भव्य गोष्टीवेल्हाळपणा (Movie Review - Bahubali - The Beginning)

Submitted by रसप on 11 July, 2015 - 23:42

वर्षभरापूर्वी एका मित्राने म्हटलं की, 'ह्यावर्षी मी मुंबई मॅरेथॉन धावणार!'
मी म्हटलं, ' बाबा रे, तू काही अ‍ॅथलीट नाहीस आणि सेलेब्रिटी तर त्याहूनही नाहीस, कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतोयस?'
पण तो ठाम होता. 'हे स्पिरीट आहे रे, 'स्पिरीट'. तुमच्या शहरासाठीचं तुमचं 'स्पिरीट''
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन धावला. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठीसुद्धा सॉलिड जिद्द लागते. त्या जिद्दीला सलाम म्हणून काही दिवसांनी त्याला एक प्रशस्तीपत्रक तर मिळालंच, त्याहीपेक्षा मित्रांकडून क्वचितच मिळणारी कौतुकाची थाप आणि कायमस्वरूपी 'इज्जत' मिळाली !

एस एस राजामाउलीचा 'बाहुबली' अशीच एक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतो. भव्य, अतिभव्य, अतिशयोक्तभव्य अश्या एकावर एक कडी करत जाणाऱ्या परदेशी इतिहासपटांच्या जोडीला भारताने जोधा-अकबर वगैरे काही मोजकेच चित्रपट उभे केले आहेत. जे उभे केले, त्यांतही लिखित इतिहासाकडून कथानकं उधार घेण्याकडे जास्त कल होता. पूर्णपणे काल्पनिक कथानकावरील एक भव्य इतिहासपट बनवणं, हा एक मोठा धोका राजामाउलीनी स्वीकारला. ह्या चित्रपटाचं नेमकं बजेट काय ह्यावर १७५ कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत माहिती उपलब्ध आहे. १७५ कोटीसुद्धा काही चिल्लर नाही ! मुघल-ए-आझम बनवताना दिग्दर्शक के आसिफ ह्यांनी निर्माता शापूरजी पालनजींना पाण्यासारखा पैसा वाहवायला लावला होता, तेव्हा शापूरजींचे धाबे कसे दणाणले होते, ह्याच्या सुरस कथा बऱ्याच वाचायला मिळतात. पण वाहिलेल्या पैश्याचं जे चीज मुघल-ए-आझमच्या आरसेमहाल व इतर भव्य सेट्समध्ये झालं, तसंच चीज 'बाहुबली'नेही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

'बाहुबली'ची भव्यता शीर्षकांपासूनच सुरु होते. अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकाला करून दिलेली ही भव्यतेची अनुभूती, अगदी अखेरपर्यंत ठेवलेली आहे. काही दृश्यांमध्ये स्पेशल इफेक्ट्स कळून येतात, पण ते गुळगुळीत रस्त्यासाठी टोल भरण्याचा त्रास नसल्यासारखं निरुपद्रवी आहे.
कल्पनेच्या पलीकडे असणारा अतिप्रचंड धबधबा आपल्याला पहिल्याच दृश्यात दिसतो. एका मध्यमवयीन स्त्रीच्या (राम्या कृष्णन) मागावर काही सैनिक लागलेले असतात. तिच्या कुशीत एक लहानगं बाळही असतं. ती त्या सैनिकांपासून वाचते, मात्र जखमी अवस्थेत पाण्याच्या त्या अथांग प्रवाहाला शरण जाते. पण त्या लहान बाळाला सुरक्षित ठेवते. हे बाळ ह्या महाकाय जलपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भूमिपुत्रांना मिळते आणि त्यांच्या टोळीच्या मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. लहानपणापासून जलपर्वताच्या वरच्या बाजूस काय असेल, ह्याची जबरदस्त ओढ असलेला हा पुत्र - शिवा - पर्वतकडा चढून जायचे असंख्य अयशस्वी प्रयत्न करत राहतो. अनेक वर्षांनंतर 'शिवा'च्या (प्रभास) प्रयत्नांना यश मिळतं आणि तो त्या अज्ञात दुनियेत पोहोचतो. इथे असलेले लोक त्यालाच काय, कुणालाच माहित नसतात. काय असतं तिथे ? कोण असतात ते लोक ? शिवा कोण असतो ? नेमका संघर्ष काय आणि कुणाचा आहे ? ही सगळी कहाणी बरीच मोठी आहे. इतकी मोठी की ती एका चित्रपटात मावलेलीच नाही ! उत्कंठा शमते आहे असं वाटत असताना ती परत ताणली जाते आणि चित्रपट त्याच अपूर्ण अवस्थेत संपतो ! 'बाहुबली - द कन्क्ल्युजन - इन २०१६' असं झळकतं.

