भव्य गोष्टीवेल्हाळपणा (Movie Review - Bahubali - The Beginning)

Submitted by रसप on 11 July, 2015 - 23:42

वर्षभरापूर्वी एका मित्राने म्हटलं की, 'ह्यावर्षी मी मुंबई मॅरेथॉन धावणार!'
मी म्हटलं, ' बाबा रे, तू काही अ‍ॅथलीट नाहीस आणि सेलेब्रिटी तर त्याहूनही नाहीस, कशाला उगाच जीवाला त्रास करून घेतोयस?'
पण तो ठाम होता. 'हे स्पिरीट आहे रे, 'स्पिरीट'. तुमच्या शहरासाठीचं तुमचं 'स्पिरीट''
तो पूर्ण नाही, हाफ मॅरेथॉन धावला. पण हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्यासाठीसुद्धा सॉलिड जिद्द लागते. त्या जिद्दीला सलाम म्हणून काही दिवसांनी त्याला एक प्रशस्तीपत्रक तर मिळालंच, त्याहीपेक्षा मित्रांकडून क्वचितच मिळणारी कौतुकाची थाप आणि कायमस्वरूपी 'इज्जत' मिळाली !

एस एस राजामाउलीचा 'बाहुबली' अशीच एक हाफ मॅरेथॉन पूर्ण करतो. भव्य, अतिभव्य, अतिशयोक्तभव्य अश्या एकावर एक कडी करत जाणाऱ्या परदेशी इतिहासपटांच्या जोडीला भारताने जोधा-अकबर वगैरे काही मोजकेच चित्रपट उभे केले आहेत. जे उभे केले, त्यांतही लिखित इतिहासाकडून कथानकं उधार घेण्याकडे जास्त कल होता. पूर्णपणे काल्पनिक कथानकावरील एक भव्य इतिहासपट बनवणं, हा एक मोठा धोका राजामाउलीनी स्वीकारला. ह्या चित्रपटाचं नेमकं बजेट काय ह्यावर १७५ कोटींपासून ते २५० कोटींपर्यंत माहिती उपलब्ध आहे. १७५ कोटीसुद्धा काही चिल्लर नाही ! मुघल-ए-आझम बनवताना दिग्दर्शक के आसिफ ह्यांनी निर्माता शापूरजी पालनजींना पाण्यासारखा पैसा वाहवायला लावला होता, तेव्हा शापूरजींचे धाबे कसे दणाणले होते, ह्याच्या सुरस कथा बऱ्याच वाचायला मिळतात. पण वाहिलेल्या पैश्याचं जे चीज मुघल-ए-आझमच्या आरसेमहाल व इतर भव्य सेट्समध्ये झालं, तसंच चीज 'बाहुबली'नेही केलं आहे असं म्हणायला हरकत नाही.

'बाहुबली'ची भव्यता शीर्षकांपासूनच सुरु होते. अगदी सुरुवातीलाच प्रेक्षकाला करून दिलेली ही भव्यतेची अनुभूती, अगदी अखेरपर्यंत ठेवलेली आहे. काही दृश्यांमध्ये स्पेशल इफेक्ट्स कळून येतात, पण ते गुळगुळीत रस्त्यासाठी टोल भरण्याचा त्रास नसल्यासारखं निरुपद्रवी आहे.
कल्पनेच्या पलीकडे असणारा अतिप्रचंड धबधबा आपल्याला पहिल्याच दृश्यात दिसतो. एका मध्यमवयीन स्त्रीच्या (राम्या कृष्णन) मागावर काही सैनिक लागलेले असतात. तिच्या कुशीत एक लहानगं बाळही असतं. ती त्या सैनिकांपासून वाचते, मात्र जखमी अवस्थेत पाण्याच्या त्या अथांग प्रवाहाला शरण जाते. पण त्या लहान बाळाला सुरक्षित ठेवते. हे बाळ ह्या महाकाय जलपर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भूमिपुत्रांना मिळते आणि त्यांच्या टोळीच्या मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. लहानपणापासून जलपर्वताच्या वरच्या बाजूस काय असेल, ह्याची जबरदस्त ओढ असलेला हा पुत्र - शिवा - पर्वतकडा चढून जायचे असंख्य अयशस्वी प्रयत्न करत राहतो. अनेक वर्षांनंतर 'शिवा'च्या (प्रभास) प्रयत्नांना यश मिळतं आणि तो त्या अज्ञात दुनियेत पोहोचतो. इथे असलेले लोक त्यालाच काय, कुणालाच माहित नसतात. काय असतं तिथे ? कोण असतात ते लोक ? शिवा कोण असतो ? नेमका संघर्ष काय आणि कुणाचा आहे ? ही सगळी कहाणी बरीच मोठी आहे. इतकी मोठी की ती एका चित्रपटात मावलेलीच नाही ! उत्कंठा शमते आहे असं वाटत असताना ती परत ताणली जाते आणि चित्रपट त्याच अपूर्ण अवस्थेत संपतो ! 'बाहुबली - द कन्क्ल्युजन - इन २०१६' असं झळकतं.

