भयानक : भाग १

Submitted by यःकश्चित on 29 August, 2011 - 10:09

भयानक
_____________________________________________________________

पौर्णिमेची रात्र होती ती....कुठल्याश्या एका गर्द वनराईच्या मध्यभागी ते सारे जमले होते...चंद्र चांदण्यांसमवेत वनात शुभ्र प्रकाश सोडत होता. मंद वारा वाहात होता. त्या जागी मध्यभागी एक यज्ञकुंड धगधगत होते. यज्ञाच्या चारी बाजूंना चार व्यक्ती बसल्या होत्या. त्यांनी भगवी कफनी परिधान केली होती आणि कमंडलूतील तुपाची पळीने आहुती देत होते. त्यांच्या शेजारी आठजण लाल कफनी घालून मंत्रोच्चार करत होते. सलग न् थांबता ते कालिका देवी आणि चामुंडा देवीचा नामोच्चार करत होते. यज्ञकुंडापासून साधारण वीस पाउले दूर एक मचाण बांधले होते. त्या मचाणावर काळी वस्त्रे परिधान केलेला एक तगडा माणूस डोळे मिटून शांतपणे ध्यान लाऊन बसला होता. त्या मचाणाभोवती लिंबू आणि मिरच्यांनी वर्तुळ काढले होते. त्या वर्तुळाच्या भोवतीने दोन माणसे गोल फिरत त्या बसलेल्या व्यक्तीवर बुक्का आणि कुंकवाचे क्रमाक्रमाने प्रोक्षण करीत होती. सारं काही यथासांग पार पडत होतं.

पण अचानक वारा जोराने वाहू लागला. निरभ्र आकाश बघता बघता काळ्या ढगांनी व्यापले. शुभ्र चंद्रबिंब हा हा म्हणता नाहीसे झाले. पावसाचे मोठाले टपोरे थेंब हळूहळू वेग घेत होते. वादळकम पाउस पाच मिनीटभर चालू होता. पावसाने यज्ञ थंड होत होता. मंत्रोच्चार करणारे आठ जण पावसाच्या व्यत्ययाने मंत्रोच्चार चुकत होते. यज्ञाभोवतीचे चार जण यज्ञ पुन्हा प्रज्वलित करण्याचा असफल प्रयत्न करत होते. मचाणावरची व्यक्ती मात्र शांतपणे ध्यान लाऊन बसली होती.

पाच मिनीटानंतर वादळ थांबले. एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती. सगळी परिस्थिती क्षणात पालटली होती. सारेजण हवालदिल होऊन एकमेकांकडे पाहत होते. मचाणावर बसलेली व्यक्ती मात्र अजुनी डोळे मिटूनच बसली होती. सगळे त्या व्यक्तीकडे टक लावून पाहत होते. हळूहळू त्या व्यक्तीने डोळे उघडले. त्याने सभोवार नजर फिरवली. तो खाली उतरला, लिंबू-मिरच्याच्या रिंगणाबाहेर आला. त्याने पुनश्च सभोवार नजर फिरवली आणि दोन्ही हात वर केले. तो हात वर्तुळाकार फिरवू लागला. त्याने हातांची गती वाढवली. अचानक त्याच्या हातातून कुंकवाचा सडा पडू लागला. एकदम त्याने हात फिरवायचे थांबवले. आजूबाजूची सारी जमीन लालबुंद झाली होती. नुसते दोन्ही हात आकाशाकडे करून तो काही मंत्र पुटपुटू लागला. काही क्षणातच परत जोराचा वारा वाहू लागला. ढगांचा गडगडात झाला आणि आकाशवाणी झाली-

"तू केलेल्या चुकांची शिक्षा तू लवकरच भोगशील. या पुढची ५० वर्षे तुझ्या सर्व शक्ती काढून घेण्यात येत आहेत. हा हा हा ..."

