मुलं - काही नोंदी

Submitted by मितान on 21 October, 2013 - 03:09

मुलं - काही नोंदी
गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळायला मिळतायत. आलिप्त राहून काम करायचे ठरवले तरी मनात अस्वस्थता दाटून राहतेच. लिहिल्याने थोडे बरे वाटेल असं वाटतंय म्ह॑णून हा प्रपंच..लिहिताना अर्थात त्या त्या व्यक्तींच्या खाजगीपणाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत आहे.

अवनी. वय १७.
गेली चार वर्षं दरवर्षी एक अश्या कुटुंबातल्या ४ व्यक्तींचा मृत्यू या मुलीने पाहिलाय. आता एकटी आहे. १२ वीत उत्तम गुणांनी पास झाली आहे. तिचा प्रश्न " माझ्या आजूबाजूची एकेक माणसं मरतायत आणि मी मजेत जगतेय.. मला नको असं जगणं.." स्वार्थी नातेवाईक, एकटेपणा, अकाली प्रौढत्व, मित्र मैत्रिणी आणि हिच्या जगण्याच्या शैलीतली तफावत, अपरिपक्व निर्णक्षमता अशा अनेक गोष्टींनी नैराश्याच्या गर्तेच्या तोंडाशी उभी ही !

नीरव,वय १९.
लहाणपणापासून प्रत्येक हट्ट पुरवला गेला. अकरावीत असताना अनेक व्यसने लागली. त्यातून बहेर पडला तेव्हा बारावीच्या परीक्षेला ३ महिने उरले होते.१० वीला ९२% मिळवणारा हा मुलगा १२ वीत कसाबसा पास झाला.हट्टी हेकेखोर स्वभाव मात्र तसाच आहे. लाड पुरवणे तसेच आहे. वडिलांचा व्यवसाय. आई नोकरदार. नीरव ने मागच्या आठवड्यात नवे गेम खेळण्यासाठी नवा लॅपटॉप मागितला. त्याला हवा असलेला लॅपटॉप मिळाला नाही तर आत्महत्येची धमकी दिली. घरातून दोन दिवस गायब झाला. वडिलांनी घाबरून लॅपटॉप घेऊन दिला. आई हतबद्ध !

रचिता. १५ वर्षे. घरात आईबाबांची सतत भांडणं. हिच्याकडे होणारे दुर्लक्ष हे या संवेदनशील मेधावी बुद्धिमत्तेच्या मुलीला सहन झालं नाही. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

सरयू.२१ वर्षे.
११ वर्षांपूर्वी दिल्लीतल्या एका डॉक्टरने ही स्लो लर्नर आहे असे सांगितले. मग स्पेशल स्कूल, रेमिडियल क्लासेस असे चक्र सुरू झाले. आत्ता टेस्ट केली तर बुद्ध्यांक सामान्यांपेक्षा वरचाच आहे. पण लेखनातली अध्ययन अकार्यक्षमता आहे असे आढळले. ही नुकतीच १० वी झाली. पुढे काय हा निर्णय घेता येत नाही.

संकेत आणि संध्या.
१४ वर्षे. एका महागड्या प्रसिद्ध कोचिंग क्लास मध्ये गेलं वर्षभर लैंगिक शोषणाला बळी पडलेली ही मुलं. आई बाबांचे खूप पैसे वाया जातील असे वाटल्यामुळे सहन करत राहिली. असह्य झाल्यावर बोलण्याचे धाडस केले.

विरेन.१४ वर्ष.
अती बुद्धिमान. त्याच्या मते ही शिक्षणपद्धत, राजकारण, समाजरचना 'होपलेस' आहे. त्याला याचा भाग होण्याची इच्छा नाही. त्याने शाळेत येणं सोडून दिलंय. गेले सहा महिने केवळ शास्त्रीय संगीत ऐकतोय. कोणाशीही संवादाची इच्छा नाही.

अक्षता. १५ वर्षं.
गेली २ वर्षं तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या असणार्‍या मुलाच्या प्रेमात(?) आहे. आता त्याला दुसरी मैत्रिण भेटली आहे. म्हणून हिने अभ्यास शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला.हट्टाने घरातून बाहेर पडली नि होस्टेलवर आहे. तिथे तिच्याबद्दल चोरीच्या तक्रारी पुराव्यांसह येताहेत.

