मनाचे श्लोक – चित्रपटाच्या नावावरून चालू असलेला वाद

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2025 - 19:40

वादाची पार्श्वभूमी

मनाचे श्लोक नावाने एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या नावाला काही संघटनांनी विरोध केला. त्याचा शो बंद पाडला. आता तो चित्रपट येत्या आठवड्यात नाव बदलून प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे. अश्या अर्थाने चित्रपटाचे नाव मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून समर्थ रामदासांचे मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. तर यामागे केवळ कल्पकता आहे.

यावरून वाद उद्भवले आहेत ज्यात प्रामुख्याने दोन ते तीन गट तयार झाले आहेत.

१) या नावाला विरोध करणारे – ज्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

२) या नावाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणारे – ज्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले असे वाटत आहे.

३) ज्यांना हा निव्वळ मार्केटिंग फंडा वाटत आहे – म्हणजे मुद्दाम असे खोडसाळ नाव देऊन एका गटाच्या धार्मिक भावना दुखवायच्या आणि आपणच त्यात तेल ओतून वणवा पेटवायचा. जेणेकरून समोरून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागरूक असलेला गट सक्रिय होईल आणि दोघांची छान जुंपेल. यातून जी चर्चा होईल त्याने चित्रपटाची आयती जाहिरात आणि मार्केटिंग होईल असे जे समजतात.

या तिसऱ्या गटात सुद्धा दोन उपगट आहेत.

३ अ) ज्यांचा अश्या प्रकाराच्या मार्केटींगला विरोध आहे. – कारण त्यांच्यामते यामुळे समाजात नाहक तेढ निर्माण होते आणि समाजाचे स्वास्थ्य बिघडते.

३ ब) ज्यांना अशी मार्केटिंग पटते. – म्हणजे याकडे ते फक्त व्यवसाय म्हणून बघतात. याउपर एका मराठी चित्रपटाची चर्चा होत आहे तर चांगलेच आहे असे समजतात.

तुम्ही यापैकी कुठल्या गटात आहात? किंवा यापलीकडे काही विचार करता का? किंवा एकूणच या वादाकडे कुठल्या नजरेने बघता?

मी माझे मत सांगतो,
मी तिसऱ्या गटात आहे. पण या केस मध्ये ३ अ की ३ ब हे अजून तरी ठरवता आले नाहीये.

------------

(मराठी चित्रपट कसा वाटला या धाग्यावर चर्चा न करता इथे स्वतंत्र धाग्यात करता आली तर तिथे अवांतर पोस्ट टाळून इतर मराठी चित्रपट कसे वाटले यावरच बोलता येईल.)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा ओके
मी ते वाक्य वेगळ्या अर्थाने घेतले.
सेन्सॉर बोर्ड काय भूमिका घेते कल्पना नाही.
कदाचित आऊट ऑफ सेन्सॉर बोर्ड सेटलमेंट होत असेल दरवेळी आणि ते कुठलीही भूमिका घेणे टाळत असतील.
शेवटी ते सुद्धा बाल बच्चे वाले आहेत. हल्ली नुसता जीवाला धोका नसतो तर सोशल मीडियावर ट्रोलधाड मागे लागली तर भल्या भल्या सेलिब्रेटींचे जगणे अवघड होते.

सामो धनश्री, हो मला माहीत आहे की ते मला उद्देश्युन नव्हते. भले मी या विषयावर धागा काढला असला तरी मी माझा वेळ आणि बुद्धी माझे आयुष्य मनोरंजक करण्यातच खर्च करतो Happy

"एकूण समर्थांनी मूर्खांची एव्हढी लक्षणे लिहूनही काही बाकी राहिली" >>> हो Happy

ज्यांना खुट्ट झालं की रडारड करत सेन्सर बोर्डाकडे जायचे आहे ते जावोत बापडे. माझी मागणी आहे कायद्यातच ह्या लोकांना भाव देण्याची तरतूद नसावी. >>> मलाही एक मिनिट असेच वाटले. पण लोकांना कायदेशीर दाद मागायचा मार्ग राहू द्या. तो ते खरोखरच सेन्सॉर मधून निसटलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल मागत आहेत की "खुट्ट झाले" म्हणून मागत आहेत हे कायद्यात कसे बसवणार Happy

