ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 24 September, 2010 - 03:00

कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि रूम नंबर २१४ मधील चारही मने एकमेकांमधे मिसळून एक पाचवाच रंग तयार होऊ लागला. रोज निदान अर्धी बाटली तरी संपायला लागली. आता आत्मानंदच्या कानावर ओल्ड मंक, नंबर वन व्हिस्की, ओ.सी., ब्ल्यु रिबॅन्ड वगैरे नावे पडू लागली. तो अजूनही लांब बसून सर्वांकडे टक लावून बघत बसायचा आणि मनातल्या मनात जप करायचा. सगळ्यांचे पिणे झाले की हातातल्या भांड्यातील पाणी सगळ्या खोलीत शिंपडायचा अन मगच झोपायचा. कित्येकदा त्याची थट्टा करण्यासाठी मग वनदास पुन्हा त्याने शिंपडलेल्या पाण्यावरून बाटलीतले काही थेंब शिंपडायचा. दारू अशी शिंपडल्यामुळे मग दिल्या वनदासला एक फटका लावायचा. मग तिघेही हसत हसत झोपायचे.

आत्मानंद प्रत्येक लेक्चरला मात्र बसायचा. अगदी सिन्सियरली बसायचा. त्याच्या वह्या भरू लागल्या होत्या. अक्षर मोत्याच्या दाण्यांसारखे होते. स्पेलिंग मिसटेक नाही, खाडाखोड नाही. प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर गणेशाची व स्वामी समर्थांची प्रार्थनेची एक एक ओळ! सुबक प्रकरण होते सगळे! त्याला खोलीचा एक कोपरा मिळाला होता. त्या कोपर्‍यात त्याच्या दोन बॅगा आणि सर्व किरकोळ सामान, कपडे वगैरे असायचे. अभ्यास नसेल तेव्हा तो नामस्मरण करत बसायचा. पण लक्ष सगळं या तिघांकडे ठेवायचा. लक्ष ठेवण्याची तीन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे दिल्या कधीही कुणालाही फटका लावायचा. तो आपल्याला बसू नये असे आत्मानंदला प्रामाणिकपणे वाटायचे. दुसरे म्हणजे स्त्री या विषयावर काही अद्भुत चर्चा व्हायची अन त्यातून मन सुखवायचे. आणि तिसरे म्हणजे पिऊन ते तिघे गोंधळ घालायला सुरुवात करायचे. या गोंधळात काहीही व्हायचे. आपली कोणतीही वस्तू त्यात नष्ट होऊ नये अशी इच्छेने आत्मानंद सगळे झोपेपर्यंत जागाच राहायचा.

आत्मानंद ठोंबरे! आजवर अत्यंत सुरक्षित वातावरणात व धार्मिक संस्कारात वाढलेल्या या मुलावर त्याच्या आजी आजोबांच्या जुन्या वळणाचा फार प्रभाव होता. त्यामुळे आपले बोलणे चालणे हे इतर समवयीन मुलांसारखे नाही आहे हे त्याच्या लक्षातच यायचे नाही. तो प्रॉपर चतुर्थी वगैरे करायचा. मंगळवार करायचा. आणि हे तिघे त्याची थट्टा करत करत त्याच्यासमोर अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करायचे. पण अंगात दम नसल्यामुळे तो बिचारा सहन करायचा ते! पण त्याच्या आता लक्षात यायला लागले होते. तिघे जरी व्यसनी असले तरीही तिघांचेही आत्मानंदवर खूप प्रेम बसलेले होते. आणि त्यामुळे आता त्याचेही त्या तिघांवर प्रेम बसलेले होते.

