निसर्ग चक्रीवादळ : कथा आणि व्यथा

Submitted by वावे on 8 June, 2020 - 10:34

३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती. पण खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा अनुभव असा, की अरबी समुद्रातून चक्रीवादळ येऊन कोकण किनारपट्टीला धडकणार अशा बातम्या कितीही आल्या तरी एक तर ते वादळ समुद्रातच सौम्य होतं, नाहीतर दिशा बदलून दुसरीकडे निघून जातं. त्यामुळे यावेळीही तसंच होईल असं वाटत होतं. पण तसं होणार नव्हतं.

दोन तारखेला रात्री वाचलेल्या बातम्यांनुसार साधारणपणे सकाळी अकरानंतर वादळ रायगडच्या किनार्‍याजवळ येणार होतं आणि त्याचा लँडफॉल होणार होता. लँडफॉल नेमका कुठे होणार आणि नेमका किती वाजता होणार याच्या माहितीत सतत बदल होत होते आणि ते साहजिकच आहे. २ तारखेच्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यात वादळ पोचलं. आमचं गाव श्रीवर्धन तालुक्यात असलं तरी समुद्रकिनार्‍याला अगदी चिकटून नाही. समुद्र आणि गावाच्या मध्ये डोंगर आहे. शिवाय पूर्वेलाही डोंगर आहे. त्यामुळे आपल्या गावात वादळाचा परिणाम कमी होईल अशी आशा होती मनात. तीन जूनला दहा-साडेदहानंतर फोन आणि मोबाईल सेवा बंद झाली.

त्यानंतर टीव्हीवर वादळाच्या बातम्या पाहण्याशिवाय आणि ’श्रीवर्धन, दिवेआगरला वादळ धडकले’ अशा ब्रेकिंग न्यूज वाचून काळजी करण्याशिवाय दुसरा काही मार्गच राहिला नाही. मुंबईच्या सुदैवाने वादळ मुंबईला टाळून उत्तर महाराष्ट्राकडे गेलं. शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्सवर चौकशी केली. कुणाचाच घरी फोन लागत नव्हता आणि त्यामुळे सगळेच काळजीत होते.

चार तारखेला श्रीवर्धनच्या, मुरुडच्या जवळच्या नातेवाईकांच्या/ओळखीच्यांच्या घरांच्या बातम्या इकडून तिकडून मिळायला लागल्या. जवळजवळ सगळ्यांच्या घरांची छपरं उडून गेल्यामुळे घरात पाणीच पाणी झालं होतं. फोन, मोबाईल चालू नसल्यामुळे माझ्या गावी थेट संपर्क होत नव्हताच आणि इतर कुणाकडूनही घरची काहीच बातमी कळत नव्हती, त्यामुळे केवळ अंदाज लावणं हेच हाती होतं. अशा वेळी मन चिंती ते वैरी न चिंती याचा प्रत्यय येतो. आपापल्या गावाची काहीच बातमी कुठूनच कळत नसल्यामुळे आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावांतले, मुंबई-पुण्यात किंवा अन्य ठिकाणी रहात असलेले आम्ही सगळेजण अस्वस्थ आणि चिंताक्रांत झालो होतो. श्रीवर्धनजवळच्या मेटकर्णी भागातल्या एका महिलेच्या कोसळलेल्या घराची हृदयद्रावक बातमी टीव्हीवर दिसली. पण त्यापलीकडे जाऊन आमच्या भागातल्या, अंतर्गत भागातल्या बातम्या काहीच कळत नव्हत्या. असंख्य झाडं रस्त्यांवर पडल्यामुळे बरेच रस्तेही बंद होते. रिलायन्स जिओ सोडल्यास कुठल्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं, पण तेही फक्त श्रीवर्धन शहरातच आणि त्यातही वीजपुरवठा नसल्यामुळे कुणालाच मोबाईल चार्जिंगही करता येत नव्हतं.

