मी दिनेश विश्वनाथ शिंदे....

Submitted by दिनेश. on 10 May, 2017 - 08:25

मी दिनेश विश्वनाथ शिंदे....
मी ऑगस्ट २००१ पासून मायबोलीचा सभासद आहे ( माझ्या प्रोफाईल मधली तारीख चुकलेली आहे, कारण
जून्या मायबोलीवरून डेटा घेण्यात काहीतरी गल्लत झाली असावी. )
मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.
ही कैफियत नाही, आरोपपत्रही नाही. आहे ती निव्वळ माझी भुमिका.

१) पहिल्याप्रथम, भारतीय नागरिकांबद्दल अभिमान असणे वगैरे..

तामाम भारतींयाबद्दल केलेले एक खोडसाळ विधान हे कदाचित निमित्त झाले असेल, पण ज्या बाबींबद्दल मी
संवेदनशील आहे, त्यापैकि हि एक. पुर्वीदेखील असे प्रकरण झाले आहे.
त्यावेळी सगुणा या आय डी ने, मुलगा होण्यासाठी काय उपाय करावेत, असा बीबी उघडला होता. त्यावर इथल्या
काही जेष्ठ सभासदांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणाला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नव्हते.
त्यावेळी " बेटी बचाओ आंदोलन" वगैरे सुरु झालेही नव्हते पण गर्भनिदान चाचणीवर भारतात बंदी आली होती.
( भारताबाहेर अनेक देशांत नव्हती ) तरीही भारतीय भाषेत असलेल्या एका संकेतस्थळावर अशी चर्चा व्हावी,
हे मला अजिबात पटले नव्हते. त्यावर इथल्याच एका सभासदाने, फारसे सिरियसली घेऊ नकोस, ओल्ड वाईव्ज
टेल्स एवढेच याचे महत्व आहे. असे मला सांगितले होते. तरीही मी आग्रही राहिलो, आणि तो बीबी नंतर बंद करण्यात आला.
त्यामूळे एखाद्या तत्वासाठी माझा आग्रह आजचा नाही.

२) मेघना पेठे यांचे पुस्तक, नतिचरामी

या पुस्तकांची अत्यंत व्यापक प्रमाणावर जाहीरात करण्यात आली होती. भारतीय साहित्याचा
इतिहास बदलवणार वगैरे दावे करण्यात आले होते. हे पुस्तक मी वाचले. त्यापुर्वी या लेखिकेच्या
काही कथाही वाचल्या होत्या.
एकंदर पुस्तक वाचल्यावर मला ते अजिबात आवडले नव्हते आणि त्यब्बद्ल मी इथे लिहिले. आता सर्व संदर्भ
आठवत नाहीत, पण दोन उदाहरणे आठवताहेत ती लिहितो.

पुस्तकात असे विधान आहे कि मुंबईतील फोर्ट मधे पारश्यांची जी विहिर आहे, त्यात पारसी लोक प्रेते टाकतात.
हे विधान अत्यंत खोडसाळ आहे. ती विहीर आणि त्या विहीरीतले पाणी हे पारसी लोकांसाठी अत्यंत पवित्र आहे.
फोर्ट मधल्या अनेक इमारतीत पुर्वी पाणीपुरवठा होत नसे ( तशी सोयच नव्हती ) अनेक पारसी केवळ त्याच विहिरीचे
पाणी पित असत. आणि मी त्या काळात फोर्ट विभागात अनेक वेळा जात असे म्हणुन हे मला माहीत होते.
मुंबई विद्यापिठाच्या कुंपणालगत पण अशी विहीर होती ( अजूनही असेल ) आणि तिथूनही प्यायचे पाणी
पुरवले जात असे. ( कारण वरचेच, अनेक इमारतीत पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. ) आणि पारसी लोक,
त्यांचे मृतदेह, एका अत्यंत पवित्र भावनेने, टॉवर ऑफ सायलेंस मधे ठेवतात. त्यामूळे लेखिकेचे हे विधान अयोग्य होतेच.

त्याच पुस्तकात आणखी एक बेधडक विधान असे होते कि, फोर्ट मधे गुलाबाची फुले विकणारी मुले, ती फुले
थडग्यावरुन उचलून आणतात. हे पण एक खोडसाळ विधान होते. ( आजही के रुस्तम च्या बाहेर, ती मुले अत्यंत
निगुतीने फुले नीट करताना दिसतील )

आणि एकंदरच पुस्तकाबाबत बर्याच न पटणार्या गोष्टी होत्या, त्याबद्दलही मी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि
ती करताना, लेखिकेचाच " क्लायमॅक्स" हा शब्द वापरला. झालं, त्यावरून या सभासदांचा पापड मोडला.
म्हणजे त्यांच्या विरोधात मत नोंदवायचा इथे कुणाला अधिकारच नाही जणू. त्यापुर्वी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि परीचित
असलेल्या एका कवियत्रीने पण माझ्याशी अबोला धरला होता. पण पुढे माझ्या चुलतभावाच्या अपघातानंतर
स्वतःहून सांत्वनाचा प्रतिसाद दिला. सध्या ती मायबोलीवर दिसत नाही. या संपूर्ण ग्रूप माझ्या विरोधात
जायचे कारण हे. त्यापुढे लेखिकेची काही पुस्तके प्रसिद्ध झाली का, किंवा काय इतिहास घडवला ते मला माहीत
नाही. पण इथे मात्र इतिहास घडला.