रीमा. वय ८.
कॉलनीत एक टोळी आहे. त्या टोळीची ही लीडर. ५ ते ८ वयातल्या या मुली रोज ठरवून एकीच्या घरून पैसे चोरून आणतात. ते जंक फूडवर खर्च करतात. जी मुलगी याला विरोध करेल तिला वाळीत टाकलं जातं. पालक हैराण..

अर्णव.वय ६. आई सतत आजारी असते म्हणून त्याला ती अज्जिबात आवडत नाही. घरी असलेल्या वेळापैकी ६-७ तास हा टी व्ही किंवा व्हिडिओ गेम्स खेळतो. ते बंद केले तर याला खूप उलट्या सुरू होतात. हे व्यसन कसं घालवायचं या संभ्रमात पालक.

निधी. वय ५. दत्तक मुलगी. आई बाबा ५० च्या वरचे. ही चंचल आहे. दिवसाला ३ बिस्किटांशिवाय काहीही खात नाही. अचानक अंथरुण ओले करणे सुरू झाले आहे. बोलण्यात तोतरेपणा यायला लागला आहे.

अंकुर. वय ४. बोलत नाही ही तक्रार घेऊन पालक आले. चाचणीनंतर समजले तो कर्णबधीर आहे. आई म्हणाली आमच्या लक्षातच आलं नाही.

राधा . वय ६.उत्तम चित्र काढते. अचानक तिने घरावरून वाहणारी नदी आणि घराखाली जळणारे डोंगर एवढीच चित्रं काढायला सुरुवात केली आहे. पालकांना समुपदेशकाकडे यायला गेली ५ महिने वेळ मिळत नाही.

सारिका वय ११
वर्गात शेजारी कोणालाही बसू देत नाही अशी सतत तक्रार. आई सांगते घरीही कोणाला हात लावू देत नाही. आणि सतत हात धूत असते. लाईटच्या बटणाला हात लावताना बोटाला रुमाल गुंडाळायचा. बेसीनमध्ये हात धुताना आधी नळावर वारंवार पाणी टाकायचं, दार उघडलं की हात धुवायला पलायचं.... दिवसातून ३४ वेळा हात धुतल्याची नोंद केली आहे त्यांनी ! दोन वर्षांपूर्वी एका सहलीत तिला कोणीतरी 'बॅड टच' केला होता म्हणाली. तेव्हापासून तिला कोणत्याही स्पर्शाची भिती वाटते. मामाने गालाला हात लावलेला तर सहनच होत नाही.
आई वडील अल्पशिक्षित श्रीमंत. ' तिच्यावर वाटेल तेवढा पैसा खर्च करतो पण हे खुळ तिच्या डोक्यातून काढा " असे म्हणतात. त्यांच्याजवळ पैसा आहे. पण संवाद साधण्यासाठी वेळ नाही. Sad

केतन. वय १७.
वडील एका अती महत्त्वाच्या सरकारी खात्यात उच्चपदस्थ आहेत. आई मानसशास्त्राची पदवीधर. दोघेही अतिशय प्रामाणिक आणि सरळ साधे जगायला आवडणारे. केतनचा स्वभावही साधा. काहीसा भाबडाच. आता त्याला त्याचे मित्र 'सरकारी तोर्‍यात रहा, गाड्या वापर, पैसे उधळ.." असा आग्रह करतात. आई बाबा समजावून बोलून थकलेत. केतनला मित्र हवेत म्हणून त्यांचे ऐकावे लागेल असे ठामपणे वाटतंय. तो आता घरातून किरकोळ चोर्‍या करायला लागला आहे. स्वतःच्या स्टेटस साठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करतोय. बाबांना ते अजिबात मान्य नाही. याच्या काळजीने ते त्रस्त आहेत.

संकल्प, वय १२
आई बाबा दोघे नोकरीवर गेल्यावर घरी एकटा असताना इंटरनेटवर पॉर्न पाहण्यात आले. मग आवडले. मग वारंवार बघण्याची सवय लागली. बाबांना समजल्यावर खूप मार खावा लागला. आता घरात नाही बघत. सायबर कॅफे मध्ये बघतो. त्यासाठी लागणारे पैसे चोरतो. दिवास्वप्नात राहणं खूप वाढलंय. भाषा आणि नजर बदलली आहे. तो आता मुलामुलींना नको तिथे स्पर्श करण्याची संधी शोधत असतो. आई बाबांच्या पापभीरु विश्वाला हा प्रचंड मोठा हादरा आहे. ते म्हणाले की आम्ही त्याचा तिरस्कार करतो. ही चटक संकल्पला विकृत बनवतेय. कळतंय पण वळत नाही. तो एकटा पडलाय.