हा मला मार्केटिंगचा भागही वाटत नाही. वर्षानुवर्षे अशी नावे व संदर्भ वापरले गेले आहेत. इतकी वर्षे कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता. साधे एक लोकप्रिय नाव संदर्भ बदलून पिक्चरकरता वापरले आहे. ते नक्की काय बदलले आहे मला माहीत नाही. पण त्यात इतका गदारोळ होण्याचे काही कारण नाही. यातल्या कोणाला मनाचे श्लोक किंवा रामदासस्वामींचा अपमान वगैरे करायचा असेल अशी अजिबात शक्यता नाही. उलट अशीच शक्यता आहे की मृण्मयी किंवा इतर कोणालाही मुळात याने वाद होऊ शकतो अशी शंकाच आली नसेल.

मनाच्या श्लोकांचाच फॉर्मॅट वापरून त्यातील वाक्यांतच फेरफार करून तयार केलेले "श्लोक" पुलंच्या "बटाट्याची चाळ" मधे आहेत. मधे कोणीतरी एक "उदासबोध"ही लिहीला आहे. "गाळीव इतिहास" मधे बरेच काय काय आहे. तो विनोद आहे, अपमान नव्हे हे समजण्याइतकी विनोदबुद्धी पूर्वी शिल्लक होती. आता लोक अचानक कसल्याही गोष्टींनी ऑफेण्ड होऊ लागले आहेत.

(वरती "पण लोकांना कायदेशीर दाद मागायचा मार्ग राहू द्या." इथे चुकून "कायदेशीर दादा मागायचा" असा टायपो झाला होता. माबोकरांची विनोदबुद्धी अजून शाबूत आहे पण उगाच एक लिहायला जाउन भलताच अर्थ व्हायचा, म्हणून एडिट केले Happy )

Lol हो!
उ-दासबोध कव्हरावर उघडबंब पाडगावकर रामदासी लंगोटी, जपमाळ कमंडलू वेशात आहेत. आतल्या कविताही मजेशीर आहेत आठवतं.

कशाला बशीचे फुका दोन आणे, उशीरा सदाचे हापिसात जाणे हा भुजंगप्रयात पुलं नी मना सज्जना सकट चोरला आहे. संगीतक मध्ये साधं श्रेय ही दिलेलं नाही. छफ तिया जमवायला चांगली संधी आहे. Wink Lol

रानभुली तुमचा प्रतिसाद वाचला. बहुधा तुम्ही याच अर्थाचा प्रतिसाद दुसर्‍या कोणत्यातरी घटनेबद्दल दिला होता. जरी ते मत अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या विरोधात वाटले, तरी त्याचे कारण "लोक अजून तितके तयार नाहीत" हे आहेत - असा मी अर्थ लावला.

पण हे मला पूर्ण पटले नाही (थोडा पॉईण्ट नक्कीच आहे - ते ही पुढे लिहीले आहे). याची दोन तीन कारणे:
- एकतर हा विनोद, विडंबन किंवा अगदी कॅज्युअली केला गेलेला वापर समजून घेण्याचा व त्याने ऑफेण्ड होण्याचा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर पुढच्या वर्षांमधे हे स्वातंत्र्य वाढायला हवे. ते कमी होत चालले आहे. त्यामुळे यात राजकीय हेतू जास्त आहे असे वाटते. हा राग खरा नसून हे रागाचे "राजकीय सोंग" आहे असे मला वाटते.
- यात एक खुलासा - सर्वसामान्य व्यक्तीला आपल्या श्रद्धास्थानाबद्दल आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे कोणी काही केले की राग येतो, अपमान वाटतो. तो खरा, स्वाभाविक असतो. भले तो चुकीचा असेल. हा राग येणे सार्वत्रिक आहे. त्याचा शिक्षणाशी, सामाजिक स्थानाशी संबंध नाही. एकतर घटनेतील ही स्वातंत्र्ये आपल्याला आपोआप मिळाली आहेत - सर्वसामान्य लोकांनी ती मागितली नव्हती. ती काय असतात व का आवश्यक असतात याचा लोकांना पत्ता नव्हता. अजूनही नाही (इथे "आपोआप" याचा अर्थ सर्वसामान्य लोकांना आपोआप. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या लोकांनी त्याकरता केलेला अभ्यास व प्रयत्न वादातीत आहेत). पण अशा लोकांना जे नेते फूस लावतात त्यांना घटनेने दिलेल्या अधिकाराची माहिती खरे म्हणजे असायला हवी. त्यातून या लोकांचा राग शांत करण्यापेक्षा उलटे हेच लोक त्यावर पोळी भाजून घेत आहेत. नसलेले अपमान उकरून काढत आहेत.
- यातून कायद्याच्या बाहेर संघटना तयार झाल्या आहेत - ज्या ठरवणार की एखादा उल्लेख चालणार की नाही ते. एकदा असे झाले, की इतर अनेक गोष्टींप्रमाणे मग प्रत्यक्षात लोकांना काय वाटते हे बाजूला राहते व ज्यामुळे त्या नेत्यांना टीआरपी मिळतो ते महत्त्वाचे होते.
- अशा परिस्थितीत अशी एखादी घटना जेन्युइन उद्रेकातून झाली आहे की कोणीतरी हे बळंच उकरून काढले आहे हे कसे ठरवणार? ते एखाद्या कायदामान्य स्टॅण्डर्ड पद्धतीने ठरवता आले नाही, तर मग कोणीही उठेल व कशालाही आक्षेप घेईल आणि लोकांचा उद्देश काहीही असो, जर त्यातून एखाद्याने अपमान "शोधून" काढला, तर या लोकांना बदल करावेच लागतील. मग अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे काही शिल्लक राहणार नाही.

