एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने!

Submitted by विजनवासि on 25 June, 2026 - 02:42

लोहगडाच्या कड्यावरून कोसळलेला केतन .. गेले काही दिवस सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. पोलीस तपास , नाते संबंध , कटकारस्थान , मोबाईल मधले पुरावे, सीसीटीव्ही फूटेज, दोन आरोपींनी मुख्य आरोप एकमेंका वर ढकलायचा केलेला प्रयत्न - या सगळ्यामुळे ,हे प्रकरण एखाद्या गुन्हेगारी कथा कादंबरी पेक्षाही चमत्कारिक वाटायला लागलेले आहे . कायद्याच्या अभ्यासकांना हा प्रकार नवा नाही. "- “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn’t.”! हे किती तरी वेगवेगळ्या केसेस मध्ये या पूर्वी हि दिसलेले आहे .. या नंतरही दिसत राहील..
प्रत्येक गाजलेल्या प्रकरणामागे फक्त पिडीत, न्यायालये, तपास् काम , आरोपी ... एवढीच पात्रे नसतात . त्यामागे एक समाजही उभा असतो. त्या समाजाच्या अपेक्षा, परंपरा, कुटुंबव्यवस्था, विवाहसंस्था, तरुणांच्या स्वातंत्र्याविषयीच्या कल्पना आणि आधुनिकतेशी चाललेला संघर्ष हे सारे घटक त्या कथेत कुठे ना कुठे गुंतलेले असतात.सिया आणि केतन यांच्या प्रकरणाकडे पाहताना म्हणूनच केवळ "कोणी खून केला?" हा प्रश्न पुरेसा ठरत नाही. त्यापलीकडे जाऊन "अशा परिस्थिती निर्माणच का होतात?", "आजच्या तरुण पिढीसमोर नेमकी कोणती द्वंद्वे उभी आहेत?", "प्रेम, विवाह आणि कुटुंब यांच्या पारंपरिक संकल्पना बदलत्या समाजात कशा धडकत आहेत?" आणि "वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक अपेक्षा यांच्या संघर्षाची किंमत कोण मोजत आहे?" असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहतात. मी त्या प्रश्नांची निश्चित उत्तरे देण्याचा प्रयत्न नाही करत आहे पण प्रश्न नीट मांडायचा मात्र करते आहे. एका गाजलेल्या खुनाच्या निमित्ताने (त्याच्या कायद्याशी संबधित कोणत्याही बाबीला,तूर्तास बिलकुल बाजूस ठेवून) आपल्या समाजाच्या आरशात डोकावण्याचा प्रयत्न आहे.
भावनिक प्रौढत्व आणि सामाजिक बाल्यतुम्न्ही जर वीस वर्षाचे असाल आणि साधारण सुस्थित मध्यमवर्गी कुटुंबात असाल तर हि विसंगती तुमच्या साथीला असते. .. तुम्ही मानसिक दृष्ट्या प्रौढ असता . तुम्हाला तुमचा रोमांटिक पार्टनर निवडता येतो, तुमचा मोबाईल तुम्हाला संपर्क आणि संवाद करायचे स्वतंत्र देतो, तुमचे छान एक डीजीट्ल आयुष्य असते , तुम्हाला तुमच्या आशा आकांक्षा असतात , त्या पाठी जाण्याची माध्यमे खुली असतात .. ती तुम्हाला मुक्तपणे वापरायला मिळत असतात. मानसिक दृष्ट्या तुम्ही मस्त स्वतचे स्वत: एक परिपूर्ण निर्णयक्षम व्यक्ती असता ... पण एकदा का ..तुमचा मानसिक परीघ संपला आणि तुम्ही सामाजिक वर्तुळात आलात कि ते तुमचे प्रौढत्व बासनात गुंडाळा!!... तू पैशाने कुटुंबावर अवलंबून .. सामाजिक प्रतिष्ठे साठी कुटुंबावर अवलंबून... तू कोणत्याही परिस्थितीत आपल्या आईवडील भाऊ बहिणीच्या हिताला बाधा आणणारा निर्णय घेऊच शकत नाहीस या दबावावर अवलंबून .... यातून एक प्रकारची अंतर्गत विसंगती निर्माण होते—व्यक्ती मानसिकदृष्ट्या प्रौढ असते, पण सामाजिकदृष्ट्या अजूनही तिला अल्पवयीनासारखीच वागणूक मिळते किंवा वागावे लागते. ही दरी जेव्हा विवाहसंस्था, कुटुंबाच्या अपेक्षा आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दबावाशी जोडली जाते, तेव्हा ती अधिक तीव्र आणि कधी कधी असह्य स्वरूप धारण करते.आधुनिक तरुणाई मला ह्या एका अदृश्य पण तीव्र मानसिक तणावाच्या चौकटीत अडकलेली दिसते.यातून मग उद्रेकाचे असे वेगळाले मार्ग तयार होत जात असतील का?.......
