लक्ष्मीबाई धुरंधर आणि उकडलेली अंडी - भाग २

Submitted by दिनेश. on 2 July, 2014 - 08:07

तर मी चक्क उकडलेली अंडी का इथे मांडलीत ? मी अंडी खात नाही.. ( त्याच्यामागे मोठा इतिहास आहे.
मी ५ वर्षांचा असताना माझे एका कोंबडीवर प्रेम बसले होते. पण तिची योजना ज्या कारणासाठी झाली
होती, त्याच कारणासाठी घरातच तिची कत्तल झाली.. मेल्यावरही तिच्या पोटात अंडे सापडले. त्या तिच्या
त्यागाने मी फारच इमोशनल झालो आणि त्यानंतर अंडेच काय, नॉन व्हेज खाणेही सोडले... मला माहीत
आहे माझ्या या प्रेमकहाणीला सर्व हसणार आहात.... दुनिया ऐसीही होती है... आवरा ! )

या पुस्तकाच्या काळात, जेवणामधे काहीतरी वेगळे करावे असे खानसाम्यांना वाटत असे. एका राज्याच्या
दरबारी खानसाम्याने ताटातील सर्व पदार्थ साखरेपासून केले होते. तर एकाने पिस्त्यांना डाळीसारखे कापून
त्याची डाळ व बदामांना तांदळासारखे कापून त्याचा पुलाव केला होता.
आणखी एकाने शिजवलेल्या भाताचा प्रत्येक दाणा अर्धा केशराच्या पाण्याने रंगवून मोत्या पोवळ्याचा पुलाव
केला होता.

ही परंपरा ओगलेआज्जींनी देखील पाळली. त्यांनी फसवे डिंकाचे लाडू ( कणीक व पोहे वापरून ) फसवे अळीवाचे
लाडू ( गाजराचा किस वापरून ) लिहिले आहेत.

या पुस्तकातही असे काही पदार्थ होते. कृत्रिम ऑमलेट आहे, ते उडदापासून बनवलेले होते. कृत्रिम कणंग
नावाचा एक पदार्थ होता. शिजलेल्या भातात साखर घालून ती जिरवायची. मग लाल चवळी, शिजवून
वाटायची. त्याची पारी करून आत साखरभात भरायचा. त्याला लांबट आकार द्यायचा. आणि ते वाफवायचे.

तशी हि अंडी देखील फसवी आहेत. ( माझे तिच्यावरचे प्रेम फारच सच्चे होते बरं ! )

याची कृती त्या पुस्तकातच आहे. कृत्रिम कवठें या नावाने.

अंडी फोडून त्यातला बलक काढून ती रिकामी करायची. मग पिठाच्या आधाराने उभी ठेवायची.
चायना ग्रास कापून दूधात शिजवायचे. त्यात साखर घालायची. मग ती अंडी त्या मिश्रणाने अर्धी भरायची.
मग माव्यात केशर घालून त्याचा गोळा करायचा. तो गोळाही त्या अंड्यात टाकायचा. मग परत चायना ग्रास
शिजवून त्यात टाकायचे. ते सेट झाले कि कवच फोडून आतले अंडे मोकळे करायचे, आणि उभे कापायचे.

हा पदार्थ करून बघायची मला फार ईच्छा होती पण माझे काही प्रॅक्टीकल प्रॉब्लेम्स होते. अंडी फोडल्यावर
माव्याचा गोळा घालण्यासाठी मोठे छिद्र करावे लागणार मग तेवढ्या भागाचा गोलाकार परत कसा आणायचा.
आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्या बलकाचे मी काय करू ?

परवा बाजारात किंडर जॉय चॉकलेट्स बघितली आणि माझे काम फारच सोपे झाले. फक्त द्रव ओतताना
तो थोडा थंड करून ओतावा लागला. ( एका चॉकलेट शेलची वाट लावली. )

तर अशा तर्‍हेने मी माझ्या पहिल्या प्रेमाशी एकनिष्ठ राहिलो.

जेवणावर राहून गेलेली स्वीट डीश... स्वीकार करावी.

माझ्या पाककलेतील दुसर्‍या गुरू लक्ष्मीबाई धुरंधरांना साष्टांग नमस्कार !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा खरच साष्टांग दंडवत! Happy
नाव वाचून, बघणारच नव्हत. म्हटलं बघू तरी काय आहे? पहिलाच फ़ोटो अंड्यांचा बघीतल्यावर पुढे न बघताच जाणार होते. पण म्हटल दिनेशदांनी हे लिहिलय म्हणजे काहीतरी वेगळ असेल. आणि वाचल्यावर थक्क झाल. Happy