मृण्मयी वय १५.
दहावीत शिकणार्‍या मृण्मयीच्या आई बाबांचा घटस्फोट होतोय. मार्च मध्ये शेवटची सुनावणी आहे. ती आईच्या पाठीशी ठाम उभी आहे. बुद्धिमान आहे. कष्टाळू आहे. आता तिला ताण आहे तो लोकांच्या प्रश्नांचा, मित्रमैत्रिणी दुरावण्याचा. तिला निद्रानाशाचे निदान झाले आहे.

सारंग, वय ८
मोठ्या एकत्र कुटुंबातला मुलगा. आई बाबा आपापल्या व्यवसायात मग्न. आई त्याला भेटतच नाही. सकाळी ८ ते रात्री १०-११ ती ऑफीसात असते. सारंग भेटला की मनातल्या अपराधीपणाला घालवण्यासाठी वाट्टेल ते लाड होतात. आता शाळेतून तक्रारी येतायत. आई सोडून सारंगचा आवाज कधीच कोणी ऐकला नाही. माझ्याकडे पहिले सेशन झाले तेव्हा ४० मिनिटांनी पहिला शब्द त्याने उच्चारला. "बाय" !
आता आपणहून येतो. समोर नुसता बसतो. चित्र काढतो. मेकॅनो किंवा टूलकिट काढून खेळतो. अवघड पझल्स लीलया सोडवतो. बाय म्हणतो नि जातो.

निनाद, वय ८
६ महिन्यांपूर्वी अचानकच याच्या समोरच याची आजी गेली. तेव्हा घरात निनाद नि आजीच. याने आईला फोन केला. " बहुतेक आजी वारली. कारण ती आता जप करत नाहिये."
निनादला तान्हा असल्यापासून आजीनेच सांभाळलं. काहीशी अती काळजी घेणारी पण शिस्तीत नि प्रेमळ धाकात वाढवणारी आजी निनादसाठी सर्वस्व होती.
ती गेल्यानंतर निनाद रडला नाही. सकाळी उठल्यापासून जी कामे आजी करायची ती स्वतःहून करायला लागला. रांगोळी, पूजा, स्वतःची आंघोळ.... आई बाबांशी संवाद नाही. चिडणे नाही. बोलणे नाही. अभ्यास उत्तम. शाळेतून काही तक्रार नाही.

अकल्पिता, वय ४
घरात आई बाबांचे सतत होणारे वाद बघते. बहुतेक मारहाणही. एक दिवस शाळेत तिच्या मनाविरुद्ध काहीतरी झाले म्हणून हिने शिक्षिकेसमोर बेंचवर स्वतःचे डोके आपटून घेतले. सगळा वर्ग स्तब्ध ! शिक्षिका हतबद्ध ! आता तिने पुन्हा असे करू नये म्हणून घरात नि वर्गात सगळे तिच्या मनासारखे वागतात. तरीही अकल्पिता आनंदी नाही.

मनाच्या जंगलात हरवलेली ही मुलं सतत काहीतरी सांगू पहातायत. ते आपल्याला कधी ऐकू येणार ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका ब्रेकमध्ये वर्गाबाहेर टेन्शन न घेता पेपर लिही. असं सांगितलं, तेव्हा तो म्हणाला की बाकीची मुलं माझं डोकं फिरवतात. त्यमुळे अभ्यास लक्षात राहत नाही. बाकीच्या मुलांकडे दुर्लक्ष कर असं सांगायचा प्रयत्न केला.
काही वेळाने मला कळले की काही मुलांच्या एका टोळक्याकडून त्याला रॅगिंगचा त्रास होत होता आणि त्या दिवशी सकाळीच नववीतला हा मुलगा ढसाढसा रडला होता. सुदैवाने ऑर्फनेजमध्येच राहून मोठा झालेला, सध्या कॉलेज शिकणारा आणि ऑर्फनेजच्या ऑफिसचे काम बघणारा एक मुलगाच (आता तरुण) [जो आमच्यापुरता(व्हॉल्युन्टीअर ट्युटर्स) डि-फॅक्टो इन-चार्ज आहे] त्याने हे प्रकरण हाताळले. त्यानंतर त्या मुलाचे टेन्शन कमी झाल्यासारखे वाटले.>>>>

