माणसाच्या अनेक जातींपैकी एक जात आहे. 'आरंभशूर'.
ह्या जातीत अनेक खेळाडू येतात. उदा. शिखर धवन. सुरुवातीला दोन-चार फटके असे मारेल की डोळ्यांचं पारणं फिटावं आणि जरा नजर बसली की गोलंदाजाला वाढदिवसाचं प्रेझेंट द्यावं इतक्या प्रेमाने स्वत:ची विकेट बहाल करून मोकळा होईल. चित्रपट आणि माणसाची नाळ तेव्हाच जुळते जेव्हा चित्रपट माणसाशी थेट संबंध जोडतात. जसं, ह्या 'आरंभशूर' जातीत अनेक चित्रपटही मोडतात. Or lets say, बहुतांश चित्रपट ह्याच जातीत येत असावेत.
हे सांगायचं कारण इतकंच की, 'लय भारी' अपेक्षेने 'निशिकांत कामत' ह्यांचा 'लय भारी' बघायला गेलो आणि 'लय सॉरी' झालो !
चित्रपटाच्या सुरुवातीला एक सुंदर गाणं, त्याचं तितकंच छान चित्रीकरण, एकंदरीतच अपेक्षा उंचावणारी निर्मितीमुल्याची झलक ह्या सगळ्यांतून जरा माहोल बनल्यासारखं वाटतं. पण नजर बसल्यावर जसा शिखर धवन विकेट फेकून देतो, तसं मध्यंतरापर्यंत 'लय भारी'ची लेव्हल 'भारी'पासून 'बरी' पर्यंत येते आणि मध्यंतरानंतर तर हाराकिरी होते. मग जाग आलेला प्रेक्षक सगळाच ठोकताळा मांडतो. अगदी सुरुवातीपासून.
गावातलं एक मोठं प्रस्थ. प्रतापसिंह निंबाळकर (उदय टिकेकर). सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या निंबाळकर व त्यांच्या घराण्याला सगळेच जण खूप मानत असतात. पण त्यांना मूल होत नसतं आणि ह्याचं शल्य पत्नी सुमित्रा देवींना (तन्वी आझमी) कायम बोचत असतं. मग एकदा वारीला जाऊन त्या विठ्ठलाला साकडं घालतात आणि विठ्ठल पावतो ! (निंबाळकर-दाभोळकर हे कमजोर यमक असल्याने वृथा संबंध जोडू नये.)
इतक्या वर्षांनी होणारं मूल आणि त्या पहिल्या मुलाला विठ्ठलाला अर्पण करायचं ? पत्नीचं हे म्हणणं न पटल्याने, गावातल्या गोरगरिबांच्या दु:खाने व्यथित होणारे प्रतापसिंह निंबाळकर स्वत:च्या पत्नीच्या आयुष्यातील महत्कठीण टप्प्यात तिला एकटं सोडून, चिडून थेट लंडनला निघून जातात आणि पुत्रजन्मानंतरच परततात ! आता देवाला वचन दिलं आहे आणि नवऱ्यालाही नाराज करायचं नाहीये. मग ह्यावर उपाय काय ? तो देव देणारच असतो. काय दिला असेल, हे समजण्याइतके चित्रपट आपले पाहून झाले असल्याने आपल्याला पहिल्या अर्ध्या तासात पुढचा अख्खा चित्रपट कळतो आणि तो प्रत्यक्षात घडत असताना बघण्यासारखं बहुतेक वेळेस काही नसल्याने आपण आपल्या मनात पुढचा चित्रपट बघत राहतो.
अपेक्षेनुसार सगळा घटनाक्रम तसाच असणे जर 'लय भारी' असेल तर आपण 'लय सॉरी' आहोत राव ! अहो, अश्या ष्टोऱ्या तर पोटातल्या पोरालाही माहित असतात आजकाल !
खरं तर रितेश देशमुख मला एक बरा अभिनेता वाटतो. पण इथे अनेक ठिकाणी तो थेट 'बिग बी'ची कॉपी मारायला बघतो. अरे लेकीन उसके पास जो ष्टाईल है, जो आवाज है वो तुम्हारे पास किधर है ? हांय ?
अभ्यासक्रमातून व्याकरणेत्यादी जसं बाद झालंय तसं मराठीचे उच्चार ही बाब आता माध्यमांतूनही बाद झाली आहे, त्यामुळे त्याबद्दल 'लय सॉरी' होण्यात काही अर्थ नाही.
