वर्षा विहार २०१७: फक्त १७ जणच का ?

Submitted by केदार जाधव on 31 July, 2017 - 01:05

मित्रानो ,

काल मायबोलीचा २०१७ चा ववि पार पडला . माझी ३.२ वर्षाची ओवी धरून ( तिचा हा तिसरा ववि) अवघे १७ लोक होते. मुंबईहून ८ अन पुण्याहून ९.
अर्थात या १७ जणानी धमाल केली , नवे जुने मित्र भेटले , ओवीने अगदी दंगा घातलाही.
पण मला पडलेला प्रश्न होता की १७ च का ? संयोजक सोडून तर फक्त ६ लोक ?

१. गेल्यावेळी साधारण १२० लोक होते
२. गेल्या वविला काही मोठे प्रॉब्लेम झाल्याचही आठवत नाही
३. संयोजक अन त्यांचे प्रयत्नही तितकेच .

मग नक्की झाल तरी काय ? काही संयोजकांशी मी चर्चा केली , पण त्यांची उत्तरे फारशी पटली नाहीत .
सगळ्यांचे स्वतःचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असतीलही , ते नेहमी भेटत असतीलही , पण वविचा युएसपी नविन लोकाना भेटणे हा होता , ते वविला कसे रिप्लेस करू शकेल ?
आणि २०११ मधले ७०० अन २०१७ मधले ११०० रू एकच ना ?
अन गेल्या वेळच्या सगळ्या १२० लोकाना असे Unavoidable Issues असतील की Priorities बदलल्या आहेत ? नवीन कुणीच नाही ?

मनात आल तस लिहित गेलोय . कदाचित थोड्या वेळाने वेगळे विचार येतीलही , पण थोड अस्वस्थ वाटल इतकच .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया तु मागच्या वर्षी नव्हतीस वविला. पण मागचा ववि खरोखरी ग्रँड झाला होता. तुफ्फान प्रतिसाद, सुंदर जागा, स्मूथ आणि स्विफ्ट एकदम.
>>>
अम्म्म्म्म्म्म! मला मिळालेला फिड बॅक तसा नव्हता Happy
पण वविवर संयोजक फार मेहानत घेतात याची पुर्ण जाणिव आहे आणि त्यात खोट काढली गेली की वाईट वाटणं अगदीच स्वाभाविक आहे

केदार ने हे असं का झालं हे विचारलंय म्हणून मी माझ्यापुर्तं उत्तर दिलं

१)कोणत्याही वस्तूलाच नव्हे तर ब्रँड ना , संकल्पनेला एक शेल्फ लाईफ असते - म्हणजे ती संकल्पना जुनी होत जाते . त्यामुळे एखादी संकलपना नवनवे प्रयोग करीत जिवंत ठेवावी लागते . वर्षाविहार ची जी रूपरेषा आहे ती बदलायला पाहिजे असे मला वाटते - आता बर्याच लॊकांसाठी जल रिसॉर्ट ला जाऊन मस्ती करणे हे नेहमीचे झाले आहे . खरे तर आता नवीन माणसे , मित्र , मैत्रिणी भेटत नाहीत हा मला तरी मोठा प्रॉब्लेम वाटतो . पण प्रथम जलविहार आणि नंतर संस्कुरुतिक खेळ यात संवादाला वेळच मिळत नाही असे मला वाटते .

२) मी स्वतः दोन वर्षांपूर्वी वर्षाविहार ला आलो होतो आणि खरे सांगायचे तर मला जाणवले कि मी प्रचंड एकटा पडलो . आता व्यवसायानिमित्त अनोळखी लोकांशी सतत संपर्क येतो . पण येथे सर्व जण आपापल्या कंपू मधेच होते . बरेच लोक बऱ्याच लोकांना ओळखत होते आणि माझ्यासारखे नवीन थोडेच . खरे तर परत जाताना माझी अवस्था केंव्हा एकदा परत जातोय अशी झाली होती.

३) असे मला माझा पहिलाच मिसळपाव च्या स्नेह संमेलनात गेलो तेव्हा वाटले नव्हते . आणि ते स्नेह संमेलन म्हणजे फक्त जेवण होते . पण ४-५ तास अगदी मजेत गेले . असेच अजून एक स्नेह संमेलन ( कट्टा ) परत झाले त्याला मी गेलो होतो. या तुलनेत खरेच मला मायबोली वाले शिष्ठ वाटले ... पण एखाद वेळी माझाच प्रॉब्लेम असेल .

