दशकपूर्तीच्या निमित्ताने - ३ (झलक दिखला जा..)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

झलक दिखला जा..

जीटीजी, गटग, एवेएठी, कल्लोळ.. हे सगळे शब्द आता बरेचजणांना माहीत आहेत.

"अखिल मायबोली अधिवेशन(AMBA)" असे भारदस्त नाव पूर्वी मायबोलीकरांच्या भेटीगाठींना दिले होते. त्याच्या संयोजनाच्या काही गाईडलाईन्सही होत्या. "आंबा" च्या धाग्यावर काही ठिकाणी स्नेहसंमेलन, हितगुज संमेलन आणि पिकनिक असेही शब्द वापरलेले दिसतील. GTG (जीटीजी) किंवा गटग हा शब्द पहिल्यांदा २००२ मध्ये वगैरे सापडतो. तरीही तेव्हा न्यूजर्सीवाले इस्ट कोस्ट ग्रँड AMBA चा प्रोग्रॅम वगैरे म्हणत होते!

जर्सीवाल्यांचे पहिले एवेएठी ऑगस्ट २००७ मध्ये झाले. ज्याला मी जाऊ शकले नव्हते. या पानावर त्याची 'माणूस' ने केलेली, झक्की आणि रॉबिनहूड यांच्या फोटोंसह, पत्रिका आहे. आणि खाली "आमच्या 'एठीवेठी' ला यायचं हं!" अशी विनंती!

आता या एन्जेवाल्यांचे नंतर बघू. तिथे सारखंच चालू असतं काहीतरी..

१० एप्रिल २०१० चा वासंतिक कल्लोळ होण्याच्या खूप आधी, म्हणजे फार फार वर्षांपूर्वी इथे एक गटग झाले होते. त्यासाठी मी धरुन ५ मायबोलीकर उपस्थित होते. तरी खूप झाले. कुटुंबीय वगैरे धरुन १०-१२ लोक असतील. ही २००३-०४ ची गोष्ट आहे. तेव्हा उपास (Upas) आणि AmitV हे व्हर्जिनियात आले होते आणि मिनर्वामध्ये आमचे गटग झाले. स्थानिक मायबोलीकर स्वाती_दांडेकर आणि समि(sami) पण उपस्थित होत्या. मला भेटलेले पहिले मायबोलीकर म्हणजे उपास आणि AmitV.

हे माझे पहिलेवहिले जीटीजी.

मग भेटला तो परागकण. त्याला त्यांच्या कॉलेजात की मंडळात कुठेतरी लेझीम बसवायचे होते आणि लेझीम हवी होती. तसं त्याने कुठल्यातरी धाग्यावर विचारलं. आम्ही मंडलात दरवर्षी गणपतीला मिरवणुकीत लेझीम ठेवतो, मी शाळेत शिकले होते तेव्हा सुरुवातीला सक्रीय भाग घेऊन झाल्यावर मग बाकी लोकांना, मुलांना शिकवणे, प्रेक्तीस घेणे हे काम माझ्याकडे असायचे. तर माझ्याकडची चार-पाच शिवाय बाकी लोकांचीही लेझीम माझ्याकडेच होती. त्यांना विचारून मी सगळी देईन म्हटलं. मग काही कारणाने तो इकडे आला होता तेव्हा लेझीम नेण्यासाठी घरी आला. हे "ए वे ए ठी" म्हणता येईल. म्हणजे एका वेळी एके ठिकाणी असलेले मायबोलीकर, मग ते दोन का असेनात. तेव्हा मी बटाटेवडे, चटणी आणि कढी-भात केला होता. याने नुसतेच बटाटेवडे खाल्ले. कढी भात तर जाऊदेत, वडा-पाव पण नाही. नुसतेच वडे! माझ्या हातचे बटाटेवडे खाल्लेला पहिला मायबोलीकर हा 'परागकण' आहे.

स्थानिक सोडल्यास मायबोलीकरणीला भेटायला मात्र मला फार लांब जावे लागले. म्हणजे अगदी 'चुकीचा किनारा'च गाठावा लागला.