३) पित्त, गुरुवर्य डॉ. शरदीनी डहाणूकर आणि मी

डॉ. डहाणूकर माझ्या लेखनातील गुरु. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायला हवेत. २५ वर्षे अलोपथीची
प्रॅक्टीस करून त्या आयुर्वेदाकडे वळल्या होत्या. पण त्यांना इतर अनेक विषयात रस होता आणि
त्या विषयांवर, खास करुन झाडांवर त्या महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहित होत्या. त्यासोबत आमच्या
कॉलनीत राहणारी मृदुला नाडगौडा हिने काढलेले सुंदर फोटोही असत. त्यांचा मी चाहता होतो आणि आहेही.

१९९६ - १९९८ या काळात मी नायजेरियात होता. तिथेही मी त्यांचे लेख वाचतच असे ( तेव्हा इंटरनेट नव्हते,
मी वर्तमानपत्रे कुरियर ने मागवायचो ) तिथे असताना मला यलांग यलांग ( हे नाव तेव्हा माहीत नव्हते )
या झाडाची ओळख झाली. त्यांच्या कुठल्या लेखात या झाडाचा उल्लेख नव्हता ( हे झाड भारतात मी
त्यापुर्वी बघितले नव्हते. ) म्हणून कौतूकाने मी त्यांना त्या झाडाचा फोटो आणि एक पत्र पाठवले. पत्रात
अर्थात त्यांच्याच काही लेखांचा उल्लेख होता. त्या उत्तर देतील, अशी अपेक्षाही नव्हती, पण त्यांनी तत्परतेने
उत्तर पाठवले, माझ्या चार ओळींचे खुप कौतूक केले आणि चक्क भेटायला बोलावले.

पुढच्या भारतभेटीत मी त्यांना भेटलो. तो पर्यंत त्यांनी झाडांवरचे लेखन थांबवले होते आणि पाककलेवरच्या
लेखनाकडे वळल्या होत्या. मी तिच तक्रार केली तर त्या म्हणाल्या, कि आता तू लिहायला सुरवात कर.
मी माझा एक लेख, लोकसत्ता कडे पाठवला, पण तो प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते.

झाडांबद्दल, पुढे प्रा. महाजन, प्रा. घाणेकर वगैरेनेंही विपुल लेखन केलेय, पण तरीही डॉ. डहाणुकरांची
मिश्किल शैली, एकमेव अशीच आहे. त्यांचे बोलणेही असेच मिश्किल होते. सहज बोलता बोलता त्यांनी
मला विचारले कि तू पित्त प्रकृतीचा का ? मला तेव्हा ते नीट कळले नाही, पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल
त्यांचे काही आडाखे सांगितले ( उदा. मला उपवास सोसत नाहीत वगैरे ) आणि ते खरे होते.

पुढे एका लेखाच्या निमित्ताने मी ते आडाखे इथे लिहिले. ते सत्य असल्याने, पित्त प्रकृतीची माणसे ते
सहज स्वीकारणार नव्हतीच. झालं, त्यावरून पण इथे वादळ. एका विदुषीने तर थेट असा आरोप केला,
कि माझा कुणाबद्दल तरी आकस असणार म्हणून मी असे लिहिले. ( आणि त्यांची प्रकृती कुठली, हे मला
माहीत असायचे काही कारणच नव्हते. ) काय काय लिहिले गेले इथे माझ्याबद्दल.

पुढे, डॉ डहाणूकरांच्या " स्वास्थ्यवृत्त " या पुस्तकातील पानांचे स्कॅन इथे दिले. मी केलेली बहुतेक विधाने
त्या पुस्तकातीलच होती. त्या लेखाला मी, " हा सूर्य आणि हा जयद्रथ" असे नाव दिले होते. एवढा सबळ
पुरावा, या लोकांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पुढे मग गंमतच झाली, तो लेखच इथून गायब करण्यात
आला. त्यानंतर तो गूगलवर दिसत होता, पण इथे दिसत नव्हता. हे त्यांचे कर्म, त्यांनाच जाचत राहिले.
मग त्यांच्याच एका गटग च्या चर्चेत, गटग ला जयद्रथ येणार आहे का ? अशी चर्चा झाली होती. आहे कि नाही मज्जा ?

४) वर्षा विहार आणि मी

मायबोलीचे वर्षा विहार सुरु होण्यापुर्वी मी स्वतः एक वर्षा विहार आयोजित केला होता. क्षिप्रा, सोनचाफा,
बॉम्बे व्हायकिंग वगैरे काही मोजके मायबोलीकर त्याला हजर होते. त्यानंतर सिंहगडावर एक सहल गेली होती,
त्यातही मी सहभागी होतो, तो जरी पहिला वर्षाविहार मानण्यात आला असला तरी त्याला मायबोलीचे नाव नव्हते,
ती प्रथा नंतर सुरु झाली.

तोपर्यंत मायबोलीवर अत्यंत मोकळे वातावरण होते आणि त्याला अनुसरून मी माझ्या एका नव्या मैत्रीची कबूली
दिली होती. ती पुढे मायबोलीवर आली, पण आमच्या मैत्रीबद्दल इथे एवढ्या घॄणास्पद चर्चा झाल्या, कि तिने
मायबोली सोडली, ती कायमची. ती आजही माझी अत्यंत जिवलग मैत्रिण आहे.

