शहरातली ’समोवार’ जेव्हा बंद होत जातात..

Submitted by शर्मिला फडके on 6 April, 2015 - 00:26

’समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतात. मुंबईसारख्या गजबजाटी, कोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव ’समोवार’ असतं.
--
सकाळचे अकरा वाजले की एक परदेशी तरुण मुलगी आपल्या लहान मुलीला प्रॅममधे घालून रोज त्या रेस्टॉरन्टमधे यायची, पॉट टी मागवायची आणि तिथल्या टेबलावर बसून पुस्तक वाचायची किंवा पत्र लिहायची. लिहिताना काहीवेळा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे. चेहराही अनेकदा दमलेला दिसायचा. रेस्टॉरन्टच्या मालकिणीच्या ते लक्षात आलं तेव्हा तिने ऑर्डर दिलेली नसतानाच त्या टेबलावर ऑमलेट आणि ज्यूसही पाठवायला सुरुवात केली. पत्र लिहिणारी सावकाश ते संपवायची. मग बिल देऊन मुलीला घेऊन निघून जायची. जाताना रेस्टॉरन्टच्या मालकिणीचे आभार मानायला विसरायची नाही. मग हळू हळू गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की ती तरुण मुलगी आपल्या इंग्लंडमधल्या नातेवाईकांना खूप मिस करतेय. भारतात रहाण्याची, इथल्या आयुष्याशी जुळवून घेण्याची सवय करण्याची धडपड करताना थकून जातेय. आपल्या लहान मुलांचं आवरुन, घरातलं काम करुन, नव-याचं खाणंपिणं करुन तो कामावर गेला की ती इथे येते आणि इथेच फ़क्त तिला निवांत वेळ मिळतो घरच्यांना पत्र लिहून खुशाली कळवण्याचा, तिकडच्या मित्र-मैत्रिणींना इथल्या गमती जमती कळवायला. काही दिवसांनंतर एका संध्याकाळी ती आपल्या नव-यासोबत तिथे आली. तेव्हा रेस्टॉरन्टच्या मालकिणीला कळलं की तरुणी शशी कपूरची बायको, जेनिफ़र केन्डल कपूर आहे. प्रॅममधली ती चिमुरडी होती संजाना कपूर. ते रेस्टॉरन्ट होतं नुकतंच बंद झालेलं सामोवार.

सामोवार बंद होणार हे कळल्यावर संजाना कपूरने ही आठवण सांगीतली. ती जेव्हा सांगते की ती अक्षरश: या जागेत वाढली आहे, लहानपणापासूनचे अनेक आनंदाचे क्षण या जागेत साठून आहेत तेव्हा त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

एकटा, एकाकी आरा, कॅनव्हासचं ओझं घेऊन हिंडणारा, समोवारमधे बिनदुधाचा चहा पित गप्पा मारणारा. कधी समोवारमधे न खाणारा. त्याला वांग्याचं भरीत खावसं वाटलं तेव्हा त्याने समोवारमधूनच तेरा रुपये घेतले वांगी, टोमॅटो, मिरच्या आणायला आणि मग तिथल्या किचनमधे ते बनवलं.

मुंबईतून फ़्रान्सला गेलेले आणि तिथून पुन्हा पुन्हा मुंबईत येत राहिलेले, परत जात राहिलेले रझा जहांगिरमधे झालेल्या त्यांच्या एका चित्रप्रदर्शनानंतर खूप उशिरा, सगळी गर्दी ओसरल्यावर सामोवारमधे चहा प्यायला आले आणि जाताना टेबलावरच्या पेपर नॅपकिनमधे लिहून गेले- “किप मी बॅक, डोन्ट लेट मी लिव्ह, क्लास्प मी टू दिज शोरस- मुझे आप यहां रोक लिजिए-”.

