.....और उनके बहुत सारे साथी!

Submitted by लसावि on 4 April, 2012 - 02:49

दुपारी दीड-दोनची वेळ, प्रचंड, रखरखीत उन्हाळा आहे; सगळं काही एकदम स्तब्ध. रविंद्रनाथ म्हणतात तशी, 'दिवसाच्या पोटात असलेल्या रात्रीसारखी' दुपार! काहिली इतकी भयंकर आहे की कसलीही सहज कृती, साधा विचारही शक्य नाही, एक प्रकारची ग्लानी आली आहे.
आणि तेवढ्यात कानावर सूर येतात......
'फिर मिलोगे कभी इस बात का वादा कर लो, हमसे इक और मुलाकात का वादा कर लो'. मोजकीच वाद्ये, सुंदर चाल आणि 'वादा' शब्दावर गंमत करणारा महंमद रफी नावाचा कोणी. सगळा त्रास, शीण, थकवा संपतो, मन जणू सर्व शारिर संवेदनांच्या पलिकडे जाते, वाळवंटातील ओअ‍ॅसिस अजून दुसरे काय असते?
गाणं संपतं आणि घोषणा होते, 'ये रात फिर न आएगी इस फिल्म का ये गाना सुनना चाहा था हमारे इन श्रोताओंने, पटना बिहारसे राजकुमारी और गुंजन चावला, पुरीसे बिट्टू, चिंटू और उनके मम्मी पापा, बिकानेर राजस्थानसे राजेश उपाध्याय और उनके बहोत सारे साथी.'
माझी भयाण दुपार शांतवून टाकणारे हे सगळे खरचं माझे साथी वाटू लागतात आणि आम्हा सर्वांना एकत्र आमचा आणणारा सर्वात मोठा साथी- विविधभारती!

मुळात मला रेडिओची आवड लागली तीच विविधभारती ऐकल्याने. अगदी सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत एकपेक्षा एक सरस कार्यक्रम देत श्रोत्यांना बांधून ठेवायची किमया त्यात आहे. सकाळी प्रसारित होणारा संगीत सरिता हाच कार्यक्रम घ्या. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीत यातले दिग्गज या कार्यक्रमाच्या ५-७ मिनीटात काय अपूर्व ज्ञान देतात! या कार्यक्रमाची वेळ वाढवा ही सूचना देखील 'वाचकांच्या पत्रव्यवहारात' ठरलेली! नंतर येणारा 'चित्रलोक' म्हणजे टिपीकल ऑडीओ ट्रेलरची धमाल- 'मनोरंजन का लावा फूटेगा, सारा भारत डोलेगा' इ.इ.इ. मग दुपारच्या वेळेत येणारे फ़र्माईशी गाण्यांचे कार्यक्रम, चहाच्या बरोबर असणारा ’पिटारा’, संध्याकाळी ’फ़ौजी भाईयों के लिए-जयमाला’ आणि त्यातही कलाकारांनी सादर केलेला ’विशेष जयमाला’ असेल तर अजूनच मजा. त्यानंतर फ़क्त गजलांचा कार्यक्रम कहकशां आणि शेवटी ’बेला के फ़ूल’! पुन्हा यात ’आज के फ़नकार’’एक ही फ़िल्म से’ इत्यादी ’नेहमीचे यशस्वी’ कार्यक्रम तर आहेतच.
हिंदी सिनेसंगीताच्या अक्षय्य खजिन्याची चावी म्हणजे विविधभारती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी तर गाण्याबद्दल दिली जाणारी माहिती लिहीण्यासाठी एक वही तयारच ठेवली होती आणि त्यात सिनेमाचे नाव, संगीतकार असल्या गोष्टी तत्परतेने उतरवत असे (ते कागद माझ्याकडे अजून आहेत आंणि त्यातल्या लिस्टप्रमाणे सी.डी बनवण्याचा न जमलेला बेतही!).