२००५ ला कॅलिफोर्निया ट्रीप ठरली तेव्हा तिथे असलेल्या मायबोलीकरांना मी कळवले. माझ्या मैत्रिणी झालेल्या मैत्रेयी आणि डीजे तिकडे होत्या, पण त्या मला कधी भेटल्या नव्हत्या. सशल, मिनोती, निशी आणि रचनापण होत्या. सशलकडे जमायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही तिच्याकडे गेलो. बाकी कोणी अजून पोचले नव्हते त्यामुळे आधी सशल भेटली. सशल ही मला भेटलेली पहिली मायबोलीकरीण आहे!

आमचे बे एरिया हितगुज संमेलन पार पडले. ज्याचा वृत्तांत मी 'मायबोली महिला मेळावा(मा.म.मे.) नावाने लिहिला आहे. कारण यात मायबोलीकर प्रामुख्याने महिलाच होत्या. महागुरु आणि निराकार यांनी संगनमताने टांग मारली. तरी मि. सशल आणि प्रफुल्ल होते. दुसर्‍या गावी जाऊन जीटीजी करण्याची पहिलीच वेळ, त्यासाठी चुकीचा किनारा निवडला(एन्जेकरांनी नोंद घ्यावी) आणि तिथे 'महिला मेळावा' व्हावा हा योगायोगच म्हणायचा.

तेव्हा तिथे storvi आणि Rangy पण होत्या, त्यांना जीटीजीबद्दल कळले नाही म्हणून त्या वैतागल्या. याबद्दल नंतर त्या धाग्यावर "ज्याप्रमाणे अडवाणी, बाजपेयींना बाजूला सारुन नवीन लोक येत आहेत 'बीजेपी'मध्ये तसे हितगुजवर 'जुन्या जाणत्या' लोकांना न बोलावता 'नवीन' लोकांनी आपले स्वतंत्र अधिवेशन केलेले दिसते." असे (अर्थातच) झक्कींचे पोस्ट आहे.

पुढच्याच वर्षी भारतवारी ठरली. पुण्यात १-२ दिवस मुक्काम असणार होता म्हणून पुणेकरांना कळवले. तोवर पुणे-कोल्हापूर भांडणे होऊन तलवारी निघायच्या ते सगळे कमी झाले होते. मुख्य म्हणजे ते भांडणारे लोक पुण्यात रहात नव्हतेच. २००६ मध्ये कधीतरी हे पुण्याचे जीटीजी म्हणजे माझे भारतातले पहिले. बालगंधर्व रंगमंदीरच्या वटवृक्षाच्या छायेत जाऊन थांबायचे होते. तेव्हा तिथे "हाती धनुष्य ज्याच्या" अरुण आला होता. खरं म्हणजे 'फ' पोचणार होता तिथे आधी. तो नंतर आला. कोणीही स्वतःची नीट ओळख (आयडी) करुन देत नव्हते. तरी आलेल्यांपैकी अरुण, फ, श्रद्धा, पूनम, राहुल फाटक, मधुरा, सखीप्रिया, जीएस, दिमडू, Itsme, दीपस्तंभ एवढे लोक तरी मला आठवतात. आणि आयडीमध्ये दोन अन्डरस्कोअर असलेले कोणीतरी होते. तेव्हा अमेरिकेतून 'पमा' ही भारतात आली होती, ती पण होती. तिथे भजी वगैरे खाल्ल्यावर मी पेल्यातले पाणी नको म्हटलं, bottled water पाहिजे. तर राफा ने माझ्याकडे तु.क. टाकून "भजी चालते आणि पाणी का नाही?" असे काहीतरी म्हटल्याचे आठवते.

मग प्रत्येक भारतवारीत जीटीजी हे ठरुनच गेले. एकदा सई अणि दिनेश कोल्हापूरला भेटले. शिवाजी पार्क, मुंबईत दोन वेळा जीटीजी झाले. एकदा मंजूडी, गजानन, नंदिनी, नील्_वेद, मनी वगैरे ग्रूप होता आणि मग गेल्या वेळचा "विराट" मेळावा.
Happy