आकाशवाणीतून एक प्रकारचे असुरी हास्य बाहेर पडत होते. हात वर केलेली ती व्यक्ती टक लावून आकाशाकडे पाहत होती. ते सारे शिष्यगण त्या व्यक्तीकडे भिरभिरत्या नजरेने पाहत होते. सारेच्या सारे निराश झाले होते. मगाशी धगधगणारे यज्ञकुंड आता रागावलेल्या मुलासारखे शांत बसले होते. यज्ञाचे साहित्य इतस्ततः पसरले होते. आकाशाकडे पाहणाऱ्या त्या व्यक्तीची नजर अजून शून्यातच होती. त्या आकाशातील गुढ हास्याचा ध्वनी आसमंतात पुन्हा पुन्हा कितीतरी वेळ आदळत होता.

**********************************************************************************************************

स्थळ : संजीवन सभागृह
"नमस्कार, माननीय अध्यक्ष, माननीय संचालक आणि माझ्या सर्व रसिक श्रोतेहो, आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे, तो फक्त तुमच्यामुळेच. आज माझे चौदावे पुस्तक "भयानक" याच्या प्रकाशन प्रसंगी आपण सारे जमलो आहोत. याचे सर्व श्रेय तुमच्यासारख्या असंख्य वाचक बांधवाना जाते. आपण सर्वांनी माझ्या या आधीच्या सर्व पुस्तकांना भरभरून प्रतिसाद दिला तसाच या आणि यापुढील सर्व कलाकृतींना असाच प्रतिसाद मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना...........................................मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र ."

टाळ्यांचा प्रचंड कडकडाट...

त्याच्या चौदाव्या पुस्तकाला आजही तेवढाच प्रेक्षकवर्ग होता जेवढा याआधी असायचा. थोड्या वेळाने पुस्तकाचे परिच्छेद वाचन मग आभार प्रदर्शन झाले. सकाळी ९ वाजता सूरु झालेला हा कार्यक्रम ११ वाजता संपला. तो त्याच्या गाडीतून घरी आला. आल्यावर त्याने तलुला (त्याची पत्नी तारिका - तो तिला लाडाने तलु असं म्हणयचा) चहा द्यायला सांगितला आणि सोफ्यावर आरामात पहुडला.

श्री. विश्वास जेऊरकर.... तसा वयाने तरुणच. साधारणतः सत्तावीस वर्षाचा असेल. त्याच लग्न होऊन दोन वर्षे झाली होती. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने लेखन क्षेत्रात पाऊल टाकले होते. गेली बारा वर्षे तो हे लेखनकार्य करत होता. व्यवसायाने तो बँकेत कामाला होता पण त्याला साहित्यात खूप रुची होती. वर्षातून एक किंवा दोन पुस्तके पण उच्च दर्जाची, त्यामुळेच तो अल्पावधीत लोकप्रिय झाला होता.

**********************************************************************************************************

आज तो अतिशय खुश होता कारण आजवर त्याने फक्त ललित लेखन आणि वास्तववादी कादंबऱ्या लिहिल्या होत्या. पण 'भयानक' ही त्याची पहिली रहस्यमय कथा होती. त्याच्या खुश असण्याचं मुख्य कारण म्हणजे आठवड्यात 'भयानक'च्या ५०० प्रती खपल्या होत्या. हा लेखन क्षेत्रातील एक इतिहास होता. या आधी कोणत्याही पुस्तकाची इतकी विक्रमी विक्री झाली नव्हती. आणि त्याच्या पहिल्याच रहस्यमय कथेला एवढा प्रतिसाद..! तो आज खूप खुश झाला होता.( पण त्याला हे माहित नव्हतं की हीच 'भयानक' त्याच्या आयुष्यात भयानक गोष्टी घडवून आणणार आहे !!!) ह्याच खुशीत त्याने तलुला सांगितले की आज संध्याकाळचा स्वयंपाक करू नको, आपण आज हॉटेलला जाऊयात.