लक्ष्मण श्रेष्ठ नेपाळवरुन जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकायला आले चित्रकलेच्या ओढीने. घरच्यांचा विरोध होता त्यामुळे जवळ पैसे नसायचेच. होस्टेलवर जेमतेम रात्री झोपण्यापुरता आसरा. अशात जे जे मधून पास आऊट होत असतानाच त्यांचं प्रेम जडलं एका सुंदर, श्रीमंत घरातल्या मुलीवर. जहांगिर आर्ट गॅलरीच्या पाय-यांवर ते तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत बसायचे. सामोवारच्या उषा खन्नांनी बरेच दिवस ते पाहिलं आणि त्याला आत रेस्टॉरन्टमधे येऊन बसत जा असं सुचवलं. तो मुलगा संकोचला. त्याच्याजवळ तिथे रोज चहा प्यायला पैसे नव्हते. पण सामोवारमधे चालत होतं जमेल तेव्हा पैसे दिलेले. तो मुलगा हळू हळू तिथे इतका रमला की एकदा त्याने विचारलं की ’मूली का आचार’ का बनवत नाही तुम्ही इथे? हा खास नेपाळी पदार्थ त्याला त्याच्या मैत्रिणीला खिलवायचा होता. तेव्हा त्याच्याकडूनच रेसिपी घेऊन ते बनवलं गेलं. मग तो पदार्थ मेनू कार्डावर आला. लक्ष्मण श्रेष्ठांचं पुढे त्या मुलीशी म्हणजे सुनिता परळकरांशी लग्न झाल्यावर सामोवारच्या स्टाफ़ने त्यांना पार्टी दिली. लक्ष्मण आणि त्यांची बायको सामोवारमधे नियमित येत राहिले, अगदी परवा सामोवार बंद होईपर्यंत. लक्ष्मण आवर्जून सांगतात की गरज होती तेव्हा पेंटींगची मोठी कामं त्यांना मिळाली हुसेनसारख्या इथेच मिळालेल्या मित्रांनी करुन दिलेल्या इथल्या ओळखींमधून.

लक्ष्मण श्रेष्ठ, आरा, जेनिफ़र कपूरसारखे अनेक जन असतात या अवाढव्य, गजबजलेल्या शहरात पण समोवारसारख्या जागा मात्र अगदीच मोजक्या, शेवटच्या काही उरलेल्या.

मुंबईसारख्या शहरात असं एखादं रेस्टॉरन्ट अशा या अनेकांकरता काय असतं नेमकं?

जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकणारे, तिथून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेले आर्टिस्ट, थिएटर, सिनेमामधे काही नवं करु पहाणारे, लिहू पहाणारे, कविता करणारे, स्वप्न पहाणारे हजारो तरुण आणि तरुणी.
काय हवं असतं त्यांना शहरात?

जवळ पैसे नसतात तेव्हा त्यांना उधारीवर खाण्याची मुभा, काम मिळवायला फोन करायला लागतो म्हणून कॅश काउन्टरजवळच पब्लिक बूथची सोय, चित्रकारांना त्यांची चित्र विकत घेऊ शकतील अशांशी ओळखी, लेखकांना लिहायला एक निवांत टेबल, कार्टुनिस्टकरता समोर अनेक इंतरेस्तींग चेहरे, एकंदरीत अनेकांना दिवससभर हवी तितकी, हवा तितका वेळ बसता येईल अशी जागा, ज्यांच्याकडे परमनन्ट अड्रेस नाही अशांना पत्रव्यवहार करण्याकरता एक पत्ता. कवी, पत्रकार, उभरते लेखक, जाहिरात व्यावसायिक, सिनेमा नाटकांमधे काम करणारे सगळेच एका ठिकाणी जमा होणार, मग त्यातून अनेक पुढील काळात दंतकथांचं स्थान मिळालेल्या गोष्टी घडणार. पत्रकारांना शहरातल्या सांस्कृतिक घडामोडी टिपायला वाव.. ताज्या बातम्या कळण्याचं, बातम्या घडण्याचं एक ठिकाण.