चार तारखेला रात्री आणि पाच तारखेला दिवसभरात फेसबुकवरच्या आपला श्रीवर्धन नावाच्या ग्रुपवर श्रीवर्धन तालुक्यातल्या वाकलघर, रानवली, हरिहरेश्वर, धारवली, वाळवटी या गावांबरोबरच आमच्या गावाचेही काही फोटो पहायला मिळाले. काही व्हिडिओही होते. सगळ्या फोटोंमधून आणि व्हिडिओंमधून दिसत होता तो फक्त आणि फक्त विध्वंस! हे फोटो आणि व्हिडिओ नक्की कुणी काढले आहेत ते कळत नव्हतं. थेट काहीच बातमी न कळल्याने सहा तारखेला मुंबईपुण्यात राहणारे आमच्या परिसरातले बरेचजण गावाला गेले.

श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातल्या दांडगुरी, वाकलघर, खुजारे, आसुफ, कार्ले, वडवली, वांजळे, बोर्ला, देवखोल, धनगरमलई, नागलोली या आणि अशा कित्येक गावांमध्ये असंख्य घरांची छपरं या वादळाने उडवून नेली आहेत. आंब्याची, काजू-फणसाची जुनी झाडं मोडून किंवा मुळासकट उन्मळून पडली आहेत. या सगळ्या गावांमधली बहुतेक सगळी तरुण मंडळी मुंबईत नोकरी करतात. कष्ट करून, पैसे साठवून, प्रसंगी कर्ज काढून गावाकडचं मोडकळीला आलेलं जुनं घर पाडून नवीन घर बांधतात. अशा या घरांचं मोठं नुकसान या वादळाने झालं. लॉकडाऊनमुळे आधीच सगळ्यांच्या डोक्यावर नोकरीधंदा जाण्याची टांगती तलवार असताना हे नवीनच संकट आलं. श्रीवर्धन, दिवेआगर , हरिहरेश्वर आणि मुरुडसारख्या बागायती गावांमधल्या नारळ-सुपारीच्या अख्ख्या बागाच्या बागा अक्षरशः आडव्या होऊन पडल्या आहेत. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या भागातल्या पर्यटन व्यवसायाला आधीच मोठा धक्का बसला होता. ते कमी म्हणून की काय, हे बागायतीचं प्रचंड नुकसान! अनेकांचं पोट या नारळ-सुपारीच्या बागांवर अवलंबून असतं. उन्हाळ्यात पाणी शिंपून तगवलेल्या सुपारीच्या बागा आणि वाडवडिलांनी लावलेली, आपण मशागत करून फळवलेली आंब्याकाजूंची झाडं मोडून पडताना पाहणं सोपं नाही.

वादळ आलं म्हणून पाऊस थांबला नाही. कोकणात मान्सून म्हणा, मान्सूनपूर्व म्हणा, पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. घरावरचं छप्पर वादळाने उडवून नेलेलं, पत्रे, कौलं, ताडपत्री, वेल्डिंगसाठी लागणार्‍या जनरेटर्सची, एवढंच नाही, तर घरात उजेडासाठी लावायला मेणबत्त्यांचीही टंचाई आणि या टंचाईचा गैरफायदा घेऊन वस्तूंचा आणि सेवांचा चढा भाव लावणारे दुकानदार आणि कारागीर! श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग, माणगाव तालुक्यांमधल्या जवळजवळ सगळ्या गावांमधलं हे चित्र आहे. शिवाय समोर पावसाळा उभा! कोकणात पाऊस नुसता पडत नाही, तर कोसळतो. अशा वेळेस सामान्य माणसांनी काय करायचं?

रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे सक्षम आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत, ही एक नक्कीच दिलासादायक वस्तुस्थिती आहे. सरकारकडून जी काही नुकसानभरपाई मिळायची ती यथावकाश मिळेलच.

