तुम्ही कधी विमानातून छत्री घेऊन उतरला आहात का? म्हणजे मला नेहेमी असं वाटतं की ही छत्रसाल मंडळी नेमकी मोकळ्या पटांगणातच कशी उतरतात? वाऱ्याचा वेग, स्वतःची उंची आणि त्याप्रमाणे नेमके दोर ताणून/सैल सोडून नदी, कडे-कपारी, झाडे वगळून नेमकं हवं तिथे उतरता येणं हे खरोखर कसब आहे. हा जरी अनुभव मला नसला तरी त्याच्या जवळ जाणारा प्रसंग म्हणजे एखाद्या अशा गावात उतरायची वेळ येणे, जिथे तुमचे किमान ३-४ नातेवाईक किंवा जवळचे मित्र रहात आहेत. साधारण हेच कौशल्य अशा ठिकाणी पणाला लावावं लागतं.
अशात तुमच्यावर परगावच्या येणाऱ्या पाहुण्याला घरापर्यंत मार्गदर्शन करायचा प्रसंग ओढवलाय का? माझ्यावर ही वेळ नेहेमी येते (बाहेरून येऊन पुण्यात स्थायिक झाल्यामुळे येणारे-जाणारे ‘पावणे’ भरपूर असतात. एके दिवशी अचानक फोन येतो.
“हॅलो, मी आलोय पुण्यात. आहात का घरी?”
“अरे वा.. अलभ्य लाभ. कुठे उतरलात? स्वारगेटला ना?”
“नाही, पिंपरीत उतरलोय मी”
“तिकडे कुठे?”
“कालच आलोय, भाच्याकडे उतरलोय. काम झालंय. म्हंटलं जाता-जाता भेटून जावं”
“बरं, बरं. या की मग. मी घरीच आहे”, बायकोला विश्वासात न घेता परस्पर या म्हंटल्याचं एक कलम तर नक्कीच लागलं, आता सांभाळून बोलायचं.