१८९७ चा प्लेग

Submitted by भरत. on 27 April, 2020 - 03:05

सध्याच्या दिवसांत Epidemic Diseases Act, 1897. याचा उल्लेख वारंवार होतो आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभू मीवर सरकारने हा कायदा पुन्हा एकदा लागू केला आहे.
हा कायदा ब्रिटिश सरकारने १८९७ साली प्लेगच्या नियंत्रणार्थ आणला होता.

या प्लेगच्या पाऊलखुणा मराठी इतिहास-साहित्य-कलाविश्वात उमटलेल्या दिसतात. सर्वांत आधी आठवतो तो २२ जून १८९७ हा चित्रपट.

चापेकर बंधूंनी केलेल्या रँडच्या खुनामागे लोकमान्य टिळकां ची प्रेरणा होती, असा आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा पहिला खटला चालला आणि त्यांना १८ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
केसरीचे माजी संपादक अरविंद व्यं गोखले यांनी लिहिलेल्या 'मंडालेचा राजबंदी' या पुस्तकात या सगळ्या कालखंडाबद्दल लिहिले आहे. त्या आठवणी आजच्या काळाशीही समर्पक वाटतात.
१८९६ सालच्या दुष्काळात जनता होरपळत असतानाच प्लेगच्या संकटाची भर पडली. हाँगकाँगहून (म्हणजे पुन्हा चीनमधून) आलेल्या धान्याच्या पोत्यांबरोबर प्लेगचे उंदीरही मुंबई बंदरात उतरले . मुंबईत साथ पसरली, न्यायालये , सरकारी कार्यालये बंद झाली. गाड्या भरभरून माणसे गुजरातकडे रवाना होऊ लागली. काही सरकारी नजर चुकवून पुण्यात आली. ऑक्टोबर १८९६ मध्ये पुण्यात प्लेगचा पहिला रुग्ण सापडला आणि आजार पाहता पाहता पसरला.

टिळकांनी केसरीतून प्लेगबद्दल माहितीपर मजकूर छापायला सुरुवात केली. लोकांनी काळजी घ्यायला हवी, बेपर्वाई सोडायला हवी. असे सांगितले. हिंदुस्तानात प्लेग येउ नये यासाठी प्रयत्न करण्यात सरकार कमी पडले, तरी आता प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपायांना टिळकांनी पाठिंबा दिला. टिळकांना तेव्हाही लोकांना नागरिक शास्त्राचे धडे द्यायची गरज भासली होती. सुशिक्षित, पुढारलेल्या लोकांनी प्लेग निवारणाच्या कामात पुढे यावे, आजूबाजूच्या लोकांना मदत करावी हे त्यांनी खडसावून सांगितले.

प्लेग प्रतिबंधासाठी सातार्‍याहून पुण्यात आणवलेल्या रँडने नदीपलीकडे प्लेगग्रस्तांसाठी संसर्गरोध छावणी (क्वारंटाइन) उभारली. रुग्णांना वेगळे काढणे , ते सापडलेल्या ठिकाणी स्वच्छता करणे ही कामे त्याने आरंभली. या उपायांनी पुढे सक्तीचे रूप घेतले. स्वच्छता करण्याची मजल चीजवस्तू घरेदारे जाळण्यापर्यंत गेली.

छावण्यांमध्ये खाण्यापिण्याची सोय नसल्याने प्लेगच्या जोडीने लोक उपासमारी आणि रोग प्रतिकारकशक्ती कमी होऊन मरू लागले. त्यामुळे लोक रुग्णाला छावणीत पाठवायला कचरू लागले. परिणामी सरकारने दंडुकेशाही आरंभली. "लोकांमध्ये अस्वास्थ्य उत्पन्न होऊन अरिष्ट निवारण्याकरता योजलेले हेच एक दुसरे अरिष्ट" अशी स्थिती झाली. "सरकारच्या उपायांमध्ये दुष्टावा नसेल, पण माणुसकीचा ओलावा नव्हता."
एकीकडे प्लेगचे वाढते प्रमाण, मृतांची वाढती संख्या आणि त्यात उपायांच्या नावाखाली अत्याचार यामुळे जनतेत असंतोष निर्माण होऊ लागला. काखेतले गोळे तपासण्यासाठी मुस्लिम स्त्रियांचे बुरखे फाडणे, हिंदू स्त्रियांना उत्तरांगावरची वस्त्रे काढून ठेवण्यास सांगणे, असे प्रकार होऊ लागले.