भरत, हे बुलींग आहे . शाळेत याविषयी काही रुल्स नाहीत का? तुम्ही व्यवस्थापनाकडे याबाबतीत आग्रह धरु शकाल का? ज्या मुलांनी त्याला त्रा द्यायचा प्रयत्न केलाय त्या मुलांना शाळेच्या पॉलिसीज बाबतीत एकदा क्ल्पना दिली तर पुन्हा हा प्रकार होणार नाही.
ज्याच्यावर बुलींग होत आहे त्या मुलाला "लक्ष देवू नकोस" असे सांगु नका." (तुमचा हेतु चांगला असला तरी) त्यामुळ एकप्रकारे बुलींगला चालना दिल्यासारखे होते. त्या ऐवजी ,तक्रार कर, नावे कळव, ऑथॉरिटीजना इन्व्हॉल्व्ह करुन घे हे सांगण जास्त योग्य आहे.

तुम्ही फार उत्तम काम करत आहात. म्हणून सांगावस वाटल. आपल्याकडे दुर्दैवाने अजुनही ह्याविषयी लॉज नाहीत का? नसतील तर फार खेदाची गोष्ट आहे.

ज्याच्यावर बुलींग होत आहे त्या मुलाला "लक्ष देवू नकोस" असे सांगु नका." (तुमचा हेतु चांगला असला तरी) त्यामुळ एकप्रकारे बुलींगला चालना दिल्यासारखे होते. त्या ऐवजी ,तक्रार कर, नावे कळव, ऑथॉरिटीजना इन्व्हॉल्व्ह करुन घे हे सांगण जास्त योग्य आहे>>>

करेक्ट! माझा मुलगा काइंड ऑफ रेशिअल बुलिंग मधून जात असताना मी त्याला समजून घेऊन साथ देण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, कधी कधी तर रंगावरूनही बुलींग होऊ शकते. त्याने शांतपणे ह्याला तोंड दिले, आता तो नॉर्मल आहे.

सीमा, लक्ष देऊ नको सांगितलं तोवर काय प्रकार चालला आहे ते मला कळले नव्हते. (मी म्हटले तसे माझीही शिकण्याची प्रोसेस चालूच आहे). त्याचे गांभीर्य योग्य त्या व्यक्तीला तोवर कळले होते आणि "तक्रार कर, नावे कळव, ऑथॉरिटीजना इन्व्हॉल्व्ह करुन घे" या तोन्ही गोष्टी झाल्या होत्या.
हा प्रकार शाळेतला नव्हे तर ऑर्फनेजमधला आहे. त्यांचे या बाबतीतले नियम अतिशय स्पष्ट आणि कडक आहेत. तरीही असे काही प्रकार होतच असतात.

ऑर्फनेजमधल्या मुलांना बाहेरून काही विकत आणणे शक्य नसते. पण शाळेतल्या (स्वगृही राहून शाळेत शिकणार्‍या- त्यांना डे-स्कॉलर्स म्हणतात) मुलांकरवी गुटखा, तंबाखू त्यांच्यापर्यंत पोचतो.

हे आणखीने एक : जिया खानच्या आत्महत्येच्या बातमीने मुलांमध्ये आत्महत्येबद्दल विचित्र कतूहल निर्माण झाले आहे. It's a cool thing असे त्यांना वाटतेय की काय अशी शंका यावी इतके. सामान्यज्ञान वाढावे म्हणून त्यांना वृत्तपत्रे वाचायला दिली जातात,

मितान उत्तम लेख. आशु२९ म्हणतेय तसे स्वतःलाच जोखुन बघता येतेय.
स्वातीताई उत्तम पोस्ट्स. अगदी मिट्ट अंधारात दिवा उजळावा अशा पोस्ट्स आहेत तुमच्या.

दक्षिणा Uhoh अग,मितानने लिहिलय ना खाजगीपणाला धक्का न लागु देता इ. इ.