या चारपाच दिवसात मी आधी कधीही पाहिल्या नसतील इतका वेळ आणि इतक्या उत्सुकतेने मराठी वृत्तवाहिन्या पाहिल्या. चक्रीवादळ आलं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या बातम्यांचा नक्कीच ’बातम्या’ म्हणून उपयोग झाला. पण त्यानंतर ’मुंबईवरचा धोका टळला’ या बातमीने या वृत्तवाहिन्या जणू रिलॅक्स झाल्या. दुसर्‍या दिवशीपासून चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या बातम्या मागे पडल्या. तेच तेच व्हिडिओ परत दिसू लागले. तिसर्‍या दिवशी तर वटपौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्रग्रहणही होतं. ’वटपौर्णिमेची पूजा करण्यात ग्रहणाची अडचण नाही’ अशा प्रकारची अत्यंत मौलिक आणि उपयुक्त माहिती आणि ठिकठिकाणच्या सुवासिनींनी मास्क बांधून वडाच्या झाडाची केलेली पूजा, कुणी घरी फांदी आणून पूजा केली, कुणी अजून कुठल्या प्रकारे केली, अशा सुरस आणि महत्त्वाच्या बातम्या देण्यात वृत्तवाहिन्या गर्क होत्या. पण श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांमधले बहुतेक सगळे अंतर्गत रस्ते सुरू झालेले असतानाही (NDRF आणि SDRF च्या जवानांनी प्रचंड कष्ट घेऊन हे रस्ते दोन दिवसात मोकळे केले) कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीवर मी वर उल्लेख केलेल्या गावांमधली आणि इतरही असंख्य गावांची दृश्यं कधीच दिसली नाहीत. वृत्तवाहिन्याच नाही, तर आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईट्सवरही या कुठल्याच गावांचा उल्लेखही नाही. मोबाईल सेवा त्या भागात सुरू नसताना, घरची काहीच बातमी नसताना, आपल्या परिसरातली काहीतरी बातमी कळेल म्हणून उत्सुकतेने टीव्ही लावावा, तर तिथूनही काही बातमी कळत नव्हती. आता तर निसर्ग चक्रीवादळाचा उल्लेख होतोय, तो फक्त कोकणात होणार्‍या राजकीय नेत्यांच्या दौर्‍यासंदर्भातच.
राजकीय नेते, सरकार आणि प्रशासन त्यांची कामं करतच आहेत, पण या सगळ्या खेडेगावांची झालेली दुरवस्था इतक्या लवकर बदलणार नाहीये. अजून कमीतकमी महिना-दीडमहिना लागेल वीजपुरवठा सुरळीत व्हायला. घरांची छपरं होतीलही दुरुस्त, पण वर्षानुवर्षं ज्या झाडामाडांवर मेहनत घेतली, ती कोसळलेली झाडं परत उभी राहणार नाहीयेत. नवीन झाडं लावून त्याचं चांगलं उत्पन्न सुरू होण्यासाठी आठदहा वर्षं जावी लागतात. तोपर्यंत काय करणार हा मोठा प्रश्न आहे. असे प्रश्न सोपे नसतात आणि त्यांचं एकच एक असं उत्तरही नसतं.
वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं ही अशा ’स्टोरीज’ चा कितपत पाठपुरावा करतात, अशी एक शंका या निमित्ताने मनात आली. आपल्याच गावात चक्रीवादळ आलं, म्हणून मी जिथून जशा मिळतील तशा बातम्या मिळवल्या. पण एरवी अशा कित्येक घटना, दुर्घटना घडतात, आपण कुठे त्या बातम्यांचा पाठपुरावा करतो ? वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं नक्की कुठल्या निकषांवर आपल्या बातम्या निवडतात? त्यांच्याकडे प्रशिक्षित पत्रकार असतात, पत्रकार म्हणून मिळणारा माहितीचा ॲक्सेस असतो, रोज चोवीस तासांचा वेळ असतो, पण त्याचा ते खेड्यापाड्यातल्या बातम्या देण्यासाठी उपयोग करतात का? आणि जर करत नसतील, तर या बातम्या बाहेर येणार कशा? वादळ एका दिवसात, काही तासात संपलं, पण त्याचे परिणाम मात्र वर्षानुवर्षं मागे राहणार आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादी गोष्ट जवळून अनुभवतो तेव्हा त्याची दाहकता कळते..

वृत्त वाहिन्यांबद्दल काही बोलायलाच नको ..

लेखामुळे इथे पुण्यात वादळ अनुभवलं असं म्हणून safe घरात बसणाऱ्या माझ्यासारख्याना वास्तव समजलं..