'गुड्डी'मध्ये 'प्राण' साहेबांनी मरतुकड्या लोकांकडून केवळ ते 'हीरो' होते म्हणून मार खावा लागल्याची व्यथा बोलून दाखवली होती. साला... एखाद्याने आयुष्यभर 'जिम' लावून, खुराक घेऊन बॉडी बनवावी आणि ज्याच्या मांड्यांएव्हढे त्याचे दंड असतील अश्या एका चॉकलेटी चेहऱ्याने त्याला बुकलून काढावं; असं अशक्यप्राय हीरोपण आणखी कितीदा दैवी कृपेच्या नावावर आमच्या माथी फोडलं जाणार आहे, हे त्या विठ्ठलाला विचारलं तर तोही बहुतेक 'लय सॉरी'च म्हणेल ! त्यामुळे हे सगळं शरद केळकरने स्वीकार केलं असेलच. आपणही करू. पण तरी तो आपली छाप सोडून जातोच.
संगीतकार अजय-अतुल आणि महाराष्ट्रातली धरणं, दोघांची सद्यस्थिती एकसारखीच वाटते मला. मोजकाच साठा उरला आहे. आता कपात मावेल इतकंच उरलं असेल, तर कपात होणं तर क्रमप्राप्तच आहे ! त्यामुळे आठवड्यातून मोजून एक तास नळाने धो-धो बरसावं तसं अजय-अतुल सुरुवातीच्या 'माउली माउली' मध्ये मनसोक्त बरसतात आणि नंतर लय म्हंजे लयच सॉरी होतात !
कुणी सई ताम्हणकरचीही कॉपी मारू शकतं, असा एक झटका मला 'आदिती पोहनकर'ला पाहून मिळाला.
एका सुमार गाण्याच्या टुकार कडव्याच्या भिकार नाचापुरती जेव्हा जेनेलिया पडद्यावर झळकते, तो क्षण तिच्या आजवरच्या कारकीर्दीतला एकमेव असा क्षण असावा जेव्हा तिला पब्लिककडून शिट्ट्या मिळाल्या असाव्यात.
तन्वी आझमी ही एक माझी आवडती अभिनेत्री आहे. तिने आजच्या काळातली निरुपा रॉय व्यवस्थित रंगवली आहे.
संवादलेखनाने काही उल्लेखनीय मजा आणली, असं वाटलं नाही.
सर्वात मोठा अपेक्षाभंग दिग्दर्शक निशिकांत कामतकडून होतो. एका दृश्यापुरता सलमान खान झळकतो. त्या दृश्यात तो अभिनयशून्यतेच्या सर्व मर्यादा पार करतो. तरी ते ठीक आहे कारण त्याच्याकडून कुणालाच अभिनय करवून घेता आलाच नाहीये आजपर्यंत. पण बाकीचे ? त्याच दृश्यातल्या रितेशला पाहून असं वाटलं की दिग्दर्शक म्हणून रिकामी खुर्ची ठेवली असावी की काय ?
आवर्जून 'लय भारी' म्हणावं, अशी एकच गोष्ट जाणवली ती म्हणजे 'माउली माउली' हे गाणं. सुंदर शब्द, तितकीच सुंदर चाल व वारीचं त्याच तोडीचं चित्रीकरण. अगदी सुरुवातीला असलं तरी, चित्रपटगृहातून बाहेर आल्यावरही हेच गीत आपल्या ओठांवर असतं. पण ते तेव्हढंच !
एकुणात काय ?
तर आपली कहाणी सॉरी, गाणी सॉरी, हीरो-हीरवणी सॉरी.. च्या मायला सगळंच लय सॉरी !
रेटिंग - * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2014/07/movie-review-lai-bhari.html
Crying baby gets the milk
Crying baby gets the milk च्या जवळ जाणारा >> अगदी अगदी. त्यात अश्लील काही वाटत नाही. 'भांडणाशिवाय आपल्याला करमत नाही', 'राड्याशिवाय मजा नाही', 'मारामारी केल्याशिवाय पदरात काही पडत नाही'- असं काहीसं. लार्जर दॅन लाईफ कडे जाणारे रस्ते आहेत सगळे. तुम्ही लोकांनीच अनेक दशकांपुर्वी बच्चनसाहेबांना सुरू करून दिलंत. आता भोगा.
मी कोल्हापुरची नसुन पण मला
मी कोल्हापुरची नसुन पण मला कळाला
तंटा म्हणजे भांडण. घंटा नाय हे वाक्य आजकाल काहीही नाही या अर्थाने वापरतात.
