विनाशकाले विपरीत बुद्धी..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 December, 2014 - 11:47

...

भाग १ इथे वाचा - http://www.maayboli.com/node/51814

भाग २ ईथे वाचा - http://www.maayboli.com/node/51894

....

आता भाग अंतिम

---

बोलावणे थेट प्रिन्सिपल सरांच्या केबिनमधून आले होते.. काय आणि कश्यासाठी याची ट्यूब पेटायला जास्त वेळ लागला नाही. पण हे घडले कसे???

आम्हाला आठवत होते की आम्ही सकाळी स्वत: रौशनला उठवून, त्याला ती रंगलेली भिंत दाखवून, त्याच्या हातात कापडाचा बोळा कोंबून, आंघोळ करायला हॉस्टेलचा रस्ता धरला होता. त्यानंतर त्याने आम्हाला खूप शिव्या घालत ते काम इमानईतबारे निभावले असावे अशीच आमची कल्पना होती. पण घडले होते ते भलतेच!..

रौशनने आमच्यावर डूख धरत ती भिंत न पुसता, थेट मुख्य कार्यालयात तक्रार केली होती. सोबत आमची नावेही स्वत:च दिली होती. बहुधा त्याला आधी घडलेल्या प्रकरणातही आमचाच हात असावा अशी शंका होती. त्याचाही हिशोब त्याने एकदमच सेटल करायचे ठरवले होते. काहीही का असेना, मित्रामित्रांमधील भांडणाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. शेवटचा पेपर लिहित होतो आम्ही,.. पण आता आमची सारी शैक्षणिक कारकिर्दच पणाला लागली होती!.

"रुनम्या, ते मी लिहिलेय, मीच जबाबदार आहे त्याला, जे काही होईल ते मी बघून घेईन. तू टेंशन घेऊ नकोस, आधी पेपर पुर्ण लिही" .. जित्याने मला परीक्षागृहातच आवाज दिला.

"बस काय जित्या,! मी नाही लिहिले कारण माझे अक्षर खराब आहे. पण यात आपण दोघेही सामील होतो. तर, आता जे काय होईल ते दोघांचेही" .. बस्स, आमच्या या संवादाने दोघांनाही तात्पुरता हुरूप आला आणि त्या हिंमतीवर आम्ही कसाबसा पेपर पुर्ण केला.

पण प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये त्यांच्यासमोर उभे असताना आम्हा दोघांचेही पाय लटपट कापत होते,..
"लाज वाटतेय मला आज तुमची... कॉलेजच्या दिडशे वर्षांच्या ईतिहासात कधी असे घडले नव्हते.." त्याही परीस्थितीत आम्ही चमकून एकमेकांकडे पाहू लागलो. कानांवर विश्वास बसत नव्हता. दिडशे वर्ष?? म्हणजे १८५७ चा उठाव आमच्याच कॉलेजातच झाला होता की काय?.. काही का असेना, पण हे प्रकरण पसरले तर यात कॉलेजची बदनामी होती एवढे मात्र खरे. आणि तसे झाल्यास आमची पिसे काढली गेली असती हे हि नक्की होते.

तिथून पुढच्या घडामोडी फार वेगाने घडल्या. आमचे आधीचे रेकॉर्ड चेक करण्यात आले. त्यात आम्ही दोघेही बरेपैकी हुशार मुले निघालो. पण त्याचबरोबर आमची हजेरीपटावरची दयनीय उपस्थिती देखील सामोरी आली. त्यानंतर आम्हाला शिकवणार्‍या इतर प्राध्यापकांना बोलावण्यात आले. दुर्दैवाने ज्यांना बोलावणे धाडले ते नेमके आमच्यावर डूख धरणारे निघाले. त्यांनी जित्याच्या व्यसनांचा आणि आमच्या एकंदरीत ग्रूपच्या टवाळकीचा पाढा वाचला. आता हि लढाई स्वत:ला सिद्ध करायची असल्याने मग मीच पुढाकार घेऊन प्रिन्सिपल सरांना ईतर काही शिक्षकांची मतेही घ्यायला सांगितली जी आम्हाला अनुकूल असण्याची शक्यता होती. आणि सुदैवाने तसेच घडले. मात्र ते शिक्षक देखील आम्ही असे कृत्य केले म्हणून व्यथितच झाले. पण त्याला आता ईलाज नव्हता. अखेरपर्यंत आम्ही नेटाने आमची हिच बाजू मांडत होतो की आम्ही हे रौशनला त्रास द्यावा याच हेतूने केले होते, जे तो सकाळी मेहनत घेऊन पुसेल अशी आम्हाला अपेक्षा होती, तसेच आधी घडलेल्या प्रकरणाशीही आमचा काहीही संबंध नव्हता. अखेरीस आमच्या गेल्या चार वर्षांचा लेखाजोखा आणि चारीत्र्याची माहिती घेतल्यावर प्रिन्सिपल सरांनी आमच्या या हेतूवर विश्वास ठेवायचे ठरवले आणि तसे आमच्याकडून एका कागदावर लिहून घेतले. खाली स्वाक्षरी करायच्या आधी मात्र त्यांनी एक वाक्य फेकले जे आम्हाला पुन्हा हादरवून गेले....

