काही चित्रपटात किंवा नाटकात एखाद्या सामान्य माणसाला एक दिवसासाठी राजा किंवा मुख्यमंत्री करतात. हे गोष्टीत ठीक आहे. प्रत्यक्षात असं कधी होणार नाही. तरी पण कल्पना करायची झाली तर एक जानेवारीला आपण मुख्यमंत्री व्हायचं, असं मी कधीचंच ठरवलं आहे. एक जानेवारीच का? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक जानेवारीला हापूस आंब्याची पहिली पेटी कोकणातून भेट म्हणून येते, (असं ऐकलं आहे) म्हणून!! खरं खोटं वर्षा बंगल्याच्या रहिवाशांना ठाऊक. अश्या ह्या भाग्यवान माननीयांना वगळलं, तर बाकी जनतेचे आंब्याचे दिवस एप्रिल-मे महिन्यात सुरू होतात. वर्तमानपत्रात ‘फळांच्या राजाचे पुण्यात आगमन’ वगैरे बातम्या झळकतात.
मध्यंतरी काही कारणामुळे दोन आठवडे शेतावर जाता आलं नाही. आपापले काम-धंदे सोडून शेती करायला लागलो, त्याला आता पाच वर्ष झाली. पाच वर्षात शेताचा इतका लळा लागला आहे, की बाहेरगावी गेल्यामुळे किंवा काही वैयक्तिक अडचणींमुळे जर काही दिवसांची गॅप झाली, तर माझ्या डोळ्यासमोर शेताचा रस्ता, तिथली झाडं येऊ लागतात! त्यामुळे शाळेत असताना ट्रीपला जायच्या दिवशी ज्या उत्साहाने उठायचो, तशाच उत्साहाने उठून, आवरून डबा, पाणी, शेताचे कपडे अशा ठरलेल्या गोष्टी घेऊन निघालो. दर वेळी जाताना साधारणपणे त्याच वेळी, त्याच रस्त्याने, त्याच गाडीत बसून आणि आम्हीच दोघं जातो. परिणामी आमचं सगळं सेम टू सेम असतं.
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.