रात्रीस खेळ चाले ३

Submitted by DJ....... on 8 March, 2021 - 11:47

सीझन ३

अगदी उत्सुकतेच्या शिखरावर चढूनच भल्या मध्यरात्री हा सीझन ३ बघायला सुरुवात केली. टायटल साँग न लागताच एपिसोड सुरु झाला त्यामुळे अनपेक्षितपणे तोल गेल्या सारखंच वाटलं. एपिसोड सुरू होतो तोच मुळी पहिल्या सिझनचा पहिला एपिसोड अन दुसर्‍या सिझनचा शेवटचा एपिसोड घेऊन. आपण ठार केलेल्या सर्व माणसांच्या भुतांचा भास होत आण्णांचा मृत्यु होतो अन माई हंबरडा फोडते. दत्ता लगेच माधवला फोन करून कल्पना देतो. लगेच रघुकाका अन इतर गावकरी जमून आण्णांना नदीकाठी नेऊन क्रियाकर्म करतात तेव्हा माधव आणि अभिराम देखिल दिसतो. नदीच्या पाण्यात आण्णांच्या धगधगत्या चितेचे प्रतिबिंब उमटते अन भडकलेली चिता पाहून माधव, दत्ताला सावरण्याचा उपदेश करत रघुकाका सर्वांना परत फिरायला सांगतात. ते सर्वजण निघुन जातात पण कॅमेर्‍याच्या साक्षीने आपण मात्र आण्णांच्या चितेजवळच घुटमळत रहातो. नको म्हटलं तरी कॅमेरामन आपणाला पार चितेत घुसवतो Proud . शेवटी चितेतून मागे खेचत आपण नदीच्या पाण्यातल्या प्रतिबिंबात चिता बघत बसतो तेव्हा आण्णांचा आत्मा वर गेल्याचा भास होतो. Uhoh (हे फार भयानक चित्रण केलं आहे..!)
---------------------------------------------------------------------------०००--------------------------------------------------------------------------
मुंबईत कोण परुळेकर नामक एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसाईक असतो त्याच्या मुंबईतल्याच टुमदार घरापासून सीनला सुरुवात होते. तो घाईगडबडीत आकेरीला निघालेला असतो जिथे त्याला आण्णा नाईकांचा वाडा इस्टेट एजंटकरवी विकत घ्यायचा असतो. तो अचानक निघालेला बघून त्याची बायको त्याला काळजीने बरेच प्रश्न विचारते परंतु त्या वाड्यात रिसॉर्ट बनवण्याच्या कल्पनेने परुळेकरवर पुर्ण ताबा घेतलेला असतो. तो एकटाच त्याच्या कारने आकेरीसाठी रवाना होतो तत्पुर्वी बायको त्याच्या हातात एक लाल धागा बांधते.

मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ-सावंतवाडी राज्यमार्ग अशी मजल-दरमजल करत आपण कधी परुळेकराच्या कार मधुन आणि कधी ड्रोनच्या माध्यमातून एरियल व्युने आकेरीतल्या नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर पोचतो तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. आधीच्या सीझनमधील हिरवीगार निसर्गरम्य भातखाचरं या सीझन मधे मात्र पेटवून दिल्यामुळे काळी-पिवळी-तपकिरी दिसत असतात. परुळेकर आपली बी.एम.डब्ल्यु. नाईकांच्या वाड्याच्या रस्त्यावर फक्त २० फुट अलिकडे थांबवतो अन समोरुन येणार्‍या इसमास आण्णा नाईकांच्या वाड्याचा पत्ता विचारतो. तो माणुसही वेडेपणा करत पुढे जाऊन डावीकडे वळा (एरियल व्यु मधे आपणाला उजवीकडे वळायचं ते लक्ख दिसलेलं असतं..!) सांगायचं तर पुढे जाऊन उजवीकडे वळा असं सांगुन तिथून पोबारा करतो. शेवटी ते २० फूट अंतर पार करून परुळेकराची कार वाड्यासमोर थांबते अन दिवेलागणीच्या वेळेस पोचलेल्या परुळेकराच्या तोंडून (अन आपल्याही तोंडून Wink ) हुंड्या-झुंबरं ल्यालेला भारदस्त वाडा पाहून शब्द फुटतात - "मार्व्हलस..!!" Bw .

परुळेकर वाड्यासमोर पोचतो तोपर्यंत आपणही अनामिक ओढीने वाड्याचा साज-शृंगार भिरभिरत्या नजरेने डोळ्यात साठवू लागतो. वाड्याचं ते पेटंट फाटक, फाटकाच्या पिलरवर लावलेले प्रकाशाचे मोठे लाईटस, आतमधे माईचं वृंदावन, वाड्याची ओसरी, पायर्‍या, ओसरीच्या लाल दगडांच्या बिचीत लावलेला सफेद रंग (हा पांढरा रंग जरा नाजुक ब्रश ने दिला असता तर बरं झालं असतं असं वाटुन जातं Uhoh ), ओसरीतील झुला, वाड्याची काळं पॉलिश केलेली भारदस्त सागवानी चौकट, दरवाजा, कडी-कोयंडा, खिडक्या, भिंतींना दिलेला फिकट निळा रंग आणि पांढर्‍या रंगाने नजरेत भरलेले दारं, खिडक्या, खोल्यांच्या कोनांचे उठाव अन यासर्वांवर हुंड्या-झुंबरं यांच्या आरस्पानी काचेतून पसरलेला नाजुक प्रकाश यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो तसा तो परुळेकरही Bw .

