इथे पुस्तके राहतात ...

Submitted by कुमार१ on 27 January, 2020 - 08:25

लहानपणापासून ते आतापर्यंत वाचन हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. बालपणी त्याची सुरवात छोट्याशा रंगीबेरंगी गोष्टीच्या पुस्तकांनी झाली. पुढे माध्यमिक शाळेत अभ्यासेतर अवांतर वाचन चालू झाले. तेव्हापासून ते थेट कमावता होईपर्यंत जे काही असे वाचन झाले त्यासाठी विविध वाचनालयांचा आधार घेतला. पुढे कमावता झाल्यानंतर काही प्रमाणात पुस्तक खरेदी करीत राहिलो. तरीही पुस्तकांचा मुख्य स्त्रोत हा वाचनालय हाच राहिला होता. ३०-४० वर्षांपूर्वी वाचनालये ही सुसंस्कृत शहरांचे वैभव असायची. आज त्यांचे प्रमाण आणि सर्वसाधारण दुरवस्था आपण जाणतोच. त्या अनुषंगाने माझा आजपर्यंतचा वाचनालय-प्रवास आणि तिथले काही अनुभव सादर करतो. ते वाचकांना रोचक वाटतील अशी आशा आहे.

माध्यमिक शाळेत असताना आम्हाला रोजच्या वेळापत्रकात दोन मधल्या सुट्या असायच्या – एक लहान १५ मिनिटांची तर दुसरी मोठी ४५ मिनिटांची. मोठ्या सुटीमध्ये शाळेच्या ग्रंथालयात आमच्यासाठी वाचनाची सोय केलेली असे. तिथे बसून वाचताना समोरच्या भिंतीवर मोठ्या व आकर्षक अक्षरात लिहिलेले ‘ग्रंथ हेच गुरु’ हे वचन नजरेत भरे. वाचनाच्या आवडीतून त्या वचनाची सत्यता पटत गेली, यात शंकाच नाही. त्या काळात वयानुरूप असे वाचन झाले, जसे की अद्भूत गोष्टी, प्रवासवर्णने, इ. तिथल्या कपाटांत काही भले मोठे ग्रंथ देखील रचून ठेवलेले असायचे. ‘गीतारहस्य’, ‘ कर्‍हेचे पाणी ’सारखी पुस्तके लांबून पाहिली पण त्यांना हात लावायचे काही धाडस झाले नाही. एका नियतकालिकाने मात्र तेव्हा चांगलेच आकर्षून घेतलं होते. त्या मासिकाचे नाव ‘अमृत’. त्याच्या मुखपृष्ठावर ‘ज्ञान आणि मनोरंजन’ हे ब्रीदवाक्य अगदी ठळकपणे लिहीले असायचे. त्या वाक्यास अनुसरून सर्व वयोगटांना आवडेल असे काही ना काही त्यात होते. पुढे मोठे झाल्यावर समजले की अमृतला मराठीतील ‘डायजेस्ट’ (RD च्या धर्तीवर) म्हटले जाई. हे मासिक सुमारे ६३ वर्षे चालल्यावर बंद पडले तेव्हा हळहळ वाटली. माझ्या शालेय वयात वाचायला सुरवात केलेले हे मासिक मी माझ्या मुलांचे कॉलेजचे शिक्षण संपून गेल्यावरही वाचत होतो. इतका त्याचा दीर्घ सहवास होता.

त्या वयात असेच एकदा रस्त्याने भटकत होतो आणि एक मित्र भेटला. म्हणाला, काय करतो आहेस ? मी म्हणालो, काही खास नाही. त्यावर तो म्हणाला की चल माझ्याबरोबर, आपण जरा पुस्तके पाहू आणि वाचत बसू. तिथे जवळच एका इमारतीवर ‘शासकीय विभागीय ग्रंथालय’ अशी भली मोठी पाटी होती. मी जरा बुचकळ्यात पडलो आणि त्याला सांगितले, की मी काही याचा सभासद नाही. त्यावर तो मोठ्याने हसला आणि म्हणाला, “अरे येड्या, मी तरी कुठे आहे. अरे, हे नुसते तिथे बसून वाचायला फुकट असते, अगदी कुणाला पण !” तेव्हा मला अगदी धक्काच बसला होता. जनतेसाठी असे फुकटचे वाचनालय असू शकते, हे प्रथमच समजले. मग आम्ही तिथे आत गेलो. एका मोठ्या नोंदणी वहीत फक्त आपले नाव, पत्ता आणि आल्याची वेळ असे लिहायचे होते. आत खूप मोठी जागा, त्यात असंख्य पुस्तके मांडून ठेवलेली होती. ते बघून अगदी हरखून गेलो. ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांची सूची देखील बघायला उपलब्ध होती. पुन्हा ३-४ कर्मचारी आपल्याला हवे ते पुस्तक शोधून देण्यासाठी हजर होते. एकंदरीत त्या ग्रंथालयावर खूष झालो.

