परंपरा वगैरे - मंजूडी

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 04:37

एखादा दिवस असा उगवतो की त्या दिवशी घडणार्‍या सगळ्याच गोष्टींना एक विशिष्ट संदर्भ असतो. योगायोगच तो.. पण होतं खरं असं.

त्या दिवशी ऑफिसात आले. रीतसर स्थानापन्न वगैरे होऊन कॉम्प्युटर चालू केला. इन्बॉक्सात पडलेल्या खंडीभर मेलींपैकी त्या एका मेलीने माझे लक्ष वेधून घेतले... 'दिनूचे बिल'. काहीतरी लख्खकन् मनात चमकून गेले. इतर कामाच्या मेलींकडे दुर्लक्ष करून सगळ्यात आधी तीच मेल उघडली.

शाळेत असताना दरवर्षी पिठोरी अमावास्येला म्हणजेच श्रावणी अमावास्येला आम्हा प्रत्येक इयत्तेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सभागृहात नेलं जायचं. 'मातृदिन' अशी अक्षरे रंगवलेला कापडी फलक व्यासपीठाच्या पडद्यावर लावलेला असायचा. 'आई माझा गुरू' या श्लोकाने सुरू झालेल्या कार्यक्रमात बापूसर आम्हाला आचार्य अत्र्यांची 'दिनूचं बिल' ही गोष्ट वाचून दाखवायचे. गोष्ट आहे साधीशीच, पण थोडक्या शब्दांत आईची महती सांगणारी आणि विलक्षण परिणामकारक.

दिनू हा लहानसा मुलगा आपल्या वडिलांबरोबर त्यांच्या दवाखान्यात जात असे. तपासणी झाल्यावर, औषधं घेतल्यावर पेशंट दिनूच्या वडिलांकडे बिलाची विचारणा करीत असत. या बिलाविषयी दिनूला खूपच उत्सुकता होती. एक दिवस त्याने वडिलांना 'बिल म्हणजे काय?' असे विचारल्यावर वडिलांनी त्याला बिल बघायला दिले. त्यावरील तपशील वाचून दिनूला एक कल्पना सुचली. घरी गेल्यावर त्याने एका कागदावर आईचे नाव लिहिले आणि त्यात पुढील तपशील भरले -

आज बागेतून फुले आणल्याबद्दल ... ५० पैसे

बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल ... २ रुपये

शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल ... १ रुपया

दुकानातून साखर आणल्याबद्दल ... ५० पैसे

__________________________________

एकूण ... ४ रुपये

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला उशाशी ठेवलेले चार रुपये दिसले आणि तो भलताच आनंदून गेला. पण त्याबरोबर एक कागदही तिथे ठेवलेला होता -

लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल ... काही नाही

चारदा आजारपणात दिवसरात्र जागून काळजी घेतल्याबद्दल ... काही नाही

गोष्ट सांगून करमणूक केल्याबद्दल ... काही नाही

वाचायला शिकवल्याबद्दल ... काही नाही

________________________

एकूण ... काही नाही.

ते वाचून दिनूला एकदम रडायला आलं. तो पैसे घेऊन धावतच आईकडे गेला आणि तिला मिठी मारून रडू लागला. आईने दिनूला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली, "तुझ्या बिलाचे पैसे पावले बरं, दिनू!"

दरवर्षी ही गोष्ट आम्ही ऐकायचो. आणि दरवर्षी हमखास डोळ्यातून पाणी यायचेच. शाळेतून आम्हाला दोन नानकटाया आणि पार्लेची केशरी गोळी अशी पुडी मिळायची. घरी जाऊन ती पुडी आईला द्यायची आणि तिला नमस्कार करायचा अशी सूचना आम्हाला शाळेतून मिळालेली असे. हा प्रसंग आमच्यासाठी आणि आईसाठीही फारच हृद्य असायचा. आम्ही दोघी बहिणी, दोघींना एक-एक अशा दोन पुड्या मिळायच्या. 'एक पुडी बाबांना द्या' असं एका वर्षी आईने आम्हाला सांगितलं. 'नमस्कार करा' ह्या सूचनेची गरज आम्हाला भासलीच नाही. शब्दांवाचूनच भावना व्यक्त झाल्या आणि थेट हृदयापर्यंत पोचल्या. मग त्या वर्षापासून तशीच प्रथा पडून गेली.

