पाहाता पाहाता २०१४ चे सात महिने सरले; श्रावण आला आणि सणवारांची रेलचेलही आलीच. आता काहीच दिवसांत गणराय येतील मूषकावर बसून आणि महालक्ष्म्यांचंही आवाहन होईलच!
या १० भारलेल्या दिवसांतच गौरीही असतात. विदर्भात मात्र महालक्ष्मी म्हणतात. तीन दिवस माहेरी असतात. सगळेच लोक मग त्यांच्या सरबराईमध्ये गुंग होतात.
ऋषीपंचमी नंतर एखाददिवशी फुलोरा करण्याचा घाट असतो. यात आई, आजी अन जवळच्या काकू, आत्या वगैरे येऊन सगळा फुलोरा करतात. यामध्ये करंज्या, तळणीचे मोदक, साटोर्या, लाडू, अनरसे, पापड्या, शंकरपाळे असे प्रकार असतात. विशेष प्रकारही केल्या जातात जसे वेणी वगैरे. आमच्या कडे गणपतीचा फुलोराही याचवेळेला करतात. काही जणांकडे मुका फुलोराही असतो. यात फुलोरा पूर्ण होईपर्यंत कुणाशी बोलायचं नसतं.
मग सुरुवात होते ती माळ्यावरून ट्रंक काढण्यापासून... सकाळी आजीची नित्यपूजा, पाठ झाले की माळ्यावरून मोठी ट्रंक तिला खाली उतरवून द्यायची; हे काम करून झालं की मग साफसफाई करायची. फुलोरा ठेवायची जाळी काढून द्यायची; महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द आहे, आता डोक्यात नाही मात्र) काढून द्यायचे. त्यानंतर मग नमस्कार करून आजी हळूवारपणे मऊ सुती कापडात गुंडाळून ठेवलेले मुखवटे बाहेर काढते. ज्येष्ठा आणि कनिष्ठेचे मुखवटे झालेत की मग बाळांचेही मुखवटे. यानंतर, परातीत धान्याच्या राशीवर त्यांची तात्पुरती स्थापना होते. मग पूजा होते.
यानंतर सोयीसाठी म्हणून दुसर्या दिवशीकरता चण्याच्या डाळीचं पुरण शिजवून तयार केलं जातं. अर्थातच, कडक सोवळ्यात.
यावेळेपर्यंत नातलग घरी जमायला लागतात. त्यासोबतच महालक्ष्म्या जिथे मांडायच्या ती जागा साफ करून बाकी सोय केली जाते. बर्याच जणांकडे मखर असतं ते आमच्याकडे नाही. त्यामुळे बरीच मेहेनत वाचते. एका घडवंचीवर गालीचा घालून ती जागा सजवली जाते. बाजूला शोभा म्हणून झाडाच्या कुंड्या ठेवल्या जातात. वर फुलोरा ठेवण्याकरता जागा केली जाते. हे सगळं आटपेस्तोवर संध्याकाळचे ४ / ४.३० होतात.
आता खरं बायकांचं काम चालू होतं. सकाळी धूवून स्वच्छ केलेले स्टँड आणले जातात. त्याच्या आतमध्ये तयार केलेल्या फुलोर्यामधला थोडा-थोडा फराळ आत ठेवला जातो. मग कोरी जरीची साडी घडी मोडून त्यांना नेसवली जाते. हे कौशल्याचं अन अनुभवाचं काम! आई, काकू मात्र एका प्रयत्नात व्यवस्थित करतात. नीट मनासारख्या निर्या पाडून चोपदार साडी घालून झाली की मग हात आणि मानेपर्यंतचा भाग (हा कापडाचा केलेला असतो) बसवला जातो. यानंतर बाळांना ही तयार केले जाते. आमच्याकडेतरी बाळांचे तयार कपडेच वापरले जातात. मग तयार केलेल्या मूर्ती स्थानापन्न केल्या जातात.