“दुहेरी जीवन” (double life) संकल्पना हा आणखी एक आयाम . आजच्या आधुनिक भारतात अनेक तरुण-तरुणी दोन वेगवेगळ्या ओळखी एकाच वेळी जगताना दिसतात.As Arundhati Roy famously suggests, India does not live in a single historical time-frame; it lives in several centuries simultaneously. एकीकडे परंपरा मानणारी “आज्ञाधारक मुलगा किंवा मुलगी” ही ओळख असते—जी कुटुंबाच्या अपेक्षा, संस्कार आणि सामाजिक जबाबदाऱ्यांशी जोडलेली असते. तर दुसरीकडे - अतिशय आधुनिक “स्वतंत्र प्रेमसंबंध असलेली व्यक्ती” ही ओळख असते—जी वैयक्तिक निवड, भावनिक नातेसंबंध आणि खाजगी स्वातंत्र्याशी निगडित असते.ह्या दोन्ही ओळखी बराच काळ एकत्र चालू शकतात. अगदी कधीकधी या वागवण्यात एक मजा - एक साहस पण वाटत असते. परंतु विवाहाचा प्रश्न जेव्हा प्रत्यक्षात उभा राहतो, तेव्हा या दोन्ही जगांमध्ये निवड करणे अपरिहार्य बनते. आणि इथेच खरी तणावपूर्ण अवस्था निर्माण होते. जी गोष्ट आधी लपलेली असते, ती उघड होण्याचा धोका वाढतो; आणि जे “कल्पनेतले स्वातंत्र्य” होते, ते अचानक वास्तवाच्या दबावाखाली येते.या टप्प्यावर अनेकदा एक मानसिक संघर्ष निर्माण होतो—आता एकाच वेळी दोन्ही भूमिका सांभाळणे शक्य राहत नाही. त्यातली " मजा" संपून "सजा" दिसायला आणि डाचायला लागते. त्यामुळे काही व्यक्तींसाठी ही अवस्था केवळ सामाजिक नाही तर खोलवर existential संकट बनते. अश्याच मानसिक ओढाताणीतून सुटायला हा टोकाचा मार्ग निवडला असेल का ?.....आजची तरुण पिढी स्मार्टफोनच्या जगात जगते, डेटिंग रिलेशनशिप्स स्वीकारते, खाजगी संवादाच्या नव्या पद्धती वापरते आणि जागतिक मूल्यव्यवस्थेशी जोडलेली असते. त्यांना वैयक्तिक निवडीचे, अभिव्यक्तीचे आणि स्वातंत्र्याचे अधिक भान आलेले दिसते.
परंतु दुसरीकडे अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक चौकटीतच कार्यरत आहेत—कुटुंबीय निर्णयपद्धती, प्रतिष्ठेचा विचार, आणि विवाहासंबंधी ठरावीक अपेक्षा या गोष्टी अजूनही समाजाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे या दोन जगांमध्ये सतत एक तणाव निर्माण होत राहतो. हे असिमेट्रिक मॉडर्नायझेशन” (asymmetrical modernization) आहे का ? भारताने सांस्कृतिक पातळीवर वेगाने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे, पण संस्थात्मक आणि सामाजिक संरचना मात्र त्याच वेगाने बदललेल्या नाहीत. परिणामी एक प्रकारची विसंगती निर्माण झाली आहे. त्या विसंगतीतून निर्माण झालेला हा सामाजिक विकार आहे का?आता हा तणाव काही सिया केतन यांनाच नाहीये - सगळ्यांनाच आहे .. सगळेच असा मार्ग निवडत नाहीत ! हा तणाव बहुतेक वेळा तरुण-तरुणी यशस्वीपणे हाताळतात आणि आपल्या आयुष्याचा समतोल साधतात. परंतु काही अपवादात्मक प्रसंगी हा ताण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि व्यक्तीगत पातळीवर अत्यंत चुकीच्या, टोकाच्या प्रतिक्रिया निर्माण करू शकतो .. इथे एक महत्त्वाचा समाजशास्त्रीय प्रश्न उभा राहतो. फक्त “सिया किंवा केतन प्रकरणात नेमके काय घडले?” असा विचारून तो थांबत नाही. तो त्यापेक्षा अधिक खोल प्रश्न विचारतो—“ज्या लाखो तरुण-तरुणी अशाच सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक दबावातून जातात, त्यापैकी बहुतांश लोक गुन्हेगारीकडे वळत नाहीत!” अजून तरी ...पण म्हणून तो दबाव कमी लक्षणीय मानावा का ?
कोणताही कायदेशीर निष्कर्ष काढण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला नाही. हा केवळ एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे— हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या समाजात, एकाच वेळी अतिशय घट्ट कौटुंबिक आणि समुदायाधारित रचनांमध्ये वाढणाऱ्या- पण आजूबाजूला मोकळाढाकळा, ग्लोबल सिटीझन पाहणाऱ्या - तरुण पिढीसाठी काही दीर्घकालीन चिंताजनक प्रवृत्ती निर्माण होत आहेत का....पारंपरिक कौटुंबिक अधिकार आणि आधुनिक वैयक्तिक स्वायत्तता यांच्यातील संघर्ष—हा असा तणाव आहे- तो घट्ट विणलेल्या व्यापारी आणि समुदायाधारित सामाजिक नेटवर्क्समध्ये घुस्मटून आतापर्यंत टाकला गेलाय - पण इथून पुढे तसेच होऊ शकणार आहे का ?? कि ह्या कड्यावरून एकटा केतनच कोसळणार नाहीये ......!??? .

