सिनेमा सिनेमा- पाकिझा

Submitted by शर्मिला फडके on 5 May, 2012 - 15:01

पाकिझा- साहेबजानचा प्रवास.

पाकिझा म्हणजे मीना कुमारी.
पाकिझा म्हणजे ते स्वप्न जे साकार करायला कमाल अमरोही चौदा वर्ष धडपडत होता.
पाकिझा म्हणजे अस्तंगत गेलेलं ते युग ज्यात काव्यात्मकता, तरलता, रोमॅन्टिसिझम आणि काही प्रमाणात भाबडीही वाटू शकणारी सामाजिकता हा सिनमांचा मुख्य गाभा होता.
पाकिझा म्हणजे लता मंगेशकर या गानसम्राज्ञीची अवीट गोडीची गाणी आणि गुलाम महंमद या दुर्लक्षित गुणी संगीतकाराचा अप्रतिम स्वरसाज.
पाकिझा म्हणजे तवायफ़-कलावंतिणींच्या बदनाम दुनियेचं करुण-राजस रुप.
पाकिझा म्हणजे मीना कुमारीच्या अभिनय कारकिर्दीला आणि तिच्या आयुष्यालाही मिळालेला पूर्णविराम.
पाकिझा म्हणजे युंही कोई मिल गया था.. सरे राह चलते चलते.. असं व्याकूळ आवाजात म्हणणार्‍या साहेबजानच्या नजरेत उमटलेली, रात्रीचा निराश अंधार चिरत येणारी, न होणार्‍या भेटीची ग्वाही देणारी ट्रेनची शिट्टी.. त्या शिट्टीत एका मिट्ट काळोख्या रात्री ट्रेनमधल्या कंपार्टमेन्टमधे, ती गाढ झोपेत असताना तिच्या नकळत घडून गेलेल्या एका अधुर्‍या मुलाकतीची सारी दास्तान उमटलेली असते.
आपली नाजूक गोरी पावले लालजर्द पर्शियन गालिच्यावर हलकेच थिरकवत गाणं गाणारी साहेबजान.. त्या पावलांना जमिनीवर टेकवायचं नसतं तिला. न भेटलेल्या त्याने पैंजणात अडकवून ठेवलेल्या चिठ्ठीत तसं बजावलेलं असतं. आपके पांव बहोत हसीन है.. इन्हे जमीनपर मत उतारईयेगा..
पाकिझा म्हणजे हा काव्यात्म मूड.

pakeezah12.jpg

पाकिझा कथा आहे तवायफ़ परंपरेतल्या दोन पिढ्यांची. नरगिस आणि तिची मुलगी साहेबजान या दोघींच्या नशिबात कोठ्यावरची बदनाम जिंदगी लिहिलेली असते पण दोघींनाही त्यांच्या प्रियकरांच्या रुपात आयुष्य एक संधी बहाल करतं प्रतिष्ठीत समाजात जगण्याची. दोघीही ही संधी स्विकारतात खर्‍या पण नरगिसला समाज नाकारतो आपल्यात सामावून घ्यायचे, शहाबुद्दीनचे, नरगिसच्या प्रियकराचे कुटूंब तिला आपल्या खानदानाची बहू होण्याचा सन्मान नाकारते, घराबाहेर काढते आणि अपमानीत, विद्ध नरगिस आश्रय घेते कबरस्तानाचा. पोटातल्या साहेबजानला वाढवत आपल्या आयुष्याचे उर्वरित काही महिने ती तिथेच काढते आणि मुलीला जन्म देऊन मरुन जाते. मात्र मरण्याच्या आधी शहाबुद्दीनच्या नावाने एक पत्र लिहून ठेवते, निदान आपल्या मुलीला तरी सांभाळ अशी विनवणी त्यात करते. पण त्याआधीच तिची बहिण येऊन त्या तान्ह्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाते आणि तिचा प्रतिपाळ करते.

साहेबजान त्याच कोठीत, गुलाबी महलमधे वाढते, तरुण होते. इन्ही लोगोंने ले लिना दुपट्टा मेरा.. गात आपल्या कलावंत कारकिर्दीचा आरंभही करते. आपले प्राक्तन काही वेगळे असू शकेल याची सुतराम कल्पनाही तिच्या मनात नसते. पण ते वेगळे असते आणि त्याची चुणूकही मिळते.

शहाबुद्दीनला वीस वर्षांनंतर नरगिसने लिहिलेले ते पत्र अकस्मात मिळते. मिळते तेही मोठ्या अजब रितीने. नरगिस जिथे मेली त्या कब्रस्तानातले तिचे बेवारस सामान भंगारात विकले जाते आणि त्यात तिची वही असते, ज्यात तिच्या आयुष्याची दर्दभरी, उदास दास्तान सांगणारी शायरी असते आणि ते पत्र असतं. ज्याच्या हातात ते पडतं तो ते वाचल्यावर हलून जातो. आटापिटा करत शहाबुद्दीनचा शोध घेऊन ते पत्र त्याच्या हवाली करतो. शहाबुद्दीन पत्र वाचल्यावर उलट्या पावली नरगिसच्या आणि त्याच्या मुलीचा शोध घेत गुलाबी महलमधे पोचतो खरा, पण त्याआधीच नरगिसची बहिण पुन्हा एकदा साहेबजानला घेउन पसार होते.
शहाबुद्दीनच्या कुटूंबात जिथे नरगिसला स्थान नव्हते तिथे या नाजायज मुलीला कोण स्विकारणार हा तिचा सवाल तर्कशुद्ध असतो खरा. मात्र त्यातूनच नियती साहेबजानला त्या संधीची चाहूल देतो, जी पुढे तिचं आयुष्य बदलून टाकू शकणार असते.

