अमलताश

Submitted by अमुक on 21 November, 2025 - 06:04

बऱ्याच दिवसांपासून पहायचा म्हणून नोंद करून ठेवलेल्या या अनुभूतीला आज मुहूर्त सापडला. उरकून टाकायच्या कामांच्या यादीत टाकण्यापेक्षा, निवांतपणे रसपरिपोष करायचा ठरवले त्याचे चीज झाले असे वाटले. मराठी चित्रपट या आपत्तीच्या मी सहसा वाटेस जात नाही कारण तेथे पाहिजे जातीचे! माझ्या या धारणेस मराठी सिनेजगताने फारच मनावर घेऊन मला माझ्या निर्णयाचा फेरविचार करण्यास सहसा भाग पाडले नाही. नाही म्हणायला जब्बार पटेल, अमोल पालेकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, परेश मोकाशी अशा काही मातब्बर मंडळींनी मला थेटरात खेचून नेले खरे, पण त्यांना अपवाद म्हणून जमेस धरून माझ्या मूलभूत धास्तीस फारसा फरक पडला नाही. शिवाय जगभरातील उत्तमोत्तम कलाकृती पाहता येणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलने वर्षानुवर्षे आमचे फिल्म रसास्वादन अधिकच समृद्ध केल्याने दिवसेंदिवस अधिकच सरधोपट, उथळ, बाष्कळ, बटबटीत, प्रचारकी आणि म्हणून असह्य होत चाललेल्या मराठी चित्रपटांकडून मला शून्य अपेक्षा असतांनां 'अमलताश'ने खूपच आनंदी (आय मीन सुखद!) धक्का दिला... अगदी सतीश राजवाडेच्या 'प्रेमाची गोष्ट' सारखा

तीन महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने निदर्शनास आल्या - १. सोशल मीडियाने कितीही आव आणला तरी वृत्तपत्रांना निदान महाराष्ट्रात तरी पर्याय नाही. बहुतेकांनी लोकसत्ता मधला राहुलचा लेख वाचल्यामुळे युटूयबवर येऊन अमलताश बघितल्याच्या उल्लेख केलाय. २. नेहमीच्या(च) प्रथितयश(?) निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक, संगीतकार यांच्या युतीपेक्षा वेगळे जातिवंत, खानदानी कलाकार किती फ्रेश वाटू शकतात आणि कमाल करू शकतात याचा आनंद अवर्णनीय. चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक सुहास देसले हा आमच्या धुळ्याचा असल्याने वाढीव कौतुक आणि विशेष अभिमान. ३. कथा, कल्पना, निर्मिती, सादरीकरण आणि प्रदर्शन या सगळ्यांत केलेल्या अभिनव प्रयोगाने थिएटर, मल्टिप्लेक्स यांच्याबरोबरच ओटीटीची मुजोरी देखील मोडून काढता येऊ शकते आणि त्या निमित्ताने काही उत्तम, दर्जेदार, सकस, अर्थपूर्ण आणि म्हणून अभिजात असे काही करता येऊ शकते या शक्यतेने उमेद वाढून भविष्य खूपच आशादायक वाटते.

सगळ्यांनी हा तरल अनुभव निवांतपणे नक्कीच घ्यावा आणि आपल्याला मिळालेल्या आनंदाच्या प्रमाणात, मल्टिप्लेक्समधल्या तिकीट आणि पार्किंग राहू दे, निव्वळ पाणी आणि पॉपकॉर्नच्या जीएसटीसह किमतीस स्मरून, यथाशक्ती योगदान करावे... तरच अशा प्रयोगांना बळ मिळेल आणि प्रेक्षकांना क्वालिटी कन्टेन्ट! सुहास, राहुल आणि संपूर्ण अमलताश टीमला मनापासून शुभेच्छा... निरंतर!

शुभम भवतु !

(१० महिन्यांपूर्वी अमलताशच्या युट्युब व्हिडीओवर प्रकाशित माझा अभिप्राय)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप सुंदर आणि तरल चित्रपट!
दुर्दैवाने त्याला खूप जास्त उचलून घेतलं नाही ( मुख्य करून इतर सर्व कलाकारांनी) , कंपूशाहीचं हे अजून एक उदाहरण.

