कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2014 - 13:48

"
कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे!..
"

आता धागा सुरू करूया,

१) त्या दिवशी सचिन फॅन क्लब या धाग्यावर सचिनच्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी फिरतेय अशी बातमी पाहून मी म्हणालो, "पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." ..अर्थात, अगदी मनापासून केलेले हे विधान होते.

मी स्वत: त्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो ज्या पिढीला क्रिकेटची जाण येणे आणि सचिन नावाचा तारा भारतीय क्रिकेट क्षितिजावर उगवणे हे एकाच वेळी घडले. तेव्हापासून द्रविड-सेहवाग-दादा यांचा उदय होण्याआधी, झाल्यानंतरही, किंबहुना अगदी हल्लीचे कोहली-धोनी-शर्मा यांच्या झंजावातातही, भारतीय क्रिकेटमधील आमचा ईंटरेस्ट सचिन या नावापासूनच सुरू व्हायचा आणि त्याच्या बाद होण्याला संपायचा. अगदी त्याच्या शेवटच्या सामन्यापर्यंत, "सचिनने किती केले?" हा प्रश्न स्कोअर विचारण्याचाच एक भाग होता. असा हा खेळाडू आपल्या स्वत:च्या कर्तुत्वावर मोठा झाला हे न नाकारताही त्याच्या यशातील त्याच्या निस्सीम चाहत्यांचा वाटा देखील कबूल केलाच पाहिजे. आणि अश्यांसाठीच ते केलेले विधान होते. भले मग पुस्तक छापणे आणि विकणे हा व्यवसाय मानला तरी पैसाच कमवायचा म्हटले तर सचिनने स्वाक्षरी केलेल्या बॅट दहापट किंमतीत विकायला काढल्या तरी तो तेवढे पैसे सहज कमावू शकतो. म्हणूनच ज्यांनी सचिनला बघण्यात वीस वर्षे खर्ची घातली त्या प्रत्येकाला सचिन वाचायलाही मिळाला पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

असो, तर त्या दिवशी ‘सचिन फॅन क्लब’ या धाग्यावर, माझ्या या विधानावर तिथे थोडासा गदारोळ उडाला. मी शब्दाला शब्द टाकत बसलो असतो तर वाढलाही असता. पण मी सुद्धा सचिन फॅन क्लबचा सदस्य असल्याने तिथे त्या धाग्याला वेगळे वळण लावायचे टाळलेच. आणि इथे आज हा धागा उघडला.

कोणाला यावर इथे चर्चा करायची असल्यास वेलकम पण,
हा धागाही इथेच संपत नाही..

२) त्यानंतर एका धाग्यावर लेटेस्ट भोंदू बाबा रामपालवर चर्चा चालू होती. चर्चेच्या दरम्यान त्या बाबाची काही लैंगिक शोषणाची स्कॅंडल्स सामोरी आली. त्या संतापजनक बातम्या पाहता कोणीतरी त्या बाबाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, लोकांच्या हवाली करत दगडाने ठेचून मारले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. अर्थातच हि इच्छा देखील मनापासून आणि प्रामाणिकच होती. काही जणांनी त्याला अनुमोदन देखील दिले. (मनोमन मी सुद्धा दिले).

पण ईथेही पुन्हा, हि इच्छा कायद्याच्या चौकटीत बसवू पाहता कोणत्याही गुन्हेगाराला शिक्षा करायला कायदा आपल्या हातात घेणे हा देखील एक गुन्हाच झाला. मग त्या आरोपीचा गुन्हा कितीही भयंकर का असेना आणि त्याच्या गुन्ह्याची शिकार खुद्द आपण का असेना, तरीही त्याला आपण स्वत: शिक्षा करणे हे बेकायदेशीर कृत्यातच मोडते. मग जसे वरच्या क्रमांक १ मधील भावनेचे समर्थन होऊ शकत नसेल तर या भावनेचेही नाही झाले पाहिजे.

पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी भावनेतून आलेला आहे तर दुसर्‍यामध्ये कोणालातरी धडा शिकवण्याच्या भावनेतून आला आहे.

३) आता तिसरे आणि जरा वेगळे उदाहरण बघूया. ज्यात कायद्याच्या चौकटीत एखादी गोष्ट बसत असूनही कित्येकांना ती मंजूर नसते. यासाठी विषय गेले दोनेक महिने फॉर्मात असलेल्या राजकारणाचा घेऊया.

यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही हे आपण सारे जाणतोच. अश्यावेळी ते कायद्यानुसार किंवा संविधानानुसार ईतर पक्षांची मदत घेऊन सरकार बनवू शकतात. पण तेच त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा (तो देखील न मागता) घेतल्यावर अचानक एकच गदारोळ उठला. जणू काही त्यांना बरोबर न घेणे हे त्यांच्यासाठी बंधनकारकच होते. खुद्द भाजपाला मत दिलेल्या लोकांनी हा आमचा विश्वासघात आहे, आम्ही फसवलो गेलो असा ओरडा सुरू केला. परिणामी भाजपाला ठामपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारताही येत नव्हता. पण जर संविधानानुसार ते गैर नसेल तर तुम्ही आम्ही मतदार याबाबत कोणत्या अधिकाराने त्यांनी तसे करू नये हा हट्ट धरू शकतो??

म्हणजे इथे आपण फिरून पुन्हा नैतिकतेकडे आलो तर!..

यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो.
आपलाच,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिला ................... Wink

मुद्दे व्यवस्थित मान्डले आहेत!

