आश्रमातून बाहेर पडलेला तो तालवृक्षासारखा उंच तरुण झपझप चालत होता. अंगावरच्या घामेजलेल्या वस्त्रांचं त्याला काहीच भान राहिलं नव्हतं. चेहरा विचारांमुळे व्यग्र झालेला दिसत होता. मांडीवर ओघळलेला रक्ताचा ओहोळ आता सुकून गेला होता. ओलेपणामुळे अंगाला चिकटलेल्या वस्त्रांतून त्याचा बलदंडपणा नजरेत भरत होता. चेहरा व्यग्र झाला असला तरी त्याचे असामान्य देखणेपण लपत नव्हते. वाटेत त्याच्या समोर कुणी आलेच तर त्याला झुकून वंदन करीत होते. कारण हा कुणीतरी राजपुरुष आहे हे त्यांना आतून जाणवत होते. "तू माझ्याशी खोटे बोललास. तू ब्राह्मण नाहीस. इतकी सहनशक्ती ब्राह्मणात असूच शकत नाही." गुरुदेवांचे जळजळीत शब्द त्याच्या कानात घुमु लागले. थकलेले गुरुदेव त्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आणि नेमका भुंग्याने डाव साधला. गुरुदेवांची झोपमोड होऊ नये म्हणून त्याने प्राणांतिक वाटणारी वेदना सहन केली. भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली आणि त्याचे फळ काय मिळाले तर "जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही" हा शाप. यावेळी या भुंग्याला शरीर होते. मात्र हा त्याच्या आयुष्यातला पहिलाच भुंगा नव्हता. अगदी कळायला लागल्यापासून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे त्याला जाणवले होते. आणि "आपण कोण" या प्रश्नाच्या भुंग्याने त्याचे आयुष्य पोखरायला सुरुवात केली होती. त्याच्या अंगावरील कवच आणि कुंडले ही इतर सवंगड्यांकडे नव्हती. त्याच्या आयुष्यात पोखरणार्या भुंग्याने तेव्हापासून प्रवेश केला तो आजतागायत. आज इतके परिश्रम करून संपादन केलेली विद्या निष्फळ होण्याचा शाप मिळाला. त्यावेळी काय नव्हतं त्याच्या मनात? अगतिकता, संताप, आक्रोश...त्याच्या डोक्यात तोच लहानपणापासून घुमणारा भुंग्यांचा आवाज पुन्हा घुमु लागला.
लाखो पराक्रमी योद्धे एकमेकांवर तुटून पडले होते. जणू लाखो भुंगे घोंघावत एकमेकांवर धावून जात होते. युद्धभूमीपासून बाजूला एका झाडाखाली तो योद्धा काही क्षण विश्राम करीत होता. अजूनही गुरुदेवांच्या विद्येचे स्मरण होते. याचा अर्थ अजूनही शेवटची घटका जवळ आली नव्हती. पण युद्धात फार जवळची माणसे मारली गेली होती. त्यांच्या आठवणींनी तो गलबलला. आता लढायचं कुणासाठी? मित्राला दिलेल्या शब्दासाठी. तो शब्द तरी प्रामाणिक होता का? कारण आपण त्या सर्वश्रेष्ठ म्हटल्या गेलेल्या योद्ध्यालाच ठार मारु. इतरांना हातही लावणार नाही असा शब्द दिला आहे. आज सर्वांचे पराभव केले पण त्यांना मारता आलं नाही. सोडून द्यावं लागलं. योद्धा रथात बसला. वेळ घालवून चालणार नव्हता. आज आपण नाहीतर तो. दोघांपैकी एकच उरणार. तो कटूपणे हसला. एक भुंगा आला कवचकुंडलं घेऊन गेला. एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली. रथ पुढे सहजपणे जात होता. योद्ध्याच्या बाणासमोर कुणीही टिकत नव्हतं. अचून नेम साधत तो सहजपणे शीरकमले उडवित होता. त्याला आपल्या कौशल्यावर सार्थ विश्वास होता. आपण ब्राह्मण नाही म्हणून सर्वश्रेष्ठ गुरु आपल्याला शिकवणार नाही. राजपुत्रांबरोबर आपल्याला मानाने शिक्षण घेता येणार नाही. खोटे बोलून आश्रमात दाखल होणे किंवा आयुष्यभर रथ घडविण्याची कामे करणे हे दोनच पर्याय आपल्यासमोर होते. सामान्य म्हणून जगता येणे शक्यच नव्हते इतका पराक्रम त्याच्या अंगी भरला होता. त्याच्या मनात विचारांचे वादळ उठले होते. सारथ्याची कुत्सित वाक्ये आता त्याला ऐकू येत नव्हती. सारथ्याला त्याने आपला रथ प्रतिपक्षाच्या सर्वश्रेष्ठ धनुर्धराकडे नेण्यास सांगितले. पण आज विचारांना निरनिराळ्या वाटा फुटत होत्या. धनुष्यातून सुटणार्या बाणांप्रमाणे ते सरळ जात येत नव्हते. अन्यथा त्या वृद्धेची आठवण आता आली नसती. ऐन युद्धात ती राजस्त्री आपल्या शिबीरात आली होती.
त्याच्यासमोर पुन्हा एक भुंगा उडू लागला. स्त्रीच्या आवाजात तो म्हणु लागला "तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला. तु क्षत्रिय आहेस. तुला पराक्रमी असे पाच बंधु आहेत" त्याने कानावर घट्ट हात ठेवले. या भुंग्याने येऊन त्याचा पराक्रमच पोखरून टाकला होता. युद्धात पडण्याआधीच त्याला पराभूत केले होते. ज्यांच्याशी आजन्म वैर केलं ते माझे बंधु? त्यांना मारायचं? आपल्याला हे शक्य होईल? रथ पुढे चालला होता. रक्ताने माखलेले योद्धे मदमस्त गजांप्रमाणे एकमेकांवर चाल करून जात होते. मरणार्यांचे आकोश कानावर पडत होते. मारणार्यांच्या भीषण आरोळ्या ऐकू येत होत्या. पुन्हा एक भुंगा कानाजवळ येऊन स्त्रीच्या आवाजात गुणगुणु लागला "मी सूतपुत्राला वरणार नाही". तो आणखी त्वेषाने बाण सोडू लागला. आज त्याने अनेकांचा पराभव केला होता. फार वर्षापूर्वी जेव्हा आपले कौशल्य दाखविण्याचे वेळ आली होती तेव्हा हीच माणसे आपल्याला आपले कुल विचारीत होती. आपल्याला हसत होती. आज आपल्याच हातून जीवदान देताना बरेच जुने हिशोब पूर्ण झाले होते. त्या अचाट पराक्रमी खादाड बलदंडाला त्याने पराभव करून सोडून दिले होते. पत्नीला जुगारात हरणार्या जुगार्याला त्याने युद्धात हरवले होते. इतर दोन बंधुंनाही सहज धूळ चारली होती. आता उरला होता एकच जो त्याच्या तोलामोलाचा होता. त्याला वाटलं आपला हा पराक्रम त्या शरपंजरी पडलेल्या वृद्धाने पाहायला हवा होता. पण हा विचार मनात येताच त्याने झटकून टाकला कारण एका भुंग्याने पुन्हा घोंगावत येऊन कानाजवळ म्हटले "तू अर्धरथी आहेस". त्याच्या मनात संताप फुटला. आणि रथ त्याच्या प्रतिस्पर्ध्यासमोर आला. सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण ते आज ठरणार होते.