पुण्यात एका restaurant मध्ये 'होळी जीटीजी' झाले तेव्हा नलिनी, गिरिराज, कांदापोहे, यशवर्धन, मयुरेश, रीमा, बडबडी, सँडी('बाकरवडी भांडण' फेम) हे काही नवीन लोक भेटले. अलिकडचे पुण्यात झालेले जीटीजी म्हणजे गेल्या वर्षीचे 'बड्डे (आणि झिपलॉक) जीटीजी'. इकडे ४० वा हे फार मोठे प्रस्थ आहे. माझ्या गावातल्या मराठी बायांच्यात तरी! मला पार्टी करायची नव्हती, त्याऐवजी मी भारतवारी मागितली. तो बड्डे घरच्यांसोबत आणि मायबोलीकरांबरोबरही साजरा झाला त्यामुळे अजूनच छान वाटलं. त्याचा मधुकरनी लिहिलेला वृत्तांत इथे आहे. यावेळी मला साजिरा, हिरकु, मनीष, वैभव जोशी, मधुकर यांच्याबरोबरच अज्जुका(नीरजा) पहिल्यांदा भेटली. ती "भांडखोर" आहे असे ऐकले होते पण मला ती तशी वाटली नाही. माझे तिच्याशी कधीच भांडण झालेले नाही. दोन तेवढ्याच भांडखोर बाया एकमेकींना वचकून रहात असतील म्हणूनही असेल! Wink

लिंबूटिंबूच्या भेटीचा योग अजून आलेला नाही. फार पूर्वी मी ज्योतिष बीबीवर जायचे तेव्हा वाकड्याला पत्रिका दिली होती. त्याने अजून भविष्य सांगितलेले नाही. विचारले पाहिजे योग कधी आहे.

"न्यूजर्सी एवेएठी" हा प्रकार मी पहिल्यांदा रस्ता क्रमांक १ वरच्या एका भारतीय restaurant मध्ये जीटीजी होते तेव्हा अनुभवला. पण सध्याचे त्याचे स्वरुप जसे आहे तसा तो नव्हता. मी काही कारणाने न्यूजर्सीला जाणार होते म्हणून विनयला(परदेसाई) कळवले मग जीटीजी ठरले. तेव्हा अनायासे डीजे मैत्रेयीकडे आली होती. (त्याआधी मैत्रेयीच एन्जेत आली होती.) तेव्हा मला पहिल्यांदा झक्की, मंदार, अनिलभाई, परदेसाई, कलंदर७७ आणि निनावी(स्वाती_आंबोळे (बाई)) भेटले. त्यापूर्वी बाईंशी एकदा मायबोलीवरच संवाद झाला होता. त्या रेसिपीबद्दल की तत्सम काहीतरी विचारत होत्या, मी त्यांना म्हटले त्यापेक्षा कविता (दुसर्‍या एका साईटवर लिहिलेली) का नाही लिहीत? मग त्यांनी विचारले, "ही कॉम्प्लिमेन्ट आहे का?" मी म्हटले हो! तेव्हापासून आम्ही मैत्रिणी आहोत. खरं तर त्यांनी अर्धवट प्रश्न विचारला. 'ही कॉम्प्लिमेन्ट आहे की टोमणा?' असे विचारले असते तर 'दोन्ही' असे उत्तर आले असते, मग काय झाले असते माहीत नाही.

माझे पहिले "एन्जे ए वे ए ठी" म्हणजे ७ फेब्रुवारी २००९ चे. मैत्रेयीच्या हॉलमधले. तेव्हा मी ऐनवेळी जायचे ठरवून गेले आणि एक मस्त जीटीजी पदरात पडले. याच जीटीजीत अनिलभाईंनी डुप्लिकेट आयडीजना उद्देशून 'झलक दिखला जा..' म्हटले होते. या लेखाला तेच शीर्षक दिले आहे. या संमेलनांत सर्वांची झलकच दिसते. एन्जेवाले दर थोड्या दिवसांनी जीटीजी करतात. भाई अगदी नेमाने, एन्जे जीटीजीचे बोलणे निघाले की धागा काढतात (आणि सार्वजनिक करायला विसरतात), करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करतात. त्यामुळे मालिकेतला हा एपिसोड "एन्जे ए वे ए ठि" आणि भाईंना डेडिकेट करत आहे.