"पायरसी हे नक्कीच बेकायदेशीर कृत्य आहे, पण तरीही सचिनच्या काही गरीब चाहत्यांकडे (ज्यात तुटपुंजे पॉकेटमनी असलेले कॉलेजस्टुडंट सुद्धा आले), ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल." याच्याशी सहमत !

ऋऽऽन्मेष,

>> ज्यांना हे पुस्तक विकत घेणे परवडणार नाही, अश्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचले तर मला मनापासून आनंदच होईल.

याकरिता ग्रंथालय हा एक पर्याय होऊ शकतो. मला वाटतं सफ्याक्लवर एकाने (की एकीने) हा पर्याय सुचवला होता.

आ.न.,
-गा.पै.

तीन गोष्टींचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. अ‍ॅपल्स टू अ‍ॅपल्स कंपॅरिजन करा. मुळात कंपॅरिजनचीही गरज नाहिये. जे चूक आहे ते चूकच आहे (पहिले उदाहरण)

पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी भावनेतून आलेला आहे तर दुसर्‍यामध्ये कोणालातरी धडा शिकवण्याच्या भावनेतून आला आहे. >> पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करणं/न करणं हे तुमच्या हातात आहे. शिवाय कायद्याचं उल्लंघन करणं हे सहज शक्य आहे.
दुसर्‍या उदाहरणात फक्त भावना व्यक्त केली आहे. तो विचार प्रत्यक्ष अमलांत आणणं हे सामान्य माणसाला सहज शक्य नाहिये.
तिसर्‍या उदाहरणात कुणीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहिये. शिवाय त्यात नैतिकता आपण दुसर्‍याकडून अपेक्षिली आहे.

मी फक्त सुरुवात वाचली, बाकी प्रतिक्रिया वेळेअभावी नाही वाचू शकलो.
>>>> यातून मॉरल ऑफ द स्टोरी काय काढायची हे आपल्यावरच सोडतो <<<<<
एकटी वा एकांगी नैतिकता लगाम नसलेल्या वारू प्रमाणेही असू शकते, तिला तटस्थ व त्रयस्थ (विनापूर्वग्रह) तारतम्याची जोड हवीच हवी. तसे नसेल, तर वरील तिन उदाहरणात सांगितलेले प्रसंग सामोरे येऊन बुद्धिभेद होऊ लागतो.
छान विषय.

१) वाचनालयाचा पर्याय सुचवला गेलाच आहे. आता तेवढ्यासाठी वाचनालयाचे सदस्यत्व घ्यायचे नसेल तर........
आजच्या काळातला तुटपुंजा पॉकेट मनी किती असतो त्याची कल्पना नाही. पण अगदी हाच प्रश्न असेल तर सचिनच्या अश्या तु.पॉ.म. मिळणार्‍या चाहत्यांना एक सफॅक्ल स्थापन करून मनी-पूल करून ते पुस्तक विकत घेणेही सहज शक्य आहे. पुस्तक काही एकदा वाचले म्हणून संपत नाही.
तसेच पायरटेड सॉफ्ट कॉपीज वाचण्यासाठी जी साधने लागतील त्यांचा खर्च तु.पॉ.म. मध्ये बसतो का हेही जाणून घ्यायला आवडेल.
अश्या तु.पॉ.म.मिळणार्‍या कॉलेजविद्यार्थ्यांचे पालकही सचिनचे चाहते असण्याची शक्यता किती आहे? ते असे पुस्तक विकत घेऊ शकणार नाहीत?

<ज्यांनी सचिनला बघण्यात वीस वर्षे खर्ची घातली > म्हणजे काय? ते करताना बाकीचे आयुष्य थांबले होते की काय? पुस्तक वाचल्यावर मात्र पैसे आणि वेळ दोन्ही खर्ची घातल्याची भावना होण्याची शक्यता आहे. Wink
<पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करायचा विचार एखाद्या गरजूला मदत व्हावी> गरजेची व्याख्या बदललीय का? सचिनचे आत्मचरित्र हे न परवडणारे पण अत्यावश्यक असे महागडे पाठ्यपुस्तक आहे का?

२) १ मधील भावनेचे समर्थन करायला २ मधली भावना? आँ? दोनमधल्या भावनेचे समर्थनही कोणी करणार नाही. या प्रकरणांत अजूनतरी न्याय/कायदा व्यवस्थेने त्या भावनांचा अनादर केल्याचे दिसत नाही. भर चौकात फाशी इत्यादी उपाय फार तर सूड मिळवल्याचे, तेही उगाचच , विकृत समाधान काहींना देऊ शकतील. नागपूरमध्ये अशी एक घटना झाली होती, पण तिथे कायदा यंत्रणा हतबल ठरल्याचे चित्र दिसले होते.

<यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही हे आपण सारे जाणतोच. अश्यावेळी ते कायद्यानुसार किंवा संविधानानुसार ईतर पक्षांची मदत घेऊन सरकार बनवू शकतात. पण तेच त्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा (तो देखील न मागता) घेतल्यावर अचानक एकच गदारोळ उठला. जणू काही त्यांना बरोबर न घेणे हे त्यांच्यासाठी बंधनकारकच होते. खुद्द भाजपाला मत दिलेल्या लोकांनी हा आमचा विश्वासघात आहे, आम्ही फसवलो गेलो असा ओरडा सुरू केला. परिणामी भाजपाला ठामपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारताही येत नव्हता. पण जर संविधानानुसार ते गैर नसेल तर तुम्ही आम्ही मतदार याबाबत कोणत्या अधिकाराने त्यांनी तसे करू नये हा हट्ट धरू शकतो??>

गदारोळ राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यावरून झाला; त्यापेक्षाही आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध झाले या दाव्यावर झाला. ते अनैतिक आहे असे अगदी एका निवृत्त न्यायाधीशाचेही मत आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारणे अनैतिक कसे काय ते मला अजूनही कळलेले नाही. भाजपच्या नैतिकतेची व्याख्या काय, यापूर्वी त्यांनी तसे नैतिक वर्तन केल्याचे दाखले आहेत का? गेले वर्षभर पाच जिल्हा परिषदांत भाजप-राकॉ जोडपे गुण्यागोविंदाने नांदत आहे. आताच नैतिकता कुठून उपटली?