768f8441f443e6d087d962dfc19605e9.jpg

बहुतेक लोकांना हे खरंच झेपत नाही. कारण भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला अश्या अतिभव्यतेची आणि अपूर्णतेची सवय नाही. त्यातही 'पुढील वर्षापर्यंत थांबा' असं सांगितलं जाणं, म्हणजे त्यांना एक थट्टाच वाटते ! काही अंशी बरोबरही आहे म्हणा. पुढील भाग वर्षाखेरीस किंवा दोन-तीन महिन्यांत प्रदर्शित करायला काहीच हरकत नव्हती. पण, निर्मात्यांचं गणित काय असेल ते अडीचशे कोटींची फोडणी जेव्हा बसते, तेव्हाच कळत असावं !

मूळ चित्रपट तेलुगुमध्ये बनलेला आहे. हिंदीत त्याची डब केलेली आवृत्ती आहे. ह्या विसंगातीशी जुळवून घेण्यात आपला थोडासा वेळ जातो. त्यात भर म्हणून काही ठिकाणी गंभीर रसभंग आहेत. उदा. - शेकडो लोक मिळून ओढत असलेल्या दोरखंडाला झोळ असणे, काहीही गरज नसताना मध्येच एक आयटम सॉंग येणे, सर्वदूर फरशीचं बांधकाम आणि दृष्टीपथातसुद्धा एखादंही झाड नसताना म्हातारीने मोठ्ठा खड्डा भरून काटक्या गोळा करणे आणि त्या काटक्या तिला तिच्या आसपास २४ तास मिळतच राहणे वगैरे. डब केलेले संवाद असल्याने त्यांत विशेष दम नाहीच, उलटपक्षी 'वो देखो तुम्हाला बेटा क्या कर रहा है.. वो देखो तुम्हारी मां क्या कर रही है..' सारख्या पुनरुक्तीही खटकतात.

मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो आणि त्याच वेळी 'अवंतिका' (तमन्ना) चा प्रेमिक म्हणून हळुवार अभिनयसुद्धा चांगलाच करतो.
त्याच्या विरुद्ध भूमिकेतल्या 'राणा दग्गुबती'ला आपण 'दम मारो दम' मध्ये बऱ्यापैकी मोठ्या आणि 'बेबी' व 'यह जवानी है दिवानी' मध्ये छोट्या भूमिकांत पाहिलं आहे. त्याची धिप्पाड देहयष्टी त्याचं इथलं काम आपोआपच करून जाते. माजलेल्या रानटी सांडाशी झुंजण्याचा प्रसंग असो की एका साम्राज्याचा अधिपती म्हणून मिरवणं असो, त्याला शोभून दिसतं.
तमन्नाच्या अंगावर एका दृश्यात असंख्य फुलपाखरं बसलेली दाखवले आहे, ते जराही अतिशयोक्त वाटू नये इतकी ती फुलासारखी सुंदर दिसली आहे. सुंदरीच्या वेशभूषेत नाजूक आणि एका लढवय्यीच्या भूमिकेत राकट दिसणं तिने चांगलं निभावून नेलं आहे.
राम्या कृष्णनने दिलेलं काम चोख केलं आहे आणि अनुष्का शेट्टीला ह्या भागात तरी विशेष काम नाहीच, कदाचित ती पुढच्या भागात जास्त दिसेल.
इतर सहाय्यक भूमिकांत सत्यराज (ज्याला आपण 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत पाहिलं होतं) आणि नासर लक्षात राहतातच. खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त !

रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !

सेंथिल कुमार ह्यांचं छायाचित्रण आणि मनू जगध ह्यांचं कलादिग्दर्शन निश्चितच दाद देण्यायोग्य आहे. माहिष्मतीचा राजमहाल, अद्भुतरम्य निसर्ग, प्रत्येक दृश्यात जपलेली भव्यता केवळ अप्रतिम !