भांड्ण केलं नाही तर काही घंटा मिळत नाही म्हणजे काहीही मिळत नाही असा त्याचा अर्थ आहे
त्या डायलॉगच्या निरर्थकतेचा
त्या डायलॉगच्या निरर्थकतेचा कीसच पाडायचा झाल्यास.........
'घंटा' - हे प्रतीक खरं तर शून्यत्वाचं आहे. उडवून लावायचं असेल, तर 'घंटा घे' वगैरे म्हटलं जातं. 'काही मिळालं नाही' = 'घंटा मिळाला.' किंवा 'तुला काय 'घंटा' कळतं का ?' = तुला काहीही कळत नाही.
थोडक्यात, 'घंटा' म्हणजे 'शून्य', असा एक लौकिकार्थ.
घंटा नाय = शून्य नाय = काही तरी का होईना, आहे.
तंटा नाय, तर घंटा नाय = झगडा/ लफडा नाही, तर काही तरी मिळेल. म्हणजे काय त्याला अहिंसेचा संदेश द्यायचा आहे का ?
शांतिदूत माऊली??
हे सगळं त्याला जे काही सांगायचं आहे त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. ते पिटातल्या पब्लिकला कळणार नाहीच, त्यांच्यासाठी हा जबराट जोरदार पंच आहे. पण प्रत्यक्षात सपशेल गंडलेली यमकायमकी आहे.
@ त्या डायलॉगच्या निरर्थकतेचा
@ त्या डायलॉगच्या निरर्थकतेचा कीसच पाडायचा झाल्यास.........
मलाही नक्की तसेच वाटत होते पण शब्दबद्ध करता येत नव्हते ते तुम्ही केलेत.
एकतर नायक या उद्गाराच्या विरूद्ध आहे किंवा उगाचच पंच लाईन आहे.
त्याचप्रमाणे 'आपला हात भारी आपला लाथ भारी आपलं सगळंच भारी' असल काहीतरी आहे ते सुद्धा गंडलेलं आहे.
जावूद्या आजकाल बोलण्याच्या वाताहातीत आणखीन एक वीट.
हल्ली अशुध्द बोलणे, मराठी
हल्ली अशुध्द बोलणे, मराठी बोलता न येणे, कारण नसताना इंग्रजी शब्द वापरणे ...... यानेच माणसे मोठी होतात....
तंटा नाही तर घंटा नाही म्हणजे
तंटा नाही तर घंटा नाही
म्हणजे भांडल्याशिवाय काहीही मिळत नाही .
>>>>>
एक्झाक्टली के.जा.,
आजच ऑफिसमध्ये एकाने ओवरटाईम वरून लाईन मॅनेजरशी वाद घातला आणि नंतर आम्हाला हा किस्सा सांगताना त्याने हाच डायलॉग याच अर्थाने अगदी अचूकपणे वापरला.
मलाही आवडलाय, व्यवहारात मी सुद्धा याचा वापर करण्याची शक्यता पूरेपूर आहे
'घंटा' - हे प्रतीक खरं तर
'घंटा' - हे प्रतीक खरं तर शून्यत्वाचं आहे. उडवून लावायचं असेल, तर 'घंटा घे' वगैरे म्हटलं जातं. 'काही मिळालं नाही' = 'घंटा मिळाला.' किंवा 'तुला काय 'घंटा' कळतं का ?' = तुला काहीही कळत नाही.
थोडक्यात, 'घंटा' म्हणजे 'शून्य', असा एक लौकिकार्थ.
घंटा नाय = शून्य नाय = काही तरी का होईना, आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>
रसप तुम्ही अर्थ लावण्यात चुकला आहात,
घंटा नाय म्हणजे "घंटा उर्फ शून्य नाय" असे नसून "घंटा, काहीही मिळणार नाही" असे फुल्ल वर्जन घ्यायचे आहे.
आता बघा, जेव्हा आपण एखाद्याला "हो ना" असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ "हो" असा सहमतीदर्शकच असतो. "हो नाही = नाही" असा घेत नाही.