पुढे लवकरच घरच्यांनी त्याचे सभासदत्व घेतले, जे अगदी नाममात्र शुल्कात मिळाले आणि ते शुल्कही फक्त एकदाच भरायचे होते ! इथली बहुतेक पुस्तके जुनीपानी होती. अगदी नवे पुस्तक मी क्वचितच पाहिले. आपल्याला हवे ते पुस्तक मिळण्यासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदवण्याची सोयही होती. पण त्या योजनेचा अनुभव यथातथाच आला. कालांतराने शासनाने तो कायम- सभासदत्व प्रकार रद्द केला. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी काही अटी घातल्या – अमुकतमुक दाखला जोडा वगैरे. तसेही एकूण त्या वाचनालयावर कायम (सरकारी) उदासीनतेची छाया असायची. मग मी त्या वाचनालयाला रामराम करून टाकला. पण त्याला मला एक मोठे श्रेय नक्की द्यावे लागेल. माझ्या किशोरावस्थेतील वाचनाची बैठक या ग्रंथालयामुळे झाली. तत्कालीन दिग्गज लेखक – अत्रे, खांडेकर, फडके, इत्यादी हे वाचायला लागलो. त्याचे स्वतःला फार अप्रूप वाटायचे. अत्र्यांची नाटके वाचताना उत्स्फूर्तपणे मोठमोठ्यांदा हसू आलेले आजही आठवते.
आता आमच्या कुटुंबाने वाट धरली एका खाजगी वाचनालयाची. ते तर प्रेमात पडावे असेच होते. सुसज्ज दुमजली इमारत आणि प्रसन्न वातावरण. तिथे एका वेळेस दोन पुस्तके मिळायची. मग एक मोठ्यांसाठी तर एक मुलांसाठी आणले जाई. मोठ्यांचे बहुतेक करून असायचे एखादी रहस्य कादंबरी, तर मुलांसाठी ऐतिहासिक, बोधप्रद वगैरे ! मला आजही त्या रहस्यकथांची पुस्तके आठवतात. तेव्हा बाबुराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक ही मंडळी जोरात होती. कुणाच्या ‘झुंजार’ तर कुणाच्या ‘गरुड’ कथा असायच्या. आमच्या घरी मात्र हे असले काही मुलांना वाचायला बंदी होती. आता कुठलीही बंदी घातली की चोरटा उद्योग सुरु होणारच की ! सगळे मोठे घराबाहेर गेले की हळूच त्या रहस्यकथांवर झडप घातली जाई. कधीकधी तर मोठे घरात असतानाही आम्ही अभ्यासाच्या पुस्तकात ते पुस्तक लपवून वाचत असू. आजही मला त्या पुस्तकांतील शृंगार वर्णने, नग्नता आणि हिंसा व्यवस्थित आठवते. हे असले काही आम्ही त्या वयात वाचू नये, यासाठी मोठ्यांचा तो आटापिटा. आता हे वाचून सध्याची मुले तर खो खो हसतील की नाही? असो. जी पुस्तके आम्ही वाचावीच असा मोठ्यांचा आग्रह होता त्यानुसार नाथमाधवांचे ऐतिहासिक ठोकळे आणि भा रा भागवतांची अनेक पुस्तके डोळ्यांखालून गेलेली आठवतात. शेरलॉक होम्सचे अनुवाद प्रा. भालबा केळकरांनी केलेले असल्याने ही पुस्तके मुलांसाठी अगदी ‘कुटुंबमान्य’ अशी होती.

अशा तऱ्हेने हे सुंदर ग्रंथालय इयत्ता १०वीची उन्हाळी सुटी संपेपर्यंत उपभोगता आले. पुढे ११वीत विज्ञान शाखेला गेल्यामुळे “आता २ वर्षे फक्त अभ्यास एके अभ्यास, आता बास झाली गोष्टींची पुस्तके”, असा वटहुकूम घरून निघाला. तो गुमान आचरणात आणावा लागला.

यापुढचा दीर्घ शैक्षणिक टप्पा होता वैद्यकीय महाविद्यालय. त्या अभ्यासाचे एक वैशिष्ट्य असते. आता एका विषयासाठी फक्त एकच पुस्तक असे वाचून चालत नाही. अनेक संदर्भग्रंथ चाळावे लागतात. मग वरिष्ठांनी सल्ला दिला की आता ‘ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी” (बीसीएल, सध्या फक्त ब्रिटीश लायब्ररी म्हणतात) लावलीच पाहिजे. त्याची एक विशेष आठवण सांगतो. तेव्हा या ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना सभासदत्व घेताना, कॉलेजच्या प्राचार्यानी दिलेला ‘चांगल्या वर्तणुकीचा’ दाखला देणे आवश्यक होते. त्या धोरणाला एक सामाजिक घटना कारणीभूत ठरली होती. तेव्हा महाराष्ट्रात एक भयानक हत्याकांड घडले होते. त्यातील आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले होते, की खून करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी ‘बीसीएल’ मधील पुस्तकांतून वाचल्या होत्या !