सकाळी पूजा केलेले मुखवटे घराच्या दारा पर्यंत नेतात. मग लहान मुलांना थाळी चमचा वाजवायला सांगतात आणि वाजत गाजत महालक्ष्म्यांचं आगमन होतं. ते मुखवटे मग मूर्त्यांवर बसवले जातात. ज्येष्ठा, कनिष्ठा नीट पाहून बसवतात. पदर वगैरे नीट बसवतात आणि मूर्ती पूर्ण करतात. धान्याची रासही ओततात खाली घोंगडीवर. मूर्तींना आणि बाळांना दागिने घालतात. मंगळसूत्र, चपलाहार, पोहेहार, लक्ष्मीहार, मोत्येहार, बांगड्या, पाटल्या, कर्णफुलं, वेणी असं सगळं घालून झालं की काय रूपवान दिसतात!
याचवेळेस एखादी अंगणात रांगोळी काढते आणि दारापासून तर महालक्ष्म्यांच्या स्थानापर्यंत पाऊलं काढते. दिवेलागणीच्या वेळेस मग लहानशी पूजा होते; फक्त फुलं आणि हळद-कुंकवानी. आवाहन केल्या जातं. नंतर गणपतीच्या आरतीपाठोपाठ देवीचीही आरती गायली जाते. यावेळेस साधा प्रसाद असतो.
गौरीपुजनाचा असतो दुसरा दिवस...
सकाळपासून कामाची लगबग सुरु होते. आई - आजी तर भल्यापहाटे आवरून कामाला लागलेल्या असतात. यांच्याबरोबर अजून एकजण सोवळ्यात असते. बाबा/मी वगैरे सकाळीच भाजी आणायला जातो. तर्हेतर्हेची भाजी आणल्या जाते. सग़ळ्यात महत्त्वाचा म्हणजे १६ भाज्यांचा पुडा! याबरोबरच पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीरीला लागणार्या भाज्या येतात. तांबूल करण्याकरता विड्याची पानंही येतात. काही विशेष पानं मिळाली तर तीही आणली जातात. जसे की वावडिंगाची, ओव्याची, आघाड्याची वगैरे. भाजी येऊन पडली की ती निवडणे, साफ करणे, धुणे, चिरणे यात सगळ्या लेडीजबायका व्यस्त होतात.
एकजण पूजेची तयारी करत असतो. हार, फुलं, दूर्वा, देवींकरता शेवंतीच्या फुलाच्या वेण्या आणल्या जातात. बाकी सगळं पूजेचं साहित्य सगळं आहे नाही याची खात्री करतो. धूपाचीही तयारी असते. राळ, धूप, गोवर्यांची जमवाजमव असते. एकजण सूत तयार करून त्याला हळद-कुंकवाची बोटे लावून तयार ठेवते. हे सूत घरातल्या प्रत्येकीकरता अन लहान बाळांकरता करतात.
बाबा आंघोळ करून तयार झाले की आधीपासून ठरवून ठेवलेल्या गुरुजींना बोलावणं पाठवलं जातं. ते आलेत की गरम दूध / चहा होतो आणि मग साग्रसंगीत पूजा सुरू होते. गणपतीची, खणखणीत आवाजात अथर्वशीर्ष म्हणून पूजा झाली की मग लक्ष्मीपूजन सुरू होतं. यात सूत वाहिलं जातं. लक्ष्मीला खण, कुंकवाचा करंडा, शुद्ध तुपावरचं काजळ, फणी ही सौभाग्यलेणी दिली जातात. याचवेळेस फुलोराही वाहिला जातो. आमच्याकडे मात्र फुलोरा ड्ब्यात भरून तो डबा वर ठेवतात. शेवटी धूप, दीप दाखवून साग्रसंगीत नैवेद्य दाखवतात. यात तांबूलाचाही नैवेद्य असतो. मग दणक्यात आरती होते. हा एकप्रकारचा कुलाचार आहे म्हणून मग अंबाबाईचा जोगवा मागतात. यानंतर पंगत!