768f8441f443e6d087d962dfc19605e9.jpg

बहुतेक लोकांना हे खरंच झेपत नाही. कारण भारतीय चित्रपटाच्या प्रेक्षकाला अश्या अतिभव्यतेची आणि अपूर्णतेची सवय नाही. त्यातही 'पुढील वर्षापर्यंत थांबा' असं सांगितलं जाणं, म्हणजे त्यांना एक थट्टाच वाटते ! काही अंशी बरोबरही आहे म्हणा. पुढील भाग वर्षाखेरीस किंवा दोन-तीन महिन्यांत प्रदर्शित करायला काहीच हरकत नव्हती. पण, निर्मात्यांचं गणित काय असेल ते अडीचशे कोटींची फोडणी जेव्हा बसते, तेव्हाच कळत असावं !

मूळ चित्रपट तेलुगुमध्ये बनलेला आहे. हिंदीत त्याची डब केलेली आवृत्ती आहे. ह्या विसंगातीशी जुळवून घेण्यात आपला थोडासा वेळ जातो. त्यात भर म्हणून काही ठिकाणी गंभीर रसभंग आहेत. उदा. - शेकडो लोक मिळून ओढत असलेल्या दोरखंडाला झोळ असणे, काहीही गरज नसताना मध्येच एक आयटम सॉंग येणे, सर्वदूर फरशीचं बांधकाम आणि दृष्टीपथातसुद्धा एखादंही झाड नसताना म्हातारीने मोठ्ठा खड्डा भरून काटक्या गोळा करणे आणि त्या काटक्या तिला तिच्या आसपास २४ तास मिळतच राहणे वगैरे. डब केलेले संवाद असल्याने त्यांत विशेष दम नाहीच, उलटपक्षी 'वो देखो तुम्हाला बेटा क्या कर रहा है.. वो देखो तुम्हारी मां क्या कर रही है..' सारख्या पुनरुक्तीही खटकतात.

मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो आणि त्याच वेळी 'अवंतिका' (तमन्ना) चा प्रेमिक म्हणून हळुवार अभिनयसुद्धा चांगलाच करतो.
त्याच्या विरुद्ध भूमिकेतल्या 'राणा दग्गुबती'ला आपण 'दम मारो दम' मध्ये बऱ्यापैकी मोठ्या आणि 'बेबी' व 'यह जवानी है दिवानी' मध्ये छोट्या भूमिकांत पाहिलं आहे. त्याची धिप्पाड देहयष्टी त्याचं इथलं काम आपोआपच करून जाते. माजलेल्या रानटी सांडाशी झुंजण्याचा प्रसंग असो की एका साम्राज्याचा अधिपती म्हणून मिरवणं असो, त्याला शोभून दिसतं.
तमन्नाच्या अंगावर एका दृश्यात असंख्य फुलपाखरं बसलेली दाखवले आहे, ते जराही अतिशयोक्त वाटू नये इतकी ती फुलासारखी सुंदर दिसली आहे. सुंदरीच्या वेशभूषेत नाजूक आणि एका लढवय्यीच्या भूमिकेत राकट दिसणं तिने चांगलं निभावून नेलं आहे.
राम्या कृष्णनने दिलेलं काम चोख केलं आहे आणि अनुष्का शेट्टीला ह्या भागात तरी विशेष काम नाहीच, कदाचित ती पुढच्या भागात जास्त दिसेल.
इतर सहाय्यक भूमिकांत सत्यराज (ज्याला आपण 'चेन्नई एक्स्प्रेस'मध्ये दीपिकाच्या वडिलांच्या भूमिकेत पाहिलं होतं) आणि नासर लक्षात राहतातच. खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त !

