सुरीली सुरैय्या......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

"धडकते दिल की तमन्ना हो, मेरा प्यार हो तुम...
मुझे क़रार नही, जबसे बेकरार हो तुम..."

Suraiya1.jpg

विविधभारतीवर सकाळच्या "भुले बिसरे गीत" या कार्यक्रमात ऐकून ऐकून ओळखीचं आणि अत्यंत आवडीचं झालेलं हे गाणं.. एके दिवशी ठरवलं आणि या गाण्याचे तपशील आंतरजालावर शोधलेच.

सुरैय्या... ही गायिका त्या गाण्याची हे कळल्यावर मात्रं आश्चर्यचकित झाले, कारण हे नाव वडिल-काकांकडून लहानपणी बर्‍याचदा ऐकलेलं. काहीही म्हणा पुर्वीची गाणि आणि त्या गाणार्‍या गायिका यांचे आवाज (अगदी लताचा सुद्धा) अगदी एकसारखे वाटतात.. (अजूनसुद्धा) त्यामुळे लता कोणती, सुरैय्या कोणती आणि उमादेवी कोणती यातला फरक मला अजून सुद्धा कधी कधी कळत नाही..

पाकिस्तान लाहोर इथे जन्मलेल्या सुरैय्याने शास्त्रिय संगिताचे धडे घेतले नव्हते तरिही तिच्या कारकिर्दित तिने गायलेल्या अनेक गाण्यांनी खळबळ माजवली होती.
लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला..

गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. असं म्हणतात की हे गाणं रेकॉर्ड करताना सुरैय्याला माईकपर्यंत पोहोचता यावं यासाठी तिच्याकडून हे गाणं खुर्चित उभं करून गाऊन घेतलं गेलं.

१९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेती म्हणून काम केले... त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात. सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली..

dev-suraiya.jpg

देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, दोघं ही एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला... सुरैय्या तेव्हा प्रस्थापित नायिका होती तर देव आनंद न्यू कमर... पण दोघांचे धर्म निराळे असल्याने सुरैय्याच्या घरून या विवाहाला जबरदस्त विरोध झाला, सुरैय्याच्या आजीने हे नातं जवळ जवळ तोडलंच असं बोललं जातं. एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला... देव आनंदला माहीत होतं की ग्रेगरी पेक हा सुरैय्याचा आदर्श होता, त्याने त्याकाळी स्वत:ला त्याच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला, आणि खूप वाट पाहून अखेर तो कल्पना कार्तिक या अभिनेत्रीशी विवाहबद्ध झाला.. देव आनंद नंतर सुरैय्यावर जीवतोड प्रेम करणार्‍या व्यक्तित 'इफ्तिकार' हे नाव ही त्याकाळी वारंवार घेतलं जायचं असं मी घरातल्या मोठ्यांकडून ऐकलं आहे, खरंखोटं कोण जाणे.. Happy

१९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली.. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव तरूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं.. तिचे चित्रपट पाहता यावेत म्हणून दुकानदार पहिल्या खेळाची तिकिटं काढून आपापली दुकानं बंद ठेऊन चित्रपट पहायला जात असत, त्याचप्रमाणे तिची एक झलक दिसावी यासाठी तिचे चाहते तिच्या मरिन ड्राईव्हच्या घराबाहेर तोबा गर्दी करत असत.

५० च्या दशकातले तिचे बरेचसे चित्रपट आपटले.... पण १९५४ साली तिने मिर्झा गालिब या चित्रपटात केलेली भूमिका खूप गाजली त्याचबरोबर तिने गायलेली गाणि पण.. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिचं कौतुक करताना म्हटलं होतं की ' तुमने मिर्झा गालिब की रूह को जिंदा कर दिया...' दुर्दैवाने ६० व्या दशकात तिचं काम इतकं काही उल्लेखनिय ठरलं नाही. त्यातल्या त्यात तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली.. (लेखाच्या सुरवातीला लिहिलेलं गाणं, हे शमा चित्रपटातील आहे.) सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब...

अशा पद्धतीने एकूण साठएक चित्रपटात काम केल्यानंतर सुरैय्या या गायक अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला. त्यानंतर ती काही माफक चित्रपट पारितोषिक वितरण समारंभाशिवाय कधी कुठे दिसली नाही. तिला दागिन्यांची प्रचंड हौस होती. चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतल्या नंतर बर्‍याचदा ती तिच्याकडील दागिने घालून रात्री झोपत सुद्धा असे. खाण्यात तिला 'बिर्याणी' अत्यंत प्रिय होती..

जानेवारी २००४ मध्ये लांबलेल्या आजारपणामुळे सुरीली सुरैय्या हे जग सोडून गेली...
पण तिची गाणी आजसुद्धा अजरामर आहेत..

