लोकमान्य - एक युगपुरुष

Submitted by कोकणस्थ on 4 January, 2015 - 07:31

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

Lokmanya Profile.jpg

सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.

Lokmanya Cover.jpg

हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.

LokmanyaEkYugpurush 03 Kesari.jpg

लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.

भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------

ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< इथेही मी बहुतांश परीक्षणात वाचलेय की बरेच महत्वाच्या घटना दाखवल्या नाहीयेत वा बरेच काही एकांगी दाखवलेय. मग माझ्या कोर्‍या पाटीवर ते न आलेलेच बरे, म्हणून हा चित्रपट बघू नये या निर्णयाला मी माझ्यापुरता तरी आलोय. >>

तसेही टिळकांच्या नावावर चित्रपट काढून स्वतःचा गल्ला भरायचाच उद्देश आहे निर्मात्यांचा. आपण महापुरुषांच्या भक्तीसाठी त्यांची धन कशाला करा?

चेतन, चित्रपट बघायचा की नाही जा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र चित्रपट, नाटक, मालिका काढणार्‍यांची या कलाकृती निर्माण करताना पैसा मिळावा ही महत्वाची इच्छा असते ही माहिती देऊ इच्छितो. असो.

अहो रश्मी ते परीक्षण चित्रपटाचे आहे, लोकमान्य टिळक या व्यक्तीमत्वाचे नाही, ते त्यांच्या गुणदोषासह उत्तुंगच राहणार.
<<
एक्झॅक्टली. पण हे भजन करताना ध्यानी रहात नाही. म्हणून हे पुढचं अंजन जरूरीचं आहे.

तसेही टिळकांच्या नावावर चित्रपट काढून स्वतःचा गल्ला भरायचाच उद्देश आहे निर्मात्यांचा. आपण महापुरुषांच्या भक्तीसाठी त्यांची धन कशाला करा?

+++ कितीही.

माझ्या अनेक फ्रेन्ड्सनी चित्रपट बघितलाय..सर्वांनाच आवडलाय.
मुलांना अनेकांनी आवर्जून दाखवलाय. एकूण सूर असा की sex & violence ने भरलेले आजकालचे चित्रपट मुलांना दाखवायला आम्हालाच लाज वाटते. त्यापेक्षा हा चित्रपट दाखवणे कधीही चांगलंच. त्यात आता नुसतं जड वैचारिक चर्चासत्र दाखवलं तर पोरं झोपतील. थोडं dramatize करुन दाखवण्यात काही गैर नाही. मी नक्कीच बघणार आहे Happy

हो हे "चित्रपटाचे" परीक्षण आहे
लोकमान्यांचे नाही.
अर्थात हे लांगुलचालन करणार्यांना कळणार नाही.

चित्रपट बिलकुल आवडला नाही सुबोध भावेने अत्यंत बटबटीत अभिनय केला आहे. टिळकांची समाज सुधारणे बद्दल असलेली मतेही दाखवायला हवी होती.चरित्रपटाचा दिग्दर्शकाने मसालापट तयार केला आहे.

मला ते पाहावे मनाचे वरचे परीक्षणही धमाल वाटले व हे कोकणस्थ यांनी लिहीलेलेही आवडले. दोन स्वतंत्र व्ह्यू पॉइंट्स आहेत. एक आवडला म्हणजे दुसरा खोटा वाटणे किंवा त्याचा राग येणे याची गरज नाही.

त्या लेखिकेने एक महत्त्वाचे भान पाळले आहे - चित्रपटात विनोदी वाटलेल्या गोष्टी लिहीताना कोठेही खुद्द लोकमान्य टिळकांवर शिंतोडा उडणार नाही याची काळजी घेतलेली आहे.

तसेच हा किंवा कोणताही रिव्यु वाचून आता चित्रपट बघूच नये असे लोक कसे ठरवतात मला कळत नाही. प्रत्येकाला चित्रपट वेगळा 'दिसतो'. मी तरी नक्कीच पाहणार आहे.