कोठ्यावरचा सारा लवाजमा आटपून ट्रेनमधून दुसर्‍या ठिकाणी सारेजण जात असतात. मिट्ट काळोख्या, घनदाट पावसाच्या वादळी रात्री त्याच ट्रेनमधे मध्यरात्रीच्या सुमारास सलीम चढतो. समोरच्या बर्थवर झोपलेल्या साहेबजानचं पडदानशीन लावण्य, तिच्या नाजूक शारिरीक सौंदर्याची ग्वाही देणारं गोरंपान, हसीन पाऊल त्याचं मन घायाळ करतं. आपल्या कवीहृदयाची साक्ष पटवणारी रोमॅन्टीक चिठ्ठी तिच्या पैंजणांमधे अडकवून तो मधल्याच कोणत्यातरी स्टेशनावर उतरूनही जातो.
साहेबजान जागी झाल्यावर ती चिठ्ठी वाचते आणि तिच्या शायराना, हळव्या मनाला तो अनामिक आशिक भुरळ घालतो.
पुढे अनेक अकल्पित प्रसंगांच्या मालिका घडून येतात, सलिम आणि साहेबजान पुन्हा पुन्हा भेटतात, दुरावतात. साहेबजाऩचा कमकुवतपणा, तिचा गमावलेला आत्मविश्वास, आपण तवायफ़ असण्याचा न्यूनगंड तिला सलिमच्या प्रेमाचा स्वीकार करु देत नाही आणि त्याच्यापासून तिला दामन सोडवूनही घेता येत नाही.
वास्तवापासून पळण्याचा एक मार्ग म्हणून ती सलिमसमोर आपला स्मृतीभ्रंश झाल्याचेही नाटक करते. सलिम तिला स्वत:च्या घरी घेऊन जातो. कसाबसा धीर गोळा करुन साहेबजान नियतीच्या खेळाचं पुढचं दान स्वीकारते.

योगायोग म्हणजे सलिम शहाबुद्दीनचा पुतण्या असतो. साहेबजान आणि शहाबुद्दीन दोघांनाही परस्परांची ओळख नसतेच.
पिढी बदललेली असली तरी घराचा कर्मठपणा तितकाच कडवा असतो. साहेबजान तवायफ़ घराण्यातली आहे हे कळल्यावर तिला त्यांनी स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही, पण यावेळी सलिम ठाम असतो. साहेबजानचा हात घट्ट पकडून तोही घराबाहेर पडतो. पण सलिमच्या प्रेमावरच्या विश्वासापेक्षा मनातली असुरक्षितता, भिती साहेबजानला ग्रासून टाकते आणि ती त्याचा हात सोडून पळून जाते.
तिच्या आईचं आणि तिचं प्राक्तन त्या दुर्दैवी कडीमधे असं नकळत गुंफ़लं जातंच.

भरकटलेल्या अवस्थेतल्या सैरभैर साहेबजानला पुन्हा एकदा गुलाबी महलात आणलं जातं, तिची अशी करुण अवस्था पाहून मावशीच्या मनाला यातना होतात, पण त्यावर तिच्याकडे काही उपायही नसतो. आपले प्राक्तन स्वीकार, मुजरा हेच आयुष्य म्हणून मान्य कर इतकाच सल्ला ती देऊ शकते.

इकडे आपल्या प्रेमाचा अव्हेर साहेबजान पुन्हा पुन्हा का करतेय हे न कळू शकलेला दुखावलेला सलिम नाईलाजाने शादीला मान्यता देतो, आणि स्वत:च्या लग्नाच्या रात्री मुजरा करायला साहेबजानच्या कोठ्यावर आमंत्रण धाडतो. ती ते स्विकारते. ही परिक्षा आहे स्वत:ची आणि स्वत:च्या प्रेमाची असं समजत ती शादीच्या शुभ्र तक्तपोशीवर नृत्य करते, घायाळ होते पण तरीही नाचतच रहाते.
असह्य होऊन तिची मावशी शहाबुद्दीनला पुकारते, त्याच्या तथाकथीत शरिफ़ कुटुंबाचे वाभाडे काढते आणि सांगते की बघ हे तुझ्या पोटच्या पोरीचं, तुझ्या दारात, तुझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठीत अंगणात सांडलेलं रक्त.
हादरलेला शहाबुद्दीन आपल्या मुलीला कवटाळायला पुढे होतो आणि बापाच्या गोळीला बळी पडतो. साहेबजानची बारात आणि दुर्दैवी शहाबुद्दीनचा जनाजा गुलाबी महालातून एकाचवेळी उठतो. साहेबजानला तिचा मृत बाप बिदा करतो आणि अखेर एक तवायफ़ कोठ्यावरुन स्वत:च्या घरी जाते.

साहेबजानचा हा मुक्ती, प्रेम, सन्मानाच्या आयुष्याकडे चाललेला हा प्रवास गुलाबी महाल कोठ्यातली एक लहान मुलगी बघत असते, साहेबजान तर चालली स्वत:च्या पतीच्या घरी, आपल्या घरी.. पण ती मुलगी अजूनही त्याच जगात अडकून पडलेली आहे, आपल्यासाठीही कधीतरी अशी बारात घेऊन एखादा सलीम येईल, आपल्याकरताही एखादा शहाबुद्दीन स्वत;चे प्राण पणाला लावेल अशी आस त्या लहान मुलीच्या नजरेत उमटलेली आहे.
कमाल अमरोहीची पाकिझा आहे ही मुलगी.
अमरोहीचा हा खास टच ज्यामुळे पाकिझाला अजून एक तवायफ़च्या आयुष्यावरील सिनेमा अशा बिरुदामधे न अडकवता तो एका वेगळ्याच उंचीचा सिनेमा बनतो.

पाकिझाची कथा, पटकथा कमाल अमरोहीचीच होती. अमरोही स्वत: शायर होता आणि त्याच्या तरल, कल्पनारम्य, रोमॅन्टिक कवीमनाची झलक पाकिझाच्या पटकथेत, त्यानेच केलेल्या दिग्दर्शनात ठायी ठायी दिसली. एखाद्या गूढ परिकथेसारखी पाकिझाची कथा उलगडत जाते. अगदी सुरुवातीलाच सोनेरी केसांची नरगिस शहाबुद्दीनच्या वडिलांच्या हवेलीतून अपमानीत होऊन बाहेर पडते आणि कबरस्तानाचा रस्ता गाठते तेव्हापासूनच गूढ, अकल्पनीय प्रसंगांचा वेढा जणू आपल्या मनावर पडायला लागतो. नरगिसला वाटेत भेटणारे भोई तिला काही न विचारता अचूक कब्रस्तानात पोचवतात.
कबरस्तान हे प्रतिक आहे नरगिसच्या मेलेल्या भावनांचं, समाजाने टोचून, घायाळ करुन मारुन टाकलेल्या तिच्या हळव्या मनाचं. तिच्या भग्न आयुष्याचं.