४) अमितव सांगतात त्याप्रमाणे मायबोलीचे चे वय वाढत आहे . कारे तर सर्वच मराठी संस्थळांचा हाच प्रश्न आहे . सर्वत्र चाळीशी पार केलेले ( माझ्यासारखे ) लोक आहेत ... आणि मला वाटते कि व वि हा माझ्यासाठी नाही .

पण आधी सांगितल्याप्रमाणे सर्वात महत्वाचे म्हणजे "आपुलकीचा अभाव" हे सर्वात महत्वाचे कारण आहे

मी वविला यायचा विचार करत होतो, पण त्या बाफवर काही फार हालचाल दिसली नाही, आणि इतर बाफांवरही त्याविषयी काही बोलले गेल्याचे दिसले नाही, त्यामुळे शेवटी 'बाकी कोणीच फार जात नसेल' असा विचार करून रद्द केले. मायबोलीवरच्या जाहिराती कल्पक होत्या हे खरेच, पण त्यांचे नावीन्य कमी झाल्यावर पुढे वविचा विचार सदैव फोरफ्रंटला राहिला नाही, हे माझे वैयक्तिक निरीक्षण. अर्थात जे नेहमीच जातात, त्यांना कदाचित त्याची गरजही नसेल. परंतु म्हणावी तशी 'हाईप' झाली नाही, असे वाटते.

नवीन/ तरुण पिढी माबोवर फिरकत नाहीये. थोडक्यात माबोचं सरासरी वय वाढतंच चाललंय.
>>>>
सिरीअसली, हा एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न आहे असे वाटते. यावर कोणी जुन्याजाणत्याने वेगळा धागा काढायला हवा.

मायबोली प्रशासक म्हणून सगळी जबाबदारी माझ्यावर आहे याची कल्पना आहे आणि नक्कीच कुठेतरी आम्ही कमी पडत आहोय. ही गोष्ट हळू हळू सगळ्याच उपक्रमांत जाणवायला लागली आहे.
खरं तर हा जुलै २०१७ महिना मायबोलीवर आजपर्यंत सगळ्यात जास्त वाचकसंख्या असलेला महिना ठरला. यात फक्त रोमातच (वाचनमात्र) असणारे वाचकच नाही तर लॉगीन करून येणार्‍या सभासदांचीही संख्याही विक्रमी आहे. आणि जर तो ट्रेंड पाहिला (आणी ट्रेंडचा वाढ्ता आलेख) तर तो नक्कीच आशादायी आहे. इतकेच नाही तर वविच्या पानाला भेट देणार्‍या वाचकांची संख्याही विक्रमी आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचूनही आपण नोंदणी करण्यात कमी पडलो आहो.

२००७ पासून प्रत्येक महिन्यात मायबोलीला भेट देणार्‍यांची संख्या:
Jan2007-July2017.jpg
ही प्रत्यक्ष माणसांची संख्या आहे (बॉट्स वगैरे त्यातून वगळले आहेत).

>माबो वाढवायची असल्यास क्लास धोरण सोडून क्लास ते मास असं धोरण आखून घ्यावं लागेल.
खरंतर हे पहिल्यापासून तसंच आखलेलं आहे. वरचा आलेख ते योग्य दिशेने आहे असं दाखवतोय. तुम्हाला वेगळं का वाटलं ते माहिती नाही.

