तुंबाड: अंगावर येणारी लालसा(स्पॉयलर्स नाहीत)

Submitted by mi_anu on 14 October, 2018 - 02:54

"वारसाहक्काने मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगणं शहाणपणाचं नसतं."
सतत मुसळधार पावसात भिजलेलं एक गाव, गरिबीत जगणारी एक विधवा आणि लहानपणीच बऱ्याच गोष्टींची समज आलेली तिची दोन मुलं.पैश्यासाठी भीतीदायक वाटूनही एक विशिष्ठ काम करत राहण्यातली अगतिकता.हे सगळं इतक्यावर थांबलं असतं.पण गरिबी पाहिलेली, पैश्याची अधिकाधीक लालसा बाळगणारी आणि हुशार होत जाणारी पुढची पिढी.

'डिल विथ द डेव्हील/सैतानाचा सौदा','इझी मनी' या संकल्पनेवर आज पर्यंत अनेक चित्रपट, कथा, मालिका बनल्या आहेत.कारण ती कल्पना नैसर्गिक आणि तितकी सार्वत्रिक आहे.हाती येणारा खूप पैसा, त्यासाठी अगदी थोडा वेळ पत्करावी लागणारी एक भयंकर जिवावरची जोखीम आणि त्यानंतर तो पैसा आटेपर्यंत मिळवलेलं ऐशआरामाचं आयुष्य-सुख-निवांतपणा.परत एकदा ती किळसवाणी आणि शहारवणारी जोखीम पत्करेपर्यंतच.एखादा विवेकी माणूस ही जोखीम फक्त पोटाची अडचण दूर होण्यापुरतीच पत्करेल.त्यानंतर कष्टाचे पैसे कमवून देणारा व्यवसाय चालू करून त्या मोहापासून आयुष्यभर लांब राहील.पण तुम्हा आम्हाला माहिती आहे- असं आतापर्यंत कधीच घडलं नाही.ही पैश्याची भूक, स्वतः वाढवलेल्या गरजा वाढतच जातात.परत परत त्या सैतानाकडे माणसाला घेऊन जातात.त्या मोबदल्यात गहाण ठेवलेलं आयुष्य, आत्मा, विवेक याबद्दलचे विचार कोपऱ्यात भिरकावून देऊन.

'हॅ, हे काय, अजिबातच भीती वाटली नाही' म्हणून बाहेर येणाऱ्या साठी हा चित्रपट नाही.त्या अपेक्षेने येत असाल तर बहुधा तुम्हाला ट्रेलर कळलं नाही.तुंबाड हा रूढ अर्थाने 'भयपट' नाही.त्यातले चेहरे तुम्हाला घाबरवणार नाहीत, रात्रीमागून रात्री स्वप्नात येऊन झपाटणार नाहीत.पण त्यातली माणसं, त्यांची पैश्याबद्दल लालसा, आणि त्यासाठी जे करावं लागेल ते करत राहण्यामागची अतृप्ती तुम्हाला जास्त घाबरवेल.हादरवेल.शेवट त्यातल्या अगतिकतेने, डिसगस्ट ने आणि हा शेवट माहीत असूनही परत परत त्या मोहात सापडणाऱ्या प्रवृत्ती बद्दल च्या संतापाने डोळ्यात पाणी आणेल.स्पॉईलर द्यायचे नाहीत त्यामुळे जास्त लिहीत नाही.पण असे चित्रपट बनायला हवेत, जास्तीत जास्त लोकांनी बघायला हवेत.रंगीबेरंगी रक्त, घाबरवणारे चेहरे दिसतील म्हणून नाही, तर यातली कथा नक्की काय सांगायचा प्रयत्न करते आहे ते ऐकण्यासाठी. एका छोट्या कथेत अनेक पदर आहेत, एका सरळ साध्या कथे मध्ये बऱ्याच घेण्यासारख्या गोष्टी आहेत.अनर्थ केव्हा झाला?जेव्हा भूक धान्य सोडून धनाकडे वळली.सगळंच गमावणार होतं तेव्हा किमान अर्धं वाचलं ते कशामुळे?धान्यामुळे.शेवटी जे हातात उरलं ते इतकी मोठी जोखीम घेण्याच्या बरोबरीचं तरी होतं का?खूप प्रश्न पडतात.मिळणारी उत्तरं स्वतःला हलवून जातात.

आणि तरीही मला खात्री आहे.पत्करलेली जोखीम मोठी आणि मोबदला खूप मोठा असेल तर आयुष्यात तुम्हीही त्या मोहाच्या आणि मृत्यूच्या दारात पुन्हापुन्हा जाल- थोडीशी चूक किंवा उशीर समोर काय भविष्य घेऊन येतोय हे उघड्या डोळ्याने पाहूनही.

- अनुराधा कुलकर्णी

(नवा लेख लिहायचा मोह आवरला नाही.मी एक्स्पर्ट परीक्षक नाही.पण असे पिक्चर लोकांनी बघायला हवेत.हे नाव जास्तीत जास्त वेळा डोळ्याखालून जायला हवं.मोठे स्टार, चकमकाट बघून थिएटर मध्ये एका दिवशी 8 शो ठेवणारे आणि शेवटी हाती भ्रमाचा मोठा भोपळा ठेवणारे चित्रपट सोडून.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुंबाड पाहिला एकदाचा. प्रचंड आवडला.
बरेच दिवसांनी एखादा चित्रपट संपल्यावरही मनात दबा धरून बसला होता. + ११११११

बरेच दिवसांनी रात्री डोळे मिटायची भिती वाटली Lol
पटकन डोळे उघडून भिंती पाहिल्या. मग पांघरुण घेवून कटाक्षाने तुंबाडचा विचार न करण्याचा प्रयत्न करत झोपले. Happy