मुंबईत नसली तरी पुण्यात मोहर्र्मच्या मिरवणुकीवर बंदी घातली गेली. या बंदीला टिळकांनी जुलूम म्हटले.

पुण्यात रास्तापेठेत अपरात्री जाऊन धुमाकूळ घालणार्‍या पाचदहा सोजिरांना पुणेकरांनी चोप दिला. त्यात एका सोजिराचा मृत्यू झाला.

दुष्काळात प्लेगची भर पडल्याने लोकांची अन्नान्न दशा होऊ लागली.

रँडशाहीचा कडेलोट होऊ लागला तशी टिळकांनी त्यावर टीका सुरू केली. त्या वेळची इंग्रजी वृत्तपत्रे मात्र ब्रिटिश सरकारच्या जुलुमावर लिहिण्यापेक्षा सरकारची तळी उचलत टिळकांवर टीका करण्यात - प्रक्षोभक, चिथवणीखोर अशी विशेषणे लावण्यात धन्यता मानीत होती.

लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रे या आत्मकथनात प्लेगच्या मोजक्या आठवणी आहेत. कसल्याही संकटात विनोदवृती जागृत ठेवणार्‍या लक्ष्मीबाईं तेव्हा नगर येथे होत्या. त्यां चे आयुष्य बिर्‍हाडे बदलण्यातच गेले. प्लेगबद्दल त्या म्हणतात की विघ्नहर्त्यानेच आपल्या वाहनास आज्ञा केली यांना आता इथून हलवा. एक दिवस दत्तू व त्या जेवत असताना एक मोठा उंदीर दत्तूच्या ताटाजवळील चित्रावती खाऊ लागला. यावर लक्ष्मीबाई म्हणतात - "नगरचे उंदीर भीत नाहीत बरं का!"
" दोघे उठले तसे आणखी एक उंदीर येऊन चित्रावती खाऊ लागला. थोड्याच वेळात दोघे उंदीर गरगर फिरू लागले व पटकन मेले.
त्यांची परीक्षा करून ते प्लेगचे उंदीर आहेत हे कळल्यावर घर सोडणे आले. लक्ष्मीबाईंची सोय जिथे सर्व स्त्रियाच होत्या अशा एका वाडीत झाली.

रमाबाई रानडे यांच्या 'आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या पुस्तकातही प्लेगचे उल्लेख आहेत. त्यांच्या धान्याच्या कोठीत मेलेले उंदीर मिळू लागले. पण त्यांचे एकदोन नोकर प्लेगने आजारी पडल्यावरच हे उंदीर प्लेगचे आहेत, हे त्यांना कळले. न्या. रानडे आपल्या नोकरांचीही कुटुंबीयांसारखीच काळजी घेत. त्यांची स्वतःची प्रकृतीही तोवर उतरणीला लागली होती. अशात त्यांनी स्वतःवर अधिक त्रास ओढवून घेऊ नये म्हणून रमाबाईंनी एक नोकर आजारी पडल्याची गोष्ट होताहोईतो न्या. रानड्यांपासून लपवून ठेवली. आतापावेतो प्रत्येक गोष्ट पती सांगतो केवळ म्हणून, पतीच्या सांगण्यानुसार करणार्‍या रमाबाई पहिल्यांदाच स्वतः काही ठरवताना आणि करताना दिसल्या.