राहुल देशपांडे च मला कौतुक वाटलं त्याचा वसंतराव पण फार सुंदर बनवला आहे आणि हाही, छान काम केलंय त्यांनी. म्हणजे तो गायक आहे की अभिनेता आहे असा प्रश्न पडावा.

धनश्री जरूर बघ, YouTube वर आहे.

अत्यंत सुंदर , नाजूक आणि तरल सिनेमा आहे . नाजूक गोष्टी हाताला जाणवतात पण हा सिनेमा बघताना सुद्धा सतत हळुवारपणा मनाला स्पर्शत रहातो .

जरूर बघा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी .

'मायबोली'चा नियमित वाचक आणि चाहता असलो तरी माझे इतरत्र प्रकाशित लिखाण इथे डकविण्याची परवानगी अलीकडेच मिळालेली असल्याने अजून मी इथल्या संवादशैलीला सरावलो नाही, चाचपडतो आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रियांची दखल घेऊन त्यावर प्रतिसादण्यास लागणाऱ्या विलंबाबद्दल क्षमस्व! मी सर्वांचाच आभारी आहे आणि प्रत्येक प्रतिक्रियेला स्वतंत्रपणे प्रतिसादाण्याचा प्रयत्न करीन, ते साधेल तोपर्यंत आपल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाची अपेक्षा... धन्यवाद!

बाय द वे, प्रभावीरितीने मायबोली वापरण्याचा काही क्रॅश कोर्स कुणी सुचवेल का...?
'कुणी याल का, सांगाल का, सुचवाल का या पामरा?
येथे तरी लिहू नको, शिणवू नको व्यर्थ मेंदूला...?' (कवी अनिल यांची क्षमा मागून)

अमलताश अजून पाहिला नाही पण बरेच ठिकाणी बरेच लोकांनी त्यावर भारावून लिहिले आहे. त्याचवेळी बरेच लोकांनी संथ रटाळ अशी नावे सुद्धा ठेवली आहेत.

असे तेव्हाच होते जेव्हा चित्रपट मासला अपील करणारा नसून ठराविक अभिरुची असणाऱ्यांनाच आवडेल असा असतो.

आता आपण त्या ठराविक गटात मोडतो का हे पडताळायला चित्रपटच बघावा लागेल.

जर चित्रपटाचा जॉनर लव्हस्टोरी/रोमांटिक असेल तर मला स्लो पेस सुद्धा आवडतो. हळुवारपणा त्यातच खुलतो.
अमलताश लव्हस्टोरी आहे का?

धन्यवाद
बघेन / ट्राय मारेन मग नक्की
योगायोग म्हणजे आताच लैला मजनू बघून हा प्रतिसाद लिहित आहे Happy

अमलताश पाहिला.
फार सुंदर आणि हळूवार होता.
चित्रपट बघतोय असे वाटलेच नाही. अगदी घडतेय आपल्या आसपास असेच वाटत होते.
गाणी, बॅकग्राऊंड म्युजिक जे काही होते ते सुद्धा छान लयबद्ध होते.

अमलताश!
धन्स (हा पण त्या क्रॅशकोर्सात शब्द घ्या) अवल! परत एकदा ती पोस्ट वाचली.
आर्ट फिल्म करण्याचा आव आणून अभिनय न जमणार्‍या लोकांनी काही तरी बंडल करुन ठेवलेलं परत आठवलं. हे सकस आणि अर्थपूर्ण मला तरी काही वाटलं नाही. तिकडे चिकार चर्चा केली आहे. दाण्याचे लाडू मात्र या वीकेंडला नक्की करणार.

आर्ट फिल्म करण्याचा आव आणून अभिनय न जमणार्‍या लोकांनी..
>>>>>

आर्ट फिल्म तर मला नेहमी धीरगंभीर आणि sad मूडच्या वाटतात. म्हणून मी त्यांच्या वाट्याला कधी जात नाही. हे तर फिल गुड प्रकरण होते.