रहमान आणि एम एम करीम, हे इलय्या राजांनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने हिंदीला दिलेले हल्लीचे अनमोल संगीतकार आहेत. करीमच्या क्रिमिनल, जिस्म, जख्म, सूर अश्या अनेक चित्रपटांच्या संगीताची मोहिनी रसिक श्रोत्यांच्या मनावरून सहजासहजी उतरणारी नाही. इथेही करीम उत्कृष्ट मेलोडी देतात. खासकरून 'पंछी बोले..' हे गाणं तर संपूच नये असं वाटावं, इतकं गोड आहे !

सेंथिल कुमार ह्यांचं छायाचित्रण आणि मनू जगध ह्यांचं कलादिग्दर्शन निश्चितच दाद देण्यायोग्य आहे. माहिष्मतीचा राजमहाल, अद्भुतरम्य निसर्ग, प्रत्येक दृश्यात जपलेली भव्यता केवळ अप्रतिम !

राजामाउलींचं अभिनंदन आधीच करून झालं आहे. तरी एक कहाणी सांगायला सात तासांची आवश्यकता भासणं, हे बरोबर आहे की नाही हे दुसरा भाग पाहिल्यावरच नेमकं कळेल. पण ह्या पहिल्या भागाची कहाणीसुद्धा आटोपशीर करायला हवीच होती. केवळ भव्यतेच्या ध्यासापोटी इतर काही ठिकाणी थोडी डोळेझाक केली असावी की काय असं वाटतं. अनावश्यक प्रसंग, लांबण, गोष्टीवेल्हाळपणा थोडा टाळायला हवा होता.
मात्र ह्या सगळ्याला सहन करून 'बाहुबली' एकदा तरी पाहावा असाच आहे. कारण अथक धावणाऱ्या हॉलीवूड अ‍ॅथलीटाचा जोडीने आपला नवखा भारतीय मित्र जिद्दीने धावायला उतरला आहे. कौतुक वाटायलाच हवं !
वन स्टार फॉर द एफर्ट.

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2015/07/movie-review-bahubali-beginning.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज १२ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-

MB Image.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Baghaayachaa aahech, he vaachoon tar nakkeech. Tamannaacha ek photo ithe oaN dyaa ki raav.

प्रोमोज पाहून पहावासा वाटत होताच. परिक्षण वाचून उत्सुकता अजून वाढली.
असले भव्य सिनेमे थिएटर मध्येच पहायला हवे.

स्पॉक,

झोळ = स्वत:च्या वजनामुळे आलेल्या सैलपणातून दिसणारी दोराची अधोगोलाकार बाह्यरेखा

आ.न.,
-गा.पै.

आवडली ओळख. अनुष्का ला फार काम नाही हे वाचून निराशा झाली :). मात्र तरीही चित्रपट पाहणार. भव्यता वगैरे मुळे थिएटर मधेच पाहणे चांगले असे दिसते.

मगधीराचीच पुढची आवृत्ती दिसत आहे. तोही राजमौलीचाच होता. प्रभासच्या आईचा रोल म्हणे आधी श्रीदेवीला ऑफर केला होता पण तिने तो for obvious reasons नाकारला. आपण तर नक्की पाहणार हा आणि तो सुद्धा तेलुगुत - माझा डब version वर अजिबात विश्वास नाही.

