बाजाराचा दिवस (कथा)

Submitted by चिन्नु on 16 May, 2020 - 01:29

बाजाराचा दिवस

हणम्याssss

बा ची हाळी ऐकता बरोबर जवळ जवळ झाडावरून खालीच पडला हनुमंता. अंगणातलं पेरूचं झाड म्हणजे त्याच्या साठी एक घरंच होतं- जिथं तो त्याच्या बा आणि त्याच्या कटकटीपासून सुरक्षित राहू शकत होता. हणम्यातला 'म' म्हणेपर्यंत जर बाच्या समोर उभं राहिलं नाही की दिसेल त्या काठीने बा त्याला सोलून काढायचा.
'चिंचा पाडून ठेवल्या. पोती रचून ठेवली. लाकडाच्या ढलप्या फोडून सरपण गोळा करून ठेवलं. आता काय काम राहिलं बरं?', असा विचार करतंच हणम्या बाच्या समोर धडपडला.
"काय रं? कुटं शेकत हुतास रं सुक्कळीच्या?"
अशा प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसतं हे आता हणम्याला चांगलंच माहित झालं होतं. तो खाली मान घालून निमूट पणे उभा राहिला.
"गुरांना चारलं का?" काडीने दात कोरत बा विचारत होता.
"व्हय".
"पानी आन्लं?"
"..."
"काय?"
"काय न्हाय बा. आता जातच हुतो..."
बा ने शब्द ऐकलेच नाहीत. तो तस्सा हणम्याच्या अंगावर धावला, तसा कळशी घेऊन हॅडपंपच्या दिशेने पळत सुटला हणम्या. तो तावडीतून सुटत असल्याचं दिसताच त्याच्या बा ने सणसणीत शिवी हासडून हातात गावला तो दगड हणम्याच्या दिशेने भिरकावला.

हणम्याचा कान थोडक्यात वाचला तरी तो दगड किंचित चाटून गेला. एका हाताने कळशी सावरत, दुसर्या हाताने कान आणि गालामधला रक्ताचा ओहोळ पुसत हणम्या धावायला लागला.
सगळा बेगुना गाव चावडीच्या खालच्या अंगाला असलेल्या व गल्लीच्या टोकाशी असलेल्या हॅडपंपावरून पाणी भरायचा. चार पेरू पोटात गेल्यावर त्याला छान पेंग आली आणि पाणी भरायला उशीर झाला होता.
त्याच्या अपेक्षेप्रमाणेच मोठी लाईन लागली होती. त्यातही बायका डोक्यावरचा पदर सावरत उभ्या होत्या. शेजारून जात असलेल्या कुत्र्याच्या पेकाटात लाथ मारून त्याने आपला राग शांत केला. परत कान चोळत समोर बघायला लागला.

पंपावर राजी ताई पाणी भरत होती. मोती- राजीताईची जेठाणी बायजाबाईच्या माहेरचा खास माणूस- पंप मारत होता.
बायजाबाई राजश्रीला मरेस्तोवर राबवून घेई. ती कुणाला सांगेल या भितीने मोतीला तिच्या बरोबर पाठवून देत असे आणि नंतर राजी कुणाशी काय बोलली हे मोतीकडून काढून घेत असे. हणम्याच काय पण पूर्ण गावासाठी बायजा कडू कारल्यासमान होती, तिच्या कजागपणामुळे.
राजश्री खूप गरीब होती स्वभावाने आणि बायजाबाई तितकीच तिखट आणि खमकी. राजश्रीचा नवरा पैलवान गडी असला तरी वैनीच्या मर्जीबाहेर जात नसे. सकाळी उठल्यापासून सडारांगोळी, चारापाणी, दळण, स्वयंपाक सगळं काही राजश्रीच्या वाट्याला येई.

राजीला पाहताच हणम्या रांग सोडून तिच्या समोर उभा राहिला. त्याला बघताच राजीच्या हातून हंडा पडता पडता राहिला. "आरं कुटं धडपडला हुता? रगतानं माखला हायसा" असं म्हणत तिने त्याला जवळच्या पारावर बसवलं. पदरानं त्याचा चेहरा पुसला. घोटभर पाणी पिऊन हणम्या जणू पुन्हा जिवंत झाला! त्याचे डोळे आणि मन राजीच्या ममत्वाने भरून आले.
"आयविना लेकरू ते! रं मोत्या, याची कळशी भरून घेऊन जा बिगी बिगी " राजीने फर्मान सोडलं तसं मोती पाय आपटत कळशी घेऊन हणम्याच्या घराकडे निघाला.

