"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

Submitted by सौ. वंदना बर्वे on 30 December, 2012 - 21:51

"सगळं विजोड असूनही संसार का टिकतात?"

चिटक्या मोडता मोडता निलमने सोडलेली पुडी बऱ्याच वादांना जन्म देऊन गेली. तसं पहायला गेल्यास अनुरूपता ही कुठल्याच जोडप्यात असत नाही. बहुतांशी जोडपी ही विजोडच असतात. तशी ती असावी अशीच बहुतेक त्या नियंत्याची योजना असावी.

एकेकीचे अनुभव कथन तर फारच विलक्षण होते. "आमगेलो हो", "घो म्हणपाचो ना", "मावशेक ना म्हणचे पड्टा म्हणोन आवयन हय म्हटलें आनी हांव त्रासान पड्ले." इथपासून ते "सामको बोणेर", "भाणशिरें", "मात्तूय अक्कल म्हंटा ती ना" इथपर्यंत स्वत:च्या यजमानाची संभावना या बौध्दीक चर्चे दरम्यान झाली. आम्ही स्त्रिया जे संसारासाठी भोगतो ते सहसा मी पुरूष म्हणणाऱ्या कर्तृत्ववान माणसासही सहजी जमणार नाही. मला मान्य आहे की आम्ही सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात फारसं काही नाही करत. आम्ही लहान आहोत. आमचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. पण घर संभाळणारी स्त्री ही उच्चपदस्थ स्त्री किंवा कर्तृत्ववान स्त्रीपेक्षा दुय्यम असते, हे म्हणणं पटत नाही. भले गृहीणेचे प्रोब्लेम्स काम करणाऱ्या स्त्रीहून निराळे असतील पण प्रोब्लेम्स असतातच. अगदी लहान लहान अडचणी असतात. गृहीणीचा झगडा हा नित्यनूतन आणि नित्यनवा असतो. अनुरूपतेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना शब्दांच्या कोंदणात नाही मांडता येत. म्हणूनच त्यांच्या प्रतिक्रिया ह्या थेट येतात.

बहुतेक मैत्रिणींचा म्हणण्याचा सूर हा मी आहे म्हणून संसार चालला आहे असाच होता. बहुतांशी ते खरच आहे. जसे समाजाला सांसारिक स्त्रीच्या लहानसहान अडचणी समजत नाहीत तसेच लहानसहान त्यागही समजत नाही. गृहीणीला कायम गृहीतच धरलं जातं. त्यामानाने नोकरी, उद्योग करणारी स्त्री ही थोडी तरी दुय्यमतेच्या मर्यादा ओलांडते. काही ठिकाणी तर ती कमावते तरीही दुय्यमच राहते.

विजोड असण्याचे अनेकविध अनुभव ऐकायला मिळाले. सगळं नीट नेटकं, व्यवस्थित ठेवणाऱ्या स्त्रीचा जोडीदार कमालीचा अव्यस्थित. त्याला सकाळी बाहेर जाताना चपलांची आठवण होते तेंव्हा काल घरी परतल्यावर भिरकवटलेल्या होत्या हे नाही आठवत. अशा नवरोबाला, बायकोला किमान दिवसातून पंचवीस वेळा हाका माराव्या लागतात. नमुनेदार उदाहरण म्हणजे अंघोळीला जाताना टॉवेल घेउन न जाणं, अंग पुसायची वेळ झाली की मग त्याची आठवण होणं. दिवसभरात अशा गोष्टींची यादीच असते. कंजुष स्त्रीला उधळ्या नवरा मिळतो तर उधळ्या स्त्रीला कंजुष नवरा. सडपातळ स्त्रीला ढेरपोट्या जाड्या नवरा व सिक्स पॅक अ‍ॅब असलेल्या नवऱ्याला, वन पॅक थ्री टायर स्त्री. कुठे शारिरीक ठेवण विजोड असते तर कुठे विचार विजोड असतात. मला हाच प्रश्न नेहमी पडतो, असं पराकोटीचं विजोडत्व असूनही आधीच्या काळी संसार कसे वर्षानुवर्षे टिकून रहात? व थोड्या प्रमाणात आत्ताही कसे टिकून आहेत?

