मी दिनेश विश्वनाथ शिंदे....

Submitted by दिनेश. on 10 May, 2017 - 08:25

मी दिनेश विश्वनाथ शिंदे....
मी ऑगस्ट २००१ पासून मायबोलीचा सभासद आहे ( माझ्या प्रोफाईल मधली तारीख चुकलेली आहे, कारण
जून्या मायबोलीवरून डेटा घेण्यात काहीतरी गल्लत झाली असावी. )
मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.
ही कैफियत नाही, आरोपपत्रही नाही. आहे ती निव्वळ माझी भुमिका.

१) पहिल्याप्रथम, भारतीय नागरिकांबद्दल अभिमान असणे वगैरे..

तामाम भारतींयाबद्दल केलेले एक खोडसाळ विधान हे कदाचित निमित्त झाले असेल, पण ज्या बाबींबद्दल मी
संवेदनशील आहे, त्यापैकि हि एक. पुर्वीदेखील असे प्रकरण झाले आहे.
त्यावेळी सगुणा या आय डी ने, मुलगा होण्यासाठी काय उपाय करावेत, असा बीबी उघडला होता. त्यावर इथल्या
काही जेष्ठ सभासदांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणाला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नव्हते.
त्यावेळी " बेटी बचाओ आंदोलन" वगैरे सुरु झालेही नव्हते पण गर्भनिदान चाचणीवर भारतात बंदी आली होती.
( भारताबाहेर अनेक देशांत नव्हती ) तरीही भारतीय भाषेत असलेल्या एका संकेतस्थळावर अशी चर्चा व्हावी,
हे मला अजिबात पटले नव्हते. त्यावर इथल्याच एका सभासदाने, फारसे सिरियसली घेऊ नकोस, ओल्ड वाईव्ज
टेल्स एवढेच याचे महत्व आहे. असे मला सांगितले होते. तरीही मी आग्रही राहिलो, आणि तो बीबी नंतर बंद करण्यात आला.
त्यामूळे एखाद्या तत्वासाठी माझा आग्रह आजचा नाही.

२) मेघना पेठे यांचे पुस्तक, नतिचरामी

या पुस्तकांची अत्यंत व्यापक प्रमाणावर जाहीरात करण्यात आली होती. भारतीय साहित्याचा
इतिहास बदलवणार वगैरे दावे करण्यात आले होते. हे पुस्तक मी वाचले. त्यापुर्वी या लेखिकेच्या
काही कथाही वाचल्या होत्या.
एकंदर पुस्तक वाचल्यावर मला ते अजिबात आवडले नव्हते आणि त्यब्बद्ल मी इथे लिहिले. आता सर्व संदर्भ
आठवत नाहीत, पण दोन उदाहरणे आठवताहेत ती लिहितो.

पुस्तकात असे विधान आहे कि मुंबईतील फोर्ट मधे पारश्यांची जी विहिर आहे, त्यात पारसी लोक प्रेते टाकतात.
हे विधान अत्यंत खोडसाळ आहे. ती विहीर आणि त्या विहीरीतले पाणी हे पारसी लोकांसाठी अत्यंत पवित्र आहे.
फोर्ट मधल्या अनेक इमारतीत पुर्वी पाणीपुरवठा होत नसे ( तशी सोयच नव्हती ) अनेक पारसी केवळ त्याच विहिरीचे
पाणी पित असत. आणि मी त्या काळात फोर्ट विभागात अनेक वेळा जात असे म्हणुन हे मला माहीत होते.
मुंबई विद्यापिठाच्या कुंपणालगत पण अशी विहीर होती ( अजूनही असेल ) आणि तिथूनही प्यायचे पाणी
पुरवले जात असे. ( कारण वरचेच, अनेक इमारतीत पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. ) आणि पारसी लोक,
त्यांचे मृतदेह, एका अत्यंत पवित्र भावनेने, टॉवर ऑफ सायलेंस मधे ठेवतात. त्यामूळे लेखिकेचे हे विधान अयोग्य होतेच.

त्याच पुस्तकात आणखी एक बेधडक विधान असे होते कि, फोर्ट मधे गुलाबाची फुले विकणारी मुले, ती फुले
थडग्यावरुन उचलून आणतात. हे पण एक खोडसाळ विधान होते. ( आजही के रुस्तम च्या बाहेर, ती मुले अत्यंत
निगुतीने फुले नीट करताना दिसतील )

आणि एकंदरच पुस्तकाबाबत बर्याच न पटणार्या गोष्टी होत्या, त्याबद्दलही मी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि
ती करताना, लेखिकेचाच " क्लायमॅक्स" हा शब्द वापरला. झालं, त्यावरून या सभासदांचा पापड मोडला.
म्हणजे त्यांच्या विरोधात मत नोंदवायचा इथे कुणाला अधिकारच नाही जणू. त्यापुर्वी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि परीचित
असलेल्या एका कवियत्रीने पण माझ्याशी अबोला धरला होता. पण पुढे माझ्या चुलतभावाच्या अपघातानंतर
स्वतःहून सांत्वनाचा प्रतिसाद दिला. सध्या ती मायबोलीवर दिसत नाही. या संपूर्ण ग्रूप माझ्या विरोधात
जायचे कारण हे. त्यापुढे लेखिकेची काही पुस्तके प्रसिद्ध झाली का, किंवा काय इतिहास घडवला ते मला माहीत
नाही. पण इथे मात्र इतिहास घडला.

३) पित्त, गुरुवर्य डॉ. शरदीनी डहाणूकर आणि मी

डॉ. डहाणूकर माझ्या लेखनातील गुरु. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायला हवेत. २५ वर्षे अलोपथीची
प्रॅक्टीस करून त्या आयुर्वेदाकडे वळल्या होत्या. पण त्यांना इतर अनेक विषयात रस होता आणि
त्या विषयांवर, खास करुन झाडांवर त्या महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहित होत्या. त्यासोबत आमच्या
कॉलनीत राहणारी मृदुला नाडगौडा हिने काढलेले सुंदर फोटोही असत. त्यांचा मी चाहता होतो आणि आहेही.

१९९६ - १९९८ या काळात मी नायजेरियात होता. तिथेही मी त्यांचे लेख वाचतच असे ( तेव्हा इंटरनेट नव्हते,
मी वर्तमानपत्रे कुरियर ने मागवायचो ) तिथे असताना मला यलांग यलांग ( हे नाव तेव्हा माहीत नव्हते )
या झाडाची ओळख झाली. त्यांच्या कुठल्या लेखात या झाडाचा उल्लेख नव्हता ( हे झाड भारतात मी
त्यापुर्वी बघितले नव्हते. ) म्हणून कौतूकाने मी त्यांना त्या झाडाचा फोटो आणि एक पत्र पाठवले. पत्रात
अर्थात त्यांच्याच काही लेखांचा उल्लेख होता. त्या उत्तर देतील, अशी अपेक्षाही नव्हती, पण त्यांनी तत्परतेने
उत्तर पाठवले, माझ्या चार ओळींचे खुप कौतूक केले आणि चक्क भेटायला बोलावले.

पुढच्या भारतभेटीत मी त्यांना भेटलो. तो पर्यंत त्यांनी झाडांवरचे लेखन थांबवले होते आणि पाककलेवरच्या
लेखनाकडे वळल्या होत्या. मी तिच तक्रार केली तर त्या म्हणाल्या, कि आता तू लिहायला सुरवात कर.
मी माझा एक लेख, लोकसत्ता कडे पाठवला, पण तो प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते.

झाडांबद्दल, पुढे प्रा. महाजन, प्रा. घाणेकर वगैरेनेंही विपुल लेखन केलेय, पण तरीही डॉ. डहाणुकरांची
मिश्किल शैली, एकमेव अशीच आहे. त्यांचे बोलणेही असेच मिश्किल होते. सहज बोलता बोलता त्यांनी
मला विचारले कि तू पित्त प्रकृतीचा का ? मला तेव्हा ते नीट कळले नाही, पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल
त्यांचे काही आडाखे सांगितले ( उदा. मला उपवास सोसत नाहीत वगैरे ) आणि ते खरे होते.