अशा प्रकारे सर्व सोपस्कार करून बीसीएलचे सभासदत्व घेतले. विद्यार्थ्यांसाठी शुल्कात थोडी सवलत होती. अतिशय शिस्तबद्ध आणि नीटनेटके असे हे ग्रंथालय होते. इथे अर्थातच फक्त ब्रिटीश साहित्य ठेवले होते. त्यात अभ्यासाव्यतिरिक्त इतर साहित्याचाही समावेश होता. बऱ्याच जगप्रसिद्ध इंग्लीश लेखकांची पुस्तके उपलब्ध होती. सभासदाला एका वेळेस ३ पुस्तके मिळत आणि ती २६ दिवसांत परत करायची असत. ही मुदत टळून गेल्यास दर दिवसाला ठराविक दंड होता (बहुतेक १-२ रुपये). तो दंड भरण्यासाठी मुख्य काउंटरवर एक मजेदार सोय होती. एका टेबलावर २ इंच आकाराची खाच पाडलेली होती. त्यातून दंडाची रक्कम टाकायची असायची. यातून त्यांनी पावती फाडा वगैरे कारकुनी वाचवली होती. या खाचेचे तेव्हा फार अप्रूप वाटले होते. ग्रंथालयातील शांतता वाखाणण्याजोगी होती. जरी बरेच मराठी भाषिक इथले सभासद असले, तरी इथे असणाऱ्या ग्राहक आणि कर्मचारी यांनी एकंदरीत देहबोलीतून ‘इंग्लीश वातावरणाचा’ आभास निर्माण केलेला असायचा ! आपल्याला हवे ते पुस्तक मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीची सोय अर्थातच होती आणि आपला नंबर लागल्यावर शिस्तीत त्यांचे पोस्टकार्ड घरी येई.

हे ग्रंथालय शहरातील प्रतिष्ठित भागात होते. त्याच्या आजूबाजूस एक प्रसिद्ध कॉलेज आणि खास खवय्यांची उपाहारगृहे होती. एकूणच त्या वातावरणात तरुणाई नुसती सळसळत असायची. तेव्हा पुस्तकांच्या २६ दिवसांच्या मुदतीची कोण वाट पाहत बसणार? दर १५ दिवसाला इथे चक्कर मारणे नक्कीच सुखावह होते. पुस्तके घेण्याबरोबरच तिथली रंगीबेरंगी तरुणाई ‘वाचणे’ हाही आम्हा मित्रांचा एक कार्यक्रम असायचा !

सुमारे ५ वर्षे मी या ग्रंथालयाचा सभासद होतो. त्या काळात ठरवून ३ इंग्लिश लेखकांचा फडशा पाडला. ते लेखक असे:
१. शेक्सपिअर
२. सॉमरसेट मॉम
३. पी. जी. वुडहाउस

शेक्सपिअरबद्दल मनात खूप कुतूहल होतेच आणि आता तर सुरेख संधी चालून आलेली. त्यांची तिथे असलेली बहुतेक नाटके वाचली. वाचन अजिबात सोपे नव्हते. वाचताना you shall विसरून जायचे असते आणि thou shalt ची सवय लावावी लागते !

सॉमरसेट मॉम यांच्याबद्दल दोन कारणांनी कुतूहल होते. ते स्वतः वैद्यकीय पदवीधर होते पण त्यांनी लेखन हाच व्यवसाय केला. अजून एक कारण असे. माझे एक नातेवाईक मराठी कथालेखक होते. ते स्वतःला मार्गदर्शक म्हणून
मॉम यांची पुस्तके वाचत. त्यांनी मला एकदा वाढदिवसाला मॉमचे पुस्तक भेट दिले होते. त्यामुळे ती उत्सुकता. मॉम त्यांच्या कथांतून वाचकाला जगाच्या पश्चिम ते पूर्व अशा दोन्ही टोकांना नेऊन आणत. तसेच मानवी स्वभावाचे अनेक पैलू छान उलगडून दाखवत.

पी. जी. वुडहाउस हे प्रसिद्ध विनोदी लेखक. मला काही बुजुर्गांनी सांगितले, की ज्यांना पुलं आवडतात त्यांनी ‘पीजी’ जरूर वाचावेत. म्हणून मग त्यांची पुस्तके आवडीने वाचून काढली. तो अगदी प्रसन्न विनोदाचा शिडकावा असतो. त्यातल्या ‘जीव्ज’ या व्यक्तीच्या तर आपण प्रेमातच पडतो.

अशा तऱ्हेने ‘बीसीएल’ चे हे तारुण्यातील गोडगुलाबी दिवस मजेत गेले. त्यातून इंग्लीश साहित्याची झलक चाखता आली. पदवीचे शिक्षण संपल्यावर माझे राहायचे ठिकाणही बदलले होते. तिथून हे ग्रंथालय फारच लांब असल्याने आता ते बंद केले.(अलीकडे हे ग्रंथालय निव्वळ छापील पुस्तकांचे राहिलेले नसून तिथे अनेक इ-सुविधाही उपलब्ध असतात). माझ्या तेव्हाच्या ५ वर्षांच्या कालावधीत वेगळे मराठी वाचनालय लावायला मात्र घरून परवानगी नव्हती कारण इथले शुल्क बऱ्यापैकी होते. मग मित्रपरिवारात जी काही मराठी पुस्तके होती, ती एकमेकांत फिरवून वाचत असू. अशा या ‘फिरत्या’ आणि फुकट वाचनालयातून काही वाचन झाले. त्यापैकी ‘ययाती’ आणि ‘कोसला’ आठवतात. हा लेख लिहिताना कोसलामधल्या ‘लायब्री’ ची आठवण येणे अपरिहार्य आहे !