मगाशीच न्यूज वाचली की बाहुबली ने किंग खानला मात दिली.
पहिल्या दिवशीची कमाई ६० कोटी, शाहरूखच्या हॅपी न्यू ईयरची ४५ कोटी होती.

मगधारी सहज वेळ कटत नव्हता म्हणून टीव्हीवर पाहिलेला, मजा आलेली. हा त्यापेक्षा जास्त मजा देत असेल तर बघणार आणि थिएटरलाच बघणार.

रजनीकांत शिवाय एखादा चित्रपट एवढी कमाई करत असेल तर त्याचे कौतुक आहेच. Happy

पहिल्या दिवशीची कमाई ६० कोटी, शाहरूखच्या हॅपी न्यू ईयरची ४५ कोटी होती. >> हे आजकाल दर नवीन बर्‍यापैकी पिक्चर च्या बाबतीत ऐकू येत आहे. मग 'फॅन' यापेक्षा कमावेल, आणखी कोणता त्यापेक्षा. सगळी कमाई पहिल्या दोन तीन दिवसांत, लोकांना पिक्चर नक्की कसा आहे हे कळायच्या आत. हे क्रेडिट खरे म्हणजे चित्रपटाचे नव्हे - त्याच्या मार्केटिंग चे, रिलीज च्या टायमिंग चे आहे.

लोकांना आधी त्यातील अभिनेते, दिग्दर्शक सोडले तर कसलीही माहिती नसलेले व रिलीज झाल्यानंतर पहिला आठवडा हीरो/डायरेक्टर च्या नावावर, व नंतर चित्रपटाच्या दर्जावर हिट जाणारे चित्रपट आजकाल फारसे दिसत नाहीत. त्याकरता आता 'स्लीपर हिट' ही टर्म ऐकू येउ लागली आहे.

आणि त्यांच्या टोळीच्या अनौरस मालकिणीला दैवदत्त पुत्रप्राप्ती होते. >>>>>> अनौरस ???? जरा शब्द परत तपासा बरं ! तुम्ही म्ह्णताय तोच अर्थ आहे का ???

कालच पाहिला . धबधबा केवळ अशक्य सुंदर आहे.
महिशमती चे एरिअल शॉट्स ही उत्तम .
पण भौगोलिक गोष्टीत मार खाल्लाय - कुठे जंगल , लगेच बाजूला बर्फ , लगेच मोकळ मैदान ई. ई .
शिवगामी राणी मस्त .

मुख्य भूमिकेत 'प्रभास' खूप सहज वावरतो. त्यात वारंवार सुपरस्टार 'नागार्जुना'चा आभास होत राहतो. त्याची एनर्जी केवळ अप्रतिम आहे. काही अमानवी दृश्यं तो त्याच्या पिळदार देहयष्टी व आश्वासक शारीर अभिनयाने विश्वसनीय करवतो .
खासकरून सत्यराजचा 'कट्टप्पा' जबरदस्त ! >>>>> + १०००००००

मेरा बेटा आयेगा , मेरा बेटा जरूर आयेगा - डिट्टो करणअर्जुन आयेन्गे .
शिवा महालाच्या आसपास आल्यावर म्हातारीला चाहुल लागणं - " मां , तुम्हे कैसे पता चलता है के मै आ गया हूं " (कखुकग) अशा प्रसंगाची आठवण करून देतात .

शेवटची लढाई नको तितकी लांबली आहे - कंटाळा येउ लागतो.
मध्यंतरापूर्वीची १० मि. आणि त्यानंतर अर्धा तास चित्रपट रंजक वाटतो . मध्ये मध्ये कंटाळा येतो .
आणि अतिशय अचानक , अपूर्णावस्थेत चित्रपट संपतो , त्यामुळे प्रेक्शक --- अरे! संपला ?? . अशा गोंधळात बाहेर पडतो .

तमन्ना सुन्दरच दिसते. शिवा तिच रूप पालटवतो त्या वेळी आणी त्या नंतरच्या गाण्यात केवळ अप्रतिम !
तिचा हिरव्या सापाचा सीन मस्त आहे . ज्या पद्धतीने ती सापाला विचलीत करते , Happy .