दमून भागून समोवारमधे येऊन टेकणं हे घरात येऊन टेकण्यासारखंच. रेस्टॉरन्ट अनेकांच्या लग्नाला साक्षीदार राहिलं, त्यांच्या डिव्होर्सलाही ते साक्षी होतंच. जतीन दासांनी आपलं लग्न सामोवारमधेच पंडिताला बोलावून इथल्या स्टाफ़च्या साक्षीने लावलं आणि मग त्याची आठवण म्हणून रेस्टॉरन्टच्या छतावर न्यूड काढलं. लग्न टिकलं नाही पण त्याने काढलेलं छतावरचं पेंटींग टिकलं अनेक वर्षं. मग एका पावसाळ्यात गळणा-या छतावरचं न्यूडही पुसलं गेलं. जतीन दासांनी नवं लग्न केलं. ते आणि त्यांची नवी बायको येत राहिले. नाती जमली, तुटली, पुन्हा जुळली इथे.

गीव्ह पटेल, अकबर पदमसी, जहांगिर सबावाला, अर्पना कौर, अंजोली इला मेनन, जोगेन चौधरी, अल्ताफ़, प्रोतिमा बेदी, रत्ना पाठक, नासिरुद्दीन शहा, शाम बेनेगल, अमोल पालेकर.. न्यू वेव्ह सिनेमाच्या जन्माला, बहराला, आधुनिक, समकालिन कला मुंबईत रुजत जाताना समोवार साक्षी होतं.
ज्ञानेश्वर नाडकर्णी, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, रणजित होस्कोटे, निस्सिम इझिकेल, अनिल धारकर, डॉम मोरेस, फ़्रॅन्क सिमोससारखे अनेक जण मुंबईच्या बदलांच्या, घडामोडींच्या नोंदी वृत्तपत्र, कविता, लेखांमधून वेध घेणारे इथे रमले, प्रसिद्ध झाले, अस्ताला गेले.
फ़ॅशन्स बदलल्या, बेल बॉटम आला, नाहिसा झाला, पुन्हा आला. बलराज सहानी पासुन आय एस जोहर पर्यंत, शोभा राजाध्यक्ष पासुन डॉली ठाकोर, पर्ल पदमसी, कबीर बेदी, शाम बेनेगल, लक्ष्मण श्रेष्ठ, परिक्षित सहानी, आरा, सत्यदेव दुबे अशांना यशाच्या उंबरठ्या अलिकडे झगडताना आणि मग तो ओलांडून जाताना पाहिलं.

जेव्हा खिसे रिकामे असलेले भणंग सृजनाच्या उर्मी मनात घेऊन शहरातल्या रस्त्यांवर, गल्ल्यांमधून भटकत असतात तेव्हा त्यांना अशा जागांची गरज असते. शहरातली कला-साहित्याची संस्कृती मग इथेच रुजते, फ़ोफ़ावत रहाते.
समोवारसारख्या जागा गजबजलेल्या शहरातले सांस्कृतिक ओऎसिस असतात. अशा जागा फ़क्त भेटण्याच्या, खाण्यापिण्याच्या जागा नसतात. इथले खाद्यपदार्थ उकृष्ट असतीलच असं नाही पण ते त्यांच्या चवीला, खिशाला परवडणारे, रुचणारे बनत गेलेले असतात.
इथे येणारी माणसं घडतात, मोठी होतात आणि मग जागाही मोठी होते, प्रसिद्ध होते. ग्लॅमरसही होते. पण ती उर्मट होत नाही, स्नॉबिशही नाही. ती येणा-याला जिव्हाळा देत रहाते.