पुढे लग्नानंतर शहराच्या उपनगरात स्थिरावलो. आता सांसारिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असल्याने वाचनालय घरानजीकचेच शोधणे भाग होते. असेच फिरताना त्याचा शोध लागला. आमच्या जवळच्याच एका गृहसंकुलात एका कुटुंबाने त्यांच्या घरातच वाचनालय चालवले होते. त्या जोडप्यातील गृहस्थ नोकरीत होते आणि त्यांची पत्नी गृहिणी. आपल्या ३ खोल्यांच्या सदनिकेतील बाहेरच्या खोलीत त्यांनी वाचनालय उभे केले होते. दिवसातील ४ तास ही खोली ग्राहकांसाठी उघडी असायची. त्यांच्या या पुस्तक प्रेमाबद्दल मला मनापासून कौतुक वाटले. त्या जागेच्या मर्यादेत त्यांनी जी पुस्तकांची निवड केली होती ती पांढरपेशांना अगदी अनुरूप होती. त्यामध्ये ‘पुलं- वपु -हमो- सुशि’ अगदी उठून दिसणारे होते. जोडीला नारायण धारप- रत्नाकर मतकरी हे गूढखाद्यही होते. त्याचबरोबर ‘व्यंमा- दमा- शंपा’ यांचाही एक सुरेख कप्पा होता. उच्च मध्यम वर्गाला आवडणारे खुशवंतसिंगांचे अनुवादित साहित्यही इथल्या संग्रहाला चविष्ट बनवायचे. वपुंचे एखादे नवे पुस्तक जर आपल्या हाती ६ महिन्यांनी पडले, तर त्यात त्या खास ‘वाक्यां’च्या खाली पेनाने ओढलेल्या रेघा असायच्या. असे सगळे पुस्तक शाईमय करून टाकणार्‍यांचा अगदी राग यायचा.

इथला अजून एक मुद्दा दखलपात्र आहे. त्या सुमारास उपनगरांत अशी जी घरगुती वाचनालये चालवली जात, त्यांना फक्त पुस्तके ठेवून चालणार नव्हते. त्याला नियतकालिकांची जोड देणे आवश्यक होते. नियतकालिके ही बऱ्याच गृहिणी सभासदांची विशेष आवड होती. इथे सभासदांना एका वेळेस एक पुस्तक आणि दोन नियतकालिके दिली जात. वाचनालय जरी मराठी पुस्तकांचे असले तरी नियतकालिकांत मात्र मराठीच्या जोडीने हिंदी व इंग्लीशमधले चित्रपट व सौदर्यप्रसाधनविषयक अंक हटकून ठेवावे लागत. हे जरी घरात चालवलेले वाचनालय असले, तरी त्यांनी त्यात ‘Debonair’ चे अंक ठेवण्याचे धाडस दाखवले होते. ते मासिक उघडून पाहिल्यावर पहिल्याच पानावर
“कृपया पाने फाडू नयेत, अंक जुना झाल्यावर विकत घ्यावा !"
ही प्रेमळ सूचना पेनाने लिहिलेली असायची. आमच्या कॉलेजच्या दिवसांत हे मासिक ठरवून वसतिगृहातच ‘बघावे’ लागे; ते वाचण्यात कुणालाच रस नसायचा ! अर्थातच ते घरी आणायची कुणाची टाप नव्हती. आता या वाचनालयात ते खुले आम मिळत असल्याने त्याच्याबद्दल उगाचच वाटणारा चोरटेपणा नष्ट झाला. त्यात आता विवाहित असल्याने ते घरी आणण्यात संकोच तो कसला ? या वाचनालयाच्या मालक असलेल्या त्या बाई पुस्तक नोंदणी वगैरे कामे घरकाम सांभाळून अगदी मन लावून करत. पुस्तक बदलण्यास आलेल्या माणसांना त्यांच्या स्वयंपाकघरातील फोडण्यांचे वास अगदी पाठ झालेले होते ! संध्याकाळच्या वेळात कधीकधी त्यांची आठवीत असलेली मुलगी ग्राहकाच्या पुस्तक नोंदीचे काम करी. कार्डावर लिहिताना मराठी पुस्तकाचे नाव देखील ती हटकून रोमन लिपीत लिही. तिच्या या कृतीतून लिखित मराठीला भविष्यात ओहोटी लागणार असल्याची झलक दिसून आली.

या वाचनालयामुळे आयुष्यात एक महत्वाची घटना घडली. साधारण १९९५च्या सुमारास तिथे पुस्तक बदलायला गेलो असता एका नव्या मासिकावर नजर पडली. त्याचे मुखपृष्ठ आकर्षक होते आणि मासिकाचे नावही उत्कृष्ट सुलेखानात होते. ते मासिक म्हणजे ‘अंतर्नाद.’ तेव्हा ते नव्याने सुरु झाले होते. ते सहज चाळताना एक गोष्ट नजरेत भरली. या ४२ पानी मासिकात तब्बल ६ पाने ही वाचकांच्या प्रतिसादासाठी राखलेली होती. या प्रतिसाद सदराचे प्रारंभी अशी संपादकीय टीप होती:

वाचकांच्या प्रतिसादांना या मासिकात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. वाचकांनी आपले प्रतिसाद सविस्तर आणि मोकळेपणाने लिहावेत”.