Group content visibility: 
Use group defaults

१.एक येडचाप प्लान.
२.जेन झीचं डबरं उघडं पाडलं.
३. कोक्रोच पार्टिचा पण लोक विचार करतील.

कोणताही कायदेशीर निष्कर्ष काढण्याचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न इथे मी केलेला नाही. हा केवळ एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे>> हो. तुमच्या लेखातून कारणमिमांसा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जाणवतो.
भावनिक प्रौढत्व आणि सामाजिक बाल्य, दुहेरी जिवन या शीर्षकात नोंदवलेली निरीक्षणे सुद्धा पटली. यातुन आताची तरुणच नव्हे तर त्याही आधीच्या दोन तीन पिढ्या तरी जात असाव्यात.
या विवक्षित केस मध्ये यातील कितपत लागु होते एवढे अजुन या केस बद्दल वाचले नाही. पण एकंदरीत अशा अवस्थेतून, स्थित्यंतरातून आपण जात आहोत खरे. हे कसे हाताळावे, प्रश्न जाणुन नेमके जाणुन घेऊन त्यावर काय करता येईल यावर विचारमंथन व्हायला हवे.
मला स्वतःला यात भर टाकता येईल असे काही तूर्तास काही सुचत नाहीय.
या दृष्टीने इथे काय प्रतिसाद येतील, चर्चा होईल यासाठी धागा फॉलो करेन.

मांडणी चांगली वाटली.

<भारताने सांस्कृतिक पातळीवर वेगाने आधुनिकतेकडे झेप घेतली आहे, पण संस्थात्मक आणि सामाजिक संरचना मात्र त्याच वेगाने बदललेल्या नाहीत > हे नक्की असं आहे का?

वजनदार लेख लिहिण्याइतकी योग्यता नाही त्या सिया व चेतनची. 'प्रश्न फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित नाही म्हणून एकूण चिकित्सा केली' असे म्हणणे असले तरी मुळात इतका विचार करण्यासाठीचा वेळ, मानसिकता, कल, कोणाकडेच / कोणाचाच नाही. थिल्लर पोरापोरींना असे काही केल्यावर जाहीर तुडवून काढून फासावर चढवले की अश्या घटनाही कमी होतील आणि विचारवंतांनाही बरे वाटेल.