तरीही एक पटण्यासारखे आहे - ज्या वर्गाला इतकी वर्षे कसलेही हक्क नव्हते, कसलेही सामाजिक स्थान नव्हते, ज्यांना अजूनही सिस्टीमची दारे बहुतांश बंद आहेत, अशांच्या श्रद्धास्थानांवर जर कोणी शिंतोडे उडवतोय असे वाटत असेल तर त्यांना बेनिफिट ऑफ डाउट द्यायला हवा. किमान समजावून तरी सांगायला हवे. तो ही एक स्लिपरी स्लोपच आहे पण तीच एक केस अशी आहे की इथे "शहाणपणा" चा विचार व्हायला हवा.

याउलट गेल्या काही वर्षातील चित्र असे आहे की हे "अपमान फिशिंग" बहुतांश समाजातील प्रबळ लोकांकडूनच जास्त केले गेले आहे. त्यातही त्या त्या काळात सत्ताधारी वर्गाच्या जवळ असलेल्यांकडून.

यात मला एक आश्चर्य वाटते - इतक्या लोकांकडून/संघटनांकडून गेल्या काही वर्षांत असले प्रकार झाले आहेत. घटनेची शपथ घेउन सत्तेवर आलेल्या एकाही पक्षाच्या एकाही नेत्याला आंदोलनकर्त्यांना "हे लोक जे काय करत आहेत तो त्यांचा घटनादत्त अधिकार" आहे हे ठामपणे सांगावेचे वाटलेले नाही. अगदी एरव्ही "संविधान" वगैरे ओरड करण्यार्‍यांनाही.

ओके फारेण्ड. मी कुमार सरांच्या धाग्यावर विज्ञानाबद्दल लिहीलं होतं. जबाबदारी आणि शोध याबद्दल.

फक्त विनोद, विडंबन यापुरतेच पाहू नये.
पूवीपेक्षा लोक आता ऑफेण्ड होण्यामागे लोकांना मिळालेले व्यक्त होण्याचे सहज माध्यम हा भाग पण आहे. पूर्वी वन वे कम्युनिकेशन होते. त्या वेळॉ काळजीही जास्त घेतली जात असेल. आता राजकारणासाठी उकसवणे हे सर्व मान्य आहे. माझा मुद्दा वेगळा आहे.
टोकाचे मत दोन्हीकडे आहे. साजिरा यांनी दिलेल्या व्हिडीओत विकास दिव्यकीर्ती यांनी ती मांडणी केली आहे..

जातीचा मुद्दा घेऊयात. ( उदाहरण मुद्दाम टाळले होते. कारण मग मुद्दा इश्यू बेस्ड होतो. तात्विक राहत नाही). उतरंड आहे म्हणजे ते स्टेटस आहे. श्रेष्ठत्वाची,कनिष्ठत्वाची भावना आहे. हे अस्तित्वात नाही असे समजून विनोद केले तर ऑफेण्ड होणारच. विनोद करणार्‍याने कोणत्या दृष्टीकोणातून केले हे कळत नाही. इथे मी या चित्रपटाच्या कॉण्टेस्ट मधे नव्हते लिहीले. ऑब्जेक्ट बेस्ड मुद्दा होता.