कमाल अमरोहीने प्रतिकांचा वापर पाकिझा सिनेमात अनेकदा केला.
गुलाबीमहाल कोठीत सापाचे घुसणे साहेबजानच्या आयुष्यातले धोके सूचित करतात, तिचं झिरझिरीत पडद्यांमधे गुरफ़टून जाणं, कोलमडून पडण्यातून तिचा स्वत:शी चाललेला अयशस्वी झगडा, तिचा गोंधळ दिसतो. साहेबजान कोठ्यावर परतते तेव्हा समोर फ़ाटका, दोर तुटलेला पतंग लटकलेला तिला दिसणं अशा अनेक प्रतिकांमधून अमरोही कधी तरलपणे, कधी ढोबळपणे पाकिझाची कथा सांगत जातो.

पाकिझा सिनेमाचा मूड व्याकूळ अभिनयातून, सुरेल गाण्यांमधून, पार्श्वसंगीतामधून, उर्दू, नजाकतदार संवादांमधून, देखण्या पोषाखांमधून, भव्य, नेत्रदीपक, आलिशान सेट्समधून ज्या प्रकारे तयार होत जातो ते बघताना कौतुक वाटते ते कमाल अमरोहीचे आणि आश्चर्यही.

१९५८ मधे त्याने बनवायला घेतलेला पाकिझा अखेर १९७२ मधे रजतपडद्यावर झळकला आणि या दरम्यानच्या काळात अमरोहीला सिनेक्षेत्रातल्या अनेकांची कुचेष्टा सहन करायला लागली. मीना कुमारी आजारी पडून अंथरुणाला टेकली, संगीत दिग्दर्शक गुलाम महंमद आणि सिनेमॅटोग्राफ़र जोसेफ हिरशिंग तर जग सोडून गेले. तरी अमरोहीचा पाकिझा बनतोच आहे अशी हेटाळणी सहन करायला लागली.
लोकांचं सगळंच चूक होतं असंही नाही. खरोखरच कमाल अमरोही नादीष्टासारखा वागत होता. कृष्णधवल जमान्यात त्याने पाकिझा बनवायला घेतला, मीना कुमारीसारखी अभिनयसम्राज्ञी घरातच होती, सोबतीला त्याच्या आधीच्या गाजलेल्या महल सिनेमातला अशोक कुमार होता; अमरोहीला असा सिनेमा बनवायचा होता जो पाहून लोकं चकित होतील, असं काव्यमय सौंदर्य पडद्यावर आधी कधीही झळकलं नव्हतं असे उद्गार काढतील.

सिनेमाचं शूटींग जोरात सुरु झालं. इन्ही लोगोंने.. गाण्याकरता भव्य, खर्चिक सेट उभारला होता, वातावरणनिर्मितीकरता हजारो मेणबत्त्या लावल्या होत्या, कृष्णधवल पडद्यावर इतक्या नजाकतीने कोणतं गाणं सादर झालं नसेल अशी अमरोहीच्या मनात खात्री होती.
पाकिझाचे पुढचेही काही सीन्स घेतले गेले.
दरम्यानच्या काळात लोकांना रंगीत सिनेमा लोकप्रिय व्हायला लागला होता, ’जंगली’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर लोकांना इस्टमन कलर्सची जणू भुरळ पडली. पाकिझा रंगीतच बनवायचा असं अमरोहीने ठरवलं आणि आत्तापर्यंतची शूट केलेली सगळी रिळं फ़ेकून देत त्याने रंगीत सिनेमाला साजेसा माहोल सेटवर तयार करवून घेतला आणि शूटींगला पुन्हा नव्याने सुरुवात केली.

त्यानंतर सिनेमास्कोपचं नवं तंत्रज्ञान आलं, कमाल अमरोहीने पाकिझाही आडव्या, सिनेमास्कोप तंत्रातच जास्त खुलून दिसेल असं ठरवलं, आणि मग पुन्हा आधीच शूटींग रद्द करून नव्याने शूटींग.
असा खेळ अनेकदा चालू राहीला. मीना कुमारी आधी भांडली, मग थकली, अल्कोहोलिझमने तिचा कब्जा घेतला, ती आजारी पडली, हिरो अशोककुमारचं पोक्त झाला, त्याच्या जागी राजकुमार आला. कमाल अमरोहीने नायकाची व्यक्तिरेखा राजकुमारच्या रांगड्या व्यक्तिमत्वाला साजेल अशी नव्याने लिहिली. पाकिझाचा हिरो बिझिनेसमन होता, आता फ़ॉरेस्ट रेन्जर झाला.
पाकिझा संपूर्णपणे नायिकाप्रधान असूनही, त्यात मीनाकुमारीसारख्या समर्थ अभिनेत्रीची डबलरोलची सशक्त, ऑथरबॅक्ड व्यक्तिरेखा असूनही त्यातला नायक नामधारी किंवा मिळमिळीत वाटत नाही. हे श्रेय संपूर्णपणे कमाल अमरोहीचे.

पाकिझा मधली काही वर्षं अक्षरश: डब्यात गेला. मीनाकुमारी आणि कमाल अमरोहीमधे वैयक्तिक ताण-तणाव होतेच. व्यावसायिकदृष्ट्याही त्यांचे संबंध आता दुरावले. पण सुनील दत्त-नरगिस या जोडप्याने पाकिझाची काही रिळं पाहिली होती, हा किती अप्रतिम सिनेमा बनू शकतो हे त्यांना माहित होते. अखेर त्यांनी मनावर घेतले, मीनाकुमारीला राजी केले, अमरोही तयार होताच, आणि पाकिझा पुन्हा सेटवर गेला.

