भयानक : भाग ६

Submitted by यःकश्चित on 17 December, 2011 - 03:31

भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
भयानक भाग ५

------------------------------------------------------------------------------------------
मागील भागावरून पुढे..

दोघांनी चपला घातल्या. वाड्याच्या मुख्य दरवाजाकडे वळाले आणि दरवाज्यात उभ्या असलेल्या दोन पायांवर त्यांची नजर खिळली.

मोहनराव आणि विश्वास त्या पायांकडे पाहू लागले.

कोल्हापुरी चपला.....पांढरे शुभ्र धोतर.....त्यावर तितकाच शुभ्र सदरा.....खांद्यावर पांढरा पंचा....दोन्ही हाताच्या मधल्या बोटांत व अनामिकेत रत्नजडीत अंगठ्या.....गळ्यात रुद्राक्षाच्या २-३ माळा.....पिळदार मिशा.....कपाळावर मोठ्ठा बुक्का.....उजव्या कानात बाळी...डोक्यावर तांबडा फेटा.

वयाने ती व्यक्ती वृद्ध दिसत असली तरी चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज होते. त्यांच्या तेजाने वाड्याच अंगण व्यापून टाकलं होतं.

विश्वासने खांद्याने धक्का देत मोहनरावांना ' हे कोण आहेत ?' असं विचारलं. पण मोहनरावांचे लक्षच नव्हते. ते आश्चर्यचकित होऊन दरवाज्यातील त्या व्यक्तीकडे पाहत होते.

कर्रर्रर्रर्रर्र असा आवाज करत त्या कोल्हापुरी चपलांनी वाड्याचा उंबरा ओलांडला आणि वाड्याचे अंगण त्यांच्या तेजाने न्हाहून निघाले.

विश्वासचे कुतूहल वाढतच चालले होते. मोहनराव त्या व्यक्तीकडे टक लाऊन पाहत होते. तेवढ्यात-
" दाजी तू आलास.. "

नाना वरच्या मजल्यावरून अत्यानंदाने ओरडले. त्याचवेळी विश्वासला कळाले की हेच ते नानाचे मित्र दाजी.

" मोहनराव आपल्याला अजून एक महत्वाचा दुवा मिळाला. दाजी भेटले. ", विश्वास मोहनरावांच्या कानात हळूच बोलला. मोहनराव अजूनही त्याच तंद्रीत होते.

" अरे मोहन, त्याला दारातच उभा करणारेस काय ? "

नानाच्या ओरडण्याने मोहनराव भानावर आले.

" मोहन, जा, आत जाऊन पाणी घेऊन वर ये. आणि दाजी तू विश्वासला घेऊन वर ये पटकन. " नाना एकदम खुश होऊन बोलत होते. एवढे आनंदी ते याआधी कधीच झाले नव्हते.

मोहनराव गोंधळून गेले. थोड्या वेळापूर्वी नानांनी विश्वासला घरी सोडून यायला सांगितले होते आणि आता ते त्याला वर बोलवत आहेत. असे कसे विचित्र वागत आहेत ते...? त्याने नानांकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली. नाना त्या नजरेचा अर्थ ओळखून मोहनरावांना म्हणाले, " वर आल्यावर सांगेन. तू पटकन दाजीसाठी पाणी घेऊन ये. "

मोहनराव आत पाणी आणायला गेले. दाजी व विश्वास जीना चढू लागले.

*****

" काय रे हे दाजी...किती उशीर लावलास ? मी तर आशा सोडून दिली होती. विश्वासलासुद्धा मी परत पाठवत होतो. बरं झालं तू वेळेवर आलास. थोडक्यात चुकामुक झाली असती."

" अरे नाना, मला काही बोलू देशील का नाही ! तूच किती बोलतो आहेस. जरा थांब. "

" मग तू परत यायला किती उशीर लावलास ?"

" अरे परिस्थिती तशी निर्माण झाली होती. त्यामुळे वेळ लागला. खरतर आपलं काम तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं. पण वेळच अशी होती की त्या परिस्थितीला तोंड देणं अत्यावश्यक होतं नाहीतर फार मोठ्ठ संकट आलं असतं आपल्यावर. "

" बर. जे आपल्याला हवं होतं ते मिळालं ना. आता काय करायचं ते सांग."