दोन धनुर्धर त्वेषाने एकमेकांवर तुटून पडले. निरनिराळ्या आकाराचे बाण सुटत होते. काही टोकदार काही अर्धचंद्राकृती. काही बाण मध्येच दुसर्या बाणाने खंडीत केले जात होते. काही जखमी करत होते. एक क्षण विचार करीत योद्ध्याने एक अमोघ बाण हातात घेतला. हा निर्णायक बाण होता. नेम चुकणे शक्य नव्हते. अभिमंत्रून बाण सोडला पण समोर डोक्यावर मोराचे पीस लावलेल्या चतूर सारथ्याने घोड्यांना दबवले आणि बाण फक्त मुकुट उडवून गेला. पुन्हा पुन्हा घोंघावण्याचा आवाज कानात सुरु झाला. तो संतापला. ऐन युद्धाच्यावेळी आपले लक्ष विचलित करणारे हे भुंगे टाचेखाली चिरडले पाहिजेत असे त्याला वाटले. तसा त्याने काहीवेळा प्रयत्नही केला होता. "सूतपुत्राला वरणार नाही" असं बोलणारा स्त्री आवाजातला भुंगा त्याने एकदा चिरडला होता. "पाच पुरुषांची पत्नी म्हणजे वेश्या" असे तो भर सभेत त्या उर्मट स्त्रीला म्हणाला होता. युद्धात सर्वांनी एकत्र गाठून तिच्या पुत्राला ठार मारले होते. त्यात योद्ध्यानेही आपले बाण त्या पराक्रमी पण कोवळ्या तरुणावर चालवले होते. पण इतके करूनही शांतता नव्हती. डोक्यातले विचार जात नव्हते. कधीही निरामय मनाने पराक्रम गाजवता आला नव्हता. कुल माहित नव्हते तेव्हा ते माहित करून घेण्यासाठी धडपड केली. कुल माहीत झाले तेव्हा त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट नुकसानच झाले. सारे युद्धमैदान जणू काळ्या भुंग्यांनी भरून गेले होते. आता ते हळुहळु आपल्या शरीरावर चढणार असे त्याला वाटले आणि अचानक रथाची एक बाजु कलल्यासारखी झाली. तेव्हा त्याला पहिला धक्का बसला. हा धक्का फक्त रथ अचानक थांबल्याने बसलेला धक्का नव्हता. एक गुणगुण कानाशी आली "ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल". एक निश्वास सोडून तो थांबला. त्याने धनुष्य बाजूला ठेवले. तो खाली उतरला. नि:शस्त्र आणि रथावर नसलेल्या त्याच्यावर शस्त्र उगारले जाणार नाही याची त्याला खात्री होती.
त्याने खाली उतरून चाकाला हात घातला आणि तो चाक उचलण्याचा प्रयत्न करू लागला. इतक्यात समोर धनुर्धराने भात्यातून बाण काढलेला त्याने पाहिला. तो स्तंभित झाला. मी नि:शस्त्र असताना? चाक काढण्यात गुंतलो असताना? आणि हा कोण तर सर्वश्रेष्ठ धनुर्धर? त्याने समोर हात करून थांबण्यास सांगितले. "हा अधर्म आहे" तो गरजला. पण इतक्यात त्या कोवळ्या तरुणावर आपण सोडलेला बाण त्याला दिसु लागला. सभेत फरफटत आणलेल्या त्या अबलेला आपण वेश्या म्हणालो ते दृश्य नजरेसमोर दिसु लागले. एक निळसर छटा असलेला भुंगा कानात गुणगुणु लागला. तो काय म्हणत होता ते कळत नव्हते पण एक वाक्य मात्र पुन्हा पुन्हा ऐकु येत होते "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" समोर पाहिले बाण धनुष्याला जोडला जात होता. गुरुदेवांनी दिलेल्या अस्त्राची आताच गरज होती. पण डोक्यातले आवाज वाढु लागले होते. ""जेव्हा तुला माझ्याकडून शिकलेल्या विद्येची आत्यंतिक गरज भासेल तेव्हा ती विद्या तुला आठवणार नाही","ऐन युद्धाच्यावेळी भूमी तुझ्या रथाचे चाक गिळेल""तू अर्धरथी आहेस","तु माझा मुलगा आहेस. लग्नापुर्वी झालेला","मी सूतपुत्राला वरणार नाही" भुंगे जणु त्याला पोखरण्यासाठी शरीरावर चढु लागले होते. ते आजवर इतक्या जवळ कधी आले नव्हते. त्यांचा कोलाहल आजवर इतका वाढला नव्हता. या आवाजात त्याला अस्त्राचे मंत्र आठवेनात. समोर धनुर्धराने धनुष्याला बाण जोडून प्रत्यंचा आकर्ण ओढली होती. बाण सुटला. त्याचाही घोंघावणारा आवाज भुंग्याप्रमाणेच होता.