इकडे बायजाबाई घरी छोटी घागर घेऊन जायच्या तयारीने उभी होती. त्याचं असं होतं की राजी शिळोप्याचं आवरेस्तोवर बायजा लहान घागर घेऊन बाहेर निघे.
जाता जाता प्रत्येक गल्लीतल्या प्रत्येक घरात डोकावून-
"भरलं का पाणी? मलाच मेलीला मरावं लागतं. एक टिप्पूस नाय घरात पाण्याचा. तुमचं झालं का भरून? "
असं मिरवत मिरवत जाई आणि तेवढी एक घागर आणून घरात बसे. तोवर हंडे घागर्या घेऊन राजी आणि मोती हौद भरून घेत. हौद पूर्ण भरायला आला की, बायजाबाई राजश्रीला शिताफीने तिचं लेकरू हातात देऊन घरात बसवत असे आणि स्वतः परत घागर घेऊन -
"काय भरलं का पाणी? आमचं आताच होत आलं बाई. खूप पाणी लागतं!", असं म्हणत म्हणत मिरवून घेई.

गावात सर्वांना तिची खोड ठाऊक होती.

*****
राजश्री माघारी न आल्याने, बाळ्याला वरांड्यात बसवून, बायजा तरातरा रागानेच हॅडपंपच्या दिशेने निघाली.

सगळा गाव लायनीत नीट उभा होता. राजीच्या पैलवानाला नव्हे, तर बायजाबाईच्या तोंडाला घाबरून उभे होते सर्व. कोणाची टाप नव्हती राजीला पाणी भरण्यापासून रोखायची. आता हणम्याच्या घरी आणि राजीकडे पाणी पूर्ण भरून झाल्याशिवाय कुणालाच पाणी मिळणार नव्हतेच!

एका बाजूने मोती आणि दुसर्या बाजूने बायजाबाई येतांना बघून हणम्या उठून बसला.
बायजाला पाहताच हणम्याच्या मुठी आवळल्या जात. राजीवरचं तिचं गाजवणं पाहीलं की कोणालाही वाईट वाटे पण बायजाला घाबरून ते गप्प बसत.
विचार करता करता हणम्याचं राजीकडे लक्ष गेलं. साधं लुगडं, कपाळावर गोंदण, डोक्यावर पदर घेऊन टळटळीत उन्हात घामेजलेली राजी पाहून वाईट वाटलं त्याला.
हणम्या राजीच्या दिवंगत मैत्रीणीचा मुलगा होता. राजीचा फार जीव होता त्याच्यावर. आपण या माऊलीसाठी काहीतरी करावं असं त्याला नेहमीच वाटे. तिच्या विरूद्ध बायजा. पूर्ण नखशिखांत नटलेली.

हॅडपंपावर तैनात राजीला त्याने हाक मारली.
"आक्के ये इकडं"
"काय रं पोरा? बरं वाटतंय नव्हं? हळद लावली म्या. सुकेल बघ लगेच ", असं म्हणत ती हणम्याला पदरानं वारा घालू लागली.
"आक्के, तुझं अजिबात लक्ष नाही बग सोताकडं."
"का रं, असं काहून मणतोस? बरी हाय की म्या"
"काय बरी आक्के? तुला त्वांडभरून हासतांना बगून लय दीस जाली.. "
"व्हयं रं पोरा.. तुजी आवशीपन आस्सच बोलाची. काय तरी काडून हासायला लावाची."
"तू पुन्न्यांदा का नी र्हात तश्शीच? चांगली र्हा. बरी कापडं घाल अगुदरसारखी"
ते ऐकून राजी फिकटशी हसली.
बायजा आणि मोती जवळ येऊ लागले तशी त्यांची खोड मोडायचा विचार हणम्याच्या मनात बळावला. त्याला बायजाचा संशयी स्वभाव माहित होता. तिची गंमत करायची म्हणजे काहीतरी पुडी सोडली पाहिजे, असा विचार करत असतांना त्याला एक कल्पना सुचली.
तो सगळ्यांना, विशेष करून बायजा आणि मोतीला ऐकू जाईल असा जोराजोरात बोलायला लागला.

"आक्के उंद्या बेसवार हाय. "
"बरं मग "
"मक्काय? बाजाराचा दिस न्हवं का?"
"व्हयं. का रं?"
"आक्के, उंद्याच्याला चांगली कापडं घाल"
"का रं?"
"तू घाल तर खरी, मंग सांगतो", एवढं बोलून हणम्यानं घरचा रस्ता धरला.

त्याचं बोलणं बायजाच्या कानावर पडलं याची खात्री होती त्याला. आता रात्रभर बायजाचा मेंदू कसा ओवरटाईम करेल या विचारानेच त्याला हसू येत होतं. मस्त शीळ घालत, त्याच्या बा ने वाढून ठेवलेल्या आगामी कटकटींना सामोरं जायला सिध्द झाला तो...