आजही तिघांना रात्री साडे आठलाच पूर्ण चढलेली होती आणि आत्मानंद त्याच्या पलंगावर बसून रोखून प्रत्येकाकडे पाहात होता. आत्मानंदच्या मसाजमुळे दिल्या आठ दिवसांपुर्वीच टुणटुणीत झाल्यामुळे आता शिर्के वचकून होता. पण दिल्या भाकड नव्हता. कुठेतरी बेसावध असताना शिर्केला तुडवायचा ही अशोकची कल्पना त्याने साफ फेटाळून लावलेली होती. त्याच्या मते समोरासमोर आव्हान देऊन सर्वांसमक्ष तो शिर्केला धडा शिकवणार होता. पण तो विषय आता चर्चेत फारसा येत नव्हता. कारण दिल्याने सांगून टाकले होते की शिर्केचे जे करायचे ते तो एकटाच करणार आहे. त्या गोष्टीचा बाकीच्यांशी संबंध नाही.

आजच्या चर्चेचा... खरे तर आज'ही' पिण्याचे कारण ठरणारा विषय फार वेगळा होता.

दीपा बोरगे नावाची वर्गातील एक गोरी पान मुलगी वनदासला फारच आवडलेली होती व ती त्याच्याकडे पाहाते हे त्याचे आज ठाम मत झाले होते. आणि त्यावरूनच गदारोळ चाललेला होता.

अशोक - तिने नेमकं कसं पाहिलं तुझ्याकडे??

वनदास - म्हणजे ... काय झालं ते मी सांगतो...मी चाललो होतो ना क्लासमधून बाहेर.. तेव्हा ती आत येत होती... ती अन ती उर्मिला.. दोघीही... एकदम समोरासमोर आल्यावर मी तरी काय करणार रे?? मी एकदम बघायलाच लागलो तिच्याकडे...

दिल्या - हेच... अश्क्या मी हेच तुला म्हणतोय मगाचपासून...

अशोक - थांब ना... हां ... बोल रे..

वनदास - तर तिने जायचं की नाही निघून पुढे??

अशोक - सरळ आहे...

वनदास - तर ती उर्मिला गेली पुढे.....

अशोक - अन ही??

वनदास - अरे तिथेच... असे... हे बघ हे असे डोळे मिसळून पाहात राहिली...

दिल्या - फेकतंय सालं...

अशोक - किती वेळ...

वनदास - आता किती वेळ... असेल दोन अडीच सेकंद... मी काय मोजणार आहे का??

अशोक - नाही पण दोन अडीच सेकंद ट्रॅफिक जॅम म्हणजे फार झालं वन्या...

दिल्या - अरे कसलं ट्रॅफीक जॅम? हा फेकतोय अन तू ऐकतोयस...

अशोक - तिने काय घातलंवतं??

दिल्या - त्याचा काय संबंधय??

वनदास - ड्रेसरे.. चक्क ड्रेस घालून बघत होती माझ्याकडे...

दिल्या - म्हणजे काय? तू दिसल्यावर काय कपडे बदलून येऊन बघायचं का तुझ्याकडे...

वनदास - अश्क्या... हा नाही त्या गोष्टीत अश्लील बोलतो हां... आधीच सांगतोय..

अशोक - ए दिल्या.. तू गप पी ना... इथे गंभीर बोलणी चाललीयत अन तुझं काय हे मधेमधे..??

दिल्या - अरे हा वाटेत उभा होता.. सरकत नव्हता म्हणून ती पाहात होती...

वनदास - हे बघा.. हे बघा... च्यायला एखाद्याचं चांगलं होतंय ते बघवत नाही यांना...

अशोक - घाल रे यात एक लार्ज....

वनदास - तर तुला सांगतो...काय लेका तिचे डोळे आहेत...

अशोक - नेमके कसे आहेत...??

वनदास - म्हणजे असं एखादं खोल तळं असतं ना??

अशोक - तळं??

वनदास - हां.. म्हणजे असं... असं एकदम खोल खोलच गेल्यासारखं वाटतं तिच्या डोळ्यात पाहिलं की

अशोक - किती ??

वनदास - खूपच रे... तसं मांडता नाही येणार शब्दात....

अशोक - पण... म्हणजे ... भावना काय होत्या डोळ्यातल्या??

दिल्या - हा कोण छपरी आला मधेच समोर...

वनदास - अश्क्या हा नाठ लावणारे माझ्या निष्पाप प्रेमाला....