राजामाउलींचं अभिनंदन आधीच करून झालं आहे. तरी एक कहाणी सांगायला सात तासांची आवश्यकता भासणं, हे बरोबर आहे की नाही हे दुसरा भाग पाहिल्यावरच नेमकं कळेल. पण ह्या पहिल्या भागाची कहाणीसुद्धा आटोपशीर करायला हवीच होती. केवळ भव्यतेच्या ध्यासापोटी इतर काही ठिकाणी थोडी डोळेझाक केली असावी की काय असं वाटतं. अनावश्यक प्रसंग, लांबण, गोष्टीवेल्हाळपणा थोडा टाळायला हवा होता.
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अ‍ॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
वन स्टार फॉर द एफर्ट.

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bahubali-beginning.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १२ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

MB Image.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी बघितला. आवडला
प्रभास फारच आवडला. पण राणा चे काम जास्त आवडले.
अतिभव्य हा शब्द योग्य वाटतो .
सर्वांत जास्त वाईट तमन्नाच्या कॅरेक्टरचं वाटलं. --- हो एकदम आपला गोल , कर्तुत्व , शौर्य सगळ सोडूनच देते. आता ते सगळ तो पूर्ण करेल म्हणे

सगळीकडे housefull होता. जाता जाता राहुल ला बघितले तर तिकिटे मिळत होती. लोक शिट्या वैगरे मारत होती . खूप वर्षांनी असा माहोल बघितला.

काल बघितला...वीकडेला सुद्धा हाउसफुल्ल होता.
प्रभास आवडला...:) राम्या कृष्णन चे काम फार छान..थिएटरमध्ये फुल्ल शिट्या, टाळ्या चालू होत्या.

ShravaN beLagoLachyaa bahubalicha kaahi reference aahe kaa ? Haach shabd omkara madhe paN vaaparalaay.

थिएटरमध्ये फुल्ल शिट्या, टाळ्या चालू होत्या.
>>>
सिरीअसली? असल्या धमाल कॅटेगरीतला आहे का पिक्चर .. जमवायलाच हवा मग

ओम्कारामध्ये वापरलेला बाहुबली हा शब्द त्या मातीतला शब्द आहे. तिथे सगळ्यात वजनदार गुंड असतो त्याच्या साईडकिकला बहुतेक बाहुबली म्हणतात. ओम्कारामध्ये अजय तिथल्या मातब्बर गुंडाचा हस्तक असतो.

उत्तरप्रदेशबिहार याबाजुला "बाहुबली" याचा अर्थ हुकुमत असणारा/गाजवणारा घेतात. म्हणून बाहुबली नेता असे विशेषण नेत्यांच्या नावापुढे लावले जाते.
ओंकारामधे जेव्हा "लंगडा त्यागी बाहुबली" अशी घोषणा त्यांचा मित्र करत असतो तेव्हा त्याचा अर्थ तो आता अजयच्या हाताखालून मुक्त होउन स्वतंत्र निर्णय घेउ शकणारा बाहुबली होणार त्याची स्वतंत्र हुकुमत गाजणार.

मी मराठी धड्यात तो शब्द वाचला होता ( श्रावण बेळगोळ संबंधात ) मग थेट ओमकारा सिनेमात.. असा चपखल शब्द हिंदी सिनेमात अधे मधे ऐकलाच नव्हता. स्पेशल इफेक्ट्स आपल्याकडे पण आता चांगले असतात, पण आपल्या चित्रपटात, कथा चांगली हवी अशी अपेक्षा असणे साहजिकच आहे.

स्पेशल इफेक्ट्स हे खोटे असतात हे माहीत असले तरी ते बघायला आवडतातच ! मी भारतात येईपर्यंत थिएटरला राहिला पाहिजे हा सिनेमा.

त्या दिवसाची वाट बघतो आहे जेव्हा शिवाजी महाराजांच्या आणि बाजीरावाच्या आयुष्यातील घटनांवर असा भव्य-दिव्य चित्रपट मराठी-हिंदी-इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होईल.अफझलखानाचा वध,शायीस्तेखानावरील छापा,उंबरखिंडीची लढाई,दिल्लीवर स्वारी ……………. असे किती प्रसंग /घटना आहेत.

अरबी समुद्रात हजारो कोटींचे स्मारक उभारण्या पेक्षा हॉलिवूड च्या दर्जाचा चित्रपट तयार केल्यास असंख्य लोक दुवा नक्कीच देतील.
प्रतिसादाचा धाग्याशी तसा संबंध नाही पण या चित्रपटाच्या अनुषंगाने एका इच्छेचा उल्लेख.