नवरा बायकोचा संसार टिकण्यासाठी परस्परांविषयी आदर असणे, प्रेम असणे अत्यंत आवश्यक आहे.

शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते. म्हणूनच जोडीदारामध्ये एकमेकांची कार्यक्षेत्रे भिन्न असली पाहिजेत. भिन्नत्व आदर निर्माण करतच असही नाही. उलटपक्षी असूया उत्पन्न होऊन दुय्यम स्थान देणे किंवा हेटाळणी करणे हेच प्रकार जास्त अनुभवास येतात. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या नवऱ्याला बायकोचा जास्त पगार खुपतो किंवा तिचे त्याच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या पदापेक्षा, तिच्या नोकरीच्या ठिकाणी उच्चपदस्थ असणे असह्य होते. बऱ्याचदा अशा बायकोने केलेली साधी संसारोपयोगी सुचनासुध्दा नवऱ्याला "डॉमिनेटिंग" वाटते.

प्रेमविवाह हे संसार सुखी करतात हे देखिल काही प्रमाणात सत्य असलेलं गोड अर्धसत्य आहे. विवाहानंतर जोडीदाराविषयी निर्माण झालेलं प्रेम हे बऱ्याच अंशी संसार टिकवून ठेवतं. लग्नाआधी एकमेकांना समजून घेतलं, आवड निवड, स्वभाव अनुरूप आहेत की नाही ह्याची चाचपणी केली तर पुढे संसार सुखी होतो असा समज आहे. प्रेम असण्यात तशीच अपेक्षा असते. पण गंमत म्हणजे लग्नाआधी प्रेम असतं तिथे नेहमी चांगलीच बाजू बघितली जाते. लग्नानंतर जोडीदाराची वाइट बाजूच दिसू लागते. अवास्तव अपेक्षा व तडजोड ही प्राधान्यक्रमाने प्रेमात घडते. लग्न झाल्यावर संसारात प्राथमिकता बदलत जातात. लग्नाआधी चांद तारे तोडून आणायला तयार असणारा प्रियकर नवरा झाला की साधी कोथिंबिरीची जुडी आणायलाही कचरतो. "विवाहप्रेमात" म्हणजे विवाह झाल्यानंतर जिथे प्रेम निर्माण होतं ते अनेक सांसारीक अनुभवानी समृध्द होत जातं. जोडीदाराची ती सवय नाही, तसा स्वभाव नाही तरी देखिल दोघेही एकमेकांच्यासाठी आपापल्या सवयींना, स्वभावांना मुरड घालतात हीच भावना प्रेम जुळवत जाते. जोडीदार गुणदोषांपलिकडे जाऊन आवडायला लागतो. हे आवडणं, हेच प्रेम टिकतं. विजोडत्वाकडून अनुरूपतेकडचा हा प्रवास खडतर, भांडणानी भरलेला असला तरीही नात्यांची वीण घट्ट करणारा असतो. हे खरं "मी" पासून "आम्ही" होणं असतं, खरं अनुरूप होणं असतं.

चर्चेच्या ओघात नवऱ्याला नावं ठेवणाऱ्या मैत्रिणी, "तसं असेल तर नवऱ्याला सोडून का नाही देत?" ह्या प्रश्नावर बुमरॅंन्ग झाल्यासारख्या त्याचे चांगले गुण सांगू लागल्या. लोकांनी कायम वापरूनच घेतलेला "भाणशिरें" नवरा मुलांच्यावर जीवापाड प्रेम करणारा होता. व्यवहारशून्य "बोंडेर" नवरा बायकोच्या आजारपणात रात्र रात्र जागून काळजी घेणारा होता. तोडून टाकावं हा पर्याय न स्विकारण्यासाठी त्यांच्या पोतडीत बरेच अनुभव, गोष्टी होत्या. पदरही जळू नये आणि निखाराही विझू नये असा पदर होता.