शांत, संयत सुरात, उत्तम हिंदीमध्ये आणि ते लावत असलेल्या गाण्याप्रमाणेच श्रवणीय आवाज असलेले विविधभारतीवरील उद्घोषक खरेतर एका स्वतंत्र लेखाचा विषय आहेत. कमल शर्मा, युनूस खान असोत वा ममता सिंग, रेणू बंसल; सारेच वैशिष्ठ्यपूर्ण आणि उत्तम. आजच्या एफएमवर वात झाल्याप्रमाणे बडबडणार्‍यांशी त्यांची तुलनादेखील नको. काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे. बिनाका गीतमालाच्या रुपाने सिलोन रेडीओवरील कारकिर्दिने अ़क्षरश: स्टार बनलेल्या अमिन सायानींनी देखील विविधभारतीवर मोठे योगदान दिले आहे.
या मंडळींनी घेतलेल्या आणि अनेक भागात प्रसारित करण्यात आलेल्या एकसोएक दिग्गज कलाकारांच्या मुलाखती हा एक वेगळाच खजिना आहे. मला अनेकदा वाटतं की या मुलाखतींच्या सीडीज जर प्रकाशित झाल्या तर त्या हातोहात खपतील. वर्तमानपत्रे-मासिके यात ज्या गोष्टी कधी छापल्या गेल्या नाहीत त्यातल्या अनेक भन्नाट कथा या मुलाखतीत दडल्या आहेत. एसडीच्या मृत्यूनंतर त्यांच्याबद्दल बांध फ़ुटल्यासारखा बोलणारा किशोरकुमार, मला शास्त्रिय संगीतातले काहीही कळत नाही असे ठणकावून सांगणारा ओ.पी.नय्य्रर आणि आम्ही फ़िल्मफ़ेअर पुरस्कार लबाड्या करुन मिळवला हे कबूल करणारा लक्ष्मी-प्यारेमधला प्यारेलाल शर्मा मला याच मुलाखतीत भेटला.

एका कार्यक्रमाचा मात्र मी आवर्जून उल्लेख करेन तो म्हणजे दुपारी ४च्या 'पिटारा'त लागणारा 'बाईस्कोप की बातें'. दर आठवड्यात कोणत्यातरी एका सिनेमाच्या निर्मीतीची रंजक कथा सांगणारा हा कार्यक्रम. सिनेमाच्या गाण्याबरोबर त्याचा पूर्ण ओरिजिनल साउंडट्रॅकच विविधभारतीकडे असल्याने महत्वाच्या संवादासकट ही सिनेमाची गोष्ट ऐकवली जाते. सिनेमाशी संबंधीत अनेक मजेदार कहाण्याही यातच कळल्या. ’हरियाली और रास्ता’चे नाव वितरकांना ’वरियाली और नाश्ता’ असे कळल्याने उडालेला गहजब, ’मुडमुड के ना देख’ गाण्यामागची खरी गोष्ट असल्या चटपटीत दंतकथाबरोबरच ’मुघल-ए-आज़म’, ’शोले’ अशा अफ़ाट प्रयत्नांमागची कथाही इथेच कळली. या कार्यक्रमाने मला सिनेमाकडे जास्त गंभीरपणे पहायला शिकवले, मला 'मूव्हीबफ' बनवले.

या सगळ्यांच्या पलिकडे जाउन विविधभारतीने मला असे अनेक 'आहा!' क्षण दिले की काय सांगू!
’रास्ते में रुक के दम लूं ये मेरी आदत नही, लौट के वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं, और कोई हमनवा मिल जाए ये किस्मत नहीं’ अशी अफ़ाट ओळ लिहून जाणारा मजाज आणि ती तितक्याच ताकदीने पेश करणार्‍या तलत मेहमूदशी इथेच गाठ पडली.
'अपनी तनहाई का औरों पे न शिकवा करना, तुम अकेले ही नही हो सभी अकेले हैं', हे पहिल्यांदा ऐकलं तेंव्हा अंगावर आलेला काटा आणि शब्दांच्या कल्पक वापराला दाद द्यावी की विचारांच्या खोलीला असा प्रश्न इथेच पडला.
आरडी-गुलजार-आशा त्रिकूटाने सादर केलेला 'मेरी संगीत यात्रा' नामक अफलातून कार्यक्रम; ज्याने मी पूर्ण पंचमभक्त झालो.
आणि सर्वात महत्वाचा, 'महंमद रफीचा आवाज' नामक मित्र भेटला तो विविधभारतीमुळेच.