आता प्रतिक्शा २०१६ ची .

फारएण्ड , खरेय.. पण ज्या ईमेजवर वा नावावर चित्रपट पहिल्या दिवशीच प्रेक्षक खेचतो ते नाव आणि तशी ईमेज आधी बनवावी लागते.
आणि अपवाद वगळता यात अल्लाह मेहेरबान तो गधा पेहेलवान अश्यातला भाग नसतो वा ते नाव एका दिवसात बनत नाही तर त्यासाठी मेहनत आणि टॅलेंट दोन्ही लागते.
त्यामुळे या गोष्टीचे श्रेय तरी द्यावेच लागेल Happy

मेरा बेटा आयेगा , मेरा बेटा जरूर आयेगा - डिट्टो करणअर्जुन आयेन्गे .
शिवा महालाच्या आसपास आल्यावर म्हातारीला चाहुल लागणं - " मां , तुम्हे कैसे पता चलता है के मै आ गया हूं " (कखुकग) अशा प्रसंगाची आठवण करून देतात .

अगदी हेच लिहिणार होतो. आपल्याकडच्या पिक्चरमधले आयांचे असले प्रेम, त्यांना होणारे भास / साक्षात्कार त्याचा दिखावूपणा डोक्यात जातो.

बाकी कथेमध्ये रामायण , महाभारताची छाप दिसून येते. अमरेंद्र बाहुबली आणि भल्लाल म्हणजे कौरव पांडव (भीम/ अर्जुन - दुर्योधन) वाटतात. भल्लालचा बाप म्हणजे धृतराष्ट्र (अपंग). राजसेना मात्र कुंती आणि द्रौपदी दोन्हीचे काम करते तर कटप्पा भीष्म-द्रोणाचे!
तर कधी भाल्लालचे राज्य म्हणजे सोन्याची लंका , भल्लाल रावण आणि नायक हनुमान अशी तुलना करावी वाटते.

पण ज्या ईमेजवर वा नावावर चित्रपट पहिल्या दिवशीच प्रेक्षक खेचतो ते नाव आणि तशी ईमेज आधी बनवावी लागते. >> नाही मी त्याबद्दल बोलत नव्हतो. ते सगळे गृहीत धरलेले आहे. लोकप्रिय कलाकार किंवा लोकप्रिय दिग्दर्शक यांचा चित्रपटच सुरूवातीला केवळ नावावर पहिले २-३ दिवस चालतो. पण या पहिल्या दोन-तीन दिवसांत आधीच्या हिट चित्रपटाने जे रेकॉर्ड केले आहे ते तोडायचे असेल तर त्याला कलाकार्/दिग्दर्शक यांच्याव्यतिरिक्त वेगळ्या टीम्स चे कौशल्य जरूरी असते आणि अशा वेळी जेव्हा टुकार चित्रपट रेकॉर्ड करून जातो तेव्हा ते रेकॉर्ड हे त्या टीम्स चे श्रेय असते. लोकप्रिय कलाकार्/दिग्दर्शक अशा चित्रपटाला Necessary आहेत, पण Sufficient नाहीत. ४५ कोटी तुम्हाला जर 'बीट' करायचे असतील, तर किती थिएटर्स मधे एकाच वेळी लावायचे, किती शोज लावायचे, कोणत्या दिवशी/सणांच्या वेळेस रिलीज करायचा, त्यावेळेस इतर कोणाचे चित्रपट रिलीज होत आहेत, मार्केटिंग कोणत्या चॅनेल्स मधून कसे करायचे, कोणत्या पेपर्स मधून आधी कसल्या पुड्या सोडायच्या याचे प्रचंड मोठे गणित असते.

त्यामुळे आधीच्याचे ४५ कोटी असताना यांचे ५० कोटी होतात तेव्हा त्यात शाहरूख, सलमान, आमिर, अक्षय, रणबीर, रजनीकांत याचा सहभाग त्यात रेकॉर्ड मधे मर्यादित असतो. ते नसतील तर हे होणार नाही, पण नुसते असूनही होणार नाही.

