युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?

Submitted by पाषाणभेद on 14 October, 2010 - 13:57

बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू
उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू

मास्तरीणबाई:
समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला
डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन
सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन

मास्तरीणबाई:
भरलेली शाळा खुपच आवडते मला
वर्ग कधीच ठेवणार नाही मोकळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
प्रयोग करायसाठी आहे ही प्रयोगशाळा
बाजूलाच उभी केली व्यायामशाळा

मास्तरीणबाई:
कृषीशाळेत घेतला मी हाती विळा
तण काढून दाखवले मी कितीक वेळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
हि घंटा मी अशी हातात पकडीन
शाळा सुटायची घंटा मी वाजवीन

मास्तरीणबाई:
चला शिकवू दोघे मिळून मुलांना
आता मुले झालीत शाळेत गोळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१०/२०१०

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

फारच मस्त पाषाणभेद!!!!! हा एक वेगळा प्रयोग आहे कवितेतला आणि यशस्वी झालाय... काहीच्या काही नाही वाटत ही कविता. मस्तच आहे Happy
(थोडी द्वयर्थी वाटते...पण निखळपणे वाचली तर चांगल्या अर्थाची कविता आहे... )

रसग्रहण

या कथेतला नायक अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. कामाला त्याची ना दिसत नाही पण कामात चूक नको म्हणून तो आधीच काम स्पष्ट करून घेतो आहे. अर्थात या कवितेतून गुणवत्तेचं महत्व वाढीस कसं लागेल याकडे कवीने लक्ष पुरवलेलं आहे. कवी स्वतः दगडफोड्या असून कवितेत सुतारकाम करणारा नायक दाखवल्याने या कवितेत वर्गसंघर्षाची क्षीण ज्योत तेवती ठेवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झालेला दिसतो. यावरून भांडवलशाहीच्या विरोधात तर संघटीत व्हाच पण आपल्या कामात देखील दक्ष व्हा असा गुप्त संदेश कवी देत असावा. तसच शिक्षणाचं महत्व आणि त्यातून पुढची पिढी कशी घडवावी हे त्याने शाळा आणि व्यायामशाळेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

क्रांतिकारी कविता !

मस्त,
पण चावटपणे वाचली तर चावट अर्थाची कविता आहे...
चावटपणे न वाचता देखील चावटपणा ठासुन भरलेला आहे अस वाचताना वाटलं....
Lol

ठो

पोरांच काही खर नाही..
घेतिल विळा,गाठतील मळा,कापतील गळा,रक्त वाहील भळाभळा.
हाताखंडा!बापरे...मले साला शि'खायची न्हाय.

मनस्वी म्हणतोय तेच खरे आहे.

प्रस्तूत कवितेतील नायक नायिका हे सर्वसामान्य शाळाशिक्षक आहेत. त्यांना शाळा, त्यातील मुले, शिकवणे आदिंबाबत कळकळ आहे. त्यांच्या वर्तनातून, बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवत. शाळेतील सामान्य कामेदेखील - जसे फळा लावणे, त्यासाठी खिळा ठोकणे, बेंच बसविणे, घंटा पकडणे, ती हलवून वाजवणे आदी कामांमध्ये ते हिरहिरीने भाग घेतात. शाळेत व्यायामशाळा काढणे, खर्चीक डस्टर न वापरता बोळा वापरणे, कृषीशाळेत विळ्याने तण काढणे आदी अनेक प्रयोग करण्यात त्यांना आनंद वाटतो.

मनस्वी म्हणतात त्याप्रमाणे ही एक क्रांतीकारी कविता, युगप्रवर्तक कविता आहे. तत्राप काही प्रतिक्रियांवरून ती वाटते तशी वेगळ्या अर्थाची कविता निश्चितच नाही. आपल्या डोळ्याला जसा चष्मा, आपल्या मनात जसे विचार तसे ती कवीता वाटेल.

काही शाळाशिक्षकांच्या संघटनांनी सदरहू कविता ही 'शिक्षकांची अधिकृत कविता' म्हणून स्विकारावी अशी मागणीही केली आहे. काहींच्या मते या कवितेचा अनुवाद भारतीय भाषांत व अंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषांत व्हायला हवा असेही कळते. त्यांच्या मते तसे झाले तर शिक्षकांत नवे नाते तयार होईल.

(धागा आपसूक वर आलाय. त्यामुळे विनाकरण प्रतिसादाचा आरोप नसावा ही विनंती.)

- मज्जानूं लाईफ.

Pages