विश्वास दोघांच्या तोंडाकडे नुसता पाहत बसला होता. हे दोघे काय बोलत आहेत हे त्याला काहीच कळत नव्हत. तेवढ्यात मोहनराव पाणी घेऊन आले, दाजींना पाणी देऊन ते विश्वासच्या शेजारी येऊन बसले.

" नाना, थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की विश्वासला सोडून ये, आणि आता-"

" थोड्या वेळापूर्वी इथे दाजी नव्हता.",नाना मोहनरावांचे वाक्य तोडत म्हणाले, " त्याच्या येण्याने आता फार काही बदल होणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर आता 'त्या'चा विनाश अटळ आहे. "

" आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आता मी जी गोष्ट सांगणार आहे, ती फक्त मला आणि दाजीला माहित आहे. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे आता त्या साऱ्या गोष्टी सांगायची वेळ आली आहे."

नानाचे हे बोलणे ऐकून विश्वास आणि मोहनराव सरसावून बसले आणि लक्ष देऊन ऐकू लागले.

" मोहनने बाबांचं पत्र वाचलेलं आहे. त्यात असलेल्या उल्लेखानुसार विश्वास हा दामलेंचा वारसदार आहे. विश्वास हा माझा नातू म्हणजेच प्रभाकरचा मुलगा आहे. "

मोहनराव आणि विश्वास अचंबित होऊन नानांकडे पहातच राहिले. विश्वासला धक्काच बसला. त्याला हे सारं काय चालु आहे कळत नव्हतं, रहस्यावर रहस्ये चढत चालली होती, कशाचा काही उलगडा होत नव्हता. आता थोड काही चांगलं कळेल असं वाटत असतानाच नानांनी आणखी एका रहस्यात टाकलं.

" पण हे कसं शक्य आहे ? माझे आई-बाबा तर एका कार अपघातात वारले आहेत. मग-"

" तुझे आई-वडील कार अपघातात नाही वारले.", विश्वासचे वाक्य तोडत नाना त्याला म्हणाले, " त्याच बाबतीत मी काही महत्वाच्या गोष्टी आता सांगणार आहे. " असे म्हणून नानांनी पाण्याचा एक घोट घेतला आणि परत बोलू लागले,

" बाबांनी जे पत्र लिहून ठेवलं होतं तसं पत्र आपल्या घराण्यात बऱ्याच वेळा लिहिलं गेलं आहे. त्या पत्राबद्दल विशेष गोष्ट अशी की ज्याला ते पत्र मिळत, तोच 'त्या'च्याविरुद्धच्या मोहिमेवर जाऊ शकतो. कारण ते पत्र फक्त दामले घराण्याच्या अशा वारसदाराला मिळतं जो 'त्या'च्याशी लढू शकेल आणि मुख्य गोष्ट म्हणजे ते पत्र त्याच वेळी बाहेर पडत जेंव्हा त्याच्याशी लढायची वेळ आलेली असते. यावेळी हे पत्र तुला मिळालं आहे ज्याचं निमीत्त ठरली तुझी "भयानक" कादंबरी. त्यामुळे आता तुला तयारी करायला हवी. "

" पण सध्या विश्वासची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. त्याला आपण सकाळी भेटलेलो तेसुद्धा लक्षात नाहीये. त्याला आपल्या घराण्याबद्दल काहीच इतिहास माहिती नाही. शिवाय 'त्या'च्याशी सामना कसा करायचा हे सुद्धा माहित नाही आणि तुम्ही त्याला तयारी कर म्हणताय. कसा काय तो काही करू शकणार आहे ? ", मोहनरावांनी शंका उपस्थित केली.

" तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तुलासुद्धा संपूर्ण इतिहास माहित नाही. ऐक आता शांतपणाने. आपले पूर्वज चंद्रकांतराव दामले, ह्यांनी जेंव्हा 'त्या'च्या पूर्वजांना मारले. तेंव्हा त्याचं बदला म्हणून त्या पूर्वजाने दामले घराणे निर्वंश करायचा निर्धार केला. त्याची प्रत्येक पिढी हा प्रयत्न करते पण त्याला यश येत नाही. याला कारण आपल्या पूर्वजांनी केलेला पुण्यसंचय. आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून आपण आज जिवंत आहोत. गेली अनेक वर्षे तो काही ठराविक वर्षांनी त्या वर्षातल्या एका पौर्णिमेला आपल्यावर हल्ला करतो आणि आपण तो परतवून लावतो. पण हे असं किती दिवस चालणार ? म्हणून मागल्या वेळेस आम्ही पूर्ण तयारीनिशी होतो. आम्ही त्याचा हल्ला परतवून लावला आणि एवढंच नाही तर त्याच्यावर उलटा वार केला. त्याचा यज्ञ खंडीत झालं पण अत्यंत खेदाची गोष्ट, बिचाऱ्या माझ्या मुलाचा-प्रभाकरचा यात बळी गेला."