ते नसतील तर हे होणार नाही, पण नुसते असूनही होणार नाही. >>> याच्याशी सहमत.
पण मी यातल्या पहिल्या वाक्याला वेटेज जास्त देतो. कारण ईदला सलमान चित्रपट प्रदर्शित करतो म्हणून त्या दिवशी तो करोडो कमावतो हे खरे असले तरीही ईतरांना कोणी ईदला चित्रपट प्रदर्शित करायची मनाई केली नसते, पण तरीही त्यांना सलमानशी स्पर्धा करणे झेपणार नाही हे माहीत असल्याने ते मागे हटतात. म्हणून याचे पहिले श्रेय सलमानलाच.

फा, अचूक लिहिले आहेस. नंतर वेळ मिळाला की थोडी मुद्द्यांमध्ये अजून भर घालते.

बाहुबलीविषयी : काल चित्रपट पाहिला. वाईट अजिबात नाहीये, पण "India's answer to LOTR" वगैरे अजिबात नाहीये. प्लॉट साधासुधा आणि अजिबात क्लिष्ट नाही. बहुतांश महागडे स्पेशल ईफेक्ट्स त्या लव्हस्टोरीमध्ये वाया घालवले आहेत. युद्धाची दृश्ये अप्रतिम. टिपिकल साऊथ इंडियन बटबटीतपणा अधेमध्ये दिसतच राहतो.

सर्व सहाय्यक लोकांमध्ये सत्यराज आणि नासरचं काम आवडलं मेन हीरोंमध्ये मला राणा जास्त आवडला, प्रभासपेक्षाही. Happy

सर्वांत जास्त वाईट तमन्नाच्या कॅरेक्टरचं वाटलं. सुरूवातीला एकदम राकट वगैरे दिसणारी, एकदम कड्डक डायलॉग टाकणारी ही मुलगी ऐन प्रसंगात नाहीच आहे. त्याआधी असलेले सर्व फाईट सीन तिनं कमाल केले आहेत. देवसेनेला सोडवताना किमान ती त्या प्रसंगामध्ये शिवासोबत लढताना दाखवायला हवी होती-- ती त्या लव्हसाँगनंतर एकदम "टिपिकल साऊथी हीरॉइन" बनते हे फार खटकलं. दुसर्‍या भागात तिला याहून जास्त रोल मिळावा.

परिक्षण वाचुन चित्रपट पाहावासा वाटला पण ट्रैलरमध्ये हा भव्य दिखावा अंगावर आल्यासारखा, खुपच खोटा वाटला. म्हणजे तसा तो आहे खोटाच पण पाहताना इतका प्रचंड भव्य (?? काय तरी शब्दयोजना Happy ) दिसतोय की त्या अतीभव्यतेमुळे त्याचा तो खोटेपणा जाणवत राहतो आणि त्यामुळे (निदान माझी तरी) हे सगळे प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्याची उत्सुकता थोडी कमी झाली. असो.

बाकी हल्लीची कोटींच्या उड्डाणांच्या बातम्या वाचुन गंमत वाटते. काही वर्षांपुर्वीपर्यंत चित्रपटाच्या जाहिरातीत रौप्यमहोत्सवी आठवडा, सुवर्णमहोत्सवी आठवडा असे उल्लेख असायचे. हे आठवडे एकाच चित्रपट्गृहातील चित्रपटाच्या मुक्कामावरुन मोजलेले असायचे. चित्रपट हिट की फ्लॉप हे ठरायचे या आठवड्यांवरुन. नंतरच्या काळात चित्रपट एका वेळी २५-५०-१०० चित्रगृहात वितरीत करुन पहिल्याच आठवड्यात त्याचा रौप्य वा सुवर्णमहोत्सव किंवा अजुन कसला हवा तो महोत्सव झाला असे मानायची पद्धत पडली.