पुढे एका लेखाच्या निमित्ताने मी ते आडाखे इथे लिहिले. ते सत्य असल्याने, पित्त प्रकृतीची माणसे ते
सहज स्वीकारणार नव्हतीच. झालं, त्यावरून पण इथे वादळ. एका विदुषीने तर थेट असा आरोप केला,
कि माझा कुणाबद्दल तरी आकस असणार म्हणून मी असे लिहिले. ( आणि त्यांची प्रकृती कुठली, हे मला
माहीत असायचे काही कारणच नव्हते. ) काय काय लिहिले गेले इथे माझ्याबद्दल.

पुढे, डॉ डहाणूकरांच्या " स्वास्थ्यवृत्त " या पुस्तकातील पानांचे स्कॅन इथे दिले. मी केलेली बहुतेक विधाने
त्या पुस्तकातीलच होती. त्या लेखाला मी, " हा सूर्य आणि हा जयद्रथ" असे नाव दिले होते. एवढा सबळ
पुरावा, या लोकांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पुढे मग गंमतच झाली, तो लेखच इथून गायब करण्यात
आला. त्यानंतर तो गूगलवर दिसत होता, पण इथे दिसत नव्हता. हे त्यांचे कर्म, त्यांनाच जाचत राहिले.
मग त्यांच्याच एका गटग च्या चर्चेत, गटग ला जयद्रथ येणार आहे का ? अशी चर्चा झाली होती. आहे कि नाही मज्जा ?

४) वर्षा विहार आणि मी

मायबोलीचे वर्षा विहार सुरु होण्यापुर्वी मी स्वतः एक वर्षा विहार आयोजित केला होता. क्षिप्रा, सोनचाफा,
बॉम्बे व्हायकिंग वगैरे काही मोजके मायबोलीकर त्याला हजर होते. त्यानंतर सिंहगडावर एक सहल गेली होती,
त्यातही मी सहभागी होतो, तो जरी पहिला वर्षाविहार मानण्यात आला असला तरी त्याला मायबोलीचे नाव नव्हते,
ती प्रथा नंतर सुरु झाली.

तोपर्यंत मायबोलीवर अत्यंत मोकळे वातावरण होते आणि त्याला अनुसरून मी माझ्या एका नव्या मैत्रीची कबूली
दिली होती. ती पुढे मायबोलीवर आली, पण आमच्या मैत्रीबद्दल इथे एवढ्या घॄणास्पद चर्चा झाल्या, कि तिने
मायबोली सोडली, ती कायमची. ती आजही माझी अत्यंत जिवलग मैत्रिण आहे.

त्यानंतर मायबोली वर्षाविहार सुरु झाले. त्यावेळी आयोजकांची चर्चा इथे न होता, याहू ग्रूप वर(सुद्धा) व्हायची. तर
इथल्या साळसूद चर्चेत मी भागही घेत असे. पण तिथे माझ्याशी गोड गोड बोलणारे सदस्य माझ्या माघारी
माझ्या पुरुषार्थाची चवीने चर्चा करत होते. म्हणजे सगुणा फार्म मधल्या म्हशीवर दिनेश बसला म्हणायचा कि
बसलं म्हणायचं अशी. आहे कि नाही मज्जा ? म्हणजे ज्या गोष्टीची चिंता माझ्या बायकोने करायची, त्या ह्या सर्व
जणी करत होत्या. ही सर्व चर्चा मला, तिथल्याच एका सदस्याने पाठवली होती. मी प्रतिक्रिया दिली नाही,
पण त्यानंतर कुठल्याही व वि ला हजेरी लावली नाही.

या पातळीवरची चर्चा करण्यासाठी त्यांना एक क्लोज्ड ग्रुप हवा असतो. आणि तो इथे उपलब्ध करुन दिला
जातो. आनंद आहे.

५) मैत्री आणि यांची मते

स्त्री पुरुष मैत्रीबद्दल विद्वत्तापुर्ण आव आणून चर्चा करणार्या इथल्या सभासदांची मानसिकता सांगणारा, एक किस्सा.
मायबोलीवरच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने, एक जूनी सभासद परत इथे आली. तिचे स्वागत करताना मी
"जूनी मैत्रिण" असे शब्द वापरले. हे शब्द माझ्या वैयक्तीक आयुष्यात तर अनेक स्त्रिया आणि मुलींबद्दल
वापरेन.
तर या दोन शब्दांवरुन, इथल्या सभासदांनी तिला जीव नकोसा केला. तिची मानसिक अवस्था काय केली असेल
याची मला तर कल्पना आहेच पण आणखी एका सभासदाला आहे.
पुढे याच सभासदाने, या ग्रुपचे वकीलपत्र घेतले. हि बाब तर आणखी नवलाची.

६) मी आणि माझ्या कथा

मायबोलीवर मी सुरवातीला अनेक कथा लिहीत असे. त्या काळात त्या खुप लोकप्रिय पण झाल्या
होत्या. गिरीराज सारखे माझे मित्र तर मला केवळ माझ्या कथांमुळे लाभले होते. तो आजही
माझा मित्र आहे पण मी आता कथा लिहित नसल्याने, तो मायबोलीवर फिरकत नाही.

मी आजही इथल्या कथा ( क्रमशः नसतील तर ) वाचतो. काही अपवाद वगळले तर मला त्या एका
ठराविक वर्तुळात फिरताहेत असे वाटते. एका कथेत तर हुंडा वगैरे पण उल्लेख होता. शक्यतो,
नकारात्मक प्रतिसाद द्यायचा नाही, हा माझा विचार असल्याने, मी तिथे काहीच लिहिले नव्हते.

चौदा वर्षांपेक्षा जास्त वर्षे मी आफ्रिकेत घालवली. इथले माझे सहकारी माझे जिवलग मित्र आहेत.
एकदा आपला मानल्यावर ते माझ्यावर खुप विश्वास ठेवतात आणि आपले प्रश्न आणि अनुभव
अत्यंत मोकळेपणानी माझ्याशी शेअर करतात. ठराविक भारतीय संकल्पनाना छेद देणारे
आयुष्य हे लोक जगतात. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) या विषयावर आफ्रिकन देशात नाटकेही सादर होत असतात.
पण इथले वातावरण बघता ( ज्या प्रयोगात जेन फोंडा आणि व्हुपी गोल्डबर्ग सारख्या अभिनेत्री
सहभागी होतात ) त्या नाटकांच्या नावाचाही उल्लेख इथे करावासा वाटत नाही. त्या कथेवर
माझ्यातर्फे एका दुसर्याच सभासदांने या विदुषींना उत्तरे दिली होती, पण मी मात्र ना त्या बीबी कडे
परतलो ना कधी परत कथा लिहिली. इथले वातावरण प्रगल्भ व्हायला, माझी हयात पुरणार नाही
एवढे नक्की.. ( रच्याकने, एका चित्रपटासंदर्भात मी प्रगल्भ हा शब्द वापरला, तर तो देखील यांच्यासाठी
विनोदी ठरला. )

७) माझे ललित लेख.