हल्ली अशुध्द बोलणे, मराठी
हल्ली अशुध्द बोलणे, मराठी बोलता न येणे, कारण नसताना इंग्रजी शब्द वापरणे ...... यानेच माणसे मोठी होतात.... >>>>>>>>>> अशुद्ध म्हणजे काय? प्रत्येकाचा बोलण्याचा लहेजा असतो. पुणेरी मराठी,सातारी मराठी, विदर्भाची मराठी , सोलापुरी मराठी ह्यातली शुद्ध मराठी कोणती हे कोण ठरवणार? चपतीला पोळि बोलल्यावर पुरण्पोळीला काय म्हणायचं हा प्रश्न पड्तो पण म्हणून आमचीच भाषा बरोबर आणि सगळ्यांनी चपातीच बोललं पाहिजे असा हट्ट करणं चुकिचच.
भान अगदी बरोबर म्हणणं आहे
भान अगदी बरोबर म्हणणं आहे तुमचं...
पण... <<<चपातीच बोललं पाहिजे >>> ऐवजी चपाती म्हटली पाहिजे.. असं करा...
'लय भारी' चित्रपट आपली मराठी
'लय भारी' चित्रपट आपली मराठी वर आला आहे. अजून बघितला नाही पण 'माउली माउली ' गाणे खूप छान आहे. ऐकायला आणि बघायला दोन्ही अप्रतिम.
पहिले १५ मिनिट पाहिल्यावर
पहिले १५ मिनिट पाहिल्यावर ब.न्द केला!
टिप्पीकल हिंदी मसाला स्टोरी
टिप्पीकल हिंदी मसाला स्टोरी
'लय भारी' चित्रपट आपली मराठी
'लय भारी' चित्रपट आपली मराठी वर आला आहे.
>>>
आपली मराठी काय आहे? चॅनेल का? मुंबईत सेटटॉपबॉक्स वर असेल का?
आपली मराठी डॉट कॉम ही एक साईट
आपली मराठी डॉट कॉम ही एक साईट आहे.. तिथे फुकट मराठी चित्रपट बघता येतात (देणगी देण्याचीही सोय आहे)...
http://www.apalimarathi.com/
पण तुकड्या तुकड्यात चित्रपट बघावा लागतो...
लग्नसमारंभात अत्तरदाणी
लग्नसमारंभात अत्तरदाणी वापरताना रितेशने चक्क मि. बीन ची कॉपी मारलेय
सफेदीतला सल्लू काय बोलला ते कळलच नाही, anyway, who cares
आपली मराठी बद्दल धन्यवाद
आपली मराठी बद्दल धन्यवाद बोलावे की नाही या विचारात.
मराठी चित्रपट हल्ली मी थिएटरातच बघतो त्यामुळे तुर्तास नको ती साईट
धन्यवाद
ऋन्मेऽऽष भारता बाहेरील
ऋन्मेऽऽष भारता बाहेरील लोकांना आपली मराठी हाच पर्याय आहे.
आम्हाला पण थेटर मध्ये मराठी चित्रपट बघायला आवडेल पण सध्या तरी परदेशात प्रदर्शित होत नाही.
तसेही आपली मराठी भारतातून ओपन होत नाही असे कळले. (चुभूदेघे)
तिथे फुकट मराठी चित्रपट बघता
तिथे फुकट मराठी चित्रपट बघता येतात (देणगी देण्याचीही सोय आहे)...
>>> च्यायला देणगी देण्याची दानत असती तर आम्ही फुकटाचा शोध घेतला असता काय? कैच्या कै ....
प्यारा प्लस, ओके आणि आपलाही
प्यारा प्लस, ओके आणि आपलाही गैरसमज नसावा, पण मी स्वता नेहमीच सर्वांना मराठी चित्रपट थिएटरात जाऊनच बघायचा सल्ला देतो. स्वताही तसेच करतो आणि पब्लिक फोरमवरही याच विचारांचा प्रसार करतो म्हणून सवयीने ते वाक्य आले
दुर्दैवाने कामाच्या शेड्युलमुळे गेले दोन महिने कुठलाही चित्रपट थिएटरात बघायचे वांधे झालेत. त्यात हा देखील गंडलाय,अन्यथा आपल्या रितेश देशमुखसाठी पहिल्याच आठवड्यात बघितला असता
रसपची परिक्षणं नेहेमीच
रसपची परिक्षणं नेहेमीच आवडतात. हे ही आवडलं.