वाड्यात शिरता शिरताच परुळेकराच्या हातात त्याच्या बायकोने बांधलेला लाल धागा फाटकाच्या बिचीत अडकून निघतो अन तिथेच लटकून रहातो. वाड्याच्या समोर आल्यावर मंत्रमुग्ध झालेला परुळेकर "घरात कोणी आहे का?" असं विचारतो तर आण्णांचा आवाज येतो "बूट ओसरीखाली काढून समोरच्या घंगाळातल्या पाण्याने हात-पाय धुवून या..!". सुचनेबरहुकुम परुळेकर सर्व सोपस्कर करतो अन बुट काढयला लागतो तेव्हा आपणाला दिसतं की आण्णांची खेटरं वाड्याकडे टाचा करून ठेवलेली आहेत. परुळेकरालाही असंच वाटत असतं नेमकं तेव्हाच आण्णांची भारदस्त मुर्ती हातात टॉवेल घेऊन परुळेकराच्या मागुन आपणाला सामोरी येते अन आपली १ सेकंद जाम टरकते. (आण्णांची तब्येत फार सुधारली आहे Wink ).

मग झुल्यात बसून आण्णा परुळेकराला येण्याचे प्रयोजन विचारतात. परुळेकर देखिल एका दमात वाडा विकत घ्यायला आलो असं सांगतो त्यावर आण्णा "दिला..!" असं हसत सांगतात. फुकट वाडा द्यायला निघालेल्या आण्णाला बघुन चपापलेला परुळेकर किंमत विचारतो त्यावर आण्णा त्याला गोल गोल घुमवतात. मधेच आतमधे नजर टाकून पाहुणे आलेत चहापाण्याचं बघा असं फर्मावतात. माई आता येईल मग येईल अशी आपण वाट बघत बसतो खरं पण झुल्याच्या किरकिरण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आपण माईला बघण्यासाठी आतुर झालेलो आपण मात्र आण्णा स्वतः जाऊन पितळी तांब्या-भांड्यातून पाणी आणतात तेव्हा मात्र हिरमुसले होतो. Uhoh (त्याच वेळी परुळेकरास पाटणकरणीने फास घेतलेलं अंगणातलं भेसूर झाड दिसतं.. अन तो चपापतो...!)

परुळेकर अन आण्णांच्या ओसरीतच गप्पा सुरु असतात. दिवाणखान्यात कधी जायला मिळणार अन तिथल्या भुईवरचं मडगुलं (चुन्याने रंगवलेली पेटंट नक्षी) अन रेखीव लाकडी जिना कधी बघायला मिळणार या विचारानं आपण सैरभैर झालेलो असतो. आण्णा अन परुळेकरच्या गप्पा सुरुच असतात तेव्हा आपण उगिचच उतावळेपणाने ओसरीतुन माजघराचा दरवाजा अन परसदाराचा वेध घेत असतो. चाणाक्ष कॅमेरामन आपल्या उत्सुकतेला वाटाण्याच्या अक्षता लावत आपणाला थेट आण्णांच्या खोलीतच घेऊन जातो. तिथला माहोल बघून आपले अन परुळेकराचेही डोळे दिपून जातात.

आण्णांच्या खोलियेत छताला २-२ झुंबरं अन खांबांवर डकवलेल्या हुंड्यांतून मंद प्रकाश पसरलेला असतो. आपलं मन मात्र अडकवलेली बंदुक, आण्णांचं सुप्रसिद्ध कपाट, ग्रामोफोन, मेजावरचं तांब्या-भांडं, आण्णांची खाट, तीमागची खीडकी, खिडकीतून दिसणारी बाव, समोरच्या दरवाजातून दिसणारी गॅलरी, भिंतींवरच्या आखिव-रेखीव तस्विरी, देवळ्या हे सर्व जिथं हवं तिथंच आहे का हे पहाण्यात गुंतलेलं असतं. त्याच वेळी आण्णा हसतमुख चेहर्‍याने परुळेकराला गोवा दाखवण्याच्या बोलीवर कपाटाचं दार उघडतात अन तिथला गोवा बघून आपल्याही चेहर्‍यावर मंद स्मित येतं Bw . कपाटाच्या आत आण्णांचा मुद्देमाल जसाच्या तसा असतो.. त्यात अजुन काही बाटल्यांची भर पडलेली दिसते. कपाटाच्या दारांवर आतील बाजुने भिवरी मदनिकेच्या अवतारात फोटोंवर चिकटवलेली असते. तिला बघुन आपणाला बरं वाटतं Bw .

परुळेकराला आण्णा भरपूर आग्रह करुन इतकं मदिरापान घडवतात की परुळेकराचा अक्षरशः पळूरेकर होतो Biggrin . मग नशेत चूर झालेल्या पळूरकराचं लक्ष समोरच्या भिंतीवरील तस्विरीकडे जातं अन तो ते चित्र पाहून त्याला दाद देत असतो तेव्हा आपण मात्र खूप नॉस्टेलजिक होतो. ते चित्र असतं लाल नऊवारी नेसून पाठमोरी उभी राहून आपणाकडे बघणार्‍या पाटणकरणीचं..! तिथं १४ जानेवारी २०१६ अशी तारिख असते. जुनं कॅलेंडर का लावलंय असं पळूरेकर विचारतो तेव्हा आण्णा उत्तरतात "काळ तिथंच तर थांबला..!" (ते ऐकुन आपणला जुने दिवस आठवून उगिच कावरं-बावरं व्हायला होतं Uhoh )