त्यानंतर मायबोली वर्षाविहार सुरु झाले. त्यावेळी आयोजकांची चर्चा इथे न होता, याहू ग्रूप वर(सुद्धा) व्हायची. तर
इथल्या साळसूद चर्चेत मी भागही घेत असे. पण तिथे माझ्याशी गोड गोड बोलणारे सदस्य माझ्या माघारी
माझ्या पुरुषार्थाची चवीने चर्चा करत होते. म्हणजे सगुणा फार्म मधल्या म्हशीवर दिनेश बसला म्हणायचा कि
बसलं म्हणायचं अशी. आहे कि नाही मज्जा ? म्हणजे ज्या गोष्टीची चिंता माझ्या बायकोने करायची, त्या ह्या सर्व
जणी करत होत्या. ही सर्व चर्चा मला, तिथल्याच एका सदस्याने पाठवली होती. मी प्रतिक्रिया दिली नाही,
पण त्यानंतर कुठल्याही व वि ला हजेरी लावली नाही.

या पातळीवरची चर्चा करण्यासाठी त्यांना एक क्लोज्ड ग्रुप हवा असतो. आणि तो इथे उपलब्ध करुन दिला
जातो. आनंद आहे.

५) मैत्री आणि यांची मते

स्त्री पुरुष मैत्रीबद्दल विद्वत्तापुर्ण आव आणून चर्चा करणार्या इथल्या सभासदांची मानसिकता सांगणारा, एक किस्सा.
मायबोलीवरच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने, एक जूनी सभासद परत इथे आली. तिचे स्वागत करताना मी
"जूनी मैत्रिण" असे शब्द वापरले. हे शब्द माझ्या वैयक्तीक आयुष्यात तर अनेक स्त्रिया आणि मुलींबद्दल
वापरेन.
तर या दोन शब्दांवरुन, इथल्या सभासदांनी तिला जीव नकोसा केला. तिची मानसिक अवस्था काय केली असेल
याची मला तर कल्पना आहेच पण आणखी एका सभासदाला आहे.
पुढे याच सभासदाने, या ग्रुपचे वकीलपत्र घेतले. हि बाब तर आणखी नवलाची.

६) मी आणि माझ्या कथा

मायबोलीवर मी सुरवातीला अनेक कथा लिहीत असे. त्या काळात त्या खुप लोकप्रिय पण झाल्या
होत्या. गिरीराज सारखे माझे मित्र तर मला केवळ माझ्या कथांमुळे लाभले होते. तो आजही
माझा मित्र आहे पण मी आता कथा लिहित नसल्याने, तो मायबोलीवर फिरकत नाही.

मी आजही इथल्या कथा ( क्रमशः नसतील तर ) वाचतो. काही अपवाद वगळले तर मला त्या एका
ठराविक वर्तुळात फिरताहेत असे वाटते. एका कथेत तर हुंडा वगैरे पण उल्लेख होता. शक्यतो,
नकारात्मक प्रतिसाद द्यायचा नाही, हा माझा विचार असल्याने, मी तिथे काहीच लिहिले नव्हते.

चौदा वर्षांपेक्षा जास्त वर्षे मी आफ्रिकेत घालवली. इथले माझे सहकारी माझे जिवलग मित्र आहेत.
एकदा आपला मानल्यावर ते माझ्यावर खुप विश्वास ठेवतात आणि आपले प्रश्न आणि अनुभव
अत्यंत मोकळेपणानी माझ्याशी शेअर करतात. ठराविक भारतीय संकल्पनाना छेद देणारे
आयुष्य हे लोक जगतात. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) या विषयावर आफ्रिकन देशात नाटकेही सादर होत असतात.
पण इथले वातावरण बघता ( ज्या प्रयोगात जेन फोंडा आणि व्हुपी गोल्डबर्ग सारख्या अभिनेत्री
सहभागी होतात ) त्या नाटकांच्या नावाचाही उल्लेख इथे करावासा वाटत नाही. त्या कथेवर
माझ्यातर्फे एका दुसर्याच सभासदांने या विदुषींना उत्तरे दिली होती, पण मी मात्र ना त्या बीबी कडे
परतलो ना कधी परत कथा लिहिली. इथले वातावरण प्रगल्भ व्हायला, माझी हयात पुरणार नाही
एवढे नक्की.. ( रच्याकने, एका चित्रपटासंदर्भात मी प्रगल्भ हा शब्द वापरला, तर तो देखील यांच्यासाठी
विनोदी ठरला. )

७) माझे ललित लेख.

पुर्वी मी भरपूर ललित लेखन करत असे. तेव्हा फोटो वगैरे द्यायची सोय नव्हती. आता मी ते देखील
बरेच कमी केले आहे, कारण तेच.
एक उदाहरण सांगतो. माझ्या नायजेरियातील वास्तव्याबद्दल मी लिहिले होते, त्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या
लेखाचा फोकस होता, माझे मित्र. त्यानंतर अलिकडे मी माझ्या वेगवेगळ्या देशांतील घरांवर एक मालिका
लिहिली.
आता मूळ घटना अशी. माझ्या फ्रेंच मित्राने त्याच्या आफ्रिकन मैत्रीणीसाठी मला भारतातून साडी आणायला
सांगितली. ती मी नेली. तिथे नेल्यावर त्याने मला सांगितले कि तूच तिला नेसव, ते मला अवघड वाटल्याने
मी स्वतः साडी नेसून दाखवली. आता त्यात वावगे ते काय ?
आणि झाले एवढेच कि माझ्या दुसर्या लेखात, मी स्वतः साडी नेसल्याचा उल्लेख केला नाही. त्यात लाजण्या
सारखे काही नव्हते आणि मुद्दाम मिरवण्यासारखेही काही नव्हते. लेखाच्या अनुषंगाने जे रेलेव्हंट वाटले,
तेवढा उल्लेख मी केला. झालं, विदुषी खवळल्या. चक्क दहा वर्षापुर्वीच्या एका लेखाची लिंक घेऊन
हजर झाल्या ( आता त्यापुर्वी तिथे किती चविष्ठ चर्चा केली असेल, त्याची कल्पना करा. ) अरे बाबा, नाही
ना पटत आपलं. मग दूर रहा कि. मी काही कुठे रिक्षा घेऊन जात नाही, माझे लेख वाचा म्हणुन. कि प्रतिसाद
द्या अशी याचनाही करायला जात नाही.
बरं, आता या विदुषीबाईंची आणखी एक मजा. एका विषयाच्या लेखात मी माझी बाजू मांडताना एक
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या एका उतार्याचा संदर्भ दिला, तर तोच या बाईंना आठवेना.
मग मी त्या पुस्तकाचा स्कॅन दिला.. असो नंतर काय झाले, ते बघायला मी आलो नाही. तात्पर्य काय कि,
कधीकाळी मी लिहिलेल्या लेखातला संदर्भ यांना आठवतो. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला नाही.