पुर्वी मी भरपूर ललित लेखन करत असे. तेव्हा फोटो वगैरे द्यायची सोय नव्हती. आता मी ते देखील
बरेच कमी केले आहे, कारण तेच.
एक उदाहरण सांगतो. माझ्या नायजेरियातील वास्तव्याबद्दल मी लिहिले होते, त्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या
लेखाचा फोकस होता, माझे मित्र. त्यानंतर अलिकडे मी माझ्या वेगवेगळ्या देशांतील घरांवर एक मालिका
लिहिली.
आता मूळ घटना अशी. माझ्या फ्रेंच मित्राने त्याच्या आफ्रिकन मैत्रीणीसाठी मला भारतातून साडी आणायला
सांगितली. ती मी नेली. तिथे नेल्यावर त्याने मला सांगितले कि तूच तिला नेसव, ते मला अवघड वाटल्याने
मी स्वतः साडी नेसून दाखवली. आता त्यात वावगे ते काय ?
आणि झाले एवढेच कि माझ्या दुसर्या लेखात, मी स्वतः साडी नेसल्याचा उल्लेख केला नाही. त्यात लाजण्या
सारखे काही नव्हते आणि मुद्दाम मिरवण्यासारखेही काही नव्हते. लेखाच्या अनुषंगाने जे रेलेव्हंट वाटले,
तेवढा उल्लेख मी केला. झालं, विदुषी खवळल्या. चक्क दहा वर्षापुर्वीच्या एका लेखाची लिंक घेऊन
हजर झाल्या ( आता त्यापुर्वी तिथे किती चविष्ठ चर्चा केली असेल, त्याची कल्पना करा. ) अरे बाबा, नाही
ना पटत आपलं. मग दूर रहा कि. मी काही कुठे रिक्षा घेऊन जात नाही, माझे लेख वाचा म्हणुन. कि प्रतिसाद
द्या अशी याचनाही करायला जात नाही.
बरं, आता या विदुषीबाईंची आणखी एक मजा. एका विषयाच्या लेखात मी माझी बाजू मांडताना एक
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या एका उतार्याचा संदर्भ दिला, तर तोच या बाईंना आठवेना.
मग मी त्या पुस्तकाचा स्कॅन दिला.. असो नंतर काय झाले, ते बघायला मी आलो नाही. तात्पर्य काय कि,
कधीकाळी मी लिहिलेल्या लेखातला संदर्भ यांना आठवतो. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला नाही.

असो, मी नंतर ललित लेखनही थांबवले.

८) युक्ती सुचवा आणि युक्ती सांगा

या बीबीवर स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर त्यावर सल्ले दिले जातात. गेली
अनेक वर्षे मी पाककलेत प्रयोग करत असल्याने भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि
त्यानुसार मी सल्ले देत असे.

तर त्यावरुन यांच्या ग्रुपवर माझा उल्लेख "वहिनोदा" असा करण्यात आला, आणि तो
उल्लेख त्यांच्याच पैकी एकीने मला सांगितला. मी उद्वैगाने तक्रार केली, पण त्याबद्दल
काहिही करण्यात आले नाही.

त्या उल्लेखात सहभागी असणार्या एका सभासदाने मात्र, मुद्दाम फोन करुन, दा, लहान
समजून मला माफ करा, असे सांगितले. पुढे आमच्यात काही कटूता राहिली नाही. पण
आता तिच सभासद इथे काही लिहित नाही. कारणांचा उल्लेखही तिला करावासा
वाटत नाही.

त्यानंतर मी फारश्या युक्त्या सांगायला तिथे गेलो नाही. धाकटी बहिण असणार्या एका
सभासदाने काही विचारले, तर सांगितले असेन, तेवढेच.
"भाकरीचे पिठ भिजवून फ्रीजमधे ठेवा आणि भाकरी करण्याआधी मळून घ्या" असे सल्ले
तिथे दिले गेले. तेवढे पाककौशल्य माझ्याकडे नाही. सो, माझा पास !!

९) रविवार सकाळ आणि ते

माझ्याबद्दलच्या विकृत पातळीवरच्या चर्चा मायबोलीवरच्या सो कॉल्ड क्लोज्ड ग्रुप पुरत्याच
मर्यादीत राहिल्या नाहीत. रविवार सकाळ मधल्या एका लेखावर, दिनेशदा असे नाव घेऊन,
माझे आणि माझ्या आफ्रिकन हाऊसमेड चे सबंध आहेत, असे सुचवणारा एक प्रतिसाद दिला
गेला. मी काही तो पेपर वाचत नाही, पण माझ्याच एका चाहत्याने, त्या बातमीची लिंक
मला पाठवली होती.

मीसुद्धा पाठपुरावा करण्याचे ठरवले. सायबर सेल कडे तक्रार केली. त्या बातमीची लिंक
आणि मी लिहिलेल्या इ मेल ची कॉपी मी इथे दिली होती. ती व्यक्ती कोण असेल, याचा
साधारण अंदाज होताच आणि त्यावर नंतर शिक्कामोर्तबही झाले. त्या व्यक्तीबद्दल कुठलिही
कार्यवाही करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी ती तक्रार मागे घेतली.

तर यावरुन इथल्या एक विदुषी ( अरे यार, सगळ्याच विदुषी आहेत, आणि त्यांना क्रमांक
देण्यातही अर्थ नाही ) माझ्यावर खार खाऊन आहेत, का तर ती व्यक्ती कोण, हे मी उघड
केले नाही. याच विदुषी मी कधी काळी इथे केलेल्या माझ्या गौरवर्णाच्या उल्लेखावर नाराज
आहेत. आता तो कधी आणि कुठल्या संदर्भात केला होता, ते आठवतही नाही.
( पण चुकीचा नाहीच... आणि त्या बाई हा वारसा अगदी निष्ठेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
विडंबनातील गोरेपणाचा संदर्भ आहे तो हा. फारेण्ड यांनी लिहिले आहे, कि असे संदर्भ नवीन
लोकांना माहीत नसतात. पण माझ्या बाबतीत मात्र सर्व संदर्भ असे पुढच्या पिढीपर्यंत
पोहोचवले जातात. )

त्यानंतर मी इथले दिनेशदा हे नाव टाकले ( हे नावाचे बारसे पण इथल्याच एका विदुषीबाईनी
केले होते. )

१०) मी इतरांवर केलेली टिका

एका सभासदाने, मी पण इतरांवर टिका करतो आणि ती त्यांनी वाचली आहे, असे लिहिले आहे.
मी ती सार्वजनिक ठिकाणी केली होती, आणि अर्थातच फार पातळी सोडून केली नव्हती.
आणि ती सातत्याने तर नक्कीच नाही.

त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
दुसरे : प्रा. देवपूरकर. ते गृहस्थ एकाकी आणि आजारी असतात, असे मला कळले होते. त्यांची
विचारपूस देखील मी केली होती. त्यांच्या एका गझलेवर टिका केली होती, तर त्यांनी मला
गझलेतलं काय कळतं, असे विचारले होते ? नंतर मी कधीच त्यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला
नाही. पण त्यांचे भरमसाठ लेखन सुरुच होते. नंतरही मी इतरत्र टिका केली होती, त्यावर
इथल्या एका विदुषींनी मला ओसीडी झाला आहे, असे थेट विधान केले होते ( थेट विधान, लक्षात
घ्या. ) त्याचा पुरावा देऊन मी तक्रार केली होती.. पण त्यांच्यावर देखील काहिही कार्यवाही झाली
नाही.
आणि राहिला बी ! अगदी पहिल्या वहिल्या दिवसांपासून तो माझा मित्र होता. आताच नाही तर
पुर्वीदेखील तो अनेक नावाने खोडसाळ लिहित असे. मी त्याला आव्हान केले होते आणि त्याने
स्वतःहून त्याची कबूली दिली होती. मला प्रत्यक्ष फोन करून त्याने माफी मागितली होती.
त्याच दिवसात डॉ. डहाणुकरांचे पत्र इथे अपलोड करायलाही त्यानेच मदत केली होती.