दिनेशदा, हे असलं काही तुम्हीच करू जाणे! : ____________/\______________. Happy

great Happy

तुमच्या लेखाने मन जवळ जवळ ३०-३५ वर्ष झरकन मागे गेले. हे लक्ष्मीबाईंचे पुस्तक मी ही माझ्या आजीकडेच पाहीले होते. तसेच जीर्णावस्थेला आलेले होते. य पुस्तकात पातेल्यासाठी टोप हा शब्द वापरलेला आहे.जो मला तोपर्यंत माहीत नव्हता. तो मुखप्रुश्ठावरचा फोटोही लख्ख आठवला. ह्या पुस्तकातली “दुधपोहे” ही रेसिपी मला फार आवडली होती. ती थोडक्यात म्हणजे बासुंदीत भीजवलेले पोहे आशी होती.
आणि हो ते पुस्तकही आज्जीकडे बडोद्याहुनच आले होते. माझी आक्का आज्जी म्हणजे आजीची सख्खी बहीण बडोद्याच्या राणीसाहेबांकडे कामाला होती.तीने आज्जीला ते पुस्तक दिले होते. अक्का आज्जी बालविधवा होती. पण त्या जुन्या काळातही राणीसाहेबांनी तीला फार मानाने आणि प्रेमाने वागवले. तुमचे लिखाण वाचताना ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद दिनेश.
आणी हो फसवी अंडी मस्तच. किंडरजॉयची कल्पना अफलातुन.

माझ्याकडे आहे हे पुस्तक दिनेशदा पण हा प्रकार कधी करून नाही बघितला…फोटो नाहित पुस्तकात पण ईथे छान बघायला मिळाले.मस्त Happy

पहिल्या भागातील पुस्तक परिचय आणि ह्या भागातील वर्णन,पाककृती दोन्हीसाठी धन्यवाद Happy

अंड्यांची कल्पना आणि फोटो दोन्ही मस्त आहेत. खव्याच्या गोळ्यामुळे मजा येईल खायला.
फक्त दोन्ही भागांत ते तुटलेले अंडे फोटोतून वगळले असते तर चालले असते असे वाटले Happy

मस्त Happy

लक्ष्मीबाई धुरंधरांचं हे पुस्तक खरंच अफाट आहे. मात्र मराठीतलं हे पहिलं पाककृतींचं पुस्तक नाही. १९१०च्या अगोदर प्रकाशित झालेली किमान तीन पुस्तकं अस्तित्वात आहेत. त्यांपैकी दोन पुस्तकं ही मुळात आयुर्वेदीय औषधांची आहेत. त्यात अनेक पाककृती आहेत. तिसरं पुस्तक मात्र फक्त पाककृतींचं आहे. हे पुस्तक नक्की कधी प्रकाशित झालं, लेखक कोण हे कळत नाही, कारण पुस्तकाची सुरुवातीची पानं गायब आहेत, आणि भांडारकर संस्थेत या पुस्तकाचे इतर तपशील नाहीत. मात्र या पुस्तकावर मधल्याच एका पानावर १९०७ सालातली एक तारीख आहे. त्यानुसार हे पुस्तक १९१० सालच्या आधीचं आहे, हे मानायला हरकत नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की, आज आपण लिहितोवाचतो त्याप्रमाणे अगोदर साहित्य, मग कृती या पद्धतीनं लिहिलेली पाककृती सर्वप्रथम या पुस्तकात सापडते. एकोणिसाव्या शतकात ब्रिटनमध्ये ही पद्धत रूढ झाली होती.

लक्ष्मीबाई धुरंधरांच्या या पुस्तकावर ब्रिटिश पुस्तकांची छाप आहे. 'गृहिणीमित्र' हे नावही ब्रिटिश पुस्तकांवरून स्फुरलेलं आहे. ब्रिटिश स्त्रियांना उपयुक्त अशा पुस्तकांची इंग्रजी नावं अशी असत. दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव पाककृतीला देणं, यात प्रताधिकाराचा संबंध नाही. अगदी पार आठव्या-नवव्या शतकापासून ही पद्धत प्रचलित आहे. अमीरउमराव-राजेराण्या यांची नावं अगोदर पदार्थांच्या कृतींना दिली जात, कारण मग त्या पदार्थांना खास मान मिळे. पुढे त्या सरदाराला-राजाला-राणीला तो पदार्थ आवडला म्हणून त्या व्यक्तीचं नाव मिळू लागलं. अनेक अँग्लो-इंडियन पुस्तकांमध्ये सैन्याधिकार्‍यांची किंवा त्याच्या बायकोची किंवा एखाद्या गव्हर्नराची किंवा क्लबातल्या स्वयंपाक्याची नावं पदार्थाच्या कृतीसह आढळतात. याचा अर्थ एकतर ती कृती त्या व्यक्तीकडून मिळाली हा होतो (जेणेकरून त्या कृतीचं वेगळेपण ठसतं, ती कृती इतर कृतींपेक्षा वेगळी आहे, हे वाचकाला कळतं आणि त्या कृतीला महत्त्व प्राप्त होतं), किंवा त्या व्यक्तीला तो पदार्थ आवडला, असा होतो.

