तिरंदाजी

Submitted by हिम्सकूल on 26 July, 2012 - 09:13

तिरंदाजी - खेळाबद्दल माहिती

- एकूण चार स्पर्धा - पुरुष वैयक्तिक, पुरुष सांघिक, महिला वैयक्तिक, महिला सांघिक

- एकूण सहभागी स्पर्धक १२८ (६४ पुरुष व ६४ महिला)
प्रत्येक सहभागी देशाच्या फक्त ६ खेळाडूंना सहभाग घेता येतो (३ पुरुष व ३ महिला)
वैयक्तिक प्रकारात ३ खेळाडू तर ३ खेळाडूंचा १ संघ

- तिरंदाजीचा समावेश १९०० साली झालेल्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये केला गेला. त्यानंतर १९०८ साली लंडन मध्ये तिरंदाजी स्पर्धां वगळण्यात आली होती.१९२० साली एकदाच तिरंदाजीची स्पर्धां झाली.त्यानंतर ५२ वर्षांनी १९७२ मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये तिरांदाजीला परत स्थान मिळाले ते अजूनही कायम आहे.

- तिरंदाजीत लक्ष्याच्या मध्याच्या जास्तीत जास्त जवळ बाण मारणे साध्य करणे हेच ध्येय. ऑलिम्पिक तिरंदाजीचे लक्ष्य १२२ सेमी व्यासाचे असते आणि त्याचा मध्य भाग १२.२ सेमी व्यासाचा असून तो सोनेरी असतो (जास्तीत जास्त १० गुण) . लक्ष्यावर एकूण १० गोल आखलेले असतात आणि आतील गोलात बाण लागल्यास १० गुण तर बाहेर येत येत प्रत्येक गोलातील गुणांची संख्या कमी होत सर्वात बाहेरच्या गोलात बाण लागल्यास १ गुण मिळतो. खेळाडू ७० मी. अंतरावरून लक्ष्याचा वेध घेतात. पुरुष आणि महिला वेगवेगळया स्पर्धांत सहभागी होतात.

- सर्व चारही स्पर्धा बाद फेरीच्या असतात. स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व स्पर्धक क्रमवारी ठरविण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. प्रत्येक स्पर्धकाने ७२ बाण मारणे आवश्यक असते. प्रत्येकाला ४ मिनिटांच्या वेळेत ६ बाण मारायच्या १२ फेर्‍या पूर्ण कराव्या लागतात. ७२ बाण मारून झाल्यावर गुणांची बेरीज करून त्यानुसार सांघिक आणि वैयक्तिक क्रमावारी निश्चित केली जाते. १ ते ६४ क्रमांक वैयक्तिक खेळाडूस दिले जातात.

- वैयक्तिक स्पर्धा
- बाद फेरीची स्पर्धा - क्रमांक १ चा स्पर्धक क्रमांक ६४ स्पर्धाकाविरुद्ध खेळतो. प्रत्येकी ५ फेर्‍या असतात. आणि प्रत्येक फेरीत ३ बाण मारायचे असतात. गुण जास्त असलेला स्पर्धक ती फेरी जिंकतो. फेरी जिंकल्यास २ गुण तर बरोबरी झाल्यास १ गुण मिळतो. ६ गुण आधी मिळवणारा स्पर्धक विजेता घोषित केला जातो. बरोबरी झाल्यास दोन्ही स्पर्धक अजून एका बाण मारतात. ज्याचा बाण मध्य्याच्या जास्तीत जास्त जवळ जातो तो विजेता ठरतो.

- सांघिक स्पर्धां
- बाद फेरीच्या स्पर्धेत एकूण १२ संघ भाग घेतात. दोन्ही संघ ४ फेर्‍यांमध्ये प्रत्येकी ६ बाण मारतात. प्रत्येक खेळाडू एका फेरीत २ बाण मारतो. जास्ती गुण असणारा संघ विजेता घोषित केला जातो. बरोबरी झाल्यास ३ बाणांचा शूट ऑफ होतो. त्यातही बरोबरी झाल्यास ज्यांचे बाण मध्य्याच्या जास्तीत जास्त जवळ असतात तो संघ विजेता ठरतो.

- सर्वोत्कृष्ट ४ संघ उपांत्य फेरीत जातात.

- उपांत्य फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतात.

- अंतिम फेरीतील विजेत्यास सुवर्ण, हरलेल्यास रौप्य आणि उपांत्य फेरीतील दोन पराजित संघातील लढतीत विजेता ठरलेल्या संघास कांस्य पदक दिले जाते.

भारतीय संघ आणि प्रतिस्पर्धी..

यंदा भारतास तिरंदाजी पदक मिळायची शक्यता आहे. दिपिका कुमारी ही १८ वर्षीय भारतीय तिरंदाज महिलांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. आणि तिचा फॉर्म बघता पदक मिळावे. तसेच पुरुष संघही चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आधी झालेल्या दोन अंतरराष्ट्रीय स्पर्धात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे.

भारतीय पुरुष संघात राहुल बॅनर्जी, तरुणदीप रॉय आणि जयंत तालुकदार आहेत तर महिला संघात दिपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि चेक्रुवोलू स्वुरो आहेत.

सांघिक खेळात महिलांमध्ये कोरिया, चीन, चायनीज तैपेई आणि भारत ह्या संघात उपांत्य लढती होण्याची शक्यता आहेत तर पुरुषांमध्ये कोरिया, अमेरिका, इटली, भारत हे संघ यायची शक्यता आहे.

मूळ लेख - http://www.london2012.com/mm/Document/Documents/Publications/01/25/72/48...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवी बाहेर.... एक बाण निशाणावर बसलाच नाही.. त्यामुळे फारच वाईट झाले..

भारताची स्वुरो १/३२ च्या फेरीत बद झाली. दोघींनी प्रत्येकी दोन-दोन देट जिंकले तर एक सेट टाय झाल्याने टायब्रेकर खेळला गेला.
जयंत तालुकदारला एकही सेट जिंकता आला नाही.

वर्ल्ड नंबर १ आणी वर्ल्ड नंबर ३ दोघीही स्पर्धेतून बाहेर.. कोरियाला परत एकदा सगळी पदकं जिंकण्याची संधी.. >>>

ह्म्म!

काल दीपिका कुमारी आणि तिच्या कोचची मुलाखत पाहिली. "इथे रँकिंगला काही अर्थ नाही . कोणत्याही सामन्यात कोणीही जिंकू शकतो." दीपिकाला वार्‍याचा अंदाज घेऊन अ‍ॅडजस्ट करायला जमले नाही म्हणे.
तरुणदीप रायनेही द्वितीय मानांकित तिरंदाजाला चांगली लढत दिली होती.

Pages