मनाचे श्लोक – चित्रपटाच्या नावावरून चालू असलेला वाद

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2025 - 19:40

वादाची पार्श्वभूमी

मनाचे श्लोक नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नावाला काही संघटनांनी विरोध केला. त्याचा शो बंद पाडला. आता तो चित्रपट येत्या आठवड्यात नाव बदलून प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे. अश्या अर्थाने चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून समर्थ रामदासांचे मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तर यामागे केवळ कल्पकता आहे.

यावरून वाद उद्भवले आहेत ज्यात प्रामुख्याने दोन ते तीन गट तयार झाले आहेत.

१) या नावाला विरोध करणारे – ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२) या नावाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणारे – ज्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असे वाटत आहे.

३) ज्यांना हा निव्वळ मार्केटिंग फंडा वाटत आहे – म्हणजे मुद्दाम असे खोडसाळ नाव देऊन एका गटाच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि आपणच त्यात तेल ओतून वणवा पेटवायचा. जेणेकरून समोरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागरूक असलेला गट सक्रिय होईल आणि दोघांची छान जुंपेल. यातून जी चर्चा होईल त्याने चित्रपटाची आयती जाहिरात आणि मार्केटिंग होईल असे जे समजतात.

या तिसऱ्या गटात सुद्धा दोन उपगट आहेत.

३ अ) ज्यांचा अश्या प्रकाराच्या मार्केटींगला विरोध आहे. – कारण त्यांच्यामते यामुळे समाजात नाहक तेढ निर्माण होते आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडते.

३ ब) ज्यांना अशी मार्केटिंग पटते. – म्हणजे याकडे ते फक्त व्यवसाय म्हणून बघतात. याउपर एका मराठी चित्रपटाची चर्चा होत आहे तर चांगलेच आहे असे समजतात.

तुम्ही यापैकी कुठल्या गटात आहात? किंवा यापलीकडे काही विचार करता का? किंवा एकूणच या वादाकडे कुठल्या नजरेने बघता?

मी माझे मत सांगतो,
मी तिसऱ्या गटात आहे. पण या केस मध्ये ३ अ की ३ ब हे अजून तरी ठरवता आले नाहीये.

------------

(मराठी चित्रपट कसा वाटला या धाग्यावर चर्चा न करता इथे स्वतंत्र धाग्यात करता आली तर तिथे अवांतर पोस्ट टाळून इतर मराठी चित्रपट कसे वाटले यावरच बोलता येईल.)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी यासाठीच या विषयावर कधी लिहीत नाही, कारण वादविवाद हा माझा प्रांत नाही.
तुमच्या प्रतिसादात ज्या शक्यता गृहीत धरलेल्या आहेत ते तुमचे मत आहे ( एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येकडे बुद्ध्यांक नाही).

मी आधीच्या किंवा अन्यत्र लिहीलेल्या प्रतिसादामधे एम्पथी हा मुद्दा अधोरेखित केला होता, जो तुम्ही डकवलेल्या उतार्‍यात बिल्कुल आढळलेला नाही. किनार्‍यावर बसून पोहणार्‍याला खोलीचा अंदाज येत नाही तसे कुंपणावर बसून कोणत्याही जनआंदोलनाचे, अनुयायांचे मूल्यमापन करणार्‍याला त्याचे मर्म समजत नाही. ज्या महापुरूषांचे अनुयायी पराभव करतात असे म्हटलेले आहे ते वाक्य वाघमारेंच्या आधीपासून लोक सांगतात कारण त्यांना त्या महापुरूषांना थेट नावे ठेवायची नाहीत म्हणून हा जावईशोध लावलेला आहे.

जर या महापुरूषांनी या मंडळींना बुध्यांक नाही असा अडाणचोट पवित्रा घेतला असता तर ते ही स्वतःभोवती कोष विणून लेख पाडत बसले असते तरीही ते प्रसिद्धच असते. पण करूणा हा एक विषय आहे जो ड्राईव्ह फोर्स आहे, आधीच्या, आधीच्या प्रतिसादात वाचा ते, तो कोरड्या टीकाकारांकडे नसतो. दोन वेळचं खायलाही ज्यांना नाही त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांच्यात राहून आंदोलन उभारणे आणि ओळख मिळवून देणं वेगळं आणि त्या नेत्यानंतर पोरक्या झालेल्या त्या जनतेला जज्ज करत काहीही निष्कर्ष काढणे वेगळे.

वाघमारे असं आंदोलन उभारू शकतात का हा निकष लावला तर ते सावलीतले विचारवंत आहेत ज्यांना काय लिहीले तर आपल्याला प्रसिद्धी मिळेल याचा अंदाज आहे असं म्हणता येतं.

सुनीताबाई देशपांडे म्हणतात ज्या विद्वत्तेमधे अहं आहे ते ज्ञान नसून निरूपयोगी माहितीचा साठा आहे. अन्य एका विद्वानाने म्हटलेले आहे ज्या विद्वानाकडे करूणा आहे त्याचे ज्ञान शीतल असते आणि ते आनंददायी असते, अर्धवट ज्ञानातून आक्रमकपणा येतो आणि अज्ञानात निव्वळ सुख असते.

मला हे लिहायचं जिवावर आलं होतं. इथे शब्दसीमा.

तुमच्या प्रतिसादात ज्या शक्यता गृहीत धरलेल्या आहेत ते तुमचे मत आहे >>खरंय .... जसं तुम्ही तुमचं मत व्यक्त करता, इथे लिहिणारे सर्व जण आपआपलं, आणि सुनीताबाई सुनीताबाईंचं, कुणी कुणाचं मत विचारात घ्यावं आणि सोडून द्यावं ही ज्याची त्याची कुवत.

एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येकडे बुद्ध्यांक नाही. > >> हे एकांगी विचार करणं झालं, अशीही शक्यता होऊ शकते जसे, एका ठरावीक चौकटीच्या आतले विचार करताना असलेला बुद्ध्यांक(कॉग्निटिव्ह ऍबिलिटी) सप्रेस्ड होणे To almost disability level. (बघा विचार करून उलगडतंय का?)

https://www.researchgate.net/publication/385937782_The_Psychology_of_Indoctrination_How_Coercive_Cults_Exploit_Vulnerability_and_Foster_Radical_Beliefs

फाविदडि, किती तरी दिवसांनी 'महापुरुषांचा पराभव' हा धडा परत वाचला. लक्षात राहिलेला धडा आहे हा. धन्यवाद! मला हा शाळेत इयत्ता दहावीच्या मराठीच्या पुस्तकात होता. मला तेव्हा तर आवडला होताच (कारण शिक्षकांनी तो अतिशय चांगला शिकवला होता, उदाहरणे देऊन), पण मला अजूनही त्यातला विचार पटतो. अगदी गेल्याच महिन्यात मी कुणाला तरी सांगत होते याबद्दल!

(कारण शिक्षकांनी तो अतिशय चांगला शिकवला होता, उदाहरणे देऊन)
>>>>>
हो, आशय उलगडून पोहोचवणारे शिक्षक असतील तरच अश्या धड्यांची मजा होती.
महापुरुषांचा पराभव खरेच भारी धडा होता त्या वयाला. शाळेत असताना जे विचार आपल्याला शिकवत होते ते कित्येक मोठ्यांना कळणे सुद्धा अवघड आहे.

Pages