सवाष्ण-ब्राह्मण आले नसतील या वेळेपर्यंत तर त्यांना बोलावून घेतात. यांचं बुकींग झालेलं असावच लागतं कारण सगळ्यांकडेच हा कार्यक्रम असतो. घरात पंगत मांडली जाते तर बाहेर पाट, हात-पाय धुण्याकरता पाणी ठेवतात. मोठी ताटं मांडतात, भोवती रांगोळी काढतात. सुवासिक उद असतोच त्यामुळे प्रसन्न वातावरण असतं. ताटं वाढून तयार असतात. पाहुण्यांना पानावर बसवलं की वाफाळता भात-वरण अन अन्नशुद्धी वाढली की संकल्प सोडतात. शांतपणे पंगत होते.
जेवणात मोठा थाट असतो... मीठ, लिंबू, पंचामृत, मोकळी डाळ, हिरवी चटणी, कोशिंबीर, लोणचं डव्या बाजूला असतं. भरड्याचे वडे, गिलक्यांची, वावडिंगाच्या पानांची, ओव्याच्या पानांची भजी असतात. कधीकधी पापड कुरडयाही असतात. घारी, पुरणाची खीर, फुलोर्यामधला फराळ ही वाढतात. उजवीकडे १६ भाज्यांची परतून केलेली भाजी (ही अगदी प्रसादापुरतीच करतात शक्यतो), एक अजून फळभाजी, पातळभाजी, कढी असते. विशेष प्रकार म्हणजे आजच्या महाप्रसादामध्ये ज्वारीची आंबील असते. दूध + पिठीसाखर घालून सरबरीत केलेली पानावर वाढतात. गरम गरम तुपानी माखलेल्या गच्च पुरणानी भरलेल्या खास पोळीचा आग्रह तर केल्या जातोच! कुणाला हवं असल्यास याबरोबर दूध + तूप देतात. शांतपणे पोटभर जेवून तृप्त झालेल्या पाहुण्यांना मग तांबूल दिला जातो.
यादिवशी सगळ्यांची जेवणं होईतो दुपारचे तीन तरी होतातच... मग संध्याकाळी काही विशेष नसतं. गप्पा-टप्पा अन आराम!
तिसर्या दिवशी सकाळी साधी पूजा करतात. आदल्या दिवशी जे लोक राहिलेले असतात ते लोक आज प्रसादाला असतात. वडा-पुरणाचा महाप्रसाद असतो आजच्याही दिवशी. दुपारी मग, कुणीतरी जवळच्या १०/१५ घरी संध्याकाळच्या हळदीकुंकवाचं बोलावणं करतं. संध्याकाळी मग अंगणात सडा घालून रांगोळी घालतात. आलेल्या सवाष्णीं लक्ष्मीची ओटी भरतात. आई / आजी या सवाष्णींणींची ओटी भरतात. त्यांना मसाल्याचं गरम दूध देतात. हा कार्यक्रम आटोपला की संध्याकाळची आरती होते. मग जेवणं. यानंतर ज्येष्ठा-कनिष्ठांची पाठवणी केली जाते. बाहेरगावी जाणार्या पाहुण्यांना प्रसादाची पाकीटं दिली जातात. मुखवटे पुढच्या वर्षी करता पुन्हा ट्रंकेत ठेवले जातात.
तर अशी ही तीन दिवसांच्या माहेरवाशीणीची कहाणी...
हा फटू (यावर्षीच्या महालक्ष्म्यांचा आहे)
(दोन वर्षे झाली माबोकर होऊन; ववि, टीशर्ट समितीमध्येही काम केलं. पण लेखन कधी केलं नव्हतं. हा पहिलाच प्रयत्न. काही चूक असेल तर माफी असावी)
मस्त योकू. लिहायला लागलास.
मस्त योकू. लिहायला लागलास.
जमतंय जमतंय.. लिहायलाही
जमतंय जमतंय.. लिहायलाही जमतंय...
माझ्या काकू आजीकडे सोळा वेगवेगळ्या भाज्या करतात... सोळा भाज्यांची एक करायच्या ऐवजी...
