विषय क्रमांक-१ : काळरात्रीनंतरचा उषःकाल
भारतमातेला जखडून ठेवणाऱ्या पारतंत्र्याच्या बेड्यांनी अस्वस्थ झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याग, बलीदानानंतर मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचे अप्रूप सगळ्या भारतीयांना होते. समाजात, राजकारणात मुल्यांची, तत्वांची चाड असलेली माणसं अजून कार्यरत होती.
आपल्या अनेकांच्या मनात इतिहास म्हटले की पंधरा ऑगस्टला वर जाणारा भारताचा तिरंगा आणि खाली उतरणारा युनिअन जॅक (वजा फाळणी) हाच शेवट डोळ्यासमोर येतो. याला कारण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास इथेच संपतो. इथून पुढे सुरु होते ते नागरिकशास्त्र आणि ते जणू काही इतिहासाशी काहीच संबंध नसल्यासारखे शिकवले जाते. इंडिया आफ्टर गांधी ह्या ७५० पानी (अधिक १००-१५० पाने संदर्भसूची आणि तळटीपा) ग्रंथात रामचंद्र गुहांनी नेमक्या ह्याच काळाच्या (१५ ऑगस्टपासून पुढच्या) इतिहासाचा परामर्ष घेतला आहे.