आताच ऑफिसमध्ये आलो, वरचे प्रतिसाद वाचले, वेळेअभावी घाईघाईत काही लिहित नाही, पण एक विनंती तातडीने करणे योग्य समजले, येथील राजकारणाचा विषय धाग्याच्या विषयानुसारच मर्यादीत ठेवा, धागा शतकी नाही झाला तरी चालेल Happy
याउपर माझे ते तिसरे उदाहरण मुळातच चुकले असल्यास, तसे निदर्शनास आणून देउ शकता.

कायदा हा कोणा देवाने (आस्तिकांकरिता) बनविलेला नाही / नैसर्गिकरीत्या (नास्तिकांकरिता) बनलेला नाहीये. वर्णभेद / वर्गभेद / जातिभेद / अस्पृश्यता / धर्मसंसद / खाप पंचायत अशा अनेक मानवनिर्मित गोष्टींप्रमाणेच कायदा हादेखील मानवनिर्मीत असल्यानेच त्यात अनेक त्रुटी आहेत. अनेक देशांमधील कायदे तर अजूनही मध्ययुगीन कालखंडाची आठवण करून देणारे आहेत. इराण मधील घोनचेह घवामी नावाच्या एका महिलेला पुरुषांचा व्हॉलीबॉल सामना पाहिल्याबद्दल तुरुंगवास झाल्याची घटना ताजीच आहे.

http://www.lokmat.com/storypage.php?catid=3&newsid=3603446

त्याशिवाय अनेकदा वाहन चालविण्यासारख्या तथाकथित अपराधाबद्दल महिलांना शिक्षा ठोठावल्या जाण्याच्या या देशातील बातम्या देखील आपल्याला सरावाच्या झाल्याच आहेत. पाकिस्तानात इशनिंदेसारख्या गुन्ह्याबद्दल असलेला देहदंडाचा कायदा देखील असाच वादग्रस्त आहे.

आपल्या देशात देखील अनेक अजब, अतर्क्य व अन्यायी कायदे अजुनही प्रचलित आहेत. तेव्हा मूळ लेखातील

<< कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, असे माझे मत आहे, नव्हे असा माझा विश्वास आहे! >>

या विधानात व्यक्त केला गेलेला कायद्यावरील विश्वास सार्थ नाही असेच म्हणावे लागेल. पायरेसी (स्वामित्वहक्क) कायदा विषयी केली जाणारी चर्चाही फारशी कामाची नाही. इंटरनेटव टोरंट स्वरूपात बहुतेक सर्व गाजलेले चित्रपट आणि काही प्रमाणात पुस्तके देखील उपलब्ध आहेत. पुस्तके थोड्या प्रमाणात आणि चित्रपट तर प्रचंड प्रमाणात पायरेटेड स्वरूपात बघितले जातात. त्यात बेकायदेशीरपणा असला तरी अनैतिकता आहे असे मला वाटत नाही. चित्रपटगृहात चित्रपट बघणे किती जणांना परवडते? नसेल परवडत तर नका पाहू या सल्ल्याला देखील काही अर्थ नाही. अनेक नवीन निर्माते कमी खर्चात व आशयपूर्ण असे चित्रपट बनवितात. ते जनतेला कमी तिकीट दरात चित्रपट दाखवू शकतात देखील. परंतु काही बड्या चित्रपट निर्मात्यांनी लॉबीइंग करुन या लहान चित्रपट निर्मात्यांना मोठ्या शहरात चित्रपट प्रदर्शनाकरितात चित्रपटगृह मिळू नये अशी सोय केली असल्याने त्यांची कुचंबणा होते आणि प्रेक्षकांना काही ठराविक निर्मात्यांचेच चित्रपट पाहण्याकरिता उपलब्ध होतात. हे जाणण्याकरिता मुंबईतील ईरॉस येथून होणारी वितरणव्यवस्था मूळातूनच अभ्यासावी लागेल. असो. तो एक मोठ्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

तूर्तास इथे इतकेच लिहू इच्छितो की, कायदे निर्मिती व अंमलबजावणी ही लॉबिईंग मुळे काही लोकांची मक्तेदारी झाली आहे. प्रसिद्ध लेखक व विचारवंत भाऊ तोरसेकर तर असे लिहीतात की अंधश्रद्धा निर्मूलन करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर हे स्वतःच एक मोठे अंधश्रद्ध होते. पुण्यातील रस्त्यांवर सकाळी फिरत असताना आपणांस अचानकपणे येऊन कोणी पिस्तुलातून गोळ्या चालवणार नाही कारण बेकायदेशीर रीत्या व कुठल्याही परवानाशिवाय शस्त्र सोबत बाळगता येत नाही असा या देशात एक कायदा आहे आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होत आहे यावर त्यांची फार मोठी अंधश्रद्धा होती.