संध्याकाळी हॉटेलमध्ये...ते दोघे पाच नंबरच्या टेबलवर बसले होते. त्यांनी वेटरला दोन मसाला मंचुरियन आणि दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. दोघेही गप्पा मारत मंचुरियनची मजा लुटत होते. इतक्यात -
strong>"ओ विश्वासराव ...... "
दोघांनीही त्या आवाजाच्या दिशेने तोंड वळवले. कोपऱ्यातल्या सतरा नंबरच्या टेबलावरचा इसम, साधारणतः तीसेक वर्षाचा असेल, त्यांच्याकडे धावत येत होता. तो जवळ आला.
"तुम्ही विश्वासराव जेऊरकर ना..?"
"हम्म."
"ती 'भयानक' तुम्ही लिहिली आहे ना..?"
"होय."
"मला तुमच्याशी जरा बोलायचय."
"हम्म बोला."
"इथे नको. आपण मला एकटे भेटू शकाल का..?"
"तुम्हाला उद्या दुपारी वेळ आहे का...?"
"हो"
"मग उद्या तुम्ही माझ्या घरी या. आपण सविस्तर बोलू. हा माझा पत्ता."
असे म्हणून विश्वासने त्याला एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला. खाऊन झाल्यावर थोड्यावेळाने ते दोघेही घरी आले. रात्रीचे ९ वाजले होते. तलुला जाम कंटाळा आल्यामुळे ती आल्या आल्या लगेचच झोपायला जाऊ लागली. तिने विश्वासला विचारले पण तो म्हणाला की मला जरा काम आहे, काम झालं की येतो झोपायला. ती 'बरं' म्हणून बेडरूममध्ये निघून गेली. विश्वास बाहेरच्या खोलीच्या खिडकीत विचार करत बसला होता.

'कोण होता तो ? त्याला आजवर कधीच भेटलो नाही. त्याला काय बरे सांगायचं असेल..? त्याला माझी कादंबरी आवडली नाही का किंवा त्यातील काही भाग त्याला खटकला का ? मग त्याने तिथे बोलायला नकार का दिला ? तो सगळ्यांसमोर काही बोलला नाही याचाच अर्थ तो जे काही सांगणार आहे ते काहीतरी वेगळं आणि नक्कीच गोपनीय आहे. काहीच कळत नाहीये.' -

स्सस्ससससससस्स्सस

त्याची विचारशृंखला तुटली. खिडकीच्या खाली असलेल्या झुडुपातून कसलासा आवाज झाला. कसला आवाज झाला हे पाहायला तो खिडकीत वाकणार इतक्यात मागे जोराचा वारा त्याच्या पाठीला स्पर्शून गेला. त्या वाऱ्याच्या ओघाने तो मागे वळला आणि खाडकन खिडकीचे तावदान खाली पडले आणि खिडकी बंद झाली. तो अजून एक सेकंद जरी खिडकीत राहिला असता तर त्याचे मुंडके धडावेगळे झाले असते.

रात्रीच्या त्या थंड वातावरणात त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. हे सारं इतक्या चटचट घडलं की विश्वासला कसला विचार करायची सवडसुद्धा मिळाली नाही. त्याची विचारशृंखला परत सुरु झाली पण यावेळी विषय वेगळा होता.

'कसला आवाज होता तो ? काय होतं तिथे खाली ? बरं झालं मी खिडकीतून खाली वाकलो नाही नाहीतर जीवाला मुकलो असतो. ते झुडुपातून काय सळसळत गेलं ? आणि मागे बाकीच्या सर्व खिडक्या बंद असताना एवढा जोराचा वारा कुठून आला ? पण तो वारा आला म्हणून वाचलो. हा सगळं काय प्रकार होता ? असं या आधी कधी झालं नाही मग आजच हे काय झालं ? आता बास. अजून थोडा विचार केला तर डोक फुटेल माझं. '

त्याने विचार करणं थांबवलं आणि बेडरूमकडे जाऊ लागला. जातानादेखील त्याच्या डोक्यात हेच विचार चालू होते. संध्याकाळी भेटलेला तो माणूस आणि ही अघटित घटना या दोन्ही विचारांनी त्याच्या डोक्यात गोंधळ घातला होता. त्याच्या मनातून काही हे सारे विचार जात नव्हते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सारं अंग कॉटवर झोकून दिले.