"लोक काय म्हणतील", "इतकी वर्ष झाली लग्नाला आता काय तोडायचं नातं" असेही सूर होते. घटस्फोटितेकडे पाहण्याची समाजाची नजर ही दुषित असते. सामाजिक असुरक्षितता संसार टिकून राहण्याचं कारण होतं. काडीमोड झाल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याएवढं शिक्षण, तेवढी धमक नाही म्हणून संसार चाललेला होता. संसार तोडला तरी आणि टिकवला तरी हाल हे स्त्रीचेच होतात. तिलाच दोषी धरलं जातं. दारूपायी महिना पंचवीस हजार जोडून आणणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी होता. त्यातही पुन्हा दिवसरात्र मारबडव, मुलगा नाही म्हणून सासूचा छळवाद. ना सुटकेला केलेले संसार हे असून नसल्यासारखेच असतात. नाण्याची ही दुसरी बाजू विषण्ण करणारी होती.

अनुरूप नसणे हा सहजीवनातला, संसारातला दोष नाही. एकमेकांच्या कष्टाची जाणीव, तडजोडीची जाणीव, आदर, प्रेम हे संसार टिकवतात, फुलवतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रतिसादक, पहिली पोस्ट अतिशय संतुलित वाटली आणि आवडली. दुसऱ्या पोस्ट मधलं हे वाक्य वाचताना डोक्यात जरा 'बीप' वाजले आणि काही प्रश्न मनात आले.

हे सर्व नाईलाजाचे तत्वज्ञान आहे ज्यातून प्रगतीची संधी शून्य उरते असं मला वाटतं.

आपण वंदनाताईना सतत आणि १०० टक्के तडजोड असं अभिप्रेत आहे असं गृहीत धरतोय का? त्यांचं खरंच तसं मत असेल तर वरचं वाक्य पूर्णपणे पटतं. त्याचवेळी असं वाटतं की तडजोड ही adaptibility कडे नेणारी असेल तर हे निसर्गातून आलेलं तत्वज्ञान नव्हे का? त्यातही प्रगतीची संधी शून्य उरते की केवळ काही लोकांना ती दिसतच नाही आणि तात्पुरत्या तडजोडीने थोडी उसंत आणि शांतता मिळते, भांडणात वाया जाणारी शक्ती वाचते त्याचा मुत्सद्दीपणे फायदा करून घेता येत नाही? ते प्रत्येक जण तडजोडीकडे इच्छित स्थळी पोहोचण्याचा वेगळा मार्ग म्हणून पाहतो की अंतिम ध्येय म्हणून पाहतो यावर अवलंबून नाही का? शिवाय प्रगती कशाला म्हणायचं हा वेगळा वादाचा विषय होऊ शकतो कारण ती भौतिक, कौटुंबिक, सामाजिक, आध्यात्मिक अशी वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते.

वरदा यांची पोस्ट पटली आणि आवडली. एकूण चर्चेला चांगली स्टेशनं लागतायत, आता जरा खिडकीची काच खाली करायला हरकत नाही Happy

@ मुंगेरीलाल
पहिली पोस्ट आवडल्याचे कळवल्याबद्दल आभार.
दुस-या पोस्टसंबंधी ..
आपण वंदनाताईना सतत आणि १०० टक्के तडजोड असं अभिप्रेत आहे असं गृहीत धरतोय का? त्यांचं खरंच तसं मत असेल तर ...
यातून आपल्याला काय म्हणायचे आहे हे नेमके ध्यानात येत नाही.