नशेत चुर्रर्रर्रर्र झालेल्या पळूरेकराला भिंतीवरील बंदुक दिसते अन तो अजुन रंगात येतो. आण्णा त्याला बंदुक काढुन त्यात बार भरून देतात अन रिकामी बाटली स्वतःच्या डोक्यावर ठेवत नेम धरायला सांगतात ते बघून पळूरेकराचा खरेच बार सुटतो Rofl Rofl Rofl . शेवटी आण्णांनी अतिशय आग्रह केल्याने परुळेकर शेवटी बंदुकीतुनही बार ठोकतो अन धुरात हरवलेल्या आण्णांच्या हाती फुटलेली बाटली दिसते. आण्णा पळूरेकरावर खूश होत खाली जेवणाची तयारी करण्यासाठी आवाज देतात अन खाली जातात (आपण पुन्हा एकदा ओढीने माई नाही निदान सरिताची लगबग बघायला स्वयपाक घरात जाण्यासाठी धडपडत असतो पण कॅमेरामनने थोपवून धरल्यामुळे आण्णांच्याच खोलीत चरफडत बसतो Uhoh ) त्यावेळी पळूरेकराला खाटेच्या मागच्या खिडकीतून खाली पाहिल्यावर बावीकडे कोणीतरी पळालेल्याचा भास होतो. शेवटी पळूरेकर उठून भेलकांडत जिना उतरू लागतो अन निम्यात येतो तेव्हा आण्णा वरुनच त्याला आवाज देतात तेव्हा तो अन आपणही चमकतो. या खोलियेत यायला १२ वाटा आहेत असं हसत हसत आण्णांनी सांगितलं अन ते पळूरेकराला पटलं तरी आपणाला माहित असतं की वर जायला ही एकच वाट आहे Wink

आपण पळूरेकरासोबत भेल्कांडत कपाळ्मोक्ष होणार तेवढ्यात वरील खोलित असणारे आण्णा समोर मुख्य दरवाजात जिन्याच्या तोंडाला पळूरेकराला सावरतात (आपण मात्र भुईवरील नक्षी बघण्याचा आटोकाट प्रयत्न करत रहातो अन जेव्हा ती दिसते तेव्हा खूप भ्रमनिरास होतो. संपुर्ण वाड्याला रिपेंट करणार्‍या पेंटरने नक्षीसाठी मात्र पाट्या टाकण्याचं काम केलं हे प्रकर्षाने जाणावतंं Uhoh ). मग आण्णा त्या पळूरेकराला जेवण्यासाठी गादीवर बसवतात (आपलं मन मात्र दिवाणखान्यातलं गणापती-लक्ष्मी-सरस्वतीचं चित्र बघण्यात रमतं..!) अन समोर चांदीच्या चौरंगावर चांदीच्या ताटात सुग्रास भोजन वाढलेलं असतं (आपण पुन्हा एकदा माई नाही निदान सरिताची लगबग बघायला मिळते का.. निदान छाया तरी आत्ता येऊन भोचकपणे काहीतरी बोलताना दिसेल किंवा गेला बाजार पांडु तरी "इसारलंय..इसारलंय.." करत हात झटकत आत येईल अशी वाट बघत बसतो..! पण हिरमोडच होतो.. कोण्णी कोण्णी येत नाही Uhoh ).

जेवण झाल्यावर आण्णा पळूरेकराला त्याच्या माडीवरच्या खोलियेत झोपवतात अन सकाळ होते तेव्हा इस्टेट एजंट परुळेकराला उठवत असतो. झापड आलेल्या परुळेकराला जाग येते खरी पण आपणाला समोरचं दृष्य बघून अतिशय धक्का बसतो. रात्री झुंबर-हुंड्यांनी उजळून निघालेल्या खोलीची अक्षरशः वाताहत झालेली असते. संपुर्ण खोली जाळ्या-जळमटांनी अन धुळीने भरलेली असते अन खाट, कपाट, मेज, खुर्च्या, बाकं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं.. छताची कौलं फुटलेली असतात. Uhoh Uhoh Uhoh एजंट परुळेकराला उठवतो तर परुळेकराने जेवणाऐवजी यथेच्छ माती खाल्लेली दिसते. घाबरलेला परुळेकर ओरडत जिन्यावरून खाली येतो खरा पण दिवाणखाना, ओसरी अन संपुर्ण वाडा इतका विद्रुप झालेला असतो की त्याच्या ऐवजी आपल्याच अंगावर भितीने अन संतापाने काटा उभा रहातो Uhoh :रागः

एजंट त्या परुळेकराला थांबवायचा अटोकाट प्रयत्न करतो पण परुळेकर कसाबसा बूट घालत कार मधे बसून पळ काढतो तेव्हा तो बुट घालताना रात्री करकरीत नवीन असणारी आण्णांची वहाण कुजून जीर्ण झालेली दिसते. आपणाला धक्का बसतो की नाईकांच्या वाड्याचं हे असं मातेरं का झालं असेल...? माई, सरिता, दत्ता, छाया, माधव, अभिराम, देविका कुठे आहेत..? निलिमाला नक्की कोणती शिक्षा झाली..?? असे असंख्य प्रश्न समोर उभे रहात असतानाच ४० मिनिटांचा लांबलेला पहिला एपिसोड समाप्त होतो.

