आवडलेली वाक्ये

Submitted by जिप्सी on 23 February, 2011 - 00:49

=================================================
=================================================
कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खुप आवडुन जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही. कॉलेजात असताना कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय होती. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथसंग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत व्हायची. एकदा "वपूर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे. :-). अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण येथे शेअर करूया. जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.
=================================================
=================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जामोप्या बहुतेक आपण दोघे आक्खे तु आ तु पा इकडे लिहून काढू असे वाटू लागले आहे. Happy
या धाग्याप्रमाणे चित्रपटातील वाक्यांचा धागा का काढू नये ? की आधीच आहे अस्तित्वात ?

एक असंच वाचनात आलेलं वाक्य.....

"When u ask GOD for something....
He answers in three ways.....
1. He says "Yes" and gives you what you want........
2. He says "No" and gives you something better.........
And
3.He says "Wait" and gives you the Best!!!!!!"

जिप्सी,सुंदर धागा.आजच वाचला व लगेच जुनी वही बाहेर काढली.
वि.स.खांडेकरांच्या 'ययाति' मधल्या मला आवडलेल्या ओळी.....
मागे किर्र रान,पुढे गर्द अरण्य! असे आहे हे जीवन. अज्ञाताच्या अंधःकारात तर ते अधिकच भयाण भासते.कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. या पायवाटेवरुन होणार्‍या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो.

जिप्स्याचा हा धागा केव्हाचा शोधत होते Happy

माझ्या कलेक्शन पैकी हे एक. माझे आवडते.

"हिवाळ्यात पहाटे उठू नये. उठलेच तर निदान हे असले बिभासी ढग पाहू नयेत. ते पाहिले की माणूस ढगवेडा होतो. सबंध दिवसभर ढगांना लोंबत बसतो. ढगांच्याच लयीत त्याचे मन फिरू लागते; ढगांसारखे वेडेवाकडे आकार घेते. त्या ढगांना पुन्हा रात्रीच्या हवाली केल्याशिवाय माणसाचे पाय पृथ्वीला टेकत नाहीत. असे पिसे लागते याचे कारण सरळ आहे. पहाटेचे ढग हे खर्‍या अर्थाने ढग नसतात; ती ढगांची गर्भावस्था असते. आकारापूर्वीचे हे निराकार पाहण्याचा माणसाला काय अधिकार आहे? सृजनापूर्वीची सृष्टीची गुपिते पाहणारांना असाच शाप मिळतो. असे केले म्हणजे माणसाला त्याच दिवशी त्याचे प्रायश्चित्त घ्यावे लागते; ढगासारखे स्वतःला पिंजावे लागते; ढगामागोमाग रंगांना शरण जावे लागते. आपल्या आत्म्याचे विसर्जन करून अनामिकात शिरावे लागते. पुन्हा त्या ढगांना रात्रीच्या हवाली केल्याशिवाय माणसाचे पाय पृथ्वीला टेकत नाहीत. "
---आकाशाचा अर्थ आणि इतर लघुनिबंध
(गो.वि. करंदीकर)

मस्त मस्त धागा रे जिप्सी...

मला आवडलेली वाक्ये
व पु
१) म्हणायला मंगळसुत्र, मग त्याचे मंणी "काळे" का?
ते धवलसुत्र का नाही? जीवन बहूरंगी असतं, मृत्यूचा रंग काळा- मरणा सगळे रंग पुसून टाकतं- बालपण बहूरंगी, सासर एकरंगी आणि वार्धक्य बेरंगी हे सातत्याने तिच्या ल़क्षात रहावे, म्हणून ते मणी काळे!

२) कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं

३) माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्यामागं धाव धाव धावतो, पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हेवी ती वस्तू मिळानही तो सुखी नसतो, ह्याचं कारणा तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली प्रत्येक गोष्ट त्याला नव्याने सजेल.

४) मखमलीचा अंगरखा घातला की बघणार्‍याचे डोळे दिपतात, पण तो अंगर्खा घालणार्‍याला निव्वळ अस्तरच स्पर्श करीत असतं. तशा काही व्यथा.

५) शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, त्यातून तो बरा झाला की शिवलेली जखम तोच कौतूकानं दाखवत सुटतो

६) क्षमा मागणारा माणूस जास्त धोकादायक, क्षमा मागणं, चूक कबूल करणं हा एक बहाणा असतो. पुन्हा पहिल्याच मार्गावर जाण्याचा तो एक परवाना असतो

रणजित देसाई
जर- तर शब्दाला काहीच अर्थ नसतो, तसे असतेच तर सागवानालाही चंदनाचा गंध असता

"The bottom is all very crowded but there is always room at the top"
हे वाक्य ऐकतच मोठी झालेयं त्यामुळे हे माझ्या विशेष आवडीच. तेंव्हा राग यायचा ह्या वाक्याचा, आता पुरेपुर पटलयं. Happy

कागदाला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होतं

हे वाक्य वपुंच्या पुस्तकातही आहे का?