ही ह्यांची प्रेमं! जी निरपराधाचा खून करतात.

एकेकाळी एक दुजे के लिये म्हणत कड्यावरून दोघं उड्या मारून आयुष्य संपवायची... आता ते एक-दुजे तिसऱ्याला संपवतात.
किती भयंकर आहे हे!!!!
पालकांना मान्य नसेल प्रेम तर पळून जाण्याचा मार्ग होताच की...

पार्टनरचा खून करणे हे समाजात नवीन नाही. दरवर्षी हजारो लाखो हुंडाबळी, सासुरवास, अॅसिड अटॅक, रेप केसेस होतात. तेव्हा कुठलाही समाज का बरं कडेलोटाच्या सीमेवर नसतो? कारण तो खून महिलेचा होतो. त्यावर समाजाची रिॲक्षन- चलता है, बडेबडे देशो मे ऐसी छोटीछोटी बाते होते रहती है..
एका मुलीने खून केला तर समाजाचा कडेलोट होतो पण हजारो पुरूष दरवर्षी, वर्षानुवर्षे पत्नीचे/प्रेयसीचे खून करत आहेत. ते समाजाने नाॅर्मलाइझ केले आहे. ही विषमता का? पुरूषाचा जीव गेला तर सगळा समाज ढवळला जातो आणि महिला मारल्या जातात तेव्हा "आमचे रितीरिवाज, आमच्या परंपरा, कुटुंबाची प्रतिष्ठा, जातपातीची प्रतिष्ठा, मुली वाया गेल्यात, मुलींच्या आया नीट वाढवत नाहीत" वगैरे कारणे पुढे करून घाईघाईने तो विषया गालिच्याखाली दडवणारा आपला समाज!

पुरूषाचा खून होणे वाईट आहेच पण इतका आउटरेज महिलांच्या खूनाला आपण का करत नाही हा प्रश्न स्वतःला विचारा.

>>> विचारवंतांनाही बरे वाटेल.>>> विचारवंत!!?? Lol

नक्की माहीत नाही, पण कदाचित जर तुमचा असा ग्रह झाला असेल की मी मलाच विचारवंत वगैरे म्हणत आहे तर ते तसे नाही. मी म्हणत आहे की समाजातील विचारवंत अश्या घटनांवर खूप काही लिहितात पण त्याचा उपयोग न झाल्याने शांत बसतात. वेळच्यावेळी कडक शिक्षा होऊ शकल्या तर त्या विचारवंतांनाही बरे वाटेल, असे माझे म्हणणे आहे.

मला ही बातमी वाचून बरेच प्रश्न पडले होते. आमच्या घरी चर्चा सुद्धा झाली.

लग्नाला नकार देऊन पळून न जाता खून करायचा एवढा मोठा निर्णय का घेतला?

कारण आजच्या मोबाईल आणि सीसीटीव्हीच्या काळात खून पचवणे इतके सोपे नाहीये. पकडले गेल्यावर आपल्या दोघांचे आयुष्य सुद्धा उध्वस्त होईल याची त्यांना कल्पना असणारच.
तसेच आपल्या स्वार्थासाठी का असेना एखाद्या निरापराध व्यक्तीला मारायला मन सहजपणे धजावत नाही.

मुलीला असे काय प्रेशर होते जे तिने लग्नाला नकार न देता किंवा पळून न जाता त्या मुलाला संपवायचा निर्णय घेतला?

कदाचित तिचा होणारा नवरा लग्न मोडायला तयार नसेल?
किंबहुना तोच तिला लग्न करायला प्रेशर टाकत असेल?
कदाचित दोन्ही फॅमिली आधीपासून ओळखीचे असल्याने त्यांचे प्रेशर असेल?
काही बिजनेस डील असेल? ज्या मुलीच्या मनाविरुद्ध लग्न होत असेल? आणि तिचा वाली कोणीच नसेल..
कदाचित त्या नवऱ्या मुलाकडे तिचे काही सीक्रेट असेल, कदाचित एखादा व्हिडिओ आणि तो ब्लॅकमेल करत असेल?

