लय सॉरी ! (Movie Review - Lai Bhari लय भारी)

Submitted by रसप on 15 July, 2014 - 03:34

माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.

हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.

lai_bhari_main.jpg

गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !

trailer-8.jpg

खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.

'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.

संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !

कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.

तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.

संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.

सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !

एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !

रेटिंग - * १/२

http://www.ranjeetparadkar.com/2014/07/movie-review-lai-bhari.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघणार नव्हतोच. आता अजिबात बघणार नाही. ह्या रसप साहेबांना आमचे शेकडो रुपये वाचवल्याबद्दल एकदा पार्टी द्यावीच लागणार. Happy

विचारवंत | 15 July, 2014 - 13:30 नवीन
बघणार नव्हतोच. आता अजिबात बघणार नाही. ह्या रसप साहेबांना आमचे शेकडो रुपये वाचवल्याबद्दल एकदा पार्टी द्यावीच लागणार

>> असं आजपर्यंत अनेक जण म्हणालेत. एकसुद्धा पार्टी मिळाली नाही ! Sad

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र .... चांगले लिहिले असते तर रितेश च्या फेस्बुक पेज वर टाकला असता लेख .....

आता जौद्या Wink .....लयच सॉरी राव Biggrin

असं आजपर्यंत अनेक जण म्हणालेत. एकसुद्धा पार्टी मिळाली नाही >>>>>>>> तुमचा बी केजरीवाल झाला व्हय ? Happy

मला तरी बरा वाटला . काही विनोद चांगले आहेत . कथानक नेहेमीच्च आहे हे मान्य . (तसही मसाला चित्रपटात काय वेगळ असत) रितेशने चांगल काम केलय . शरद केळकर मात्र झकास . अप्रतिम वगैरे नसला तरी ३ स्टार एवढा तरी वाटला .

मी पण लय भारी बघून आले Sad नाहीच आवडला हा चित्रपट..आणि अजून खटकलेली गोष्ट म्हणजे मराठी वाक्यामध्ये आलेले हिंदी शब्द..तो वडिलांना म्हणत असतो मी तुमची तारीफ करतोय? तारीफ...अजून ३-४ ठिकाणी असच झालंय ..आठवल्यावर सांगेल..

ती छोटी रखुमाई खूप आवडली..जरा अधेमधे ओरडून बोलत होती,पण होती खूप गोड..:)

एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते>>तेवढंच काय ते पैसा वसूल होत

गेल्या रविवारी टिकीट मिळाले नाही म्हणुन येत्या रविवारी पिक्चर बघण्याचा प्लान केलाय. Sad
घरात सगळ्यांना बघायचा आहे आता काय करु Sad

निल्सन | 15 July, 2014 - 14:31

>> निल्सन इतके काही निराश होऊ नका. अगदीच काही नाही तर सकाळच्या शोला जा. तेवढेच पैसे पण वाचतील. आणि चित्रपट कसा का असेना.. घरच्यांसोबत चित्रपट बघण्याची मजा वेगळीच असते. त्यामुळे तिकिटे काढली असतील तर जा अन्यथा घरच्यांना कन्व्हिंस करुन इतर कोणतातरी चित्रपट बघा.

मला तरी बरा वाटला . काही विनोद चांगले आहेत . कथानक नेहेमीच्च आहे हे मान्य . (तसही मसाला चित्रपटात काय वेगळ असत)>>>> ३-४ दिवस हाऊसफुल्ल असल्याने तिकीटेच मिळत न्हवती, फायनली काल रात्री ११ चा लास्ट शो पाहिला... चित्रपट कसा असेल ते प्रोमो वरूनच कळत होते तरीही फक्त निशिकांत आणि सलमानसाठीबघायला गेले दोघांनीही घोर निराशा केली.

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !>>> खरच .खूपच भरून आले होते हे गाण ऐकताना. बघतानाच पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटले.. .

रितेशने चांगल काम केलय . शरद केळकर मात्र झकास . >>> अगदी अगदी केदार... शरद केळकरने अशरक्ष खाऊन टाकलेय फिल्म... (हे माझे वैयक्तिक मत) बादवे आजकाल हिरो पेक्शा फिल्म मधील व्हिलनच जास्त आवडायला लागलेत Happy

निल्सन घाबरु नका सिनेमा अगदीच बंडल नाही टाईमपास मुव्ही आहे. Happy

बाकी अपेक्षा नाहीच आहे पण संजय मेमाणेच्या सिनेमॅटोग्राफीसाठी कदाचित बघणारे.
वारीची एरियल फोटोग्राफी वगैरे बर्‍याच गोष्टी आहेत असं कळलंय

एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. >> हे त्रिकालबाधीत सत्य सांगितलेत तुम्ही रसप... ज्यांना अभिनय येत नाही ते पुढे जाऊन सुपरस्टार होण्याची शक्यता असते याचे सलमान हे जितेजागते उदाहरण. बाकी परीक्षण लय भारी.

सलमानला अभिनय येत नाही ??
अक्षर्शा असहमत !

एकवेळ तो स्टारडमच्या जीवावरच पिक्चर खेचतो म्हणून अभिनय करायची फारशी मेहनत घेत नाही असे बोलू शकता.
अन्यथा त्याच्यात अभिनयाचा स्पार्क नसता तर "मैने प्यार किया" करून तिथेच थांबला असता.

"लय भारी" अजून स्वता पाहिला नाही म्हणून नो कॉमेंटस, पण तरुणवर्गात लोकप्रिय होऊ लागलाय.
आशा करतो गल्ला खेचेल. मराठी पाऊल पडते पुढे !

परीक्षण पटो न पटो, ते वैयक्तिक मत असते, पण लिहिलेय लय भारी (y)

आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !>>> खरच .खूपच भरून आले होते हे गाण ऐकताना. बघतानाच पंढरपूरला जाऊन आल्यासारखे वाटले.. .>>>>>> लाखो अनुमोदन. जबरी गाणे आहे. पण ते शोभलय रितेशच्या तोन्डी. मला तरी असे वाटले. आणी तसेही मराठीत आता हिरो म्हणून सध्या तरी मकरन्द, भरत, सन्जय यान्चीच चलती असते.

एक शंका विचारू का? (कदाचित चुकीची असेल पण डोक्यात आलीय खरी, चुकीची असेल तर क्षमस्व!)

आपल्याला हा चित्रपट फारसा रुचला नाही हे खरेय, अन्यथा आपल्या लेखाचे शीर्षक देखील "लयभारी लयंच भारी" असे काहीसे असते.
पण आपल्याला चित्रपट न आवडल्याने आपण लय भारी या नावावरून यमक जुळवत "लय सॉरी" असे शीर्षक ठेवले. आणि मग त्या शीर्षकाला जस्टीफाय करायला जरा जास्तच नकारात्मक लिहिले गेले, कदाचित आपल्याही नकळतच ..

Pages