विविधभारतीने माझ्या आयुष्याला सूर दिला, भावनांना शब्द दिले, मला माझा संगीताचा कान दिला...आयुष्य समृद्ध करुन टाकले.
आणि माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील.

गुलमोहर: 

मस्त लेख. प्रत्येक ओळ वाचल्यावर ' अगदी अगदी' ' हो मी पण' ' येस्स मला सुद्धा' असं होत होतं. शिर्षक वाचल्यावर टिंग्कन एक घंटी वाजली. लगेच कळलं ' मन चाहे गीत'. Happy इतकं जबरी शिर्षक लेखाचं आणि लेख तर झकासच.

झुमरी तलैय्या चे साथीपण आठवले >>> हो गं वर्षु Proud आम्ही तर तो नकाशात गावं शोधण्याचा खेळ खेळायचो तेव्हा नेहमी हे गाव शोधायचो. हे गाव विभा आणि नंतर माबोच्या एका आयडीच्या अवलोकनात या दोन ठिकाणीच पाहिलं आणि ऐकलं आहे. Wink

ते एफएम च्या आरजेंबद्दल लिहिलं ते अगदी खरं. ती जमात इतकी बदाबदा बोलुन बोअर करते आणि क्षणोक्षणी इतकी एक्सायटेड का असते, देवच जाणे. पण त्याच वेळी चिमणचं म्हणणं पण एकदम खरं. विभाच्या आरजेंचं बोलणं ऐकुन <<<त्यांचे आवाज ऐकून मला एखाद्या शोकसभेला आलोय की काय असं वाटायचं! किशोरच्या धमाल गाण्यांच्या वेळेला पण त्यांचे आवाज मयतीला गेल्यासारखे वाटायचे! >>> आता तर ते फारच कृत्रिम वाटतात. <<<खरा उद्घोषक अमीन सायानी, तो मुळीच वात आल्यासारखं बडबडायचा नाही आणि त्याचं बोलणं ऐकत रहावसं वाटायचं!>>> + १
मी बिनाका कधी ऐकलंच नाही त्यामुळे ऐन भरातले सयानी मला माहित नाहीत, पण त्यांचं वय झाल्यावरही काय आवाज होता आणि त्यांचा बोलायचा ढंग लाजवाब.
थँक्स आगावु ! मस्त आठवणी जागवल्यास.

या विविध भारतीच्या पिढीचा मी एक अनुभव घेतलाय. एखाद्या लांब सफरीवर असावे आणि सहज एखादे जुने गाणे म्हणायला सुरवात करावी. गाडीत जर या पिढीचा कुणी असेल तर स्वरसाथ मिळतेच मिळते.

मस्तच रे आगावा Happy
पण ते रविवारी दुपारी नाट्य-रुपांतर वगैरे तत्सम काहितरी लागायचे (अजुनही लागतं बहुतेक) त्यामध्ये बरेच लोकं कायम 'रुप तेरा मस्ताना मोमेंट' येउ घातलीय अश्या स्टाईल मध्ये बोलत ... Wink (का? ते ठाउक नाही :फिदी:)

मस्त मस्त Happy अगदी नॉस्टॅल्जिया Happy रेडीओ हाच अगदी जिव्हाळ्याचा विषय !! ते 'आहा' क्षणांबद्दल अगदी प्रचंड अनुमोदन. वात आल्यासारखे बडबडणारे अलिकडचे आरजे... +१००००००० Happy
त्यामानाने ९१.१ वरचा 'कल भी आज भी' चा फहाद (नाव चुभुदेघे) आवडायचा.त्याचाही वेग खूप होताच बोलण्याचा पण गाणी ,माहिती आणि त्याचा तो सुकूनभरा Happy आवाज यामुळे बरेच दिवस तो कार्यक्रम मी नेमाने ऐकायचे Happy

एकदम नॉस्टॅल्जिक लेख.
मंदार तुमचे खास आभार मानायला हवेत ऑनलाइन विविधभारतीचा दुवा इथे दिल्याबद्दल. मला माहित नव्हता हा दुवा.