चौथी आणि अतिशय हृदयद्रावक आठवण सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची आहे. त्यांनी आपला दत्तक मुलगा डॉक्टर यशवंतवतराव याला पुण्याजवळ प्लेगच्या उपचारांसाठी दवाखाना काढायला सांगितले. त्या स्वतः जाऊन रुग्णांना घेऊन येत आणि दवाखान्यात भरती करत. ६६ वर्षांच्या सावित्रीबाईनी एका दहा वर्षांच्या रुग्ण मुलाला बर्‍याच दूरवरून पाठंगुळीला घेऊन आणून दवाख्यान्यात भरती केले. तो मुलगा तर वाचला. पण प्लेगच्या संसर्गाने सावित्रीबाईंचा बळी घेतला.
पुढे १९०५ मध्ये नगरमध्ये प्लेगची साथ आली असताना यशवंतरावांनी तिथे दवाखाना काढला आणि रुग्णसेवा करताना संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लो. टिळकांच्या सुधारणाविरोधी आणि सनातनी मतांमधे शेवटी झालेले परिवर्तन हा एक मोठ्या लेखाचा विषय बनू शकतो पण इथे अर्थातच आणि उघडच अवांतर नको म्हणून लिहीत नाही.

प्रतिसाद ही सगळे इंटेरेस्टिंग.

आदिश्री, तुम्ही लिहिलेली आठवण म्हणजे देव तारी त्याला कोण मारी ह्या म्हणीची प्रचिती देणारी.

<< थोडक्यात, तेव्हाचे पुणेकर म्हणजे आजचे तबलिगी होते म्हणता येईल का?
रँडच्या कर्तव्यदक्षतेमुळे हजारो पुणेकरांचे जीव वाचले असतील. त्याचे बक्षीस त्याला खुनाच्या रुपाने मिळाले. >>

------
रँड यांनी हजारो/ लाखो लोकांना वाचविण्यासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतले होते. त्या परिस्थितीत ते योग्य होते हे आता करोम मुळे समजायला लागले. काही ठिकाणी अत्याचार झाले असतील...

करोना काळात आपलेच पोलिस आणि आपल्यास नागरिकांना बेदम चोप देत आहेत. कारण काय तर दुध, भाजी, औषध आणायला बाहेर पडणे... काही नागरिकही पोलिसांच्या लॉकडाऊन काळातल्या कामात अडथळे आणत आहेत.

आपण रँड यांची हत्या करणार्‍यांना क्रांतिकारक आणि थोर देशभक्तांचा दर्जा देणे किती चुकीचे आहे हे आता (करोना मुळे) समजते.

वध का हत्या, स्वातंत्र्य संग्राम का बंड हे सगळे आपण कुठल्या बाजूला आहोत ह्याच्यावर ठरते.
जाणत्या राजाला ही वाट चुकलेला देशभक्त म्हटले गेले होतेच.
प्रत्येकाला आपली बाजू ठरवायचा हक्क आहेच.
तरीपण उदय सखेद आश्चर्य वाटते आहे.

आपण रँड यांची हत्या करणार्‍यांना क्रांतिकारक आणि थोर देशभक्तांचा दर्जा देणे किती चुकीचे आहे हे आता (करोना मुळे) समजते.
Submitted by उदय on 1 May, 2020 - 10:37
--
भगतसिंग, सुखदेव, राजगुरु व अश्या अनेक क्रातिंकारां बद्दल तुमचे उदात्त विचार ऐकायला आवडतील.

ओसामा व हाफिज सईदला "जी" म्हणणार्या लोकांत व आपल्यात फारसा फरक दिसत नाही.

रँड यांनी हजारो/ लाखो लोकांना वाचविण्यासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतले होते. त्या परिस्थितीत ते योग्य होते .......
आपण रँड यांची हत्या करणार्‍यांना क्रांतिकारक आणि थोर देशभक्तांचा दर्जा देणे किती चुकीचे आहे हे आता (करोना मुळे) समजते.
>>>>

उदय इतकंच सांगावेसे वाटते की अभ्यास वाढवा. कृपया धन्यवाद.

