लोकमान्य - एक युगपुरुष

Submitted by कोकणस्थ on 4 January, 2015 - 07:31

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

Lokmanya Profile.jpg

सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.

Lokmanya Cover.jpg

हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.

LokmanyaEkYugpurush 03 Kesari.jpg

लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.

भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------

ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परीक्षण आवडले, चित्रपट बघण्यास आधीपासूनच उत्सुक आहे. सुबोध भावेने साकारलेला गेटअप आणि दमदार संवादफेक ट्रेलरमध्ये पाहता वाटते की छोट्या स्क्रीनवर बघायला मजा नाही. पण सध्या थिएटरात जमणे कठीण आहे. Sad

धन्यवाद, सुंदर वर्णन !

खरेतर लोकमान्यांवर मराठी चित्रपट एवढ्या उशिरा का निर्माण झाला याचे सखेद आश्चर्य वाटत आहे.
खुद्द टिळकांच्या घरातील लोकांनीदेखील कधी का मनावर नाही घेतले ? असो देर आये दुरूस्त आये.

नरकेसरीस आमचा मानाचा मुजरा ! Happy

लि़खाण अतिशय भारदस्त नि धारधार झालेलं आहे... चित्रपटाचा प्रभाव पूर्ण जाणवतोय.
त्याच वेळेस " 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात.."
अश्या टिपण्या वास्तवाचे चांगलेच भान दाखवताहेत.
वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. असे बारिक सारिक उल्लेख आवडले.
सुंदर परिक्षण.

@ महेश

<< खुद्द टिळकांच्या घरातील लोकांनीदेखील कधी का मनावर नाही घेतले ? >>

ते इकडे व्यस्त असल्याने कदाचित त्यांना वेळ मिळाला नसेल.

१. स्वतःचा पगार स्वतःच वाढवणे -

http://www.loksatta.com/pune-news/tilak-maharashtra-university-vice-chan...

२. कसोट्यांवर न टिकणारे खोटे दावे करणे -
http://zeenews.india.com/marathi/news/pune-western-maharashtra/lokmanya-...

३. विद्यापीठ अनुदान आयोगाचे निकष पूर्ण न करणे -
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/tmv/articleshow/...?

याशिवाय साधारण वीसेक वर्षांपूर्वी टिळकांच्या एका वंशजाची अशाच एका वादामुळे वर्तमानपत्रात प्रसिद्धी झाली होती. त्याकाळी सार्वजनिक दूरध्वनी केन्द्रांवर मीटरनुसार बिल छापून येत असे व त्या प्रमाणे ग्राहकाकडून रक्कम वसूल करावी असा नियम होता. काही दूरध्वनी केंद्र चालक अतिरिक्त रक्कम मागत व पुणेरी ग्राहक मात्र देत नसत. तर हे टिळकांचे वंशज देखील असेच एक सार्वजनिक दूरध्वनी केंद्र चालवित असत व त्यांचाही एका ग्राहकाशी असाच वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी टिळकांच्या त्या वंशजाला रात्र तुरुंगात काढावी लागली. अर्थात त्या काळी वर्तमानपत्राची आंतरजालीय आवृत्ती नसल्याने लिंक देता येणार नाही.

असो. तर एकूणच टि़ळकांच्या वंशजांनी टिळकांच्या नावलौकिकास साजेसे वर्तन केले नसल्याने त्यांच्याकडून टिळकांवरील चित्रपटाविषयी अपेक्षा व्यक्त करणे अवास्तव आहे.

जबरदस्त परीक्षण, कोकणस्थ! लेख वाचतोय की लोकमान्यांचं चरित्र वाचतोय की प्रत्यक्ष चित्रपट पाहतोय हेच कळेनासं झालं क्षणभर! चित्रपट आवर्जून पाहणार.
आ.न.,
-गा.पै.

या चित्रपटाचे अनेक रिव्हूज वाचले. उत्सुकता तर आहेच. सुबोध भावे तर अगदी लोकमान्यांसारखाच दिसतो. मेक अप आर्टीस्ट बहुतेक विक्रम असावा.

पण ओम राऊतला हा प्रोजेक्ट झेपलेला नाही असं वाचनात आलं. धाकधुक झाली. दुस-या कुणाकडे द्यायचा होता प्रोजेक्ट !

चित्रपट पाहिला ,आवडला मात्र अजिबात नाही. टिळक सावळ्या रंगाचे होते तर भावे गोर्या रंगाचा दाखवलाय .नाटकात अभिनय करणे आणि चित्रपटात अभिनय करणे यात भावेने गल्लत केलीए.
चित्रपट फार अपेक्षा वाढवतो ,पण त्या पुर्ण करु शकत नाही .चित्रपट टीव्हीला आल्यावरच पाहावा असा फुकटचा सल्ला देतो.