पिठोरी अमावास्येचं व्रत हे आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी, संवर्धनासाठी करते. विदेहा नावाच्या स्त्रीची संतती जगत नव्हती. तिने पिठोरी अमावास्येचं व्रत केलं, चौसष्ट योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली सातही मुलं जिवंत झाली अशी पिठोरी अमावास्येची कहाणी आहे. आणि म्हणून यादिवशी मातृदिन साजरा केला जातो.

इन्बॉक्सातली मेल वाचून एका क्षणात हे सगळं डोळ्यासमोर तरळून गेलं. कामाच्या मेलींत ती मेल हरवून जाऊ नये म्हणून माझ्या खाजगी मेल आयडीवर ढकलली. काय वाटलं माहीत नाही, पण एक प्रिंट काढून पर्समधे घालून ठेवली. ती मेल पाठवणार्‍याला मनापासून धन्यवाद देऊन कामाला सुरुवात केली.

त्याच दिवशी 'पुण्यातले पुणेकर'वर गप्पा मारताना श्रावणी-शुक्रवारी आमच्या शाळेत मिळणार्‍या गरमागरम चण्यांची आठवण निघाली. मग पिठोरी अमावास्येला मिळणार्‍या नानकटाई आणि गोळीची आठवण येणं अपरिहार्यच होतं. योगायोग! पाठोपाठच संक्रांतीला तिळगूळ, ऊसाची कांडी आणि चैत्र महिन्यात मिळणारी आंबेडाळ, पन्हं आणि कलिंगडाची फाक याही आठवणी निघाल्या. माझ्या आणि अरुणच्या पोस्टी वाचून 'पुण्यातले पुणेकर'वर केवळ वाचनमात्र असणार्‍या एका बालमोहनकरीण मायबोलीकरणीने माझ्या विचारपुशीत तिच्या आठवणी लिहिल्या. तसं आमच्या वयात खूप अंतर आहे, त्यामुळेच शालेयकालही वेगवेगळा... पण आठवणींच्या या धाग्याने आम्हाला एकत्र आणले. ओळख वाढली आणि पटलीदेखील.

त्याच दिवशी अजून एका मायबोलीकरणीने 'मी पण बालमोहनचीच आहे' असं आवर्जून माझ्या विचारपुशीत लिहिलं होतं. अजून एक योगायोग!

प्रोफाइलमध्ये शाळेचं नाव लिहिल्याचा फायदा त्यादिवशी मला जाणवला. त्याचबरोबर आम्हाला आपल्या परंपरांचे पाईक करण्याचे प्रयत्न आमची शाळा, आमचे आई-बाबा किती सहजतेने करत होते याची जाणीव मला झाली.

संध्याकाळी ऑफिसातून घरी जाताना एक मैत्रीण ट्रेनीमधे बर्‍याच दिवसांनी भेटली.

मैत्रीण म्हणजे नेहमीच्या संपर्कातली अशी नाही, ऑफिसच्या वेळा साधारण सारख्या असल्याने बर्‍याच वेळेला एकाच ट्रेनीमधे असायचो आम्ही. तश्या रोजच्या सहप्रवासी असतात बर्‍याच, पण हिच्याशी जरा गप्पागोष्टी व्हायच्या, विचारांची नाळ जुळतेय असं वाटायचं.

एकदा कधीतरी तिने स्वतः घरी केलेली नानकटाई डब्यात आणली होती. त्या आठवड्यात 'मदर्स डे' झाला होता आणि तिच्या आईसाठी आवडीचा खाऊ म्हणून तिने स्वतः ती नानकटाई केलेली होती. मदर्स डे - मातृदिन - नानकटाई... सगळे दिवे डोक्यात पेटले आणि मी तिला आसुसून सांगायला सुरुवात केली.