छान लिहिलंय!
छान लिहिलंय!
नॉस्टॅल्जिक वाटलं एकदम.
नॉस्टॅल्जिक वाटलं एकदम. आमच्या गौरी फक्त इतक्या दणक्यात नसतात, बर्यापैकी आटोपशीर प्रकार आहे.
गौरी सकाळी आणण्याची पद्धत वेगळी वाटली. मी आमच्याकडे आणि आसपास तिन्हीसांजेच्या आधी आणलेल्याच बघितलं आहे - खड्याच्या असोत किंवा उभ्याच्या.
इथेच पूर्वी कुणीतरी गौरींवर फार सुरेख लिहिलं होतं ना? आठवत असेल तर लिंक द्या ना..
छान लिहिलंयस योकु. आधीच्या
छान लिहिलंयस योकु.
आधीच्या पाककृती लिखाणातून तुझ्या लेखन कौशल्याची चुणूक दिसलीच होती. हा लेखही मस्त जमलाय. महालक्ष्म्यांचे आणि त्यांच्या पूजेचे संपूर्ण वर्णन वाचून हुबेहूब चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले. माझी अगदी खास मैत्रीण आहे अकोल्याची, तिच्या घरी हे सगळं जवळून पाहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलय. वरदा, तू आशूडी चा
छान लिहिलय.
वरदा, तू आशूडी चा हा लेख म्हणतेस का? http://www.maayboli.com/node/28573
छान लिहलयं ..
छान लिहलयं ..
छान लिहिलंयत योकु. आमच्या
छान लिहिलंयत योकु.
आमच्या शेजारच्या घरी मस्त प्रकार पाहिला होता.दारापासून सर्व घरात चंदनाची पाऊले काढली होती.गौरीला सर्व घरात फिरवतात,तिची ती पाऊले असतात.
धन्यवाद, शूम्पी
धन्यवाद, शूम्पी
छान लिहिलयं!
छान लिहिलयं!
खूप सुंदर! माहेरच्या उभ्या
खूप सुंदर! माहेरच्या उभ्या गौरी आठवल्या. आजी गेली, बाबा गेले आणि ती मजाच संपली. असो.
महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द) बहुतेक याला कोठा म्हणतात आमच्याकडे.
योकु, छान लिहिलेस आवडल
योकु, छान लिहिलेस
आवडल
एकदम नोस्टॅल्जिक झाले!
एकदम नोस्टॅल्जिक झाले! गौरी-गणपती हा माझा सगळ्यात आवडता सण आहे!!
मस्त लिहिलंय. माझ्या आजोळच्या
मस्त लिहिलंय.
माझ्या आजोळच्या मी कधीच बघितल्या नाहीत.
पण आई सांगते त्याप्रमाणे खड्याच्या गौरी असतात. नदीवरून पाच खडे आणि तेरडे आणतात.
जेवणात एका दिवशी भाजी भाकरीचा तर एका दिवशी कढी वडीचा नैवेद्य असतो. पुरणाचा तर असतोच.
मस्त लिहिलय. आमच्याकडे
मस्त लिहिलय. आमच्याकडे खड्याच्या गौरी असतात पण ह्या उभ्याच्या गौरींबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आल आहे. आज त्यात अजून भर पडली.
योकु, मस्त लिहिलं आहेस.
योकु, मस्त लिहिलं आहेस. मोठाच कार्यक्रम आहे हा महालक्ष्मीचा.
धन्यवाद लोक्स...
धन्यवाद लोक्स...
योकु, अगदी तंतोतंत लिहिलं
योकु,
अगदी तंतोतंत लिहिलं आहेस.
मस्त रे योकु!!
मस्त रे योकु!!
फोटो टाकायचे ना..
फोटो टाकायचे ना..
लेख अप्रतिमच. अगदी सर्व सोहळा
लेख अप्रतिमच. अगदी सर्व सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला.