त्यात आता नुसतं जड वैचारिक चर्चासत्र दाखवलं तर पोरं झोपतील. थोडं dramatize करुन दाखवण्यात काही गैर नाही.
>>>
चित्रपट न पाहिल्याने किती dramatize केला आहे हे माहीत नाही, पण ईतिहासातील, स्वातंत्र्यकाळातील एखाद्या थोर व्यक्तीमत्वाबद्दल चित्रपट असल्यास वरील विधानाशी असहमत. पोरं झोपू नये म्हणून कोण्या जहाल विचारांच्या स्वातंत्र्यवीराला बॉलीवूड अ‍ॅक्शन हिरोप्रमाणे प्रोजेक्ट करण्यात अर्थ नाही. त्यांची अशी इमेज मनात भरण्याऐवजी पोरे झोपलेलेच चांगले. किंबहुना पोरांना समज, प्रगल्भता आली की ते बघतील तो चित्रपट. चित्रपट मनोरंजक बनवायच्या नादात त्या अजय देवगणच्या भगतसिंग मध्ये राजगुरू या कॅरेक्टरचे काय केलेले माहीत आहे ना.

तसेच हा किंवा कोणताही रिव्यु वाचून आता चित्रपट बघूच नये असे लोक कसे ठरवतात मला कळत नाही.
>>>>>>
जसे एखादा रिव्ह्यू वाचून आता तर बघितलाच पाहिजे असे ठरवतात Wink

<<त्या लेखिकेने एक महत्त्वाचे भान पाळले आहे - चित्रपटात विनोदी वाटलेल्या गोष्टी लिहीताना कोठेही खुद्द लोकमान्य टिळकांवर शिंतोडा उडणार नाही याची काळजी घेतलेली आहे.>>

पण भाषा खूप चीप वापरली आहे. टिळकांबद्दल रिव्ह्यू लिहित असताना थोडी propriety पाळणं आवश्यक वाटतं. अर्थात टिळकांबद्दल मनापासून खूप आदर असणं व म्हणून लिहितानाही आपोआपच भाषा नीट वापरली जाणं आणि आपल्याला त्यांच्याबद्दल आदर नसताना दुसर्‍यांनी आपल्याकडे बोट दाखवू नये वा 'आमच्या भावना दुखावल्या' अशी तक्रार करु नये म्हणून काळजीपूर्वक शब्द वापरणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. ती लेखिका आणि इथले अनेक लोक त्या दुसर्‍या कॅटेगरीतील आहेत.
आम्ही आपले अजून केसरीवाडयात गणपती बघायला गेलो तरी भारावून जाणारे लोक आहोत Happy

जसे एखादा रिव्ह्यू वाचून आता तर बघितलाच पाहिजे असे ठरवतात >>> ऋन्मेष (कोकणस्थ - सॉरी Happy ) - ते तसेच हवे. पिक्चर चांगला असेल तर लोकांना तो बघावाच असे वाट्णे हे चांगल्या समीक्षणाचे कामच आहे. पण उलटे होउ नये. दोन्ही केस मधे एक कॉमन आहे - की असे अनेकदा होते की बघून आल्यावर त्या समीक्षकाला वाटला तसा आपल्याला वाटला नाही असेच वाटते.

आम्ही आपले अजून केसरीवाडयात गणपती बघायला गेलो तरी भारावून जाणारे लोक आहोत >>> आम्हीही! वेदिका - अशा शब्दांत जे या चित्रपटावर टीका करतात ते तुम्हाला आवडले नाही हे समजले. पण ते ज्यांना आवडले ते याबाबतीत (टिळकांवरच्या आदराच्या बाबतीत) तुमच्यापेक्षा वेगळे आहेत असा निष्कर्ष काढू नका.

एक उदाहरण देतो - गणपतीउत्सवात लोक अनेक प्रकारची गाणी बनवतात. एखाद्याने जरा बाजारू चालीत गाणे लिहीले आणि त्यावर कोणी अशा शब्दांत टीका केली, तर ती गणपतीवर टीका केलीय असे नाही.