वैयक्तीक आयूष्यातले प्रॉब्लेम्स आणि एकटेपणा यांनी तो गांजला होता. त्याच्या इथल्या शेवटच्या
दिवसातही मी त्याच्या बाजूने ठाम राहिलो. आजही आम्ही फेसबूक वर मित्र आहोत. मायबोली
सोडून तो सुखी आहे. अत्यंत सुंदर असे फोटो, तिथे पोस्ट करत असतो तो.
आपल्याच घरातलं एखादं माणूस जर कुठल्या समस्येने ग्रासलेले असल, तर आपण
त्याला आणखी त्रास देतो का ? तो आणि मी ज्या काळात इथे सभासद झालो होतो,
तो काळ असाच जिव्हाळ्याचा होता. त्याला होणारा त्रास त्याच्याच शब्दात सांगायचे
तर बलात्काराइतकाच क्लेशदायी होता. त्याने जरूर इतरांचा अपमान केला असेल,
पण आपण मन मोठे केले नाही, हे देखील आहेच.
गेलेल्या लोकांबद्दल वाईट लिहायचे नाही, असा एक संकेत आहे. पण सत्य लिहायला हरकत
नसावी.

नताशा यांची आणि माझी ओळख असायचे काही कारणच नाही. माझ्या लेखनात काही
शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. त्याबद्दल त्यांनी एकदा नापसंती व्यक्त केली होती
आणि मी त्यांची माफी मागितली होती.
त्याच्या रहमानीया या लेखावर प्रतिक्रिया देताना, मी त्याचे संगीत मला आवडत नाही,
असे लिहिले होते. मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १ मुद्दा लता मंगेशकर यांचे मत होते.
माझ्या धोरणाप्रमाणे मी नंतर कधीच त्याच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली नाही.

पण नंतर माझ्या एका लेखात, एक संदर्भ मला सापडला नव्हता तो त्यांनी शोधून दिला होता
आणि दुसर्या एक लेखात, चित्रपट संगीतातील प्रादेशिकता, यावर आमचे मतभेद झाले होते.
ते सुद्धा थेट नव्हेच, दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली होती.

त्यानंतर त्या माझा उल्लेख, जुनी खोडं असा करु लागल्या होत्या. मुद्दाम सविस्तर लिहिले
कारण, या एवढ्याश्या मतभेदाला नंतर कुठे खतपाणी घातले गेले, त्याची कल्पना येईलच.

आणि आता राहिल्या त्या माझ्या पाककृती.

आधी लिहिल्याप्रमाणे पाककृती लिहिणे हि माझ्यासाठी पॅशन होती. ( आहे आणि राहीलच )
पण त्याही कुणाच्या कुचेष्टेचा विषय का व्हाव्यात ? विडंबन हा साहित्यप्रकार मलाही आवडतो,
पण त्यातही एक आब राखलेला असतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणत मी कधी लक्ष दिले नाही,
पण जे समोर आले ते अत्यंत क्लेशकारक होते, शिवाय हे इथे सातत्याने होत होते ( आणि
ते होऊ दिले जात होते ) ते तर त्याहूनही क्लेशकारक आहे.

आणि याबाबतीतही काही लिहून मोकळे झालेच पाहिजे. मी रुढ अर्थाने भाविक नाही. पण
संतसाहित्य माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केनयातील वास्तव्यात मला तिथे अनेक भाज्या
सहजी उपलब्ध व्हायच्या. त्यातल्या अनेक भाज्या, भारतात ( निदान त्या काळात तरी ) सहज
मिळत नव्हत्या.

म्हणुन त्या भाज्यांची ओळख व्हावी म्हणुन मी अवघी विठाई माझी, हि मालिका सुरु केली.
प्रत्येक भाजी स्वतः शिजवून, तिची माहिती आणि फोटो असे त्या मालिकेचे स्वरुप होते.
तर विठाई हा शब्द सुद्धा कुचेष्टेचा विषय व्हावा ? आपला अपमान आपण सहनही करतो, पण
आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान, सहन करु ? डॉ. डहाणुकरांचाही असाच उपमर्द इथल्या
विदुषींनी केला होता.

याच मालिकेत, मी लीक या भाजीबद्दल लिहिले होते. स्पेलिंगवरुन देवनागरीत लिहायचे
झाले तर त्या भाजीचे नाव असेच लिहावे लागणार. आता मी ते नाव असेच का लिहिले असा
एक निरोप घेऊन एक विद्वान आले होते.. निरोप अश्यासाठी लिहितोय कारण, काल आमची
तिथे चर्चा झाली.. वगैरे सुरवात होती. या शब्दावरून त्यांना नेमके काय आठवले ते त्यांनाच
माहीत.

पाककृती मला काही अधिकार आहे असे मी अजिबात मानत नाही. उलट या क्षेत्रात लाजो माझी
गुरु आहे, असे मी जाहीररित्या मान्य केले होते. इथेही ज्या ज्या सूचना चांगल्या मनाने केल्या
जातात त्यांचे मी स्वागत करतोच आणि गरज वाटल्यास मी बदलही करतो. त्यात लाजिरवाणे ते
काय ? पण अर्धवट ज्ञानावर जर काही प्रतिक्रिया आल्या, आणि त्या सुद्धा काही विशिष्ठ आयडी कडून
तर मी काय म्हणून सहन कराव्यात ? वाटीभर काजू घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळ घालून केलेल्या
पदार्थाला, खांडवी म्हणालेले मी सहन करायचे ?

आता मला मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देणात येणार हे नक्की, मी जी प्रतिक्रिया दिली होती
त्यात एक म्हण वापरली होती पण त्यातलाही मला ग्राम्य वाटलेला शब्द वगळला होता.
एका संताच्या अभंगाचा दाखला दिला होता, तर त्यातला एकच शब्द उधृत केला गेला होता.
असो त्यानंतर तिथल्याच काही प्रतिक्रिया उडवल्या गेल्या आणि नंतर मी त्या पानावर गेलो
नाही. तसेही मी मायबोलीवर येतो तेव्हा, फारतर पहिलेच पान बघतो. त्यामूळे कुणी मी
लिहिलेल्या पाककृतीवर नंतर कुणी प्रतिसाद दिला असेल, तर माझ्या नजरेत तो येत नाही.

----

आता परत एका रुपकाचा आधार घेतो. रवांडा देशात जो नरसंहार झाला त्यावर ३ चित्रपट आले.
त्यापैकी हॉटेल रवांडा अनेक जणांनी बघितला असेल. त्यात मुख्य कलाकार अमेरिकन होते.
तो चित्रपट अंगावर येतोच पण याच काळावर आधारीत समटाईम्स इन एप्रिल आणि किनयारवांडा
हे दोन चित्रपट आले होते. त्यात स्थानिक कलाकारच होते. ते चित्रपट अगदी थेट चित्रण दाखवतात.

त्या देशातले दोन गट, एकमेकांच्या विरुद्ध ऊभे रहायला काय कारण झाले होते. तोपर्यंत ते एकत्रच
रहात होते, त्यांचे आपापसात विवाहही होत होते, पण त्यांच्यात एक कृत्रिम रेषा आखण्यात आली..
अत्यंत अनैसर्गिक अशी.

आणि पुढे जे झाले ते झालेच.
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्या संकेतस्थळाशी गेली १५ वर्षे बांधलो गेलो होतो, आणि जिथे अनेक मित्र मैत्रिणी ( हो मैत्रिणी )
लाभले, त्यांच्याशी ऋणानुबंध जूळले, तिचा निरोप घेताना कटूता नाही.
एक जूनी मायबोलीकर म्हणाली, इतकी वर्षे सहन का केले ? खरंच, का केले ?
वर साधना म्हणतेय, कि माझ्या लेखनावर मालकी मायबोलीचीही होती, त्याच न्यायाने जे,
इथे भले बुरे लिहिले गेले, त्याचीही मालकी मायबोलीचीच आहे.

मला पाककलेतले फार काही येते असा माझा समज अजिबात नाही, तरीही माझी कुठलीही
पाककृती हवी असेल, याच किंवा इतर कुठल्याही बाबतीत माझी मदत हवी असेल,
तर मी सदैव उपलब्ध असेन.
मी इथले लेखन थांबवल्याने मायबोलीला काही फरक पडेल, या भ्रमात मी
नाही. सकस आणि दर्जेदार लेखन इथे होतच राहिल. पण अगदी कालच्या
तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ?