दिल्याने 'निष्पाप' हा शब्द ऐकून भिंतीवर एक मुष्टीप्रहार केला व हासला.

अशोक - तू मला सांग रे... हां... भावना काय होत्या डोळ्यांत..??

वनदास - जणू काही याच नजरानजरीच्या खेळाची मी कित्ती कित्ती जन्म वाट पाहात होते...

अशोक - वन्या... मला चढते हे ठीक आहे... पण एवढी नाय चढत...

वनदास - विश्वास नाही ना?? तुझाही विश्वास नाही ना??

अशोक - लेका पहिल्या नजरेत तुला एवढं कळलं होय??

वनदास - अरे... मी कविता केलीय कविता तिच्यावर....

'कविता' हा शब्द ऐकल्यावर मात्र दिल्याने एक सण्णकन वाजवली वन्याच्या पाठीत...

दिल्या - असले फालतू प्रकार मला या रूमवर चालायचे नाहीत... कविता बिविता...

वनदास - दिल्या.. तुला प्रेमातल्या भावना नाही कळणार... अरे कविता स्फुरते अशी...

'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले.

अशोक - ऐकव..

वनदास - खरंच..??

अशोकने फर्माईश करणे व वन्याने खिशातून कागद काढणे या अपराधांसाठी दोघांनाही दिल्याकडून एक एक अस्सल शिवी भेट मिळाली.

आत्मानंद - यांना कविता पठण करूदेत... मनुष्याचे सर्वात सुंदर व्यक्तीकरण म्हणजे कविता...

आता मगाचपेक्षा जहरी शिवी आत्मानंदला मिळाली. दिल्याला घाबरून वन्या कविता बाहेर काढत नव्हता खिशातून!

अशोक - तू वाच रे कविता...

वनदास - अरे हे मारतं ना पण??

अशोक - ए दिल्या... च्यायला दादागिरी करू नको हां...

आता दिल्यालाही उत्सुकता वाटू लागली होती की आपल्या रूममधे चक्क एकाने कविता केली?? कशी आहे ती कविता??

दिल्या - मला जर आवडली नाही ना? तीन दिवस दारूला स्पर्श करू देणार नाय तुला..

वनदास - आवडेल आवडेल...

अशोक - अरे वाच ना...

वनदास - हां! ऐका...

दीपा माझी राणी...
.... आज तुला पाहिलं वर्गाच्या दारात... आणि....
मी... मलाच हरवून बसलो बघ... ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...

दिल्या - चक्षू म्हणजे काय??

अशोक - डोळे डोळे...

दिल्या - च्यायला डोळे गुलाबी असतात का??

वनदास - अरे प्रेमात पडलेल्या युवतींचे डोळे गुलाबी दिसतात... ऐकवू का पुढचं??

अशोक - बिनधास्त!

वनदास - दीपा माझी राणी.... आज तुला....

दिल्या - अबे पुढे चल ना?? तिथेच अडकतंय ग्रामोफोन सारखं..

वनदास - ऐका...

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....

हे ऐकून दिल्याने लाथ घातली वनदासला..!

वनदास - क... आता काय झालं??

दिल्या - टिळक कुठे आले इथे??

अशोक - दिल्या तू मारतोस फार हां पण याला...

दिल्या - आधी मला सांग तिच्या डोळ्यांवर कविता केली त्यात टिळकांचा संबंध काय??

वनदास - दिल्या... ही आपल्या समाजाची दारूण शोकांतिका आहे....

दिल्या - कसली??

वनदास - साहित्यात जोवर थोरांचे उल्लेख होत नाहीत तोवर त्या साहित्याची नोंद घेतली जात नाही...

दिल्या - म्हणून टिळक??

वनदास - टिळकांचा उल्लेख रिप्लेसेबल आहे..

दिल्या - म्हणजे काय??

वनदास - टिळकांऐवजी कोणतेही थोर नाव चालेल..

दिल्या - लय ब्येक्कार मार खाणारेस तू....

अशोक - ए ऐकव रे...

वनदास - ऐका...