हे सर्व नाईलाजाचे तत्वज्ञान आहे ज्यातून प्रगतीची संधी शून्य उरते असं मला वाटतं.>>> ही संपूर्ण पोस्ट विचारात घ्यावी. तसंच आधीच्या पोस्टला जोडून पाहील्यास आपल्याला लक्षात येईल. मनाविरुद्धच्या आयुष्यात हाती काही नसेल तेव्हां हे तत्वज्ञान जगणे सुकर करण्यास सहाय्यभूत ठरते असे आधी म्हटलेच आहे. प्रश्न असा आहे कि या परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर वेगला व्चार करता यायला हवा. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळात आजूबाजूचा समाज अशाच प्रकारच्या तडजोडवादी तत्वज्ञात आनंदी होता. या वातावरणात त्यांच्या डोक्यात वेगळा विचार येणे आणि तडजोड नाकारून रूढी व परंपरांविरुद्ध जाऊन पत्नीस शिक्षित करणे, स्त्रियांसाठी शिक्षण सुरू करणे, बालविवाह, केशवपण नाकारणे, विधवा पुनर्विवाह सारखे उपक्रम चालू करणे यामुळे आजच्या महिलांची प्रगती झालेली आहे.

हा प्रगतीचा विचार ज्यांनी आत्मसात केला त्यांची प्रगती झाल्याचे दाखले दिसत असताना तडजोडवादी तत्वज्ञानाचं उदात्तीकरण नको असं म्हटलेलं आहे. जी परिस्थिती बदलता येत नाही तीत आनंदी राहण्यासाठी सुख मानायला विरोध नाही, पण तेच योग्य असं समजून त्याचा प्रसार चुकीचा असा काहीसा आशय आहे. आहे ते क्षण आनंदात नक्कीच घालवा पण पुढच्या पिढीला देण्यासाठी तरी किमान प्रगतीचा विचार मनात कुठेतरी ठेवा इतकंच...

एक प्रतिसादक,

<ही दोन वर्गातली आणि त्यांच्या विचार करण्यातली दरी आहे इतकंच म्हणेन. आपण जिथे उभे असू तिथून ती बाजू बरोबर दिसते.>

सहमत.

डेलियाजी,
<वंदनाताईंना , उच्च शिक्षित आणि उत्तम कमाई करणार्‍या बायकांविषयी फारच राग आहे म्हणायचा>

अजिबात नाही. परंतु आपल्या शिक्षणाचा जोडीदाराला दुय्यम लेखण्यात व तसे दर्शविणाऱ्या जोडीदाराविषयी निश्चितच आहे. शिक्षण आणि त्यातून येणाऱ्या अहंकारातून जोडीदाराला दुय्यम लेखण्याचा प्रकार होत नाही, असं म्हणायचय का आपल्याला? सगळीकडेच हा प्रकार होतो असे माझे म्हणणे नाही. शिक्षणात जिथे खूप तफावत असते तिथे हा प्रकार होतो हे देखिल सार्वत्रिक सत्य नाही. दोघेही कॉमर्स ग्रज्युएट आहेत. पत्नी फर्स्टक्लास तर नवरा पासक्लास. यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे. ही व अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास आढळतात. याला प्रतिवाद करणारी उदाहरणेही शेकडो असतील. पण त्याचा अर्थ कमी शिकलेला नवरा बघा असा सल्ला देते असा कसा काय काढलात?

अहंकार हा स्वभाव आहे व तो कशाचाही असू शकतो. शिक्षणातून येणारा अहंकार जोडीदाराला दुय्यम लेखण्यास कारणीभूत होतो. दुय्यम लेखणे याला असलेल्या अनेक कारणापैकी ते एक कारण होते व आहे. वर लेखात मांडलेले विचार तेवढेच बरोबर, योग्य किंवा सर्वंकष आहेत असा माझा बिलकूल दावा नाही आणि ते नाहीतही.
नवराबायकोत गुण, अवगुण, सवयी, संस्कार, शिक्षण या व अशा अनेक तफावती असूनसुध्दा एकमेकांविषयी आदर, जाणीव व प्रेम संसार टिकवतात हे मांडले आहे. कदाचित हा विचार मांडत असताना योग्य पध्दतीने न मांडल्याने मला जो मुद्दा मांडायचाय तो आपल्यापर्यंत पोहोचला नसावा. हा लेखनदोष आहे व तो हळूहळू सुधारेल.

