भयानक : भाग ७

Submitted by यःकश्चित on 22 January, 2012 - 04:40

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५
भयानक भाग ६

------------------------------------------------------------------------------------------
मागील भागावरून पुढे..

नाना सांगत होते -

" दोघांनी जोरजोरात हसत गुहेच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केला. मी तिथेच जवळ लपलो होतो. त्यांना मी दिसत नव्हतो पण ते मला दिसत होते. ते माझ्या दृष्टीपथात आले आणि त्यांचे चेहेरे पाहून मला धक्काच बसला.

त्या दोघांतील एक व्यक्ती म्हणजे बुवा होते. त्यांना पाहून मला प्रश्न पडला की बुवा इथे कशाला आले आले असावेत. बुवा सहसा इतक्या निर्जन ठिकाणी जात नाहीत. प्रथम मला वाटले की ते कुठलीशी योगसिद्धी प्राप्त करण्यासाठी आले असावेत. पण माझा अंदाज साफ खोटा ठरला. ते एकटेच नव्हते. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. एवढ्यात तिथे आणखी ७-८ जण आले. मला वाटले, ते सारे बुवांचे सहकारी असावेत. बुवा त्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणाले,

" आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"

आणि बुवा जोरजोरात हसू लागले. त्यांच्या पाठोपाठ त्या दुसरा व्यक्तीनेही हसायला सुरुवात केली. त्यांनी हसणे थांबवले पण हसण्याचा आवाज येताच होता. मलाही काही समजेना की हा हसण्याचा आवाज नक्की येतोय कुठून ? ते हास्य वाढू लागले. कानांना असह्य झाले. बुवांचे सारे शिष्य कानावर हात ठेवू लागले. ते सारेजण बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. मागोमाग तो दुसरा माणूसही बेशुद्ध झाला. बुवा त्या आवाजावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत होते पण आवाज काही केल्या कमी होत नव्हता. तो तर अजूनच वाढत चालला होता. मग मलाही तो आवाज कानांना असह्य झाला. कान बधीर व्हायची वेळ आली होती. पुढे काय झालं कळालंच नाही. मीही त्या आवाजाने बेहोश झालो होतो.

मी किती वेळ बेशुद्धावस्थेत होतो ठाऊक नाही. गुहेच्या मध्यवर्ती भागात असल्याने वेळेचा अंदाज येत नव्हता. कदाचित संध्याकाळ झाली असावी कारण छताला असणाऱ्या छिद्रातून येणारा प्रकाश कमी झाला होता. मी उठलो आणि समोर पाहिले. बुवा किंवा त्यांचे सहकारी कुणीच नव्हते तिथे. मी हळूच त्या कपारीतून बाहेर आलो. ती जागा स्वच्छ केली होती. यज्ञकुंडात लाकडाच्या काटक्या रचून ठेवल्या होत्या. त्याच्या शेजारी पूजेचे सामान होते. आसने मांडलेली होती. बहुतेक बुवा एक मोठ्ठा यज्ञ करणार होता. ते सारेजण बाहेर कुठेतरी गेले होते. तीच वेळ साधून मी तिथून बाहेर पडलो आणि तडक इकडे आलो. तुला माहितीये का नाना, ती दुसरी व्यक्ती कोण होती ? "

दाजींनी दोन सेकंद नानाच्या प्रश्नांकित चेहेऱ्याकडे बघितले आणि ते म्हणाले,

" """"" तो ' तो ' होता. दामलेंच्या जीवावर उठलेला दामले घराण्याचा कट्टर वैरी. "

विश्वास आणि मोहनरावांनी चमकून दाजींकडे पाहिले. नाना अजूनही प्रश्नार्थक मुद्रेने दाजींकडे पाहत होते.

" अरे पण तुला कसं काय कळाले की तो 'तो' होता ? ", नाना.

" हीच तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे. शुद्धीवर आल्यावर मी त्या गुहेतून बाहेर पडलो. मला वाटले तसे संध्याकाळ होत होती. संध्याकाळची संध्या करण्यासाठी तलावाकडे निघालो. आपल्या आसपास कुणी नाही ना याचा कानोसा मी घेत होतो. जरी पकडलो गेलो असतो तर काही झाले नसते किंबहुना त्यांनी मला पकडलाच नसतं पण मला एक महत्वाची गोष्ट पुढे कळाली ती कळाली नसती. मी संध्या करण्यासाठी तलावाजवळ पोहोचतो तोच मला तलावाच्या काठावर बुवा ध्यान लाऊन बसलेले दिसले. त्यांना समोर पाहून मी दोन पावले मागे सरकलो. मी तिथून जरा दूर बुवांच्या नजरेस न पडता संध्या आटोपली आणि उठून परत घरी येण्यास निघालो. एका ठिकाणी झुडूपामागून मला कुजबुज ऐकू आली. तिथे काय चाललंय हे पाहावं म्हणून मी त्या झुडूपाजवळ जाऊन दोन फाटे बाजूला सारून पलीकडचे पाहू लागलो. तो दाजींच्या सोबत आलेला बाकीच्या सहकाऱ्यांना भाषण देत होता - "

" यावेळी आपण हरायच नाही. त्यांचा पूर्ण विनाश करायचा. त्या दामल्यांनी आपल्याला खूप त्रास दिलेला आहे."