असो, मी नंतर ललित लेखनही थांबवले.

८) युक्ती सुचवा आणि युक्ती सांगा

या बीबीवर स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर त्यावर सल्ले दिले जातात. गेली
अनेक वर्षे मी पाककलेत प्रयोग करत असल्याने भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि
त्यानुसार मी सल्ले देत असे.

तर त्यावरुन यांच्या ग्रुपवर माझा उल्लेख "वहिनोदा" असा करण्यात आला, आणि तो
उल्लेख त्यांच्याच पैकी एकीने मला सांगितला. मी उद्वैगाने तक्रार केली, पण त्याबद्दल
काहिही करण्यात आले नाही.

त्या उल्लेखात सहभागी असणार्या एका सभासदाने मात्र, मुद्दाम फोन करुन, दा, लहान
समजून मला माफ करा, असे सांगितले. पुढे आमच्यात काही कटूता राहिली नाही. पण
आता तिच सभासद इथे काही लिहित नाही. कारणांचा उल्लेखही तिला करावासा
वाटत नाही.

त्यानंतर मी फारश्या युक्त्या सांगायला तिथे गेलो नाही. धाकटी बहिण असणार्या एका
सभासदाने काही विचारले, तर सांगितले असेन, तेवढेच.
"भाकरीचे पिठ भिजवून फ्रीजमधे ठेवा आणि भाकरी करण्याआधी मळून घ्या" असे सल्ले
तिथे दिले गेले. तेवढे पाककौशल्य माझ्याकडे नाही. सो, माझा पास !!

९) रविवार सकाळ आणि ते

माझ्याबद्दलच्या विकृत पातळीवरच्या चर्चा मायबोलीवरच्या सो कॉल्ड क्लोज्ड ग्रुप पुरत्याच
मर्यादीत राहिल्या नाहीत. रविवार सकाळ मधल्या एका लेखावर, दिनेशदा असे नाव घेऊन,
माझे आणि माझ्या आफ्रिकन हाऊसमेड चे सबंध आहेत, असे सुचवणारा एक प्रतिसाद दिला
गेला. मी काही तो पेपर वाचत नाही, पण माझ्याच एका चाहत्याने, त्या बातमीची लिंक
मला पाठवली होती.

मीसुद्धा पाठपुरावा करण्याचे ठरवले. सायबर सेल कडे तक्रार केली. त्या बातमीची लिंक
आणि मी लिहिलेल्या इ मेल ची कॉपी मी इथे दिली होती. ती व्यक्ती कोण असेल, याचा
साधारण अंदाज होताच आणि त्यावर नंतर शिक्कामोर्तबही झाले. त्या व्यक्तीबद्दल कुठलिही
कार्यवाही करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी ती तक्रार मागे घेतली.

तर यावरुन इथल्या एक विदुषी ( अरे यार, सगळ्याच विदुषी आहेत, आणि त्यांना क्रमांक
देण्यातही अर्थ नाही ) माझ्यावर खार खाऊन आहेत, का तर ती व्यक्ती कोण, हे मी उघड
केले नाही. याच विदुषी मी कधी काळी इथे केलेल्या माझ्या गौरवर्णाच्या उल्लेखावर नाराज
आहेत. आता तो कधी आणि कुठल्या संदर्भात केला होता, ते आठवतही नाही.
( पण चुकीचा नाहीच... आणि त्या बाई हा वारसा अगदी निष्ठेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
विडंबनातील गोरेपणाचा संदर्भ आहे तो हा. फारेण्ड यांनी लिहिले आहे, कि असे संदर्भ नवीन
लोकांना माहीत नसतात. पण माझ्या बाबतीत मात्र सर्व संदर्भ असे पुढच्या पिढीपर्यंत
पोहोचवले जातात. )

त्यानंतर मी इथले दिनेशदा हे नाव टाकले ( हे नावाचे बारसे पण इथल्याच एका विदुषीबाईनी
केले होते. )

१०) मी इतरांवर केलेली टिका

एका सभासदाने, मी पण इतरांवर टिका करतो आणि ती त्यांनी वाचली आहे, असे लिहिले आहे.
मी ती सार्वजनिक ठिकाणी केली होती, आणि अर्थातच फार पातळी सोडून केली नव्हती.
आणि ती सातत्याने तर नक्कीच नाही.