काय कमाल आहे बघा. शुक्रवारपासुन हा चित्रपट फक्त एकाच चित्रपटगृहात आहे. म्हणजे एक का दोन आठवड्याचाच धंदा. भाइंचा बजरंगी येतोय त्याच्या डिस्ट्रीब्युटरने यांची ठासुन ठेवलेली दिसत आहे. तो सिनेमा याचेही रेकॉर्ड तोडेल. कलीयुग रे कलीयुग.

असो. जमेल तेव्हा बघावा हा चित्रपट.

कार्टून मूव्ही आहे. स्टोरीचा अजिबात पत्ता नाही. दोन चार सीन नक्कीच आवर्जून पाहण्यासारखे , बाकी इशेष काही नाही. फार मोठ्या अपेक्षा घेवून या सिनूमाला जावू नका.

काल पाहिला. एकदा पाहण्यासारखा आहे. अतिभव्यतेचा कंटाळा येईल असे वाटलेले पण मोठ्या पडद्यावर मजा आली पाहताना. अधेमध्ये साउथी स्लो मोशन अतिरेक कंटाळा आणतो. तेवढे टाळले असते तर बरे झाले असते. बाकी कथा काल्पनिक असली तरी ब-यापैकी गुंगवुन ठेवते. सगळ्यांची कामे ब-यापैकी विश्वसनिय झालेली आहेत.

दुस-या भागाचे प्रयोजन कळले नाही. पहिला नीट एडिट केला असता पुढचा भागही यातच बसला असता. ते आयटेमगाणे आणि हिरो हिरविनीचे गाणे - दोघांचीही चित्रपटात अजिबात गरज नव्हती, गाणी ऐकायला मात्र छान होती. हिरोईनीचे पहिले गाणे खुपच सुंदर होते. ते नसते तर हिरो जलपर्वत चढला नसता आणि पुढचा सिनेमा घडला नसता Happy

पुढची कथाही याच आणि यामागच्या कालखंडातली आहे/असावी त्यामुळे जे दाखवलेय त्यापेक्षा अतिभव्य असे काही दाखवण्याची शक्यता बहुतेक नसावी. पुढची कथा पहिला भाग फ्लॅशबॅक आणि पुढचा भाग दुष्टांचे निर्दालन यात जाईल. यापेक्षा काहीतरी वेगळे असल्यास पाहायला नक्कीच आवडेल.

शुक्रवारी येईल की भाईजान. Happy

आता कोणी जास्त सामर्थ्यवान आहे त्यावर शुक्रवारी काय होईल ते ठरेल. हा चित्रपट गर्दी खेचतोय. कालचा शो ९.३० चा होता, १२.१५ ला संपणारा, तरीही १३५ सिटर थेटर अर्धे भरलेले होते. विकडेजना एवढी गर्दी म्हणजे खुप झाले. दिधदो विकडेला आम्ही गेलेलो त्याला जेमतेम १०-१२ माणसे होती. भाईजान पहिल्या दिवशी गर्दी खेचेल पण चित्रपट तेवढा चांगला नसेल तर नंतर कोणी येणार नाही. ह्याचे चित्र तसे दिसत नाहीय.

शुक्रवारपासुन कसे असणार कांपो. भाइजान का बजरंगी आरेला है ना.>>
तेच तर म्हणतोय ना मी कधीचे. Sad

तेच तर म्हणताहेत कांपो. आज जरी ४ शोज असले तरी शुक्रवारी भाईजान असणार त्याच्या जागी. पण साऊथमध्ये भाईजानला जागा मिळत नाहीये असे ऐकलेय. तिथे ह्याला उतरवुन भाईजानला आणायला कोणी तयार नाही. तिथे उलटी लॉबीयिंग आहे Happy

तेच तर म्हणतोय ना मी कधीचे.> ओह मी वाचलं नव्हतं. Happy पण निळा चेहरा का?

पण साऊथमध्ये भाईजानला जागा मिळत नाहीये असे ऐकलेय. तिथे ह्याला उतरवुन भाईजानला आणायला कोणी तयार नाही. >>>>साउथ पब्लिकला भव्यदिव्य आवडतं.

ह्या कथेतली अजुन एक गोष्ट मला आवडली. इथे रणांगणात शत्रुची डो़की उडवायला जरी पुरूष असले तरी राज्यातला अंतिम निर्णय स्त्रियांचा आहे. त्या निर्णयाच्या विरूद्ध जायची हिंमत कोणी करत नाही. राजवाड्यात पण आणि जंगलात पण. Happy

Pages