या लेखात मी कुणाचेही ( म्हणजे घेऊ नये त्यांचे ) नाव घेतलेले नाही. तरीही हा लेख इथे
राहणे, अनेकांना अडचणीचे वाटेल. हे माझ्यातर्फे सत्यकथन आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळा लेख वाचला. बरेच काही झाले होते याची कल्पना नव्हती.
पण अगदी कालच्या तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ? >> माझ्या मते वेबमास्तरांनी स्वतःहून या प्रकरणात लक्ष घातले आहे आणि त्यानुसार संबंधितांना त्यांनी सुचना/वॉर्निंग इ. कठोर स्वरूपात दिली आहे.
म्हणून तुम्ही पहिल्यासारखे लिहायला सुरुवात करावी अशी विनंती करतो. बाकी आपली इच्छा.

हा हा हा ! दिनेशजी, मी जर या लोकांची नावे जाहीर केली तर मोठा स्फोट होईल. पण ते मी करत नाही किम्वा करणार नाही. कारण हिशेब करणारा ( मायबोलीचे माननीय अ‍ॅडमीन वा वेब मास्टर नव्हे) वरती बसला आहे हे माझे ठाम मत आहे. तुम्हाला तर हे बाहेरचे त्रास देत होते, मला तर अजूनही घरचे काही सदस्य लेकी बोले सुने लागे असे वागवत आहेत. पण त्यांना त्याची परतफेड देवाने केली आहे हे मी प्रत्यक्ष पाहीले, अनूभवले आहे. मग आधीच मेलेल्याला का मारावे या न्यायाने मी कायम गप्प रहाते.

नातिचरामी वरुन कुणाशी वाद झाला ते मला लक्षात आहे. तुम्हाला वहिनोदा कोण म्हणाले ते पण माहीत आहे. पण हे सगळे माहीत असणे हाच माझा नाईलाज आहे. कारण मला अन्याय, मग तो कोणावर का असेना, सहन होत नाही. लहानपणापासुन अमिताभचे पिक्चर पाहिल्याचा परीणाम असावा. तुमची भूमिका पटली, पण जाऊ द्या. हे लोक कोण आहेत हे ८५ टक्के मायबोलीकरांना माहीत आहे. मग त्या ८५ टक्कांसाठी तरी एखादा ब्लॉग उघडा आणी मोकळे आनंददायी जीवन पुढे चालू द्या. बी बद्दल कधीतरी लिहीन. पण बी साठी एकच वाक्य की टाळी एका हाताने वाजत नाही. बी चे जीवन काय आहे ते मला नंतर कळले पण त्याला तो स्वतः पण थोडा जबाबदार होता. व्यक्तीगत आयुष्यातला ताण माणुस सहन करु शकत नाही, कारण त्याला घर हेच एकमेव सहारा असते. पण घरातच आनंद नसेल तर माणुस फ्रस्ट्रेट होऊन त्याचा राग इतरांवर काढतो तसे बी चे झालेय. आम्ही त्याला समजून घेण्याचा, समजवायचा प्रयत्न केला पण तो कुठल्याच गैरसमजातुन कधीच बाहेर पडला नाही. उलट त्याचाच कोष तो विणत गेला.

असो तुम्हाला शुभेच्छा. काळजी घ्या.

मी फारच नविन असल्याने बाकी काही गोष्टी मला माहिती नाहीत. पण सुरवातीला तुमच्या पाककृती आणि बेफींच्या काही गोष्टी वाचूनच मायबोलीवर रूळलो होतो. मला स्वतःला स्वयंपाकाची आवड असल्याने तुम्ही करत असलेले वेगवेगळे प्रयोग नेहमीच आवडायचे. रश्मी म्हणती आहे तसा एखादा ब्लॉग उघडा. आम्ही नक्कीच तिथे चक्कर मारत राहू. तुमच्या पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा !

दिनेश.
तुमची वरची भूमिका वाचली. मी माबोची जुनी सदस्या असले तरी माझा वावर खूप अनियमित असतो त्यामुळे तुम्ही उल्लेखलेले बरेचसे वाद मी वाचलेले नाहीत किंवा मला त्या घडामोडींबद्दलची फारशी माहिती नाही. तुम्ही कोणाबाबत लिहिता आहात त्याचा अंदाज आलाय. तुमची उद्विग्नता समजू शकते. मला चूकबरोबर मधे पडायचंच नाहीये पण फक्त तुम्ही पाककृती मागे घेतल्याने नक्की काय अचीव झालं? तुम्ही वारंवार करत असणारा निषेध, तुमचा वैताग अधोरेखित झाला, सगळ्यांपर्यंत पोचला. मान्य. वरती लिहिलं आहे तसं वेमांनी उशीरा का होईना ठाम भूमिका घेतली आहे असे दिसते आहे. तेव्हा मला अजूनही वाटतं की एका कंपूसाठी म्हणून तुमच्या इतर वाचकांकडे दुर्लक्ष करायचं कारण नाही.

तुमच्या पाककृती आवर्जून वाचणारा इथे एक मोठा वाचक वर्ग आहे. मी सुगरण कॅटेगरीतली नसले आणि फारशी प्रयोग करत नसले तरी मीही तुमच्या पाकृ वाचत असे, कधीतरी प्रतिसादही देत असे. माझ्यासारखेही वाचक इथे नक्की असणार. आणि जसं इथे इतर माबोकरांनी लिहिलं आहे की तुमच्या पाकृ त्यांना खूप भरवशाच्या वाटतात तसंच तुमच्याही आयुष्यात माबोचं छोटं का होईना एक स्थान असणारच की. तेव्हा माझ्या मते एका मूठभर लोकांसाठी तुम्ही तुमच्या आनंदाच्या इंटरॅक्शन्स का थांबवत आहात? तुमच्या पाकृ टाका इथे परत Happy

तुमच्या पाककृती आवर्जून वाचणारा इथे एक मोठा वाचक वर्ग आहे. मी सुगरण कॅटेगरीतली नसले आणि फारशी प्रयोग करत नसले तरी मीही तुमच्या पाकृ वाचत असे, कधीतरी प्रतिसादही देत असे. माझ्यासारखेही वाचक इथे नक्की असणार. आणि जसं इथे इतर माबोकरांनी लिहिलं आहे की तुमच्या पाकृ त्यांना खूप भरवशाच्या वाटतात तसंच तुमच्याही आयुष्यात माबोचं छोटं का होईना एक स्थान असणारच की. तेव्हा माझ्या मते एका मूठभर लोकांसाठी तुम्ही तुमच्या आनंदाच्या इंटरॅक्शन्स का थांबवत आहात? तुमच्या पाकृ टाका इथे परत +१११११११११११

वॉव, ह्यातील अनेक गोष्टी मला माहिती नव्हत्या. उदा. ते सगुणा फार्म किस्से , वहिणोदा वगैरे जे टू मच आहेत. इट्स जस्ट सॅड !

फॉर द रेकॉर्ड - नतिचिरामी हे पुस्तक मलाही फार काही इतिहास घडवणारे वाटले नाही. Happy

आय गेस, मी मागच्या शुक्रवारी टिपापावरील माझ्या भांडणात एक वाक्य लिहिले होते, की तुम्ही कितीही गोळाबंद वाक्य लिहिले, तरी समोरच्याला जे वाचायचे, तेच तो वाचतो आणि मिसइंटरप्रिटही करू शकतो. आणि वाक्यातील एखाद दुसर्‍या शब्दामुळे काही लोकांचा सात्त्विक संताप खूप उफाळून येतो आणि भांडणं होतात. त्यामुळे तुमचे लेखही त्याला अपवाद नाहीत.