माणूस भावनांवर जगतो. इमोशनल कोईफिशिएण्टचे मह्त्व आता मान्य झालेले आहे. अनेकदा तो ड्राईव्ह फोर्सही असतो. त्याचे बरे आणि वाईट दोन्हीही परिणाम असतात. उद्या कुणी आपल्या घराच्या बाहेर उभे राहून आपल्या आईवडीलांबद्दल काहीही बरळेल, ते त्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र असेल का ? त्या वेळी आपल्या भावना दुखावल्या तर तो टिंगलीचा विषय असेल का ? जो अशी टिंगल करतोय त्याला त्यात वावगे वाटत नसेल. कदाचित स्वतःच्या आईवडीलांच्या बाबतीत तो तितकासा संवेदनशील नसेल म्हणून त्याला भावना का दुखावल्या याचे आश्चर्य वाटत असेल. त्याच्या दृष्टीकोणातून हे खुळचट प्रकरण असेल. त्याच वेळी ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे, ज्यांनी आपल्याला भलं बुरं समजण्यासाठी सक्षम केलं आणि जे उद्याही आपली काळजी घेणार आहे त्यांच्याबद्दल असे बोलल्याने भावना दुखावणे स्वाभाविक असेल. या वादात कोण बरोबर कोण चूक हे कोण ठरवणार ? प्रत्येकाची आपापली व्याख्या असेल.

जिथे उगाचच भावना दुखावल्या जातात ती घटना आणि वर दिलेली घटना या वेगवेगळ्या काढण्यासाठी शहाणपणाची गरज असते. विकास दिव्यकीर्ती यांनी यासंबंधात न्यायालयांनी ज्या कसोट्या बनवलेल्या आहेत असे सांगितले त्या कौतुकास्पद वाटल्या. व्याख्या दर वेळी समाधान करतील असे नाही. केस टू केस पहायला पाहीजे. इथे आपण न्यायाधीश हे शहाणे आहेत असे समजले आहे. कुठे तरी सहमती दर्शवावीच लागते. न्यायाधीशच जर शहाणा नसेल तर ते आपले दुर्दैव.

राजकीय कारणांमुळे असेल किंवा अन्य काही वर्षे या भावना दुखावतील. पण अशी घुसळण होत होत लोक जेव्हां प्रगल्भ होतील तेव्हां भावना दुखावणे हा प्रकार राहणार नाही. त्याला काही वर्षे जावी लागतील. ही परिस्थिती ध्यानात न घेता कुणी अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या कडक व्याख्या अंमलात आणणार असेल तर अवघड आहे. (याचा अर्थ फुटकळ वाद समर्थनीय आहेत असे नाही, गैरफायदा घेणारे असणारच).

दोन्हीकडे काही जण असे असतात कि ते आव आणतात. काहींना भारतात बालपण, तरूणपण घालवूनही भारतात असे होते ? असे आश्चर्य वाटते. हे खरे असते कि ते आव आणतात कल्पना नाही. काही वेळा भारतात असताना बुरसटलेल्या कल्पना कवटाळणारे लोक प्रगत वातावरणात गेल्यानंतर तिथल्याप्रमाणे मोल्ड होतात. आपला हा प्रागतिक प्रवास नोंद करण्याकरता तिथे बसून आपण तुलनेने प्रगत झालो आहोत हे दर्शवण्याकरता काही जण भारतातल्या घडामोडींबद्दल खूप टोकाचे व्यक्त होतात.

तर काही जण दुखावले गेलेले नसतानाही उगीचच उपद्रव म्हणून भावना दुखावल्याचा आव आणतात. काही वेळा प्रत्यक्षात प्रगत विचार असलेले राजकीय किंवा अन्य फायद्यांसाठी भावना दुखावल्याचा कांगावा करतात. यात त्यांना ग्राहक मिळतात. काही वेळा प्रगत असल्याचा आव आणणारे बरेचदा दुखावले जातात पण दाखवत नाहीत, तरीही अबोला धरणे, एखाद्याला टाळणे अशा कृतीतून ते दिसते.