लेख उत्तम! आवडला!
चित्रपट पाहण्याचीही उत्सुकता आहेच!

सुबोध भावे गेटपमध्ये आणि ट्रेलरमधून हुबेहुब टिळकांसारखा दिसतो आणि त्याचा आवेशही जाणवतो.

त्याचवेळी खूप वर्षांपूर्वी एका नाटकात आणि त्यावर आधारीत हिंदी टेलीफिल्ममध्ये सुबोधइतक्याच एका ताकदीच्या कलाकाराने उभे केलेले टिळक आठवले. अत्यंत संयत आणि आक्रमक अभिनयाने टिळक उभे करणारा हा कलाकार म्हणजे नुकतेच गेलेले सदाशिव अमरापूरकर.

मुस्लीम लीग १९०६ मध्ये स्थापन झालेली असली तरी जिन्हांचा १९१२ पर्यंत लीगशी संबंध नव्हता. वेगळं पाकीस्तान हा विषय कोणाच्या डोक्यातही नव्हता. हिंदुस्तानचं स्वातंत्र्य या एकाच विचाराने भारुन आणि टिळकांवरील श्रद्धेपोटी जिन्हांनी टिळकांचा खटला लढवला होता.

टिळकांना जो आदर आणि श्रद्धा जिन्हांकडून मिळाला तसा गांधीजींना मात्रं कधीच मिळाला नाही.

छान लिहिलं आहे! शाळेत असताना दुर्दम्य वाचल्यानंतर जवळपास एक आठवडा भारावल्यासारखं झालं होतं! त्यावेळी केसरी वाड्यासमोरून जाताना देखिल 'ह्या इथे इतिहास घडला' असं हरीतात्यांसारखं वाटत राहायचं. आत्ता दोन वर्षांपूर्वी टिळकांच्या टिपा असलेली गीता वाचताना पुन्हा एकदा त्यांच्या बुद्धीने स्तिमित व्हायला झालं! What a genius he was! खरंच इतक्या वर्षांत त्यांच्यावर एकही सिनेमा/डॉक्युमेंटरी निघू नये याचं आश्चर्य वाटतं.

चित्रपटाचे परीक्षण खूप आवडले. सुंदर लिहीले आहे. एक चित्रपट म्हणूनही "चांगला" आहे असे या व इतर रिव्यूज मधून समजते आहे, त्यामुळे पाहणार नक्कीच आहे.

परीक्षण लिहीताना लेखकाचे राजकीय मत थोडेफार येथे येणे साहजिक आहे. त्यामुळे तळाशी असलेले एक दोन मुद्दे अनावश्यक वाटले तरी पुढची सगळी चर्चा त्यावर व्हावी असे होउ नये. कारण बाकी रिव्यू अतिशय सुंदर आहे.

परिक्षण छानच आहे! सुबोधच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय सगळीकडे. टिळकांबद्दल तर लहानपणापासूनच खूप आदर आहे त्यामुळे चित्रपट नक्कीच बघणार आहे Happy

चित्रपट पाहायची उतत्सुकता वाढ्ली.

'अहिन्सा' या थोतान्डाचाही पुढे भारतीय स्वातन्त्र्य मिळ्ण्यास 'थोडासा' हातभार लागलाच (!) हे या 'नमो' आणि 'मोहन' युगात नम्रपणे सुचवावेसे वाटते!

जबरदस्त लिहिलं आहे .चित्रपटाचा प्रोमो पाहुनच चित्रपट अतिशय उत्कृष्टरीत्या चित्रीत झाला आहे याची खात्री होतीच.लोकमान्य टिळकांचं उत्तुंग असं कार्य आणि व्यक्तीमत्व चित्रपटाच्या माध्यमातुन पाहणं ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. सुबोध भावे कुठल्याही भुमिकेचं सोनं करु शकतो .अगदि अगदि. सुबोध भावेची मेहनत आणि जबरदस्त संवादफेक यासाठी हा चित्रपट मोठया स्क्रीन वर पाहण्यातच मजा आहे. मी नक्की पाहणार आहे.चित्रपटाच्या प्रोमो मधे एक जबरदस्त वाक्य आहे .जे टिळक आगरकरांना उद्देशुन म्हणतात "लोकमत ही फार मोठी शक्ती आहे" कीती महत्वाचं वाक्य आहे ,जे त्या काळीही महत्वाचं होतं आणि अजुनही आहे.