काळाच्या ओघात असे कित्येक प्रसंग तंतोतंत पुनः पुन्हा घडत असतात. History repeats itself.
त्या काळच्या समाजवर्तनानुसार आणि अभिजनमतानुसार घटनांचे मूल्य, योग्यायोग्यता ठरते.
जेव्हा रक्तरंजित kraanti घडते तेव्हा मात्र एखाद्या तात्कालिक घटकामुळे वर्षानुवर्षांचं साचलेलं वैफल्य उफाळून येतं आणि पूर्वोदाहरण नसलेलं अस काहीही घडू शकतं. आणि हे सहसा रिपीट होत नाही.

>>तरीपण उदय सखेद आश्चर्य वाटते आहे.<< +१
उदयशेठ, पटलं नाहि. चूकिची फूटपट्टी लावली आहे तुम्हि, प्लीज फेरविचार करा...

उत्तम लेख

आदीश्री , ममो आठवणी हृद्य आहेत तुमच्या

सव्वाशे वर्षांपूर्वी पुण्यातले एकूण वातावरण फारच सनातनी होते. फक्त पेठान्मध्येच नाही तर इतरत्रही. कारण काय ते बाजूला ठेवून त्या कालखंडात सार्वत्रिक सामाजिक मानसिकता अशी होती हे तथ्य स्वीकारले तर सगळे सोपे होते. डॉ रमाबाईंना उपचार नाकारले गेले. डॉ घोल्यांच्या मुलीस काचा खायला घालून मारून टाकले वगैरे. समाजाचे म्होरक्ये सनातनी होते आणि ते हीरो होते. त्यांना जे योग्य वाटत होते तेच घडू शकत होते. योरपमध्येसुद्धा चारपाचशे वर्षांपूर्वी हेच घडत होते.
इतिहास हा कोणाची विभागणी राष्ट्रप्रेमी वा राष्ट्रद्रोही अशी करीत नाही. राष्ट्रीयत्व राष्ट्रप्रेम हा पेच योरपमध्ये एकेकाळी खूप गुंतागुंतीचा झाला होता. कारण सततच्या लढाया आणि आक्रमणे यामुळे राष्ट्रांच्या सीमा आणि व्यक्तीच्या निष्ठा सतत बदलत होत्या.
इतिहास इतकाच निष्कर्ष काढू शकेल की सर्वस्तरीय सामाजिक सुधारांमध्ये सापेक्षतेने भारतीय द्वीपकल्प थोडे मागे राहिले.

आपण रँड यांची हत्या करणार्‍यांना क्रांतिकारक आणि थोर देशभक्तांचा दर्जा देणे किती चुकीचे आहे हे आता (करोना मुळे) समजते. >> +१.

टिळकांच्या देशभक्तीवर शंका?
माझ्या बालपणीपासूनच्या सर्व ईतिहासाच्या अभ्यासालाच सुरुंग लागला.
एक असे मानले की रॅन्ड योग्य काम करत होते आणि टिळकांनी राजकीय फायदा ऊचलत हत्या केली किंवा त्यांच्या सनातनी विचारांमुळे त्यांना रॅंन्डचे परिस्थितीला अनुसरून योग्य वागणेही अयोग्य वाटले...
तरी याव्यतिरीक्त टिळकांचे काहीच योगदान नव्हते का? सगळेच खोडून दाखवा ते...

बाकी ईंग्रजांनी सरसकट जुलूम केले नसावेत. अन्यथा त्या काळात साता समुद्रापलीकडून येत त्यांनी आपल्यावर ईतकी वर्षे राज्य केले नसते. आपल्यातले कित्येक लोकांना ईंग्रज राजवट आवडत असावी किंवा ईतर राजेशाही पर्यायांच्या तुलनेत सुसह्य वाटत असावी.