या सगळ्यात मीनाकुमारीचं पाकिझा पहिल्यांदा सुरु होतानाचं उत्फ़ुल्ल, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे टवटवीत सौंदर्य मात्र उताराला लागलं होतं. कमाल अमरोहीने हेही आव्हान स्विकारलं. जमेल तसे लॉन्ग शॉट्स घेत, काही ठिकाणी, विशेषत: नृत्याच्या प्रसंगात पद्मा खन्नाच्या डमीचा वापर करत त्याने शूटींग पुढे रेटलं. आपली कल्पनाशक्ती पणाला लावत गाण्यांचे शूटींग केले.
उदा. चलो दिलदार चलो.. या गाण्याच्या चित्रिकरणाच्या वेळी मीनाकुमारीला उभं रहाणंही मुश्किल होतं. चेहर्‍यावर सूज आली होती, क्लोज-अप्स तर अशक्यच होते. अमरोहीने तिचा चेहरा दिसणारच नाही अशा तर्‍हेने डमी वापरत, व्यक्तिरेखांवर कमीतकमी भर देत, समुद्राचं पाणी, आकाशातला चंद्र, चांदण्या आणि शीडाच्या बोटींचा वापर करत गाण्याचे शूटींग केलं आणि गाण्यातला रोमॅन्टिक मुड कायम ठेवत उलट त्याला एक वेगळीच फ़िलॉसॉफ़िकल डूब मिळाली.

कमाल अमरोहिच्या दिग्दर्शनाचे, मीनाकुमारीच्या अभिनयाचे काही मास्टरपीसेस पाकिझामधून दिसतात ते केवळ अप्रतिम आहेत. मीनाकुमारीच्या आजारपणामुळे असेल, किंवा व्यक्तिरेखाच तशी लिहिली गेल्यानेही असेल, पण तिच्या दोन्ही व्यक्तिरेखांवर एक कमालीच्या औदासिन्याची झाक आहे. दु:ख, उदासी ती गरज नसताना स्वत:वर ओढवून घेते आहे, मनातला गोंधळ अनेकदा स्वत:च्या निर्णय न घेऊ शकण्याच्या कमकुवतपणामुळे मुद्दाम निर्माण करत आहे असं वारंवार जाणवतं.

काहीवेळा तर आपल्याला कळतच नाही ही नक्की अशी का वागते आहे, चीडही येते इतकं तिचं कॅरेक्टर कधी कधी कन्फ़्युजिंग वागतं. तिची व्यक्तिरेखा स्वप्नाळू आहे मात्र आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची ताकदच तिच्यात नाही असं वाटतं. मीनाकुमारीला आनंदी व्हायचंच नाहीये का असा प्रश्न पडतो.

मात्र एका प्रसंगात मीनाकुमारीच्या अभिनयाला, तिच्या संवाद उच्चारण्याच्या एरवी सदोष वाटणार्‍या धाटणीलाही सलाम करावासा वाटतो. माझ्या मते सिनेमाचा हा हायलाईट सीन.
मीनाकुमारी म्हणजेच साहेबजान, राजकुमारपासून म्हणजेच सलीमपासून पळून पुन्हा कोठ्यावर परतलेली असते, सैरभैर, उदास अवस्थेत वावरत असते. तिची कोठ्यावरची सखी त्याबद्दल तिला वारंवार छेडते, तिचा मूड सुधारण्याचा प्रयत्न करते. अशाच एका प्रसंगी साहेबजान म्हणते- "हर तवायफ़ एक लाश हैं, मैं एक लाश हूं, तुम एक लाश हो, आपले हे गुलाबी कोठे म्हणजे कब्रस्तान."

मीनाकुमारीने आपल्या व्यक्तिमत्वाला सारा दर्द या संवादामधे ज्या पद्धतीने ओतला आहे, तो ऐकताना अंगावर काटा येतो. आपल्याला ट्रॅजेडीक्वीन हा किताब उगाच नाही मिळाला याची जणू साक्ष या प्रसंगातून ती देते. साहेबजानच्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण औदासिन्याचा मूडच या प्रसंगातून व्यक्त होतो. ती आतून खरंच मरुन गेलीय, काही स्ट्रगल करावा, झगडावं परिस्थितीशी असं आतूनच तिला वाटत नाहीये, फ़क्त दु:ख आणि दु:खच आपल्या पदरी येणार अशी तिची जणू खात्री झाली आहे.

इतकं खोलवर डीप्रेस्ड कॅरेक्टर आजवर हिंदी सिनेमांमधे कधीही इतक्या समर्थपणे रंगवलं गेलं नाहीय. नायिकेच्या प्रमुख भूमिकेतून तर नाहीच नाही.
साहेबजान जेव्हा नरगिसच्या पोटात वाढत असते तेव्हा नरगिसने कब्रस्तानात आसरा घेतलेला असतो, समाजाच्या धिक्कारण्यामुळे ती त्यावेळी संपूर्णपणे कोलमडून पडलेली असते. जिवंतपणीच कफ़न पांघरुन बसलेली, जिंदा लाश नरगिस. नऊ महिने तिच्या पोटात वाढलेल्या साहेबजानवर सगळे संस्कार झाले असणार ते अशा नकारात्मक, उदास प्रवृत्तिचेच.

व्यक्तिरेखेचा असा सखोलपणा ही पाकिझामधली अचानक गवसलेली, व्यावसायिक सिनेमांमधे मला तरी अद्वितीय वाटलेली गोष्ट.

पाकिझाच्या कथेला एक विशिष्ट काळ आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा हा काळ आहे. सरंजामशाही अजून पुरती लयाला गेलेली नाही. इंग्रजी अंमल ऐन भरात आहे. अमरोहीने हा काळ दिसेल असे वातावरण सेटवर निर्माण करण्याचा असोशीने प्रयत्न केलेला दिसतो.
नरगिस आणि शहाबुद्दीन लग्नानंतर चौकच्या बाजारातून ज्या बग्गीत बसून जातात तिच्यावरचा चांदीचा पत्रा आणि त्यावरचा बकिंगहॅम पॅलेसचा ठसा कोरलेला स्पष्ट दिसतो. शहाबुद्दीनच्या घरातले कर्मठ मुस्लिम वातावरण दाखवणे हा तर कमाल अमरोहीच्या डाव्या हाताचा मळ. एकंदरीतच मुस्लिम कौटुंबिक समाजातली ट्रेडमार्क असणारी आदब, तेहजिब, चालिरिती पाकिझामधून वैशिष्ट्यपूर्ण रितीने दिसले.
मुस्लिम सोशल सिनेमांचा अस्त हळू हळू होतच होता, पाकिझा हा त्यातला शेवटचा महत्वाचा सिनेमा ठरला.