आमच्याकडे खड्यांच्या असतात त्यामुळे मलापण अशा उभ्या गौरीबद्दल कुतूहल वाटते.
आमच्या इथेही बसतात
आमच्या इथेही बसतात महालक्ष्म्या. उभ्याच्या. पहिल्या दिवशी सकाळीच आणतात, भाजी भाकरीचा नैवेद्य, दुसर्या दिवशी पुरणाचा नैवेद्य आणि संध्याकाळी हळदी- कुंकू, तिसर्या दिवशी दहि भाताचा नैवेद्य.
छान लिहीले आहे. त्या स्टँडला
छान लिहीले आहे. त्या स्टँडला तिवई म्हणतात. आमच्याकडे माहेरी हे असे. आली आली गौर. कश्याच्या पावलांनी, सोन्या रुप्याच्या पावलांनी असे म्हणत मुखवट्यांच्या मागे फिरायचे काम व जोगवा मागायचे काम केले आहे. आमच्याकडे पण पहिल्या दिवशी भाजी भाकरी, दुसृया दिवशी पुरण, ति स र्या दिवशी
दहिभात. मग विसर्जन.
नॉस्टॅल्जिक केलत राव !!!!
नॉस्टॅल्जिक केलत राव !!!! महालक्ष्म्या कधी येत आहे असे झाले लेख वाचुन.
महालक्ष्म्यांचे स्टॅन्ड (याला मराठी शब्द)>> आम्ही अडण्या म्हणतो.
योकु, काल आपण ह्या बद्दल बोलत
योकु, काल आपण ह्या बद्दल बोलत होतो आणि लगेच लेख लिहून पण तयार. खूप मस्तच माहिती मिळाली. आणि गौरीला तुमच्याकडे खरच खूप मजा असते.
अगोदरच्या वर्षीचे फोटो असतील तर ते डकव.
इथे सुद्धा पुन्हा लिहिते आमच्याकडे जितके दिवस गणपती तेवढे दिवस गौरी असते. आमची गौरी गणपतीबरोबरच येते आणि गणपतीबरोबरच जाते. म्हणजे ज्या दिवशी गणपती जाणार त्याच दिवशी गौरी जाते. गणपती दिड दिवसाचा असेल तर गौरीसुद्धा दिड दिवसच राहते आणि १० दिवस गणपती असेल तर गौरीसुद्दा १० दिवस राहते. आमच्याकडे गौरी हळदीच रोप असते. त्यामूळे मुखवट्यावाल्या उभ्या गौरींच नेहमीच आकर्षण वाटत.
मस्त लिहीलय योकु. आवडल.
मस्त लिहीलय योकु. आवडल.:स्मित:
मस्त लिहिलय .. आता यवतमाळ
मस्त लिहिलय ..
आता यवतमाळ जातेय सो मज्जाच मज्जा ..
एक शंका .. उभ्या महालक्ष्म्या फक्त विदर्भातच बसतात का ? वरील सर्व प्रतिसाद वाचुन तसच दिसतय .. मला वाटल सगळीकडेच उभ्या असतात ते..
मीपण काढलेत काही फोटो मागच्या वेळी .. कुणाला काही हरकत नसेल तर टाकते इथे ..
अरे हो आणखी एक, इकडे
अरे हो आणखी एक, इकडे महालक्ष्म्यांचे सोवळे ओवळे प्रमाणेच त्यांचे रुसवे फुगवे पन असतात ..
लहानीला मोठीप्रमाणेच सर्व दागदागीने हवे.. काकणभर जास्तच पण कमी नाही .. अगदि साडी पण जी महागाची असेल तीच हवी नाहीतर ती नेसतच नाही .. आणि त्या कुणाच्याही हातानी बसत नाही , त्यांना नेहमी बसवणाराच व्यक्ती लागतो .. पण कसे का घरातले लेकर मात्र चालतात त्यांना..त्यांच्या हातचं सगळ काही चालत ..
टीना हे ऐतेनच की!
टीना हे ऐतेनच की!
Pages