IMG_20150330_170446458_HDR_0.jpg

हळू हळू शहर बदलत गेलं. बॉम्बेचं मुंबई झालं. रस्ते बदलले, नकाशे बदलायला लागले. इराणी कॅफ़े एकामागोमाग एक नाहिसे होत गेले, कॉफ़ी हाऊसेस बंद पडत गेली. स्ट्रॅन्ड सारखी घरगुती जिव्हाळ्यातून चालवलेली पुस्तकांची दुकाने बंद पडली. मिनर्व्हा, मेट्रो, रॉक्सी बंद पडलं, नाट्यगृह बंद पडली. एकेका फ़्लायओव्हरखाली अशी अनेक ठिकाणं जमिनदोस्त होत गेली. शहराच्या नकाशावरची निवांत बेटं होती जी हळू हळू खचत गेली, शहरातल्या वाढत्या चकचकाटात, झगमगाटात बुडून गेली.
तरी सामोवार होतं. ते होतं तोवर या बदलांची झळ लागली नाही. पण आता तेही नाही आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की आता यानंतर काय? अजून एखादी अशी जागा आहे का शहरात याचा विफ़ल शोध घ्यायचा की तशी निर्माण होईल अशी आशा करत रहायचं की आता काळ इतका बदललाच आहे तर अशा जागांची गरजही नसणार आपल्याला आणि कुणालाच असं समजत रहायचं?

शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो. आणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जात आणि ते शहराच्या इतिहासात फ़ेकलं जातं. अनेक जण हळहळतात. त्यात सामान्य असतात, नोकरी असलेले असतात, नसलेले असतात. शिकणारे असतात, स्ट्रगलर्स असतात. सेलेब्रिटी असतात. स्थिरावलेले, नाव कमावलेले, स्थलांतरीत, पर्यटक, अगदी हायकोर्टातले वकिल, दलाल स्ट्रीटवरचे बनिये असे अनेक जण त्या हळहळणा-यांमधे असतात. त्या जागेत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. आठवणी अडकलेल्या असतात तिथल्या टेबलखुर्च्यांमधे. ते जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा त्यांना एक कप चहावर तासनतास बसून रहायला, सिगरेटच्या धुरात विचारांची वर्तुळं काढायला, चर्चा करायला, योजना आखायला, त्या कागदावर मांडायला, इतरांची मतं आजमावून बघायला, आपल्यासारख्या इतर काहींचं नेमकं काय चाललय काय चाललेलं नाही ते चाचपडायला इथे जागा मिळालेली असते. खिशात पन्नास रुपये असणा-याला आणि पाच हजार असणा-यालाही सामावून घेण्याची क्षमता अजून कुठे असणार?
इंच इंच जागेचा हिशेब लावणा-या महागड्या शहरात अशा बेहिशेबी जागांचं मोल करता येत नाही.

सुख वाटायला, दु:ख शेअर करायला, निराशा गिळून टाकायला अशा जागांची गरज असते. शहराच्या कॉस्मोपोलिटन संस्कृतीमधे संवाद निर्माण व्हायला, एकजिनसीपणा वाढवायलाही या जागा गरजेच्या असतात.
समोवार बंद पडतात तेव्हा भेटण्याच्या जागा हरवतात. गप्पांची ठिकाणं हरवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबांनी, मित्रमैत्रिणींनी एकत्रित घालवलेले अनेक क्षण ज्या जागांमधे भरलेले असतात त्या जागा शहरातल्या रस्त्यांवरुन अचानक नाहिशा होतात.
शहरातली लोकं मग आठवणी काढत रहातात. कधी वे साईड इनच्या, कधी भुलाभाई मेमोरियल सेंटरच्या, आर्टिस्ट सेंटरच्या, कोप-यावरच्या इराण्याच्या.
अशा जागेला त्याचं असं खास व्यक्तिमत्व असतं, जे इथे येणा-यांच्या व्यक्तिमत्वातून उत्क्रांत होत जातं, घडत जातं. तेही मग हरवतं.
आणि मग शहर एकसुरी बनत जातं. जास्त यांत्रिक. मल्टीनॅशनल बॅन्क्स, ब्रॅन्डेड शॉप्स, चेन रेस्टॉरन्ट्सच्या साचेबद्ध सजावटीखाली शहर आपला चेहरा हरवत जातं. गुळगुळीत होत जातं शहराचं व्यक्तिमत्व. इतर चार आंतरराष्ट्रीय शहरांसारखंच ते एक.
शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. शहर थोडं थोडं झिजत जातं. थोडं थोडं पोकळ होत जातं.
शहरातला उबदारपणा, लोभसपणा थोडा थोडा हरवत जातो.
--
शहराला हवी असते एक जागा, जिथे गप्पा होतील निवांत, प्रेमात पडलेल्यांना नुसतंच बसता येईल एकमेकांच्या सहवासात संध्याकाळच्या सावल्या लांबेपर्यंत. स्ट्रगलर्सना आपली उमेद टिकवायला, निराशा लपवायला जागा मिळेल, भविष्याची स्वप्न रंगवायला, रंगवलेली कागदावर उतरवायला. कलाकारांना, लेखक-कवींना निवांतपणा मिळेल. एखाद्या वयस्कर, स्पर्धेत मागे पडलेल्या कलाकाराला आसपासच्या ताज्या, उमेदीच्या तरुण कलाकारांच्या सहवासात नवी उर्जा मिळेल. जागा नुसती निवांत असून चालत नाही. तशी तर अनेक एकट रहाणा-यांच्या फ़्लॅटमधेही ती असतेच. पण गरज असते वातावरणातून उर्जा मिळण्याची, इन्स्पायर होण्याची. सातत्याने येणा-या सर्जनशील व्यक्तींमुळे निर्माण झालेल्या सिनर्जीची. बिझिबीने आपले कॉलम मागून कॉलम समोवारच्या टेबलांवर बसून लिहिले ते अशा वातावरणामुळेच. नाहीतर निवांतपणाची त्याला काय कमी असणार?

