India's biggest cover up: अनुज धर ह्यांच्या २० वर्षांच्या नेताजींच्या रहस्याच्या अभ्यासाचा निष्कर्ष

Submitted by मार्गी on 13 August, 2022 - 02:26

सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.

(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये http://niranjan-vichar.blogspot.com/2022/08/indias-biggest-cover-up-infe... इथे वाचता येईल)

✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे

नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं‌ त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही‌ असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.

१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात हा तेव्हाही जाणकारांनी स्वीकारला नाही आणि तो ब्रिटीश- अमेरिकन अशा विरोधकांनीही मान्य केला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये असंख्य विसंगती होत्या, पुरावे उपलब्ध नव्हते. अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. परंतु काही जणांना नेताजी गतप्राण झाले, हे सांगणं सोयीस्कर होतं, त्यामुळे ती‌ बाजूच खरी आहे, असं रेटून सांगितलं गेलं. तुटक तुटक ठिकाणी नेताजी रशियात असल्याचे पुरावे लोकांना माहिती होते, कालांतराने भारतातही त्यांना काही जणांनी बघितलं होतं. पण ही गोष्ट कधीही "सरकारी सत्य" बनली नाही. का? हे जाणण्यासाठी अनुज धरचे काही पोडकास्टस ऐकावे लागतील. अनुज धर ह्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे! ज्या काळी हा विषय जवळ जवळ मागे पडलेला होता, तेव्हा 'एकला चोलो रे' हा मंत्र घेऊन ह्यांनी नेताजींच्या रहस्याच्या उत्खननाला स्वत:ला वाहून घेतलं. आज हे त्यांचं जीवन झालं आहे. २००४- ०५ च्या सुमारास 'Enigma of Netaji Subhas Bose' अशी हिंदुस्तान टाईम्सची लेखमालिका नेटवर वाचल्याचं आठवतं. ती त्यांनीच केलेली होती. हिंदुस्तान टाईम्समधली कव्हर स्टोरी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे तर हेच त्यांचं मिशन बनलं. कालांतराने इतर नेताजीप्रेमी व संशोधक असे चंद्रचुड घोष व इतर लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. सरकार दरबारी असंख्य अडथळ्यांमधून आणि विरोधाच्या अनेक स्तरांवर सतत संघर्ष करून त्यांनी वाट काढली. सरकारी लोकांकडून एक एक गोष्ट करून घेणं ही अशक्य बाब असते! हळु हळु काही सरकारी अधिकारी, नेताजीप्रेमी, माजी अधिकारी अशांच्या मदतीने काही तथ्य समोर आणली. पारदर्शकतेला मानणा-या विदेशांमधील माहितीचा छडा घेतला. कालांतराने आलेल्या माहितीचा अधिकारासारख्या शस्त्राचा व इंटरनेटवर होणा-या जागतिक संपर्काचा उपयोग करून घेतला. त्याच काळात म्हणजे १९९९ मध्ये नेताजींच्या रहस्यासाठी तिसरा आयोग- मुखर्जी आयोग स्थापन झाला होता. मुखर्जी आयोगाने खूप उत्तम काम केलं आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेई येथे अपघात झालाच नव्हता, हे सिद्ध केलं. नेताजींचं रशियातलं आणि भारतातलं वास्तव्य जवळ जवळ उघड होईल, अशा स्वरूपाचे इतर पुरावे समोर आणले. पण २००५ मधल्या केंद्र सरकारने ह्या आयोगाचा अहवालच फेटाळला. परंतु तरीही सत्य प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रकारे समोर येतच आहे. अप्रत्यक्ष प्रकारे हे अनेकांना तुटक तुटक माहिती होतंच, पण आता अनेक धागे दोरे एकत्र येत आहेत. नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक डॉटस जोडले जात आहेत. २०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. देश म्हणून आपल्यामध्ये देशप्रेम आणि देशासाठी काम केलेल्यांसाठी प्रेम असेल तर इतर लपलेल्या गोष्टीही समोर येतील.

मांचुरियामार्गे रशिया!