**********************************************************************************************************

"या बसा. नाव काय म्हणालात तुमचं ?"
"मी मोहन दामले. मी डेल्टा महाविद्यालयात प्रोफेसर आहे. मी तिथे विद्यार्थ्यांना आर्किऑलोजी शिकवतो. आता तिकडूनच येतोय."
"हम्म. तुम्ही चहा घेता कि कॉफी ?"
"कॉफी."
"ठीकाय. तलु दोन कॉफी आण." विश्वासने तलुला सांगितले आणि तो मोहनकडे वळून म्हणाला, " तर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचय असं काल तुम्ही म्हणालात !"
"होय. त्यासाठीच मी आलोय. हे 'भयानक'चे कथानक तुम्हाला कसं काय सुचलं ?"
"त्याच काय झालं, मी एकदा असाच बसलो होतो. तर मनात विचार आला की ललित कथा आणि गुन्हेगारी विषयक कथा नेहमीच लिहितो. यावेळी जरा नवीन प्रयोग करून पाहावा. मग मी असाच विचार करत गेलो आणि एकामागून एक घटना सुचत गेल्या तश्या मी त्या उतरवल्या आणि काय झाली की 'भयानक'.", विश्वास हे सगळं एकदम खुशीत येऊन सांगत होता, "का हो मोहनराव, तुम्ही हे का विचारताय मला ?"
"त्याचं कसंय ना, की आपल्या सभोवताली वा आपल्याशी संबंधित काही गोष्टी अचानक आणि इतक्या अचंबित करणाऱ्या घडतात की त्याची कारणे जर आपण शोधू लागलो ना तर आपण निसर्गाच्या अशा एका चक्रात अडकतो आणि मग तिथून बाहेर पडणं फार मुश्कील होऊन जातं. अशा घटनांना अडाणी लोक योगायोग किंवा प्राक्तन असं गोंडस नाव देतात पण ते तसं नसतं." -
"एक मिनिट मोहनराव, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ?"
"तुम्हाला सुचलेली भयानक ही केवळ कल्पनाशक्ती नाही. या भयानकचा तुमच्याशी काहीतरी संबंध आहे. भयानकचं कथानक हे नुसतं एक कथानक नसून यामागे एक मोठा इतिहास आणि त्या इतिहासामागे एक मोठं रहस्य दडलेलं आहे. "
"याचा माझ्याशी संबध आहे म्हणजे ?"
"तुमच्याशी संबंध म्हणजे भयानक हि एक कथा नसून हि एक घडलेली घटना आहे आणि त्या घटनेचा आणि तुमचा खूप मोठा संबंध आहे."
"म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं कि हि कथा मी त्या घटनेवरून चोरली आहे. !", विश्वास आता थोडा रागाला येऊ लागला होता. दोघेही एकमेकांवर वरचढ बोलत होते. दोघांचाही आवाज वाढत होता.
"नाही. मला असं नाही म्हणायचय"
"मग तुम्हाला काय म्हणायचंय ?"
"भयानक ही एक वास्तवात घडलेली घटना आहे."
"याला पुरावा आहे काय ?"
"होय."
" माझे चुलत आजोबा म्हणजे माझ्या बाबांचे काका. तुमच्या कथेतील महत्वाच्या पात्रांमधील भैरोनाना हे माझे आजोबा आहेत."

एकदम दोघेही शांत झाले. दोन मिनीटभर दोघेही शांत होते. तलु कॉफी घेऊन आली. तिने कॉफीचा ट्रे त्यांच्यासमोर ठेवला आणि आत निघून गेली. दोघेही कॉफी प्यायले. विश्वासने मोहनरावांकडे बघितले. मोहनराव शांत बसले होते पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता ठळकपणे दिसत होती.