प्रभाकराच्या आठवणीने नानांचे डोळे पाणावले. पुढे दाजी बोलू लागले,

"म्हणून आम्ही डोकं चालवलं आणि विश्वासला या साऱ्यापासून दूर ठेवलं. दामले घराण्यात जेंव्हा व्रतबंध करतात तेंव्हा त्यासोबत अजून एक विधी केला जातो. त्यात त्या मुलाचे वडील त्याला घराण्याचे सारे संस्कार करतात शिवाय एक विद्या त्याला शिकविली जाते ज्याचा वापर 'त्या'च्या विरुद्ध लढताना केला जातो. विश्वासलासुद्धा ही विद्या अवगत आहे. आणि सांगायची गोष्ट अशी की यावेळी "तो" सुद्धा असंच विचार करतोय की यावेळी सगळा खेळ संपवून टाकावा. यासाठी त्याने बुवांना बोलावले आहे. बुवा म्हणजे काळ्या माया-जगतातील महान व्यक्ती. आत्तापर्यंत बुवांना कुणीही आव्हान दिलं नाहीये कारण त्यांना आव्हान देणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. आणि आपण "त्या"च्याविरुद्ध लढणार म्हणजे बुवांना अप्रत्यक्षपणे दिलेलं आव्हानच आहे. त्यामुळे यावेळी विश्वासला सर्व तयारीनिशी सज्ज राहावे लागणार आहे. तसेच मी काही नवीन विद्या त्याला शिकवणार आहे. बुवा ही व्यक्ती अतिशय ताकदवर आणि हुशार आहे. त्यांना जर हरवायचे असेल तर विश्वासला अस्त्रविद्याही शिकावी लागेल. त्यासाठी अपार कष्ट आणि मेहनत घ्यावे लागतील. दुसरा पर्यायच नाहीये. "

इतका वेळ विश्वास तिघांकडे पहात नुसतं ऐकत होता. पण डोक्यात उडालेल्या गोंधळाने त्याला वाचा फुटली.

" आतापर्यंत मी तुमचं सगळ ऐकलं. त्यावरून मला काही प्रश्न पडलेत. "

" निःसंकोचपणे विचार ", नाना.

" तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी तुमचा नातू आहे. तर मग या गोष्टीला पुरावा काय ? जरी ही गोष्ट खरी असेल तर मग मला कसे काही आठवत नाही ? "