त्याच्या तोंडून दामले हे नाव ऐकताच मला आश्चर्यही वाटले आणि कुतूहलही. मी आणखी लक्ष देऊन ऐकू लागलो.

" मागल्या वेळी त्या हरामखोर नानाची चाल आपल्याला मारायचीच होती. पण ऐनवेळी मला त्याच्या डावाचा सुगावा लागला आणि मी तो यज्ञ सुरु केला म्हणून आपण वाचलो. नाहीतर त्याच्या त्या आघाताने मी आणि माझ्यानंतर तुम्ही सारे ठार झाला असतात. "

" पण नाना आम्हाला कशाला मारतील. त्याचं वैर तर तुमच्याशी आहे ना ? ", एकाने शंका उपस्थित केली.

" हो ना. तुमच्याशी नानाचा काही संबंध नाही पण हे त्या अविवेकी नानाला काय माहित ! भडक डोक्याचा आणि एक लुच्चा माणूस, तो सरसकट सर्वांना ठार करणार. आपण त्याच्या कचाट्यातून वाचलो हे बरं झालं. पण यावेळी त्याला आणि त्याच्या घराण्याला ठार केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. "
तो अगदी चवताळून बोलत होता.

" आपण सारे जण या ठिकाणी यासाठीच थांबलो आहोत. आपले या आठवड्यातले सगळे यज्ञ सुरळीत पार पडले की मग आपल् कार्य सफल झालंच म्हणून समजा. शिवाय बुवाही आपल्यासोबत आहेत. हे बुवा म्हणजे काळ्या मायाजगताचे देव आहेत. आजतागायत कुणी त्यांच्या नखालासुद्धा स्पर्श करू शकला नाही. मोठे मोठे मांत्रिकसुद्धा त्यांच्या पायाशी लोळून गेले आहेत. अशा या मायाराज बुवांचा आपल्या पाठीवर हात आहे म्हणल्यावर कशाची चिंताच नाही. येत्या पौर्णिमेला आपण अजातशत्रू झालेले असू. हीच ती पौर्णिमा. बरोबर २५ वर्षापूर्वी, आपण सारे थोडक्यात बचावलो होतो. त्याच पौर्णिमेला दामले मरणार आणि माझ्या पूर्वजांना मुक्ती मिळणार. "

" या वाक्याने मी जरा दचकलो आणि हातात धरलेला फाटा सुटला. झुडुपातून सळसळ ऐकू आल्याने त्याचं बोलणं थांबल आणि ते सारे त्या झुडूपाकडे पाहू लागले. त्याबरोबर मी चटकन तिथून पसार झालो. मग मी घरी आलो. चार घास खाल्ले आणि लगेच इकडे आलो. "

दाजी बोलायचं थांबले. सारेच जण काही वेळ शांत होते.

" आपण त्या काळ्या शक्तींवर विजय कसा मिळवायचा ? त्याला हरवायच कसं ? "

दाजींनी सांगितलेल्या घटनेने सारेजण खिन्न झाले होउन विचार करत होते. विश्वासच्या प्रश्नाने त्यांना जरा दिलासा आला. नाना उभे राहून म्हणाले,

" बोलता बोलता बराच उशीर झाला. रात्रीचे आठ वाजत आलेत. आज रात्री मी आणि दाजी चर्चा करतो आणि काय करायचं ते तुम्हाला उद्या सांगतो. "

ते विश्वासकडे वळून म्हणाले,

" विश्वास, तारिकाला तू इथे बोलवून घे. कारण आता येत्या पौर्णिमेपर्यंत तरी तुला कुठेही जाता येणार नाही. तोपर्यंत ती इथेच राहील. आणि दाजी, तूसुद्धा आज इथेच रहा. आता आपण जेवण करायला जाऊया. "

******************************************************************************

सकाळचे ९ वाजले होते. नाना आणि दाजी त्यांच्या खोलीत बसले होते. आता यापुढे काय करावं लागेल याचा विचार करत होते.

" तुला काय वाटतं दाजी ? आपण बुवांना हरवू शकू का ? ", नाना.

" बहुतेक हो. ", दाजी.

" अरे त्याचं सामर्थ्य फार आहे, त्यांची शक्ती अचाट आहे. त्यांच्या शक्तीपुढे आपण म्हणजे हत्तीपुढे वाघ-सिंह. आपण 'त्या'च्याविरुध्द लढतोय म्हणजे बुवांना दिलेलं आव्हान आहे आणि बुवांना आव्हान म्हणजे .... "
" माहित आहे. पण माझ्याकडे एक युक्ती आहे ज्याने आपण बुवांना हरवू शकणार नाही पण त्या'ला ठार करू शकतो. "

" मग त्यावेळी बुवा प्रतिकार करणार नाहीत का ?"