ह्या सर्व संशोधनातून समोर आलेले धागे मांडतो. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी अनुज धरचे पोडकास्टस वाचावेत आणि २० वर्षांच्या अभ्यासासह व शेकडो कागदपत्रांचा पुरावा देऊन त्याने लिहीलेलं 'India's biggest cover up' पुस्तक वाचावं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष- धागे इथे मांडतोय. ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रकारे दुजोरा मिळालेला आहे, पुरावे मिळालेले आहेत. १८ ऑगस्ट १९४५ चा अपघात हा केवळ बनाव होता. ज्याप्रमाणे कोलकत्यावरून नेताजी जर्मनीला जाण्यासाठी निसटले होते व ते प्रत्यक्षात काबूलजवळ पोहचल्यानंतर ते घरात नसल्याची 'बातमी' सांगण्यात आली होती, त्याप्रमाणे १८ ऑगस्टच्या कथित अपघाताची बातमी टोकिओवरून २२ ऑगस्टला देण्यात आली होती व तेव्हा ते मांचुरियाजवळ पोहचले असावेत. पुढे मांचुरियामार्गे सोव्हिएट रशियात ते गेले. आल्फ्रेड वेग ह्या अमेरिकन पत्रकाराने १८ ऑगस्टनंतर त्यांना एकदा बघितल्याचं नेहरूंच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतर एक भारतीय इंजिनिअर एका ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी सोव्हिएट रशियात गेला होता. त्या विशिष्ट प्रकल्पावर त्याचा प्रमुख एक जर्मन होता. तो जर्मन रशियामध्ये अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याने त्या भारतीय इंजिनिअरला विश्वासात घेऊन सांगितलं की, तो नेताजींना भेटला होता. आणि १९४१ मध्ये त्याने जर्मनीमध्ये नेताजींना समोरून बघितलं होतं. व्यावसायिक व राजकीय नेत्यांच्या एका कँपवर तो असताना त्याने तिथे नेताजींना ओळखलं व जर्मनमधून संवादही साधला होता. त्यांना राजदुताचा दर्जा दिलेला होता. जेव्हा त्या इंजिनिअरने मॉस्कोच्या भारतीय राजदुताला ही बातमी सांगितली, तेव्हा त्या राजदुताने त्याला धमजीवजा सूचना केली की, तुझ्या कामाकडेच लक्ष दे. पुढे भारतात आल्यावर आणि निवृत्त झाल्यावर त्याने ही आठवण सांगितली व मुखर्जी आयोगापुढे तशी साक्षही दिली. तथाकथित तैपेई अपघातानंतर एक वर्षाने म्हणजे जुलै १९४६ मध्ये गांधीजींची सेक्रेटरी व दादाभाऊ नवरोजींची नात खुर्शीद नवरोजीने अमेरिकन पत्रकार लुई फिशरला लिहीलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, जर रशियन सेनेच्या मदतीने नेताजी भारतात आले तर गांधी- नेहरू काही करू शकणार नाहीत. सगळा देश त्यांच्यासोबत जाईल.

मेरा भारत महान

एक प्रश्न इथे पडतो की, नेताजी रशियात होते तर भारतात का आले नाहीत? किंवा नंतरही आले तेव्हा लपून का राहिले? त्याचं एक कारण हे आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं. किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते. स्वत: नेहरूंनी १९५६ मध्ये ब्रिटनच्या दौ-यात राणीच्या एकनिष्ठेची प्रतिज्ञा घेतलीही होती. आणि ह्यासंदर्भात धक्कादायक पण कोणाला माहिती नसलेली वस्तुस्थिती ही आहे की, जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं. त्याबरोबर स्वतंत्र भारतात असे अनेक कायदे होते जे कोणी स्वाभिमानी व देशप्रेमी मान्य करणार नाही. अस्पृश्यता ही कायद्याने समाप्त होण्यासाठी १९५५ वर्षं यावं लागलं. गुन्हेगार जमाती अधिनियमासारखा काळा कायदा १९५२ पर्यंत होता. तेव्हा हे स्वातंत्र्य खरोखर स्वातंत्र्य होतं का केवळ dominion status होतं, हाही मुद्दा समोर येतो. ब्रिटीश नेताजींना युद्ध गुन्हेगार मानत होतेच, पण एकाही भारतीय नेत्याने पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांमुळे ब्रिटीशांना गुन्हेगार म्हंटलं नाही.