मी अशा शक्यता काढत होतो म्हणून बायको वैतागत होती की गेलेल्या व्यक्तीला सहानुभूती द्यायचे सोडून त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून खून करणाऱ्याला का सहानुभूती देत आहेस..

जे झाले ते दुर्दैवी झाले याबाबत मला सहानुभूती आहेच. आणि ती एकूण तिन्ही कुटुंबात बद्दल आहे.

पण जिथे नेमके काय घडले हे आपल्याला माहित नसते तिथे एखाद्या ठराविक व्यक्तीला हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे सुद्धा योग्य वाटत नाही.

एखादी व्यक्ती अविचाराने वेड्यासारखी वागू शकते. पण दोन जण मिळून असा निर्णय घेतात तेव्हा अजून प्रश्न पडतात.

ऋन्मेऽऽष सर
अत्यंत सुयोग्य प्रतिसाद!

ऋन्मेष,

व्यावसायिक कारणे होती असे आणखी एका ठिकाणी वाचले, पण तिथेही ते फक्त अंदाज म्हणून व्यक्त केलेले मत आहे / होते.

पळून जाण्याचा मार्ग.... म्हणजे सैराट होण्याची निश्चिंती!

इथे त्या बिचाऱ्या मुलाचा बळी गेला याबद्दल वाईट वाटले. त्या मुलाच्या जागी तिचे पालक असते तर? चांगली जरब बसली असती का पालकांवर? खानदानाची प्रतिष्ठा वगैरे तद्दन जुनाट प्रकार याच्या मागे आहेत. सद्न्यान मुलाना आपल्या पायावर उभे राहून आपला जोडीदार निवडता येऊ नये... आणि त्यासाठी या थराला जावे लागावे! यापुढे असे पाऊल उचलायचे असेल तर पालकांचा विचार व्हावा.

बाकी यात नवीन काही आहे का? मला तरी लहानपणापासून अशा प्रेमात खून बातम्या वाचलेल्या आठवतात. ही आपली परंपरा न्हवे का?

बाकी यात नवीन काही आहे का? मला तरी लहानपणापासून अशा प्रेमात खून बातम्या वाचलेल्या आठवतात. >> बिंगो! नवीन एवढंच की मुलीने मुलाला मारलं. बाकी मुलांनी मुलींनी मारणे ही तर परंपराच आहे आपल्याकडे.

मुली मेल्या की म्हणायचं - " मला या मुलींचीच चीड येते, त्या आवाज का उठवत नाहीत, त्यांचे पालक का समाजाला घाबरतात?" आठवा नुकतीच घडलेली त्विषा सिंग केस.
पुरूषाला मारलं तर म्हणायचं- " मुली स्वैर झाल्या आहेत, आईवडील नीट शिकवत नाही, समाजाची अधोगती होतेय, संस्कृती बुडतेय". आठवा सिया-चेतन केस.
दोन्हीबाजून चूक कुणाची? मुलींचीच हो. फार विचारवंत असलात तर मुलीच्या आईला पण जबाबदार धरायचं. बाकी कोणाची काय चुक? बाकी सगळ्यांच्या चुका तर नैसर्गिक, स्वाभाविक, समाजमान्यच आहेत.

प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला, मुलांना मारल्याच्या घटनाही बातम्यांमध्ये येतात>> किती होतात वर्षाला?
दरवर्शाला नवर्याने, प्रियकराने, एखाद्या विकृत पुरूषाने उगाच मारलेल्या बायका किती?
आता या दोन्हीची टक्केवारी बघता मुलींनी केलेले नगण्य खूनच चर्चेला घेऊन ठराविक महिलाविरोधी निष्कर्षावर पोचणे ही पण आपली परंपराच.

प्रेमात खुन होतात ते एकतर्फी प्रेम मान्य नसते म्हणुन.