Suraiya2.JPG

सुरैय्याची मला आवडलेली गाणी
* धडकते दिल की तमन्ना हो मेरा प्यार हो तुम..... (शमा)
* जब तुम ही नहीं अपने, दुनिया ही बेगानी है ......(परवाना)
* ओ दूर जाने वाले वादा न भूल जाना.... (प्यार की जीत)
* तेरे नैनों ने चोरी किया, मोरा छोटा सा जिया, परदेसिया.... (प्यार की जीत)
---------------------------------------------------------------
तळटिप : मी वैयक्तिकरित्या सुरैय्याच्या कारकिर्दीत जन्मलेली सुद्धा नव्हते, त्यामुळे वरिल लेखातील सर्व माहीती ही वाचन व आंतरजालावरून साभार..
---------------------------------------------------------------

विषय: 

त्या हळुवार वयात हव्याहव्याश्या पण अनोळखी भावनांशी हितगुज साधलं ते ह्याच गाण्यांनी. उत्कट पण अव्यक्त प्रेमातली व्याकुळता , असहायता ह्या गाण्यांनी अचुक टिपली होती . तीही कुठलाही आक्रस्ताळेपणा, कर्कश्यपणा, स्वरांमधे उद्दामपणा न आणता. आणि म्हणुनच इतकी वर्ष झाली तरी त्यातला ताजेपणा टिकुन आहे.

शेवटी वय माणसाला असतं, कलेला किंवा कलावंताला नव्हे !>>>>>>>>>.

पर्‍या, तुला १०००० मोदक रे ! दक्षे, काय भन्नाट आठवणी जाग्या केल्यास यार. सीओईपीच्या बोटक्लबवर सुरैय्याच्या गाण्यावरुन मित्रांशी घातलेला वाद, कँपातल्या त्या दिलशाद का नाझनीन असं कायसं नाव असणार्‍या इराण्याच्या हॉटेलवर सुरेय्याची गाणी ऐकण्यासाठी दोन चहा आणि एक मस्कापाव यांच्या बदल्यात दोन-दोन तास तळ ठोकुन त्याच्या खाल्लेल्या शिव्या सगळं काही आठवलं.
सुरैय्या....., ज्याने सुरैय्याला ऐकलं नाही त्याला...’हाय कंबख्त तुने पि ही नही’ असे म्हणायचा मोह होतो. दिनेशदांप्रमाणेच मलाही तिची मिर्झा गालीब आणि रुस्तम सोहराब मधली गाणी जाम आवडतात.
दक्शे, मनःपूर्वक आभार गं या लेखाबद्दल. आवडत्या दहात गेला.

ज्याने सुरैय्याला ऐकलं नाही त्याला...’हाय कंबख्त तुने पि ही नही’ असे म्हणायचा मोह होतो. <<< जल्ला रोज ' रोज सुरैय्या' पेग भरायला हरकत नाही.

बाकी दक्षिणाच्या पिढीला पण तिची गाणी आवडतात, याचा खूप आनंद झाला>>> असे च नाही तर त्यानंअतरच्या माझ्या पिढीलाही आवडतात की! :ड

माझे आवडते म्हणजे रुस्तम सोहराब मधले ' ये कैसी अजब दास्तंअ हो गयी है'

सगळ्यांचे खूप खूप आभार.. Happy

>>असे च नाही तर त्यानंअतरच्या माझ्या पिढीलाही आवडतात की! :ड >>
गिरी कित्ती तो आटापिटा... Rofl

दक्षिणा,
तुमचा हा नेटका, मुद्देसूद आणि माहितीपूर्ण लेख...... आवडला.
सदर माहिती जरी आंतरजालावरून गोळा केली असलीत, तरी त्याचं संकलन करणं हे देखील महत्वाच असतं. आणि ते तुम्ही योग्य प्रकारे केलं आहेत, ज्यायोगे महत्वाचे तपशील सहज ध्यानात येतात.
माझा जन्म १९५२ सालातला. त्यामुळे समज येण्याच्या वयानंतर जे काही हिंदी सिनेमा पाहिले, त्यात क्वचितच देवानंद-सुरैया चा चित्रपट पाहिला असावा. (matinee show) त्यांच्या पूर्वीच्या प्रेमप्रकरणाबाबत मात्र त्याही काळात काही ना काही ऐकल्याचं आठवतय. “देव आनंदला माहीत होतं की ग्रेगरी पेक हा सुरैय्याचा आदर्श होता, त्याने त्याकाळी स्वत:ला त्याच्या प्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केला” ही माहिती मात्र आज कळली.