सौ. वंदना बर्वे.

एक प्रतिसादकजी,

<हा प्रगतीचा विचार ज्यांनी आत्मसात केला त्यांची प्रगती झाल्याचे दाखले दिसत असताना तडजोडवादी तत्वज्ञानाचं उदात्तीकरण नको असं म्हटलेलं आहे. जी परिस्थिती बदलता येत नाही तीत आनंदी राहण्यासाठी सुख मानायला विरोध नाही, पण तेच योग्य असं समजून त्याचा प्रसार चुकीचा असा काहीसा आशय आहे. आहे ते क्षण आनंदात नक्कीच घालवा पण पुढच्या पिढीला देण्यासाठी तरी किमान प्रगतीचा विचार मनात कुठेतरी ठेवा इतकंच...>

सहमत.

हा आपला विचार योग्य आहे. कायम तडजोड करीतच राहणे व तीच संस्कृती आहे असे समजणे आणि कुठल्याच ठिकाणी तडजोड करू नका म्हणणे दोनही टोकाच्या भुमिका आहेत, संसाराला घातक आहेत. तडजोड कुठपर्यंत, कितीपर्यंत असावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो हे मत ग्र्याह्य धरूनही अशी तडजोड स्विकारताना अथवा नाकारतांना तारतम्य असणे आवश्यक आहे.

सौ. वंदना बर्वे.

तडजोडीचे तारतम्य म्हणजे काय आणि किती किलो पर्यंत तडजोडीला नकार योग्य आणि किती किलोपुढे नकार अयोग्य असं काही कोष्टक असल्यास कळवावे.
तारतम्य हे ही अत्यंत सापेक्ष आहे तसेच प्रत्येकाच्या आयुष्याच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे.

तडजोड कुठपर्यंत, कितीपर्यंत असावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो हे मत ग्र्याह्य धरूनही अशी तडजोड स्विकारताना अथवा नाकारतांना तारतम्य असणे आवश्यक आहे.>> एकदा हा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य केलंय ना? मग ते तडजोडीचं तारतम्य त्या वैयक्तिक पातळीवर ठरू/ठरवू देत ना! ते आवश्यक आहे, नाही, किती प्रमाणात इ. ची चर्चा कशाला हवीये?
कुणीही स्वतःचा जीव, आयुष्य अकारण दु:खात टाकायला बसलेलं नाही तेव्हा आपण कोण बाहेरून सल्ले देणारे? ते विजोड आहेत-नाहीत हेही ठरवायचा आपला संबंध नाही. जर स्वतःच्या संसारात 'विजोड'त्वामुळे अडचणी येत असतील तर त्याही आपल्यालाच सोडवायच्या असतात. शांतपणे विचारविनिमय करून. उग्गाच जोडीदाराच्या, कुटुम्बियांच्या मागे वैताग, चीड व्यक्त करून, स्वतःच्या 'त्याग-तडजोडीचं' उदात्तीकरण करून नव्हे. शिवाय ज्या बाहेर नोकरी करतात, करिअर करतात त्यांनाही घरं असतात. त्यांनाही इतर गृहिणींसारखेच प्रॉब्लेम्स असतात. काही वेगळे नसतात. उलट घरचं-दारचं दोन्ही पहायचं असतं. फक्त त्या त्याचं उदात्तीकरण करत नाहीत, त्यावर प्रॅक्टिकल मार्ग काढतात. नवर्‍याला, कुटुम्बाला घर/संसार चालवण्यात बरोबरीचा भागीदार करून घेतात. आणि नोकरी नाही केली तरी स्व'त्व जपून ठेवून ही भागीदारी करून आयुष्य आनंदात जगता येतंच की.