अभिनय म्हणाल तर कोणी तो करतच नव्हते. अगदी सहज सारे काही घडत होते. जेव्हा अभिनय जमत नसून तो करायचा प्रयत्न असतो तेव्हा ते प्रकरण असह्य होते. यात ते नसल्याने हे प्रकरण सुसह्य होते.

हे सकस आणि अर्थपूर्ण मला तरी काही वाटलं नाही >>> येस, असे काही मलाही वाटले नाही. पण त्याचा आव आणून बनवले असेही बिलकुल वाटले नाही. आणि कदाचित म्हणूनच आवडले.

मायबोलीवरील एखादी व्यक्ती जी प्रथितयश लेखक नसते ती आपल्या आयुष्यातील एखादा किस्सा जे घडले ते हे असे म्हणून सहजपणे सांगते आणि तो वाचायला आवडतो तसे झाले.

असे तेव्हाच होते जेव्हा चित्रपट मासला अपील करणारा नसून ठराविक अभिरुची असणाऱ्यांनाच आवडेल असा असतो. >>>>> ऋन्मेष, हे असं लिहून तू अनेक मायबोलीधुरीणांशी शत्रुत्व घेतोयस. Biggrin

मला अमलताश आवडला. मला वाटतं सिनेमा बघताना आपला मूड कसा आहे त्यावर तो आपल्याला अपील होतो किंवा नाही हे बर्‍यापैकी ठरतं. काही अभिरुचीसंपन्न लोकांना पुणे५२ पण आवडला होता.

बघताना आपला मूड कसा आहे .>>>> +७८६ आणि त्यासोबत आपल्या चित्रपटाकडून बघायच्या आधीच असलेल्या अपेक्षा काय आहेत यावर सुद्धा ठरते.

बरेचदा काय होते. एखाद्याला असा चित्रपट आवडतो. पण त्याला नेमके काय आवडले हे शब्दात सांगता येत नाही. तिथे तो अश्या वेगळ्या चित्रपटासाठी प्रचलित असलेले आणि घासून गुळगुळीत झालेले शब्द वापरतो. सकस, अर्थपूर्ण, आशयघन, अभिनयसमृद्ध वगैरे...
पण यामुळे समोरच्याच्या डोक्यात वेगळ्या अपेक्षा तयार होतात आणि तो चित्रपट बघताना ते शोधू लागतो. आणि नाही मिळाले तर त्याची चिडचिड होते.

मनाची पाटी कोरी असताना त्यांना तो चित्रपट आवडलाही असता किंवा नावडलाही असता.. पण चिडचिड झाली नसती.

किती विचार करता ? प्रत्येक सिनेमात काही ना काही चांगलं असतंच . फक्त ते बघण्याची दृष्टी हवी .
न आवडलेला भाग अधिक असेल तर चित्रपट नाही आवडला ,
आणि मनाला धावणाऱ्या गोष्टी अधिक प्रमाणात असतील तर चित्रपट आवडला .

इथे कोणाच्या मनाला काय भावते हा वैयक्तिक प्रश्न आहे .
तसे पण आंबे आणि शोले न आवडणारे महाभाग पण सापडतीलच जा देशात .

मी चित्रपट पळत पळत बघितला आहे. तसेच ह्या असल्या विषयात मला गती नाही. त्यामुळे माझ्या मताला जास्त किंमत देऊ नये.
माझ्या मते चित्रपटाचे स्क्रिप्ट प्रोब्लेमाटिक आहे. कुणाचेही व्यक्तिमत्व व्यवस्थित डेवलप केले नाहीये. या हिरो मध्ये एकही क्लासिक हिरोची लक्षणे नाहीयेत. त्या दोघांचे प्रेम जमणे हा निव्वळ दैवी योगायोग आहे. सर म्हणतील कि ही साध्या माणसाची साधी कहाणी आहे. साधी माणसे मुलगी बघून लग्न करतात! आम्ही पण साधी माणसेच आहोत.
चित्रपटाचा शेवट पब असाच घाई घाईत गुंडाळला आहे. अरे अभिनय करायला केव्हढा वाव होता. कल हो ना हो
आनंद पहा जरा, मूल, सिंगल पेरेंट हे उगाचच.