"जर त्या मुलीने पोलिस कम्प्लेंट केली.......... तर मात्र या प्रकरणात कॉलेज तुमची काहीही मदत न करता त्या मुलीचीच बाजू घेणार."... अर्थात हे योग्यच होते. आमचा हात दगडाखाली अडकला होता आणि तो दगड आम्हीच आमच्या हातावर ठेवला होता.

सुझायना!.. नाम तो याद रहेगा.. हे नाव आता आमच्या आयुष्यभरासाठी लक्षात राहणार होते. प्रिन्सिपल सरांच्या केबिनबाहेर पडल्यावर सर्वप्रथम आम्ही सुझायनाच्या कानावर हे प्रकरण गेले की नाही याचा शोध घेतला. पण त्यांचा पेपर उद्या असल्याने हे आता तिला उद्याच समजणार होते. पण कोणाच्या ना कोणाच्या मार्फत समजणार होते एवढे नक्की. अगदी कोणाच्या नाही तर आमच्याच क्लासमधील तिच्या मावसबहीण सेलिनाच्या मार्फत तरी नक्कीच समजणार होते.... मग का नाही सेलिनालाच विश्वासात घेऊन तिच्यामार्फतच हे सुझायनाच्या कानावर सौम्य पद्धतीने जाईल हे बघावे आणि सोबत आमचा माफीनामाही पोहोचवावा. तसेही आता वेळ पडल्यास पुर्ण कॉलेजसमोर सुझायनाचे पाय पकडायलाही आम्ही तयार होतो!..

रौशन मात्र या सर्वात कुठेही नव्हता. रौशनचा बदला घ्यायला म्हणून त्याला मारहाण केली तर त्याचे परीणाम वाईट होतील असा सज्जड दम आधीच आम्हाला प्रिन्सिपल सरांनी भरून झाला होता. अर्थात तसा काही आमचा विचारही नव्हता वा त्याच्याशी आता कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायची इच्छा नव्हती. आमच्या पुर्ण ग्रूपसाठी तो केव्हाच एक गद्दार म्हणून घोषित झाला होता!..

पण आम्ही सेलिनाच्या शोधात पोहोचलो तर तिथे आम्हाला वेगळेच चित्र बघायला मिळाले. रौशन आणि सेलिना आधीच कॅंटीनच्या आवारात चर्चेत मग्न होते. अर्थात या विषयावरच त्यांचे बोलणे चालू असावे. साहजिकच होते, एकदा का हे प्रकरण चिघळले तर ते रौशनलाही जडच गेले असते. तो देखील यात फसला असता. कारण सुझायनाच्या मागे मागे तो स्वत:ही आजवर लागला होता. सुझायनाला जर रागच काढायचा झाल्यास तिच्या द्रुष्टीने आम्ही दुय्यम ठरून तिने रौशनलाच सर्वप्रथम टारगेट केले असते. आणि या उपर हे प्रकरण आम्हा सर्वांच्या घरापर्यंत जाणे जसे आम्हाला परवडणार नव्हते तसे रौशनलाही मुळीच परवडणार नव्हते, कारण त्याचे वडील हे सामान्य सरकारी कर्मचारी होते.

ईतक्यात रौशनची नजर आमच्याकडे गेली. सेलिनानेही आम्हाला पाहिले. आम्हाला एक विखारी नजर देत रौशन तिथून सेलिनाला घेऊन निघून गेला. काय, कुठे, याचा पत्ता नाही लागला. संध्याकाळपर्यंत आमचा त्या दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.