त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
दुसरे : प्रा. देवपूरकर. ते गृहस्थ एकाकी आणि आजारी असतात, असे मला कळले होते. त्यांची
विचारपूस देखील मी केली होती. त्यांच्या एका गझलेवर टिका केली होती, तर त्यांनी मला
गझलेतलं काय कळतं, असे विचारले होते ? नंतर मी कधीच त्यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला
नाही. पण त्यांचे भरमसाठ लेखन सुरुच होते. नंतरही मी इतरत्र टिका केली होती, त्यावर
इथल्या एका विदुषींनी मला ओसीडी झाला आहे, असे थेट विधान केले होते ( थेट विधान, लक्षात
घ्या. ) त्याचा पुरावा देऊन मी तक्रार केली होती.. पण त्यांच्यावर देखील काहिही कार्यवाही झाली
नाही.
आणि राहिला बी ! अगदी पहिल्या वहिल्या दिवसांपासून तो माझा मित्र होता. आताच नाही तर
पुर्वीदेखील तो अनेक नावाने खोडसाळ लिहित असे. मी त्याला आव्हान केले होते आणि त्याने
स्वतःहून त्याची कबूली दिली होती. मला प्रत्यक्ष फोन करून त्याने माफी मागितली होती.
त्याच दिवसात डॉ. डहाणुकरांचे पत्र इथे अपलोड करायलाही त्यानेच मदत केली होती.

वैयक्तीक आयूष्यातले प्रॉब्लेम्स आणि एकटेपणा यांनी तो गांजला होता. त्याच्या इथल्या शेवटच्या
दिवसातही मी त्याच्या बाजूने ठाम राहिलो. आजही आम्ही फेसबूक वर मित्र आहोत. मायबोली
सोडून तो सुखी आहे. अत्यंत सुंदर असे फोटो, तिथे पोस्ट करत असतो तो.
आपल्याच घरातलं एखादं माणूस जर कुठल्या समस्येने ग्रासलेले असल, तर आपण
त्याला आणखी त्रास देतो का ? तो आणि मी ज्या काळात इथे सभासद झालो होतो,
तो काळ असाच जिव्हाळ्याचा होता. त्याला होणारा त्रास त्याच्याच शब्दात सांगायचे
तर बलात्काराइतकाच क्लेशदायी होता. त्याने जरूर इतरांचा अपमान केला असेल,
पण आपण मन मोठे केले नाही, हे देखील आहेच.
गेलेल्या लोकांबद्दल वाईट लिहायचे नाही, असा एक संकेत आहे. पण सत्य लिहायला हरकत
नसावी.

नताशा यांची आणि माझी ओळख असायचे काही कारणच नाही. माझ्या लेखनात काही
शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. त्याबद्दल त्यांनी एकदा नापसंती व्यक्त केली होती
आणि मी त्यांची माफी मागितली होती.
त्याच्या रहमानीया या लेखावर प्रतिक्रिया देताना, मी त्याचे संगीत मला आवडत नाही,
असे लिहिले होते. मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १ मुद्दा लता मंगेशकर यांचे मत होते.
माझ्या धोरणाप्रमाणे मी नंतर कधीच त्याच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली नाही.

पण नंतर माझ्या एका लेखात, एक संदर्भ मला सापडला नव्हता तो त्यांनी शोधून दिला होता
आणि दुसर्या एक लेखात, चित्रपट संगीतातील प्रादेशिकता, यावर आमचे मतभेद झाले होते.
ते सुद्धा थेट नव्हेच, दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर त्या माझा उल्लेख, जुनी खोडं असा करु लागल्या होत्या. मुद्दाम सविस्तर लिहिले
कारण, या एवढ्याश्या मतभेदाला नंतर कुठे खतपाणी घातले गेले, त्याची कल्पना येईलच.

आणि आता राहिल्या त्या माझ्या पाककृती.

आधी लिहिल्याप्रमाणे पाककृती लिहिणे हि माझ्यासाठी पॅशन होती. ( आहे आणि राहीलच )
पण त्याही कुणाच्या कुचेष्टेचा विषय का व्हाव्यात ? विडंबन हा साहित्यप्रकार मलाही आवडतो,
पण त्यातही एक आब राखलेला असतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणत मी कधी लक्ष दिले नाही,
पण जे समोर आले ते अत्यंत क्लेशकारक होते, शिवाय हे इथे सातत्याने होत होते ( आणि
ते होऊ दिले जात होते ) ते तर त्याहूनही क्लेशकारक आहे.

आणि याबाबतीतही काही लिहून मोकळे झालेच पाहिजे. मी रुढ अर्थाने भाविक नाही. पण
संतसाहित्य माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केनयातील वास्तव्यात मला तिथे अनेक भाज्या
सहजी उपलब्ध व्हायच्या. त्यातल्या अनेक भाज्या, भारतात ( निदान त्या काळात तरी ) सहज
मिळत नव्हत्या.

म्हणुन त्या भाज्यांची ओळख व्हावी म्हणुन मी अवघी विठाई माझी, हि मालिका सुरु केली.
प्रत्येक भाजी स्वतः शिजवून, तिची माहिती आणि फोटो असे त्या मालिकेचे स्वरुप होते.
तर विठाई हा शब्द सुद्धा कुचेष्टेचा विषय व्हावा ? आपला अपमान आपण सहनही करतो, पण
आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान, सहन करु ? डॉ. डहाणुकरांचाही असाच उपमर्द इथल्या
विदुषींनी केला होता.

याच मालिकेत, मी लीक या भाजीबद्दल लिहिले होते. स्पेलिंगवरुन देवनागरीत लिहायचे
झाले तर त्या भाजीचे नाव असेच लिहावे लागणार. आता मी ते नाव असेच का लिहिले असा
एक निरोप घेऊन एक विद्वान आले होते.. निरोप अश्यासाठी लिहितोय कारण, काल आमची
तिथे चर्चा झाली.. वगैरे सुरवात होती. या शब्दावरून त्यांना नेमके काय आठवले ते त्यांनाच
माहीत.