भारतातून किंवा अमेरिकेच्या इतर भागांतून कोणी या किनार्‍यावर आलं तरी जीटीजी आयोजित होतात. तसे मेधाकडे टण्यासाठी आणि बाईंकडे केदारसाठी झाले. मृण्मयीला मी फ्लोरिडात गेले तेव्हा प्रथम भेटले. एका लग्नानिमित्त अ‍ॅटलांटाला गेले तेव्हा तिथे कल्लोळाला आलेल्या अ‍ॅटलांटाकरांना पुन्हा भेटले. मला मेट्रो स्टेशनवरुन उचलून जेवायला घालून हॉटेलवर पोचवणे ही कामे त्यांनीच केली. डीसीला आलेले मायबोलीकर वेळ काढून भेटून गेले. बी सारखे काही कामानिमित्त इथे येऊन गेले त्याला भेटणे शक्य नव्हती तरी त्याने आवर्जून फोन केला. बी ने अलिकदेच विपुत लिहिले होते की सिंगापूरला आलीस तर अवश्य भेट. खरं तर हे सांगण्याची आवश्यकता नाही. जिथे जाईन तिथे कोणी आहे का ते पाहून शक्य असेल तर भेटेनच. नुकत्याच मैत्रेयी आणि डीजे कितव्यांदातरी भेटल्या. दुसर्‍या दिवशी मी वॉशिन्ग्टन पोस्टमधल्या एका आर्टिकलची लिंक पार्ल्यात दिली तर सायो म्हणाली, "मला वाटलं तुमचय जीटीजीचा वृत्तांत पोस्ट्मध्ये आलाय की काय!" कुणी सांगावं? कधीकाळी येईलसुद्धा. Happy आता अंजलीकडे पुढच्या कल्लोळाची तयारी चालूच आहे..

जे भेटतात ते तुमचे कायमचे मित्र होतील, संपर्कात रहातील असं काही नाही. पण ज्या त्या वेळी मायबोलीवरुन झालेल्या ओळखीवर एकमेकांना भेटावं वाटणं यातच सगळं आलं. मला भेटायला वेळ काढून या सगळ्या जीटीजींना जे मायबोलीकर आले त्या सर्वांची मी आभारी आहे.

हल्ली भारतात तर भटकंती जीटीजी होतात. 'यो रॉक्स' वगैरे लोक मायबोलीकर जमून गड सर करतात. (आम्ही काहीतरी शिकले पाहिजे, नुसते खातो-पितो आणि गॉसिप करतो.) पण तरी असं वाटतं की 'जिथे गॉसिप नाही, त्याले जीटीजी म्हणू नये!"

या सगळ्यांत काहीतरी राहून गेल्यासारखं वाटत नाही? मायबोलीचे दरवर्षी होणारे सगळ्यात मोठे जीटीजी 'वर्षाविहार'! तोच राहून गेलाय! एकदा तरी वर्षाविहाराला हजर असावं अशी माझी खूप इच्छा आहे. दरवर्षी नुसते टी शर्ट पोचतात आमच्यापर्यंत. पण हा एक मायबोलीचा उपक्रमच आहे आणि सगळे स्वयंसेवक, संयोजक मिळून तो दरवर्षी उत्साहाने यशस्वी करुन दाखवतात. त्याला उपस्थित रहाणे कधी जमते पाहू.

..आणि उपक्रम, स्वयंसेवक, संयोजनापर्यंत विषय आलाच आहे तर मायबोलीवरच्या उपक्रमातला माझा सहभाग, अनुभव इत्यादींबद्दल पुढच्या "लष्कराच्या भाकर्‍या" या लेखात सांगेन.

दशकपूर्ती -२

विषय: 
प्रकार: 

पग्या, अटलांटाकरता ३ ओळी आहेत की

>>एका लग्नानिमित्त अ‍ॅटलांटाला गेले तेव्हा तिथे कल्लोळाला आलेल्या अ‍ॅटलांटाकरांना पुन्हा भेटले. मला मेट्रो स्टेशनवरुन उचलून जेवायला घालून हॉटेलवर पोचवणे ही कामे त्यांनीच केली. >> ह्या बघ.

हा ही भाग मस्त. Happy

>> त्यापेक्षा कविता (दुसर्‍या एका साईटवर लिहिलेली) का नाही लिहीत? मग त्यांनी विचारले, "ही कॉम्प्लिमेन्ट आहे का?" मी म्हटले हो! तेव्हापासून आम्ही मैत्रिणी आहोत.

'तुझे अनंत रे वारे' विसरलीस का (टाळलंस)? हो, पूर्ण प्रश्न विचारलेला बरा! :P)

आणि बाराकरांचं पहिले ए.वे.ए.ठि. १९ फेब्रुवारी २००६ला झालं बरं का! Happy
हे मी अटेन्ड केलेलं पहिलं 'स्नेहसंमेलन' म्हणून माझ्या लक्षात आहे.