ज्यांना आवडला, त्यांना तू "ठराविक अभिरुची असणारे" म्हणतो आहेस
>>>>>

अभिरुचीचे वाक्य मी हा चित्रपट बघायच्या आधी जनरल स्वरूपात म्हटले होते. ती माझी आधीची पोस्ट आहे.

लोकांची अभिरुची ठराविक नसते तर चित्रपट एखाद्या ठराविक अभिरुचीशी जोडला गेला असतो. अशा वेगवेगळ्या ठराविक अभिरुची एका माणसात असतातच की. जसे मला अमलताश सुद्धा आवडला आणि मला जवान सुद्धा आवडला. दोन्ही चित्रपट ठराविक अभिरुची नसतील तर आवडणे शक्यच नाही. असतील तर मात्र आवडूही शकतो किंवा नावडूही शकतो, ते चित्रपट किती चांगला बनला आहे यावर ठरते.

तसे पण आंबे आणि शोले न आवडणारे महाभाग पण सापडतीलच जा देशात.
>>>>

आंबे आणि शोले न आवडणारे महाभाग असतात म्हणून आपणही शिक्का मारलाच की Happy

मला शोले अफाट आवडलेला.
मला आंबे मी कोकणी असून सुद्धा आवडत नाहीत.
एकात महाभाग एकात सर्वसामान्य Happy

या हिरो मध्ये एकही क्लासिक हिरोची लक्षणे नाहीयेत.
>>>
क्लासिक हिरोची लक्षणे जाणून घ्यायला आवडतील.
मुळात हिरो का म्हणावे त्याला. कथेचा नायक आहे तो. रिलेट होण्यास सर्वसामान्य असू शकतोच. किंबहुना आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या कित्येक व्यक्तींपेक्षा स्मार्ट व्यक्तिमत्व दाखवले होते त्याचे.
.

चित्रपटाचा शेवट पण असाच घाई घाईत गुंडाळला आहे. अरे अभिनय करायला केव्हढा वाव होता.
>>>>>
कलाकार त्या क्षमतेचे नव्हते तर कसा करणार तो अभिनय..
पण मुळात तो दर्द, तो आक्रोश, ती विरहाची भावना दाखवायची नसावीच.
कुठलेही दुःख आले की कालांतराने ते विरतेच. त्यांनी थेट तो काळ आलेला दाखवला. एक चित्रपट जो शोकांत बनला असता तो त्यांनी टाळला असे मला वाटते. कारण मुळात कुठली कथा प्रत्यक्ष आयुष्यात शोकांत नसते. चित्रपट तिथेच संपला तरी त्यातील पात्रांचे आयुष्य असते जे पुढे मागे त्यांना पुन्हा सुख दाखवते. त्यांनी तो चित्रपट त्या पुढच्या काळावर नेऊन थांबवला. मला तरी ते आवडले.

नक्की काय झाले हे चेक करायला मी शेवट पुन्हा मागे जाऊन पाहिला. तेव्हा लक्षात आले की बरेच जणांनी शेवट पुन्हा पाहिला आहे. त्या पिक्चर पुढे मागे ढकलायच्या दांडीवर कर्सर ठेवला की शेवटाला most replayed चा डोंगर दिसेल बघा

सर एक शंका.
त्याचे एक ऑपरेशन झाले आहे असा डॉक्टरच्या संभाषणात उल्लेख आहे, हे खरे आहे का? का माझा गैरसमज झाला आहे ?

हो त्याचे ऑपरेशन झाले असते. ते सुद्धा बरेपैकी यशस्वी. पण दुर्दैवाने तो ट्युमर आणि त्यासोबतची त्रासदायक लक्षणे पुन्हा उसळून येतात. म्हणून पुन्हा ऑपरेशन करावे लागते.

Pages