पाककृती मला काही अधिकार आहे असे मी अजिबात मानत नाही. उलट या क्षेत्रात लाजो माझी
गुरु आहे, असे मी जाहीररित्या मान्य केले होते. इथेही ज्या ज्या सूचना चांगल्या मनाने केल्या
जातात त्यांचे मी स्वागत करतोच आणि गरज वाटल्यास मी बदलही करतो. त्यात लाजिरवाणे ते
काय ? पण अर्धवट ज्ञानावर जर काही प्रतिक्रिया आल्या, आणि त्या सुद्धा काही विशिष्ठ आयडी कडून
तर मी काय म्हणून सहन कराव्यात ? वाटीभर काजू घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळ घालून केलेल्या
पदार्थाला, खांडवी म्हणालेले मी सहन करायचे ?

आता मला मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देणात येणार हे नक्की, मी जी प्रतिक्रिया दिली होती
त्यात एक म्हण वापरली होती पण त्यातलाही मला ग्राम्य वाटलेला शब्द वगळला होता.
एका संताच्या अभंगाचा दाखला दिला होता, तर त्यातला एकच शब्द उधृत केला गेला होता.
असो त्यानंतर तिथल्याच काही प्रतिक्रिया उडवल्या गेल्या आणि नंतर मी त्या पानावर गेलो
नाही. तसेही मी मायबोलीवर येतो तेव्हा, फारतर पहिलेच पान बघतो. त्यामूळे कुणी मी
लिहिलेल्या पाककृतीवर नंतर कुणी प्रतिसाद दिला असेल, तर माझ्या नजरेत तो येत नाही.

----

आता परत एका रुपकाचा आधार घेतो. रवांडा देशात जो नरसंहार झाला त्यावर ३ चित्रपट आले.
त्यापैकी हॉटेल रवांडा अनेक जणांनी बघितला असेल. त्यात मुख्य कलाकार अमेरिकन होते.
तो चित्रपट अंगावर येतोच पण याच काळावर आधारीत समटाईम्स इन एप्रिल आणि किनयारवांडा
हे दोन चित्रपट आले होते. त्यात स्थानिक कलाकारच होते. ते चित्रपट अगदी थेट चित्रण दाखवतात.

त्या देशातले दोन गट, एकमेकांच्या विरुद्ध ऊभे रहायला काय कारण झाले होते. तोपर्यंत ते एकत्रच
रहात होते, त्यांचे आपापसात विवाहही होत होते, पण त्यांच्यात एक कृत्रिम रेषा आखण्यात आली..
अत्यंत अनैसर्गिक अशी.

आणि पुढे जे झाले ते झालेच.
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्या संकेतस्थळाशी गेली १५ वर्षे बांधलो गेलो होतो, आणि जिथे अनेक मित्र मैत्रिणी ( हो मैत्रिणी )
लाभले, त्यांच्याशी ऋणानुबंध जूळले, तिचा निरोप घेताना कटूता नाही.
एक जूनी मायबोलीकर म्हणाली, इतकी वर्षे सहन का केले ? खरंच, का केले ?
वर साधना म्हणतेय, कि माझ्या लेखनावर मालकी मायबोलीचीही होती, त्याच न्यायाने जे,
इथे भले बुरे लिहिले गेले, त्याचीही मालकी मायबोलीचीच आहे.

मला पाककलेतले फार काही येते असा माझा समज अजिबात नाही, तरीही माझी कुठलीही
पाककृती हवी असेल, याच किंवा इतर कुठल्याही बाबतीत माझी मदत हवी असेल,
तर मी सदैव उपलब्ध असेन.
मी इथले लेखन थांबवल्याने मायबोलीला काही फरक पडेल, या भ्रमात मी
नाही. सकस आणि दर्जेदार लेखन इथे होतच राहिल. पण अगदी कालच्या
तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ?

या लेखात मी कुणाचेही ( म्हणजे घेऊ नये त्यांचे ) नाव घेतलेले नाही. तरीही हा लेख इथे
राहणे, अनेकांना अडचणीचे वाटेल. हे माझ्यातर्फे सत्यकथन आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राया, तुम्ही वर स्वातीच्या पोस्टमधला भाग कॉपी पेस्ट केला आहात. त्यात लिहिलेलं समजून न घेता त्यात बोललं गेलेलं टीपापा पब्लिकने म्हटलंय किंवा स्वातीने म्हटलंय हे पुन्हा म्हणताय. मूळ लेख पुन्हा वाचा, त्यानंतर मैत्रेयी आणि मग स्वाती आंबोळेचा प्रतिसाद वाचा. होपफुली त्यानंतर तुम्हांला लक्षात येईल.
येऊन काय ते क्लियर करणं ही लेख लिहिणार्‍याची जबाबदारी असते असं नाही का वाटत?

हो मलाहि वाटले होते. पण ते क्लिअर झालेले नाही. पण वर दिलेल्या काही जुन्या लिंक्समध्येही तेच तेच्/तिच तिच नावे येत आहेत. हह यांच्या धाग्यावर विदुषी म्हणुन एकच नाव आहे.>>> हो, बरोबर. सगळा न्यायनिवाडा अगदी व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. Lol

>>पण वर दिलेल्या काही जुन्या लिंक्समध्येही तेच तेच्/तिच तिच नावे येत आहेत. <<

आता जाउद्या हो, "अँड दे लिव्ह्ड हॅपीली देराफ्टर" हा नाटकातला शेवटचा प्रवेश चालु असताना मध्येच तुम्ही "शांतता कोर्ट चालू आहे" चा दुसरा अंक का सुरु करताय?..