सरकारची भुमिका काहीही असो, नेताजींचे जवळचे सहकारी, त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी एमिली अशा जवळच्यांना जाणीव होती की, नेताजी रशियात आहेत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबावर सरकार पाळत ठेवून होतं. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याची काय गरज? त्यामुळे हे एक प्रकारे ज्यांना आतल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी उघड सत्य होतं. त्यामुळेच तर हे रहस्य सोडवण्यासाठी पहिला आयोग १९५६ च्या सुमारास व दुसरा आयोग १९७० साली स्थापन केला गेला. अनेकदा सरकारने प्रयत्न केला की, टोकिओच्या रेनकोजी मंदिरात नेताजींच्या तथाकथित अस्थी भारतात आणून हा विषयच संपवावा. पण नेताजींच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे हे करता आलं नाही.

सरकारची‌ भुमिका जास्त करून सत्य समोर येण्यापासून टाळण्याची होती. तत्कालीन तैवानसोबत भारताचे राजकीय संबंध नाहीत, म्हणून सरकारने पहिल्या दोन आयोगांना तैवानला जाऊ दिलं नाही. किंवा कदाचित प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तिथे असलेल्या "पुराव्यांचा" फोलपणा उघड होण्याची भिती असेल. त्यावेळी नेताजी मात्र केवळ स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि त्यांना ओळखणा-या देश- विदेशातील जीवाभावाच्या सहका-यांच्या मदतीने मांचुरिया- चीन- रशिया अशा अज्ञात देशात झेप घेत होते. किती वेगवेगळे देश- प्रदेश! अफघनिस्तान- रशिया- इटाली- जर्मनी नंतर म्यानमार- थायलंड- इंडोनेशिया- सिंगापूर- जपान! हे काही त्यांच्या मित्रांचे देश नव्हते. इथेही उर्मट राज्यकर्ते आणि अधिकारी होतेच. पण त्या सर्वांना नेताजींनी आपल्या देशप्रेमाच्या शक्तीपुढे झुकवलं. उर्मट राज्यकर्त्यांनी त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केल, पण ते कुठे झुकले नाहीत आणि आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिले. अगदी हिटरलरलाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाची‌ चुणूक दिली. भारतीय लोक म्हणजे शेळ्या- मेंढ्या आहेत असं मानणारा हिटलर वरमला. डोळ्याला डोळे भिडवून आणि प्रचंड आत्मविश्वासाने शेक हँड करून त्यांनी हिटलरची भेट घेतली. आणि विदेशी शक्तींची मदत ही एका स्वतंत्र देशाला केलेली मदत आहे जी स्वातंत्र्यानंतर हा देश कृतज्ञतेने परत करेल ही त्यांची भुमिका होती. पण तेव्हाचे भारतातले मुख्य नेते हिटलरला भेटणं म्हणजे नरकात बुडाल्यासारखी गोष्ट करत होते. "हिटलरने सैतानावर जरी स्वारी केली तरी माझा सैतानाला पाठिंबा आहे" असं म्हणणारा भारतद्वेष्टा चर्चिल त्यांना चालत होता. कृत्रिम दुष्काळामुळे ३० लाख बंगाली लोकांचा बळी घेणारा व भारताला गुलाम ठेवू इच्छिणारा चर्चिल त्यांना चालत होता.

Your dead man- गुमनामी बाबा!

रशियामध्ये काही काळ अज्ञातवासात राहून आणि देशामधील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल होतील अशी वाट अनेक वर्षं बघून नेताजी गुमनामी बाबांच्या रूपात भारतात आले, असं आज म्हणता येऊ शकतं. अर्थात् ते रशियात असतानाही भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने कम्युनिस्ट देशांमध्ये प्रवास करायचे, अनेक नेत्यांसोबत संपर्क ठेवायचे, असेही तुटक धागे दिसतात. १९५५ नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये नेपाळ सीमेपासून जवळ बस्ती, फैजाबाद व तशा इतर साध्या गावांमध्ये गुमनामी बाबांचं वास्तव्य होतं. पूर्णपणे पडद्याआड ते राहायचे, एकांतात असायचे, सतत चेहरा झाकून ठेवायचे आणि कोणालाही भेटायचे नाहीत. पण त्यांच्या साहित्यात मात्र इंग्लिश- बंगाली- जर्मन पुस्तकं, युद्ध, गुप्तहेर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यावरची पुस्तकं होती. कालांतराने त्यांचा आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेवक व नेताजींचे म्हणजे त्यांचेच जुने मित्र- सहकारी ह्यांच्यासोबत संपर्क झाला. आणि हळु हळु नेताजींच्या 'इनर सर्कलला' त्यांच्या आगमनाची जाणीव होते. त्यांचे लहानपणीचे मित्र, तरुणपणीचे सहकारी, कार्यकर्ते व आझाद हिंदचे लोक अशा अनेक मंडळींनी गुमनामी बाबा किंवा भगवनजी किंवा पर्देवाले बाबा ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही. कदाचित देशांतर्गत सत्ता संघर्ष, अहिंसावाद्यांचा विरोध, अन्न- धान्य व मदतीसाठी भारताचं अनेक देशांवर अवलंबून असणं व देश ख-या अर्थाने स्वतंत्र नसणं अशी कारणं असतील. असो.