हा भाग माझ्यासाठी फारच आकर्षक होता कारण तोपर्यंत मी दैनिकांतील पत्रलेखन आवडीने व हिरीरीने करीत होतोच. आता हे मासिक तिथून दरमहा घेऊन वाचू लागलो. मग त्यात नियमित प्रतिसाद लिहीले. त्यातूनच स्वतंत्र लेखन करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे वाचकांच्या प्रोत्साहनातून त्यात गती येत गेली. यास्तव या घरगुती प्रेमळ वाचनालयाचा मी कायम ऋणी आहे. कालांतराने हे संचालक कुटुंब ते घर सोडून दुसरीकडे गेले. त्यामुळे हे २० वर्षे चाललेले वाचनालय बंद झाले. या घटनेने याच्या सभासद असलेल्या एक वाचनप्रेमी गृहिणी खूपच अस्वस्थ झाल्या. त्यांनी १-२ महिने कसेबसे काढले. मग त्यांनी स्वतःच नवे वाचनालय स्वतंत्र जागेत काढले. मग माझ्यासह बहुतेक सगळे पूर्वीचे सभासद त्यांना मिळाले. त्यांनी याचे नावही छान ठेवले – ‘आपले वाचनालय’. इथेही पूर्वीची लेखक परंपरा जपलेली होती. आता कालानुरूप त्यात काही विशेष भर घातली गेली. त्यात चरित्रे, वलयांकित व्यक्तींचे अनुभवकथन, माहितीपर आणि प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश होता. अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे इथे ‘अमृत’ मासिक देखील होते. बऱ्याच काळाने त्याची पुनर्भेट झाली. इथल्या एका छोट्या कप्प्यात त्यांनी जुनीपानी इंग्लीश पुस्तके कोंबून ठेवली होती. ती सर्व त्यांनी ओळखीच्यांकडून गोळा केलेली होती. ती वाचण्यासाठी दर उन्हाळी शालेय सुटीत २-४ मुले फिरकत. एरवी तो कप्पा उदास आणि धुळीने माखलेला असायचा.

सुमारे १० वर्षे मी इथला सभासद होतो. इथे सभासदांसाठी एक विशेष सोय अशी होती. जर आपल्याला नव्याने प्रकाशित झालेले एखादे पुस्तक वाचायची इच्छा असल्यास आपण त्या संचालकांना सुचवायचे. मग त्यांना जर ते पटले तर ते खरेदी करत. अशी पाच पुस्तके मी त्यांना माझ्या शेवटच्या २ वर्षांच्या काळात सुचवली होती. पण, त्यांनी एकदाही माझी मागणी पुरी केली नाही. एव्हाना मी त्यांच्या निवडीच्या पुस्तकांना कंटाळलो होतो. वयानुरूप आता ठराविक पठडीतील साहित्य वाचायचा कंटाळा येत होता. तरी पण वाचनालय या संस्थेशी दीर्घकाळ असलेला संपर्क एकदम तोडवत नव्हता. दरम्यान अंतर्नाद, अमृत आणि अन्य काही मासिके बंद पडली. माझे पुस्तकांचे दीर्घवाचन आता होईनासे झाले. दिवाळी अंकांचेही अप्रूप वाटेना. दुसरीकडे आंतरजालावरचे निवडक वाचन वाढू लागले होते. हे सर्व पाहता निव्वळ साप्ताहिकांसाठी हे वाचनालय चालू ठेवण्यात मतलब नव्हता. तशीही ती जालावर बघता येतातच. आता आपल्या आवडीचे एखाद दुसरे पुस्तक अधूनमधून विकत घेतलेले बरे, असे प्रकर्षाने वाटू लागले. एक वर्षभर विचार करीत अखेर ते वाचनालय बंद करण्याचा निर्णय घेतला.

आज समाजात अनेक प्रकारे इ-माध्यमे ओसंडून वाहत आहेत. शहरी तरुण पिढी मराठी छापील वाचनापासून बरीच दुरावली आहे. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत काही उत्साही लोक व्यक्तिगत पातळीवर वाचनालये चालवत आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो. त्या कृतज्ञतेपोटी मी माझ्या शेवटच्या वाचनालयाकडून ते बंद करताना माझी अनामत रक्कम परत घेतली नाही. ज्येष्ठ पिढीतील थोड्याफार लोकांसाठी अशी वाचनालये – पुस्तकांची घरे- अजूनही गरजेची आहेत. ती शक्य तितका काळ टिकोत, या सदिच्छेसह या लेखाचा समारोप करतो.
………..
तुमचेही अनुभव वाचण्यास उत्सुक.
***********************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोंबिवली न. पा.ची मोठी जागा होती. अजूनही जागा आहेत. म्हणजे जागेचा प्रश्न नव्हताच. दरवर्षी नवीन फंडही येतो. पुस्तके भरपूर होतीच.
आता गणपती देवस्थानाने संचालन हाती घेऊन आठ महिला कर्मचारी दिल्या. जुने मनपा कर्मचारी दुसऱ्या खात्यात फिरवले. वर्गणी २०/- महिना तशीच ठेवली. सभासद डिजिटल कार्डे आणि पुस्तकांच्या नावांचे संगणिकरण यामुळे काम अद्ययावत झाले.