पाच गुणांनी युक्त पुरुष
पाच गुणांनी युक्त पुरुष मिळावा म्हणून द्रौपदीने तप करुन वर मागीतला होता पण ते शक्य नसल्याने तिला पाच गुणांनी युक्त असे पाच पुरुष पती म्हणुन मिळाले. पण कर्णला पाहील्यानंतर तिला जाणवले की हाच आपल्याला हवा असलेला पुरुष आहे पण आता ते शक्य नव्हते. तिला कर्णाविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळेच तिने त्याचा शेवटपर्यंत तिरस्कार केला.
माझ्या माहितीप्रमाणे धृतराष्ट्र हा ज्येष्ठ असल्याने त्याचाच राजगादीवर बसण्याचा अधिकार होता पण अंध असल्याने पंडुला राज्याभिषेक करण्यात आला. जेंव्हा धृतराष्ट्राची मुले राज्य चालवण्यास सक्षम झाली तेंव्हा ते राज्य त्यांच्याकडे सोपवने न्याय्य होते. दुर्योधनामध्ये मलातरी काही फारसा दोष दिसत नाही. द्रौपदी, भिम, अर्जुन यांनी त्याचा कैकवेळा अपमान केला. दुसरे म्हणजे द्युत खेळायचे आमंत्रण होते सक्ती नव्हती. कोणत्याही क्षणी द्युत सोडण्याची मुभा होती. असे असतानाही धर्म हट्टाने द्युत खेळत राहीला. हे काय दर्शवते? त्यात स्वपत्नी जुगारात लावणाऱ्या माणसाविषयी काय बोलायचे?
महत्वाचे म्हणजे "आई भिक्षा आणली आहे" असे म्हटल्यानंतर कुंतीने "आपसात वाटून घ्या" म्हटले आणि या पाच भावांनी द्रौपदी वाटून घेतली. याला काय म्हणायचे? यात द्रौपदीचा कुणी विचार केला का? काही ठिकानी असा संदर्भ आहे की याज्ञसेनीचे सौंदर्य पाहून कुंतीला जाणवले की या स्त्रीमुळे आपल्या मुलांमध्ये वितुष्ठ येऊ शकते म्हणून तिने हा निर्णय घेतला. म्हणजे या पाच भावांमधील बाँडींग एका स्त्रीसाठी वैरात बदलेल इतके कमजोर होते. द्रौपदीशी लग्न केल्यानंतरही प्रत्येक भावांनी वेगवेगळे स्वतंत्र विवाह केलेच की. कर्ण मात्र स्वपत्नीशी नेहमी एकनिष्ठ राहीला. काही राजकारणाचा भाग म्हणून त्याला दुसरे लग्न करावे लागले पण स्त्रीयांविषयी त्याच्या मनात नेहमीच आदर असलेला दिसतो. द्रौपदीसाठी त्याने वापरलेले अपशब्द हे तिने आयुष्यभर केलेल्या अपमानाचे फलीत होते. त्यात कुठेही वासना नव्हती. अर्थात वरील सर्व माझी वैयक्तीक मते आहेत.