अनेकांना प्रश्न पडतो की, मग नेताजी अशा अज्ञातवासात व लपून राहताना करत काय होते? ह्याची दोन- तीन उत्तरं स्पष्ट मिळतात. एक तर ते साधना करत होते. श्री अरविंदही क्रांतिकारक होते, पण ते पुढे साधनेत गेले आणि ती साधनाही देशासाठी होती. नेताजी १७ व्या वर्षी ७ महिने हिमालयात निघूनही गेले होते. ती त्यांची एकांत साधना आता पुढे जात होती. त्याबरोबर ते कम्युनिस्ट फोल्डसह अनेक आशियातल्या नेत्यांच्या गुप्त संपर्कात होते आणि वेगवेगळे प्रश्न, व्हिएतनामसारखं युद्ध ह्याबद्दल त्यांना मदतही करत होते, असंही गुमनामी‌ बाबांच्या पत्रातून व बोलण्यातून दिसतं. अगदी भारत- चीन युद्ध आणि बांग्लादेश मुक्तीसंग्राम ह्यामध्येही त्यांनी गुप्त प्रकारे मध्यस्थी/ हस्तक्षेप केलेला आहे, असं ते सांगतात. एका बाजूला हे अविश्वसनीय वाटेल. पण हा माणूस कसा होता, हे आपल्याला परत एकदा आठवायला पाहिजे. आयसीएस राजीनाम्यानंतर म्हणजे १९२१ पासून १९४१ पर्यंत ते भारतात सक्रिय होते (त्यातही काही वर्षं तब्येतीमुळे विदेशामध्ये सक्तीची विश्रांती घेत होते व राज्यकर्त्यांच्या भेटीही घेत होते), ह्या २० वर्षांच्या सक्रिय आयुष्यात तुरुंगवास, स्थानबद्धता, मंडालेचा विजनवास अशा गोष्टी धरल्या तर जेमतेम तीन- साडेतीन वर्षं ते मुक्त होते आणि तरीही इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. संपूर्ण देशभर त्यांचे लोक होते. गांधीजींविरुद्ध निवडणूक लढून ती ते जिंकू शकले व अगदी मद्राससारख्या राज्यांमधून त्यांना समर्थक मिळाले होते. अशी त्यांची योग्यता असेल तर त्यांना पारख असलेले विदेशी राज्यकर्तेसुद्धा कधीच दूर करणार नाहीत. ब्रिटीशांच्या पोलादी पकडीमधून जो अगदी शिवाजी महाराजांच्या हुशारीने पसार झाला होता, ज्याच्याकडे गुप्त संपर्काचं इतकं प्रभूत्व होतं जो नाझींमधील हिटलरविरोधी गटही लगेच ओळखू शकला, त्याला कोणत्या सीमा अडवू शकतील? आणि मग तो माणूस गुप्त प्रकारे अनेक देशाच्या नेत्यांच्या संपर्कात असणं ह्यात आश्चर्य ते काय? आणि मग अशा माणसाला काम करण्यासाठी समोर येऊनच केलं पाहिजे अशीही गरज उरत नाही. असो. ह्याबद्दल असंख्य अप्रत्यक्ष पुरावे दिसतात, अनेक डॉटस दिसतात, जे आपण आपल्या बुद्धीने कनेक्ट करू शकतो. शास्त्रीजींच्या मृत्युचं गूढ, स्वतंत्र भारतातील अनेक राज्यकर्त्यांचा कार्यकाळ, अगदी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, नरसिंह राव, अटलजी, मनमोहन सिंह अशा पंतप्रधानांचे कार्यकाळ असे अनेक संदर्भ ह्यात येतात. प्रत्येक बिगर काँग्रेस सरकारने हे गूढ उलगडण्यासाठी केलेली मदत त्यात दिसते. आणि १९९५ च्या सरकारमधले विदेश मंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले नेते एमिली शेंकलना टोक्योच्या अस्थी आणण्याच्या प्रस्तावावर सही करण्याची सक्ती करताना दिसतात (त्यांना त्या घराबाहेर जायला सांगतात). अशा अनेक गोष्टीचे पुरावे सरकारी कागदपत्रांत आहेत. आता डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांत दिसतात. असो.

मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांच्या हस्ताक्षराची व डिएनएची चाचणी केली होती. एका तज्ज्ञाने हस्ताक्षर जुळतं हा निष्कर्ष दिला. सरकारी तज्ज्ञांनी नकारात्मक निष्कर्ष दिला. आणि नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला. कारण पुरावे आहेत, पण ते कागदोपत्री सबळ ठरले नाहीत. कारण आपल्या देशाची उदासीनता, अनास्था आणि भ्रष्टाचार! पण खाजगीमध्ये बोलताना न्यायमूर्ती मुखर्जींनी गुमनामी बाबा हे तेच होते, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि योगायोगाने त्यांचं हे सांगणं एका कॅमेरामध्ये शूट झालं आहे व तो व्हिडिओ इंटरनेटवर आज उपलब्धही आहे. गूगल करू शकता. गुमनामी बाबा हे तेच हे त्यांनाही माहिती होतं, पण चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सरकारने असहकार केल्यामुळे ते तसं सिद्ध करू शकले नाहीत. पण अप्रत्यक्ष पुरावे आहेतच. अनेक बंगाली क्रांतीकारक आणि राजनेते लीला रॉय, समर गुहा, आझाद हिंद सेनेतील दिग्गज, तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री संपूर्णानंद अशा अनेकांनी त्यांनाच नेताजी म्हणून दुजोरा दिला होता. फक्त वर दिलेल्या कारणांमुळे हे उघड सत्य होऊ शकलं नाही. असो.

आजच्या काळात नेताजी आणि त्यांचं सत्य आणि योगदान हे सगळं आठवण्याचे दोन उद्देश निश्चित आहेत. एक तर माझ्या बाबांचं पुढे काय झालं, हे जाणणं माझा अधिकार आहे. किंबहुना जो मुलगा- मुलगी असेल त्याला/ तिला त्याशिवाय चैन पडणार नाही. आणि त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की, ही प्रेरणा, ही ऊर्जा आजच्या पिढीला व पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. असंही अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं, आपण त्यांच्या निदान १% होण्याचा प्रयत्न करावा, इतका विश्वास मिळाला पाहिजे. असंख्य अडथळे असले तरी त्यावर मात करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि आपण आज जे स्वातंत्र्य- मर्यादितच पण तरीही स्वातंत्र्य उपभोगतोय, जे सुख अनुभवतोय, त्याची किंमत किती मोठी होती, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ही जाणीव झाली, ही आठवण राहिली तर आपण निदान १% तरी त्यांना आत्मसात करू शकू. हे करण्याचे अनेक मार्ग असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात हिंमतीने, स्वाभिमानाने आणि स्वयंप्रेरणेने काम करणं असेल. नवीन पिढीला पथनाट्य, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा माध्यमातून हे सांगणं असं असेल. आपल्या ठिकाणी सत्याचा शोध घेत राहणं असेल. आपण १% जरी हे करू शकलो तरी आपलं आयुष्य कृतार्थ ठरेल.

'नेताजी द फरगॉटन हिरो' चित्रपटात एकला चोलो रे गाण्यात एक ओळ आहे. जर आपण देश म्हणून आणि नेताजींचे वारस म्हणून त्यांना १% आत्मसात करू शकलो तर त्याच गाण्याची पुढची ओळही सार्थक ठरेल-

मज़िलें कभी क्या मिलेगी हमें
होगी क्या सहल कभी जो राह है कड़ी
आज हर जवाब हमको मिल जाएगा
आ गई है आज फैसले की घड़ी

(निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)

Group content visibility: 
Use group defaults

खरेखोटे माहीत नाही.