त्या पेक्षा सरळ माझ्या भावना दुखावल्या असे खरे खुरे सांगणारे लोक मला प्रामाणिक वाटतात म्हणजे संवाद सुद्धा होतो ( मोर्चे आणणारे गृहीत धरलेले नाहीत).

जाता जाता : भादु हा एकच मुद्दा नाही. अनेक घटनांमधे (भारतासारख्या ठिकाणी) जी एक गोष्ट मिसिंग असते ती म्हणजे एम्पथी. एक तर लोक सिंपथीचा सहारा घेतात किंवा मग हेटळणी. सगळेच महात्मा गांधी किंवा बुद्ध झाले असते तर मग जग वेगळेच असते.
भली मोठी कमेण्ट झाली. बास आता. Happy

मृण्मयी किंवा इतर कोणालाही मुळात याने वाद होऊ शकतो अशी शंकाच आली नसेल.

>>>
हे पटले नाही. हे नाव ओढून ताणून केलेले आहे. ते मुद्दाम वादंग निर्माण करून फुकट प्रसिद्धीसाठी केले की कट्ट्यावर टवाळ्या करताना वापरले व तसेच ठेवले एवढंच काय ते समजत नाही.

मनाच्या श्लोकांचाच फॉर्मॅट वापरून त्यातील वाक्यांतच फेरफार करून तयार केलेले "श्लोक" पुलंच्या "बटाट्याची चाळ" मधे आहेत. मधे कोणीतरी एक "उदासबोध"ही लिहीला आहे. "गाळीव इतिहास" मधे बरेच काय काय आहे. तो विनोद आहे, अपमान नव्हे हे समजण्याइतकी विनोदबुद्धी पूर्वी शिल्लक होती
>>>
पु. ल. काय किंवा पाडगावकर हे लिजंड होते. त्यांना सवंग प्रसिद्धीची गरज किंवा सोस नव्हता, ‘टवाळा आवडे विनोद’ असं जेव्हा पु. ल. म्हणतात तेव्हा तो दासबोध पचवून आलेला सेल्फ डेप्रिशिएटींग ह्युमर असतो हे मिडीआ मर्यादित असला तरी लोकांना माहित होते.

पु. ल. नी कधीही असंबद्ध/संदर्भरहित विनोदाचा वापर केला नाही. वारणानगरला तत्कालिन राजकिय दिग्गजांसमोर केलेले भाषण किंवा सावरकरांवरील भाषण हा त्याचा उत्तम नमुना आहे.

विनोदबुद्धी फारशी असेल नसेल पण बहुतांश जनतेला माहिती नसलेले २ मराठी पिक्चर आणि ४ सिरीअल करून सेलेब्रिटी झालेल्यांचे उद्योग आणि बहुश्रुत पुलं/पाडगावकरांनी केलेली टवाळी यातला फरक समजण्याइतपत सुज्ञपणा जनतेकडे नक्कीच आहे.

सवंग प्रसिद्धी हा उद्देश असणाऱ्या लोकांना अनुल्लेखाने मारणे हा खरं तर उत्तम उपाय. पण हे पटत नसेल, तेवढी समज वा पेशन्स नसेल तर कायदेशीर मार्गाने जरूर विरोध करावा.

कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काही थोर्थोर संपादक, लेखक, कवी, पत्रकार, रंगकर्मी इ.इ. चें राखीव कुरण नाही.

बाकी महाराष्ट्रात फुकट प्रसिद्धी मिळवून झाल्यावर देशभर हवी असल्यास ‘मन की बात’ शीर्षक जरूर ठेवावे.

पु. ल. काय किंवा पाडगावकर हे लिजंड होते. त्यांना सवंग प्रसिद्धीची गरज किंवा सोस नव्हता, ‘टवाळा आवडे विनोद’ असं जेव्हा पु. ल. म्हणतात तेव्हा तो दासबोध पचवून आलेला सेल्फ डेप्रिशिएटींग ह्युमर असतो हे मिडीआ मर्यादित असला तरी लोकांना माहित होते.

पु. ल. नी कधीही असंबद्ध/संदर्भरहित विनोदाचा वापर केला नाही. वारणानगरला तत्कालिन राजकिय दिग्गजांसमोर केलेले भाषण किंवा सावरकरांवरील भाषण हा त्याचा उत्तम नमुना आहे.