कृतघ्नपणा कशाला म्हणतात तर त्यासाठी मी हे उदाहरण देइन.>>>
नंदिनी,
काल कि परवा सावितीबाईची जयंती होती. आशा करतो तू कृतज्ञता व्यक्त केलीस.

मुंगेरीलाल,

आपला इथला प्रतिसाद आवडला. Happy

तडजोडींचे वर्गीकरण मनोरंजक आहे. तात्कालिक (tactical) आणि धोरणात्मक (strategic) असे करता येईल. किंवा वेगळ्या प्रकारे करायचं झालं तर परिस्थितीशी तडजोड आणि तत्त्वांशी तडजोड असेही करता येईल. अर्थात काही गोष्टी तपासून पाहायलाच पाहिजेत.

१. आपण अमुक एक तडजोड का करतोय हा उद्देश.
२. पहिल्या प्रकारची तडजोड कुठे संपते आणि दुसरी कुठे सुरू होते याबाबत सुस्पष्टता.

(यादी अपूर्ण. प्रत्येकाने आपापल्या अनुभवानुसार वाढवावी.)

आ.न.,
-गा.पै.

काल कि परवा सावितीबाईची जयंती होती. आशा करतो तू कृतज्ञता व्यक्त केलीस.
>>> हो. तुम्ही कॉपी पेस्ट केलेले वाक्य जिथे आहे त्यावरचा प्रतिसाद वाचा.

दोघेही कॉमर्स ग्रज्युएट आहेत. पत्नी फर्स्टक्लास तर नवरा पासक्लास. यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे. याचे रीव्हर्स उदाहरण तुमच्या पाहण्यात नसेलच ना? नवरा कॉमर्स ग्रॅज्युएट आणि बायको बारावी. मग नवरा अगदी कौतुकाने "माझी बायको बारावी आहे" असं म्हणत असतो का? बायकोच्या शिक्षणावरून, रंगरूपावरून, बोलण्याचालण्यावरून सतत अपमान करणारे कितीतरी पुरूष असतात, त्यांना तुम्ही हे तडजोडीचे तत्वज्ञान का शिकवत नाही? आणि तुमच्या उदाहरणामधे बायकोने नवर्‍याला "कमी लेखले" म्हणजे काय नक्की केले हो? आणि ते दोघे नवरा-बाय्को आपापसांत एकमेकांना कमी लेखतील, जास्त लेखतील नाहीतर अजून काय करतील? एक तिसरी व्यक्ती म्हणून तुमचा संबंध काय?

शिक्षण आणि त्यातून येणाऱ्या अहंकारातून जोडीदाराला दुय्यम लेखण्याचा प्रकार होत नाही, असं म्हणायचय का आपल्याला? सगळीकडेच हा प्रकार होतो असे माझे म्हणणे नाही. शिक्षणात जिथे खूप तफावत असते तिथे हा प्रकार होतो हे देखिल सार्वत्रिक सत्य नाही. >>>

आताच्या प्रतिसादातलं हे वाक्य आणि

मूळ लेखातलं हे वाक्य शिक्षण अहंकार निर्माण करतं. अहंकार हा आदराचा सर्वात मोठा शत्रू आहे. "त्यात काय विशेष, हे मी सुध्दा करेन" ही जोडीदाराबद्दलची भावनाच अनादराला जन्म देते.
या दोन्ही वाक्यांतला विरोधाभास लक्षात येतोय का? मूळ लेखामधे ठामपणे तुम्ही शिक्षण अहंकार निर्माण करतं आणि हा अहंकार आदराचा शत्रू असल्याने जोदीदाराबद्दल अनादराचे भावना येते असे लिहिले आहे. प्रतिसादामधे "असं होतंच असे माझे म्हणणे नाही, सार्वत्रिक सत्य नाही" असल्या शब्दांचा मुलामा चढवलेला आहे. असल्या मुलाम्यांना खरवडून टाकलं तर तुमच्या लिखाणातला मूळ उद्देश सहजासहजी दिसतो. फक्त तो उद्देश दिसू नये म्हणून तुमची खटपट चाललेली आहे. कुणाच्या अजून लक्षात आलं नाही असं तुम्हाला वाटलं असेल तर खरंच तुमची दया येते.