असेच एकदा नाशिकला गेलो असता तिथले मनपाचे वाचनालय पाहण्याचा योग आला. खूप छान होते.
दादर सार्वजनिक याचेही सभासद होतो. खूप चांगली पुस्तके आहेत तिथे.
पुण्याचेही छानच असेल.
मुंमग्रंच्या तीन शाखा आहेत. गिरगाव,दादर आणि ठाणे. दादर शाखेचा सभासद होतो. धार्मिक,सामाजिक कादंबऱ्या,चरित्रे पुस्तके फार. महाराज/बुवांची (वेगवेगळे) ५६ चरित्रे तिथेच मिळाली. जुनी वर्तमानपत्रे आणि ग्रंथ मिळणे हे विशेष आहे.

पण १९६० च्या काळांत शहरे लहान होती. वस्ती लहान. त्यामुळे पायी चालत जाण्याच्या अंतरांत ही वाचनालये होती. आता शहरे बारा गुणिले बारा किमी परिसरांत पसरली आणि शिवाय वस्ती संमिश्र वाचकांची. त्यामुळे शाखा काढायला अडचणी येतात. उदाहरणार्थ भोसरीचा वाचक धनकवडीला वाचनालयात जाऊन पुस्तक आणणे अशक्य होत जाते. प्रवास महागडा आणि वेळखाऊ होत आहे.
फिरती वाचनालयेही महागडीच ठरतील. पुस्तकांना एका ठिकाणी राहाणे परवडत नाही आणि फिरणेसुद्धा. "पुस्तके असलेली कपाटेच माझी लहानपणी सोबतीला होती" अशी वाक्ये फारच थोड्या नशिबवानांच्या असावीत.

आता शहरे बारा गुणिले बारा किमी परिसरांत पसरली आणि शिवाय वस्ती संमिश्र वाचकांची.
>>> +१११
महत्वाचा मुद्दा.

डोंबिवलीच्या वाचनालयाबद्दल वाचून छान वाटलं.
मुंमग्रं दादर मुख्य शाखा ना? तिथे अनेक जुने ग्रंथ आहेत, असे ऐकले आहे.
जवळपास प्रत्येक उपनगरात शाखा असावी. जागा मनपा देते. आधी स्टेशनच्या जवळ मनपा इमारतीतच जागा होती. पण मग मनपाने नवी इमारत बांधून आपली कार्यालये तिथे हलवली तेव्हा मुंमला नेले नाही. जुनी इमारत पाडायला आली तेव्हा कर्मचार्‍यांनी कोणाकोणाच्या मागे लागून नवी जागा मिळवली. ती स्टेशनपासून दहा मिनिटांवर प्रबोधनकार ठाकरे नाट्यसंकुलात.
ऑफिसात जाता येता जाणार्‍यांना जरा आडवळणाची.
ठाण्याला साहित्य संमेलनाआधी महिनाभर ठाणे ग्रं सं च्या गच्चीवर महिनाभर दररोज संध्याकाळी अक्षर अंगण नावाने कार्यक्रम होत असत. तेव्हा एके दिवशी गेलो होतो. इथे वृत्तान्तही लिहिला आहे. मला वाटतं, पूर्ण इमारत त्यांची होती.

लग्नात भेटवस्तू म्हणून पुस्तके देण्याचे आवाहन, हा मुद्दा वर आला आहे. त्याबाबत काही अनुभव लिहीतो.

वरील उदाहरणात खुद्द वधू-वरांनीच हेतूसह ते आवाहन केले असल्यामुळे तिथे जाणाऱ्या पाहुण्यांना पुस्तके घेऊन जायला आनंद होईल. एरवीच्या पारंपरिक समारंभात आपण जर एखाद्याला पुस्तक भेट म्हणून घेऊन गेलो तर आपण अपवाद ठरतो. पुन्हा संबंधित यजमानाला साहित्य वाचनाची आवड आहे का नाही, हा मुद्दा असतो. अजिबात आवडत नसल्यास तो भेट उघडून बघताना आपल्या नावाने खडे सुद्धा फोडू शकतो !
पूर्वी मी नात्यात / परिचितांकडे घरगुती कार्यक्रमास बोलवले असताना ‘दैनंदिन पर्यावरण’ हे पुस्तक भेट देत असे. परंतु त्यानंतर संबंधित व्यक्तींनी कालांतराने त्या संदर्भात कधी काही मत व्यक्त केल्याचे आढळले नाही.

तेव्हापासून मी उगाचच कोणालाही पुस्तक भेट देत नाही.

दैनंदिन पर्यावरण’ हे पुस्तक भेट देत असे.

एक पर्यावरणप्रेमी आणि निसर्गमित्र मला सांगत होता की शाळेसाठी कार्यक्रम करत असता एका नववीतल्या मुलीने विचारले की "आम्हा मुलांना वेठीला का धरता? " चौपाट्या ,किल्ले स्वच्छता मोहीम कशाला?" कोण टाकतो हा कचरा मुळात?

पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी पुण्याच्या बालक पालक प्रतिष्ठानने वाचनसाखळी प्रकल्प सुरू केला आहे. हे विद्यार्थी सोलापूर, औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. प्रतिष्ठानने 25 प्रकारची विविध वाचनीय पुस्तके घेऊन मुलांना घरपोच पाठवली आहेत.

एका मुलाचे पुस्तक वाचून झाले की तो ते जवळच्या मित्र-मैत्रिणींना देणार आहे. अशी ही साखळी आहे

अभिनंदन !

मुं म ग्रं सं तून डॉ नंदू मुलमुले यांचा संभ्रमाचे सांगाती हा लेखसंग्रह आणला होता. पहिल्याच पानावर लेखकाने सही करून हे पुस्तक अंबरिश मिश्र यांना भेट दिल्याची नोंद आहे. तसंच पुस्तकाचा ब्लर्ब लिहिल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.

लेखकाने सही केलेले पुस्तक पाहण्याचा योग प्रथमच आला.
भेट मिळालेली पुस्तकांनाही वाट दाखवावी लागते. मुंम-कडे हे पुस्तक कसं आलं त्याचं कुतूहल वाटतं. एखाद्याने पुस्तक त्यांना देणगीरूपात दिल्याची नोंदही पुस्तकावर क्वचित पाहिली आहे.

<< लेखकाने सही केलेले पुस्तक पाहण्याचा योग प्रथमच आला. >>
माझ्याकडे दि.प. दांडेकर (कॅम्लिन कंपनीचे संस्थापक) यांचे आत्मचरित्र "उंटावरचा प्रवास" त्यांच्या स्वाक्षरीसह होते. ते माझ्या आजोबांकडून मला मिळाले होते. (दांडेकर हे त्यांचे स्नेही होते, अथवा माझ्या आजीच्या नात्यात होते, नक्की आठवत नाही). तसेच धोंडो केशव कर्वे यांची सही असलेली एक वही पण होती, त्यात इतर सह्या पण होत्या. मी दोन्ही कुणातरी संग्राहक व्यक्तीला देऊन टाकल्या, नक्की आठवत नाही आता कुणाला ते.

पक्षी जाय दिगंतरा हे ,मारुती चितमपल्ली यांनी श्री.ज्ञानेश्वर नाडकर्णी यांना भेट दिलेले पुस्तक आहे.जुनी पुस्तके विकतात तिथून विकत घेतले होते.त्यावेळी असे भेट दिलेले पुस्तक,रस्त्यावर आल्याचा क्षणभर खेद वाटला होता.

एखाद्याने पुस्तक त्यांना देणगीरूपात दिल्याची नोंदही पुस्तकावर क्वचित पाहिली आहे....... .... चेसावा मध्ये बरीच पुस्तके ,देणगी म्हणून दिली आहेत.अर्थात लेखकाने किंवा त्याच्याकडून भेट मिळालेल्याने नव्हे.

काल मुं म ग्रं सं त 'दिनकरराव जवळकर - समग्र वाङ्मय ' हा ग्रंथ दिसला. त्यावर अंबरिश मिश्र देणगी अशी नोंद होती. म्हणजे हे पुस्तक मिश्रंनी स्वतः आणून दिलं असणार, असं वाटून ग्रंथालय सेविकेस तसं विचारलं . अंबरिश मिश्र यांनी स्वतः येऊन अनेक पुस्तके देणगी म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले.

मिश्र यांच्यामुळे वेगळ्या विषयावरची पुस्तके जमा झाली. अन्यथा अशा पुस्तकांना वाचक कमी असल्याने ती ग्रंथाल याकडून विकत घेतली जात नाहीत.

अंबरिश मिश्र यांनी स्वतः येऊन अनेक पुस्तके देणगी म्हणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
>>> खूप छान .
त्यांचे कौतुक वाटते.

एक अनोखे प्रदर्शन
ग्रंथालयातून वाचायला नेलेली पुस्तके परत आल्यानंतर त्यांच्या पानांमध्ये वाचकांच्या काही गोष्टी विसरलेल्या असतात. त्यामध्ये अनेक प्रकारच्या चिठ्ठ्याचपाट्यापासून विविध चित्रे आणि फोटोंचा समावेश असतो. अशा सर्व विसरलेल्या गोष्टींचे प्रदर्शन कॅलिफोर्नियातील ओकलंड येथील एका ग्रंथपालांनी ठेवले आहे :

https://www.euronews.com/culture/2022/08/31/forgotten-treasures-the-stra...