अरे बाफ काय तुम्ही पब्लिक बोलाताय काय Proud

आता जाउद्या हो, "अँड दे लिव्ह्ड हॅपीली देराफ्टर" हा शेवटचा अंक चालु असताना मध्येच तुम्ही "शांतता कोर्ट चालू आहे" चा दुसरा अंक का सुरु करताय?..
>>>
Lol

फा आणि त्याला अनुमोदन देणार्‍या सर्वांनींच नावं लिहायला का सुरूवात करत नाही? अदर्स विल फॉलो! >>>> आर यु सिरियस?
आणि ह्या मागणीला नेमकं काय म्हणता येइल?

I thought we were all joking now??
Everyone keeps saying "नावं लिहा"; कोणीतरी चॅम्पियन नको? Happy

बर बर. Happy जरा जपून हो. जोक आहे ह्याचा थोडा अंदाज आला म्हणजे बरं. Proud

ज्या तुफानी वेगाने हा धागा कोतबो वरून सकाबो (सगळ्यांनाच काहीना काही (काहीच्या काही) बोलायचे) आहे वर सरकलाय ते पाहून स्तिमीत का काय ते झालो आहे.

>> जरा जपून हो. जोक आहे ह्याचा थोडा अंदाज आला म्हणजे बरं
अहो जपून का म्हणे? कर नाही त्याला डर कशाची, हर हर महादेव! गॉड ब्लेस दीझ युनायटेड स्टेट्स ऑफ मायबोली!!! Wink

>>>>येऊन काय ते क्लियर करणं ही लेख लिहिणार्‍याची जबाबदारी असते असं नाही का वाटत?----

हो पटतंय. आणि दुसर्‍या बाजुकडुनही हीच अपेक्षा आहे. हह यांनी विदुषींचे नाव जाहीर केले आणि वरील काही प्रतिसादांतही ते आहे म्हणुन. एक बाजु काहीच लिहीत नाहीए म्हणुन दुसर्‍याने त्याचा उपयोग आपले पारडे जड करायला वापरु नये एवढेच. माझ्यासारखे कित्येक वाचक नुसतेच वाचत असतिल पण लिहिणार नाहीत कारण आता सगळ्या गोष्टी खोटे खोटे आनंदोत्सव करुन झाकल्या जात आहेत. असो.

>>> दुसर्‍या बाजुकडुनही हीच अपेक्षा आहे.
आम्हाला माहितीच नसलेल्या घटनांमध्ये इन्व्हॉल्व असलेल्यांची नावं आम्ही लिहू म्हणताय? चांगली आयडिया आहे. मला आवडली.

इथे अजून मियां-बीबी राजी नाही झालेत, पण बारातीच 'कबूल है कबूल है' करत एकमेकांचे अभिनंदन करत आहेत असा सीन दिसत आहे.

कोण मियां ? कोण बीबी . कोणी राजी व्हायचे आहे ? जे झाले ते परत करण्याच्या मानसिकतेत कुणी असणार नाही. कुणी अंदाज चुकून जास्त कमी बोलले तरी इतर त्याला सपोर्ट करणार नाहीत. एखादे वेळी घडू शकते पण शिस्तबद्ध , थरवून हल्ले होणार नाहीत एवढी आशा आहे. दिनेश यांना आपण विनन्ती करू या त्यांनी मायबोलीस पूर्वीप्रमाणे जिव्हाळा द्यावा.

<<मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.>>
---- दिनेश, अशा प्रकारे टोकाचा निर्णय तुम्ही खुप विचार करुनच घेतला आहे म्हणुन तुमच्या निर्णयाचा आदर आहे. शुभेच्छा...

या निमीत्ताने जुने, जाणते लोक परतले आहेत हे कळाले, आनन्द झाला. पुन्हा स्वागत. Happy

या पाककृती दिनेश यांनी परत टाकाव्यात आणि त्यानी पूर्वीप्रमाणेच मायबोलीत सहभागी व्हावे अशी सर्वांतर्फे विनन्ती आहे...

3A, सामान्य माबोकर ज्यांना दिनेशदांचे लिखाण आवडत होते, त्यांनी दिनेश दांना परत यायची विनंती केलीच आहे,
आता माबो प्रशासनाने एकदा वैयक्तीक संपर्क साधून सल काढायचा प्रयत्न करावा, आणि त्या नंतरही त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला तर त्या निर्णयाचा आदर करावा , असे मी सुचवीन.

दिनेश दा, मला तुमचे लिखाण आवडायचे, आणि तुम्ही परत माबो वर लिहू लागलात तर मला खूप आनंद होईल.

पाच पानं वाचून झाल्यानंतर डोळे गपागप मिटू लागले आहेत. बाकीचे नंतर वाचले तर चालेल का ? हे वाचून झाल्यावर आपले काय मत बनले असा प्रतिसाद द्यावा लागतो का ? इथे कुठल्या तरी ग्रुपचा उल्ले आहे. तिथे सर्वांची खिल्ली उडवण्यात येते (कार्टून स्ट्रीप प्रमाणे). तर मला तिथे प्रवेश द्यावा. मी नियमित सर्वांची खिल्ली उडवीन अशी शपथ घ्यायला तयार आहे.

प्रवेश द्यायचा नसल्यास मला पण असा एक गुप्त बीबी काढून द्यावा. किंवा असे प्रत्येकाचे गुप्त बीबी असावेत. त्यातला एक जॉईन करीन सर्वात महत्वाचे म्हणजे इथल्या भांडणाचा बाहेर परिणाम होऊ देऊ नका. वेबवर माझे शैक्षणिक व्हिडीओज मोठ्या प्रमाणात आहेत. पूर्वीसारखाच त्यांचा आनंद घेत रहा.