पण असे असूनही गेले काही वर्षे उत्साह कमी "जाणवतो". त्या त्या वर्षीच्या संयोजन मंडळाला जाणवत नाही पण जे अनेक वर्षे आहेत त्याना जाणवतो असे अनेकांनी बोलून दाखवले आहे.
आता "जाणवतो" हे खरे आहे का सापेक्ष आहे? दोन्हीही.
मायबोली जेंव्हा बाल्यावस्थेत होती तेंव्हा कुठलाही उपक्रम करण्यात मजा होती. संयोजनात भाग घेणे आणि बाहेरून भाग घेणे सगळेच "आपले" लोक होते. हळूहळू प्रत्येक संयोजन चमूने दरवर्षी प्रत्येक उपक्रमाचा दर्जा वाढवत नेला.
(इथे आपले म्हणजे कुठल्याही जाती , धर्माचे किंवा प्रशासनाला आपले वाटणारे लोक असा अर्थ नाही. तर त्या त्या स्वयंसेवकाला आपुलकी वाटणारे लोक असा अर्थ अभिप्रेत आहे. ज्याने हात वर केला त्याला सहसा स्वयंसेवक होता आले आहे.)
मधल्या काळात मायबोली आणखी वाढत गेली आणि नैसर्गिक रित्या गट पडत गेले. आणि "आपला" कोण संयोजनात आहे, कोण नाही, यावर भाग घेण्याचेही प्रमाण कमी अधिक होत गेले. ही गोष्ट प्रशासनाला कधीच टाळता येण्यासारखी नाही. ती त्या त्या वर्षीच्या स्वयंसेवकांवर अवलंबून असेल.
In democracy decisions are made by those show up. असे एक वाक्य आहे. मायबोलीवर थोड्याफार फरकाने decisions are made by those volunteer असे म्हणता येईल.
कारण एक: एक वेळ अशी आली कि या सगळ्यातली मजा कमी होत गेली. ते काम वाटायला लागले. आपल्या उपक्रमाबद्दल जुने मायबोलीकर काय प्रतिसाद देतात, कुजबुज करतात याचे दड्पण येऊ लागले. कारण दोन : मायबोलीच्या उपक्रमांच्या वाढत्या यशामुळे , मु़ळातच जो उपक्रम पूर्णपणे स्वयंसेवकांवर चालतो त्यांच्याकडून व्यावसायिक सफाईची अपेक्षा वाढू लागली. एखाद्या वर्षी ज्याचे प्रोफेशन प्रोजेक्ट मॅनेजर आहे , किंवा जो प्रोफेशनली ग्राफीक्स डिझायनर आहे तो दरवर्षी मिळणे शक्य नाही. त्याचा परिणाम दर्जावर झाला तर ते समजून घेण्याची सवय आपल्या सगळ्यांना राहिली नाही. पण त्या अपेक्षाही नेहमी चुकीच्या होत्या असे नाही (आमच्या वेळेला आम्ही कष्ट करून योग्य ती माणसं मिळवली तर तुम्ही का नाही असे काही जणाना वाटणे शक्य आहे) . संयोजन करणारे स्वयंसेवक त्यांचा वेळ देऊन करत असल्याने त्यांना जमेल तसेच करणार. दिवाळी अंकांसारखे उपक्रम ज्यात अमॅचुअर स्वयंसेवकांकडून दिवसेंदिवस व्यावसायिक सफाईची अपेक्षा केली जाते आहे ते सस्टेनेबल नाहीत आणि ती अपेक्षा स्वयंसेवकांबद्दल असणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. ही अपेक्षा मायबोलीकरांनी जरी ठेवली नाही तरी आता आपले उपक्रम मायबोलीबाहेरचे अनेक पाहतात , त्यांची नक्कीच असते. गणपतीसारखे उपक्रम याला अपवाद ठरावेत अशी आशा आहे.

वर्षाविहाराच्या बाबतीत मी कधी संयोजनात नसल्यामुळे मला सगळ्या अडचणींची जाणीव नाही. पण आपला" कोण संयोजनात आहे, कोण नाही, याची लागण याही उपक्रमाला लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरेच वर्षे उपक्रम होत असल्याने संयोजकांकडून अपेक्षा वाढल्या असतील आणि नवीन काही दिसत नाही म्हणूनही नोंदणी कमी झाली असेल.
एक नक्कीच होते. जुने सदस्य नेहमीच गळून पडतात (त्यांना कंटाळा येणे नैसर्गिक आहे). पण नवीन सदस्यांना तितक्या वेगात मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी आपण कमी पडतो आहोत. नवीन सदस्याना भेटणे असे अनेकांचे वर्षाविहाराला येण्याचे उद्दीष्ट असते असे काहीनी लिहले आहे. ते होत नसेल तर नावनोंदणीवर परिणाम झाला असेल.

>कोणत्याही वस्तूलाच नव्हे तर ब्रँड ना , संकल्पनेला एक शेल्फ लाईफ असते - म्हणजे ती संकल्पना जुनी होत जाते . त्यामुळे एखादी संकलपना नवनवे प्रयोग करीत जिवंत ठेवावी लागते .

एकदम मान्य. हे ही एक मोठे कारण असू शकते. इतर उपक्रम वर्च्युअल जगातले असल्यामुळे नवीन प्रयोग करणे सोपे असते. पण ववि सारखे उपक्रम भौतिक जगातले असल्याने त्यात नवीन प्रयोग करण्यावर बंधने येतात. त्यात एखादे गेटटुगेदर आयोजीत करणे आणि ववी यात कष्टांमधे , वेळेमधे खूप फरक आहे.

मायबोलीच्या या आणि इतर उपक्रमांमधे सहभाग वाढवण्यासाठी तुमच्या कडे काही सूचना असतील तर त्या नक्कीच आपल्याला उपयोगी ठरतील आणि वाचायला आवडतील.