इथे मुलगी साखरपुडा किंवा लग्न करुन घेते, त्यात मिरवुन घेते, हसतमुखाने फोटो काढुन ते सोमिवर मिरवते आणि नंतर नवर्‍याचा प्रियकराच्या मदतीने खुन करते. समजा होणारा/झालेला नवरा प्रेमाच्या आड येतोय म्हणुन खुन तर तसेही नाही. प्रियकर लग्न व्हायच्या आधीच मिळालाय आणि प्रेमाच्या आड तिचे आईबाबा आलेत. नवरा तर नंतर आलाय. त्याला मारुन सुटका मिळवायची तर बंधनात अडकवुन घेण्याआधी पळुन जावे की. त्या थर्ड पार्टी माणसाला का मारले.

मला असे वाटते की अशी हत्या केल्यावर फोकस बदलतो. आईबाबा जे आजवर लग्नासाठी दबाव घालत होते ते पोलिस, कोर्ट वगैरेत अडकलेल्या मुलीला सोडवायचे प्रयत्न करणार. शिक्षा झाली तरी फारतर दोन चार वर्षांची होईल. ती भोगुन बाहेर आले की मनपसंत आयुष्य जगायला मोकळे. प्रियकराशी लग्नाला कोणीही आडकाठी करणार नाही. हा विचार सोनम व सिया ह्या दोघींनी केला असावा आणि शांतपणे नवर्‍यांना संपवले असावे.

स्टेडी प्रियकराच्या हातुन टेम्पररी प्रियकर मारला गेल्यावर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यात मदत करणारी मारिया सुसैराज ज्या दिवशी केसचा निकाल लागला त्या दिवशी जेलमधुन सुटली. ती तिन वर्षे जेलमध्ये होती आणि तिला बरोब्बर वर्षांचीच शिक्षा झाली. तिचा प्रियकरही एव्हाना सुटला असणार आणि दोघे एकत्र मजेत राहात असणार.

आपल्याकडे समोर आलेल्या पुराव्यांवर आधारुन कोर्टाला निकाल द्यावा लागतो. पुरावे कसे मॅनेज होतात हे पोर्शे गाडीच्या अपघातात सगळ्यांसमोर धळढळीत रित्या आले.

सिया व सोनमही आपल्या कोर्टांवर व पोलिसांवर विश्वास ठेऊन असे गुन्हे करायला धजावत असणार.

आणि हा गुन्हा उघडकीस आला. असे कित्येक गुन्हे उघडकीस आलेलेही नसतील.

आमच्या गावी असे काही जबरदस्त साईट सीइन्ग पॉइन्ट्स आहेत की तिथे आजवर कित्येकांनी असेच नको असलेल्या मंडळींना ढकलुन द्यायचे उद्योग केलेले आहेत. कोणी चुकुन पडते तेव्हा रेस्क्यु टिम खाली दरीत उतरते. त्यांना पडलेले सापळे दिसतात ज्याकडे ते दुर्लक्ष करतात.

मुळ धाग्यात उल्लेख केलेले दोन्ही मुद्दे योग्य आहेत. आपल्या समाजात हे प्रश्न आहेत हे खरेय आणि त्यामुळे खुप तणाव निर्माण होतोय हेही खरेय.

सुनिता, तुमचे मुद्दे बरोबर आहेत. पण तुम्ही दिलेल्या सगळ्या उदाहरणात ती स्त्री गुन्हेगार पुरुषाची नातलग आहे. त्या दोघांत काहीतरी तणाव आहे व त्यातुन हत्या झाल्यात.

सोनम व सिया केसमध्ये या मुलींचे आधीचेच काही इश्यु आहेत जे त्यांना वेगळे सोडवता आले असते. तसे न करता त्यांनी त्या इश्युशी संबंधीत नसलेल्या तिसर्‍या व्यक्तीची हत्या करायचा मार्ग पत्करला. हे असे का केले याचे काहीच उत्तर नाही, त्यांनी तरी अद्याप दिलेले नाही.

मुलगा साखरपुडा किंवा लग्न करुन घेतो, त्यात मिरवुन घेतो, जोरदार हुंडाही घेतो, हसतमुखाने फोटो काढुन ते सोमिवर मिरवतो आणि नंतर बायकोचा जाच करून खुन करतो. समजा होणारी/झालेली बायको प्रेमाच्या आड येतेय म्हणुन खुन तर तसेही नाही. Gf लग्न व्हायच्या आधीच मिळालीय आणि प्रेमाच्या आड त्या चे आईबाबा आलेत. बायको तर नंतर आलीय. तिला मारुन सुटका मिळवायची तर बंधनात अडकवुन घेण्याआधी पळुन जावे की. त्या थर्ड पार्टी बाईला का मारले?>>
जुन्या/नव्या बाईमागे लागून बायकोचा काटा काढणे अशा हजारो केसेस आहेत याप्रसंगी हे असं कधी विचारणार आपला समाज? की तेव्हा "त्या बायकोचीच चुक आहे, नवर्याला ती पसंत नाही तर सरळ सोडून का गेली नाही? " असा बायकोलाच आरोपी बनवणार?