फार मस्त लेख आहे. लहानपणीचे सगळे दिवस आठवले. मंदार काटदरे तुम्ही दिलेली लिंक इतकी मस्त आहे ना. आत्ता विविध भारतीच ऐकती आहे.
झाँसी से अशोकजी,पिंकि,गुड्डी और राणी ऐकल्यावर मला एकदम तेव्हाची दुपार झाल्यासारखच वाटली. शुद्ध हिंदी ऐकायला फार भारी वाटायच. आता सांगली स्टेशनची पण लिंक कुणीतरी द्या. Happy

मंदार कात्रे, त्या विविध भारतीच्या चॅनलबद्दल आभार. ऐकत होते थोडा वेळ. पण ह्या लेखात म्हटल्याप्रमाणे इथून हे, तिथून ते वगैरे सांगितलं नाही दोन गाण्यांमध्ये. कोणत्या ठराविक वेळीच ती फर्माईशवाली गाणी लागतात का?

व्वा! सुंदर लेख... Happy
एकदम नॉस्टॅल्जिक.... Happy

देशात होते तो पर्यंत एकही दिवस असा गेला नाही की विविधभारती ऐकले नाही... छायागीत आणि बेला के फुल दोन्ही कार्यक्रम रोज ऐकायचेच Happy

अमिन सयानी यांच्या 'बिनाका/सिबाका गीतमाला' चा सीडी संच आहे... प्रत्येक वेळेस ऐकताना जुन्या आठवणी जाग्या होतात Happy

विविधभारती इ च्या काही जुन्या टेप्स, रेकॉर्डस (एलपीज) मुंबईला ऑल ईडिया रेडिओच्या कार्यलयात मिळतात. यंदाच्या देशवारीत श्री लाजो काही क्लासिकल एल पीज च्या शोधात तिकडे गेले होते. पण दुर्दैवाने दोन्ही वेळेस तिथे 'विक्री कर्मचारी' आलेला नव्हता...त्यामुळे या रेकॉर्ड मिळाल्या नाहीत.. सरकारी कारभार... Sad खुप खुप जुनी रेकॉर्डिग्ज आहेत त्यांच्याकडे.

सर्वांचे मनापासून आभार!
लेख आवडला यात माझे काही नाही, जादू आहे ती विविधभारतीचीच!!!
अभ्यास करताना विविधभारती हे समीकरण तर इतके पक्के की परिक्षेत उत्तर आठवायच्या ऐवजी तो टॉपिक वाचताना कोणते गाणे लागले होते तेच आठवेल अशी परिस्थिती. विशेषतः झुलॉजी-बॉटनीसारख्या विषयांची शब्दशः हजारो आकृत्या असलेली जर्नल्स पूर्ण करताना या गाण्यांसारखी सोबत नव्हती.

विशेषतः झुलॉजी-बॉटनीसारख्या विषयांची शब्दशः हजारो आकृत्या असलेली जर्नल्स पूर्ण करताना या गाण्यांसारखी सोबत नव्हती. >>> Lol अगदी !!

परिक्षेत उत्तर आठवायच्या ऐवजी तो टॉपिक वाचताना कोणते गाणे लागले होते तेच आठवेल अशी परिस्थिती >>> हे तर फारच पटलं Rofl

मस्त लेख...त्यावेळेस अगदी लहान असल्याने असेल..पण मला फक्त रात्री आई लावत असलेला 'बेला के फूल' एवढा एकच कार्यक्रम आठवतो. सगळी जुनी गाणी ऐकता ऐकता..अधुन मधुन एखाद्या शब्दाचा अर्थ आईला विचारत विचारत झोपायचो. मोठे होता होता त्या गाण्यांचा अप्रतीम अर्थ,संगीत,सुंदर आवाज वगैरे समजु लागलं.
आमीन सायानी मात्र थोडाफार ऐकलाय. त्याबद्दल चिमण चाचांना आणि सर्वांनाच हवे तेवढे मोदक Happy विविधभारती बेस्ट आहे एकदम...खरंच.