पिक्चर आपलीमराठी.कॉम वर पाहिला. एवढा टुकार वाटला नाही. (हे परिक्षण वाचून अपेक्षा अती-कमी केल्या होत्या). रितेश देशमुख खूप सिन्सिअर अभिनेता वाटतो. जे काम करतो ते मनापासून करतो असं वाटतं. ह्यातही जे केलय ते चांगलं केलय. बायका माहिती नव्हत्या, आवडल्या नाहीत. तन्वीने चांगलं काम केलंय. तो नोकर आणि व्हिलन पण आवडले. ही ४ लोकं सोडली तर बाकी कोणीही छाप पाडू शकलं नाहीये. सलमान खानचा सीन नक्की का होता ते कळलं नाही. हसणं सोडा हे नक्की काय आणि कशाला चाल्लय असं वाटलं.
एकंदरीत बरा आहे.
शरद केळकर मस्त. रितेश खुप
शरद केळकर मस्त. रितेश खुप मस्त अभिनय करतो. कथा, दिग्दर्शन,संगीत...... आणि Camera पण खूप छान. नक्की पहावा असा. मला आवडला. थिएटरमध्ये पाहिला. पैसा वसूल.
रितेशने आपल्या मर्यादा ओळखून
रितेशने आपल्या मर्यादा ओळखून फडतूस मल्टीकास्ट हिंदी चित्रपटात दुय्यम चिल्लर भुमिकाच कराव्यात.
पाहिला नुकताच. अगदी बोअर होत
पाहिला नुकताच. अगदी बोअर होत नाही, पण अशा चित्रपटात जो मसाला जमायला ह्वा तो खूप जमलेला नाही. रितेश देशमुख व शरद केळकर चे काम चांगले आहे. मला रितेश पहिल्या तासाभराच्या प्रसंगांत जास्त सहज वावरतो आहे असे वाटले. शरद केळकर त्या साउथ च्या अशा पिक्चर्स मधे व्हिलन म्हणून (कदाचित हीरो म्हणूनही) सहज फिट्ट बसेल. तन्वी आजमी बर्याच दिवसांनी दिसली. तिने काम चांगले केले आहे, पण अनेक ठिकाणी रीमा लागूचा भास होतो तिच्यात.
अशा पिक्चर्स मधे लॉजिक बद्दल प्रश्न विचारायचे नाहीत. समोर दाखवले जात आहे ते एन्जॉयेबल आहे का नाही एवढेच बघायचे. त्याबाबतीत ठीक ठीक आहे इतपतच. तो माउली पहिल्या फाईटला आधी खाली पडतो, मग एक मिनीट पॉज, आणि त्यानंतर हसत पुन्हा उठताना "आता, आपली बारी" म्हणतो - तो सीन मस्त जमला आहे. पण ती धार नंतर मेन्टेन करता आली नाही. 'तंटा नाय तर घंटा नाय' जा पाहिजे तेव्हढा उपयोग केलेला वाटला नाही. 'आता, आपली बारी' साठी सुद्धा बराच स्कोप होता नंतर वापरायला. सिग्नेचर वाक्य झाले असते, ते ही 'आता माझी सटकली' प्रमाणे.
त्या 'माउली' ची भाषा अजिबात झेपली नाही. पंढरपुरात आयुष्य गेलेला पोरगा एवढे हिंदीमिश्रीत का बोलतो? ती राधिका आपटे भर खेडेगावात ७० च्या दशकातील उत्तर प्रदेशातील चित्रपटकथांमधे त्या 'शब्बो' वगैरे असायच्या तसे कपडे व मेक अप घालून का फिरते? हे काही झेपले नाही. संवादही कधी कोल्हापुरी गावरान, कधी हिन्दीमिश्रीत मराठी, तर कधी शहरी 'प्रमाण' मराठी असे मिक्स झाले आहेत. काही ठिकाणी तर पुस्तकी भाषा उगाचच वापरली आहे असे वाटते "मी प्रतापराव निंबाळकरांची अर्धांगिनी आहे" वगैरे.
बाकी ते कॅमेर्याच्या करामती, फाईटने माणसे अवास्तव उडणे, हीरो च्या कुटुंबाशी आदबीने वागणारे गावातील 'फेसलेस' गावकरी, ते सरंजामी वातावरण वगैरे त्या सूर्या, रवि तेजा, विजयकांत ई लोकांचे तमिळ्/तेलुगु पिक्चर्स असतात अगदी त्याप्रमाणे आहे.
पाहा एकदा. बोअर बिअर होणार नाही. पण फार फक्कड वगैरे नाही. ते पहिले गाणे नीट बघितले नाही अजून, पण फॉरवर्ड करताना एरियल सीनरी चांगली असावी असे वाटले. पुन्हा पाहायला हवे ते.
Pages