मॉलच्या पाय-यांवर, फ़ूडकोर्टात, स्टारबक्स, सीसीडीमधे, टी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं? नवी पिढी खरंच तिथे काही कमावणार असतात की जे जवळ जे आहे, जे मिळू शकलं असतं तेही गमावतात? सोशल मिडियामधे, तिथल्या ग्रूप्समधे चर्चा होतंही असतील कदाचित पण वैयक्तिक सहवासांमधून जे मिळतं त्याला पर्याय नाहीच.
इतक्या जलद आणि मोठ्या प्रमाणावर नकाशे बदलत जात आहेत की लोकं विसरुनच जातील शहरात अशी बेटंही होती जिथे साधेपणा, आपलेपणा, उबदारपणासोबत सांस्कृतिक जिव्हाळा फ़ुकट मिळत होता.
--

लेख लोकमतच्या 'मंथन' पुरवणीमधून पुनर्मुद्रित.
संदर्भांकरता आभार- 'समोवार'- पुस्तकः लेखिका उषा खन्ना.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा. काय सुंदर लिहिलं आहेस. समोवारला जेमतेम तीनचारदा गेली आहे. पण जितक्यावेळा गेली आहे ते सर्व अनुभव खासमखास. समोवार बंद पडेल हे ऐकून फार वाईट वाटलं होतं पण नेमकं कशानं वाईट वाटेल हे फार नेमकेपणानं लिहिलं आहेस.

या सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

सुंदर लेख. अगदी आमच्या मनातल्या भावना उतरवल्या आहेत. अश्या जागांना खरेतर एक कल्चरल हेरिटेज( सांस्कृतिक ठेवा ) अशी मान्यता देउन. जरी काही नियम असतील तर ते जरा वाकवून का होइना. चालू ठेवायला हवे होते असे वाटले. पण धनदांडग्यांच्या, रासवट राजकारण्यांच्या कारकिर्दीत हे अनवट फूल सुकून गेले. इथला आलू पराठा- दही आणि खिमा पाव लाजवाब. आणि तो मेन्यू सुद्धा.

नव्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जिथे जहांगिर आर्ट गॅलरीलाच वेटर्नरी हॉस्पिटल म्हटले आहे. अशांच्या कडून सेन्सिटिव्हीटीची काय अपेक्षा करणार.

फार सुरेख लिहिले आहे! आपल्याला नक्की काय जपले पाहिजे ह्याचा विचार आपण करतच नाहीयोत बहुतेक Sad
ह्याच्याशी थेट संबंध नाही पण काहीच दिवसांपूर्वी माझ्या गावाजवळची एक आमराई (जवळपास १४० झाडं) कापून टाकली! तिथे आता एक गृहसंकुल उभं राहणार आहे! समोवारच्या जागी पण अशीच एखादी टोलेजंग बिल्डिंग येणार असेल! हा विकासाचा महाराक्षस आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? Is it really worth it?