प्रीकॅप मधे कोणीतरी गावगुंड त्या इस्टेट एजंटाला धमकावत असतो अन वाड्याचा व्यवहार का होत नाही म्हणुन जाब विचारत असतो. पाटणकरणीच्या (दुसर्‍या) घराच्या ठिकाणाहून भेसूर वाड्यावर कॅमेरा रोखलेला असतो अन त्या फ्रेममधे जुने पोतेरं झालेलं लुगडं नेसलेली म्हातारी पुसटशी दिसते (ही नक्कीच माई असणार यात शंका नाही.. तिला अशा अवतारात बघणे अतिशय क्लेशदायक ठरणार Uhoh )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

DJ.... टीव्ही वर पाहण्यापेक्षा , तुमचं लिखाण वाचायला आवडते....

सगळो एपिसोड डोळ्यासमोर उभो केलास. सगळा अगदी जसाच्या तसा.
सहमत
DJ भाऊ खरं खरं सांगा... सिरियलच्या कथानकाचे खरे लेखक तुम्हीच आहात ना

लावण्या आणि झम्पू धन्स Bw

@ झम्पू : अहो काहीही काय Biggrin दुसर्‍यांनी दळून दिलेल्या पिठात पाणी घालून ते पीठ मळुन मी फक्त त्याच्या भाकर्‍या बनवल्या आहेत. कष्ट इतरांचे अन केवळ आवड निर्माण झाली असल्याने सादरीकरण माझं एवढंच काय ते खरं समजा Wink

सुर्याच्या उष्णतेने तापलेली वाळवंटातली वाळू उष्णता निर्माण निर्माणही करु शकत नाही की ती टिकवूनही ठेऊ शकत नाही... कधी कधी संध्याकाळी फिरायला आलेल्यांना अनवाणी चालावेसे वाटले तर अशा गरम झालेल्या वाळूवर चालून त्यांना बरे वाटते तसेच माझे झाले आहे असे समजा Bw

Dj तुमच्या पोस्टानी मागचा धागा खुलवला होतात ,हा ही धाग्याला खुमारी आणलीत,
तुमचेच अपडेट वाचण्यासाठी हा धागा उघडते मी,एपिसोड तर एकपण बघत नाही पण तुम्ही लिहिलेलं वाचलं की बघितल्याचा फील येतो

त्यांचा मुलगा आर्चिस कुठे आहे हे माहित नाही. >>> तो हिंदी सिरीयल गुम है किसीके प्यारमे मध्ये गेलाय Wink . आदिश वैद्य नाव त्याचं.

आदू धन्स Bw

त्यांचा मुलगा आर्चिस कुठे आहे हे माहित नाही. >>> तो हिंदी सिरीयल गुम है किसीके प्यारमे मध्ये गेलाय Wink . आदिश वैद्य नाव त्याचं>> अरेच्चा..! छानच की. बेट्याला चांगला ब्रेक मिळाला म्हणायचा तिकडे. पहिल्या सीझनमधे कधी निलमीवर तर कधी माधववर चरफडत खोलीतून्/घरातून बाहेर निघुन जाण्याचेच सीन्स असायचे बिचार्‍याचे. तो त्याच्या मॉमवर म्हणजे निलमीवर भयंकर प्रेम करायचा... तिच्याशिवाय आजिबात रहायचा नाही. एकटीला आजिबात सोडायचा नाही. सतत सोबत रहायचा. अगदी ममा'ज बॉय होता म्हणा ना..! तर मॉमने २-२ खून केले हे बघून त्याला जबर धक्का नक्कीच बसला असणार.. त्यात मॉम सोबत नाही हे सत्य पचवता न आल्याने त्याने जीवाचे काही बरे वाईट करून घेतले नसले म्हणजे मिळावली. आता तो दुसर्‍या चॅनेलवर काम करतोय म्हटल्यावर इकडे परतण्याची सुतराम शक्यता नाहीच.. त्यापेक्षा त्याला देवाघरी पाठवलेलाच बरा असं लेखकाला वाटू शकतं.. बायकोचे उपद्व्याप अन मुलाचा अकाली मृत्यु पचवू न शकल्याने माधव वेडा झाला असण्याची शक्यता आहे. Uhoh

माई आणि वाड्याकडे बघून जीव तिळतिळ तुटतो>> खरंय हो Uhoh

मध्ये त्या अर्चिसने कुंकु टिकली आणि टॅटू या कलर्स मराठीवरच्या सिरीयलमधे लिड रोल केलेला, माझ्या ओळखीची एक मुलगी काम करायची त्यात, तिच्यासाठी मी काही भाग बघितलेले. सिरीयल सो सो होती, फार चालली नव्हती.

ह्म्म.. बरंय. आर्चिस चांगली प्रगति करतोय. वच्छी पण साई बाबांच्या सिरियल मधे एक रोल प्ले करतेय. छाया पण मध्यंतरी बाळू मामा सिरियल मधे थातूर-मातुर रोल करताना दिसली होती. सर्वांना चांगल्या संधी मिळतातच असे नाही. माई बघा फास्ट ट्रेनप्रमाणे सटासट रुळ बदलत सुसाट रोल मिळवत धावत असते. तिला राखेचा१ मधे डेली रोल केल्यावर लगेच झीमचीच नकटीच्या लग्नाची सिरियल मिळाली ज्यात सुद्धा डेली काम होतं.. ते संप्लं तेव्हा पुन्हा राखेचा२ लगेच सुरू झालं ज्यात ती पहिल्या भागातल्या पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या भागातल्या शेवटच्या फ्रेम पर्यंट दिसली.. तो सीझन संपला तेव्हा सोनी मराठीवरच्या काळूबाई मधल्या आशालताबाई कोरोनाने गेल्या की लगेच त्यांच्या जागी माईची वर्णी लागली.. तिथं थोडे दिवस काम केल्यावर पुन्हा राखेचा३ सुरु झालं ज्यात माई परत पहिल्या भागाच्या पहिल्या फ्रेम पासुन हजर..!! Bw

आर्चिस चांगली प्रगति करतोय >>> तिथेही काही खास काम नाहीये त्याला. बॅरिस्टर बाबू मध्ये होता काही दिवस.
झी युवावर ही खुप छोट्या रोल मधे होता.