पळून जाण्याचा मार्ग.... म्हणजे सैराट होण्याची निश्चिंती!
>>>>

जर मुलीच्या घरून बॉयफ्रेंडसोबत लग्नाला विरोध असेल तर ज्याच्याशी लग्न ठरले आहे त्याला मारल्यावर घरचे या दोघांचे लग्न कसे लाऊन देतील? तो विरोध कायमच राहणार ना?

मग त्या मुलाला का मारले हा प्रश्न पडतोच.

आणि हो,
आपण सारेच तर्क लाऊन शक्यता व्यक्त करूया. निष्कर्ष नको काढुया. सत्य कदाचित त्या तिघांमधील असेल तर बातमीत येणार सुद्धा नाही.

लेखकाचा दृष्टीकोण आवडला आणि पटला.
अशा बातम्यात नेमक्या गोष्टी बाहेर येत नाहीत. पण आता मुलाच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काही पत्रकार कम विचारवंतांनी म्हटलेय कि आतापर्यंत त्या मुलीने नकार का नाही दिला असे विचारले होते. पण तिने तिच्या घरच्यांना सांगितले होते. तसेच मुलालाही तिने नापसंती आडवळणाने सुचवली होती. प्री वेड शूट साठी बालीला जाताना तिने पासपोर्ट लपवून ठेवला. (एव्हड्यातून मुलाला समजले नसेल हे मान्य). पण मुलाची बातमी आल्यावर त्याच्या बहीणीनेच पोलिसांकडे मुलीबद्दल शंका व्यक्त केली होती कि तिचे अफेअर्स आहेत, आणि तिचे वागणे संशयास्पद आहे. याचा अर्थ असा होतो कि मुलाच्या कुतुंबियांना कल्पना होती....

असे काही विचारवंत म्हणत आहेत.
फक्त मुलाच्या घरी जाऊन सरळ सांगणे किंवा ज्याच्याशी लग्न करायचेय त्याच्या बरोबर पळून जाणे हे पर्याय निवडण्यापेक्षा खून का करावासा वाटला ...ते ही वय वर्षे वीस असताना. हा कळीचा मुद्दा आहे.

मुंबई लोकल मधे क्षुल्लक कारणावरून खून झाला. असाच पाच महिन्यांपूर्वी एका प्राध्यापकाचा खून लोकलमधून उतरताना झाला. नवले ब्रिजवर किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाचा खून झाला. रोज रस्त्यात मारामारी चालते. ही हातावर पोट असलेल्यांची उदाहरणे आहेत.

पण प्रचंड श्रीमंत, सुशिक्षित घरात खून करावासा का वाटतो?
पोर्शे प्रकरणात कुटुंब सुटलं. रिपोर्टस बदलले गेलेत. आपल्या हातून दोन जणं मेले याचा पश्चात्ताप नाही..

काय चुकतंय?

इथे सगळेजण धरून चालले आहेत कि त्या मुलींनच खून केला. गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्या पूर्वीच शिक्षा पण ठोठावण्यात आली आहे. थोड्या सबुरीने घ्या हो. त्या मुलीला खुनी ठरवणे हा त्या मुलीवर सरासर अन्याय नाही का?

मुळ धाग्यात जे लिहिलेय ते ह्या हत्येच्या निमित्ते केलेले विचारमंथन व कारणमिमांसा आहे. त्या मुद्द्यांवर चर्चा होत असेल तर पुढे वाचण्यात रस राहिल. त्या मुद्द्यांवर लिहावे इतका माझा अभ्यास नाही.