काळजी घ्या Happy

दिवेआगरला माझ्या आईचा मावसभाऊ राहतो. जुने घर हौसेने डागडुजी करत तसेच ठेवले होते. ओटी माजघर सोडल्यास बाकी सर्व खोल्या झाडे पडून व वादळी वार्‍याने जमीनदोस्त झाल्या. वाडीतले एकही झाड उभे शिल्लक नाहिये. म्हणजे आता पुढली १०वर्षे तरी उत्पन्न नाही.

उन्हाळ्यात पाणी शिंपून तगवलेल्या सुपारीच्या बागा आणि वाडवडिलांनी लावलेली, आपण मशागत करून फळवलेली आंब्याकाजूंची झाडं मोडून पडताना पाहणं सोपं नाही. डोळ्यासमोर प्रसंग उभा राहिला आणि डोळ्यात पाणी तरळलं.

रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे सक्षम आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत, ही एक नक्कीच दिलासादायक वस्तुस्थिती आहे. सरकारकडून जी काही नुकसानभरपाई मिळायची ती यथावकाश मिळेलच. >>>>

हे वाचून थोडा दिलासा मिळाला.

माणसांना काही झाले नाही ह्या करता देवाचे खूप आभार.
कोकणी माणसं आपण, कातळावरही रूजून येऊ.

चौल रेवदंडा, अलिबाग

सगळी कडे अशीच परिस्थिती आहे

१०% नारळी आणि सुपारी उभ्या आहेत

बाकी ९०% पडली झाडे

घरांवर गाड्यांवर झाडे पडली आहेत

खुप वाईट स्थिती आहे
विज नाहिये लाईट्स चे पोल पण पडले अजून १० ते १५ दिवस जातील विज सुरळीत होण्यासाठी Sad

फोन चार्ज नसल्याने लागत नाहीयेत

Sad
माझ्या आजोळी आज शेवटी संपर्क झाला. गावातील सगळ्याच घरांचे वादळाने नुकसान झालेय. आवारातील सगळी झाडे मोडून पडलेत. माझे मामा मामी आता नातेवाईकांकडे महाडला आश्रयाला आलेत. तिथूनच संपर्क केला.

टवणे सर, मामाचं वाचून वाईट वाटलं Sad
स्वाती२ , निलुदा, Sad
हर्पेन, खरं आहे. तसंच होवो.
इथे बसून आपण काहीही करू शकत नाही ही हतबलता भयंकर आहे. लिहून जर काही उपयोग झाला तर झाला, या भावनेने लिहिले आहे.

शब्द नाहीत. हे सगळं अवघड आहे. आम्हा घाटावरच्या लोकांना सांगूनही ते दु:ख नाही कळणार.
काळजी घ्या वावे. चिंता करू नका. होईल सगळं ठिक.

Sad
वाईट वाटले. घरी फोन केलेला तेव्हा श्रीवर्धनच्या ओळखीच्या सगळ्या घरांत नारळी पोफळीची सगळी झाडं पडली असंच समजलेलं. Sad
आता आमचं तिकडे घर नाही, अगदी जवळचं/ रक्ताचं कुणी नाही पण लहानपणी अगदी दरवर्षी उन्हाळ्यात ठाणा गाडीने तिकडे जायचं आणि जून मध्ये आमसुले, केळ्याचं पीठ, असोल्या नारळ सुपार्‍या, वाळवलेले गरे, फणसपोळी आणि कोकणी गप्पा घेऊन परत यायचं हा नेम ठरलेला होता.
तुमच्या जवळच्यांना आणि सगळ्यांनाच लवकर मदत आणि उभारी मिळो.