मला वाटतं फक्त अर्जुनाने नंतर
मला वाटतं फक्त अर्जुनाने नंतर इतर स्त्रियांशी विवाह केले. भीमाचं हिडिंबेशी लग्न द्रौपदीशी लग्न करण्यापूर्वीच झालेलं होतं.
हो. अर्जुन आणि भिम यांचीच
हो. अर्जुन आणि भिम यांचीच लग्ने झाली होती.
शाली, माझीही अशीच मते आहेत
शाली, माझीही अशीच मते आहेत किंबहुना बरयाच लोकांची हीच मते असतील.
>>>. दुसरे म्हणजे द्युत खेळायचे आमंत्रण होते सक्ती नव्हती. कोणत्याही क्षणी द्युत सोडण्याची मुभा होती. असे असतानाही धर्म हट्टाने द्युत खेळत राहीला>>> राजाने तेही सम्राटाने द्युत खेळायचं आमंत्रण नाकारायचे नसते असा समज होता. द्युताचा मोह भल्याभल्याना आवरला नाही हेच दर्शविते, साक्षात संयमी यमपुत्र धर्मराज खेळात सर्वकाही विसरला. त्याला उचकवायला शकुनी मामा होताच. अजून एक असे द्युत खेळासाठीच्या सोंगट्या ह्या जरासंधाच्या रक्षा(की हाडे) वापरून बनवायला सांगितले होते शकुनी मामाने जो की भीम कृष्ण न अर्जुन मार्फत मारला गेला होता म्हणून त्या कवड्या पांडवाच्या बाजूने दान देत नव्हत्या.
अगदी खरं आहे. पण आमंत्रण
अगदी खरं आहे. पण आमंत्रण स्विकारुन दोन डाव खेळून, यजमानाला जिंकायचा मान देऊन द्युतगृह सोडणे योग्य होते. जेथे उतावीळ भिम पाय ठेवायच्या सोन्याच्या आसनाला खड्डा पडे पर्यंत पायाचा अंगठा दाबून संयम पाळतो तेथेच स्वतःला धर्मराज म्हणवून घेणारा युधिष्ठिर मर्यादा ओलांडतो हे काही पटत नाही. धर्माचे दुसरे नाव मर्यादा. जेंव्हा मर्यादेनेच मर्यादा ओलांडली तेंव्हा पुढचा विनाश अटळ ठरला. महाभारत द्रौपदीमुळे नाही घडले, ते घडले धर्माच्या द्युताच्या व्यसनाने आणि अर्जुनाच्या युध्दलालसेने. द्रौपदीला उगाच बदनाम केले.
रामायणातही हेच पहायला मिळते. सितेमुळे रामायण घडले असे म्हणतात. पण कारण होता लक्ष्मण. त्याला शुर्पनखेने प्रपोज केले त्यात काय चुकले? प्रपोज करणाऱ्या स्त्रीचा अपमान करुन वर तिचे नाक कापले तर विनाश नक्की हे उघड आहे. केले लक्ष्मणाने आणि बदनाम झाली जानकी. बरं हे काही सरळ नाही घडले. हे सगळे रावणाला हरवण्यासाठी प्रिप्लॅन्ड होते. कैकयीचे रामावर खुप प्रेम होते. पण इंद्रादी देवांनी तिच्याकडे जाऊन 'जगाच्या कल्याणासाठी' या सारखे उदात्त शब्द वापरुन तिला गळ घातली आणि वर मागायला लावले आणि रामाला वनवासाला धाडले.
देवांचे इप्सित साधले गेले पण इतिहासात कैकयी कायमची बदनाम झाली. सल्ला दिला इंद्राने आणि बदनाम झाली मंथरा.
भूंग्याचं प्रतीक प्रचंड आवडलं
भूंग्याचं प्रतीक प्रचंड आवडलं!!! एकही व्यक्तिरेखेच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख ना करता तुम्ही जवळजवळ सगळं महाभारत उभं केलंत. "आपण सारे अर्जुन" च्या चालीवर "आपण सारे कर्ण" म्हणावसं वाटलं. असेच अनेक भूंगे आपल्यालाही पोखरत असतात कदाचित. पुलेशु.