पण भाषा, शब्दरचना/ वाक्यरचना संध्यानंद स्टाईल किंवा भोंदू फॉरवर्डस् मध्ये वापरतात तशी वाटली.

मोदींनी फाईल् ओपन केल्या त्यातून काय निष्पन्न झाले ? मोदीप्रेमी लोक तर हातात कोयते घेऊनच बसले होते , कधी एकदा ह्यात गांधी नेहरू नाव येते !!

जपानच्या अस्थीकलशाची डीएनए टेस्ट होऊ शकत नाही.

जालियनवाला पोलिसांना पेन्शन मिळाली तर कुणाच्या पोटात का दुखावे ? भले भले पेशवे अन संस्थानिक पेन्शन खातच होते आणि इंग्रज गेल्यावर तेच पोलीस देशाच्या सेवेत आले.

आझाद हिंद सेनेची प्रेरणा सावरकरांनी दिली असे त्यांचे भक्त सांगतात , मग ते त्यांना तरी भेटले असतीलच की.

याबाबत अनेक अहवाल झालेले आहेत, पैकी एक 1956 साली शहानवाज खान यांचा होता , हे स्वतः आझाद हिंद सेनेत होते , नंतर काँग्रेस काळात नेते होते ( आणि ह्यांचा नातू म्हणजे शाहरुख खान !)

खुद्द जपान सरकारच्या तपासातही तेच आले आहे, त्यावर तर कुणाचे प्रेशर नव्हते.

त्या दिवशी ते विमान उडालेच नव्हते , हा संदर्भ कुठून मिळाला ? विमान उडाले व पडल्याचे सर्व अहवालात आहे

Historian Sugata Bose has rejected the analysis in light of the fact that the region and the airport was under Japanese occupation until 1946 and it was around 1949 when the Taiwaniese government finally consolidated itself.

काहिच्या काहि फेका फेक करुन फक्त देशात दंगे पेटवायचे एवढेच भाजपा च्या टिम चे काम आहे.

आणी त्याना मुर्ख लोक मिलालेले अस्ल्यामुळे अजुन सोपे झाअले आहे

मेजर जनरल शाह नवाज खान ही कोणी साधीसुधी असामी नव्हती. ते नेताजींचे उजवे हात होते. दुसऱ्या महायुध्दात ब्रिटिश भारतीय सेनेतून अतिपूर्वेच्या आघाडीवर लढत असताना जपान्यांकडून पकडले जाऊन ते त्यांचे युद्ध कैदी बनले. पुढे नेताजी सुभाषचंद्रांमुळे अतिशय प्रभावित होऊन आज़ाद हिंद सेनेत सामील झाले. नेताजींचा उजवा हात बनले. नेताजींनी त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी निवडलेल्या सर्वोत्तम सैनिकांच्या एका रेजिमेंटचे प्रमुख बनवून कोहिमा इंफाल येथे पाठवले. त्यांच्या नेतृत्वाखाली आ. हिंद फौजेने ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारली. आहिंद फौजेत त्यांचा किताब मेजर जनरल असा होता. पुढे युद्ध संपले. त्यांच्यावर ब्रिटिशांविरुद्ध बंड केल्याचा आरोप ठेवून ब्रिटिश भारतीय सेनेने त्यांना फाशीची सजा ठोठावली. त्यांच्या बचावासाठी पंडित नेहरूंसह अनेक बडे वकील कोर्टात उभे राहिले होते. अखेर जनक्षोभ होईल ह्या भीतीने त्यांचा मृत्युदंड रद्द झाला.
इतक्या महान आणि नेताजींच्या निकटच्या व्यक्तीने नेताजींच्या विमान अपघातातल्या मृत्यूवर शिक्कामोर्तब केले होते.

१९४७ सा. भारताला मिळालेले स्वतंत्र हे खरे स्वतंत्र नव्हते.तो गुप्त करार होता
काही वर्षांनी भारत परत ब्रिटिशांच्या ताब्यात धायच होतं
हे असे वाचले की खूप हसायला येते.
माणसाने बौद्धिक गुलाम असावे पण किती ह्याला पण मर्यादा आहेत.
१९४७ मिळालेले स्वतंत्र खरे स्वतंत्र नव्हते तर कशाला लाल किल्ल्यावरून दर वर्षी तो दिवस साजरा करत आहात.
कशाला घरोघरी तिरंगा चा तमाशा चालू आहे.