विनोदबुद्धी फारशी असेल नसेल पण बहुतांश जनतेला माहिती नसलेले २ मराठी पिक्चर आणि ४ सिरीअल करून सेलेब्रिटी झालेल्यांचे उद्योग आणि बहुश्रुत पुलं/पाडगावकरांनी केलेली टवाळी यातला फरक समजण्याइतपत सुज्ञपणा जनतेकडे नक्कीच आहे.

सवंग प्रसिद्धी हा उद्देश असणाऱ्या लोकांना अनुल्लेखाने मारणे हा खरं तर उत्तम उपाय. पण हे पटत नसेल, तेवढी समज वा पेशन्स नसेल तर कायदेशीर मार्गाने जरूर विरोध करावा. >>> +१

आजकालची लोकं फार संवेदनशील झाली आहेत जे चटकन भावना दुखावून घेतात आणि आधीची अशी नव्हती हे काही पटत नाही.

तसे असते तर नव्वदीत धार्मिक दंगली झाल्या नसत्या. दोन्हीकडील माणसे त्यात नुसती पेटली होती. त्या काळात चटकन विचार बदलून हिंसक झालेली माणसे फार जवळून पाहिली आहेत.
त्यामुळे काळ कुठलाही असो, लोकांना मुद्दाम भडकावले की ती भडकतात. कारण मुळात कुठेतरी आत ते सुप्त स्वरूपात लपलेले असतेच. जो पर्यंत कोणी उंगली करून त्याकडे लक्ष वेधत नाही तो पर्यंत बाहेर येत नाही.

हो ना..
या आधी अश्या केसेस मध्ये कोणाच्या भावना दुखावून राडा झाला नाही याचा अर्थ असा नाही की तेव्हा लोकं फार प्रगल्भ होते वगैरे.. तर तेव्हा कोणी त्यांना हे (आपल्या राजकीय/आर्थिक फायद्यासाठी) पॉइंट आऊट करून दाखवले नाही इतकेच.

आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य जर दुसर्‍यांच्या भावना न कळत किंवा मुद्दाम दुखावत असेल तर काय करावं?
तसंच
आपल्या भावना दुसर्‍यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यानं कितपत दुखवून घ्यायच्या?
तसंच
आपलं अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे दुसर्‍याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा / भावनांपेक्षाअधिक महत्त्वाचं वाटतंय का?
तसंच
एका व्यक्तीचं (किंवा एका मर्यादित गटाचं) अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे मोठ्या समाजगटाच्या भावनांपेक्षा महत्त्वाचं आहे का?
तसंच
समाजातील वैचारीक खुलेपण वि. समाजातील शांती यांची सांगड कशी घालावी?

असे अनेक प्रश्न पडले. सरसकट उत्तरं शक्य नाहीत याची जाणीवही आहे.

पु. ल. काय किंवा पाडगावकर हे लिजंड होते. >> अत्र्यांनी, जयवंत दळवींनी, विंदा नी असा विनोद, असे ताशेरे मारले आहेत. हे सगळे काही जन्मजात दिग्गज न्हवते.
इथे तर फालतू नावावर केलेली एक शाब्दिक वेलांटी आहे. इतक्या गरीब रेटारेटी ला सवंग म्हणणं ही जीवावर येतय. काय त्यावर तात्विक वाफ घालायचा!

गरीब आहेच. २-३ दिवस खुमखुमी रोखून धरली होती. पण आता इतके सगळे वाद घालताहेत तर मी मागे राहून कसं चालेल? शिवाय 'वादे वादे जायते तत्त्वबोधः' असं कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे.

सध्या अस्मितांची गळवे फार पिकली आहेत आणि ठसठसत आहेत. केंव्हा फुटतील हे सांगता येत नाही.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज , शाहू, फुले, डॉ आंबेडकर पासून मदर तेरेसा, रामदास स्वामी , हेडगेवार, सावरकर पर्यंत कुणा बद्दलही काहीही बोलायची लिहायची सोय नाही.

मग त्यात महंमद पैगंबर वगैरे तर बोलायलाच नको. थेट "सर तन से जुदा" कडे वाटचाल चालू होते.

बाकी पिंजरा सिनेमा त एक वाक्य होते.

मास्तर समाज तमाशाने बिघडला नाही कि भजनाने सुधारला नाही

बाकी सिनेमा हिट करण्यासाठी बॉलिवूड वाले आपल्या आईला सुद्धा बोर्डावर नाचायला उभे करतील. त्यांच्याबद्दल बोलायलाच नको.