पण तुम्ही हे सर्व मांडायची गरज नव्हती असे मला वाटते. तसेच तुमचे लेख काढायचीही गरज नव्हती. ह्या लेखालाही काही जण "सहानुभूती टूर" असेही संबोधतील.

आपल्यावर टिका केल्यावर आणि नेहमी केल्यावर वाईट वाटणारच. सध्या जस्ट मुव्ह ऑन म्हणणे खूपच सोपे आहे, पण तरीही म्हणतो. मायबोली म्हणजेच विश्व नाही. पण जर मायबोली तुम्हाला खूपच जवळची अन पार्ट ऑफ लाईफ वाटत असेल तर तुम्ही नावं लिहायला हवी होती. म्हणजे जर दुसर्‍यांची काही बा़जू असेल तर ती समोर येईल आणि हा एकदाचा (कायमचा ? ) निचरा झालाच तर होईल.

एका कंपूसाठी म्हणून तुमच्या इतर वाचकांकडे दुर्लक्ष करायचं कारण नाही >>. अ‍ॅग्रीड. बाकी फॉर द रेकॉर्ड - टिपापावर देखील काही लोकांना तुमच्याबद्दलचे उल्लेख खटकतात. त्यामुळे तो विषय सुरू असला की रोमात राहतात. जिप्सी ने मागच्या बाफवर लिहिल्याप्रमाणे "काही मेंबर" तर इटस अप टू यु की त्या काहींनी तुम्हाला मान्यता देणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे का? माझ्यामते नाही.

तुम्ही पाककृती मागे घेतल्याने नक्की काय अचीव झालं? तुम्ही वारंवार करत असणारा निषेध, तुमचा वैताग अधोरेखित झाला, सगळ्यांपर्यंत पोचला. मान्य. वरती लिहिलं आहे तसं वेमांनी उशीरा का होईना ठाम भूमिका घेतली आहे असे दिसते आहे. तेव्हा मला अजूनही वाटतं की एका कंपूसाठी म्हणून तुमच्या इतर वाचकांकडे दुर्लक्ष करायचं कारण नाही. >>
वरदाच्या ह्या पॅराला पूर्ण अनुमोदन. तुमची ओळख (माझ्यासाठी तरी) नि माझ्या माहितीतल्या (माबो नि माबोबाहेरच्या ही) बर्‍याच जणांसाठी तुमच्या साध्या सोप्या पाककृती हि आहे. ती पुसू नका हि आग्रहाची विनंती.

वरदा, केदार, असामी ह्यांनां अनुमोदन.

तुम्हाला स्वतःला आणि मायबोली प्रशासनाला तुमच्या कुठल्याच लेखनाबद्दल जर आक्षेप नसेल तर तुम्ही इकडे ते चालू ठेवावं. Happy

अरे बापरे बरचं काही होऊन गेलेयं की , पण मला एक समजत नाही , इतक्या वर्षांपासुन या आभासी दुनियेत एक आयडी दुसर्या आयडीचा येवढा टोकाचा तिरस्कार का करत असतील , काय मिळतं असं करुन ? टिंगल टवाळी केली तरी त्याला मर्यादाही असावी लागतेच. आशा आहे की इथुन पुढे तरी इतक्या टोकाचा तिरस्कार मायबोलीवर होणार नाही.
असो , काळजी घ्या.

दिनेश जी (सगळे दा म्हणायचे म्हणुन मी पण म्हणत असे पण आता म्हणावे की नाही हे कळत नाहिये :()
लेख पुर्णपणे पटला. नविन असल्याने थोडेसेच कळले.
त्या साडीच्या प्रसंगात तुमच्या बद्द्ल आदर वाढला. कारण कोणाही सभ्य माणसाअने असेच केले असते. पण तो टवाळीचा विषय व्हावा?? खेदजनक आहे.
मी सुद्धा सुगरण वैगेरे नाहिये पण तुमच्या पा.कृ. मुळे मी काही काही करायला लागले. अदला बदली मधे भाग ही घेतला. सगळे श्रेय तुम्हालाच.
तुमच्या लेखनाची स्टाईल आजीच्या मायेची होती. आई रागवते चुकले की पण आजी समजवुन सांगते त्या अर्थाने.
नुसत्या पा.कृ. नाहीत त्या, त्यात शिकविण्याचा आनंद देणारा शिक्षक असायचा. फोटो पण एकसे एक.
त्या काकडीचा धाग्यावर तर माझी प्रतिक्रीया होती की..(जी मी दिली नाही. तुम्हाला अवडेल का? असे वाटले).तुम्हीं 'अमुल मास्टर शेफ़' मधे भाग घ्या नक्की पहिले येणार.
तुमची भुमिका पटली.
एखादा ब्लॉग/चॅनल सुरु करा तीथे यायला नक्की आवडेल.

. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) >>>>>>> तो धागा वाचला होता.तो धागा वगळता बाकी माहिती नव्हती.तरीही वरदा,केदार यांचे प्रतिसाद नक्कीच पटत आहेत.
तुमच्या पाककृती या निव्वळ पाककृती न रहाता कलाकृती आहेत.त्यावर काहीजण सोडून बाकीच्यांचा हक्क आहे,असे त्यांच्यातर्फे (बाकीचे) मी म्हणते.त्याहीपेक्षा धनिच्या धाग्यावर सोन्याबापू म्हणाले तसे आपण तयार केलेले खळे का मोडावे?

दिनेश, तुम्ही तुमचं लेखन मायबोलीवर पुन्हा पोस्ट करा अथवा नको पण खादा ब्लॉग प्लिज सुरु करा.

दिनेशदा, माझी तुमच्याशी ओळख मायबोलीवरच आणी मायबोलीपुरताच आहे. तुमचं लिखाण - पाककृती, प्रवासवर्णनं वाचायला नेहेमीच आवडतं.

तुम्हा जुन्या माबोकरांचा एकंदरीतच ईंटरनेट वर आणी प्रत्यक्ष आयुष्यातही संपर्क असल्यामुळे कदाचित, तुम्ही ईथे घडलेले प्रसंग (बाहेर घडलेल्या प्रसंगांची जोड असल्यामुळे) दुर्लक्षित करू शकत नाही असं जाणवलं. बाकीच्या लोकांचं माहीत नाही, पण मी स्वतःपुरतं तरी ईंटरनेट चा पडदा स्वतःच्या वैय्यक्तिक आयुष्यापासून ह्या 'ऑनलाईन आयुष्याला' वेगळं ठेवण्यासाठी वापरत आलोय. हे योग्य की अयोग्य हा वैय्यक्तिक निर्णय आहे. पण आमच्यासारख्या बहुसंख्य वाचकांसाठी तुम्ही लिहीत रहावं असं मलाही वाटतं. आमच्यासाठी तुमचं लिखाण लक्षात राहील. तुम्ही वर उद्धृत केलेले प्रसंग एक तर लक्षात रहाणार नाहीत किंवा लक्षात येणार ही नाहीत. पुन्हा एकदा लिहीते व्हा ही विनंती.

दिनेश्दादा,

तसा मी मा बो वर नविन आहे पण जेव्हा पासुन आपले लेख वाचले , ते वाचन्या साठि इथे यायचो,असो तुम्हिलिहिन्णे परत चालु ठेवा ही कळ्क्ळीची विनन्ति.
अनिरुद्ध

वरदाच्या पोस्टला संपूर्ण अनुमोदन. तुमच्या पाककृती, त्यातले फोटो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमची त्याबाबतीतली पॅशन खुप आवडते. तुम्ही लिहावत असं वाटतं.