त्या हळुवार वयात हव्याहव्याश्या पण अनोळखी भावनांशी हितगुज साधलं ते ह्याच गाण्यांनी. उत्कट पण अव्यक्त प्रेमातली व्याकुळता , असहायता ह्या गाण्यांनी अचुक टिपली होती . तीही कुठलाही आक्रस्ताळेपणा, कर्कश्यपणा, स्वरांमधे उद्दामपणा न आणता. आणि म्हणुनच इतकी वर्ष झाली तरी त्यातला ताजेपणा टिकुन आहे.`<<<<<<<<<<<<<<<
ह्या मताशी पुर्ण सहमत. धन्यवाद!

दक्षे.. मस्तच ग.. सुरैयाची गाणी ऐकली होती पण तिच्याबद्दलची तुझ्या लेखातली बरीचशी माहिती प्रथमच वाचल्ये.. लेख आवडला.. Happy
आगाऊ.. Biggrin
परेश.. पहिली पोस्ट मस्तय.. Happy नि नंतर्ची पोस्ट.. Lol

>.सुखद आश्चर्याचा धक्का बसला हा तूझा लेख वाचून>> अगदी अगदी !!
दक्षे छानच लिहलयास लेख.. खालचा फोटो विशेष आवडीचा आहे. Happy

दक्षे, आता लिखाणाच मनावर घे. >> कौतुक, तिने प्रवास सुरु केलाय नां. आधी कविता, मग सांजवेळेचा फोटो, आता "धडकते दिलकी तमन्ना" वाली सुरय्या! यापुढे कथाच असेल, नाही दक्षे?? Happy

दक्स, मस्त लिहीलं आहेस. आवडला लेख.

(ते मध्ये.... चुकून दशक चं शतक झालं आहे, दोन ठिकाणी! ते दुरुस्त करणे.)

दक्षिणा, सुरैयाबद्दल वाचून मस्त वाटलं. धन्यवाद लेख लिहिल्याबद्दल Happy

मी जे काय थोडंसं गाणं ऐकलंय त्यावरून माझा माझ्यापुरता काढ्लेला निष्कर्श म्हणजे 'सुरैया इतका मधाळ, लाघवी आणि योग्य असा 'है' चा उच्चार फक्त सुरैयाच करू शकते' Happy

सुरैय्याचा विषय आहे तर मग 'दिल्लगी' चा उल्लेख झाल्याशिवाय तो पूर्णच होणार नाही. नौशादसाहेबांच्या चाली लाभलेली सगळीच गाणी - महान ! त्यातली सुरैयाची "निराला मोहोब्बत का दस्तुर देखा, वफा करनेवालोंको मजबुर देखा" (ह्यातला तो 'हाय' इतका अलिप्त आहे ना... कदाचित विरहात तो 'हाय' पण मजबुर झाला असावा!), तेरा खयाल दिलसे भुलाया न जायेगा, उल्फतकी जिंदगीको मिटाया न जायेगा' आणि श्याम बरोबरची 'तू मेरा चांद मै तेरी चांदनी' आणि 'जालिम जमाना मुझको तुमसे छुडा रहा है' .. ही सगळीच गाणी जबरदस्त आहेत.

असाच अजून एक खास सुरैया ट्च असलेलं गाणं म्हणजे 'मेरा दिलदार ना मिलाया...' हे शमा परवाना मधलं गाणं.
'तेरे कुदरत, तेरी तदबीर मुझे क्या मालूम' म्हणताना ती जो आर्त स्वर लावते ना गाण्याच्या सुरुवातीलाच.. काटा येतो दरवेळी ऐकताना !
हुस्नलाल भगतराम नी ह्या गाण्यात नुसता 'डफ' वाजवण्याचा tempo वाढवून आर्तता निर्माण केली आहे संगीतात... महान लोक होती !

माझी अजून काही अतिशय आवडती गाणी म्हणजे ...
तुम मुझको भूल जाओ, अब हम न मिल सकेंगे' (बडी बहन )
सोचा था क्या, क्या हो गया (अनमोल घडी)
दूर पपिहा बोला, रात आधी रह गयी, (गजरे)
रहिये अब ऐसी जगह (मिर्झा गालीब)
ये मौसम और ये तनहाई (दास्तान)
नाम तेरा है जबापर, याद तेरी दिलमे है ( दास्तान)

अनेक गाणी आहेत.. आपल्याला ऐकायला मिळतात हे आपलं भाग्य Happy

'सुरैया इतका मधाळ, लाघवी आणि योग्य असा 'है' चा उच्चार फक्त सुरैयाच करू शकते' >>>> सही निरीक्षण! याचेच एक उदाहरण म्हणजे माझं आवडतं गाणं
'आपसे प्यार हुआ जाता है'..

Pages