छान लिहिलंय Happy

मॉलच्या पाय-यांवर, फ़ूडकोर्टात, स्टारबक्स, सीसीडीमधे, टी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं? नवी पिढी खरंच तिथे काही कमावणार असतात की जे जवळ जे आहे, जे मिळू शकलं असतं तेही गमावतात? >>>> नवी पिढी ह्या नव्या स्पॉट्सनाही कमावेल. काळ बदलतो तशी ठिकाणं बदलतात फक्त. माणसाच्या भावना तितक्याश्या नाही बदलणार.

समोवार तर अनुभवलं आहेच. तुझ्याचबरोबर अनेकदा आणि शेवटचंही तुझ्याचबरोबर अनुभवलंय.

शेवटचे दोन परिच्छेद हे फार जास्त पटलेत. कारण ते अनुभवलेही आहेत. आता आपल्यासाठी निवांत जाऊन लिहीत बसायला, ब्रेनस्टॉर्मिंग करायला पृथ्वी(कॅफे आणि कट्टापण) शिवाय जागा उरलेली नाही. स्टारबक्स, सीसीडी वगैरेंमधे ती मजा आणि तो मोकळेढाकळेपणा नाही आणि खिशाला परवडणारेही नाही.
वेस्टर्न सबर्ब्जमधली मॉल्स, सीसीडी, इतर कॉफी शॉप्स ही सगळी चकवा कपडे घालून नजरेत भरायचा प्रयत्न करणार्‍या केविलवाण्या स्ट्रग्लर्सनी भरलेली असतात. चकचकीत बजबजपुरी आहेत मॉल्सची फूडकोर्टस.

खूप सुरेख लिहिलेय. खरंच अशा जागा केवळ नैमित्तिक वास्तू न राहता स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन वाढतात. तिथे येणाऱ्या माणसांच्या भाव भावना कुठेतरी शोषल्या जात असाव्यात त्याशिवाय असा जिवंतपणा जाणवणार नाही.

पंधरा वर्षांपूर्वी एका स्नेह्याच्या प्रदर्शनानिमित्त जहांगीरला गेलो होतो त्यावेळी समोवार पाहिले होते. प्रचंड उर्जा जाणवली होती आणि उगाचच उत्साही वाटले होते. मीही त्यावेळी माझ्या नियोजित करियरच्या विचारात एका टप्प्यावर होतो त्यामुळे काही करू पाहणाऱ्या, सकारात्मक मनांच्या vibes छान जाणवत होत्या.

समोवार कितीतरी पराभूत, दुर्दैवी कहाण्यांनाही साक्षी असेलच कारण तिथे ज्या क्षेत्रातील मंडळी येत त्या क्षेत्रात अत्युच्च यशासोबत पराकोटीचे अपयशही असतेच, पण माझ्या मन:स्थितिनुसार मला मात्र ती एक भेट चांगल्या कारणासाठीच आठवत आहे.

समोवर बंद पडण्याचं नेमकं कारण काय? एका बातमीनुसार चालकांचं वय झाल्यामुळे त्यांनी स्वत होऊन बंद करण्याचं ठरवलं आहे. दुसरं लीज रिन्युअल व्हायचे आहे आणि नव्या लीज प्रपोजलचे भाडे परवडणारे नसल्याने चालक लीज रिन्यू करू इच्छित नाही ... गॅलरी तर काही बन्द होत नाही आहे त्यामुळे डीपी प्लॅनचा काही लोच्या नसावा....

छान लिहलंय

जहांगीर मध्ये पुष्कळ वेळा गेलोय, पण "त्या काळी" समोवार मध्ये जाण्याचे धैर्य झाले नाही.

feeling very nostalgic. Thanks.

ते नटेसन आर्ट्स दुकान पण बंद होणार आहे.