खरे स्वातंत्र्य

हा शब्द वाचल्यावरच लक्षात आले होते की हे खोटे मुखवटे आहेत

सत्ता एकाकडून दुसरीकडे गेली तरी मागच्यातला कुणीतरी ओरिइंटेशनसाठी रहातो, सगळा चार्ज त्याच्याचकडून तर घेणार ना

आता आपल्या देशात आहे ती पूर्ण लोकशाही आहे की करार झाला आहे .
हुकूमशाही च असणार पण लोकशाही सारखे वरून फक्त मुलामा द्यायचा असा.
(खरे स्वातंत्र्य ह्या धर्ती वर )

मुखर्जी आयोगाचा अहवाल नेताजीं च्या दोन वंशजांनी नाकारला आहे.
They sought DNA testing of the remains at the Renkoji temple in Tokyo and said this was raised by experts during the hearings of the Justice Mukherjee Commission, but was not acted upon. The authorities of the Renkoji temple were ready to extend full cooperation but Justice Mukherjee decided not to proceed with the DNA testing, or even with a prior examination of the remains to determine if a DNA test would be possible, they claimed.
नेताजींच्या कन्या अनिता पहिल्यापासून हेच मानत आल्या आहेत आहे की नेताजींचा १९४५ मधल्या विमान अपघातात मृत्यू झाला.

२०१७ साली माहिती अधिकाराखाली विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात संघ सरकार च्या गृहमंत्रालयाने सांगितलं की नेताजींचा मृत्यू १९४५ साली विमान अपघातात झाला असा सरकारचा निष्कर्ष आहे

अनुज धर हे अलेक्स जोन्स ची स्वस्त भारतीय आवृत्ती आहेत. नेहेरुंनी ब्रिटिशांना लिहिलेले "ते" पत्र लेखात नाही हेही नसे थोडके !

आता हा विषय highlite करण्याचा एक च हेतू आहे..
देशात दीर्घकाळ काँग्रेस सरकार होते त्या मुळे त्यांचा मृत्यू काँग्रेस सरकार नी लपवलं असा फक्त जनतेला भास निर्माण करून देणे.
दोन
गांधी जी आणि काँग्रेस बरोबर त्यांचे किती टोकाचे मतभेद होते की त्यांनी मृत्यू पण लपवला असे लोकांना वाटले पाहिजे
म्हणून च आवशक्य तेवढेच लिहायचे आणि महत्वाचे सोडून द्यायचे असे धोरण असते.
पण सुभाष बाबू उजव्या विचार श्रेणी असलेल्या लोकांना झेपले असते का.?
ते अजून असते तर.

अनुज धर हे अलेक्स जोन्स ची स्वस्त भारतीय आवृत्ती आहेत >>> जेम्स हैडली चेस ची स्वस्त भारतीय आवृत्ती आहेत

मला तुमच्या शैलीवर काही बोलायचं नाही, प्रत्येकाचे आपापले बायसेस असतात अन् त्याचा त्याचा ते ते जपून ठेवण्याचा हक्क लखलाभ.

अनुज उत्तम शोध पत्रकार आहे, हो मी आहे म्हणतो कारण तो विषयाच्या मुळाशी उत्तम जातो. पण नेताजी ह्या विषयात अनुजने ऑब्जेक्टिविटी हरवल्याचे दुर्दैवाने कायमच वाटत राहिले आहे, संशोधनाची वस्तू ओबसेशन झाली की असे होते कारण आपण घेत असलेल्या मेहनतीला फळ मिळावे अश्या पद्धतीने conformational biases माणूस आपलेसे करू लागतो. हे म्हणजे गूगलवर "हाऊ गांधी इज बॅड" सर्च करण्यासारखे आहे, गुगल तुम्हाला आवडेल असे सर्च रिझल्ट आणून समोर ठेवेल. हे झालं अनुज बद्दल माझं वैयक्तिक मत, आता आपण वळू आपल्या लेखनाकडे. काही मुद्दे आहेत ते खालीलप्रमाणे:-

स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं.