दिनेशदा, तुम्ही लिहिलेले सर्व कथन वाचून वाईट वाटले. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्या आपण बदलू शकत नाही. तुम्ही इथे मन मोकळे केले आहे तर तुम्हालाही थोडे हलके वाटत असेल. आता ही ओझी पुन्हा मनावर घेऊ नका!
तुम्ही नावे लिहिली नाहीत पण त्या सगळ्या व्यक्तींची संख्या १५-२० च्या पलिकडे असणार नाही (असे मला वाटते). मायबोली वाचकांची संख्या काही लाखांत आहे. ज्यातील बऱ्याच सदस्यांना तुमच्या पाककृती हव्या आहेत. तेव्हा तुम्ही त्या इथे नाही तर इतरत्र कुठेही प्रकाशित जरूर करा.
मी तुमच्या पाकृ ने आयुष्यात पहिल्यांदाच रवा नारळाचे लाडू केले होते आणि ते अप्रतिम झाले होते! त्या धाग्यावर पण लिहीले होते की नाही ते आठवत नाहीये पण इथे तुम्हाला पोच द्यावीशी वाटली!

त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
>>>>>>>>>>>
माझ्या प्रचंड धागे काढण्यावरून, काहीच्या काही बाता मारण्यावरून असेल. फारसे आठवत नाही, ना त्यावरून मी तुमच्याबद्दल काही प्रतिकूल मत बनवले, म्हणजे काही विशेष नसेल. तरी या हिट लेखात माझे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद Happy

असो,
बरंच रामायण महाभारत घडलंय, ईतक्या वर्षांपासून घडतेय. बरं झाले सारे ईथे लिहिलेत, अन्यथा उगाच एखद्याला वाटले असते की तुम्ही पराचा कावळा करत आहात. काही टिका खरेच जहरी आणि आकसाने केलेली वाटते. वाहावत जातात लोकं सोशलसाईटवर...
बाकी तुम्हाला अजून प्रत्यक्ष ओळखत नाही पण एकंदरीत तुम्ही ईथे ईतरांना करत असलेली मदत दिसून येते. त्यामुळे या वरच्या लेखाला दुसरी बाजू असेल असे फारसे वाटत नाही.

एक मात्र आहे, मला ईथे टिकाकार मिळवण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागतो. तुमच्याकडे ईतके चांगले गुण आहेत की ते सहज मिळून जातात. यासाठी तुमचा नेहमीच हेवा वाटतो Happy

प्रत्यक्षात भेटायची ईच्छा असलेले मायबोलीकर - अशी लिस्ट काढल्यास कित्येकांच्या लिस्टमध्ये आपले नाव वर असेल. काही परस्थिती बदलत आपण पूर्वीसारखेच परत आलात तर ते मायबोलीसाठी चांगले होईल... ते वेगळे ब्लॉग काढून ईथले लिखाण थांबवायचा विचार मनात आणू नका प्लीज.. ते करू नका जे तुम्ही करावे असे तुम्हाला त्रास देणारयांना वाटते.

नमस्कार. मी नताशा.
काल सकाळी ऑफिसच्या घाईत जेव्हा मी दिनेश यांनी आपल्या रेसिपीज उडवल्याची बातमी वाचली, तेव्हा पहिला शब्द मी टाइप केला "Apologies". ह्या प्रकरणाला असं दुर्दैवी वळण लागावं अशी कुठलीही इच्छा नसल्यामुळे त्यानंतर मी स्वतःच अ‍ॅडमिन ना माझा आयडी डिलिट करायची विनंती केली. त्यावर अ‍ॅडमिननी दिलेलं उत्तर सगळ्यांनी वाचलंच असेल. आयडी उडवून मग आरोपपत्र दाखल करण्याची पद्धत आवडली. तर अ‍ॅडमिनच्या मर्जीविषयी मला काहीही बोलायचे नाही. पण त्यामुळे एकुणच प्रकरणाला जे काय खलनायकी रंग दिले गेलेत त्याबद्दल बोलायचे आहे.

पहिले दिनेश ह्यांच्या रेसिपीजच्या विडंबनाबद्दल बोलते. दिनेश ह्यांनी वर लिहिलेल्या पैकी (माझ्याविषयी सोडता) एकाही गोष्टीची मी साक्षीदार नाही. मी मूळातच जुन्या माबोवरही नव्हते आणि नवीन वर देखील २०१० मध्ये आले. दिनेश म्हणतात ते बरोबर आहे की आम्चे फारसे कधीही वादही झाले नाहीत. रहमान धाग्यानंतर मी त्यांना "जुनी खोंडं" म्हणू लागले हे मात्र १००% खोटं आहे. माझ्या रहमानविषयक लेखाचे नाव "आमच्या टीनएजमधला रहमान" असं असून त्या लेखाची थीमच माझ्या टीनएजमधल्या बंडखोरीची आहे. त्यात रहमान न आवडणार्‍या, मला भेटलेल्या, मुख्यतः मागच्या पिढीतल्या लोकांचा उल्लेख "सनातनी" असा आहे. जेव्हा दिनेश ह्यांनी त्या लेखावर रहमान बकवास आहे अशा टाइपची प्रतिक्रिया दिली (शब्द वेगळे असतील), तेव्हा (त्यांचे वय माझ्यापेक्षा बरेच जास्त आहे हे माहीत असल्याने) "तुम्ही तर सनातन्यांचे लीडर दिस्ताय" अशी एक हार्मलेस प्रतिक्रिया (विथ स्मायली) दिली. बस्स. तिथून पुढे ते प्रकरण माझ्या लक्षातही राहिले नाही, ते आज दिनेश ह्यांचे हे लेखन वाचल्यावर आठवले.
दिनेश ह्यांच्या लेखात, लिहिण्यात एक पॅटर्न आहे. तो सतत रिपीट होतो. ज्यांना तो प्रत्येकठिकाणी दिसतो, त्यांना तो विनोदी वाटू शकतो, हे कोणी अमान्य करु नये. अनेकदा ते "आपल्याकडे पुर्वी गहू उगवत नसे", "कोकणात पुर्वी पुरणपोळी केली जात नसे", "व्हीटी स्टेशनच्या बाहेर एका सिग्नलवर एक भेळवाला बसतो, तिथे एक जॅकरांडाचे झाड आहे", " मागे मला अमुक एक सेलेब्रिटी भेटल्या होत्या, त्यांनी मला अमुक माहिती सांगितली" असे उल्लेख करत असतात, जे कुणीही पडताळून बघू शकत नाही. कारण एकतर त्यात स्पष्ट उल्लेख नसतात. उदा. "पुर्वी" म्हण़जे किती पुर्वी? तर हा पॅटर्न मला एकटीलाच दिसत होता असे नाही, इतरांनाही दिसत होता. अनेकदा मी/इतरही कुणी त्यांना स्पेसिफिक माहिती विचारली किंवा त्या फझी विधानांतली विसंगती दाखवली तेव्हा एकतर त्यांनी पुर्ण दुर्लक्ष केले किंवा आकांडतांडव केले. त्यामुळे तो नाद सोडून त्या लिखाणाची विडंबनं सुरु झाली.

ह्या विडंबनातून त्या व्यक्तीला दुखवायचे होते, हा अ‍ॅडमिनचा आरोप मला पुर्णपणे अमान्य आहे. मला दिनेश ही व्यक्ती आवडत नाही हा आरोपही खोटा आहे. मुळात मी ज्या व्यक्तीला कधीही भेटले नाही, जिच्याशी मी माबोव्यतिरिक्त कुठेही संपर्कात नाही, त्यांच्या "रेसिपीज" मधल्या मक्तेदारीशी माझी स्पर्धाही होऊ शकत नाही, त्या व्यक्तीला दुखवण्याचा हेतु होता, हे अति-सुलभीकरण आहे. परंतु, मला त्यांचा चुक मान्य न करण्याचा, आणि वरुन "दलदल, विकृत," वगैरे उल्लेख करण्याचा स्टँड अजिबात पटत नव्हता. पण सरळ बोलल्यास ते आणि त्याचे चहाते (खरे-खोटे) इतक्या वाईट शब्दात बोलत असत की त्यावर जोक करुन सोडून देण्यापलिकडे काहीही मी केले नाही. परंतु जोक हा व्यक्तीवर नसून लिखाणावर आहे, हे जर "अ‍ॅज अ कॉन्सेप्ट" म्हणून मान्यच नसेल, तर मग त्यात "मुद्दाम डिवचले, विकृतपणा, हीन प्रवृत्ती" असे खलनायकी रंग देता येऊ शकतात.