विश्वासचे शंका निरसन करण्यासाठी नाना सांगू लागले,

" इथेच सारी कहाणी सुरु होते. सुमारे २५-२६ वर्षांपूर्वीची घटना आहे. त्या दिवशी पौर्णिमा होती. संध्याकाळची वेळ होती. आम्ही त्याच्या आघातापासून स्वतःचे रक्षण केले आणि त्याच्यावर आघात करण्याच्या तयारीस लागलो होतो. रात्री नऊच्या आसपास आमची तयारी पूर्ण झाली. ठरल्याप्रमाणे पहिला आघात मी करणार होतो, मग नंतर दाजी आणि नंतर प्रभाकर. पण "विनाशकाले विपरीत बुद्धी".. ऐनवेळी प्रभाकरला काय झाले की तो म्हणाला पहिला आघात मी करतो. मीही बुद्धी फिरल्याप्रमाणे त्याला संमती दिली. प्रभाकरने आघात मंत्राचा पहिला चरण म्हणाला आणि आघात केला. तोच आकाशातून एक चमकता किरण सुसाट वेगाने आला आणि प्रभाकर वर आदळला. आधी आम्हाला काही कळेना. मी आणि दाजीने आमची शक्ती एकवटली आणि अंतःचक्षु उघडले असता आम्हाला कळाले की "त्या"ने आघात-निवारण याग सुरु केला होता. जो याग पूर्ण होताच त्याच्यावर कुठलाच आघात काम करणार नव्हता आणि तो शक्तिशाली बनणार होता. त्या यागामुळे प्रभाकरने केलेला आघात त्याच्यावरच उलटला आणि त्यातच प्रभाकरचा प्राण गेला. मग आम्ही परत अंतःचक्षूच्या सहाय्याने पाहिले, त्याचा शेवटचा चरण चालू होता. तो जर पूर्ण झाला असता तर याग संपूर्ण झाला असता. पण तो पूर्ण होऊ द्यायचा नव्हता आणि अशा ऐनवेळी आम्हाला काही उपाय योजना करणे फार अवघड होऊन बसले. मग आम्ही कृत्रिम पाऊस निर्माण केला आणि त्याच्या यज्ञात बाधा आणली. जेणेकरून त्याचा याग सफल होऊ नये. आमचा हेतू साध्य झाला. त्याचा यज्ञ खंडीत झाला. मग त्याला घाबरवण्यासाठी दाजीने आकाशवाणीद्वारे संदेश पाठवला. त्याचा यज्ञ अपूर्ण राहिला. पण इकडे प्रभाकरचा जीव गेला. तेंव्हा तू एक-दीड वर्षाचा होतास. मग आम्ही तुला जेऊरकरांच्या घरी सोपविले. त्यांनाही मुलगा हवा होता. मग त्यांनी तुला दत्तक घेतले. दुर्दैवाने श्री व सौ जेऊरकरांना काळाने आपल्या पोटात ओढले. तुझ्या व्रतबन्धाची वेळ येताच व्रतबंध व आपले खानदानी संस्कार व विद्या तुला दिली. पण नियती.. "

नानांनी पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले,

" नियतीच्या मनातील विचार कधी ओळखता येतात का ? जरी ओळखता आले तर ते आपण बदलू शकत नाही. तसंच काहीसं तुझ्याबाबतीत झालं. आम्ही विचार केला की तू जर आमच्यापासून दूर राहिला तर ते पत्र तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि मग तुला "त्या'च्याशी लढायची वेळच येणार नाही. तसं झालंही असतं जर तू "भयानक" लिहिली नसतीस तर. तू भयानक लिहिलीस आणि तुझ्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्या स्मृतींद्वारे नियती जागृत झाली आणि मग पुढच्या घटना अशा रीतीने घडत गेल्या की त्या ठरल्या आहेत असं वाटणारही नाही. शेवटी ते पत्र तुझ्या हातात पडलं, तू इकडे आलास आणि....... आता नियतीचे आपल्याला ऐकले पाहिजे. "

विश्वासच्या चेहेरयावर किंचितसे समाधान दिसले आणि तो लढायला तयार आहे असे वाटले. मग नाना दाजीकडे वळून म्हणाले,

" दाजी तू मगाशी बोललास की त्याने बुवांना बोलावले आहे. तुला कसे कळाले ? "

यावर दाजी हसून म्हणाले,

" अरे म्हणून तर मला उशीर परतायला उशीर झाला ना. आपलं काम आधीच झालं होतं. मी जी विद्या संपादन करायला गेलो होतो ती विद्या कधीच मिळाली मला. ही विद्या फार दुर्मिळ आहे. तिचे नाव "आत्मा संमोहन विद्या" आहे. कठोर तपश्चर्या केल्यावर ही विद्या मिळते. त्यामानाने मला ती फारच सहज मिळाली असे म्हणावे लागेल. इथून उत्तरेकडे ९-१० मैलांवर एक शांत, सुंदर जंगलात एक डोंगर आहे. त्या डोंगरात एक गुहा आहे. तिथे साडेसातशे वर्षांपूर्वी एक फार महान ऋषी रहायचे. त्याच्या निवासाने ती जागा पवित्र झाली होती. मी तिथेच तपश्चर्येला बसलो. मी तिथे फलाहार आणि जलाहार करायचो. फक्त साडेचार वर्षात ते ऋषी प्रसन्न झाले आणि त्यांनी मला ही विद्या दिली. मी तिथून निघालोच होतो. पण तेवढ्यात मला कुणीतरी गुहेत येत असल्याची चाहूल लागली. मी तिथल्याच एक कपारीत दडून बसलो आणि पाहू लागलो कोण येतंय ते. एवढ्या निर्जन ठिकाणी कोण कशाला बरे येईल. आधी मला वाटले की जंगली श्वापदे असावीत. पण मग माणसाच्या बोलण्याचे आवाज आले. त्यांच्यातला एकजण बोलला "