@DJ - मी मराठी- हिंदी मालिका कधीच पाहत नाही.. पण तुमचं मालिकांचं विश्लेषण आवडीने वाचते.
भारी लिहता ..!!

आधीच्या सुसल्याची बारीक आवृत्ती वाटते ही सोनया. अभिराम इतक्या वर्षांनी आला की त्याला आपली आई कशी जगते हेही माहित नाही हे काही पटले नाही. दत्ता तर गावातच असेल ना. हळूहळू एकेक जण येईल आणि मालिका खुलत जाईल अशी अपेक्षा.

तिथेही काही खास काम नाहीये त्याला >>> मी दोन तीन भागच बघितलेत अजून. सध्या बघत नाहीये पंधरा दिवस. रोल कमी असला तरी पैसे जास्त मिळतात म्हणून करत असावा हिंदीत काम.

अभिराम इतक्या वर्षांनी आला की त्याला आपली आई कशी जगते हेही माहित नाही हे काही पटले नाही. >>> अभिराम तोच आहे का कलाकार.

अभिराम तोच आहे, साईंकित कामत. त्याची बायको देविका आधी मराठी होती आता दक्षिणेकडची आहे आणि अभिनेत्री पण दुसरी आहे. पांडुची दया आली, मारत असतील बिचाऱ्याला.

मलाही तीच शंका आहे. अण्णा गेले म्हणून देविकाला अपशकुनी तर नाही ना ठरवली नाईकांनी. लग्न मोडलं असेल त्याचं देविकाशी कदाचित.

दत्ता आणि सरिता मांगरात राहत असतील. पुर्वाचं लग्न झालं असेल. छायाचा गणेशमधे जिव होता म्हणून छायाला पण मांगरात नेलं असेल.

कालच्या भागात जास्त काहीच नाही झालं.. जे झालं ते कसतरीच पटवून घ्यावं लागलं. २ धक्के बसले जेंव्हा जुना सुसल्या अन जुनी देविका बदललेल्या दिसल्या. Uhoh

एपिसोड सुरु होतो तोच वाड्याच्या मागे माई बावीतून पाणी शेंदताना. पहाटे पहाटे ती पाणी शेंदत असते. तिला एक कळशी पाणी शेंदण्यासाठी सुद्धा फार कष्ट पडत असतात. कशीबशी ती एक कळशी पाणी शेंदते तेंव्हा ती तांब्याची कळशी सर्व बाजुंनी चेपलेली दिसते. बावीच्या मागे केळीची बाग अजुनही आहे हे बघुन आपणाला बरं वाटतं.

इकडे एका बंगल्याच्या समोर पार्क केलेल्या पांढर्‍या शुभ्र आर्टिगा गाडीतून आपला पांडु उतरतो अन नेहमीप्रमाणे घोळ घालणे सुरू करतो. त्याला एक अनोळखी माणुस घरात साहेब आहेत का विचारत असतो तर त्या माणसावर हा पांडबा पाईपने पाणी उडवतो. त्या बिचार्‍याचा शर्ट भिजतो तेवढ्यात अजुन एक डिझायर कार तिथं येते ज्यातून अगदी तोकडे कपडे घातलेली तुपारे मधील इशा निमकरची जाऊ उतरते. तिला बघून पांडू सुसल्या ईलंय असं म्हणतो तेव्हा ही बाई सुसल्या आहे हे आपणाला कळातं. पांडबाचं अन तिचं संभाषण ऐकुन आपणाला समजतं की सुसल्या एके दिवशी भर पावसात वाड्यातून एका पोलिसासोबत पळून जाते अन त्याच्याशीच लग्न करते. लग्नानंतर ती गावातच बंगला बांधून तिथं राहु लागते. तिचा पती खूप रागीट आहे असंही पांडुकडून समजतं.

मग त्या शर्ट भिजलेल्या माणसाकडे पहात सुसल्या तो इथे कशाला आला आहे हे विचारते. त्यावर तो हातात अंगठ्या, गळ्यात सोन्याची चेन असलेला माणुस तिला त्याला साहेबांना भेटायचं आहे असं सांगतो. त्याच्या अंगावरील सोनं पाहून सुसल्या त्याला घरात बोलावते अन त्याचा भिजलेला शर्ट काढून त्याला अंग पुसायला टॉवेल देते. तिचा नवरा (साहेब) परत यायला अजुन वेळ आहे असं सांगत त्या माणसासाठी चहा आणि गोडधोड घेऊन येते. त्यानंतर ती त्या माणसाच्या उगीच गळे पडण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा नवरा येतो (हा तोच पीळदार मिशीवाला गुंड वाटला होता ज्याने दुसर्‍या भागात साळगावकराचं गचुंडं धरलं होतं..!) अन या दोघांना अशा अवस्थेत पाहून तो त्या माणसाच्या डोक्यालाच पिस्तुल लावतो. माणुस जाम घाबरतो आणि सुसल्या त्या माणसावरच आळ घेत त्याला अजुनच घाबरवून सोडते. मग त्या घाबरलेल्या माणसाला सुसल्याचा नवरा तो इथे कशासाठी आला होता असं विचारल्यावर माणुस सांगतो की एका गुन्हासाठी मांडवली करायला आलेलो (पैसे देण्यासाठी). मग सुसल्याचा नवरा त्या माणसाकडून दुप्पट पैसे घेऊन त्याला घरातून पिटाळून लावतो. त्यानंतर सुसल्या तिच्या नवर्‍याला कानफाटीत मारते अन एवढ्या घाबरलेल्या माणसाकडून फक्त नोटांची बंडलंच काय घेतली त्याच्या हातातील अन गळ्यातील सोनं दिसलं नाही का असं खडसावून विचारते तेव्हा अपणाला समजतं की हा या दोघांचा पैसे कमावण्याचा डाव आहे. अशाप्रकारे पैसे गोळा करून ते श्रीमंत झालेले आहेत. परंतू मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे जुन्या गब्दुल्या सुसल्याच्या लकबी हुबेहुब साकारण्याच्या अट्टाहासापायी नव्या शेलाट्या सुसल्याची फार केवीलवाणी अवस्था होत आहे. मुळात आकेरी सारख्या कोकणातल्या खेडेगावात अशी आपुर्‍या वस्त्रानिशी कोणी रहिवाशीण रहात असेल हे स्विकारणं थोडं कठीणच जातं.