अगदी आजही वा स्वातंत्र्यानंतरच्या काळातही आपल्यायेथील जनतेच्या मनात ईंग्लंडबद्दल वा ईंग्रजांबद्दल तितका राग दिसून येत नाही जसा पाकिस्तान वा गेला बाजार चिन्यांबद्दल दिसतो. का ते बरेचदा मला कळत नाही. कदाचित ब्रिटीशांची राजवट सरसकट हुकुमशाही नसावी ज्यांनी केवळ जुलुमच केले.

आणखी एक म्हणजे भारतीयांमध्ये जे जातीभेद होते त्याचे ईंग्रजांना काही पडले नसावे. त्यांच्यासाठी सारे भारतीय ब्राऊनच. हि त्यांच्या नजरेतील समानताही काही लोकांना सोयीची वाटत असावी..?

इथे कोणीही टिळकांच्या देशभक्तीविषयी शंका घेतलेली नाहीय. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवीनच असे इंग्रज सरकारला ठणकावून सांगणारे टिळकच होते. त्यांच्या आयुष्याचा आणि राजकीय आयुष्याचा बराच काळ सनातनी वातावरणात गेला आणि त्यांचे विचार बराच काळ पराकोटीचे सनातनी राहिले . पण ह्यामुळे त्यांच्या देशभक्तीचा उपमर्द कसा होतो?

आपण रँड यांची हत्या करणार्‍यांना क्रांतिकारक आणि थोर देशभक्तांचा दर्जा देणे किती चुकीचे आहे हे आता (करोना मुळे) समजते.
>>>>

मला या पोस्टमध्ये शण्का दिसली
असो. आपला आपला दृष्टीकोन. त्यानुसार आपण अर्थ कढणार.. मूळ पोस्ट ज्यांची आहे तेच क्लीअर करतील.

रँड यांची हत्या चापेकर बंधूंनी केली. त्यामुळे ते वाक्य चापेकर बंधूंविषयीच असावे.
पण आता सव्वाशे वर्षांनंतर फार चिकित्सा करण्यात अर्थ नाही असे वाटते.

मला चापेकर बंधूंचे नाव आधीच्या चर्चेत दिसले नाही. उलट रॅन्ड आणि टिळक अशीच चर्चा दिसली. त्या हत्येमागे टिळक होतेच. त्यांच्यावरही ख्टला भरलेला. कारावास झालेला. मुळात वरची चर्चा टिळकांचा संदर्भ देतच सुरू झालेली. मागच्या पानावर बहुधा फेरफटका यांची पोस्ट आहे तिथून हा दृष्टीकोण मांडला गेलाय आणि पुढे चर्चा वाढली.

म्हणून म्हणतोय की मूळ पोस्ट लेखकालाच स्पष्ट करू देत.
शंका टिळकांच्या देशभक्तीवर आहे की चापेकर बंधूंच्या?

मुळात धागा लेखक व त्याचे अड्डा गॅगचे चेलेचपाटे, इथली एक ब्रिगेडी टोळी आहे. तेव्हा त्यांचे ब्राह्मण क्रांतिकारकांबाबत मत काय असेल हे उघड आहे.

त्यांच्या मते आलिशान घरात, ब्रिटिशांनी दिलेले चमचमीत पक्वान्ने चापून, गाद्यागिर्दयांवर लोळत उपोषण करणारे खरे क्रांतिकारक आहेत.

ब्राह्मण क्रांतिकारक हा कोणता प्रकार? धर्मासाठी एखाद्याचा खून पाडणे क्रांतीकारी असते की अतिरेकी?

ब्रिटिशांनी दिलेले चमचमीत पक्वान्ने चापून, गाद्यागिर्दयांवर लोळत उपोषण करणारे खरे क्रांतिकारक आहेत.>>> ना. तिथे (ब्रिटिशांशी) चापुलसी करून, चमको आणि चमचेगिरी करून, इथल्या मातीशी प्रतारणा करून जे जगले तेच सद्यस्थितीत खरे क्रांतिकारक आणि देशभक्त आहेत.