" नाही. कारण बुवा त्यावेळी सुप्तावस्थेत असतील. त्यांना सारे दिसत असेल आणि कळतपण असेल पण ते काहीच करू शकणार नाहीत. "

" अरे दाजी, हे कसं शक्य आहे. ते बुवा आहेत बुवा. त्यांना काहीही करणं ही काही छोटी गोष्ट नाही. "

" नाना तू एक गोष्ट विसरतो आहेस. मी "आत्मा संमोहन विद्या" प्राप्त करून घेतली आहे. त्याद्वारे आपण बुवांच्या मेंदूचा ताबा घेऊ शकतो. "

एवढ्यात विश्वास आणि मोहनराव खोलीत आले. त्यांना बसायला सांगून नानांनी दाजींकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली. त्या नजरेचा अर्थ ओळखून दाजी म्हणाले,

" मला माहितीये की बुवांच्या मेंदूचा ताबा घेणं सहजासहजी शक्य नाही होणार. पण त्यावरही एक उपाय माझ्याकडे आहे."

" कुठला ? ", नानांनी उतावीळपणे विचारले.

" आज आहे पंचमी, म्हणजे आपल्याकडे अजून १० दिवस आहेत. खरंतर ते कमी आहेत पण दुसरा काही पर्याय नाही. इथे जवळच गावाबाहेर एक महादेवाचं मंदिर आहे. गावाबाहेर असल्याने सहसा तिकडे कुणी जात नाही. तिथे प्रशस्त, शांत, सुंदर जागा आहे. आजूबाजूला झाडी आहे. गावाबाहेर असल्याने शांत, झाडीमुळे थंड अश्या त्या जागी आपल्या साधनेस अनुकूल असे वातावरण आहे. तिथे मी आत्मा संमोहनाला प्रबळ करण्यासाठी साधना करेन. त्याच वेळी तू तिथे विश्वासच्या मेंदूला जागृत कर."

" एक मिनिट, माझ्या मेंदूला जागृत ...? ", विश्वासने मधेच वाक्य तोडले.

" अरे विश्वा, तुला त्याच्या शक्तीची कल्पना नाही. या दामले घराण्यात व्रतबन्धासोबत एक विधी केलं जातो हे मी तुला आधीच सांगितलं आहे. त्यात त्या मुंज्याला मंत्र-तंत्र-अस्त्र-विद्यादी ज्ञान दिले जाते. तो विशी तुझ्यावर केला पण लगेचच आम्ही आणखी एक काम केलं की तुझ्या मेंदूच्या त्या भागाला निद्रावस्थेत ठेवलं. कारण तसं केलं नसतं तर 'त्या'ने तुझ्या मेंदूतल्या स्मृतींद्वारे तुला केंव्हाच शोधून काढला असता आणि ठार केला असता. म्हणून तुझ्या मेंदूला निद्रावस्थेत ठेवले. आता या आठवड्यात आपण त्या विधीचा प्रतिविधी करणार आहोत. "

दाजी बोलायचं थांबले. तेवढ्यात मोहनरावांच्या पत्नी चहा घेऊन आल्या. साऱ्यांनी चहाचे कप उचलले. नाना चहा पीत बोलले,

" विश्वास, तू आता घरी जा. तारिकाला घेऊन ये आणि तुझ्या कंपनीत रजेची मुदत वाढवून ये. आणि मोहन तू... "

मोहनरावांनी नानांकडे पाहिले,

" तसं तुला काहीच काम नाहीये पण तू आमच्या सोबत तिथे येणार आहेस. न जाणो आम्हाला तिथे तुझी मदत लागेल. त्यामुळे तूसुद्धा चलायचं. "

साऱ्यांचा चहा पिऊन झाला. ते सारे उठले. विश्वास निघाला.

" आता विश्वासला जाऊन यायला साधारणतः दोन-अडीच तास लागतील. तोपर्यंत सारेजण विश्रांती घ्या. आजच चार वाजता आपल्याला निघायचं आहे. "

विश्वास, दाजी आणि मोहनराव नानाच्या खोलीतून बाहेर पडले.

दोन तासांनी विश्वास तारिकाला घेऊन परत आला. साऱ्यांनी दुपारच जेवण केलं. विश्वासची कार दरवाज्यातच होती. चौघे कारमध्ये बसले. दारात उभ्या असलेल्या बायकांकडे पाहून त्यांनी हात हलवून निरोप घेतला आणि कार गावाबाहेरच्या मंदिराकडे निघाली.

क्रमशः

गुलमोहर: 

किती वेळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ?
कधी संपणार................>>>?

भयानक, भुक्कड....... भ अक्षरावरुन सुरु होणार्‍या रहस्यकथा अर्धवटच रहातात.

ओम भग भुगे भगिनि भागोदरे भगमासे ओम फट स्वाहा

१ मे.... ओके

भयानक, भुक्कड, भैराळं..

आता आणखी काही नावं .... भडबुंजा, भाजका, भंकस, भगभग, भक्षण.........................