पाकिझा हे कमाल अमरोहीचे जिवंतपणी पाहिलेले स्वप्न होते आणि ते साकार करण्याकरता त्याने आपली सारी पुंजी, सारी प्रतिभा पणाला लावली.

सुंदर, आत्म्याला स्पर्श करणारे संगीत पाकिझाचा प्राण होता आणि अत्यंत उच्च दर्जाची सौंदर्यपूर्ण दृष्यात्मकता हा पाकिझाचा कणा होता.
गुलाबी महालातली झुंबरं, रुजामे, शमादाने, कारंजी, नक्षीदार कमानी, खांब.. सिनेमास्कोप पडद्यावरची प्रत्येक फ़्रेम नेत्रदीपक आणि तरीही कुठेही भडक, अभिरुचीहीन दिसली नाही. याचे श्रेय सेटडिझायनर एन.बी.कुलकर्णींना अर्थातच जाते.
कारंज्याच्या पाण्यात आपले केस बुडवून पहुडलेली मीनाकुमारी भन्नाट होती, अनेक दशकांनी संजय लिला भन्साळीने जेव्हा देवदासमधून तवायफ़ साकारली तेव्हा चंद्रमुखीच्या प्रत्येक अदेमधून साहेबजान डोकावली. अगदी कारंज्याच्या पाण्यात केस बुडवून बसलेल्या माधुरीच्या सीनसकट.

समृद्ध रंगांचा वापर, विशेषत: लाल रंगाच्या विविध छटा, त्याही कुठेही भडकपणा येऊ न देता वापरणं हे पाकिझाचे वैशिष्ट्य.
पाकिझाचा काव्यात्म मूड अगदी सिनेमाच्या टायटल म्युझिकपासून दिसतो. त्यातला वाद्यांचा एकत्रित वापर, लताच्या आवाजातला आलाप सिनेमाचा क्लासिक म्युझिकल मूड सेट करतो.
गुलाम महंमद पाकिझाच्या निर्मितीकाळातच खुदाला प्यारे झाल्यावर पार्श्वसंगिताची जबाबदारी नौशाद यांनी उचलली आणि मास्टर्स स्ट्रोक काय असतो त्याची चुणूक या बुजूर्ग संगीतकाराने अगदी सहजपणे रसिकांना दिली. पक्षांच्या किलबिलाटाचा, आगगाडीच्या शिटीचा, धडधडत येणार्‍या ट्रेनचा, बांगड्यांच्या किणकिणाटाचा आवाज ज्यांनी पाकिझामधे ठायी ठायी महत्वाच्या व्यक्तिरेखेसारखी भूमिका बजावली तो जिनियस टच मात्र कमाल अमरोहींचा स्वत:चा.
कोठ्यावर मुजरा नृत्य चालू असताना, आजूबाजूच्या कोठ्यांवरुन उमटणारे स्वरांचे नाद, ज्यात ठुमरीची तान आहे, गझलांचे सूर आहेत, तबल्याचे बोल आहेत, मधुनच शास्त्रोक्त चीजांचा वापर.. हे सारं तवायफ़ कोठ्यांच्या आसपासचा माहोल अचूक उभा करणारं.

गुलाम महंमद हे नौशादांचे सहायक संगीतकार होते. स्वतंत्रपणे संगीत दिलेला त्यांचा हा पहिलाच सिनेमा. इतक्या बेहतरीन, हॉन्टींग चाली त्यांनी दिल्या आणि त्यांचे रसिकांनी केलेले कौतुक पहायला हा बिचारा संगीतकार जिवंत राहू शकला नाही हे किती दुर्दैवाचे.
सिनेमा पूर्ण झाल्यावर वितरकांनी कमाल अमरोहींना सुचवून पाहीले की या अनोळखी संगीतकाराच्या नावावर सिनेमा खपणार नाही, कोणी नावाजलेला, नव्या दमाचा संगीतकार श्रेयनामावलीत येईल असे पहा. पण अमरोहीने ही सूचना साफ़ धुडकावून लावली. गुलाम महंमद हयात नसताना त्यांचा असा अपमान करणे माझ्याच्याने शक्य नाही, ते जिवंत असते तर कदाचित त्यांना विनंती केली असती, पण आता नाही. त्यांनी जी मेहनत करुन सुंदर संगीत दिले त्याचा मान मला राखलाच पाहीजे, असे कमाल अमरोहींचे विधान काळजाला स्पर्श करुन जाणारे आहे.

चलते चलते यूंही कोई मिल गया था, थाडे रहियो, इन्ही लोगोंने, चलो दिलदार चलो, आज हम अपनी मुहोब्बत का असर देखेंगे, मौसम है आशिकाना.. अशी एक से एक गाणी पाकिझाची शान ठरली. कमाल अमरोहींचा विश्वास सार्थ ठरला.
एकुण बारा सुरेल गाणी सिनेमाकरता बनवली होती, सगळीच काही वापरता आली नाहीत. पण एचएमव्हीने काही वर्षांनंतर या गाण्यांची डबल एलपी काढली जी रसिकांकरता खजाना ठरली.

लता मंगेशकरांचा मधाळ आवाज पाकिझामधे अलौकिक पातळीवर पोचला आहे असं म्हटलं तर यत्किंचितही अतिशयोक्ती ठरणार नाही. स्वरांवरची हुकूमत काय असते ते चलो दिलदार चलो.. या एकाच गाण्याच्या उदाहरणावरुनही सहज पटते. पुरुष गायकाचा म्हणजे रफ़ीचा आवाज या गाण्यातल्या फ़क्त ध्रूवपदात वापरला आहे. रफीच्या चलो दिलदार चलो.. या व्याकूळ सादेला प्रतिसाद देणारा लताचा हम है तैय्यार चलो.. म्हणणारा डीव्हाईन आवाज, हे दोन्ही आपल्याला क्षितिजापल्याडच्या दुनियेत तरंगत घेऊन जातात त्यांच्यासोबत.