एवढया मोठ्या ऐतिहासिक व्यक्तीमत्वाचं चित्रण करणं खुप आव्हानात्मक होतं त्यामुळेच कदाचित उशीर झाला असेल चित्रपट निघायला .उशीरा का होईना ,पण आता आला आहे ही पण चांगलीच बाब आहे आणि ही कठिण गोष्ट ज्यांनी साकारली आहे त्याबद्दल त्यांचं खरच कौतुकच केले पाहिजे .
<< आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे >> Happy

चित्रपटात हि व्यक्तिरेखा कशी हाताळली हे महत्वाचं असलं तरी एक दिगदर्शकाचा प्रयत्न म्हणून आणि टिळकांविषयी एक आदर आणि आवडते व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच मूवी पहाणार.

बहुतेक टुकार हिंदी व मराठी मूवीज पैसे खर्चून पहातेच मग एका मराठी माणसाचा प्रयत्न म्हणून बघण्यास काय हरकत आहे. हाच विचार आहे व जाणारच. Happy

फालतू हिंदी चित्रपट बघायला ब्ल्याक ने तिकीटे घेतील पण अशा सिनेमाना जाणार नाहीत हे निर्लज्ज लोक ...

बघून घ्या रे... आणि शिका काही जमले तर ... स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हि सिंहगर्जना फक्त थेटर मधेच ...
डौन लोड नका करू हि विनंती...

स्पार्टाकस, जिनांबद्दल घटनांचा क्रम लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लेखात आवश्यक बदल केला आहे.

कोकणस्थ,

फार उत्तम परिक्षण लिहिले आहेत तुम्ही, अगदी संयत पणे...
>>असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे?<<
व्वा !! तुमच्या या वाक्याला माझे असंख्य अनुमोदन !!!

स्पार्टाकस,

हो, तुम्ही बरोबर लिहिले आहे, टिळकांचा मंडाले चा खटला जिन्हांनी लढवला होता, त्या वेळी बहुदा टिळकांनीच हे म्हण्ट्ले होते की माझा खटला लढविण्यासाठी जर कुणी लायक व्यक्ती असेल तर ती म्हणजे बॅ. जिन्हा !!

उत्कृष्ट लेख लिहिला आहे. टिळकांच्या नेमक्या कोणत्या पैलूवर चित्रपट काढायचा, हा पॅरा फार आवडला. गा मा पैलवानांशी सहमत आहे.

अभिनंदन कोकणस्थ

टिळकांच्या नेमक्या कोणत्या पैलूवर चित्रपट काढायचा>>>> देअर यू आर ! मला फार वाटत की डिस्कव्हरी सारख्या वाहीनी ने टिळकांवर मोठ्या अवधीची डॉक्यूमेण्टरी बनवावी. टिळक , सुभाषबाबू , सावरकर, गांधीजी बाबा साहेब , ही सारीच व्यक्तीत्वे एका सिनेमात कव्हर करण हे अशक्यप्रायच. या सार्‍या व्यक्तींचे आपापसातले संबंध कोणत्या उंची वरचे होते याची फारशी कल्पना ही आज लोकांना नाही. आपल्या कोत्या विचारांची , जातीपातीची झापडे काढून न ठेवता , काहीएक अभ्यास न करता, या महामानवांविषयी करंटे लोक उचलली जीभ लावली टाळ्याला पध्दतीने समाज आणखी आणखी विभाजीत कसा होईल अशी वक्तव्ये, लिखाण करतात तेव्हा फार क्लेष होतात. सध्याही सोशल मीडीयामधे टिळकांवरच्या या चित्रपटाच्या निमित्ताने हे बघायला मिळतय. " इतिहासात चंदन ही आहे अन कोळसाही आहे... आपण चंदन उगाळूया कोळसा नको... चंदन जाळून त्याचा कोळसा करण्याचा व तो उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको " हे बाबासाहेब पुरंदर्‍यांचे बोल मला फार मार्गदर्शक वाटतात. असो.
मला हा चित्रपट केव्हा बघायला मिळेल माहीत नाही. तो वर उत्सुकता म्हणून विचारतो, मॅक्स म्यूलर बरोबर पत्रांमधून होणारी चर्चा....., (मला नीट स्मरत असेल तर)गंगाधर गाडगीळांनी दुर्दम्य मधे वर्णन केलेले टिळकांच्या अंतयात्रेच्या वेळी आक्षेप घेणार्‍या लोकांप्रती गांधीजींनी काढलेले " लोकांचे सेवकास जात नसते " हे उद्गार..... मंडालेच्या तुरुंगात टिळक होते तेव्हा चिमण्या त्यांच्या हातावर चे तांदूळ अगदी जवळ येउन खात असत असे काही सुंदर प्रसंग या चित्रपटात आहेत काहो ?

Pages