असो. कायद्याविषयी नारायण धारप यांच्या कादंबरीतील नायकाची ही विधाने वाचा, म्हणजे कायदा किती अपुरा, लुळा, लंगडा आहे ह्याची प्रचिती येईल.

http://readerwrites.blogspot.in/2013/12/blog-post_29.html

माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी मला एक भयंकर अनुभव आला. तो काय हे मी सांगत बसत नाही. एवढं सांगतो की त्या अनुभवाने माझे डोळे उघडले. तथाकथित कायदा व कायद्याचा न्याय किती अपुरा आहे हे मला समजलं. हेही कळलं की असे अनेक गुन्हे आहेत की जे कायद्याच्या कक्षेत येतच नाहीत. अन्याय ज्याच्यावर झालेला आहे अशा माणसाला दाद मागायची सुद्धा काही सोय नाही. कदाचित सुधारलेल्या समाजाची ती एक खूण असेल-- पण सर्वच माणसे सुधारलेली नसतात. काही माणसे समाजाच्या या सैल किंवा चूकीच्या नियंत्रणाचा गैरफायदा घेतात. समाजातल्या पापभिरू, असहाय्य, सज्जन, दुबळ्या अशा घटकांवर आपली उपजीविका करतात." लोकांनी कष्टाने पैसा पैसा जमवून उभी केलेली संपत्ती लुटतात. अशा दुर्दैवी लोकांना वाली नाही. समाज केवळ हळहळतो, प्रत्यक्ष काही करत नाही. मलाही हा अनुभव आला.. ते संस्कारक्षम वय म्हणा, माझा स्वभाव म्हणा किंवा माझ्यावर झालेल्या अन्यायाचं खास राक्षसी रूप म्हणा-- कशाचा तरी परिणाम होऊन माझ्या मनाची घडण आमूलाग्र बदलली--"
"गुन्हेगारांविरुद्ध नुसतं संतापून उपयोग नव्हता. त्यांच्या मागे पैशांचं बळ होतं, समव्यवसायी लोकांची संघटना होती. त्यांना धडा शिकवायचा तर मला मला त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर, जास्त हिकमती, जास्त कुशल व्हायलं हवं होतं आणि माझ्या आयुष्याची अनेक वर्षे ही तांत्रिक कौशल्ये हस्तगत करण्यात घालवली आहेत-मीही साधा माणूसच आहे- पण सतत सरावाने आणि चिकाटीने मी अनेक तंत्रे हस्तगत केली आहेत पण जरा विचार केला तर समजेल की त्यात खरोखर अशक्य काय आहे?"
"पिस्तूल, रायफल, तलवार, जंबिया, चाकू, तीरकमठा ही शस्त्रे मी चांगली वापरतो. सर्व गाड्या, सर्व दुचाकी-तिचाकीही वाहने, काही जातीची विमानं मी चालवू शकतो. कुस्त्यांचे शास्त्रीय व अशास्त्रीय सर्व प्रकार मी जाणतो. मी चांगले वेषांतर करतो, इतरांच्या आवाजाची सहीसही नक्कल मी करू शकतो, इतरांच्या हस्ताक्षराची नक्कल मी करू शकतो- माझे शरीर इतके काटक आहे, चपळ आहे. पण या सर्वात दैवी किंवा अमानवी असं काय आहे? मी आयुष्याचा जो एक मार्ग निवडला त्यासाठी ही साधनं आवश्यक होती त्याखेरीज मी यशस्वी झालो नसतो."
"पूर्वी असा एक काळ होता की व्यक्तिगत अन्यायाला किंवा अपराधाला व्यक्तिगतच जवाब द्यावा लागे. व्यक्तिच्या सुखाची, सुरक्षिततेची, सन्मानाची हमी द्यायला समाजच संघटित नव्हता. माणसाला स्वत:पुरता कायदा करावा लागे आणि मनगटाच्या बळावर तो अंमलात आणावा लागे. असं समज की माझ्यापुरता मी त्या युगात वावरतो. या कल्पना इतरांना कदाचित कालबाह्य, जुनाट, बुरसटलेल्या, बेजबाबदार वाटतील. पण मला नाही! माझ्या आयुष्याला काही अर्थ असला तर तोच आहे! माझ्या डोळ्यापुढे काही आदर्श असला, काही ध्येय असलं तर तेच आहे!"

गुगळे यांच्या प्रतिसादाची लांबी ही नेहमीच मूळ लेखाबद्दल जास्त का असते असा एक नैतिक प्रश्न माझ्या मनात आला आहे. या भावनेचे काय करावे अशा विचारात. Happy

दिवा घेणेचे करावे

मला कळत नाही लोक एवढं सिरियसली का घेतात... जे आवडतय ते वाचा, चांगलं म्हणा... जे नाही आवडत ते सोडुन द्या... उगाच माझीच मतं योग्य आणि सगळ्या जगानी तसाच विचार करायला पाहिजे असं कोणी म्हणत असेल तर त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे?
लिखित स्वरुपातील संभाषणाच्यादेखिल मर्यादा आहेत. प्रत्यक्ष समोरासमोर बोलताना गोंधळ होतात.. इथेतर ते होणारच... प्रत्येक लिहिलेला शब्द भिंगातून बघण्यात काय अर्थ आहे...