आपल्याकडे लग्नासाठी दोघे सज्ञान असावे लागतात हा कायदा आहे. परंतु होणाऱ्या लग्नात दोन्ही पक्षांकडून किमान अठरा जण लक्ष घालतात. यावर हिंदी सिनेमे आणि मालिका चालतात. हेच या सर्वाचे मूळ आहे.

मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे. एखाद्या घटनेच्या निमित्ताने चौकटीत मंथन होऊ शकते. ओपन फ्रेम मधे ही चर्चा कुठे जाणार? तिला आताच मुलीने खून केला तर, मुलाने केला तर हे वळण लागलेले आहे.

पोलीसांनी काय तपास केला हे आता माध्यमात आहे. त्यापेक्षा वेगळे गुप्त तपशील कुणाकडे असतील तर सावकाशीने का होईना हा तपास योग्य रितीने नाही झालेला हे सांगा. संदर्भासहीत सांगा.

या घटनेत ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यातून अशा घटनातून खूनापर्यंत का जावेसे वाटते हा मुद्दा अनेक ठिकाणी महत्वाचा वाटत असल्याचे म्हटलेय. कुणाला बाकीचे वाटतील. चौकटच नसेल तर त्याला अनंत अवकाश आहे.

मूळ धाग्यात गोची अशी आहे कि हे मंथन ज्या घटनेच्या निमित्ताने आहे त्याबद्दल लेखिकेला बोलायचे नाहीये असा पवित्रा घेतलेला आहे. एखाद्या घटनेच्या निमित्ताने चौकटीत मंथन होऊ शकते. ओपन फ्रेम मधे ही चर्चा कुठे जाणार?
हे मला पटले नाहीये. मी फक्त समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या घटने कडे पाहते आहे .. हे मी साफ साफ लिहिलेले आहेच. तरी मला बोला य चेच नाहीये असा मेसेज गेला असेल तर माझ्या लेखनाची मर्यादा !.. या घटनेवर कायदेशीर अंगाने चर्चा होऊच शकते .. ज्यात ते कुणी केले आहे , कसे केले आहे , सिद्ध काय होऊ शकते , निर्णय काय येऊ शकतो ही साधक बाधक चर्चा संभवते. मी तरी ती ही करायला उत्सुक आहे .. पण कुणीतरी एक गुन्हेगार सिद्ध झाला आहे अश्या आविर्भावाने ती होऊ नये .. असे च मलाही वाटते .. बाकी धागा भरकटण्याची आपली परंपरा काही कमी थोर नाही किंवा आज चीही नाही .. त्यामुळे तसे थोडे से व्हायचेच .. मी गृहीत धरले आहे ....

>>>>>कदाचित तिचा होणारा नवरा लग्न मोडायला तयार नसेल?
किंबहुना तोच तिला लग्न करायला प्रेशर टाकत असेल?
कदाचित दोन्ही फॅमिली आधीपासून ओळखीचे असल्याने त्यांचे प्रेशर असेल?
काही बिजनेस डील असेल? ज्या मुलीच्या मनाविरुद्ध लग्न होत असेल? आणि तिचा वाली कोणीच नसेल..
कदाचित त्या नवऱ्या मुलाकडे तिचे काही सीक्रेट असेल, कदाचित एखादा व्हिडिओ आणि तो ब्लॅकमेल करत असेल?

या सर्व केसेसमध्ये खून करणे समर्थनिय आहे?

एखाद्या मुलीच्या मनाविरुध्द लग्न होत असेल तर ती इतक्या उत्साहाने इन्स्टाग्रामवर रिल्स टाकेल?

कदाचित तिच्या बॉयफ्रेंड ने दबाव आणला असेल तिच्यावर....

काहीही असले तरी कुणीच कुणाचा खून करणे समर्थनीय नाही होऊ शकत..

<<<
या सर्व केसेसमध्ये खून करणे समर्थनिय आहे?
>>>

नाही
मी म्हटले आहे का माझ्या पोस्टमध्ये कुठे असे?
मी हा गुन्हा घडण्यामागच्या शक्यता वर्तवल्या आहेत.
गुन्ह्याचे motive काय आहे हे माझ्यामते महत्वाचे असते.
जगातले सर्व खून एकच तराजूत तोलने योग्य नसते.

तुम्ही दृश्यंम् पाहिला आहे का?

Pages