या गाण्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख करावासा वाटतो कारण हे गाणं नुसत्या रोमॅन्टिकपणात अडकत नाही, यात काहीतरी सुटत चालल्याचा, सगळ्यांना सोडून क्षितिजापार, चंद्रालाही मागे टाकून जाण्याचा जो हळवा मूड आहे तो मनाला कातर करुन सोडतो, गाण्यातल्या एको इफ़ेक्टमुळे स्वर मनात घुमत रहातात.
हळूवारपणे, संथ वेग पकडत पाण्यावर तरंगणारी शिडाची नौका.. आओ खो जाये सितारोंमे कही.. आओ भूल जाये दुनियाको कही.. असे स्वर उमटवत हळू हळू चांदण्यांमधे लहरत जात असते, तो मूड केवळ अविस्मरणीय. लताचा आर्त स्वर अंधारात हलकेच विरत जाणारा.
शेवटच्या श्वासाची लय सांधणारी ही साद आहे.

पाकिझा हा प्रवास आहे साहेबजानचा.
गुलाबी महालातल्या लालजर्द गालिच्यावर थिरकणार्‍या तिच्या नाजूक गोर्‍या पावलांचा,
सलिमला मोहात पाडलेल्या तिच्या पैंजण घातलेल्या उघड्या पावलांचा,
पांढर्‍याशुभ्र तक्तपोशीवर लाल रक्ताचे ठसे उमटवणार्‍या तिच्या रक्तबंबाळ जखमी पावलांचा.
अखेर तिची पावलं गुलाबांच्या पाकळ्यांवरुन सलिमच्या दुनियेत प्रवेशतात.
तिचा प्रवास संपतो.
पाकिझाचा प्रवास मात्र सुरु व्हायचा असतो.

* संदर्भ-
विनोद मेहता (इंडियन सिनेमा),
अभिजीत देसाई (शिणुमामागची गोष्ट)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम... काही सिनेमा, गाणी, यांच्या कथा माणसाच्या धडपडीची साक्ष देतात. छान. या विषयावर असेच आणखी लिहा. आजकाल सिनेमे दोन महिन्यात बनतात. आणि एक दोन आठवड्यत ५-५० कोटीचा धंदा करून उठतात. त्याच्यापुढे या जुन्या कहाण्या अगदी अरबी दंतकथा वाटतात.

असं नका लिहु बॉ.
पाहणार पुन्यांदा पाहणार. फक्त तुझ्या लेखामुळे. Happy तू लिहीलेल्या काही गोष्टी माहित नव्हत्या. थँक्स अ टन.

शर्मिला हाणेल मला,
पण मीनाकुमारीची पावलं अजिबात नाजूक वाटली नव्हती..
मी (दूरदर्शनच्या दिवसात) पाहिल्यांदा पाहिला तेव्हा या चित्रपटाबद्दल मातोश्रींची टकळी सुरु होती. पिताजींने संवाद म्हणून उरलेली कसर भरुन काढली.
मी एकीकडे कटकट करत होते, पण घातली, भुरळ घातली पाकिजाने. दुसर्‍या दिवशी शाळेतही कुचुकुचु खुसुरफुसुर चर्चा झाली. शिक्षक सुद्धा वैतागले की वर्गाला झाले तरी काय.
पण एवढ्यांदा ते कौतुक ऐकलं वाचलं की तो राजकुमार पण रुबाबदार वाटायला लागला, ती तुकड्यातुकड्यातून वयस्कर दिसणारी साहेबजानही षोडशवर्षीय वाटायला लागली. ती पडद्यावरची प्रेमकहाणी खरी वाटायला लागली.
असो. willing suspension of disbelief चे याहुन चांगले उदाहरण नाही माझ्या पाहण्यात. Wink
संगीत आणि ग्रँड सेटस आणि संवादातील काव्य हे मात्र कमालीचे.

हिंदी शिनेमातल्या cliche क्रमांक कितीतरी- courtesan with a heart of gold म्हणले की मला हटकुन आठवतात त्या साहेबजान,पारो, उमरावजान इ.इ.इ. नंतरच्या काळातील नवीन पारो (दिक्षीतबाई सुद्धा)

गाणी.. खरंच स्वर्गीय गाणी आहेत.
माझ्या कॉलेजातल्या एका मैत्रिणीची अत्यंत आवडती ओळ 'आजाओ मै बनादू, पलकों का शामियाना'. रात्री गप्पा कुटत असताना तिने ते अशा प्रकारे सांगीतले की आमची स्वप्न जादूची झाली.
ट्रेनचे प्रवास तर माझ्यालेखी फक्त 'पाकिझा' आणि 'उपरवाला जानकर अंजान है'- या दोहोंनी रोमँटिक करुन ठेवले.

'माणूस' मी मुद्दाम पुन्हा पाहिला होता. त्याचे दिग्दर्शन निश्चित उजवे, तरी ते प्रेम बीम असं नकळत्या वयात झपाटुन टाकत नाही 'पाकिझा' सारखं. का यावर फुकटचा विचार करण्यात बराच वेळ दवडला आहे.
मला वाटतं भाषा आणि गाणी . उर्दु मध्ये जे आहे, ते .. लताबाईंच्या आवाजात, संगीतात जे आहे ते..
शर्मिलाने लिहीलेले 'काव्यात्मक' जे आहे ते..

गंमत म्हणजे 'प्रिटी वुमन' पहिल्यांदा पाहताना, आठवला होता तो पाकिझा. ' Must've been love, but its over now' ऐकताना कानात पाकिझाचे ट्रॅक्स वाजत होते खरंच. एकतर तवा इंग्रजी पटकन कळत नसे. पहिले पाहणे फुकट घालवलेय मी त्या प्रिटीवुमनचे.

एक अगदी साधी गोष्ट नोंदवतो. http://www.youtube.com/watch?v=ubQ9hrKO6XI&ob=av3e चलते चलते या गाण्यातल्या एक्स्ट्रॉज च्या हालचाली, नृत्यमुद्रा पहा. त्या सुध्दा इतक्या सुंदर आहेत की आपण काहीतरी खानदानी , अभिजात अस पहातोय, हे काही नेहमीच्या कोठे तवायफांच्या गाण्यांवरच्या नाचातल्या सारख थिल्लर उत्तान अस नाही, हे तुम्हाला लगेच लक्षात येइल.