सचिन अथवा कोणाचंही तो(/ती व्यक्ती रिटाअर झाल्यावर बरीच आगपाखड /विरुध्द मतं /सनसनाटी वक्तव्य करून पुस्तक गाजावाजा करून भरमसाठ किंमतीला बाजारात आणल्यावर ते पुस्तक पंधरा दिवसांत विकत घेऊन वाचलंच पाहिजे असा आग्रह कशाकरता ?त्यापेक्षा रेल्वे टाइमटेबलचँ मुल्य वर्षभरतरी टिकतं.
हीच पुस्तकं महिन्याभरात फुटपाथवर स्वस्तात मिळतात. जी लोकं पस्तीस वर्षाँच्या काळात तोंड उघडत नाहीत ती पुस्तकात मात्र "अमक्या वेळी मी बादलीभर पाणी घेऊन धावलो नसतो तर आगीचा भडका उडाला असता "अशी वाक्य खरडतात. आणि ते वाचायला सर्वाँनी धावावं अशी अपेक्षा ठेवतात. इथे वाचकांची नैतिकता का लेखकांची पाहायची ?

<<गुगळे यांच्या प्रतिसादाची लांबी ही नेहमीच मूळ लेखाबद्दल जास्त का असते >> कारण ते जिनियस आहेत आणि ते समजण्यासाठी बरयाच जणांना उशीर लागला माझ्यासहित ,इथे खरी नैतीकता गंडलेय Happy

आणि आपण सगळे जिनियस नाही कारण आपण अमानवीय आहोत. Proud Proud

विषय पाहून मनात असलेले कांहीं विचार [ ठाम मत नव्हे! :डोमा:] -
१] कायदे, कायदे करणारे व न्यायव्यवस्था जरी कायदा सर्वाना समानच असतो असं गृहीत धरत असले [ कारण त्याला पर्यायही नसावा ], तरीही सर्वसाधारणपणे, अपवाद वगळतां, प्रत्येक व्यक्ती कायद्याचा अर्थ काय लावते , त्याला महत्व किती देते हें ती व्यक्ती ज्या वातावरणात व लोकसमूहात वावरते यावरच बव्हंशीं अवलंबून असावं. नैतिकतेच्या बाबतींतही तसंच असावं. टोंकाचं उदाहरण- दरोडेखोरांच्या टोळीत वाढलेल्या व्यक्तीला दरोडा बेकायदेशीर आहे हें माहित असलं तरीही त्याचं सोयरसुतक असणार नाहीं व दरोड्याच्या नैतिकतेबद्दल तर त्याला शंकाही असणार नाही. नेहमीच्या पहाण्यातलं उदाहरण- ज्या कार्यालयाचा 'चिरीमिरी घेणं' हा स्थायीभावच आहे, तिथल्या कर्मचार्‍यांच्या[अपवाद वगळतां] मनाला तसं करणं बेकायदा आहे , अनैतिक आहे हा विचारही शिवत नसावा.
२] नैतिकता व कायदा ही तर अगदींच विजोड जोडी आहे. कांहीं गोष्टी १००%कायदेशीर असूनही कांहीं लोकसमूहात तरी नैतिकतेच्या निकषावर निषिद्धच ठरतात [उदा. घोड्यांच्या शर्यती ] , तर नैतिकतेच्या निकषावर 'उदात्त' ठरतील अशा कांही गोष्टींची दखल घेणंही कायद्याच्या कक्षेतच बसत नाही. [ उदा. कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय [consideration] गरजूला वेळींच केलेल्या तात्पुरत्या आर्थिक मदतीच्या परतफेडीसाठी कायदा [ Law of Contracts ] त्या दात्याच्या मदतीला येणं नाकारतो; कारण मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय केलेली मदत ही केवळ नैतिक असते व म्हणून व्यावहारिक कायद्याच्या ['काँट्रॅक्ट'] चौकटीत ती बसत नाही ! ].

एक सभ्य पुरुष हातात ब्याग घेउन सुनसान सडके वरुन जात असतो .ब्यागेत आयुष्य भराची कमाई असते. आनी रस्त्यात नेमका त्याला एक चोर भेटतो .चोर त्याला बघुन त्याच्याजवळ असलेली ब्याग खेचुन पळ्याचा प्रयत्न करतो पन तो सभ्य पुरुष त्याचा हा प्रयत्न हानुन पाडतो चोराला जेंव्हा लक्षात येते हा सहजासहजी ब्याग सोडनार नाही तेव्हा तो खिशातिल चाकु काढतो व त्याच्या पोटात भोकसतो. आनी त्या सभ्य पुरुषाचे प्राण घेउन तो फरार होतो. नेमकी त्याच वेळेस एका हॉस्पिटलमधे एक घटना घडते. एक पोट्दुखिचा पेशंट तातडिच्या वार्डात भरती होतो पोट्दुखिची तिव्रता बघुन डॉ.ना तातडिने ऑपरेशनचा निर्नय घ्यावा लागतो ऑपरेशनसाठी जेव्हा डॉ.त्याचे पोट कापतात नेमका त्याच
वेळेस त्या पेशंटचे प्राण जातात.दोन्ही घटने मधे माणसाला प्राण गमवावे लागले आहेत मग एका घटनेत चोर गुन्हेगार व डॉ.बेगुनाह असे का?? या दोन्ही घटनेत कायद्याची काय भुमिका असावी??

छान प्रतिसाद आले.

लेखातील सुरुवातीचे विधान, >> कायदे हे नेहमीच नैतिकतेला अनुसरून बनतात, << हे किंचित उपरोधानेच आले आहे.

खरे तर हा धागा सचिनच्या धाग्यावर माझ्या विधानावर झालेल्या चर्चेला प्रत्युत्तर म्हणूनच जन्माला आला. जिथे असामी यांनी एक विधान केले होते, की एकदा बेकायदेशीर आहे हे कबूल केल्यानंतर मग ईफ बट म्हणत आणखी फाटे फोडण्याला काय अर्थ?