"तुमचे आजोबा कुठे असतात सध्या ?"
"ते इथे जवळच ५० किलोमीटरच्या अंतरावर एक गाव आहे,तिथे राहतात. ते सतत कुठल्या तरी चिंतेत असतात. त्यांना काही विचारलं तर नीट उत्तरं पण देत नाहीत. ते आधी रोजनिशी लिहायचे. त्यातून मी त्यांच्याबद्दल काही माहिती काढली आहे. ते भटजी होते. गावात कोणतीही पूजा-अर्चा असू देत, एकाच नाव आठवायचं नानाभट. गावातले सगळे लोक त्यांना नानाभट असं म्हणायचे. त्याचं पूर्ण नाव भानुदास भगवान दामले. आमच्या घरात सगळे त्यांना भैरोनानाच म्हणायचे. आमच्या गावात एक पांडुरंगाच देऊळ आहे. रोज सकाळी ते तिथे जायचे, पूजा करायचे, देवळात येणाऱ्या भाविकांना प्रसाद द्यायचे. एखादी पूजा वगैरे असेल तर तिथे जायचे आणि मग उरलेला दिवस वेगवेगळ्या तऱ्हेने घालवायचे. कधी भजन, कधी कीर्तन, कधी कधी एखाद्या गरजूला मदत करायचे तर कधी लोकांचे प्रॉब्लेमसुद्धा सोडवायचे. त्यांना गावात सारेजण देवमाणूस म्हणून ओळखायचे. दारात आलेला अतिथी त्यांनी कधी रिकाम्या हाती परतवला नाही. पण गेल्या पाच वर्षापासून ते खूप विचित्र वागू लागले आहेत. कुणाशी बोलत नाहीत. कुणी बोलायला आलं तर एकदम त्याच्या अंगावरच खेकसतात आणि त्याला काहीही बोलतात. खाणे तर जवळपास सोडल्यातच जमा आहे. ३-४ दिवसांतून एखादी भाकरी खातात ते हि इच्छा असेल तर नाहीतर ते पण राहिलंच. कधी कधी जोरजोरात ओरडू लागतात 'तो जिंकेल त्याला अडवा थांबवा नाहीतर विनाश अटळ आहे.' सगळच समजेनासं झालं. मग परवा तुमची भयानक वाचली आणि त्यातले काही संदर्भ व भैरोनानांच्या रोजनिशीतील काही घटना अगदी तंतोतंत जुळल्या. म्हणून तुमच्याकडे भैरोनानाच्या इतिहासाबद्दल काही माहिती मिळेल आणि त्यांचा आजार बरा करायला तुमची थोडी मदत घ्यावी म्हणून आलो. पण तुम्ही मला निराश केलंत."

"हे पहा प्रोफेसर, माझं अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. खरंतर मला हे सगळं काय चाललंय हेच कळत नाहीये. तरी मी तुमच्या प्रॉब्लेम्सना माझ्या परीने नक्की मदत करेन."
"तुमचा अमूल्य वेळ तुम्ही माझ्यासाठी देताय. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही."
"ठीक आहे. तुम्ही आता एक काम करा. तुमच्या आजोबांची रोजनिशी मला आणून द्या. मी ती वाचेन. मग पुढे काय करायचं ते आपण ठरवू."
"धन्यवाद विश्वासराव. येतो मी. उद्या मी तुम्हाला ती वही आणून देईन." , असे म्हणून प्रो. मोहनराव निघून गेले.

विश्वास आधीच कालच्या घटनेमुळे अस्वस्थ होता आणि त्यात प्रोफेसरांनी येऊन सांगितलेल्या गोष्टींमुळे तो अजूनच अस्वस्थ झाला होता.

' हे सारं खरं आहे का ? माझा कसं काय त्यांच्या आजोबांशी संबध येईल. नाही हे खरे नाहीच मुळी. पण मग भयानकची कथा प्रत्यक्षात कशी आली ? काय होतं हे सगळं ? माझा खरच काही संबंध असेल ? का हा फक्त एक योगायोग आहे ? काल घडलेल्या घटनेचा याच्याशी काही संबंध आहे का ? कदाचित ती पुढे येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना तर नाही ना ? हे माझ्याच बाबतीत का घडतय ? ......................... '

विश्वास पुन्हा एकदा विचारांच्या गर्दीत हरवून गेला.

.............क्रमशः

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त रे , सुरुवात तर छानच झाली आहे. साधारण अंदाज येतोय Happy
लवकर येवु दे पुढचा भाग ! पुलेशु Happy

1 divasaalaa 1 bhaag taakaa...mhanje...link tutanaar naahi...

RANG CHANGLAA JAMALAA AAHE...

Bhayanak : part 2
============================
2 days to go..........

Bhayanak : part 2
============================
2 days to go..........
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

देशमुख साहेबांच घड्याळ बंद पडल कि काय Uhoh

देशमुख साहेब २ दिवस संपले.
मंगलमूर्ती च्या भक्तीमध्ये मग्न आहात कि काय ?
लवकर लिहा ना राव.

Pages