बाकी सिनेमा हिट करण्यासाठी बॉलिवूड वाले आपल्या आईला सुद्धा बोर्डावर नाचायला उभे करतील. त्यांच्याबद्दल बोलायलाच नको.
>>>>>

मी जर बॉलीवूड मधील असतो तर या वाक्याने माझ्या भावना नक्कीच दुखावल्या असत्या.
किंबहुना नसून सुद्धा मला आईचा असा उल्लेख खटकला.

पण काही जणांना हे खटकणार नाही. यात काही वावगे वाटणार नाही. काहींच्या भावना दुखावणार नाहीत.

कोण चूक आणि कोण बरोबर हे कसे ठरवावे?

राभू - पोस्ट नीट वाचली. समजली. त्यातील मुख्य मुद्दा पटलाही. पण त्यात एक खोच आहे. उगाचच डिवचणे आणि एखाद्या स्वाभाविक बोलण्यातून, सादरीकरणातून भावना दुखावून घेणे यात जर स्पष्ट फरक करता आला, तर त्यावरच्या उपायांमधेही नक्की फरक करावा. साजिर्‍याने व्हिडीओची लिंक काढली आहे. पण मी शोधतो, तुम्ही नाव दिलेले आहे.

काहींना भारतात बालपण, तरूणपण घालवूनही भारतात असे होते ? असे आश्चर्य वाटते >>> हे मला उद्देशून नाही - जनरल आहे याची कल्पना आहे Happy पण तरीही लिहीतो - मला आश्चर्य वाटते कारण अगदी २०-३० वर्षांपूर्वी हे इतके कॉमन नव्हते. गेल्या काही वर्षांत जास्त वाढले आहे. आधीपासूनच होत असते तर इतके जाणवले नसते.

सध्या अस्मितांची गळवे फार पिकली आहेत आणि ठसठसत आहेत. केंव्हा फुटतील हे सांगता येत नाही.
>> काळजी घ्या.. फील बेटर अस्मिता !!

Lol च्रप्स. हल्ली रोजच कशानकशाने दुखावणारी अस्मिता पाहून मला आयडेंटिटी क्राईसेस आले आहेत. Proud

हर्पा आणि असामी Lol
माझेमन, पोस्ट आवडली आणि नंतरची Lol
फा, पोस्टी पटल्या आणि आवडल्या. 'अपमान फिशिंग' चपखल आहे अगदी. अनुमोदन.

पिक्चर आपापल्या नशिबाने पडू द्यायचा असता, काही दम वाटला नाही यात. वादातही नाही आणि सिनेमातही नाही. मलाही वाटत नाही त्यांनी वादंग व्हावा म्हणून हे नाव दिले असेल, मराठी चित्रपटाला हे परवडणारे नाही किंवा ते इतके धूर्त आणि धोरणी वाटत नाहीत. करायला गेले एक आणि झाले भलतेच - वाटतेय. ते नावही काही फार कल्पक वाटले नाही, "लैला मजनू" सारखं पण पवित्र आणि ओळखीचे काही तरी करायला गेले आणि "सनी संस्कारी की तुलसी कुमारी" झाले. Happy

मला सुशीला सुजीत आठवलेला Lol
पुढच्या वेळी मनाचे श्लोक आठवेल. Lol पैसे देऊन दाखवला तरी यायला एकही बघणार नाही.

तिघांनाही Lol पण तुमची नावं पवित्र नाहीत त्याचं काय. Wink

सुशिला सुजीत तर चक्क अपवित्र आहे, ह्या नावाखाली सुद्धा त्यांनी च्यवनप्राशच भरवले असेल म्हणा - अशी तर नावं आजकाल. एका भावनेला दुसरीच हिंट देऊन ठेवतात. भलेही पिक्चर मधे दम नसो, आपल्याला नाव मात्र पवित्र आणि 'कॅची' हवं आहे, नाहीतर वादंग कसा माजवणार. अशाने तर शांतता नांदेल आणि आपला तो हेतू मुळातच नव्हता !

"लैला मजनू" सारखं पण पवित्र आणि ओळखीचे काही तरी करायला गेले आणि "सनी संस्कारी की तुलसी कुमारी" झाले. >> Lol ससंकीतुकु पाहिलास की काय!

Pages