पण तेव्हाच हे पटले नव्हते. शेवटी कायदा म्हणजे काय असते, तर सर्वसाधारण समाजासाठी आखलेली एक गाईडलाईन. पण त्यापुढेही जाऊन आपल्या सारासार विचारबुद्धीला जे पटेल, आपल्यातील माणुसकीला जे भावेल, जे आपल्यामते नैतिकतेच्या व्याख्येत बसते, ते करण्यास वा किमान तशी इच्छा धरण्यास गैर ते काय?
आणि याचे मला इथे बरेपैकी उत्तर मिळाले.

मनीष,
पहिल्या उदाहरणात कायद्याचे उल्लंघन करणे सहज शक्य आहे आणि दुसर्‍यात ते सहज शक्य नाही हा आपला युक्तीवाद काही पटला नाही.
खरे तर या हिशोबाने मग दुसर्‍या उदाहरणातील इच्छा आणखी डेंजरस म्हणायला हवी ना.

काही प्रतिसादात वाचनालयाचा एक पर्याय आला समोर, पण अर्थात तो अगदी सहजसोपा नाही की दर गल्लीच्या नाक्यावर एक वाचनालय असते आणि तिथे सचिनचे पुस्तक सहज उपलब्ध असते.
आणि तसेही मी इच्छा व्यक्त करताना अश्या शक्याशक्यतेंचा विचार करत बसलो नव्हतोच. असो, पण यावर खोलवर जाऊन चर्चा करणे हा या धाग्याचा उद्देश नसावा.

चेतनजी,
छान पोस्ट, पटली आवडली.
खरे तर लेखापेक्षा मोठी पोस्ट होणे हे धाग्याकर्त्यासाठीच एक प्रकारे समाधानकारक असते की त्याने मांडलेल्या विषयावर कोणाला मनापासून इतके लिहावेसे वाटावे.

भाऊ,
ईथल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि तिथेही सगळ्यांनी पायरसीच उचलून धरली तरी माझ्या विधानातील मूळ भावनेवर आपणच भाष्य केले होते, त्याबद्दलही आभार. बाकी विचार पटणे न पटणे हे त्यानंतर आले.

शेवटी कायदा म्हणजे काय असते, तर सर्वसाधारण समाजासाठी आखलेली एक गाईडलाईन. पण त्यापुढेही जाऊन आपल्या सारासार विचारबुद्धीला जे पटेल, आपल्यातील माणुसकीला जे भावेल, जे आपल्यामते नैतिकतेच्या व्याख्येत बसते, ते करण्यास वा किमान तशी इच्छा धरण्यास गैर ते काय? >> भाऊ नी वर दिलेले उदाहरण घे. दरोडा टाकणे हे बेकायदेशीर आहे हे मान्य आहे पण एखादा उद्या उठून म्हणाला कि माझ्या सारासार विचारबुद्धीला दरोडा टाकणे पटतेय, माझ्यातल्या माणूसकीला हे भावतेय, माझ्यामते नैतिकतेच्या व्याख्येत बसते, करण्यास वा किमान तशी इच्छा धरण्यास गैर ते काय?. बोल्ड केलेली वाक्ये तुझी आहेत. जर दरोडा हे फार far fetched उदाहरण वाटत असेल तर त्या italics मधल्या जागी तुला हवे ते घाल.

नैतिकतेची मापदंड व्यक्तीसापेक्ष असतात, काय चांगले काय वाईट हे माणसागणीक बदलु शकते. Modern legal system came into existence to tame down wild justice that tear aapart fabric of civilization असे Francis Bacon म्हणतो. हे का हे लक्षात घे म्हणजे त्या but चा अर्थ लागेल. कायदा हि गाईडलाईन नाही तर बहुसंख्यांना मान्य असलेले mandate आहे.

चेतनजी,
छान पोस्ट, पटली आवडली.+१

तुम्हाला माझी पहील्या उदाहरणाची मते माहीत आहेत .मी नव्हते लिहिणार पण तुम्हीच लिहा म्हणालात म्हणुन,सध्यातरी पुस्तकांची, चित्रपटांची पायरसी ही बेकायदेशीर कृत्य आहे. गाण्यांच्या बाबतीत ही आहे की नाहे ते मला माहीत नाही पण पुर्वी होती.पण आता अ‍ॅप वर गाणी फुकट घेता येतात. पायरसी करणारे कीतीही निरागस हेतुने करत असले तरी ते करणे व त्याहुन पुढे ते आंतरजालावर लिहिणे चुकीचे वाटले . असे लिहुन ज्यांना या बद्दलची माहीती नाही ते तुमच्या या शुदध पण माझ्यामते चुकीच्या हेतुचे डोळे झाकुन अनुसरण करतील. जे त्यांना नकळत कायद्याचे गुन्हेगार बनवतील. (गुन्हेगार हा मोठा शब्द असला तरी) बाकी दांभीकपणे जर पायरसीचे हे प्रकार सुरु राहीले तर काही वर्षांनी तेही कायदेशीर होतील. Happy