हे जीटीजी ब्रिजवॉटरच्या देवळात झालं होतं, आणि झक्कींनी 'बालाजी काय हो, एका वेळी सर्वत्र असतो' असं काहीतरी म्हटलं होतं. त्यावरून 'पण आपण एका वेळी एकाच ठिकाणी असू शकणारी माणसं कुठे भेटणार ते ठरवा" असा विषय झाला होता. म्हणून ए.वे.ए.ठि. Happy
(तिथे मी लिहिलेल्या वृत्तांतात
|| श्री ( स. वे. स. ठि. अ. श.) व्यंकटेश प्रसन्न||
(सर्व वेळी सर्व ठिकाणी असू शकणारा)
आणि
न्यू जर्सीस्थित हितगूजकरांचा ए. वे. ए. ठि. अ. श. मा. भे. प्र.
(एवेएठि असू शकणार्‍या मायबोलीकरांना भेटण्याचा प्रयत्न)
अशा ऐतिहासिक नोंदी आहेत. Proud

लालु,
____/\_____
काय मेमरी आहे?. तु डायरी वगैरे लिहीतेस की काय गो?
मागच्या ए.वे.ए.ठि. ला खुप मिस केल तुम्हाला. तुम्ही फचिनच्या तबल्याची झलक मिसलात.

पुन्हा एकदा धन्यवाद गो ...

२००६ च्या फोटोत जान्हवी (की सुनिता) आणि देवेन आहेत ते तेव्हा मायबोलीवर होते?>> हो. सुनिता मायबोलीकर आहे. ते चटणी मेनॉर मधे पण आले होते. Happy

भाई, हो का? अजून आहे का मायबोलीवर. मी तिला दुसर्‍या संदर्भात ओळखते आणि भेटलेय.

परत एकदा छान
आणि "आमच्या 'एठीवेठी' ला यायचं हं" मध्ये झक्की काकांचा फोटो म्हणजे तर फारच झकास Lol

ओह, उचलली जीभ लावली टाळ्याला... तसां म्हणायला वाव आहे खरंतर पण तसं काही नाही. मी आपलं तुला मदत करायलाच धावले पण म्हणतात ना 'ज्याकभतोम्हआख' Proud

खरच छान लिहिलयस लालू. आता मला पण आभासी लोकांना भेटण्याच्या फोबियावर मात करून एक तरी मिनी गटग अटेंड केलं पाहिजे असं वाटू लागलं आहे Happy

वा! वा! Happy

पण हे सगळं जुनं जुनं का खणून काढते आहेस? तुझ्या मायबोली आयुष्यातला नक्की कसला टप्पा हा?

मला एकदम तू आणि मायबोली, हातात हात, गळ्यात गळे घालून, "ये कहाँ आ गये हम युही साथ साथ चलते .." असं गाताना दिसलात! :p

(P.S. चला, माझं नाव तर आलं पण मी मैत्रीण किंवा मैत्रीण नाही ह्याबद्दल कटाक्षाने लिहीण्याचे टाळले आहे ते माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटलेले नाही! :p)

मस्त लिहिल्येत आत्तापर्यंतचे सागळेच भाग Happy काय मेमरी आहे का काँप्युटर? मी विचार करत होते इतक्या डिटेलवार मला अजून २ वर्षांनी तरी काही आठवेल का? Uhoh दहा वर्ष दुरची बात माझ्यासाठी. Sad

पुण्यात ये शूम्पे आणि मला भेट.. झालं गटग...... >> अगं हो की गं. म्हणजे मी पण गटग ला गेले होते २०१० च्या भारतवारीत असं म्हणायला हरकत नाही. माझं पहिलं गटग मी आणि नीधप !

हल्ली भारतात तर भटकंती जीटीजी होतात. 'यो रॉक्स' वगैरे लोक मायबोलीकर जमून गड सर करतात. (आम्ही काहीतरी शिकले पाहिजे, नुसते खातो-पितो आणि गॉसिप करतो.) >>>>>> Lol

चालो, नेक्स्ट जीटीजी एकत्र मॅरेथॉन करा किंवा इथे या सँटा मोनिका माउंटन्स ची भटकंती करत गॉसिप करत करत खाउ Proud

Pages