वेबमास्तर , अतिशय सुंदर प्रतिसाद !!! ग्रुपिझम , अपेक्षा , नाविन्य , सगळ्याच मुद्द्यावर छान लिहिलय .

वेबमास्तर , अतिशय प्रगल्भ प्रतिसाद !
>>खरं तर हा जुलै २०१७ महिना मायबोलीवर आजपर्यंत सगळ्यात जास्त वाचकसंख्या असलेला महिना ठरला.>> अभिनंदन. Happy
>>हे मान्य करण्याचा मोठेपणा सोशल साईटचा मालक/व्यवस्थापक(एडमीन) म्हणून स्वतःमध्ये असणे गरजेचे असते. माबो नेमकं ईथेच मार खाते.>> अगदीच असहमत. मला तर मायबोली प्रशासनाने घेतलेले बहुतांशी निर्णय योग्य वाटले आहेत, पटले आहेत.

माझ स्वतःच मत इथे मांडतोय , कुणाला राग आला तर क्षमस्व ..

आम्ही दर रविवारी सोसायटी ग्राऊंड वर ७ वाजता क्रिकेट खेळतो , ग्राऊंड अनेक जणांच्या बाल्कनीतून दिसत असत . कधी पाऊस असला तर ७ वाजता २ - ३ जण असतात , मग वाट बघितल्यावर अर्ध्या एक तासाने ६ ७ जण झाले अन खेळायला चालू केल (किमान तेवढे तरी लागतात) की ५ मिनिटात १५ २० जण हजर .

मग विचारल की बाबारे , आत्ता आला आहेस , मग १० मिनिटापूर्वी का नाही आलास ?
तर प्रत्येकाच उत्तर अस होत की आम्ही पाहत होतो, २ च दिसले , आम्हाला वाटल आज काही आपण खेळत नाही म्हणून आलो नाही .
मी त्याना हेच म्हणतो , की फक्त २ च दिसतायत तर तुम्ही येऊन ३ करायचे की ७ व्हायची वाट पाहत बसायची यावर तुमच क्रिकेट वर किती प्रेम आहे हे ठरत.
अर्थात हे सगळीकडेच घडत , होत असलेल्याच्या मागे रहायच अन न होत असलेल्यापासून दूर रहायच हा बहुधा माणसाचा स्वभाव आहे.

पण इथे "मायबोली" आपली आहे म्हणून वाईट वाटल इतकच .
चुकीची वेळ , रिसॉर्ट , जास्ती वर्गणी , कमी प्रतिसाद , या गोष्टी बद्द्ल जर काही समस्या वाटत असेल तर ती आधी सांगता येऊ शकली असती का ? ती खरोखर जेन्युईन आहे का यावर चर्चा होऊ शकली असती का ? की नाहीच जात मग मी वविला हाच त्यावर उपाय होता ?

यंदाच्या वविच्या धाग्यावर नेहमीप्रमाणे दंगा झाला नाही. धाग्यावर सतत चर्चा करून , त्यावर उत्साही प्रतिक्रिया, मागच्या वविच्या आठवणी, एकमेकांची मजेदार पायखेचणी असं दिसत राहिलं तर लोकांची उत्सुकता आणि उत्साह वाढतो. ते यंदा अगदीच बंद होतं. नेहमी वविचा धागा ओसंडून वाहत असतो तो यंदा ठप्प होता.

माझ्यामते हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे.

उदा. हर्पेननं त्याच्या धावण्याचा धागा ३ महिने आधी काढला. त्यावर सतत अपडेट्स देऊन, लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन, देणगींचे तपशील देत , स्वतःच्या प्रगतीचा आलेख नोंदवत तो धागा चर्चेत ठेवला आहे. मार्केटिंगचं हे एक उत्तम उदाहरण ठरावं.

मायबोलीकरांचं सरासरी वय वाढलंय हे बरोबर पण ते काही एका वर्षांत वाढलेलं नाहीये. मागच्या वर्षी सगळे तरूण होते आणि यंदा म्हातारे झालेत असं नाही. तसंही वविकरता असं कटऑफ वय थोडीच आहे?

वेमांचं विवेचन इंटरेस्टिंग आहे.

मी माझ्यापुरतं सांगू शकते की माझा माबो वावर संयुक्ता बंद झाल्यामुळे कमी झाला. आणि हल्ली माबोवर जी राजकीय लाथाळी सुरू असते ती उबग आणणारी असते. त्यामुळे प्रत्येक धाग्यावर विषय नसतानाही राजकारण आणून त्यावरून त्याच त्या बिनडोक मुद्द्यांवर तेच ते आयडी जे वाद घालतात ते प्रचंड कंटाळवाणं आहे.