भरसभेत द्रौपदीचा अपमान होत
भरसभेत द्रौपदीचा अपमान होत असताना तिने कित्येक महारथी रथी तिथे उपस्थित असलेल्या सर्वाकडे मदतीची याचना केली...पण प्रत्यक्ष भीष्म पितामह खाली मान घालून बसून होते त्यात इतरांचा प्रश्नच नाही....एकच होता तो फक्त सर्व काही विसरून हा अन्याय थांबवू शकला असता...पण कुठल्या तोंडाने द्रौपदी याचना करणार होती....स्वयंवरावेळी सुतपुत्र म्हणून ज्याला हिनवले, भरदरबारी त्याचा अपमान केला आणि विवाहानंतरही ती दुषणे देत राहीली म्हणून द्रौपदी याचना न करताच पुढे गेली....कर्णाने तिला वैश्या म्हणून कधीच संबोधले नव्हते....
आणि कुणीतरी दुर्योधनविषयी
@shital- दुर्योधनावर देखिल कांदबरी आहे..मी वाचली आहे..आता लेखकाच नाव आठवत नाही...पण कांदबरीचं नाव दुर्योधनच आहे..त्यातले काही संदर्भ..पटतात..जसे की,
एक अहंकार सोडला तर त्याची बाजुही न्यायाची होती..
सुभद्रा दुर्योधनाला द्यायची असं आधीच बलरामाने ठरवलं होतं..तरीही अर्जुनाने सुभद्राला नितिविरोधी पळवून नेलं होतं...इतकंच नाही सुभद्रा घरी आली तेव्हा द्रौपदीने तिला हिण दर्जाची वागणूक दिली..तेव्हा सूभद्रा सैरवैर कुठेही रडत घोड्यावर पळत होती..तिला कसलेच भान नव्हते...तेव्हाही दुर्योधनाने तिला सावरले....आपल्या घरी आसरा दिला..इतकंच..काय तिचं बाळंतपण देखिल दुर्योधनाच्या पत्नीने म्हणजेच भानुमतीने केलं...आणि मुख्य म्हणजे कर्णानंतर,कर्णानेही दुसर लग्न केलंच म्हणा पण एकटा दुर्योधन एकपत्नीव्रता होता...
द्रौपदीने दुर्योधनाचा कित्येक वेळा अपमान केला होता...आणि त्याचाच सूड म्हणून वस्रहरण घडले..
@अजय, हो मी वाचले आहे ते
@अजय, हो मी वाचले आहे ते पुस्तक, कादंबरी नाही म्हणता येणार. एवढा विस्तृत नाहीये.
>>>एक अहंकार सोडला तर त्याची बाजुही न्यायाची होती..>>> अगदीच
>>>तरीही अर्जुनाने सुभद्राला नितिविरोधी पळवून नेलं होतं...>>> सुभद्रेला अर्जुन आवडत होता. नितीविरुद्ध नाही म्हणू शकत.
>>>कर्णाने तिला वैश्या म्हणून कधीच संबोधले नव्हते....>>> तसा संदर्भ आहे मृत्युंजय न युगंधर मध्ये
नितीविरोध यासाठीच म्हणालो
नितीविरोध यासाठीच म्हणालो होतो की,पळवून आणून विवाह करणे हे त्यावेळी नितीबाह्य होते..फक्त हस्तिनापुरात ह्याला मुक मान्यता होती किंवा
हा पायंडा कौरवांच्या पुर्वजांनी पाडल्यामुळे आणि हस्तिनापुरसारख्या बलाढ्य देशाच्या विरोधात जाण्याची इतर छोट्या देशांची हिंमत नव्हती..