सर्व आर्ट डिस्ट्रिक्टला टाइम स्क्वेअर सारखे निऑन्स नी मढवून टाकायचा एक चॅप्टर प्लॅन पण इथे तिथे फिरतो आहे. तो देखील रद्द होवो.

खूपच सुरेख लिहीलय. शर्मिला तुमच्या लेखनात एक उत्कटता असते जी मनाला भिडते. अगदी समोरच्याशी हसून खेळुन गप्पा माराव्यात इतक्या सहजतेने तुम्ही लिहीता. छान वाटते, लिहीत रहा.

माझ्या गावाजवळची एक आमराई (जवळपास १४० झाडं) कापून टाकली! तिथे आता एक गृहसंकुल उभं राहणार आहे! स>>>>.:अरेरे:

सुरेख !
....पण वैयक्तिक सहवासांमधून जे मिळतं त्याला पर्याय नाहीच. >> +१

@ अश्विनी के.
नवी पिढी ह्या नव्या स्पॉट्सनाही कमावेल. काळ बदलतो तशी ठिकाणं बदलतात फक्त. माणसाच्या भावना तितक्याश्या नाही बदलणार. >>>> +१

आजच्या काळात वेळेचे पण फार कांड असतात हो. अशा एखाद्या ठिकाणी निवांतपणे बसण , तासंतास विचारांमध्ये हरवून एखाद पात्र घडवणं आजकाल औघड होत चाललंय. Sad

अमेझिंग! मस्त लिहीलंय. मी कधीच गेले नाहीये समोवार ला. पण तरीही हा लेख वाचून ते ठिकाण परिचित वाटलं क्षणभर. खरंच आहे, हे असे अड्डे बंद होत गेले तर लोकांनी काय करायचं? पुण्यातलं लकी बंद झालं तेव्हा अश्याच प्रतिक्रिया उमटल्या असणार बहुधा.

रॉबिनहूड- जहांगिर आर्ट गॅलरीमधे कला- प्रदर्शन भरवायला जागा कमी पडत होती. चार-पाच वर्षं लांब प्रतिक्षा यादी इथे कायम स्वरुपी झाली आहे. शिल्प प्रदर्शनाकरता वेगळी स्पेस उपलब्ध करुन देता येत नाही. कलाकारांची ही मागणी अनेक वर्षं पेंडिंग आहे. छायाचित्रांची प्रदर्शनंही टेरेसवर भरवण्यात मर्यादा येतात. जहांगिरच्या व्यवस्थापनाने कला-प्रदर्शनांना मुख्य प्राधान्य द्यायला हवं या मागणीतून काही वर्षांपूर्वी तिथल्या पाच भाडेकरुंना कोर्टाद्वारे नोटिस पाठवली होती, ज्यात पहिल्या मजल्यावरची केमोल्ड आर्ट गॅलरीही होती. बाकीच्यांनी जागा खाली केल्या पण समोवारला दोन वेळा लिज वाढवून मिळाली ऑलरेडी. आदी जहांगिर यांच्या म्हणण्यानुसार ही शेवटची लिज वाढीची मर्यादा होती. यापुढे वाढवली असती तर कोर्टाने तसंच केमोल्ड वगैरे आधीच्यांनीही ऑब्जेक्शन घेतले असते. त्यामुळे तसं करता येणं शक्य नव्हतं.

जहांगिर आर्ट गॅलरी ही म्युझियमच्या जागेवर उभी आहे. त्यांचेही काही इश्यूज आहेत.

रूपा, पुण्यात युनिव्हर्सिटीमधे, रानडेच्या व्हरांड्यांमधे, काही जुन्या देवळांच्या आजूबाजूच्या जागांमधे, सारसबाग, पर्वती, पु ल देशपांडे उद्यान अश्या अनेक ठिकाणी अश्या पॉसिबल स्पेसेस आहेत अजून उरलेल्या.
मुंबईच्या अवाढव्य आकाराकडे बघता निदान दर दोन-तीन उपनगरांमागे तरी एक स्पेस असायला हवी पण नाही. बघावं तिथे तोबा गर्दीच असते. जरा एखादी स्पेस अश्याप्रकारे फुलतेय असं वाटलं की तिथे इतके घोळके येऊ लागतात की कुणालाच उपयोग होत नाही.