मी वरचे वपु वाचलेच नाही.. खालचे रणजीत देसाई तेवढेच वाचले.. त्यामुळे मला वाटले सगळी त्यांचीच वाक्ये आहेत.. Happy

मला दोन वाक्य फार आवडतात.. कुणाची आहेत माहिती नाहि.. कुठेतरी ऐकली-वाचली आहेत.

* सरलेल्या क्षणांना मुठीत घट्ट धरुन ठेवु नये मुठ उघडताच मुठीत काहिच उरत नाही.
* सगळे आरसे, सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवित नाहित.

मला भावलेले आणखी एक......
असूनही जी दिसत नाही,पण मनाला जाणवते,ती भावना.जे नजरेला दिसतं,तो व्यवहार.
--- युगंधरा---डॉ.सुमति क्षेत्रमाडे.

पुस्तके लिहावीत.प्रकाशित देखील करू नयेत.त्याची एक सुरेख परत छापावी.लेखकाला वाचण्यासाठी.

पी.जी. वुडहाऊस.

जिप्सी, छान धागा.
'निसर्गपूर्ण' पुस्तक वाचताना डॉ.सतिश पांडे यांच्या लेखातलं हे वाक्य....
'प्रत्येक क्षण बहुमोल असतो. आपले आयुष्य अशाच क्षणांचे बनले आहे. सांगता आयुष्याच्या शेवटी नसते.
प्रत्येक क्षणाचीच भरीव सांगता केली तरच आयुष्य उमजलं, मोल कळलं.'

प्रत्येक शब्दाला श्रोता असायलाच हवा का? काही शब्द रानात उमललेल्या फुलाच्या गंधासारखेही असावेत. काही भावना अशाही असाव्यात की ज्यांचा उगम केवळ स्वतःच्या हृदयातून व्हावा आणि तेथेच त्या विरून जाव्यात. हृदयाच्या गाभार्यातून निर्माण झालेली प्रत्येक इच्छा पूर्ण थोडीच होते? ती न व्हावी यातच सौंदर्य आहे. न संपणारी एक वेगळी जवळीक आहे.
- रारंग ढांग (प्रभाकर पेंढारकर)

मि नविन असल्यामुले काहि चुका होतिल तर माफ करा. मि वाचलेलि काहि वाक्ये,

" फार अगोदर कधीतरी झालेल्या घावाची जखम.... अगदी उराशी बाळगली नसते पण.... कीती बरी झालीये हेच बघीतलेल नसत वळुन, actually ती बरी होण्यासाटी काहीच प्रयत्न केलेले नसतात...... एक दुर्लश करण्याशिवाय. काळ सगळ्या जखमा बर्‍या करतो हे तितकेसे खरे नाही. नुसती वरवर खपली धरलेली दिसते, आत आत जखम ओलीच असते. आपल्याच मनाला माहीत असते की बाबा जखम आहे, अजुन ओली आहे, तेव्हा जरा जपुन... मग साधा धक्का ही टाळतो आपण........"

" दारिद्र्याने वेढुन टाकलेल्या कुपी मातेच्या पोटी जन्माला आल्यावर जे बाळ अश्वासारख खिकाळल त्या खिकाळ्ण्याने सारी भुमी कन्पित झाली म्हणुन द्रोणाचार्यानी आपल्या पुत्राचे नाव 'अश्वथामा' ठेवले".

"चिऊताई, चिऊताई, दार उघड", असं विनवणार्‍या काऊला चिऊताईनं "थांब माझ्या बाळाला...." असं बजावत तिष्ठत उभं ठेवलं होतं. या चिमण्या बाळांच्या गोष्टीमध्ये "खूप मोठा पाऊस" आला होता. काऊचं उघड्यावरचं शेणाचं घर पावसात विरघळून गेलं. चिऊच वळचणीतलं मेणाचं घर मात्र सुखरूप राहिलं. पण नंतर काय झालं माहीत आहे? खूप मोठ्ठा पूर आला, "माणसांचा"! त्या पुरात वाडे, अंगण, पडव्या, ओसर्‍या, बखळी, परस, सगळं काही वाहून गेलं. शेवगे, चाफे, जाईजुई, पारिजातक, सिताफळी, आवळे, सगळे गेले. चिऊचं घर मेणाचं असूनही माणसांच्या महापुरात वाहून गेलं.
गावाताल्या चौका-चौकात लावलेली प्रदूषण मोजणारी घड्याळं इथल्या माणसांना वाचता येत नाहीत, पण चिमण्या-कावळ्यांना ती नीट वाचता येतात आणि समजतात. म्हणून इथले चिमण्या केव्हाच गावाबाहेर गेलेत, शुद्ध मोकळ्या वातावरणामध्ये!!!
"या चिमण्यांनो, परत फिरा रे घराकडे अपुल्या" असं म्हणायची तिन्हीसांज केंव्हाच सरली आहे.
— श्रीकांत इंगळहळीकर (आसमंत)

Pages