आगावा आवडला लेख! मी ९० पर्यंत कधी गाण्यांचा फॅन नव्हतो. त्यामुळे कधी रॅडीओच्या वाटेला गेलो नाही. तुझा लेख वाचुन लयच काहीतरी स्पेशल मिसल असे वाटु राहीले आहे ...

माझी खात्री आहे की '....उनके बहुत सारे साथी' ही हेच म्हणत असतील >>> Happy

मस्त लेख !

विविध भारतीची लिंक दिल्याबद्दल मंदार ह्यांचे आभार.

मस्त. आठवणी जाग्या झाल्या. खरच ती गाणे हळु आवाजात लाऊन, रात्रीच्या निरव शांततेत काय मस्त अभ्यास व्हायचा. मी व भावाने तर रात्री १ वाजता घराबाहेर ओट्यावर बसुन ही गाणी ऐकत अभ्यास केलेत.
मला नेहमी सीडी लाऊन त्यातुन गाणी ऐकण्यापेक्षा अशी रेडीओवर ऐकायला अजुनही आवडतात... पुढे कोणते गाणे येणार ते माहीत नसते त्यामुळे अचानक आपल्या आवडीचे लागले की मस्त वाटते. आणि अर्थातच निवेदक छान असेल तर अजुन मजा. 'फौजी भाईयोंके लिये' वगैरे कार्यक्रम अजुन आठवते आहे.

मनचाहे गीत मधे अनेक वेळा ऐकलेली नावे म्हणजे
भाटापारा से बचकामल, मोतीलाल, जयंतीलाल पटेल, इ.
मनीमाजरासे आणखी कोणीतरी.
माझे आजोबा म्हणायचे की हे उगाचच मनाला येतील ती नावे टाकतात खोटी खोटी Lol

मस्त लेख. Happy
काही गाण्यांची इतर कुठेही न ऐकायला मिळणारी कडवी, काही गाण्यांची फारशी न ऐकलेली versions ही त्या काळी फक्त रेडियोवरच ऐकायला मिळायची. त्या काळी अशी गाणी लागली की पटापटा दिसेल त्या कागदावर, वहीत लिहिली जायची - कारण हे गाणं परत कधी ऐकायला मिळेल माहित नसायाचं. इतकं फोकस करून, लक्ष देऊन ऐकलं जायचं की तेव्हा पाठ झालेल्या गाण्याचे शब्द, त्याची माहिती विसरणच शक्य नाही.
रेडियोचा मला आवडणारा अजून एक भाग म्हणजे गाणं ऐकलं की त्याजोडीनी चित्रपट, संगीत दिग्दर्शक, गायक अनेकदा "किसपे फिल्माया गया है" ही सगळी माहिती त्यानंतर मिळायची.
हिंदी/मराठी चित्रपटगीतांचा 'असा प्रचंड ' संग्रह, त्या बरोबरच्या माहिती सकट एक दिवस आपल्याजवळही हवा - हे स्वप्न खूप लहानवयात मला विविधभारतीनं दाखवलं. मी त्या स्वप्नाचा ध्यास घेतला आणि त्या मार्गावर ब-यापैकी प्रगतीही केली आहे.
आज जगाभरातून अनेक मित्र मैत्रीणी 'हे गाणं तुझ्याजवळ आहे का?' अशी मागणी करतात आणि नुसतं गाणंच नाही तर त्या जोडीला 'माझी खास टिपण्णी (नको असली तरी.. हा हा हा !)' जेव्हा मी त्यांना पाठवते/सांगते - तेव्हा जो आनंद होतो, जे समाधान मिळतं त्याच सगळं श्रेय विविधभारतीला.