Ladies only website सुरू झाली म्हणून संयुक्ता बंद झाले / केले ना! मायबोली वरचेच मोस्टली स्त्री सभासद तिथे आहेत बहुतेक. मी संयुक्ता किंवा त्या साईटची सभासद नव्हते /नाही.

Ladies only website सुरू झाली म्हणून संयुक्ता बंद झाले / केले ना! मायबोली वरचेच मोस्टली स्त्री सभासद तिथे आहेत बहुतेक. मी संयुक्ता किंवा त्या साईटची सभासद नव्हते /नाही. >>> नाही. संयुक्ता बंद झाली म्हणून ती वेबसाईट सुरू केली गेली.

माझी येण्याची इच्छा होती , परंतु मी माबो वर केवळ एक वाचक असल्यामुळे व वि आमच्यासाठी नसावे असे वाटत होते , त्यामुळे आलो नाही ...

Ladies only website>>> मायबोलीचे असे काही वर्जन अस्तित्वात आहे? ठाऊकच नव्हते हे!

असल्यास,

वेमा - रागावू नका पण विचारावेसे वाटते की अशी एखादी वेबसाईट असावी असे वाटण्याची अपरीहार्यता काय आहे/होती? मला हे डिस्क्रीमीनेशन वाटत आहे... चांगल्या अर्थाने केलेले असले तरी.

"माझी येण्याची इच्छा होती , परंतु मी माबो वर केवळ एक वाचक असल्यामुळे व वि आमच्यासाठी नसावे असे वाटत होते , त्यामुळे आलो नाही" ... माझ्या ही बाबतीत असेच झाले , खरेतर बर्याच जणांना भेटण्याची उत्सुकता होती. उदा: बेफी, कचा, दक्षिणा, लिंबुटिंबु इतर बरेच सगळी नावे वेळेअभावी लिहु शकत नाही.
ववि बद्दल वाचुन यायची इच्छा होती. पण त्या धाग्यावरचे प्रतिसाद बघुन निर्णय घेता येत नव्हता,तसेच फक्त वाचक असलेल्या ने जाव की नाही यात "नाही" च पारड जड झाल.

११ वर्ष ७ महिने मायबोलीकर आहे पण ववि ला कधीच गेले नाही. कारण असे काहीच नाही.मोठ्या ग्रुप्स मध्ये बुजायला होतं.
फार फार तर २० चा ग्रुप असेल तरच मोकळेपणी वावरता येतं. २०० च्या ग्रुप मध्ये गेले तर पूर्ण वेळ लोकांच्या तोंडाकडे बघत राहीन अशी भिती आहे.
प्रत्येक साईट चे आपले वय, फेज असते.आणि आता व्हॉटसअ‍ॅप सारखी मिडिया गेल्या ३ वर्षात वाढल्याचा पण हा परीणाम.(कधीकधी एक वेगळी विश्वामित्रीय प्रतिसृष्टी निर्माण होते व्हॉ अ‍ॅ ग्रुप चीच..)त्यामुळे साईट ला २००० मेंबर आणी १७ च आले म्हणून चालत नाही.कंपनी जितकी मोठी तितके लोक स्वत:चे वेगळे तंबू उभारत जातात.मराठी साईट आणी जगात इतरत्र.
मी ऑफिसात ज्या प्रोजेक्ट मध्ये होते तिथे ९ वर्षापूर्वी ६७ जण होते.खूप मजा यायची आउटिन्ग ला.नंतर ५५० झाले..लोकानी आउटिंग ला टिम बॉन्डिन्ग करणे सोडून आपापलेच ग्रुप चालू ठेवले.यात चूक काही नाही.मोठा क्राऊड झाला की हे होतेच.
अशी गेट टुगेदर अरेंज करणं, त्यातले व्याप मॅनेज करणं, बोलणी करणं, पैशाची बाजू जास्तीत जास्त लोकाना खुष ठेवणं हे अती कठीण आहे.हे दरवर्षी उत्साहाने करणार्‍या संयोजक टिम्स ना मानायला हवे.
सो, पाल्हाळ आवरुनः ७०० असुदे वा १७ असूदे वा ७, आलेल्या सर्वाना तो वेळ मजेचा गेला हे जास्त महत्वाचं!! पुढील ववि साठी शुभेच्छा.

पुणे मुम्बै सगळे एकत्र pool करायची अपेक्षा सोडून decentralize करावे.

पुणे ववि आणि मुम्बै ववि असे दोन स्वतंत्र प्लेस् ठेवावेत . ज्याना हवे ते कुठेही जातील.

Travelling cost and time should be minimum

Pages