मग सुसल्या अन तिच्या नवर्‍याचं वाड्याच्या विक्रीबद्दल संभाषण होत असतं तेवढ्यात साळगावकर तिथं टपकतो. वाडा माई म्हातारीमुळे अजुनही विकला जात नाही हे कळल्यावर सुसल्या नवर्‍याला अजुनच कानफाडते अन म्हातारीचा अंगठा कसा घ्यायचा हे ती स्वतः बघेल असं म्हणत थेट साळगावकराला घेऊन वाड्यात येते.

इकडे वाड्यात माई तिच्या तुळशी वृंदावनासमोर उभी राहून नारळाच्या करवंटीने तुळशीला पाणी घालत असते (तिला असं करवंटीने पाणी घालताना बघून आपणाला अहेवपणातील नुकतीच आंघोळ करून, केसांना ओला टॉवेल गुंडाळून, ठसठशीत टिकली लावलेली सवाष्ण माई प्रसन्न चेहर्‍याने, हातात पुजेचं ताट घेऊन पितळी तांब्याने तुळशीला कशी पाणी घालत होती हे आठवून अजुनच वाईट वाटतं Uhoh ) अन त्याचवेळी कॅमेरा तुळाशीच्या खोडापासून शेंड्यापर्यंत हळूहळू वर सरकतो अन माई जळून गेलेल्या तुळशीला पाणी घालते की काय अशी आपली धारणा होत असतानाच काट्या झालेल्या तुळशीच्या एक दोन शेंड्यांवर एक दोन हिरवी पानं दिसतात अन आपल्या जीवात थोडा जीव येतो. तुळशीला पाणी घालून झाल्यावर माई तुळशीपुढे हात जोडते अन घरावर कुणाची वाईट नजर पडा नको असं म्हणते (आपल्या मनात येतं की आता अजुन काय वाईट व्हायचं राहिलंय हिच्या घराचं..??)

तुळशीला पाणी घालून माई जेव्हा मागे वळते तेव्हा तिच्या मगे लाल रंगाची साडी नेसून फटाकडी सुसल्या साळगावकराला घेऊन आलेली असते. तिला पहाताच माईचा संताप होतो अन आता लग्न झालेल्या सुसल्याचे वाड्यात काय काम आहे असं विचारत असताना नखरेल सुसल्या तिला माईची काळजी वाटते म्हणुन आले असं सांगते. माईसाठी तिने आंबोळ्या आणल्यात असं सांगत भुतकाळात तिने माईच्या आंबोळ्या खाल्यात ज्या माधवाने तिला घरी आणुन दिल्या होत्या अशी आठवण मानभावीपणाने सांगत आंबोळ्यांचा स्टीलचा डबा पुढे करते. तो डबा बघून माईला भुतकाळात अभिरामासाठी माधवाकडे सुपुर्द केलेल्या आंबोळ्यांची आठवण येत अभिरामला अंबोळ्या फार आवडतात असं तोंडुन निघतं. नेमकं तोच धागा पकडत सुसल्या माईला टोकते की आता तो अभिराम येतो का माईची काळजी घ्यायला. उलट तीच कशी माईसाठी अधुन मधून खाणं पाठवत असते वगैरे. त्यावर माई तिला तिच्या आंबोळ्या परत करते अन सुसल्या तिच्या आईप्रमाणेच आता लोकांच्या संसारात विष कालवते आहे असं सुनावते. त्यावर संतापलेली सुसल्या माईला सांगते की हा वाडा विक. माईपुढं ती पैशांची बंडलं धरते जी माई झीडकारून लावते. वाड्यासाठी चांगलं गिर्‍हाईक आलंय तेव्हा त्याचे पेपर्स पुढे करत तिचा अंगठा मागु लागते. पण माई तिला नकार देताच सुसल्या माईची मानगुट पकडून तिला भुईवर पाडते अन साळगावकर तशाही अवस्थेत माईचा अंगठा इंकपॅडवर टेकवून तो कागदपत्रांवर उमटवू लागतो. माई जिवाच्या अकांताने ओरडत असते की जीव गेला तरी ती अंगठा देणार नाही अन अभिराम असता तर किती बरं झालं असतं वगैरे. अन तेवढ्यात एक पांढरी आर्टिगा येते जिची नंबरप्लेट झाकलेली असते (कदाचित पांडू मघाशी ज्या आर्टिगेत होता तीच असावी.. Wink ) अन आवाज येतो, "आई.. मी आलोय". तत्क्षणी सुसल्याच्या हातून माईची मानगूट सुटते अन साळगावकराच्या हातून माईचा हातही सुटतो. Proud