असामी,
नको, दरोडाच घेऊया की.. पण पर्टीक्युलर केस.. जसे की चित्रपट कथांमध्येही ठकसेन वगैरे टाईप कॅरेक्टर असतात, जे साहूकारांना लुटून गरीबांना पैसे वाटत असतात. पण आपण त्यांना हिरो म्हणूनच बघतो.
इथेही माझ्या दुसर्‍या क्रमांकाच्या उदाहरणात मी याच प्रकारचे उदाहरण दिले आहे. रामपालबाबासारख्या माणसाचा खून करायची इच्छा कोणी व्यक्त करता त्यालाही खुनाचा गुन्हा न बघता अनुमोदन दिले जाते.
हे पाहता, पायरसी हा मूळ गुन्हा दरोडा वा खून या मूळ गुन्ह्यांपेक्षा कितीतरी सौम्य आहे.
पण पर्टीक्युलर केसमध्ये जसे त्यांचे समर्थन होऊ शकते तसेच पायरसीबाबतही ती बेकायदेशीर म्हणजे चूकच असे ठाम ठरवू शकत नाही. ईफ आणि बट इथेही हिशोबात येऊ शकतात. अर्थात ते ईफ आणि बट पटले नाही तर तो पुढचा वादाचा मुद्दा झाला पण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही !

....

सिनी,
या जगात आजवर एकही कायदा मोडला नाही असा कोणीही नसेल. पण इथे, ‘जाओ पहले उस आदमी की साईन लेके आओ’ असे करणे हा हेतू नाहीये. आपल्याला माझे एखादे मत पटले नसेल तर बिनधास्त त्यावर टिका करायचा हक्क राखून आहात. जेव्हा आपण आपले मत पब्लिक फोरमवर मांडतो तेव्हाच आपण हा हक्क सर्वांना बहाल करत असतो. पण सरसकट पायरसीचे समर्थन मी कुठेही केले नव्हते ना ते करण्यात काही लॉजिक आहे.

नको, दरोडाच घेऊया की.. पण पर्टीक्युलर केस.. जसे की चित्रपट कथांमध्येही ठकसेन वगैरे टाईप कॅरेक्टर असतात, जे साहूकारांना लुटून गरीबांना पैसे वाटत असतात. पण आपण त्यांना हिरो म्हणूनच बघतो. > > हिरो मानले म्हणजे ते समर्थनीय होत नाही. समजा अशा हिरो कडून एखादा दरोडा घालताना खून झाला तर ते हिरो आहेत म्हणून ते समर्थनीय होईल का ? जे कायद्याच्या द्रुष्टीने बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीरच राहतेय.

पण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही !>> Really ? चाइल्ड अब्युज, बलात्कार ?

समजा अशा हिरो कडून एखादा दरोडा घालताना खून झाला तर ते हिरो आहेत म्हणून ते समर्थनीय होईल का?
>>>>>
हो, का नाही, जर दरोडा समर्थनीय होऊ शकतो तर मग खून का नाही, जर तो एखाद्या दुर्जनाचाच असेल. तसेही अ‍ॅकशन कथांमधील हिरो हे व्हिल्लनचा खून करूनच कथेचा दि एण्ड करतात.

जे कायद्याच्या द्रुष्टीने बेकायदेशीर आहे ते बेकायदेशीरच राहतेय. >>> ते कायद्याच्या दृष्टीनेच बेकायदेशीर राहतेय, पण इथे आपण कायद्यापलीकडे चर्चा नेत आहोत.

वरचा मी परिस्थितीचा डायलॉग लिहितानाच मला आता बलात्कार हे उदाहरण येईल अशी स्ट्राँग फिलींग होतीच. असो. वर लेखात एका उदाहरणात मी खून समर्थनीय दाखवला आहे. प्रतिसादात दरोडा सुद्धा समर्थनीय असू शकतो हे दाखवले आहे. बलात्काराबाबत आपला कायदा काय म्हणतो हे जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे त्याची शिक्षा कायद्यात खूनाच्या गुन्ह्यापेक्षा जास्त आहे की कमी आहे? तसेच जो कायदा बलात्काराला गुन्हा ठरवतो तिथेच वेश्याव्यवसाय मात्र चालून जातो तो कसा?

"पण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही" ह्या तुझ्या वाक्यावर जी तसे न ठरवणारी उदाहरणे मी दिली त्यात ती कसे समर्थनीय आहेत ते लिहिल्याशिवाय कायद्यापलीकडे बघणे न बघणे ह्याला अर्थ नाही.

, का नाही, जर दरोडा समर्थनीय होऊ शकतो तर मग खून का नाही, जर तो एखाद्या दुर्जनाचाच असेल >> असं म्हणतोस ? समज तू लिहिलेला हिरो दरोडा टाकण्यासाठी एखाद्या सावकाराच्या घरी पोहोचला. सावकाराकडे इमान इतबारे करणारा पहारा करणारा सज्जन रखवालदार त्याला आडवा आला नि त्याचा खून पडला. हे झाले समर्थनीय मग ? पुढे जाऊन आत गेल्यावर त्याला सावकाराची बायको आडवी आली. तिला उडवले नाईलाजाने. Do you see slippery slope your basic assumption creates ?

बलात्काराबाबत आपला कायदा काय म्हणतो हे जाणून घ्यायला आवडेल. >> कयदा कुठेही तो समर्थनीय आहे असे म्हणत नाही एव्हढे पुरेसे नाही ?

तसेच जो कायदा बलात्काराला गुन्हा ठरवतो तिथेच वेश्याव्यवसाय मात्र चालून जातो तो कसा? >> माझ्या माहितीप्रमाणे नाही.

तू दिलेले पहिले उदाहरण हे व्यक्तिगत नैतिकतेवर गोष्टी तोलणे किती बेगडी गोष्ट असू शकते ते दाखवते. ज्यांना परवडत नाही अशांना सचिनचे पुस्तक वाचायला मिळावे म्हणून कोणाच्या तरी मूलभूत हक्कांवर गदा आणणे कुठल्याही नैतिकतेमधे बसू शकत नाही.