माझ्या आयुष्यात गाणं येण्यात आणि आता ती माझ्या व्यक्तीमत्त्वाचा एक अविभाज्य भाग/माझी ओळख होण्याची सुरुवात विविधभारतीपासून झाली Happy

खूप छान... अगदि मनातले लिहिलेय. प्रत्येक शब्द भिडला, भावला ­­आणि आवडला! Happy खूप सारे प्रतिसादही अगदि मनातले! Happy

सुंदर लेख! टोटल नॉस्टॅल्जिया!

"पंखा रोड से राकेश सेठी और पिंटू दीवाना" हे कायम लक्षात राहिलेले. तसेच एकदा कधीतरी ११ वाजता निवेदिकेने फक्त "मधुमालती" एवढेच सांगून सुरू केलेले "गर तुम भुला ना दोगे...", तो व्हॅक्युम ट्यूब वाला रेडिओ, स्पष्ट आवाज सगळे काल ऐकल्यासारखे लक्षात आहे.

गीतकार/संगीतकार कधी आधी सांगत तर कधी नंतर. जेव्हा काही संगीतकार्/गीतकार आवडू लागले तेव्हा त्यांची गाणी "ओळखणे" हा एक आवडता उद्योग होता.

सकाळी ८ वाजता एक दोन मराठी भक्तिगीते लागत ती विविध भारतीलाच ना? की "अ" केन्द्रावर ते लक्षात नाही. मधुमालती, दु १२ ची ती गाणी, मन चाहे गीत, अडीच वाजताचा तो कार्यक्रम, मग संध्याकाळची मराठी गाणी (अजूनही काही मराठी गाणी ऐकली की आमच्या तेव्हाच्या घराजवळचे सं ६ च्या सुमाराचे वातावरण डोळ्यासमोर येते), छायागीत, बेला के फूल सगळे आज पुन्हा आठवले या लेखामुळे. जोरदार आभार आगाउ Happy

हो फ़ारेण्डा, पुर्वी ८ वाजता दोन मराठी भक्तीगीते विविधभारतीवरच लागत. मग ८.१०
ते ८.३० भूले बिसरे गीत असत. पुर्वी ७.०५ ला रसवंती असे. आता त्याचवेळी
भूले बिसरे गीत लागतं.
संगीत सरिता ७.३० ते ७.४० असायचे. त्यात फ़िल्मी गाणे असायचे. आता ते बंदच
झाले. आता सगळेच संगीत सरिता विशेष असतात. सध्या कलापिनी, अप्रतिम
रचना ऐकवत आहेत.

विविधभारतीने दिलेले अत्यंत सुखद धक्के म्हणजे, पंढरीनाथ कोल्हापुरे (पद्मिनीचे
वडील) यांचे, संगीत सम्राट तानसेन मधले गाणे. आशाचे, भीमपलासी मधले, थेट जिवलगा
च्या चालीवर बांधलेले, ओ बावरी हे गाणे. लताचे, हिंदी किचकवध मधले, धुंद मधुमति
चे हिंदी व्हर्जन.. यापैकी फक्त पंढरीनाथांचे गाणे, यू ट्यूबवर सापडले.

आता परत तो माहौल अनुभवतोय. सकाळी साखरझोपेत ऐकलेले गाणे, दिवसभर
गुणगुणतोय..

आवडले. छान स्मृतीरंजन.
हे कार्यक्रम एवढे आवडण्यामागे निवेदकांचा मोठाच सहभाग आहे. मला तर बर्‍याच वेळा त्या निवेदकांचीच भाषा ऐकत रहावेसे वाटते. <<<< काळवेळ पाहून त्याच्या मूडप्रमाणे किंवा एखाद्या थीमप्रमाणे गाणी निवडण्य़ाचे त्यांचे कसब अद्वितिय आहे. म्हणजे ’इस रंग बदलती दुनिया में’ नंतर एकदम ’सुक्कू सुक्कू’ न ऐकवण्याचे भान या सर्वांकडे नक्कीच आहे.>>>>> एकदम!

Pages