वर अमा म्हणाल्या तसं, काही नियम वाकवून/शिथिल करून हा सांस्कृतिक ठेवा जपल्या जायला हवा. लालफितीच्या अन राजकारण्यांच्या मनात आलं तर हे होऊ शकेलच की!

स्टारबक्स, सीसीडी वगैरेंमधे ती मजा आणि तो मोकळेढाकळेपणा नाही आणि खिशाला परवडणारेही नाही. > +१

हे एकीकडे आणि मोठ मोठे मॉल्स जे लोकांची घरे पाडून त्यांना हुसकावुन बांधले गेले आहेत ते आता बंद पडत आहेत. सेंटर वन वाशी, हे एक उदाहरण.

म्युझीअम चे आवार खरे तर मोठे आहे. किंवा सर्व प्रश्नांचे खास मुंबई उत्तर म्हणजे टॉवर बांधणे!! पण त्यामुळे सर्व एरीआचेच स्पिरिट धोक्यात येइल. आज पेपर मध्ये आहे कि सर्व मरीन ड्रैव एरिआच खरेतर हेरिटेज भाग आहे.

लेखातील जेनिफर केंडल ह्यांचा उल्लेख वाचून पण हलून जायला झाले. शी वॉज अ वेरी स्पेशल लेडी.

बांद्रा, जुहू, खार भागात बारके बारके क्वेंट कॅफेज खूप आहेत. परवा असेच मी सो हॅपी नावाच्या कॅफेत जाणे झाले. पत्ता शोधता शोधता चौकाची पाटी वाचली तर चक्क जी. ए. कुलकर्णी चौक. बरोबरचे इतके तरूण व आंग्लाळलेले कि त्यांना जी ए कुलकर्णी माहीत नाही. लिहायचा उद्देश हा कि आपल्या डोळ्या समोर कल्चर बदलते आहे. काही जुने लोक चुकचुकणार. नवे काहीच माहिती नसल्याने स्टारबक्स लाच आपले समजून तिथे मॅक उघडून बसणार. A complete way of life is vanishing fast.

मुळात अशा जागांत , कितीही वेळ बसले तरी, आणि नुसता एक चहा घेतला तरी 'हाकलून 'दिले जात नसे हे महत्वाचे. आता तर चांगल्या आउट लेट मध्ये , रेस्टो मध्ये , तुमचे संपून तुम्ही कधी एकदाचे 'कटता 'याची वाट वेटर, मालक, आणि तुमच्या नंतर नम्बर लावलेले , 'कवटी फुटण्या 'सारखी पहात असतात. (कधी कधी तर तशी 'समज ' ही विविध प्रकारच्या सभ्य सिग्नल्स मधून दिली जाते. )तिथे कसल्या गप्पा अन कसला शिळोपा अनस्कसली कला वृद्धी ?

(पूर्वी सुजाता त तुमच्या नंतरचे नबरवाले तुमच्या जेवणाच्या टेबलवरील खुर्चीच्या मागे येऊन तुमचे जेवण संपायची वाट पहात उभे राहात .तेव्हा नम्बर घेऊन बाहेर भिकार्‍यासारखी वाट पाहण्याची प्रथा नव्हती::फिदी: )

नी, अगदी बरोबर. आणि त्या जागा तश्याच राहाव्यात कायम. पण रेस्टॉरंट / कॅफे कट्टा असेल तर खाण्यापिण्याचीही सोय होते अश्या अर्थाने म्हणाले मी.

रुपा, या जागा आता तशा राहतील असे वाटत नाही कारण जागा ही 'कमोडिटी '' झाली आहे. इनवेस्टमेन्ट झाली आहे. पूर्वी जागा ही वापरण्यासाठीच घेतली जायची . आता तसे नाही जागेतून काहीतरी उत्पन्न निघाले पाहिजे अर्थातच नफा असा कन्सेप्ट आहे...

Pages