लोकमान्य - एक युगपुरुष

Submitted by कोकणस्थ on 4 January, 2015 - 07:31

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

Lokmanya Profile.jpg

सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.

Lokmanya Cover.jpg

हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.

सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.

LokmanyaEkYugpurush 03 Kesari.jpg

लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.

भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------

ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक गोष्टी, दुर्दम्य वाचेपर्यंत माहिती नव्हत्या. त्यातली मला एक फार जबरदस्त वाटलेली गोष्ट म्हणजे,
इंग्लंडमधे जेव्हा निवडणूका होणार होत्या, तेव्हा टिळकांनी तत्कालीन विरोधी पक्षाला भारतातुन काही हजार पौंडांची मदत पाठविली होती (कॉन्ग्रेसतर्फे नव्हे, बहुतेक स्वतंत्ररित्या)

ज्या काळात मिडिया हा वृत्तपत्रांपुरताच मर्यादित होता आणि संपर्काची साधने केवळ पत्रे आणि तारांपुरतीच मर्यादित होती, त्या काळात एवढी दूरदृष्टी ठेवून भलतीच झेप घेण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती काय जबरदस्त असु शकेल.

कॉन्ग्रेसमधे देखील खरी जान आणली ती टिळकांच्या जहाल नेतृत्वानेच. अन्यथा त्या आधी कॉन्ग्रेसचे मवाळ नेतृत्व हे केवळ ठराव पास करणे आणि अर्ज विनंत्या करणे यापुरतेच मर्यादित होते.

काउ | 4 January, 2015 - 11:43 नवीन
टिळक - शाहु महाराज यावर काही आहे का ?

इथे लोक दुर्लक्षच करणार!

सुबोध भावे गेटपमध्ये आणि ट्रेलरमधून हुबेहुब टिळकांसारखा दिसतो आणि त्याचा आवेशही जाणवतो.
>>
+११११११११११११११११११११

सिनेमा पाहिला नाही पण ट्रेलर वरून मात्र अगदी अगदी या वाक्याला.

फारेण्ड +१ शेवटचे २ परिच्छेद नसते तर अत्यंत सुंदर आहे हे परिक्षण Happy

छान परिक्षण.
सुबोध भावे अगदी टिळकांसारखाच दिसतोय आणि आवाज देखिल धारदार.
मला ते 'स्वराज्य' ज्या पद्धतीने म्हणलय ते फारच आवडल अगदी स्वातंत्र्यलढ्याचा काळ आहे असच जाणवत राहत.
बाकी सिनेमा पाहिल्यावरच.

Kaala paheelaa. Excellent Movie. Must watch.

Subodha Bhaavebaddalachyaa sagaLyaalaa + 111111111

Picture House full. Lok blackne tickets ghet hotee.

Malaa MaraTheemadhe lihitaa yet naaheey Sad

सुंदर लिहिले आहे.. बघायचाच आहे. असा फॉर्म न घेता थेट कथानकाचाच फॉर्म घ्यायला हवा होता. लोकमान्यांचे विचार आजही महत्वाचे आहेत हे दाखवायला असे खास प्रयत्न करायची गरज नव्हती.

आपले चित्रपट कलादिग्दर्शनात मार खातात, त्याकाळातले सेट्स उभारताना तारांबळ उडते, त्याबाबतीत कसा आहे हा चित्रपट ?

टिळक आणि आगरकर नावाचे एक नाटक येऊन गेले होते. कलाकार आठवत नाहीत आता.
बेनेगलांच्या भारत एक खोज मधे पण लोकमान्यांवर एक भाग होता.. मला वाटतं, अमरापूरकरांनी ती भुमिका केली होती.

दिनेशदा, लिखाणातले एक वाक्य याचे उत्तर देते. "वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे:"

" इतिहासात चंदन ही आहे अन कोळसाही आहे... आपण चंदन उगाळूया कोळसा नको... चंदन जाळून त्याचा कोळसा करण्याचा व तो उगाळण्याचा उपद्व्याप तर नकोच नको " +१११

कोक्या फारच प्रभावी लेखन केलं आहेस. पाहू का नको असा विचार होता. तुझं परिक्षण वाचून पहावा(च) असं वाटू लागलंय.

लोकमान्यांचे विचार आजही महत्वाचे आहेत >>>>>>>>

@दिनेश - वादासाठी वाद म्हणुन विचारत नाहीये.

टीळकांचे विचार म्हणजे असे कुठले विचार होते? २-४ उदाहरणे सांगता येतील का? बरं हे जे काही विचार असतील ते नेहमीचेच ( म्हणजे पूर्वापार चालत आलेले ) की टीळकांनी पाथ ब्रेकींग असे मांडले?
मला अक्कल आणि माहीती कमी आहे म्हणुन हा गंभीर प्रश्न.

विचारयचे दुसरे कारण म्हणजे टीव्हीवर पण सुबोध भावे ला टीळकांची तत्वे वगैरे बोलत होता. काय होती ही तत्वे?

टोचा, टिळकांचे तत्वे आणि विचार सांगत बसायला हे माध्यम सर्वच बाबतीत तोकडे आहे.
आपण "दुर्दम्य" हे गंगाधर गाडगीळ लिखित टिळकांवरची चरित्रात्मक कादंबरी आणि (२) न. चि. केळकर लिखित टिळकांचे तीन खंडातले चरित्र - या दोहोंचे वाचन व अभ्यास करावा. तसेच, (३) लोकमान्यांनी लिहीलेल्या साहित्याचेही वाचन व अभ्यास आपण करावात. ह्या गोष्टी आपण केल्या तर लोकमान्यांची तत्वे व विचार तुम्हाला नक्की समजतील. कृपया. धन्यवाद.