Sad

पालकांनी मुलांशी कश्या प्रकारे संवाद साधावा, त्यांना लहानपणापासून कशा प्रकारे बोलते करावे, कसे नाते प्रस्थापित केले असता मुले मोकळी होतात याबद्दल तुझे अनुभव, निरीक्षण, मत जाणून घ्यायला आवडेल. >>> +१

>>>मितान
माफ कर पण मला हे असं सगळ्या मुलांबद्दल इथे लिहिलेलं नाही आवडलं. कुणितरी विश्वासानं तुला काहीतरी मनातलं सांगितलंय आणि तु ते चक्क इथे ओपन फोरमवर लिहिलंयस. कौन्सिलिंगचा पहिला नियमच गोपनियता हा आहे. आणि तो इथे मोडला गेलाय असं मला वाटतंय.,
भले ही आम्ही यातल्या एकाही मुलाला ओळखत नसू.... पण तरिही एक कौन्सेलर म्हणून हे योग्य नव्हे.
ह्या सर्व केसेसचा (नावं न लिहिता) एक लेख करून तु इथे त्यावर सोल्युशन म्हणून काही टाकलं असतस तरी तो लेख उत्तम झाला असता. इथे तर नुसत्याच समस्या दिसतायत.
शिवाय तुला असंही वाटलं नाही की इथे आपण त्या मुलांचे प्रश्न मांडतोय तर निदान त्यांची नावं तरी बदलून टाकावीत. आणि बदलली असलीस तर तशी टिपही दिसली नाही मला लेखाच्या शेवटी.
असो.>>>>>
दक्षिणा, खाजगीपणाची टीप टाकली आहे. त्यात नावंच नाही तर कौ. पार्श्वभूमीबद्दलही गोपनीयता आहे. त्यामुळे मला त्यात काही गैर वाटत नाही. इतरही कुणाचा आक्षेप नसावा हे इथे झालेल्या उत्तम चर्चेवरून दिसतंय. तरीही तू म्हणतेस तसं स्पष्ट " या लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत. " अशी टीप टाकत जाईन इथून पुढे.
काउन्सेलर म्हणून मी काय करत आहे, काय करायला हवे याची मला पूर्ण जाणीव आहे. कोणत्याही नियमाचे उल्लंघन मी केले नाही याविषयी खात्री बाळग. गोपनीयतेच्या नावाखाली आमच्या क्षेत्रात जे गैरप्रकार चालतात याविषयी मी तुला सांगायला नको. त्या गोपनीयतेच्या नावाखालीच आजवर हे क्षेत्र लोकांपासून दूर राहिलंय. मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा, माझ्या क्षेत्राबद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
वर्तमानपत्रात मुलांवरील अत्याचाराच्या बातम्या येतात. त्यात तो राहात असलेल्या भागाचे नाव, घराचे वर्णन, आरोपीचे नाव सगळे असते. ज्यावरून पीडित मूल कोण हे सहज कळू शकते. त्याबद्दल तुझे काय मत आहे ?
हे लेखन प्रत्येकाला योग्यच वाटले पाहिजे किंवा आवडलेच पाहिजे हा आग्रह नाहीच. तुझ्या प्रश्नामुळे कदाचित इतरांच्याही गोपनीयतेसंदर्भात शंकेचे निरसन होईल म्हणून स्पष्टीकरण लिहिले. खरं तर याची आवश्यक्ता मला वाटत नव्हती. असो.

इथे या चर्चेत भाग घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार. या निमित्ताने तुम्ही मुलांच्या समस्येवर आपले प्रकट चिंतन केलेत, उपायांच्या दिशेने जाणारे विचार मांडले त्याबद्दल खूप आनंद होतोय.पालक मुलांचा संवाद, शिस्त, शिक्षा आणि कौतुकाच्या पद्धती अशा अनेक विषयांवर एवढीच उत्तम चर्चा होऊ शकते. चर्चा प्रवर्तक म्हणून काम करायला आवडेल.
स्वाती२, मयेकर, आगाऊ तुमचे चर्चा पुढे नेल्याबद्द्ल विशेष आभार. Happy

पुढच्या लेखाचा विषय या चर्चेतून आलाच आहे. लिहिते.

काल इथल्या फॅमिली सर्विसचे मेंटर ट्रेनिंग होते. ट्रेंनिंग द्यायला आलेल्या बाई म्हणाल्या की मुलांच्या वर्तन समस्या या ९०% पालकांमुळे असतात. पालकांना कसे रिअ‍ॅक्ट करायचे हे शिकवले तर काम खूप सोपे होते. पण पालक बरेचदा यासाठी तयार होत नाहीत. 'आम्ही मुलांसाठी एवढे राबतो...' हीच टेप असते. त्यातून शिकायला तयार झाले तर त्यांना इंस्टंट रिझल्ट हवा असतो. सेट झालेला वर्तनाचा पॅटर्न बदलायला दोघांनाही वेळ लागणार आहे, मुलं तुम्हाला टेस्ट करतील हे पालकांना वारंवार सांगावे लागते.