"आमच्या शाळेत मातृदिनाच्या दिवशी आईसाठी खास नानकटाईचा खाऊ द्यायचे."

"हो का? किती छान असतं नं हे मदर्स डेचं सेलिब्रेशन.."

"हम्म्.."

"एरवी कुठे गं आपण मुद्दाम आईजवळ कृतज्ञता वगैरे व्यक्त करतो. किती छान वाटतं नं आपल्या आईला एखादं ग्रीटिंग कार्ड द्यायला.. सोबत एक छानसा बुके आणि तिच्या आवडीचा खाऊ. मी गेल्या वर्षी तिला साडी घेतली होती. आपल्यात नाही अश्या सेलिब्रेशनची पद्धत."

'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या सिनेम्यातील भालचंद्राच्या तोंडी असलेल्या 'सं कृ ती म्हणजे काय?' या वाक्याची मला प्रकर्षाने आठवण झाली.

मी 'मातृदिन' म्हणत होते त्याला ती 'मदर्स डे' समजत होती. हिच्याशी आपलं जमतं असं मला का वाटलं होतं कोणास ठाऊक.

मनातले विचार दाबून मी तिला म्हटलं , "अगं असतो ना मातृदिन आपल्यातही... पिठोरी अमावास्येला असतो."

"पिठोरी अमावास्या म्हणजे?" काहीतरी अनपेक्षित ऐकल्याचा भाव तिच्या तोंडावर होता.

"श्रावण महिन्यातली अमावास्या.. त्याच दिवशी बैल पोळा पण असतो."

"ओ! अच्छा... पण तो बैल पोळा वगैरे आपण कुठे करतो? ते तर गावठी लोक, आय मीन, जे शेतकरी असतात त्यांच्याकडेच तर असतो. पुरणपोळी वगैरे करतात तोच नं?"

'मला अगदीच काही 'ही' समजू नकोस' अश्या थाटात ती म्हणाली होती. मी पुढे काहीच न बोलता माझ्या स्टेशनला उतरले होते.

त्यानंतर ती फारशी कधी दिसली नव्हती. ऑफिसच्या वेळा/ जागा बदलली असेल. कोणास ठाऊक!

आता आज पर्समधे दिनूच्या बिलाची प्रिंटआऊट असताना तीच मैत्रीण, नव्हे सहप्रवासी, भेटली.

त्यादिवशी वर्तमानपत्रातील राशिभविष्य मी वाचलं नव्हतं, पण ते 'योगायोग संभवतात' असंच असणार नक्की .

गेल्यावेळेच्या अनुभवावरून तिच्याशी त्याविषयाबद्दल एकही अक्षर बोलायचं नाही असं ठरवलं होतं. पण कसा कोण जाणे काहीतरी विषय निघाला आणि 'नानकटाई'वर येऊन स्थिरावला.

"अगं तू गेल्यावेळी म्हणाली होतीस नं आपल्याकडे कुठल्यातरी सणाला 'नानकटाई' करतात असं..."

मला हसायलाच आलं.

"हो.. पिठोरी अमावास्येला मातृदिन असतो आणि आमच्या शाळेत...."

माझं वाक्य मध्येच तोडत ती ओरडलीच, "आठवलं आठवलं.. त्यादिवशी आईला नानकटाई द्यायची आणि नमस्कार करायचा.. करेक्ट? अगं आई कधीची पाठी लागली आहे की मागच्या वेळेसारखी नानकटाई कर म्हणून. तू दिसल्यावर मला ते आठवलं आणि म्हटलं आता तुला विचारून त्या सणाच्या दिवशीच करेन ना नानकटाई..."

मला पु. लं.चं वाक्य आठवलं, 'सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.'

तर असो, नानकटाईच्या निमित्ताने का होईना, पण माझ्या त्या मैत्रिणीच्या 'मातृदिन आपल्यातही असतो' एवढे लक्षात राहिले तरी पुरे झाले.