कोकणी माणसं आपण, कातळावरही रूजून येऊ >>>>> खरंय हे. कौतुकही वाटते या वृत्तीचे. पावसाच्या झोडप्ण्याला दाद देत नाही कोकणी माणूस. पण हे संकट मोठे आणि अनपेक्षित आहे. या आधी कधी असा वादळाचा तडाखा बसला नव्हता. सरकारने योग्य ती मदत केली पाहिजे. गेल्या पुराच्यावेळीही कोकणाची उपेक्षाच झाली असे एकंदरीत बातम्या पाहून वाटले. परवा बातम्यात एका माणसाला रडत रडत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागताना पाहिले. फार वाईट वाटले. आमच्या घरासमोरचे मोठाले झाड पडले वादळात. रोज पोरांसोबत खिडकीत बसून बघणे व्हायचे तेवढ्याने जिव्हाळा निर्माण झालेला. अजूनही ते पडलेले अवशेष बघून वाईट वाटते. तर तो माणूस गावातली ८०-९० टक्के झाडे पडली म्हणून रडत होता. आर्थिक नुकसानीसोबत तो भावनिक धक्काही किती विलक्षण असावे हे जाणवत होते Sad

Sad indeed. Hope recovery happens soon and people receive much needed assistance.

Saw a news that due to climate change, in coming years these cyclones may become more frequent in the Kokan region.

कोकण माझा अतिशय आवडता प्रांत.. आता आमचे कोकणात घर वगैरे काही उरले नाही पण तरी ह्र्दयाच्या जवळचे आहे कोकण.. खूप वाईट वाटले लोकांचे.. ब्ऱ्याच लोकांना खरतर आम्हालाही वाटत होते की मधेच जोर कमी होईल किंवा दिशा बदलेल हे वादळ.. आधीच कोरोना आणी आता हे वादळ.. कोकणाचा कणाच मोडला आहे पार.. आणि आपण फक्त बघत बसण्याशिवाय काही करू शकत नाही हे जास्त त्रास देणारे आहे.. Sad
.म्हणा कोकणी माणसाला कष्ट काही नवीन नाहीत आणि घाबरणाराही नाही तो.
जनकल्य्याण समितीने दापोली आणि आसपासच्या भागात छपरे आणि कौले घालण्यासाठी मदत सुरु केली आहे, पैश्याची जमवाजमवपण करताहेत.. परंतू कोरोनामुळे लोकांकडे पैसा नाही त्यामुळे मदत मिळणेपण अवघड जातेय. कुणाला मदत करायची इच्छा असल्यास माहिती देऊ का?
माझे परिचीतच काम करताहेत तेंव्हा गरजूंनाच मदत मिळेल यात शंका नाही..मी आजच मला शक्य असलेली रक्कम दिली आहे. थोडसं का होईना समाधान.. की माझा खारीचा का होईना वाटा देता आला.. बाकी देव कोकणातल्या सगळ्यांनाच खुप शक्ती देवो यातून बाहेर पडण्यासाठी ;(

Saw a news that due to climate change, in coming years these cyclones may become more frequent in the Kokan region.
Sad
म्हणजे पुढे मागे मुंबईसुद्धा टारगेटवर येऊ शकते का...

सरकार वेळेवर आणि योग्य मदत पोहचवेल अशी आशा.
खूप प्रयत्नाने केलेली प्रगती अशी संकटे एका झटक्यात पुन्हा कितीतरी मागे घेऊन जातात. पण लोक मनाने खंबीर राहोत आणि सगळं लवकर ठीक होवो हीच प्रार्थना.

अतिशय वाईट वाटले... तुमच्या मुळे इतके व्यवस्थित कळले नक्की काय झाले.
त्यांना नवे आयुष्य जोमाने उभे करण्यासाठी खूप खूप सदिच्छा. मला कोकण 'पडघवली' या पुस्तकातून कळले. त्यातले नारळी पोफळीच्या बागांचे वर्णन आठवले Sad !!

बातम्यांपेक्षा तुमच्या लेखनाने खरी परिस्थिती समजली. करोना आणि आता हे वादळ. संकटातून कोकणी माणूस पुन्हा उभा राहीलच अशी खात्री आहे. निलूदा प्रचि बद्दल आभार.