लेख आधीच वाचला होता पण काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हतं.
सुन्न करणार्‍या आहेत केसेस. तुमचे काम अतिशय मोलाचे आहे.
लेख अतिशय उपयुक्त आहे. आमच्यासारख्या पालकांना, शारीरिक आरोग्याबरोबर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठीही तितकंच सजग असायला हवं ही जाणीव यातून वाढीला लागेल. मनापासून धन्यवाद.

ज्ञाती +१..
मितान लिहीत रहा..

स्वाती२, तुमची आधीची मुद्देसुद पोस्ट खुप आवडली

ज्ञाती +१..

>>मितान
मी लोकांपर्यंत पोहोचण्याचा, माझ्या क्षेत्राबद्दल माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.>>
या प्रयत्नाबद्दल तुझे खूप आभार आणि खूप कौतूक Happy

आज वाचले.........

बापरे..............हे असले देखील प्रकार होतात......... Sad .........विश्वासच बसत नाही

मितान, हे लेखन वाचूनच सुन्न झाल्ये आहे. तुला नक्की हाय पेशन्स आहेत. ही अशी गुंतागुंतीची भेंडोळी रोज सोडवण्याचा तुझा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. यू गो गर्ल!

खरं सांगायचं तर मला धक्का नाही बसला. Sad पालकांना मुलांवर ते फ्रस्ट्रेशन काढतांना पाहीलय. काहींना 'तुमच्यापाशी वेळ नाही हा मुलाचा दोष नाही. मुलांच्या नॉर्मल वेगानं त्यांची कामं, खेळगडीपणा चालतो' हे स्पष्ट समोरच सांगितल्यावर अचानक नविन काहीतरी समजल्यासारखं/अपराधी वाटतं. (याचं मला खूप आश्चर्य वाटतं) काहींना पटत नाही.

मितान, तुमच्या कामाची समाजाला खूप गरज आहे. इन जनरल टीप्स, तसं काहीतरी पुढे वाचायला मिळालं तर सगळ्यांनाच उपयोग होईल.

मितान, प्लिज लिहिणे थांबवु नकोस.

तुझ्या प्रामाणिकतेबद्दल कणभरही शंका नाही व तु कुठल्याही गोपनियतेचा कधीही भंग करणार नाहीस हे तु कोणतीही टीप लिहिली नसतीस तरीदेखील माहीत होते.

पुढील लेखाची वाट पहात आहे. आणि प्लिज पालकांनी पण कसे वागावे/वागु नये हे पण उदाहरणादाखल लिहिशील.

मितान, समस्या चांगल्या प्रकारे लिहील्या आहेत आणि इथली चर्चाही अतिशय विचारप्रवर्तक .. पुढच्या लेखनाची वाट बघत आहे ..

खूपच आय ओपनिंग लेख आहे हा . मितान अजून पुढे लिहिच गं. जगात काय काय प्रॉब्लेम्स आहेत या चिमुरड्यांसमोर ते तरी लक्षात येईल सगळ्यांच्या.

खरंच अतिशय सुन्न करणार्‍यासाहेत या सगळ्या केसेस. उमलत्या वयात अगोदरच शारिरीक आणि मानसिक बदलांना ही पिल्लं सामोरं जात असतात आणि त्यात अशा एकेक प्रसंग घटनाची त्यात भर पडते की त्यांच जगच ढवळून निघते सारे..

एक काउन्सेलर म्हणून निश्चितच तुमचा रोल महत्वपूर्ण आहेच याबद्दल अज्जिबात दुमत नाही.

अतिशय चांगला लेख! अजून वाचायला आवडेल. नक्की लिहा मितान. धन्यवाद! Happy

मितान, समस्या चांगल्या प्रकारे लिहील्या आहेत आणि इथली चर्चाही अतिशय विचारप्रवर्तक .. पुढच्या लेखनाची वाट बघत आहे ..>>+१

खूप सुन्न झाले मी, काही गोष्टींची कल्पनाच करता येत नाही.

लिहित राहा मितान, वाचायला आवडेल.

Pages