दुसर्‍या घरातील नवरा बायकोच्या पर्सनल नात्यावरून आणि फावल्या वेळातल्या मैत्रीणीच्या गॉसिपवरून पूर्ण समाजाचे चित्रीकरण करण्याचा सोस सोडा.

दोघेही कॉमर्स ग्रज्युएट आहेत. पत्नी फर्स्टक्लास तर नवरा पासक्लास. यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे. >>
अशा उदा. मी तरी फक्त इतकाच निष्कर्ष काढेन कि त्या बाईला नवरा मनापासून पसंतच नसावा आणि त्यांचे नवर्‍यावर मनापासून प्रेम नसावेच. आपल्याकडे बाळपणापासूनच मुलींना नवरा हा वय, उंची , शिक्षण आणि पैसा या बाबतीत बाईच्या वरचढच हवा अशी शिकवण असते. त्या बाईंना ही स्वतःपेक्षा अधिक शिकलेलाच नवरा हवा असावा. पण काही कारणाने त्यांना या बाबतीत तडजोड करावी लागली असावी. तरी ही खोट त्या मनात बाळगून असल्याने संधी मिळताच किन्वा नवर्‍याबरोबर बिनसल्यास त्या त्याच्या शिक्षणाचा उल्लेख करून फ्रस्ट्रेशन काढत असतील. इथे कमी शिक्षण हा मुद्दा नसून ते एक निमित्तमात्र आहे. नवर्‍याला कमी लेखायला एक कारण एव्हढेच. समजा नवरा जास्त शिकलेला असता आणि तरी त्यांना पसंत नसता, तर त्या बाईनी त्याच्या दुसर्‍या एखाद्य वैगुण्यावरून त्याला कमी लेखले असते. त्यामुळे अशी उदा. देऊन शिक्षणाला दोष देणे हे म्हणाजे साप समजुन भुई धोपण्यासारखे आहे.

डेलिया, हजार मोदक. माझंही मत तेच झालं होतं/आहे ते उदाहरण वाचून. फक्त लिहायचा कंटाळा आलाय. प्रत्येक वाक्यावर अगणित लिहिण्यासारखं आहे.

दोघेही कॉमर्स ग्रज्युएट आहेत. पत्नी फर्स्टक्लास तर नवरा पासक्लास. यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे. >>

बापरे.. याला तुम्ही विजोडता म्हणता वंदनाताई? मग तर उद्या लग्न करायचे ठरवल्यावर मुलगा व मुलगी यांचे शिशुवर्ग ते शेवटचे शिक्षण पर्यंत सर्वच टक्के एकमेकांशी जुळवावे लागतील. नाहीतर तुम्ही दिलेल्या उदाहरणाप्रमाणे बायको "तुम्हाला काही अक्कल नाही. तुम्हाला सातवीला फक्त ५२% मिळाले होते तुम्ही गप्प बसा." इत्यादी म्हणायची शक्यता नाकारता येत नाही.