सुंदर उपक्रम !
माझ्या नात्यातील एका बाईंनी नुकतीच वयाची पंच्याहत्तरी गाठली. त्यानिमित्त त्यांनी विविध विषयांवरील 75 पुस्तके खरेदी केली असून त्यांच्या ओळखीतील प्रत्येक घरी त्या एकेक पुस्तक भेट देत आहेत.
असे एक पुस्तक त्यांनी मलाही दिले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त भिलार या पुस्तकांच्या गावात उत्सव शब्दांचा ही कार्यशाळा संपन्न

बातमी : छापील सकाळ , १८/१०/२२

अफाट पुस्तक वेडाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे
हुतात्मा भगतसिंग.
त्यासंबंधी एक लेख येथे आहे :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6376
त्यातील हे निवडक :

.....पुस्तकांशिवाय भगतसिंगांची कल्पना करणेही अवघड आहे. २३ मार्च १९३१. भगतसिंगांच्या फाशीला अवघे काही तास उरले होते. त्यांचे वकील प्राणनाथ मेहता त्यांना भेटायला आले. ही त्यांची शेवटची भेट होती. त्यांनी भगतसिंगांसाठी एक पुस्तक आणले होते. त्याचे नाव होते – ‘The Revolutionry Lenin’. मेहतांनी पुस्तक दिल्यावर भगतसिंगांनी ते लगेच वाचायला सुरुवात केली. आपल्याकडे फार थोडा वेळ उरलेला आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यांच्या फाशीची वेळ अकरा तासांनी अलीकडे आणण्यात आली होती. त्या वेळी थंड वारे पाहत होते. भगतसिंग लेनिनचे पुस्तक वाचण्यात गढून गेले होते. ....

<< अफाट पुस्तक वेडाचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे
हुतात्मा भगतसिंग. >>

भगतसिंगबद्दल आदर आहेच, पण मरण समोर दिसत असताना असं कुणी पुस्तक वाचत बसेल का? हे वाचून माझ्या मनात विचार आला की हे उदाहरण केवळ भगतसिंग यांचे उदात्तीकरण करण्यासाठी आहे का? भगतसिंगच्या जागी (जोशी/अभ्यंकर खटल्यातील आरोपी) जक्कल, सुतार असेच, फाशीच्या आधी ४ तास पुस्तक वाचत बसले असते तर त्यांचे असेच कौतुक झाले असते का? जक्कल/सुतार पैकी कुणीतरी मरणोत्तर अवयवदान करण्याची इच्छा केली होती, त्याची अशी "बातमी" का होत नाही?

तळटीप: जक्कल, सुतार यापैकी कुणाबद्दलही माझ्या मनात काडीचेही प्रेम नाही. निव्वळ उदाहरण आहे.

पण मरण समोर दिसत असताना असं कुणी पुस्तक वाचत बसेल का?
>>>
तोच तो दुःखद विचार करण्याऐवजी काहीजण पुस्तक वाचणे पसंत करू शकतील. कोणी संगीत ऐकेल.
खुनाचा गुन्हा केलेले सामान्य गुन्हेगार कदाचित धार्मिक पुस्तक वाचू शकतील/ असावेत.
भगतसिंग क्रांतिकारक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आवडीचे वाचन केले असावे असा अंदाज.

पुस्तकं वाचण्याला माझा विरोध नसतोच. विकत घेऊन वाचण्याला असतो. एक दिवसाने शब्दकोश वगैरे संदर्भ पुस्तके सोडली तर त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो.

माझा तर पुस्तके विकत घेऊन वाचण्याला विरोध नसतो. वाचून झाल्यावर ती दुसऱ्या कुणाला किंवा एखाद्या लायब्ररीत देता येतात. माझा विरोध ई-पुस्तकांना आहे ज्यात DRM वापरले जाते. अशी पुस्तके मी विकत घेत नाही.

हे वाचून माझ्या मनात विचार आला की हे उदाहरण केवळ भगतसिंग यांचे उदात्तीकरण करण्यासाठी आहे का?
>>>>

उलटाही विचार करू शकतो. म्हणजे पुस्तके वाचण्याच्या चांगल्या सवयीला लोकांमध्ये रुजवण्यासाठी भगतसिंग यांचे नाव वापरले असावे.

सत्य काय आहे याने मला तरी फरक पडत नाही. पण एक नक्की आहे. भगतसिंग यांच्याबद्दल पुर्ण जाणून घेतले की हे त्यांच्याबाबत शक्य आहे असेच वाटते.
मुद्दाम मोकळ्या जागेत बॉम्ब फोडून स्वत:ला अरेस्ट करून घेणे. का तर आम्ही क्रांतीकारी हे दहशतवादी नसून स्वातंत्र्यवीर आहोत हे लोकांना पटवून देऊन, आपल्या कामाची जबाबदारी घेऊन, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे या साठी..
आणि हे सारे केव्हा तर वयाच्या तेविसाव्या वर्षी. जेव्हा आपले डिग्रीचे शिक्षण पुर्ण होते.
त्या वयात हि एवढी समज वाचनाचे वेड असल्याशिवाय शक्य आहे का..

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 23 October, 2022 - 02:15>>>+11

>>>केवळ भगतसिंग यांचे उदात्तीकरण करण्यासाठी>>
हा विचार अजिबात पटला नाही. क्रांतिकारक व खुनी कैदी यांची तुलना गैरलागू आहे.

‘किर्लोस्कर' नियतकालिकाची जन्मकथा :
https://www.loksatta.com/lokrang/entrepreneur-and-painter-s-v-kirloskar-...

१ जानेवारी १९२०

.... ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला अन् मराठी साहित्यजगतात लहानशी खळबळ उठली. ‘किर्लोस्कर खबर’मध्ये उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडी, गावातील लोकांच्या कथा-कविता असे एकंदर त्याचे स्वरूप होते. .....

Pages