@कोकणस्थ - ही पळवाट आहे. एक सुद्धा तत्वे कींवा विचार सापडत नसेल तर माहीत नाही म्हणा पण माहीती असले तर टीळकांनी मांडलेले ( त्यांनीच मांडलेले ) असे २ विचार तुम्हाला सांगता यायला पाहीजेत.

मराठी माणसानी टीळकांचे चरीत्र वाचलेच नसेल असे तुम्हाला कसे वाटते? पण टीळकांचे विचार आणि तत्वे असे उल्लेख वाचुन कोडे पडले नक्कीच आहे.
अगदी वैचारीक तत्वे नसतील तर काही इकॉनोमी मधली किंवा कॉमर्स मधली असली तरी चालतील.

आणि नसले मांडले नविन काही विचार तर त्यात लाजण्यासारखे काय आहे. कर्तृत्व कृतीत पण असु शकते.

तुम्ही त्याला पळवाट समजत असाल तर तुमची मर्जी. अजूनही हेच सांगेन की वरचे ग्रंथ व पुस्तके वाचून वाचन व अभ्यास वाढवावा.

>>>विचारयचे दुसरे कारण म्हणजे टीव्हीवर पण सुबोध भावे ला टीळकांची तत्वे वगैरे बोलत होता. काय होती ही तत्वे?<<<

कसली आलीयत तत्त्वे?

एक गीतारहस्य लिहिला. हे काही तत्त्व नाही. ते एक भाषांतर म्हणता येईल किंवा समीक्षा! स्वराज्य त्यांना त्यांचा जन्मसिद्ध हक्क वाटायचा. आता वाटण्याला काय तत्त्व थोडीच म्हणणार? शेंगांची टरफलं उचलायला लावली तर म्हणाले मी नाही उचलणार, मी शेंगा खाल्लेल्या नाहीत. वेळ जात नसल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याचे दुष्परिणाम आपण अजून भोगतोच आहोत.

नागरिकांनी देशप्रेम बाळगावे, परकीयांविरुद्ध एक होऊन लढावे, कणखर व्हावे, संघटित व्हावे वगैरे काय कोणीही सोम्यागोम्या म्हणू शकतो.

सुबोध भावेला काय, मिळाली ती भूमिका केली. उद्या तो रँडसाहेबही होईल बग्गीतून फिरायला मिळतंय म्हणून!

छान लिहीलेय परिक्षण, आवडले. कोकणस्थ, एकच राहिले यात. ब्रिटिशाना विरोध करणारे टिळक, इन्ग्रजी भाषा कोळुन प्यायले होते. इन्ग्रजी शिका, ती भाषा म्हणजे वाघिणीचे दूध आहे, असे ते म्हणायचे. ते खर्‍या अर्थाने केसरी होते. त्या काळात जहाल आणी मवाळ असे दोन गट होते, त्यात लोकमान्य हे जहाल गटाचे होते. स्वातन्त्र्य लढल्या खेरीज मिळणार नाही असे म्हणणारे टिळक, फार कमी लोकाना समजले.

तसे खरे तर कोणालाच काही तत्त्वे नव्हती. इंग्रज राज्यकारभार करतच होते. मग आपण काय करणार नुसते बसून? करा देश स्वतंत्र! व्हा स्वातंत्र्यवीर! गाजराची पुंगी, वाजली तर वाजली. खर्‍या जगतायत आपल्या पिढ्या! मस्त इन्टरनेटवर विचारायचे वगैरे, टिळकांची तत्त्वे म्हणजे कोणती हो? उत्तर आले की त्यावर पळवाट वगैरे म्हणून पुढच धागा उघडायचा. आहेच शास्त्रीय संगीत टीका करायला!

कशाला मंडाले, अंदमान बिंदमान नको तिथे जायचे उगाच!

ते नेताजी एक तसलेच! म्हणे आझाद हिंद सेना! आम्ही आझादच आहोत की?

प्रोमोज पाहून, सुबोधची होम मिनिस्टरमधली मुलाखत पाहून उत्सुकता फार वाढली होती...
परिक्षण छान लिहिलंय. सिनेमा पहायचा योग कधी येतो पाहुया....

@ बेफी - तुम्ही लिहीलेल्या गोष्टी ह्या चोरी करुन नये, परोपकार कराव्या अश्या स्टँडर्ड गोष्टी आहेत.

गीतेवर आत्तापर्यंत हजार तरी समिक्षा/टीका झाल्या असतील. त्यावरुन इतके दिसते की टीळकांचा अभ्यास चांगला होता. शेगाच्या टरफला बद्दल चे तत्व क्वेशनेबल आहे.

गणेश उत्सव चालू करणे ह्यात कुठले तत्व आहे हे कळले नाही. आगरकरांना सामाजिक प्रश्नांची समज होती असे आपण म्हणु शकतो आणि त्यांनी आधी समाज बांधावा ही केलेली मागणी पण कीती बरोबर होती ते दिसतेच आहे.

@रश्मी - तुमच्या माहीती साठी टिळकांनी कधीही स्वातंत्र्याची मागणी केली नाही. त्यांना Homerule पाहीजे होता, जो इंग्रजांनी दिलाच होता.

Pages