अवांतर: तुम्ही दिलेल्या उदा. मध्ये दोघांनाही फर्स्टक्लास किंवा पासक्लास असता किंवा दोघेही पूर्णपणे अशिक्षित असते तरी बायको नवर्याला "तुमची गाण्याची जाण कळली मला. सारखे टी.व्ही. वर फिल्मी गाणी बघत असता. शास्त्रीय संगीत म्हणजे काय याची काही माहिती आहे का? गाढवाला गुळाची चव काय म्हणा" असे म्हणाली असती तर तुम्ही "शास्त्रीय संगीताच्या जाणीवेमुळे अहंकार निर्माण होतो"असे विधान कराल का? याउप्पर जाउन त्याला हिंदी फिल्मी संगीत आवडते तर तिला शास्त्रीय संगीत तर त्या संसाराला विजोड संसार म्हणाल का?

वर सावित्रीबाईंबद्दल वाचून गंमत वाटली Happy
कुणाबद्दल कृतज्ञ व्हायचे असल्यास फक्त त्यांच्या बड्डेलाच व्हावं असा ़ नियम आहे का? Happy
बाकी छान , चालू द्या!

जयंतीवरून चाललेल्या चर्चेबद्दल काही म्हणायचे नाही. पण मैत्रेयीजी तुमचा मुद्दा महत्वाचा आहे. कृतज्ञता ३६५ दिवस असली पाहीजे हे खरंच. तरीही आपण कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मराठी दिवस साजरा करतो या मागची भावना काय आहे ?

पत्नी फर्स्टक्लास तर नवरा पासक्लास. यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे. ही व अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपास आढळतात. याला प्रतिवाद करणारी उदाहरणेही शेकडो असतील. पण त्याचा अर्थ कमी शिकलेला नवरा बघा असा सल्ला देते असा कसा काय काढलात?
>> lol. "शिक्षण अंहकार निर्माण करतं" आणि " यावरून तिने त्याला कमी लेखल्याचे उदाहरण आहे" ह्यावरून कमी शिकलेली बायको करा - असा सल्ला असावा.. नवर्‍यानं अंहकारी असलं तरी काय फरक पडतो जेव्हा पायाची वहाण ही मेंटॅलिटी बायकोमधेच असेल!

बाई तुमचा लेख आवडला. या लेखावर आलेल्या विरोधी प्रतिक्रिया मनावर घेऊ नका. डबल ढोलकी लोकांकडे तर लक्षही देऊ नका. तडजोड किती किलो असल्या प्रश्नांना फाट्यावर मारा. मुलाचे लाड किती किलो पुरवायचे हे सांगता येतंय का बघा आधी यांना.

लेखिकेचं वाक्यः "अहंकार हा स्वभाव आहे व तो कशाचाही असू शकतो." यातच सगळं येतं. जो जात्याच अहंकाही आहे, ज्याला जोडिदाराला कमी लेखायचय, त्याला शिक्षण हा मुद्दा मिळाला नाही तर रंग, रूप, बोली, घराणं, गाव, ओळखी हे काहिही वापरता येइल/येते... मग अहंकाराचा आणि शिक्षणाचा संबंध कुठे येतो?
... आणि म्हणुनच,
>> "शास्त्रीय संगीताच्या जाणीवेमुळे अहंकार निर्माण होतो"
Lol Lol

बाई तुमचा लेख आवडला. या लेखावर आलेल्या विरोधी प्रतिक्रिया मनावर घेऊ नका. डबल ढोलकी लोकांकडे तर लक्षही देऊ नका.

अनुमोदन या गोष्टीला. मलाही गाईचं तूप काढताना असेच अनुभव आले.

त्या लेखा पेक्षा मला बाकीचे रिप्लाय आवडले..... नी दी, वरदा, नंदीनी दी यांनी च खर तर मस्त लिहिल आहे जे पटलय मला........... आणि कोणी सांगतय की काही मुद्दे चुकीचे आहेत तर लेखिका स्वताचाच मुद्दा पुढे का घासत आहेत??.......मला वाटतय लेखिकेला आपले लिखाण चांगले असेच ऐकायचे अपेक्षित होते...पण उलट्याच प्रतिक्रिया आल्याने जरा विरस झालाय त्यातुन निराशा आलीय.....

Pages