****
हणम्याचं बोलणं बायजा आणि मोतीनं बरोब्बर ऐकलं, तरी अजून कुठं तरी पाणी मुरतंय की काय, अशी शंका साहजिकच
बायजाला आली. त्यामुळे काहीतरी अपमानास्पद बोलून राजीला न ओरडता तिच्या कडून काढून घ्यायचा निश्चय तिनं केला.
आवाज न करता, वरकरणी हसत, राजीला घेऊन घरी जात असलेली बायजा पूर्ण गावासाठी नवीन होती! न राहवून परतीच्या वाटेवर तिने राजीला छेडलेच-

"काय म्हणत व्हता तो हणम्या? "
"हणम्या व्हयं. लागलं हो लेकराला खूप! ", राजी काळजीने उत्तरली.
"ते नाय. ते बाजाराचं काय म्हनला? "
बायजाची उत्कंठा शीगेला पोहोचली होती.
"ते! उंद्याच्याला चांगली कापडं घाल बाजराचा दिस हाय म्हनत हुता. यडबंबू "

दिवेलागणीची वेळ होईतोवर बायजाने आडून आडून क्रमाक्रमाने मोतीला आणि राजीला हणम्या आणि बाजाराच्या दिवसाबद्दल विचारलं. तेच ते ऐकून ती अधिकच चक्रावली. रात्री केव्हातरी तिला झोप लागली.
****
कडुनिंबाची काडी चघळत बाहेर आला शंभू. सकाळी जोरबैठका काढून मागाहून आवरून आखाड्याकडे निघायचा शिरस्ता होता त्याचा.
धनाजी-संभाजी ह्या दोन्ही भावांचं प्रेम दृष्ट लागण्यागत होते. बायजा आल्यावर किती क्लेष केले, तरी दोन्ही भाऊ प्रेमानं निभावून नेत होते.
'धनादादा गावाहून परतेपर्यंत गोठ्याकडे लक्ष द्याया पायजे', असा विचार करत तो गोठ्याकडे वळला. कमळी गायीवरनं हात फिरवताच तिनं हंबरून आनंद व्यक्त केला. गोठा स्वच्छ दिसत होता. तेवढ्यात राजी वैरण घेऊन येताना दिसली त्याला.
'मोती कुठाय?'
नवर्याचा रागीट आवाज ओळखता येऊ लागला होता एव्हाना राजीला.
'ते बाजाराचा दीस हाय ना आज. जाला आसल उशीर. जाऊंद्या. म्या केलाय गोठा साफ', राजी हळूहळू उत्तरली.
'हूं' म्हणून चुळा भरल्या शंभूनं. तांब्या घ्यायला हात पुढे करणार्या राजीकडे बघतच राहिला तो. देवघरात तेवणार्या शांत समईसारखी राजश्री, या घरात आल्यापासून साखरेसारखी विरघळून गेली होती. नवीन कापडांमध्ये तिचं साधं सौंदर्य खुलून दिसत होतं.
त्याच्या निरखून बघण्याने गडबडून तांब्या सुटला राजीच्या हातून. तो उचलत त्याने हळूच राजीचा हात पकडला.
'जरा दमानं' तो पुटपुटला.
राजी सुखावली. पण दुसर्याच क्षणी हात सोडवून घेतला तिने.
'कुनी बगत्याल'
'कोन? कमळी?' असं म्हणत गडगडाटी हसला तो.
'जावा तिकडं' म्हणून पळ काढणार्या राजीला बघत विहिरीपाशी उभा राहिला शंभू.
'काय इशेश आज?'
ही पावती आपल्या नवीन लुगड्याला हे राजीनं ताडलं.
"हे कापड हणम्याच्या आयशीनं दिलं हुतं. पन इतक्या दिसात घडी न्हाय मोडली. लेकरू काल मनालं म्हून काडली"
राजीनं रहाट्याला हात घातला. तिच्या हातावर आपली पकड घट्ट करत शंभू काही तरी कुजबूजला. तिनं लाजून रहाट सोडून दिला.
विहिरीचं पाणी शांतपणे हेलकावे खात होतं.
*****
कोंबड्याच्या आरवण्याने बायजाची झोप मोडली.
"रं बाळ्या उट", असं म्हणत ती वळली. पण बाळ्या वरांड्यात बैठक मारून बसलेला दिसला तिला. तशी ती केसांचा अंबाडा पाडत रागाने बाहेर आली आणि बघतच राहिली!
राजीनं नवं लुगडं नेसलं होतं. डोळ्यात काजळ, कपाळावरच्या गोंदणावर ठसठशीत कुंकू, हातात पाटल्या! राजश्री अगदी नव्या नवरीगत दिसत होती.
"आगं दिस डोक्यावर आला अन् तुला ह्यो नट्टापट्टा सुदरतोय व्हयं? काय कामं करायची हाईत का नाईत? चुल बी थड पडलीया"
"आवं ताई, तुमीच काल रातच्याला म्हनालात नं आज बाजाराचा दिस. लौकर तयार व्हाया हवं. म्हून म्या रातच्याला भाकर्या बदडून ठेवल्या. कालवण बी व्हतं. लोणचं काडून ठेवलंया बरनीत.", राजी उत्तरली.
खरं तर बायजाला भाकरी मुळीच आवडत नसे. रोज ती राजीला गहू दळायला लावी. राजीनं पोळी तव्यावरनं काढताच परातीत तुकडे करून घेत त्यात घट्ट दुध आणि गुळ घालून आत नेत असे. ती आणि बाळ्या मिळून आतल्या आत फडशा पाडत. पण काल राजीकडून काढून घ्यायच्या नादात वेगळंच होऊन बसलं होतं.
आताच्या आता हिला दळायला बसवायला हवं असा विचार करत करड्या नजरेने बघत ती कडाडली, " कुटं गेलं पैलवान?"
नवर्याचा उल्लेख ऐकताच खाली मान घालून पडेल ते काम करणारी राजी चक्क लाजली! पदर ओठाला लावून खुसखुसायला लागली.
"राजेशरी! ध्यान कुटंय तुजं?"
"पैलवान नं.. पाटलांकडं गेलं बैलगाडी मागवाया. त्येलपिंपरीला टेकाडावर नवसाचा मारूती हाय न्हवं तिकडे जायला. पाटीलदादा म्हनाले तिकडच धरमसाळंत र्हावा चार दीस. देवीआईची जातरा भरते म्हनं. देवीआईची ओटी भरून येऊ आसं म्हनलं हे"
राजीच्या चेहर्यावर ओसांडणारा आनंद पाहवत नव्हता बायजाकडून.
"कायबी जायचं नाय कुटंच ", ती कडाडली.
"नाय कसं ताई. देवीआईचा कोप व्हईल. तुमी आन दाजी मागं नाय का पद्मालयला गेलं हुतं. बाप्पा पावला म्हून तर बाळ्या झाला न्हवं! औंदा आमालाबी..."
तेवढ्यात वाड्याच्या दाराशी बैलगाडी उभी राहिली.
"येतो बरं ताई! पाणी हपसायला मोतीला न्या सोबत. येगट्या जाऊ नगासा.. येत्या बाजाराच्या दिवशी येतू मागारला", असं म्हणत राजीनं नमस्कार केला आणि ती बोचकं सावरत भराभर बाहेर पडली.
तिच्या धुसर होत जाणार्या आकृतीकडे बायजा हात चोळत बघत राहिली. बाजाराच्या दिवसाचा सूर्य एव्हाना तळपायला लागला होता.
(समाप्त)