स्वयंवरातून राजकन्येला जिंकणे ही एकच परंपरा होती...आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुभद्रा ही दुर्योधनाची नियोजित वधू होती...आपली बहीण मी तुला देईन असं वचनच बलरामाने दुर्योधनाला दिलं होतं...एखाद्याच्या नियोजित वधूला पळवून नेणे हे ही नितीबाह्यच की....(त्या काळाप्रमाणे)
युगंधर तर नाही वाचलं ..पण मृत्यूंजय वाचलं आहे खुप आधी...परत एकदा वाचायला हवं मग....मी खुपच प्र्भावाखाली आहे वाटतं...अजुनही कर्णाने असे संबोधले असेल हे पटत नाहीये...
पळवून आणून विवाह करणे हे
पळवून आणून विवाह करणे हे त्यावेळी नितीबाह्य होते..फक्त हस्तिनापुरात ह्याला मुक मान्यता होती>> खुद्द श्रीकृष्णाने रुक्मिणीहरण केले होते की!
अप्रतिम! कर्ण माझं
अप्रतिम! कर्ण माझं लहानपणापासूनचं आवडीचं पात्र. अगदी सुंदर लिहिलंय तुम्ही. कर्णाच्या आयुष्यातले त्याला पोखरणारे भुंगे यथार्थ शब्दांत मांडलेयत. +++111 अगदी अगदी खरं... अप्रतिम लिहिलंय तुम्ही!!
खुप खुप आभार
खुप खुप आभार
खूप छान. जबरदस्त लिहिलंय.
खूप छान. जबरदस्त लिहिलंय.
जेथे उतावीळ भिम पाय ठेवायच्या सोन्याच्या आसनाला खड्डा पडे पर्यंत पायाचा अंगठा दाबून संयम पाळतो तेथेच स्वतःला धर्मराज म्हणवून घेणारा युधिष्ठिर मर्यादा ओलांडतो हे काही पटत नाही. >>> नक्की आठवत नाही पण ह्या संदर्भात काहीतरी वाचले होते की द्रौपदीला भीमाबद्दल जास्त जिव्हाळा / प्रेम होते आणि ती भीमाबद्दल म्हणाली होती "थोरला हो" थोडक्यात युधिष्ठिर ऐवजी भीम असता तर हे सगळे झाले नसते.
कथा छान आहे..
कथा छान आहे..
मृत्यूंजय ची आठवण आली..
रथाचे चाक चिखलात रुतेल हा शाप कोण देतं ते आठवत नाहीये..परशुराम च देतात का..??
परशुराम नाही देत तो शाप.
परशुराम नाही देत तो शाप. कर्णाकडून एका ब्राह्मणाची गाय चुकून मारली गेली आणि तो हा शाप देतो असं वाचलंय.
अप्रतिम
अप्रतिम
खुप छान! प्रत्येकामध्ये एक
खुप छान! प्रत्येकामध्ये एक कर्ण दडलेला असतो. त्याला अनेक भुंगे सतावत असतात. अप्रतिम लिहलं आहे.
खुप खुप आभार महाभारत हा
खुप खुप आभार महाभारत हा अभ्यासाचा विषय आहे. कथेचा फॉर्म वापरून असंच काही लेखन करण्याची इच्छा आहे.
जबरदस्त !!!!!!!!
जबरदस्त !!!!!!!!
अप्रतिम लिहिलं आहे
अप्रतिम लिहिलं आहे
धन्यवाद
धन्यवाद
एक भुंगा आला आणि सारथ्य
एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली.
संदर्भ सांगावा
भूंग्याचं प्रतीक प्रचंड आवडलं
भूंग्याचं प्रतीक प्रचंड आवडलं!!! +१००
एक भुंगा आला आणि सारथ्य करताना अपमान सहन करण्याची अट त्याने ठेवली.>> कर्णा चा सारथी शल्य ह्याची ती अट होती. ‘मी सारथ्य करेन, पण मी बोललेलं काहीही तुला सहन करावं लागेल.
Pages