समज तू लिहिलेला हिरो दरोडा टाकण्यासाठी एखाद्या सावकाराच्या घरी पोहोचला. सावकाराकडे इमान इतबारे करणारा पहारा करणारा सज्जन रखवालदार त्याला आडवा आला नि त्याचा खून पडला. हे झाले समर्थनीय मग ? पुढे जाऊन आत गेल्यावर त्याला सावकाराची बायको आडवी आली. तिला उडवले नाईलाजाने. Do you see slippery slope your basic assumption creates ?
>>>>>

ईथे आपली एक गल्लत होतेय, मी एखादा गुन्हा काही परीस्थितीत समर्थनीय देखील ठरू शकतो हे दाखवत आहे, त्याला आणि जर तर जोडून ते मग असे झाले तर असमर्थनीय दाखवण्यात काही पॉईंट नाही Happy कारण मुळात खून हा गुन्हा आहेच, जर तो निष्पापाचा झाला तर समर्थनीय नाहीच आहे.

बलात्काराबाबत थोड्यावेळाने लिहितो, माझा बॉस आला

१] सर्वच अपवादात्मक प्रकरणं आधींच लक्षात घेवून व त्यासाठी खास तरतूद करून कोणताही कायदा बनवणं जवळ जवळ अशक्यच आहे. परंतु, जसजशी अशी अपवादात्मक प्रकरणं पुढे येतात तसतशी कायद्यात पोटकलमं जोडणं, सुधारणा करणं हें होतच असतं. शिवाय, अशा प्रकरणांत न्यायालयानीं दिलेले खास निर्णय [ केस लॉ] हे कायद्याचाच भाग मानला जातो व त्यामुळे अपवादात्मक प्रकरणांमधे अन्याय होण्याची शक्यता कमी कमी होत जाते. म्हणूनच, << पण कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही असा जगात कुठलाही गुन्हा नाही !>> असं म्हणण्यापेक्षां 'कोणताही कायदा अपवादात्मक परिस्थितीत केलेले व म्हणून समर्थनीय ठरणारे सर्वच गुन्हे लक्षांत घेवूं शकत नाहीं ' हें म्हणणं अधिक योग्य होईल, असं मला वाटतं.

२] व्यक्तीगत गरजा, आवडी, मतं याना कोणत्याही कायद्यामुळे मुरड घालणं कांही जणाना कमी अधिक प्रमाणात भाग पडत असलं तरीही कायद्याचं अस्तित्व अपरिहार्य आहे, हें निर्विवादच असावं. पण त्याचबरोबर प्रत्येक कायदा म्हणजे डोळे झांकून नैतिकतेचा अंतिम निकष मानणं, हेंही घातकच. दुसर्‍या महायुद्धानंतर नाझी काळात ज्यूंविरोधी कायद्यांची अंमलबजावणी केल्याबद्दल अमेरिकेने जर्मनीतल्या न्यायाधिशांवर खटले भरले [या आरोपी न्यायाधिशांमधे न्यायशास्त्रावरील अधिकारी समजला जाणारा विचारवंत न्यायाधिशही होता !] ज्या ट्रायब्युनल समोर हे खटले चालले तिथं या न्यायाधिशानी असा बचाव मांडला कीं आम्हीं जर हे कायदे अनैतिक आहेत म्हणून राजीनामे दिले असते तर हिटलरने आपले अधिकारी आमच्या जागीं बसवून किती तरी अधिकच प्रमाणात ज्यूंवर अन्याय केला असता. अर्थात, हा युक्तीवाद साफ नाकारून ट्रायब्युनलने त्या सर्वाना आजन्म कारावासाची शिक्षा दिली. हें उदाहरण टोंकाचं असलं तरी तें देण्याचा उद्देश हाच कीं कायदे व न्याय यावर कमाल अधिकाराने बोलणार्‍यांच्याही मनात नैतिकतेबद्दल संभ्रम असूं शकतो. पण महत्वाचा मुद्दा हा कीं कोणत्याही कायद्याची मूलभूत नैतिकता गृहीत धरतां येत नाही पण त्याचबरोबर नैतिकतेवरच आधारलेलाही कायदा सर्वाना समान न्याय देवूं शकेलच असंही नाही !

[ या ट्रायब्युनलच्या सुनावणीवर आधारित १९६०च्या आसपासचा Judgement at Nyuremburg हा सर्वांगानी अप्रतिम असलेला सिनेमा जर कुणी पाहिला नसेल तर अवश्य पहावा.]

३] ही पोस्ट अजून लांबवणं नैतिकतेला धरून नसलं, तरीही - माझ्या आधीच्या पोस्ट्मधे किंवा इतरत्र मीं दरोडेखोरीचं किंवा 'पायरसी'चं समर्थन केलेलं नसून , संबंधित कायद्याकडे बघण्याची दृष्टी किती वेगवेगळी असूं शकते, एवढंच दाखवलं आहे !

जो कायदा बलात्काराला गुन्हा ठरवतो तिथेच वेश्याव्यवसाय मात्र चालून जातो तो कसा? >> अत्यंत चुकीची माहीती!! आजचीच बातमी! http://zeenews.india.com/marathi/news/india/tv-actress-arrested-in-sex-r...

बलात्काराबाबत थोड्यावेळाने लिहितो, माझा बॉस आला >>> Smiley

सॉरी, पटकन हसायलाच आलं. तुमच्या लक्षातच आलं असेल का ते.

Pages