Group content visibility: 
Use group defaults

मला वाटतं बायजा राजीला आणि तिच्या नवऱ्याला मोकळेपणाने बोलू देत नसणार. म्हणून तिच्या नवऱ्याने हणम्यामार्फत तिच्यापर्यंत पण त्याचवेळी बायजाला कळेल असा निरोप पाठवला.

धन्यवाद सर्वांना.
हणम्यानं 'पुडी' सोडल्यामुळे राजीला थोडी उसंत मिळते बायजाच्या कैदेतून. संशयी आणि आडमुठ्या स्वभावामुळे बायजाची खोड मोडते.

कथेची सूरवात आणि शेवट याची टोटल लागली नाही, त्यामुळे जरा समजण्यास वेळ लागला. बाकी कथा मांडणी, लिखाण अगदी उत्तम.

सर्वांना धन्यवाद.
ही कथा एका स्पर्धेसाठी लिहिली होती. कथेचं अभिवाचन 10 मिनिटात बसवायचं असल्यामुळे बरीच काटछाट केली होती. आता थोडा विस्तार केला आहे.

मस्त भारदस्त कथा!! वर्णने एकदम फरफेक्ट!! मजा आली.

काही ठिकाणी विस्तारित विवेचन हवे होते. विनाकारण गोंधळ होतोय.

बाकी फार दिवसांनी काहितरी सकस वाचले!!

मस्त झालीये कथा. आता जो जास्तीचा भाग घातलास त्यामुळे मजा येतीये.

हणम्या बायजाला त्रास द्यायला एक करायला गेला पण त्याच्याही नकळत त्याच्या करणीमुळे राजीला नवर्‍यासोबत भटकायला जायची संधी मिळाली. मस्त एकदम. भाषा आणि वातावरण फारच मस्त उभं केलं आहेस.

अरे बापरे!
खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून.
जव्हेरगंज, कुठे गोंधळ होतो सांगा प्लिज.
पुन्हा सर्वांचे आभार.