दुसरा दिवस आमचा कमालीच्या तणावाखाली गेला. किंबहुना पुढचे चार-पाच दिवस तसेच गेले. कधीही कॉलेजमधून फोन येईल आणि आम्हाला बोलावणे धाडण्यात येईल अशी सतत भिती वाटत होती. अजून आमचा निकाल लागायचा बाकी होता, अजून आमच्या हातात लिविंग सर्टीफिकेट पडणे बाकी होते. आमच्या पश्चात या प्रकरणात काय घडामोडी घडत होत्या याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो. आणि अनभिज्ञ राहण्यातच धन्यता मानत होतो. उगाच ज्यादा हुशारी दाखवत खबर काढायला जायचो आणि शांत झालेले प्रकरण पुन्हा उकरून निघायची भिती होतीच.

पुढे दिवस गेले, महिने गेले. ईंजिनीअरींग झाल्याचे सर्टीफिकेट हातात पडले. नोकर्‍या लागल्या. वर्षे सरली. आणि आज अचानक ते प्रकरण भूतकाळात कुठेतरी विस्मरणात पडले असताना रौशन समोर उगवला होता. हसत होता, खिदळत होता. मजा घेत सारे सांगत होता. त्याच्या चेहर्‍यावर ना झालेल्या प्रकाराची खंत होती, ना कसला आकस होता. त्यानेही तो भूतकाळ मागे सोडला होता आणि या वर्तमानकाळात तो खूश होता!..

...

अखेर औपचारीक हस्तालोंदन करत आम्ही उपहारगृहातून उठलो. ते दोघे आपल्या रस्त्याला, आणि आम्ही आपल्या रस्त्याला लागलो. परतताना माझी विचारमग्न मुद्रा पाहून माझी ग’फ्रेंड मला म्हणाली, "जो होता है अच्छे के लिये होता है,.. रब ने बना दी जोडी,.. अखेर त्याचे लग्न सुझायनाशीच झाले ना...."

मी फक्त हसलो!...
उत्तरादाखल म्हणालो, "अंह, विनाशकाले विपरीत बुद्धी,.. ती सुझायना नव्हती, तर सेलिना होती!.."

- ऋन्मेऽऽष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण त्या रात्री मात्र त्या भिंती उभ्या आयुष्यात कधी नव्हे ते रंगणार होत्या!.. त्या देखील त्यांनी कल्पनाही केली नसेल अश्या प्रकारे रंगणार होत्या... <<< हे वाचल्यावर खून वगैरे होणार की काय असे वाटले. (कदाचित तुमचा मसाला जरा जास्तच झाला म्हणून असेल. :फिदी:)

तुमची वर्णन/कथन करण्याची शैली चांगली आहे.

पण त्या रात्री मात्र त्या भिंती उभ्या आयुष्यात कधी नव्हे ते रंगणार होत्या!.. त्या देखील त्यांनी कल्पनाही केली नसेल अश्या प्रकारे रंगणार होत्या... <<< हे वाचल्यावर खून वगैरे होणार की काय असे वाटले. >>>> मला पण हेच वाटले होते!!

राग तर त्याचा तेवढाच आला होता Angry
आणि दुसर्‍या दिवशी तर डब्बल झाला होता..
यारदोस्त नसता तर टायमाला केलाच असता... त्या काळी तेवढी चालायची आपली!

बाकी हिच्यावर लाईन मारता मारता बहिनीशी लग्न केलं यावरून कॉलेजमधला एक मित्र आठवला. बिचार्‍याने एका मुलीवर नित्यनेमाने चार वर्षं लाईन मारली. त्या मुलीने याच्या वडलांशी लग्न केलं. Lol

आमच्या अख्ख्या ग्रूपमधला हा सगळ्यात भयाण प्रेमभंग होता.. आम्ही त्याचं सांत्वन करता करता बेक्कार हसत होतो. एक मित्र मध्येच "तू कितनी प्यारी है तू कितनी भोली है" ओरडायचा आणि आम्ही परत तासभर हसायचो.

(लिहा, यावर एक क्रमशः कथा लिहा)

बिचार्‍याने एका मुलीवर नित्यनेमाने चार वर्षं लाईन मारली. त्या मुलीने याच्या वडलांशी लग्न केलं. >> अरे देवा...खरच भयाण प्रेमभंग !!

वडलांशी लग्न .. अविश्वसनीय पोपट...

पण यावरून एक लहानपणी पाहिलेला सिनेमा आठवला..

राजकुमारचा मुलगा कमल हसन हा हेमा मालिनीच्या प्रेमात पडून तिच्याशी लग्न करायला जातो...
त्याच वेळी हेमामालिनीची मुलगी पद्मिनी कोल्हापुरी राजकुमारच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करायला जाते..

हे करायला त्यांना नक्की कोणती अडचण येते देवास ठाऊक पण बहुधा शेवटी कोणीच लग्न न करता लिव ईन रिलेशनशिप मध्ये राहायचा निर्णय घेतात..