वृत्तवाहिन्यांचे वर्तन संतापजनक होते. मुंबईला काही सनासनाटीपूर्ण घडत नाही म्हटल्यावर त्यांच्या दृष्टीने टी आर पी साठीचे सगळे ग्लॅमरच संपले. बाकी महाराष्ट्र कुठेही जाऊ दे. अगदी मराठी वाहिन्यांनीही साफ दुर्लक्ष्य केले. कबूल की रस्ते, फोन द्वारे कम्युनिकेशन होत नव्हते. पण एव्हढया मोठ्या विध्वंसाबाबत इतकी apathy? कोल्हापूर, नांदेड, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथील दुर्घटना तात्काळ पडद्यावर येतात पण कोंकणातल्याना मात्र बातम्यांत फारशी जागा नसते. पालघर डहाणूला उधाणे येतात, नुकसान होते. बोरडी घोलवडच्या चिकूबागायती रोगराई मुळे धोक्यात येतात पण कुठेही बातमी नसते. दक्षिण कोंकण तर सदैव दुर्लक्षित. आंबा महोत्सव भरवले की राजकीय नेत्यांचे काम संपले. असे का व्हावे?

हीरा, रस्ते फक्त पहिले दोन दिवस बंद होते. त्यानंतर रस्ते सुरू झाले पण वाहिन्यांचा इंटरेस्ट तोपर्यंत संपला होता.
वाचून आवर्जून प्रतिसाद देणाऱ्या आणि सदिच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार!

फार वाईट झालं, रायगड जिल्हा आणि त्याला लागून रत्नागिरी जिल्ह्याचा परीसर आहे, तिथे अतोनात नुकसान झालं. डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी काळजी घ्या. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने भरघोस नीट मदत करून निदान त्यांना आता उभं तरी करावं, आपणही खारीचा वाटा उचलुया. सासरी देवगड तालुक्यात झळ बसली नाही फार काही, माहेरी संगमेश्वर तालुक्यातही नसावी.

यावेळी एबीपी माझाने बऱ्यापैकी कवरेज दिलं असं माझं पर्सनल मत. मुंबईवर जास्त लक्ष ठेऊन होते हे मान्य, पण पहिल्या दिवशी रायगड जिल्ह्यातील माहिती आणि दापोलीची न्यूज बऱ्यापैकी दाखवली एबीपी माझाने. केळशी मंडणगड वगैरेचं मात्र उशिरा समजलं आणि दाखवलं गेलं. तिथे इतकं नुकसान झालं हे मात्र फेसबुकवर काहींनी फोटो शेअर केले त्यामुळे समजलं. टीव्हीवर तिसऱ्या दिवशी त्याचा आढावा घेतला गेला. आमच्याकडे एबीपी माझाच सुरु असते म्हणा त्यामुळे तिथलं लिहिलं. त्यांच्या टीमला आणि श्रीवर्धनच्या परिसराला कसा तडाखा बसला हे तिसऱ्या दिवशी ( किंवा दुसऱ्या दिवशी रात्री, मी तिसऱ्या दिवशी बघितलं ते, त्यांचा anchor रडत होता अक्षरशः ) दाखवलं कारण मधे संपर्क बंद होता.

पालघर, डहाणू भागाचे मात्र फार काही दाखवलं नाही. सिंधुदुर्गमधे देवबाग भागात झाडं वगैरे पडली तेही दाखवलं नाही, ते काल दाखवलं.

एकेक झाड उभं करायला किती कष्ट पडतात आणि क्षणात होत्याचे नव्हतं होतं. कोकणातले कष्ट तसे दुर्लक्षित राहतात. देवगड तालुक्यात पण नवरा लहान असताना मोठं वादळ आलेलं, आमची बरीच झाडं वगैरे पडलेली, अंगणातले एक झाड घरावर पडून घराची कौलं वगैरे तुटलेली, त्यामुळे नवरा हे सर्व रीलेट करू शकला, कशा परिस्थितून तिथली लोकं जात असतील ते. मला tv वर सर्व बघूनच एवढा त्रास झाला, तर त्या परिस्थितीतून जाणाऱ्यांची काय अवस्था झाली असेल. सर्व लवकर मार्गी लागो यासाठी प्रार्थना.

अपरिमीत हानी! वावे तुमची मनस्थिती काय झाली असेल याची एक साधी झलक सर्वांनीच लाॅकडाऊनमधे अनुभवली असेल. आपण एका ठिकाणी तर नातेवाईक,सगेसोयरे दुसर्या ठिकाणी. अशा वेळी काळजी करण्याशिवाय काहीच आपल्या हातात नसते.

Pages