बबन्याचं पडसं अन येताळाची यात्रा
सातारा जिल्हा तसा लैच सुबक, एकदम देखना. ह्या जिल्ह्याच्या दक्षिणेकडं मात्र येगळंच नखरं चालत्याती, लोणंद फलटन मार्गे जावा नाहीतर खालून तासगाव सांगली कडून येवा, अलीकडं फलटन अन वायल्या अंगाव विटा हितच काय ती रया. फुडं सुरू होतो औंधाच्या आई यमाईचा इलाखा, गोंदवलेकर महाराजांच्या रामनामाचा इलाखा. माण, खटाव, दहिवडी, औंध, म्हसवड, असली कितीतरी नामी अन त्याहून मोप कितीतर बिट्टी बिट्टी गावं अन वाड्या इकडं पसरल्याती, त्यातल्या त्यात दहिवडी म्हसवड वगैरे जरा बरी, म्हंजी लग्नात नवरी शेजारी बसल्याल्या करवलीला उगा बोटभर हळद लागतीच तसली. तालुक्याच्या कचेऱ्या अन खुळखुळ आवाज करनाऱ्या रसवंत्यांचा उगा मधाळ वास.