आता येऊ या अड्डेकरांवर ज्यांनी दिनेशच्या आडून तीर चालवला. नोटबंदी प्रकरणापासून दिनेश आणि अड्डेकरांमधले प्रेमळ संबंध सुरु झाले. हा योगायोग होता का? असेलही. तर टीपपाकरांना आम्ही दुसरा कट्टाच समजतो असा स्टँड अड्डेकरांनी घेतला. त्यांचे मत, फाइन! पण मग त्यांनी सतत माझ्याविषयी सर्ट्फुकट, फिरते कार्यालय, त्या बाई असले उल्लेख सुरु केले. मी त्याकडे दुर्लक्षच केले. चूक केले. स्क्रीनशॉट घ्यायला हवे होते. तेवढी मी "राजकारणी" नसल्याने आणि माझ्या ऑफिसच्या वेळात अस्ले प्रकार करणे शक्य न झाल्याने ते माझ्याकडून केले गेले नाही. आत्ताही आयडी टिकवून जे बसले आहेत त्यांच्या काही अत्यंत गलिच्छ, जातीयवादी पोस्ट मला आठवताहेत. काहींचे स्क्रीनशॉट कदाचित असतीलही, शोधावे लागतील.
तर साती चा आयडी वेमांनी घालवल्या पासून अड्डेकरांनी टीपापाकरांचे आयडी घालवावे ह्यासाठी बरीच फिल्डिंग लावली. (बर हे सगळे कशासाठी तर मी मोदी-भाजपा ला शिव्या घालत नाही आणि अड्डेकरांच्या लिखाणातल्या विसम्गती दाखवून देते) खरं तर मी लिंबु, मंजो, गामा ह्या अनेकांशी अनेक मुद्ध्यांवरुन अनेक ठिकाणी वाद घातलाय. पण मी मोदींना प्रत्येक मुद्द्यावर शिव्या घालत नाही ना, मग भक्त आहे. आणि भक्तांना कशी ट्रीटमेंट द्यायची असते? उपहास, शिव्या, गलिच्छ भाषा वगैरे. त्यामुळे ती मलाही मिळाली. तेव्हा अ‍ॅडमिन्/वेमा गस्त घालत नसल्याने ते दिसले नसेल. उपहास मीही केला, पुर्णपने मान्य. पण कधीही वाईट भाषा, पर्सनल रिमार्क्स, असांसदीय उल्लेख मी केले नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही.

तर आता दिनेशच्या रेसिपी विडंबनाआडून अनेक माझ्या मनातही नसलेले संदर्भ माझ्या पोस्टला चिकटवले गेले. रेसिस्ट, पाकिस्तानी मीठ अशा अनेक कांगावेखोर संदर्भांना काय उत्तर द्यावे ते मलाही कळत नाही. तेही अनेक आयडी घालवून पुन्हा पुन्हा माबोवर येणार्‍यांकडून! तर मी त्याला आबुदोस म्हणून सोडून देते.
दिनेश ह्यांनी त्या कमेंटमध्ये हे जे नसते संदर्भ शोधून मानभावीपणा केला आहे, त्यालाही मी काही करु शकत नाही.

अनेकदा एखादा आयडी उडला किंवा "हा मी जातो" म्हणाला की त्याला कारणीभुत झालेल्या ट्रिगरला/ आयडीला अतिशय नाट्यपुर्ण रित्या खलनायक बनवले जाते. माझ्याबाबतीत हे पहिल्यांदाच झाल्याने असेल किंवा अ‍ॅडमिनने केलेल्या "न्यायनिवाड्याने" असेल पण मला ह्या प्रकरणाचा बर्‍यापैकी मनस्ताप झाला.

हे स्प ष्टीकरण लिहिणे मला मानसिक क्लोजर साठी महत्वाचे वाटले म्हणून लिहिले. वेमांनी हा आयडी उडवला तरी इट्स ओके.

अजून एक. काही वर्षांपुर्वी "नताशा" आयडीचा पासवर्ड विसरल्यामुळे मी हा नवीन आयडी बनवला होता. पण "नताशा" हा आयडी असेपर्यंत हा आयडी कुठेही वापरलेला नाही.

नताशा, संपूर्ण अनुमोदन. या पिटी पार्टीत सामील व्हायची इच्छा नव्हती, पण तुला सहमती द्यायला लिहीत आहे.
लेखातील एकांगी, संदिग्ध दावे आणि इतक्या वर्षांत एकदाही आत्मपरीक्षण करण्याची धागाकर्त्याला न भासलेली आवश्यकता यावर काही लिहिण्यासारखं नाहीच.
टीपापाकरांनी कायम या आयडीच्या पोस्ट्समधल्या आणि ऑनलाइन वावरामधल्या विसंगतींवर टिप्पणी केलेली आहे (तीही सामोपचाराला अयोग्य पद्धतीची उत्तरं मिळाल्यावर आणि त्यामुळेच), व्यक्तीवर नाही.

आयला सव्या तू म्हणजे नताशा?

बायदवे नताशा हा आयडी ह्या सर्व क्रॉसफायर मध्ये गरज नसताना उडवला गेला असे मला वाटले. अड्डा मधील काही मेंबर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पोलिटिकल बेनिफिट घेत आहेत असेही मला वाटते.

नताशा, आपलं मायबोलीवर इतरत्र इंटरॅक्शन झालेलं आहे ती ओळख ह्या नात्याने मी हे लिहीत आहे.

रेसिपीचं लेटेस्ट विडंबन इतरत्र स्क्रीनशॉर्ट्स वगैरे दिसले तेव्हा मी बघितलं. तुला मी इतरत्र इन्टरॅक्शन्स वरून जेव्हढी ओळखते त्यावरून मला ते केवळ "विडंबन" च वाटलं. अधिक काही नाही. पण हे ही तितकंच खरं की कदाचित अननोइंगली त्यात मीठाबद्दल जो संदर्भ आला ते एक अतिशय सेन्सिटिव्ह मॅटर आहे. साहजिकच सर्व लोक ते वाचतील तेव्हा सारख्याच चष्म्यातून वाचतील हे शक्य नाही आणि माणसाची "प्रिज्युडिस" बनवण्याची क्षमता बघता त्यातून अनेक निरनिराळी आणि अनफेव्हरेबल इन्टरप्रिटेशन्स निघतील हे तुलाही मान्य असेल.

बाकी जे आहे ते आहे पण जे निमीत्त घडलं ( रेसिपी विडंबन) त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून हे प्रकरण क्लोज होऊ शकत नाही का? असा विचार करणं जर अति नाईव्ह असेल किंवा ह्या माझ्या समजुतीत काही चूक असेल अथवा मी काही मिस करत असेन तर नक्की सांग.

(P.S. "वेमांनी हा आयडी उडवला तरी इट्स ओके" हे कालपासून मी इतके वेळा बघितलं आहे की हल्ली हुतात्मा व्हायची फॅशन आली आहे का असा विचार आला मनात. "जिंकू किंवा मरू" लेव्हल ला जाण्याएव्हढं मायबोलीचं महत्व असावं का ? :))

नताशा, परफेक्ट शब्दात मांडलं आहेस. इथे लिहायची फार इच्छा नव्हती कारण लेखकाचा हा जो आविर्भाव आहे, तो काही नवीन नाही. ह्याउपर आणखिन वाद वगैरे घालून वेबमास्ट्रांच्या डोक्याचा भुगा करायची पण इच्छा नाही पण तू पफरेक्टली मांडलं आहेस. Couldn't agree more.
It was good to know you and your views. Hopefully your id stays and we all start a new page of our maabo lives. Happy

Pages