कदाचित हा शब्द आल्यावर नेताजींना युद्धकैदी केलं असतं, ब्रिटनच्या हवाली केलं असतं वगैरे सगळ्या hypothesis चा उभा केलेला डोलारा पोकळ होऊन थरथरू लागतो. भारत ब्रिटन गुप्त समझोता वगैरे विषय ओके आहे वाचायला पण ते पु ना ओक टाईप पुस्तकांत, माफ करा पण १९३८ हरिपुरा काँग्रेस अधिवेशन आणि १९३९ त्रिपुरी काँग्रेस अधिवेशनात हेच शिकवलं आहे आपल्याला, objective thinking and Questioning. मग महातम्याला प्रश्न विचारावे लागले तरी बेहत्तर Happy

जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं.

छोटीशी दुरुस्ती, ते पोलीस नव्हते तर गोरखा रेजिमेंटचे लष्करी जवान होते. जर दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांकडून लढलेले Cariappa, sam maneckshaw Field Marshal होऊ शकतात, तर सामान्य जवानांना पेन्शन नाकारण्यात काय हशील ?? आझाद हिंद सेनेच्या जवान व अधिकाऱ्यांना स्वातंत्र्यसैनिक दर्जा बहाल करून इंदिरा गांधींनी पेन्शन पण सुरू केली होती.

अजूनही कैक मुद्दे आहेत, आत्ता वेळेअभावी इतकेच, उरलेले परत मांडतो आरामात सवड मिळेल तसे.

(सुभाषवादी म्हणून objective ) वांड

Anuj Dhar
@anujdhar
Mahatma Gandhi opposed Purna Swaraj, for which Subhas Bose clashed with him. Gandhiji sought Dominion Statue, which is what we got in 1947. The King of England remained our King after 15 August. Gandhiji also wanted Union Jack on free India's flag.

उत्तम शोध पत्रकार?

Barech kahi माहीत नव्हते.या लेखामुळे,काहींच्या प्रतिसादांमुळे माहितीत भर पडली.

२०१४ नंतर खास भक्तांसाठी लावलेले शोध आहेत हे

खूप हसलो ह्या वाक्यावर.
.अजून असे बरेच शोध आहेत.
भारताला खरे स्वतंत्र मिळालेच नव्हते.तो फक्त करार होता ..
इथेच हा शोध थांबत नाही पुढे पण आहे नवीन शोध ..
९९ वर्षाच्या करारा वर स्वतंत्र दिले आहे.९९ वर्ष पूर्ण झाले की भारत परत त्यांना द्यायचा आहे.
विष्वगुरू च ह्या संकटातून भारताला वाचवतील असे फॉरवर्ड येतील पुढे.
फॉरवर्ड आले की मग लोकांना विश्व गुरू चे महत्व समजेल.

उत्तम शोध पत्रकार?

होय, त्याचे काही जुने क्राईम reports (आत्ता हाती नाहीत) उत्तम रिसर्च करून लिहिलेले होते, पण सुभाषचंद्र बोस मॅटर मध्ये, अन् तदानुषांगिक विषयात गडी ढेपाळून गेला पूर्ण. मला वाटते मी त्याच्या ह्या विषयासंबंधी असलेले lack of objectivity आणि conformational Biases ह्यावर बऱ्यापैकी वरच लिहिले आहे.

अनुज फार फार तर मरा ठी सिरियल लिहु शकतील - तुम्ची मुलगी काय करते टाइप इतके फालतु आहेत,

जेम्स बैन्ड तुम्चि एवढे लिहिले ते कोणी वाचत नाहि. बाष्कळपनात वेळ नाहि घाल वत मी

देवकी, युट्युबवर अनुज धर, नेताजी, गुमनामी बाबा असे सर्च करा. गेल्या 7-8 वर्षात भरपूर व्हिडिओज आलेले दिसतील. किती खरं किती खोटं आपलं आपण तपासून पहावं.

देशासाठी काहीही करण्याची तयारी असलेले लोक स्वातन्त्र्य मिळाल्यावर लपत छपत गुमनामीचे आयुष्य जगतील यावर विश्वास ठेवणे कठिण आहे. जे ब्रिटिशांना घाबरले नाहीत ते भारतीय शिक्षेला घाबरतील?

बोस काल परवा पर्यंत जिवंत होते असे दावे करणारे कोण आहेत
त्यांची biography तरी बघा
त्यांच ना स्वतंत्र लढ्या शी संबंध होता . ना स्वतंत्र शी आस्था आहे अशी लोक आहेत

त्यांना किती गंभीर घ्यायचे .
आणि कोणत्या राजकीय पक्ष कडून हा प्रचार चालू असतो.ते पण बघा

Pages