या गोड अंड्याची प्रेरणाही ब्रिटिश आहे. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये अशा चमत्कृती सापडत नाहीत. खाद्यपदार्थांच्या अशा गमती करणं हे अरबांनी रोमनांना शिकवलं. तिथून ते फ्रेंचांनी उचललं आणि मग ब्रिटिशांनी सवयीप्रमाने फ्रेंचांची नक्कल केली. सोळाव्या शतकात जेव्हा तिसरा हेन्री व्हेनिसला गेला, तेव्हा आपलं सामर्थ्य त्याच्यावर ठसवण्यासाठी मेजवानीत प्रत्येक पदार्थ साखरेपासून केला गेला होता. अगदी टेबलक्लॉथ, थाळ्या, चमचे, नॅपकीनसुद्धा साखरेचे होते. हेन्रीनं नॅपकीन हाती घेतला आणि तो फुटला, तेव्हा कुठे त्याला खरी गोष्ट कळली. त्या काळी साखर अतिशय महाग होती. राजाला फक्त ती परवडत असे. हेन्रीपर्यंत योग्य तो संदेश पोहोचला.

भारतात अकबराच्या दरबारात अस्सल मोत्यांसारखी दिसणारी मिठाई इत्यादी चमत्कृती रोज केल्या जात. मुघल साम्राज्याचा अस्त होईपर्यंत हे प्रकार सुरू होते. महाराष्ट्रात मात्र असलं कधी काही झालं नाही. 'मिठाया खाऊन तुम्ही सुस्तावले आहात. जरा मराठ्यांकडे बघा..भाकरी आणि मिर्ची खातात म्हणून ते चपळ आहेत' असं औरंगजेबानं आपल्या एका सेनापतीला पत्रात लिहिलं होतं. युरोपातून आलेली मिर्ची आपण चटकन स्वीकारली. ब्रिटिशांची मोलेक्यूलर गॅस्ट्रनॉमी स्वीकारायला बराच वेळ लागला.

हा पदार्थ करून बघितल्याबद्दल तुमचे आभार. Happy

चिनूक्स,
याची एखादी प्रत बडोद्याच्या राजघराण्याकडे नक्की असणार. आमच्याकडे पूर्ण पुस्तक होते पण प्रकाशक वगैरे तपशील आठवत नाही. बहुतेक नसावाच. २००५ पर्यंत ते शाबूत होते. त्या वर्षातल्या पुरात ते वाहून गेले.

सर्वच पाककृती एका फॉर्मॅट्मधे नव्हत्या. नेहमीच्या पाककृती थेट ( म्हणजे साहित्य व कृती एकत्र ) लिहिल्या होत्या.

पण तरी हे पुस्तक नवशिक्यांसाठी नव्हते. रुचिरामधे जसे साधा भात, फुलका, भाकरी आहेत तसे त्यात नव्हते.

नंतर बुकगंगा वर दिसतेय ते संपादीत आहे. काही पाककृती ( शिकार वगैरे ) नक्कीच वगळल्या असणार. खरं तर लेखिकेबद्दलही काही माहिती असेल तर वाचायला आवडेल. त्यांचे इतर काही लेखनही असणार.

अगो, ते तुटलेले अंडे मुद्दाम ठेवलेय फोटोत.. दिसतोय तो प्रकार तुटण्याजोगा आहे ते पटायला.

सुभाषिणी,
असे लेखन नंतर इंग्रजीमधे झाले ( लेखिका बहुतेक शालिनीदेवी होळकर.. ) पण मराठीत असे अपवादानेच दिसले. कोल्हापूरच्या राजघराण्यातील पाककृतींचे एक पुस्तक बघितल्यासारखे वाटतेय. पण ते मराठीत का इंग्रजीत ते आठवत नाही.

मामी, खरं तर यालाच स्पाँज केक + कोकोचे कोटींग देऊन नर्गिसी कोफ्ता पण करता येईल.. ( हे म्हणजे तूम्हा दोघींच्या कल्पकतेला डिवचणे आहे बरं )

परत एकदा आभार ! मला हे पुस्तक परत मिळणार आहे असे संकेत मिळाले आहेत.. वाट बघतोय.

AGDI HUBEHUB DISTAT AAHET EGG. PAN TYACHE ING. CHE PRAMAN PAN SAAGANA DINESHDA
BAKI TUMHALA ____/\____

फारच सुंदर दिसतेय
कोणाला रस असल्यास व्हॅनिला आणि केशर पिस्ता वगैरे आईस्क्रीम चे असे फसवे अंडे करता येईल.

दोन्ही भाग सुंदर
कल्पक! चिनूक्सची पोस्ट पण माहितीपूर्ण....+1.

Pages