>>>टिळकांबद्दल रिव्ह्यू लिहित असताना थोडी propriety पाळणं आवश्यक वाटतं. <<<

हे वाक्य 'टिळकांवरील चित्रपटाचा' असे करेक्ट करून वाचले तरीही पटतेच.

>>>आम्ही आपले अजून केसरीवाडयात गणपती बघायला गेलो तरी भारावून जाणारे लोक आहोत<<<

+ १

==============

>>>पण ते ज्यांना आवडले ते याबाबतीत (टिळकांवरच्या आदराच्या बाबतीत) तुमच्यापेक्षा वेगळे आहेत असा निष्कर्ष काढू नका.<<<

फारेण्ड,

तुम्ही म्हणता तसे असेलही! पण अश्या भाषेत गांधी, महाराज ह्यांच्यावरील चित्रपटांबद्दल लिहिले गेले तर?

Happy

मला असेही म्हणायचे नाही की काही लोक भडक माथ्याचे असतात तर मग आपणही तसेच असायला काय हरकत आहे. मला असे म्हणायचे आहे की विनोदी शैलीतील लेखन करताना जी भाषा वापरली आहे ती अल्टिमेटली 'लोकमान्य टिळक' ह्या नावापाशी जाऊन पोचणार आहे ह्याचे भान ठेवायला नको का? Happy

टिळकांबद्दल रिव्ह्यू लिहित असताना थोडी propriety पाळणं आवश्यक वाटतं.
<<
टिळक अन एक सिनेमा यातला फरक समजत नसेल तर कठीण आहे. तो टिळकांबद्दल रिव्ह्यू नाही. सिनेमबद्दल आहे.

पण अश्या भाषेत गांधी, महाराज ह्यांच्यावरील चित्रपटांबद्दल लिहिले गेले तर?
<<
यु मीन यांच्याबद्दल अशा भाषेत लिहिले गेलेले नाहिये?

बाकी टिळक नामक कोंग्रेसी पुढार्याचा पुळका का आलाय इतका?

बाकी टिळक नामक कोंग्रेसी पुढार्याचा पुळका का आलाय इतका?>> कारण तेव्हाची कॉन्गेस आणी आताची कॉन्ग्रेस यात एका हाताच्या छाप्याखेरीज काहिच साम्य नाही (आधी चरखा होता नाही का! मग काय सगळच बदललय)

तो टिळकांबद्दल रिव्ह्यू नाही. सिनेमबद्दल आहे>>सहमत!
ट्रेलर बघुन चित्रपट फार ड्रामेबाज वाटतो, तरी बघायची उत्सुकता आहेच.

ते तसेच हवे. पिक्चर चांगला असेल तर लोकांना तो बघावाच असे वाट्णे हे चांगल्या समीक्षणाचे कामच आहे. पण उलटे होउ नये.
>>>>>>>>>>>
७५ टक्के असहमत,
एक म्हणजे समीक्षकाला पिक्चर चांगला वाटला म्हणून त्याने सर्वांवर आपली आवड लादण्याचा प्रयत्न का करावा.
हि आपल्या आवडीची मार्केटींग नाही का झाली, असेही म्हणता येईल,
तरी ओके, एखादी चांगली कलाकृती शेअर करण्यात गैर नाही.

पण मग त्याच धर्तीवर एखादा सिनेमा बंडल असेल तर इतरांना सावध का करू नये? कोणाचे पैसे आणि वेळ वाया जाण्यापासून वाचवणे हे पुण्यकर्म नव्हे का?

दोन्ही केसमध्ये अंतिम निर्णय वाचक स्वताच घेणार आहेत.

कोकणस्थ मी सध्या जगाच्या पाठीवर जिथे आहे तिथे अजून शुभरात्रीला किमान ३ तास बाकी आहेत.

मी आपल्या परीक्षणाला नाही काटत आहे, कृपया गैरसमज नसावा. तो माझा पिंड नाही, मी फक्त माझे मत व्यक्त करतोय. आपले परीक्षण हे आपल्या आवडीतून आले आहे, आणि आपल्या आवडीचा आदर आहे.