माई देवसेनेच्या अविर्भावात गाडीकडे बघू लागते की तिचा अमरेंद्र बाहुबली कुठं आलाय. पण गाडीतून अमरेंद्र बाहुबली ऐवजी अवंतिका उतरते Proud . ती केरळी ओणम साडी नेसलेली बाई बघून साळगावकराला वाटते की वाड्याचं गिर्हाईकच आलं. तो पळत तिच्यापाशी येतो अन तिला मराठीत विचारतो की बाई तुम्ही वाडा विकत घ्यायला आलाय ना म्हणुन. त्यावर ती केरळी कुडी येनमाडती कानझाडती असं काहीतरी बडबडत गळ्यातलं मंगळसुत्र दाखवते (कदाचीत ती म्हणत असावी की ती या वाड्याची सून आहे..!). आता सुसल्याला म्हातार्‍या माईची सही घ्यायची घाई झालेली असते. ती बसलेल्या माईचा अंगठा कागदावर उठवणार तेवढ्यात माईचा बाहुबली आपलं ते हे अभिराम गाडीतून खाली उतरतो अन गाडी, अभिराम, त्याची बायको, माई, सुसल्या, साळगावकर अन या सर्वांच्या मागे असलेला वाडा अशी फ्रेम दाखवण्यासाठी ट्रॉली उचलत कॅमेरा एपिसोडचा एंड करतो.

प्रीकॅप मधे काय दाखवलं ते काय कळणा नाय Uhoh

डीजे: छान लिहिलयत तुम्ही. राखेचा चे पहिले २ सिझन्स पाहिलेच आहेत आता हा पण बघणार. माइ आणि वाड्याची स्थिती मात्र बघवत नाही. आणि माधव ला पण.

सुसल्या भलतीच मॉड दाखवली आहे . कपडेपट गंडलाय .
तिला असं करवंटीने पाणी घालताना बघून आपणाला अहेवपणातील नुकतीच आंघोळ करून, केसांना ओला टॉवेल गुंडाळून, ठसठशीत टिकली लावलेली सवाष्ण माई प्रसन्न चेहर्‍याने, हातात पुजेचं ताट घेऊन पितळी तांब्याने तुळशीला कशी पाणी घालत होती हे आठवून अजुनच वाईट वाटतं >>> + १००००००

सुसल्या भलतीच मॉड दाखवली आहे . >>> सुसल्या तीच आहेका, नंतर बिगबॉस मधे आलेली पण हात फ्रॅक्चर झाल्याने लवकर बाहेर पडावं लागलं.

धन्स लावण्या Bw
---------------------०००---------------------------

कालच्या भागाची सुरुवात होते तीच मुळी त्या केरळी ओणमच्या साडीचा पदर वाड्याकडे ओढला जातो त्या सीन ने. नक्की काय होतंय हे आपल्याला कळायच्या आत माई "माझो अभिराम इलो.. बघितला का माझो अभिराम ईलो.. ह्या घराचा मालक ईलो.." चा गजर करत वाड्यापुढुन इकडून तिकडे पळू लागते. तिला थांबवत अभिराम तिला "आई" अशी हाक मारतो तेव्हा ती भानावर येत शांत होते अन इतक्या वर्षांनी आपणाला आपल्या एकातरी मुलाने "आई" म्हणुन हाक मारावी यासाठी तरसाळालेली माई अभिरामच्या गळ्यात पडून रडू लागते तेव्हा आख्खी फ्रेम गहिवरून येते Uhoh मग ती अभिरामवरून भाकरीचा तुकडा उतरवायला म्हणुन घरात जाणार तोच तिला क्षणात परिस्थितीची जाणीव होते पण त्यामुळे तिचं काहीही आडत नाही. दुसर्‍याच क्षणाला ती खाली वाकून जमिनीवरची माती-काट्या-पानं जे काही हाताला लागेल ते घेऊन अभिरामाची दृष्ट काढते अन त्याला घरात घेऊन जाऊ लागते. नेमकं त्याच वेळी आपणाला तुळाशी वृंदावनही दिसतं अन काल माई तुळशीला पाणी घालताना तुळशीच्या वाळक्या काड्या झालेल्या शेंड्यांवर फुटलेली २ पानांचा अर्थ कळतो. Bw

तिला थांबवत अभिराम विचारतो की तिची आणि वाड्याची ही अवस्था होईपर्यंत सगळे बघत कसे काय बसले..? दत्ता, माधव, छाया कुठे आहेत..? तेव्हा माई दीर्घ सुस्कारा सोडत अभिरामला एवढंच सांगते की त्यांचं नाव आता पुन्हा काढु नये. त्यांच्याबद्दल नंतर सांगते आधी त्याने घरात यावे. त्याच्या सोबत आलेल्या केरळी ओणमकडे माई कसनुशी बघत अभिरामच्या हाताला धरून वाड्याची पहिली पायरी चढते त्यावेळी कॅमेरा आपणाला दोघांच्या पायाशी आणुन ठेवतो Proud . आपणाला दिसतं की पहिल्या पायरीवर माईचं अनवाणी म्हातारं पाऊल धुळीने भरलेलं अन अभिरामचं पाऊल उंची स्टँडर्डच्या बुटात बंदिस्त आहे.. पण दुसर्‍याच क्षणाला अभिराम बूट घातलेलं पाऊल खाली जमिनीवर घेतो अन दोन्ही पायातले बूट काढून खाली काढून ठेवतो ( त्या क्षणी त्याच्या बुटांच्या शेजारी आण्णांच्या कुजलेल्या चपलाही दिसतात) अन पुन्हा पायर्‍या चढून वर जातो ते पाहून आपल्या मनात अभिराम बद्दल उगाच अभिमान वगैरे दाटून येतो Proud