असो, बाकी फॉर ए चेंज यात कमल हसनने अ‍ॅक्टींग मात्र चांगली केली होती Wink

>>>> तळटीप - सदर कथेतील नावे आणि घटना काल्पनिक असून त्यात योगायोग आढळल्यास त्याला योगायोगच समजा. <<<< ओक्के,
>>>>> परतताना माझी विचारमग्न मुद्रा पाहून माझी ग’फ्रेंड मला म्हणाली, <<<<<
म्हणजे या वाक्यातील "माझी ग'फ्रेंड" देखिल काल्पनीकच ना? Proud

नाही त्या वाक्यातील `विचारमग्न मुद्रा' काल्पनिक... Happy
ग'फ्रेंड वरुणदेवाच्या कृपेने आयुष्यात बरेच आल्यात!

बिचार्‍याने एका मुलीवर नित्यनेमाने चार वर्षं लाईन मारली. त्या मुलीने याच्या वडलांशी लग्न केलं. >>> अशी खरी घटना उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मी खरी नावं टाळून ती घटन लिहतो, बघा आठवते का.

----

पुण्याच्या मेडिकल कॉलेजात शेवटच्या वर्शाला असताना बापानी गावाकडे एक मुलगी पाहिली व पोराकडे लग्नाचा तगादा लावला. पोराने मेडिकल मध्ये पोस्ट ग्रेज्यूएट करायचे आहे सांगून लग्नास नकार दिला. बापानी पुण्यात येऊन पोराला दमदाटी करुन पाहिली. पोरगी सुंदर असून कुठल्याहि परिस्थीतीत तीच सून म्हणून हवी असा हट्ट करुन पाहिला. सगळे उपाय करुन झाले पण पोरानी काही दाद दिली नाही. मग बापाला राग आला व त्यानी गावाला जाऊन थेट पोरीच्या बापाला म्हटले की माझा मुलगा नालायक असून तुझी पोरगी मला देत असशील तर मी खुद्द लग्न करायला तयार आहे. पोरीच्या बापानी हो म्हटले अन होऊ घातलेल्या सुनेशी म्हातार्‍यानी लग्न केले. जी बायको होणार होती ती आता त्या मुलाची आई बनली होति.

या तरून बायको कडून म्हातार्‍याला एक मुलगा व मुलगी झाली.

इकडे तो तरुण डॉक्टर झाला व काही दिवस प्रॅक्टीस करुन पुढे राजकारणात स्थीरावला. वैद्यकीय सेवे सोबत याला अजुन एक वेड होते ते म्हणजे व्यायामाचे. त्या काळात आपल्या पैलवानकीमुळे हा माणूस महाराष्ट्रात बराच गाजला होता. पवार साहेबांच्या कृपेनी डॉक्टर साहेबानी मंत्रीपदही भुषविले आहे. आज डॉक्टरची मुलही राजकारणात असून म्हातार्‍याचा प्लान बी चा अख्खा गणगोतही राजकारणात आहे.

आजच्या घडीला त्या दुसर्‍या बायकोची मुलगी महाराष्ट्रातील पहिल्या ५ नेत्या मधील एकाची बायको असून पुणे व परिसरातील जवळ्पास ५०% जमिनी विकत घेतल्याचे अधून मधून अरोप होत झेलत असते.

ओळखा बरं पाहू कोण आहेत ते?

तरुण डॉक्टरला राजकारणात आल्यावर खूनाच्या केस मधे सहभागी असण्याबद्दल अटक झाली होती का?>> बरोब्बर ओळखलात बघा.

मी नाही ओळखले, उत्सुकते पोटी बारामतीच्या माझ्या एका कलिग ला शेवट चा पॅरा वाचायला दिला, त्याने पॅरा पुर्ण होई पर्यन्त नाव आणि इतर माहिती ही पुरवली. Happy

<<<<ओळखा बरं पाहू कोण आहेत ते?>>>> आल लक्षात कोण ते . डॉ च्या उल्लेखाने ओळखता आल Happy

नंदिनी , कहर किस्सा Lol Proud Wink

<<<<तू कितनी प्यारी है तू कितनी भोली है">>>> Rofl

बिचार्‍याने एका मुलीवर नित्यनेमाने चार वर्षं लाईन मारली. त्या मुलीने याच्या वडलांशी लग्न केलं. >>>यावरून फेसबुक वरची एक धमाल पोस्ट आठवली ती जशीच्या तशी देतोय.537295_707294822637300_1747005957_n.jpg

Pages