सध्या ही आठवड्यांची मोजणी कोणी करत नाही. आता पहिल्या दिवशी वा आठवड्यात किती गल्ला जमवला याला महत्व आलेय. पहिल्या आठवड्यात १०० कोटी कमावणारा हिट, मग भले पुढच्याच आठवड्यात सगळीकडुन उतरला तरी चालतो. अजुन पुढे जाता अजुन नवी नवी परिमाणे लाभतील यशाच्या मोजणीला.

या एका कारणामुळे माझे कित्येक चित्रपट पाहायचे राहुनच गेले. परिक्षणे वाचुन पाहावासा वाटतो, शेजारच्या चित्रगृहात लागलेलाही असतो. पण कामाच्या गडबडीट थोडे दुर्लक्ष करुन नंतर पाहायला जावे तोवर तो तिथुन उतरुन गेलेला असतो. मग त्याला इतरत्र शोधत कोण बसेल?? राहुन जातो मग पाहायचा. Happy

बाय द वे त्या 'शिवा' पुस्तकांशी याचा काही संबंध आहे का?<<<< नाही. शिवा ट्रायॉलॉजी हरप्पान सिव्हिलायझेशनम्ध्ये बेस्ड आहे. गोवारीकरचा मोहेंजोदडो शिवावर बेस्ड नाही. अमिशच्या शिवा ट्रायलॉजीचे चित्रपट हक्क करन जोहरनं विकत घेतले आहेत. त्याला ह्रितिक मेन लीडमध्ये हवा होता, पण गोवारीकर मोहेंजोदडो बनवत असल्यानं करनला दुसरा अभिनेता शोधावा लागेल. (थोडक्यात बहुतेक एस आर के हा रोल करेल)

थॅन्क्स नंदिनी, साधना.

त्या पहिल्या वीकेण्डच्या कमाईबद्दल वेगळा धागा मी उघडतो एक दोन दिवसांत, तेथे लिहू आपण. हा धागा या परीक्षणाच्या/चित्रपटाच्या चर्चेवर राहू दे.

मी काल हिन्दी आवृत्ती पाहिली आणि डबींचा त्रास नाही वाटला.

मला फक्त पहिलाच भाग आवडला. दुसरा भाग आणि ती लढाई नकोशी होते.

ग्राफिकचा भाग वाया गेला. तो सिनेमात योग्य जागी बसलाच नाही. काहीतरीच विचित्र वाटतो.

मी काल हिन्दी आवृत्ती पाहिली आणि डबींचा त्रास नाही वाटला.

मला फक्त पहिलाच भाग आवडला. दुसरा भाग आणि ती लढाई नकोशी होते.

ग्राफिकचा भाग वाया गेला. तो सिनेमात योग्य जागी बसलाच नाही. काहीतरीच विचित्र वाटतो.

काल पाहिला. चांगला आहे पण अर्थात नंदिनीला अनुमोदन - Indian answer to LOTR वगैरे अजिबातच नाही(कोण म्हणलय का अस? आपली लोक तस पण बऱ्याचदा काहीही बोलतात).
बाकी स्पेशल इफेक्ट्स बद्दल मला काहीही बोलायच नाहीये, एवढं बजेट आहे म्हणजे असे इफेक्ट्स असणारच आणि राजमौलीचे सिनेमे इफेक्ट्स साठी फेमस आहेत - मगधीरा, ईगा(मख्खी). मला कमकुवत बाजू वाटली ती पटकथेत! fantasy आणि ती सुद्धा एवढी भव्यदिव्य आहे म्हटल्यावर एका भागात संपेल अशी अपेक्षा नाहीच पण बाहुबलीची कथा इतकी सरधोपट (हे पहिल्या भागावरून केलेले विधान आहे) आहे की एका भागात हे सर्व बसवता आले असते असे प्रकर्षाने जाणवले. epic fantasy बनवताय ना, मग इतकी साधी सरळ कथा, कुछ पट्या नहीं.

आणि @नंदिनी >>(थोडक्यात बहुतेक एस आर के हा रोल करेल) >> शुभ बोला ना ताई! शिवा म्हणून इतका रोगट अत्याचार नाही सहन होणार हो!

Pages