आतापर्यंत जे प्रतिसाद वाचले त्यातलेगंमतीशीर लक्षात राहीले. एक एक मजा आहे
एकाने म्हटलेय की कुणी आमंत्रण दिले होते का ? आपल्याला नाही पटत तर नाही जायचे.
भाषा खूपच सरळ आहे ही. आणि युक्तीवाद गुळगुळीत.
एखाद्या बंद दाराआड आपल्याशी संबंधित चर्चा नसेल होत तरी लोक जातातच ना ? इथले मला माहीत नाही. पण फेसबुक वर क्लोज्ड ग्रुप्स मधे बाहेरच्या वाचकांना इशारे दिलेले असतात. म्हणजे हे पेज लोक वाचतात याची त्यांना कल्पना / अपेक्षा असते. जर अशा मर्यादीत पेजेस वर इतरांची टिंगल चालत असेल तर मग आपल्याबद्दल काय बोलतात हे जाणून घ्यायला लोक तिकडे जात असावेत.

आमंत्रणांचं म्हणाल तर हे एक उदाहरण. या बाईंनी कुणाला आमंत्रण दिलेलं नाही. पण बरीच जनता गोळा झाली आहे.
https://www.facebook.com/profile.php?id=100017178522101

"ह्यांच्या लेखात, लिहिण्यात एक पॅटर्न आहे. तो सतत रिपीट होतो. ज्यांना तो प्रत्येकठिकाणी दिसतो, त्यांना तो विनोदी वाटू शकतो, हे कोणी अमान्य करु नये. अनेकदा ते "आपल्याकडे पुर्वी गहू उगवत नसे", "कोकणात पुर्वी पुरणपोळी केली जात नसे", "व्हीटी स्टेशनच्या बाहेर एका सिग्नलवर एक भेळवाला बसतो, तिथे एक जॅकरांडाचे झाड आहे", " मागे मला अमुक एक सेलेब्रिटी भेटल्या होत्या, त्यांनी मला अमुक माहिती सांगितली" असे उल्लेख करत असतात, जे कुणीही पडताळून बघू शकत नाही. कारण एकतर त्यात स्पष्ट उल्लेख नसतात. उदा. "पुर्वी" म्हण़जे किती पुर्वी? तर हा पॅटर्न मला एकटीलाच दिसत होता असे नाही "

मजेशीर आहे. सर्वांच्याच लिखाणाचा पॅटर्न असतो. तो/ती आपल्या मर्जीत असेल तर जाणवत नाही. डोक्यात गेला की मग नावडतीचे मीठ अळणी या न्यायाने खुपायला सुरूवात होते याचं उदाहरण आहे हे.
आपल्याकडे पुर्वी गहू उगवत नसे", "कोकणात पुर्वी पुरणपोळी केली जात नसे >> यात पडताळून पाहता न येण्यासारखे काय आहे ? आपल्याला महाराष्ट्राच्या पीकसंस्कृतीत कसे बदल झाले हे कुठे वाचायचे एव्हढे माहीत असले तरी दावे खोडून काढता येतात. कोकणात गहू होत नव्हता तो नेमका काळ लक्षात ठेवून सहज प्रतिसाद दिले जातील का ? असे प्रतिसाद विशिष्ट विषयावरच्या धाग्यांवर येतील. घाटावर बाजरी, ज्वारी , मका होत असे. ऊस सुद्धा अलिकडचा. ही माहिती स्वतः पडताळून पाहता येण्यासारखी आहे. एखाद्याला अनुभवातून माहीत असलेल्या गोष्टींची त्याने लिंक द्यायची, कि आधी पुस्तक प्रकाशित करून मग त्याचा संदर्भ द्यायचा ?
पुस्तक प्रकाशित केले तरी मेघना पेठेंसारख्या चुका झाल्या तर ?
पूर्वी म्हणजे किती पूर्वी या प्रश्नाला काही एक अर्थ नाही. ही सर्व खुसपटे आहेत.

व्हीटी स्टेशनच्या बाहेर एका सिग्नलवर एक भेळवाला बसतो, तिथे एक जॅकरांडाचे झाड आहे >> जर तुम्ही व्हीटी स्टेशनच्या बाहेरच्या परिसराशी परिचित असाल तर हा दावा खोडून काढणे सहजच शक्य आहे. जर परिचित नसाल तर दावा करणा-याला दोष का देता ? त्यांनी पाहीले असेल ते झाड. प्रत्येक गोष्टीचे पुरावे द्यायला लागले तर कठीण होईल.
या साईटवर घरगुती काही लिहीले जात असेल तर माझा नवरा असे लिहील्याबरोबर संदर्भ, पुरावे देऊनच लिहावे लागेल.

ट्रिपल अ यांनी पद्यरचना दिली आहे. ती गझल असावी म्हणून बराच वेळ ते काय असते ना रदीफ, क्याफिये आणि क्याय क्याय ते पाहिले. पण ते काहीच नाही म्हणजे ती कविता असेल बहुतेक. ट्रिपल ए यांनी अधून मधून कविता पण लिहाव्यात. ही कविता छान जमली आहे त्यांना. ब-याच काळापासून ऐकण्यात असावी असे वाटण्यासारखी आहे.

सनई लहाने !! एक आठवड्याच्या वयात उत्कृष्ट देवनागरी लिहिल्याबद्दल तुम्हाला ज्ञानपीठ देण्यात येत आहे.

Pages