" आपल्याला ही जागा स्वच्छ करून घ्यावी लागेल. फारच सुरेख जागा निवडलीस तू. इथे नक्कीच आपला यज्ञ यशस्वी होणार आणि एकदाचा हा यज्ञ यशस्वी झाला की मग -"

" असे म्हणून तो हसू लागला. त्याच्या पाठोपाठ दुसरी व्यक्तीही हसू लागली. दोघांनी जोरजोरात हसत गुहेच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केला. मी तिथेच जवळ लपलो होतो. त्यांना मी दिसत नव्हतो पण ते मला दिसत होते. ते माझ्या दृष्टीपथात आले आणि त्यांचे चेहेरे पाहून मला धक्काच बसला. "

क्रमशः

गुलमोहर: 

सर्वप्रथम मी आपली सर्वांची माफी मागतो...
मध्यंतरी माझी सत्र परीक्षा चालू असल्याकारणाने मला लेखनकार्यासाठी वेळच मिळाला नाही..
पण परीक्षा संपल्या संपल्या लगेच पुढचा भाग लिहिला आणि पोस्टला...
झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व..
यापुढे असं विलंब होणार नाही...

तुमचं वय आणि अनुभव लक्षात घेता खुपच उमदा प्रयत्न. तुमचं कौतुक.

फक्त एकच सुचना, हा भाग जरा बोअर झाला आहे. कदाचित तो उशीरा आला म्हणुन ही असेल. पण जरा जास्त क्लिश्ट झाला आहे. त्या वर काही संस्कारण जमलं तर पहा. पण शैली छान आहे.

पहिले ३ भाग जेवढे उत्कंठा वर्धक झाले त्या मानाने हा भाग नाही.

राग मानुन घेवु नका.

धन्यवाद अप्पासाहेब, वेद, मी_चिऊ, अनुसया, मोहन कि मीरा, भाग्यश्री......!!!!

@मोहन कि मीरा : प्रतिसादाबद्दल धन्यवाद...राग येण्याचे काहीच कारण नाही....कारण अश्या प्रतिसादाची मला गरज आहे....तशी ही माझी पहिलीच कथा आहे..त्यामुळे मला कथालेखनाचा फारसा अनुभव नाही...तरीही मी लेखनात सुधारणा करेन....

नक्षी | 10 November, 2011 - 02:16

मस्त... उत्सुकता टिकुन ठेवली आहे
माझ्यामते, ते पाय "दाजींचे" असावेत...

ह्म्म... माझा तर्क बरोबर निघाला Happy
आधीच्या भागांच्या तुलनेत हा भाग जरा फिका वाटला. हे.मा.वै.म. राग नसावा.

@नक्षी... : हे.मा.वै.म. म्हणजे काय...?

मी अजून माबो वर नवखा आहे...त्यामुळे मला इथले खुपसे संकेतिक शब्द माहित नहीत... Sad

छान आहे हा भाग पण !! <<ही तपश्चर्या मी एका शांत, सुंदर जंगलात एक डोंगर आहे.>> ह्या ठिकाणी काही दुरुस्ती करावी लागेल बहुदा

@शकुन : धन्यवाद....हात आणि मेंदूचा मेळ न जमल्यामुळे होतं असं ...ते वाक्य दुरुस्त केलं आहे आता ...

प्रणव_देशमुख | 17 December, 2011 - 02:41
सर्वप्रथम मी आपली सर्वांची माफी मागतो...
मध्यंतरी माझी सत्र परीक्षा चालू असल्याकारणाने मला लेखनकार्यासाठी वेळच मिळाला नाही..

>>
आपल्या लेखनकार्याची आम्ही सर्व तत्परतेने प्रतिक्षा करत आहोत.
नविन वर्षाच्या शुभेच्छा.

धन्यवाद मोहन कि मीरा...
@ प्रणव_देशमुख आपल्या पुढिल भागाची वाट पाहात आहोत.
सगळ्या मा. बोकरांना (मायबोलीकरांना) नविन वर्षाच्या शुभेच्छा !!!

प्रणव, पुढचा भाग येणार आहे का? असल्यास कधी? काय राव, तुम्ही एवढी मस्त कथा लिहीत आहात, आणी आम्हाला असे वाट बघायला लावतात, हे वागणं बरं नव्हं. Happy