चापेकर बंधूंनी स्वतःच इंग्रजांच्या सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी पराकाष्ठा केली होती हे माहित आहे का? 'आमची पलटणीत राहण्याची सर्व तर्‍हेने निराशा झाल्यावर आम्ही इंग्रजांचे हाडवैरी जाहलो' असे ते म्हणतात. साथ रोखण्यासाठी जे काही कटू उपाय करावे लागले ते इंग्रजांनी केले. त्याला आजच्या काळाच्या मोजपट्ट्या लावून बघण्यात अर्थ नाही. 'बिग पिक्चर' कडे बघायला पाहिजे. प्लेगवर लस निर्माण केली तिसुद्धा हाफकिन नावाच्या इंग्रजाने. ब्रिटिशांऐवजी त्यावेळी पेशव्यांचे राज्य असते तर प्लेग घालवायला यज्ञ आणि अनुष्ठाने करत बसले असते आणि लाखो पुणेकर उंदरांसारखे मेले असते.

धाग्याला अपेक्षित वळण लागलेय! आमच्याही 2 पिंका.

बाकी कुणाही इंग्रजाला मारून देश स्वतंत्र करणार म्हणणारे लोक्स थोर होते.

1857 वाले, फडके अँड पार्टी, गदर पार्टीवाले, पत्री सरकार वाले खरे क्रांतीकरी!

सा.

एत्तदेशीयांचे राज्य असतांना किंवा इंग्रजी राज्यात संस्थानांमध्ये प्लेग पसरला नव्हता.

Lol

माझ्या एका पोस्टमुळे ह्या धाग्याला अनपेक्षित वळण लागलं, त्याबद्दल माझी दिलगिरी. माझ्या पोस्टमधे कुठेही टिळक, चापेकर किंवा कुठल्याही इतर क्रांतिकारकांविषयी, स्वातंत्र्यसैनिकांविषयी अनादर व्यक्त करण्याचा अजिबात उद्देश नव्हता. तत्कालिन परिस्थितीचा राजकीय लाभ करून घेण्यात, असलाच, तर टिळकांचा एक राजकारणी म्हणून धूर्तपणा आहे. इथे धूर्तपणा हा गौरवोद्गार आहे. येन-केन प्रकारे, परकीय सत्ता उलथून स्वातंत्र्य मिळवणं हे त्या सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचं ध्येय होतं. त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही. मुळात ब्रिटीशांच्या colonization / वसाहतवादाचं कुठलंही समर्थन होऊ शकत नाही.

आता राहिला प्रश्न डॉ. हाफकिन च्या कार्याचा. त्याबद्दल अखिल मानवजात त्यांची ऋणी राहील. एक तपशीलातली चूक - डॉ. हाफकिन ब्रिटीश नव्हते. ते जन्माने रशियन होते आणी नंतर फ्रान्समधे मायग्रेट झाले होते. पण प्लेग जसा एतद्देशीयांना होत होता, तसाच त्याचा धोका ब्रिटीशांना सुद्धा होता. त्यामुळे फक्त भूतदयेनं ब्रिटीशांनी लस शोधायला प्रोत्साहन दिलं असं म्हणता येणार नाही. आता एतद्देशीयांचं राज्य असतं (पेशवाई चं राज्य नव्हतं. पेशवे राजे नव्हते. मराठ्यांचं राज्य असं म्हणता येईल.) तर काय झालं असतं हा 'मधूच्या आत्याबाईंना मिश्या असत्या' कॅटेगरीतला प्रश्न आहे. मुळात चीनशी व्यापार असता का, प्लेग भारतात आला असता का वगैरे प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे त्या चर्चेला अर्थ नाही.

फेरफटका +१
तुमच्या कमेंट्स अभ्यासपूर्ण असतात.

Pages