खूप छान सिनेमा, परत बघणार

आज पाहिला एकदाचा 'तुंबाड' ! काही काही गोष्टी आणि शेवटाचा काही भाग नीट कळला नाही. घरी आल्यावर पहिल्यांदा हा आणि दुसरा स्पॉयलर्स असलेला धागा नीट वाचून काढले. शिवाय अनुने व्हॉट्स अ‍ॅपवरुनही शंकानिरसन केलं त्यामुळे आता सगळे संदर्भ व्यवस्थित लागले आहेत.
व्हिज्युअली हा पिक्चर खूपच अंगावर येणारा आहे. घुसमटल्यासारखे झाले सतत पाऊस, अपुरा उजेड आणि एकंदर वातावरण बघताना. शेवट बघताना मनात खिन्नता दाटून आली आणि घशात आवंढा दाटून आला.
चित्रपट म्हणून उत्तम आहे पण वैयक्तिकरित्या ही एक कथा म्हणून 'वाचायला' मला जास्त आवडली असती. आत्ता ह्या क्षणाला परत चित्रपट बघायची इच्छा होत नाहीये पण पुस्तक हातात घेऊन धारप शैलीतली एक अफाट कथा म्हणून पारायणं करायची इच्छा होतेय Happy

अगो, पाहिलास, बरं झालं.तुला आवडेल याची खात्री होती.
मलाही हस्तर नष्ट कसे होतात हा भाग कळला नव्हता.धागा वाचून दुसऱ्या वेळा पाहिल्यावर सगळा पिक्चर नीट कळला.

जवळ अजून असेल तर प्रत्यक्ष स्क्रीन ला बघा
डॉल्बी म्युझिक ने मजा येते.
पिक्चर पाहून झाल्यावर जास्पर कीड चे हिटमॅन अपॉकॅलिप्स सर्च करून ऐका.अजून मजा येते.

बऱ्याच ठिकाणी सब टायटल्स असते तर बरं असं वाटलं.कोणी हा फीडबॅक त्यांच्यापर्यंत पोहचवेल का?

>>>> मी काल पाहीला तर सबटाइट्ल्स होते Happy

मी काल पाहीला तर सबटाइट्ल्स होते >> पाहिलास का शेवटी? मी पाहिला तिथे पण होते सबटाइट्ल्स.
ह्याचा पार्ट २ पण येत आहे. परवाच्या मिररमध्ये वाचले तसे.

पार्ट 2 नाही करणार म्हणाले होते ते
रक्त ब्रह्मण्ड वर काम चालू आहे, ती जी ए कुलकर्णी यांच्या विदूषक कथेवर बेतलेली आहे.

आजी व्हर्जन चालेल. त्या सदाशिवलापण वाड्यावर नेते ना ती. त्याचे काही दाखवले नाही नक्की काय करते ते. चिता आहे ती त्या सरकारचीच असते ना.

त्या सदाशिवलापण वाड्यावर नेते ना ती. त्याचे काही दाखवले नाही नक्की काय करते ते. <>> सदाशिव मरतो. त्याची चिता जळत असते, तेव्हा ते..विनायक व त्याची आई डोंगीतून जात असतात.

सदाशिव कुठे जातो वाड्यावर?
तो झाडावर बसलेला असतो, आणि खाली पडून मरतो.
त्याचे मरणे हे विनायक आजी बरोबर एकटा रहावा म्हणून नियतीने केलेला प्लॉट असावा.

मरतो ते समजले. पण ती त्याला वाड्यावर नेते स्मशानात नेण्याएवजी. तो गाडीवान तिला विचारतो पण की स्मशानात जायचे का तर ती म्हणते नाही वाड्यावर जाऊ. आणि ती चिता बहुदा त्या सरकारचीच असावी. ह्यांना तर वाळीत टाकले असते गावाने. ही एकटी बाई सगळे मॅनेज करणे अवघड वाटते.

ती चिता बहुदा त्या सरकारचीच असावी. >> जमिनदार म्हणून त्यांच्या मालकीच्या जागेत अंतिमसंस्कार करायची सोय असेल.

हो.असं असू शकेल.
मुलगा खाली जखमी पडल्यावर डोळे उघडतो तेव्हा तो पेन मध्ये दिसत नाही.सहज डोळे उघडतो आणि मिटतो.मला क्षणभर वाटलं की मुलाला झपाटलं. पण नंतर जाणवलं की 'मुलगा आईने दवाखान्यात न्यायला गाडीत बसवे पर्यंत जिवंत' इतकंच दाखवण्याचा उद्देश असावा.मुलगा तिथेच गेला असता तर आईने खाणं देण्याचं काम विनायक कडे देऊन ती लगेच निघाली नसती.

ह्याचा पार्ट २ पण येत आहे. >>>>>> येस्स!

हो रे, एकट्यानेच पाहावा लागला. >>>>>> Lol

आजी व्हर्जन येऊदे >> नाम भूल गया!!! लई डेंजर म्हणते ती >>>>> गानू आजी, बरोबर बोलले ना मी? Uhoh

नाही, वाड्यावर जे कोणी टेम्प केअर टेकर असेल त्यांना विनंती करून सदाशिव च्या अंत्यविधी साठी नाणं मागून घेते, किंवा कोणी नसेल तर बिनधास्त जाऊन हस्तर च्या मूर्तीतलं उचलून घेऊन येते.
हे आपल्याला कधीच कळणार नाही की ती वाड्यावर का जाते.राही ना विचारायला हवे.

Pages