जसे माझ्या आवडीचे कलाकार सई, शाहरूख आणि स्वप्निल हे इथे चारचौघांना आवडत नाहीत त्याकडे मी देखील दुर्लक्ष करत माझ्या स्वताच्या आवडीचा आदर करतोच.

त्याव्यतिरीक्त आपल्या परीक्षणातील मुद्याशी सहमत असो वा नसो, आय मस्ट से यातली आपली लिखाणशैली खूप प्रभावी झाली आहे याबद्दल दुमत नाही, आपले टिळकांबद्दलचा अभ्यास आणि प्रेम दोन्ही त्यात पुरेपूर उतरलेय. आणि त्याबद्दल कौतुक आहेच. Happy

ओह नो..सॉरी सॉरी सॉरी...इट वॉज अ टायपो..मला 'टिळकांविषयीच्या सिनेमाबद्दल' असंच लिहायचं होतं.

<<मला असे म्हणायचे आहे की विनोदी शैलीतील लेखन करताना जी भाषा वापरली आहे ती अल्टिमेटली 'लोकमान्य टिळक' ह्या नावापाशी जाऊन पोचणार आहे ह्याचे भान ठेवायला नको का? >>

+१

वेदिका२१,

>> टिळकांबद्दल रिव्ह्यू लिहित असताना थोडी propriety पाळणं आवश्यक वाटतं.

औचित्याच्या मुद्यास शंभर टक्के अनुमोदन. अगदी मनातलं नेमकेपणाने मांडलंत!

आ.न.,
-गा.पै.

मला ते पाहावे मनाचे वरचे परीक्षणही धमाल वाटले व हे कोकणस्थ यांनी लिहीलेलेही आवडले. दोन स्वतंत्र व्ह्यू पॉइंट्स आहेत. एक आवडला म्हणजे दुसरा खोटा वाटणे किंवा त्याचा राग येणे याची गरज नाही. तसेच हा किंवा कोणताही रिव्यु वाचून आता चित्रपट बघूच नये असे लोक कसे ठरवतात मला कळत नाही. प्रत्येकाला चित्रपट वेगळा 'दिसतो'.>>>>>अनुमोदन.

तिथे त्या लिहिणार्‍याचेच परिक्षण जोरात चालु आहे Lol
धन्यवाद लिंक दिल्याबद्दल. बाकी मिर्ची जरा जास्तच झोंबलेली दिसते Wink

लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण आणि आदरांजली.
आठवण ठेवल्याबद्दल बाळाजीपंतांचे आभार.
-गा.पै.

अनेक काळापासून पहायचा राहिलेला 'लोकमान्य' पाहिला एकदाच.... आणि संपूर्ण निराशा !
चित्रपट तद्दन खोटा आणि वरवरचा वाटला... चकचकीत करण्याच्या नादात आणि नव्या-जुन्याची सांगड घालण्याच्या नादात - लोकमान्यांचे विचार, त्या वेळचा काळ - परिस्थीती, राजकीय- सामाजिक वातावरण रादर बॅकग्राउंड, टिळक -आगरकर वादाचं मूळ, स्वराज्याची मागणी यातलं काहीच धड establish झालं नाही असं वाटलं.
मुळात वातावरण निर्मीतच झाली नाहीये चित्रपटात... उगाच वेळ जात नव्हता म्हणून टिळक- आगरकरांनी 'चला आता शाळा काढू, आता वर्तमानपत्र चालू करु ' असे डिसीजन घेतल्यासारखं फील येतो सिनेमा पाहून.
वाईट वाटतं इतका पॉवरफूल विषय असा हाताळला गेला की.. रीसर्च कमी पडतो ? की
'लोकमान्य' म्हणजे 'लोकांना जे मान्य आहे ते' , जे पहायला आवडतं तेच दाखवावं असा अर्थ घेऊन चित्रपट काढलाय असं वाटलं !

Pages