अभिराम माईसोबत देवघरात जातो. जाताना ओसरी, दिवाणाखाना, माजघर अन देवघराची वाताहत त्याला बघवत नाही. धुळीने भरलेल्या देव्हार्‍यातल्या देवांना मनोभावे हात जोडून माई म्हणते की सर्वांना सुखात ठेव (गेले २ सिझन हिचे हेच गार्‍हाणं ऐकुन हिचे देव कानकिवंडे झालेत हे आपणाला पक्कं माहित झालेलं असतं Biggrin ). अभिरामलाही ती देवाला हात जोडायला सांगते. अनिच्छेनेच अभिराम हात जोडतो अन पटकन उठुन स्वयपाक घरात येतो तर तिथलं भेसूर दृष्य पाहून त्याला अतिशय वाईट वाटतं. तो माईला विचारतो की ती अशा पडक्या घरात इतके दिवस कशी राहिली? इतक्या दिवसात तिने अभिरामला एका शब्दानेही का कळवले नाही..?? त्यावर माई उत्तरते की तिने दर आठवड्याला पोष्ट्याकरवी अभिरामला पत्र पाठवलंय.. नेमकं त्याच क्षणी अभिरामला एक जुना रुपाया ओसरीवर पडलेला दिसतो. तो रुपाया घेतो तेव्हा केरळी ओणम ते काय आहे असं विचारते (जसा काही हिने केरळात रुपया बघितलाच नव्हता कधी..!) त्यावर अभिराम ते जुनं नाणं आहे असं सांगतो. केरळी ओणम सतत मल्ल्याळीच बोलत असते तेव्हा माईच अभिरामला तिच्या बद्दल विचारते अन देविका कुठं आहे असंही आपल्या मनातला प्रश्न फेकते. त्यावर अभिराम सांगतो की ती केरळी ओणम त्याची बायको आहे अन तिचं नाव कावेरी आहे. देविकाला त्याने पटत नव्हतं म्हणुन घटस्फोट दिला आहे. त्यावर माई लगेच उत्तरते की तरीच देविकाचे आईवडील कधी भेटले तर तोंड वेंगाडुन निघून जातात. मग कावेरी माईच्या पाया पडते. तेवढ्यात साळगावकर "साहेब.. साहेब.." करत येतो.

साळगावकर लगेच बदलेला असतो. अभिरामशी अन माईशीही चांगला वागु लागलेला असतो. तो स्वतः माईची कशी काळजी घेत होता हे सांगत असताना अभिरामला घरीच जेवायला अन रहायला बोलावतो. त्यावर अभिराम जिथं आई तिथं तो असं ऐकवतो मग साळगावकर माईलाच घेऊन जातो असं म्हणतो. अभिराम त्याला विचारतो की मघाशी तो आला तेव्हा तोच आईचा अंगठा घेण्यासाठी आला होता ना वगैरे तर विषय टाळून आपण कसे ऑल इन वन आहोत हेत पटवून देत साळगावकर अभिरामचा ड्रायव्हर बनण्यापासुन ते त्याच्या घराची डागडुजी करण्यापर्यंतची सगळी कामं करायला तयार होतो. अभिरामाकडून ५००० अ‍ॅडव्हान्स घेऊन लगोलग कामगार देखिल घेऊन येतो.

मधेच एकदा देविकाचे आई-वडिल येऊन ओसरीत उभ्या अभिरामाला बोल बोल बोलतात अन नाईकांचा उद्धार करून तळातळाट लागतील असे शिव्याशाप देत परत जातात. देविकाच्या वडिलांचा डावा गाल कमालीचा फुगलेला दिसतो Proud

अभिराम बायकोच्या आग्रहाखातर आण्णांची खोली दाखवतो खरं पण तिथं तिला उगिचच झटके आलेले दाखवले आहेत जे की आपणाला पटत नाहीत. मग अभिराम साळगावकराच्या आग्रहाखातर बायकोला घेऊन घरी जातो. तिथं साळगावकरणीने आधीच घरी आलेल्या माईला भांडी घासायला लावलेले असते. ते समजल्यावर अभिराम माईला घेऊन घरात येतो. वाद्यातील धुळीच्या अ‍ॅलर्जीने कावेरीची तब्येत बिघडते अन तिला चांगलाच ताप भरतो. त्या तापाने ती हा हु करु लागते अन काळजीत पडालेली माई कावेरीच्या गालांवर हात फिरवत असतानाच एपिसोड संपतो.

इतकी वर्ष अभिराम आला नाही, घटस्फोट झालेला माईला माहितच नाही हे काय माका पटलेला नाय. देविकाचे आवुस बापूस पण काय बोलले नाहीत नुसते तोंड फिरवुन जात होते हे पण पटणेबल नाही.
अभिरामची बायको फक्त अंडुगुंडु बोलत होती ते फार इरिटेटींग वाटत होतं. इथल्या मराठी लेखात दुसरी भाषा वाली चर्चा आठवली.

Pages