बाकी या लेखा विषयी काय लिहायच? शर्मिला !! सिर्फ नाम ही काफी है!!नाव दिसल की लेख वाचल्याशिवाय पुढे जाता येतच नाही.

ता.क. या गाण्याच रिमिक्स मात्र चुकूनही पाहु नका. त्या मीनाकुमारीने ते पाहिल तर बिचारी कबरीत तडफडत उलटी पालटी होईल.

पाकिजा मी एकंदर ११ वेळा बघितलाय, इतका आवडला होता तो. लेख उत्तमच जमलाय.
काही कलाकारांचा उल्लेख व्हायला हवा होता.
पद्मा खन्नाचा जसा आलाय तसाच सितारादेवीचा पण व्हायला पाहिजे. तिने याचे नृत्यदिग्दर्शन केले होते. चलते चलते मधल्या दोन सहनर्तिकांचे नृत्य हा हायलाईट होता.

पाकिजाच्या मैत्रिणीच्या भुमिकेतील नादीरा, आणि शहाबुद्दीन अशी खणखणीत हाक मारणारी वीणा.

लताची वगळलेली गाणी आणि बेगम परवीन सुलताना (कौन गली गयो) वाणी जयराम (मोरा बालम)
राजकुमारी (नजरीया की मारी) या गायिकांचे उल्लेख व्हायला पाहिजे होते.

सुंदर लेख. बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या 'पाकिजा' बद्दल.
श्रीकांत, दिनेश
परफेक्ट निरीक्षण Happy ...

ट्रेनचे प्रवास तर माझ्यालेखी फक्त 'पाकिझा' आणि 'उपरवाला जानकर अंजान है'- या दोहोंनी रोमँटिक करुन ठेवले.>> रैना Happy

सुरेख लेख!!! Happy

अत्यंत आवडती ओळ 'आजाओ मै बनादू, पलकों का शामियाना'.

ट्रेनचे प्रवास तर माझ्यालेखी फक्त 'पाकिझा' आणि 'उपरवाला जानकर अंजान है'- या दोहोंनी रोमँटिक करुन ठेवले.>>>>रैना +१

शर्मिला इतकं विस्तृत आणि तितकंच छान लिहिलंत. आता पुन्हा एकदा हा चित्रपट पहावासा वाटतोय.
राजकुमार साहेबजानची ओळख (बहुधा एका काजीला) पाकीजा म्हणून करून देतो त्या क्षणीची साहेबजानची वर्मी बाण लागलेल्या शुभ्र पक्षिणीची तडफड मीनाकुमारीने जी व्यक्त केलीय ती अंगावर येते. (अशीच 'साहिब बीवि और गुलाम' मधली 'न जाओ सैंया' नंतरची, शराब पी है किसीने?' विचारतानाची तडफड आणि शेवटची किंकाळी
पाठलाग करीत राहतात.

एक दुरुस्ती : पाकिजा हा गुलाम मोहम्मद यांचा पहिला नाही तर शेवटचा चित्रपट. १९५० पासून ते स्वतंत्र संगीत दिग्दर्शनही करीत होते. मिर्जा गालिब ही त्यांची आणखी एक अजरामर कलाकृती. त्यांनी संगीत दिलेलं लताने गायलेलं १९५१मधलं गाणं इथे फक्त ऐका. {नौशाद यांच्यावरील एका अन्य धाग्यावर हिंदी चित्रपटसंगीतासंबंधीच्या आख्यायिकांबद्दल चर्चा झाली आहे. (योगायोग? इथेही पुन्हा नौशाद?) गुलाम मोहम्मद यांच्याबद्दल तुम्ही इथे जे लिहिले आहे ते मात्र मी प्रथमच ऐकतोय. त्याचा स्त्रोत काय ते सांगाल का?}

हा चित्रपट प्रदर्शित होऊन त्याचे संगीत सुपरहिट होण्यापूर्वी गुलाम मोहम्मद विपन्नावस्थेत पोचून अल्लाला प्यारे झाले.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रथम पडला आणि मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर अचानक हिट झाला.

नवाबजानच्या भूमिकेतली अभिनेत्री वीणा ही हिंदी चित्रपटांतली सर्वाधिक सुंदर अभिनेत्री असं शिरीष कणेकरांनी लिहिल्याचं आठवतंय. तिच्यावरच्या लेखातला तिने 'शहाबुद्दिन' अशा दिलेल्या बुलंद आव्हानात्मक हाकेचाही उल्लेख लक्षात आहे.

मीनाकुमारी - कमाल अमरोही यांच्या दायरा बद्दल वाचलंय. तो पहायला मात्र मिळत नाही.

रैना, मीनाकुमारीचे पाय सुंदर वाटले नाहीत तरी तसे लिहायचे नसते. (मीनाकुमारी आपल्या वयाच्या आणि त्या व्यक्तिरेखेच्या मानाने खूप प्रौढ बेढब वाटली तरी हा चित्रपट पाहताना जराही खटकत नाही.) "तुझे पाय खूप सुंदर आहेत, ते जमिनीवर ठेवू नकोस" असं पोटासाठी नाचणं जिच्या नशिबी आलंय तिलाच सांगितलं जावं, आणि असं सांगणार्‍यासमोरच काचांवर आपल्या रक्तरंजित पावलांचे ठसे उमटवीत तिने नाचावे हा दैवदुर्विलास.

शर्मिला, अफाट सुंदर लिहिलं आहेस. या लेखापायी परत एका नव्या दृष्टीकोनातुन सिनेमा पहावासा वाटतो आहे. सिनेमाचा इतिहास कळला, त्यातल्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन कलाकारांच्याबद्दल कळल्यावर ओढच वाटते आहे हा सिनेमा पहायची.