- मंजूडी

(आचार्य अत्रे यांच्या 'दिनूचे बिल' या कथेतील भाग लेखात वापरावयाची परवानगी दिल्याबद्दल श्री. आप्पा परचुरे, परचुरे प्रकाशन गृह, मुंबई यांचे आभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

मंजू छान लिहिले आहेस..
पण खरं सांगू.मातृदिन काय किंवा मदर्स डे काय भावना त्याच असतात ना गं..
लहानपणी जेव्हा तू आईला नानकटाई देऊन नमस्कार करायचीस तेव्हा आईला छानच वाटत असेल आणि आता तुझ्या लेका/कीने मदर्स डे ला तुला छान गुलाबाचे फूल/ग्रीटींग कार्ड दिले तरी तुला भरून येईलच ना?

मला तरी आईच्या आवडीचे एखादे गाणे लागले, एखादा पदार्थ केला एखादा पिक्चर लागला, साडी,ड्रेस दिसला की आपण फोन करतो, तिच्या साठी काहीबाही आठवणीने घेतो ते सगळे सारखेच वाटते..

मदर्स डे साजरा केला म्हणजे आईबद्दल जे वाटते ते कुठे कमी होते का ?

रागवू नकोस, मला जे वाटले ते लिहिले.

मस्तच.
खूप आवडली तुझी गोष्ट. अत्र्यांची गोष्ट तर आवडतेच.
माझा बाळ जसजसा मोठा व्हायला लागलाय तसतसं मलाही आपल्या संस्कृतीतल्या या गोष्टींबद्दल आकर्षण वाटू लागलंय.
पुढच्या वर्षी आमच्याकडे जीवतीचं व्रत (मॉडिफाईड स्वरुपात अर्थात) नक्कीच.
धन्यवाद गं आठवण करून दिल्याबद्दल.

एम्बीचं बरोबरच आहे.उद्या माझ्या बाळाने कुठल्याही दिवशी माझ्यासाठी आवर्जून काही केलं तर मला तितकाच आनंद वाटेल. पण एखाद्या खास नात्याला एखादा खास दिवस दिलेला खासच :).

परवा बाळाच्या वाढदिवशी आम्हीही आमचा दोघांचा मदर्स आणि फादर्स डे साजरा केला. Happy

मस्तच मंजूडी. Happy दिनूच्या बिलाची आठवण.. अहाहा!

संस्कृती हे एकुणातच अजब रसायन असावं, अनेक गोष्टींचा मिळून बनलेलं एक अनाकलनीय रंगाचं कोलाज. आपल्यालाच कधी कधी कळत नाही, या कोलाजचे नक्की घटक काय ते. त्याच त्या गोष्टी टिकून राहिल्या तर संस्कृती का काय, त्याचे साचले डबके होत असावे. कारण नुसतं टिकून राहणंच टिकून राहिलं तर संदर्भ हरवण्याची भिती. हरवलेल्या गोष्टींचा हळवा नॉस्टॅल्जिया हीही, आणि सतत वाहत राहणं हीही एक संस्कृतीच. शेवटी भोवतालात (बरं वाईट- जे काय असेल ते) तेच टिकून राहतं- व्हाट वुई डिझर्व.

दिनूचं बिल आजही आहेच. बिलबुकं जरा चकचकीत झाली असतील इतकंच.

Happy भावना महत्त्वाच्या हे तर पटलेच! रोजच्या व्यवहारांच्या धबडग्यात व्यक्त न होऊ शकणारं प्रेम, जिव्हाळा हा अशा छोट्या छोट्या कृतींतून व्यक्त करता आला/झाला की जे काही वाटतं ते शब्दांत पकडणं खरंच अवघड काम आहे.

'सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे.'

सारी संस्कृती खाण्याभोवती 'गुंतली' आहे का हे माहित नाही, पण 'टिकली' याचे कारण खाण्यातच आहे. खाल्लेच नसते तर सगळे मेले असते, मग कसली संस्कृती नि कसले काय!
आता अन्न की पैसा हे आजकालच्या युगात सांगणे कठीण आहे, पण दोन्ही खाण्याचा संबंध भारतीय संस्कृतीशी आहे.

Pages