१०-१२ वर्षांपुर्वी रात्री कोणत्यातरी चॅनेलवर हा सिनेमा आला होता, तेव्हा सगळ्यांनी आठवडाभर इतकी वाट पाहिली होती. सारख्या चर्चा आणि इतका उदोउदो कि अपेक्षा फार उंचावल्या आणि सिनेमा पाहिल्यावर अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटलं. मला मीनाकुमारी कधीही सुंदर वाटली नाही. या सिनेमात तर अज्जिबात नाही. तिचं पाऊल सुंदर, हा सिनेमातला अतिशयोक्त प्रसंग वाटला होता, पण या लेखानंतर परत एकदा पहावासा वाटतो आहे सिनेमा. गाणी निर्विवाद सुंदर आहेत, भव्य सेटस, संवाद या सगळ्या जमेच्या बाजु आहेत.
आता कमाल अमरोहींच्या स्वप्नासाठी, मीनाकुमारीच्या शोकांतिकेसाठी, गुलाम महंमदांना श्रद्धांजली, लता मंगेशकरांच्या जुन्या काळातल्या स्वर्गीय आवाजासाठी आणि मॅच्युअर्ड वयात दृष्टीकोन बदलल्यावर स्वतःच्याच समाधानासाठी हा सिनेमा परत पहायचा आहे.

शर्मिला, रसग्रहण खूप छान केले आहे - इतके की पुन्हा एकदा (कितव्यांदा याची मोजदाद या असल्या बाबतीत कराविशी कधी वाटलीच नाही) चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं... साहेबजानचं प्रेम, तिची द्विधा मनःस्थिती, चित्रपटाचा माहौल खूप छान पकडलं आहे शब्दांत. खरोखरच जेव्हा चित्रपट बनवायला घेतला तेव्हा बनला असता तर मीनाकुमारीने अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही घायाळ केलं असतं असं मात्र मनात येतं.

शर्मिला, अगं काय लिहिलं आहेस गं. किती छान उलगडून दाखवलयंस.

कमाल अमरोही, के आसिफ अशा लोकांचा ध्यासातून, खरंतर 'वेडातून' निर्माण झालेले ही स्वप्नं म्हणूनच 'माईल-स्टोन' ठरलीत. एकाच सिनेमात इतक्या अलौकिक गोष्टी एकत्र याव्यात हे आपलं भाग्य!

गुलाम महंमद यांचा ठेका तर सिनेमात पदोपदी दिसतो. विशेषतः चलते चलते गाण्यात. सुरवातीचे सारंगीचे सूर, नंतर सुरू होणारा तबला आणि एका अचानक क्षणी सुरू होणारा लताचा आवाज.... केवळ स्वर्गीय अनुभव.

मस्त लेख....आवडला. मी कधीही हा सिनेमा पाहणार नाही हे माहित असूनही पाहावासा वाटतोय इतका छान लिहिलाय. अभिजीत देसाई ह्यांचं शिणुमामागची गोष्ट मीही वाचलंय. मला वाटतं त्यातच उल्लेख आहे की ह्या चित्रपटात सलीमच्या भूमिकेसाठी धर्मेद्रही काही दिवस होता. पण आधीच सुरु असलेली त्याची आणि मीनाकुमारीची प्रेमकहाणी ह्या काळात अधिक बहरली आणि मीनाकुमारी-कमाल अमरोही नातं संपलं. मीनाकुमारीच्या शेवटच्या दिवसात आपण हा चित्रपट पूर्ण केलाच पाहिजे असा तिला ध्यास लागला होता. त्यामुळे नर्गिस-सुनील दत्त ह्या तिच्या सुह्र्दांकडवी अमरोहीला निरोप पाठवून चित्रपट सुरु करण्यात आला.

एकदा वाचून समाधान होईना. पुन्हा वाचणार! पाकिजा बघावाच लागेल पुन्हा!
मयेकरांची नोट मस्त!

अप्रतिम लेख!

मी कधीही हा सिनेमा पाहणार नाही हे माहित असूनही पाहावासा वाटतोय इतका छान लिहिलाय. >>> असं नको करूस. बघायला हवासंच हा सिनेमा.

मी १९७२ मध्येच पाहिलेला आईबरोबर. काहीही समजला नव्हता. आता गोष्ट कळली. परत बघेन. नटराजला लागलेला पहिला सिनेमा बहुतेक. चलते चलते फेवरिट साँग. मौसम है आशिकाना फारच रोम्यांटि़क गाने आहे. कोणाच्या नशिबात असते बरे इत्का रोमँटिक पणा. त्या गाण्यातील निसर्ग फारच सुरेख आहे. लेख छान आहे हे तर गृहितच Happy

सुरेख लेख, नेहमीप्रमाणेच.
'पाकिजा' मी (शक्य असूनही ) संपूर्ण पाहिला नाही. काही तुकडे / गाणी पाहिलीत. हा लेख वाचल्यानंतर नव्या दृष्टिकोनातून पुन्हा पाहीन म्हणतो. Happy

ज्या वर्षी पाकिझा रिलीज झाला त्याच वर्षी, मीनाकुमारीचे लागोपाठ मेरे अपने आणि दुष्मन रिलीज झाले. आणि अचानक ती गेलीच. गोमती के किनारे, हा तिचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट.

लेख खासच. पहिल्यांदा वाचल्यावर नि:शब्द झाले. आता पुन्हा वाचला. मी सिनेमा पाहीला नाहीये पण गाणी सगळीच आवडीची. आता मात्र अशा दृष्टीनं बघायला हवाच.

काय सुंदर लिहीलयस शर्मिला...

खूप लहान असताना हा सिनेमा पाहिलाय. आता हे वाचुन पुन्हा पहावासा वाटतोय.

चलो दिलदार चलो बद्दलतर काय लिहिलयस!! खरच पाकिझाची गाणी अगदी चिरतरुण आहेत. मनात हुरहुर जागवणारी. Happy

लेख सुंदरच आहे. पण पाकिझा हा माझा फारसा आवडता चित्रपट नाही. केवळ गाणी आणि पार्श्वसंगीत अप्रतिम आहे. पण मीनाकुमारी ला अजिबात बघवत नाही पडद्यावर. (माझ्या घरी मीनाकुमारीची हार्डकोअर फॅन असतानाही मी हे वाक्य लिहायला धजावलोय ! :फिदी:)

Pages