तू जागी होताच.... पहाट सुगंधी होते... कोकिळा मधूर कूजन करतात...
... मला तर वाटतं... तू सारखी जागीच होत राहावंस...
ती तुझी अंगडाई... दवाला ज्यापासून नशा मिळते...
ते तुझे ओठ... ज्यांच्यापासून मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्की कैफ चोरते...
ते तुझे कोमल हात... जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ... आ SSSSSSSSSSS

ए... आपण नाय वाचणार... च्यायला.. कविता करायची अन मार खायचा होय???

दिल्या - अश्क्या... तूच सांग... टिळक, कोकिळा, व्हिस्की अन स्वातंत्र्य यांचा काही संबंधय का??

आता अशोक गदगदून हसू लागला. वनदासला राग आलेला होताच.

वनदास - एक मारतं, एक तिथे शिवायचं नसल्यागत लांब बसतं अन एक कविता ऐकून हसतं...तिच्यायला होस्टेल आहे का इस्पीतळ??

अशोक - वन्या... तू काही म्हण लेका... पण.. टिळक कोकिळा व्हिस्की अन स्वातंत्र्यलढा हे काय एकत्र बसत नाय राव...

वनदास - मला वाटलंच होतं.. खेचतायत माझी... भर.. लार्ज भर...

दिल्या - हात लावायचा नाय दारूला आता तीन दिवस....

वनदास - हा घोर अन्याय आहे...

दिल्या - हाच न्याय आहे.. कविता ऐकवतो काय???

दिल्याने कवितेचा कागद हातात घेऊन त्याचा बोळा करून फेकला. आत्मानंदने तो घाईघाईत उचलला अन नीट सरळ करून घडी घालून खिशात ठेवला. तिकडे कुणाचे लक्षच नव्हते.

पण उदार मनाने वन्याला दारू प्यायची परवानगी मात्र दिली दिल्याने!

आत्मानंद - तुमच्या वाचास्वातंत्र्यावर गदा आली असे वाटत नाही का तुम्हाला??

वनदास - आली ना राव... गदाच काय.. भाले आले.. तोफा आल्या..

अशोक अजून हसतच होता.

दिल्या - पुन्हा या रूममधे कवितेतला 'क' काढायचा नाय..

आत्मानंद - त्यांचं पुढे काय झालं??

वनदास - कुणाचं?

आत्मानंद - दीपाताईंचं???

दीपाला 'ताई' लावलेलं पाहून आता दिल्याही हसायला लागला. भिंतीवर दोन बुक्या बसल्या. एवढंच काय वनदासही हासला!

अशोक - वहिनी म्हण लेका वहिनी...

आत्मानंद - छे छे! विवाहापुर्वी असे संबोधन एखाद्या युवतीच्या नाहक बेअब्रूस कारणीभूत ठरेल..

अशोक - ह्याचं बोलणं एकदा टेप करून ठेवायचंय राव मला...

आत्मानंद - मी स्वतःच करून देईन... टेप रेकॉर्डर आणू परवडेल तेव्हा..

अशोक - वन्या.. पण खरंच... पुढे काय झालं रे?

वनदास - अरे ती बेंचवर बसल्यावर मी दाराबाहेर दोन मिनीटे थांबलो ना?? त्या दोन मिनिटांमधेही आमची तीन वेळा नजरानजर झाली...

अशोक - दिल्या.. हे गंभीर आहे हां??

वनदास - तुला सांगतो... इतकी मधाळ बघते रे...

अशोक - लेका उद्या यावर बसलं पाहिजे...

आत्मानंद - मग आज कशावर बसला आहात??

अशोक - तुम्ही मधे अडथळे आणू नका...

वनदास - मला तर काही सुचतच नाय राव... काय करू रे आता दिल्या? पुढची स्टेप काय??

दिल्या - मार खाणे...

वनदास - याला विचारण्यात काय अर्थच नाय...

अशोक - मला वाटतं तू बोल एकदा तिच्याशी...

वनदास - काय बोलू??

अशोक - मन मोकळं कर ना??

वनदास - एवढं सोपंय होय??

अशोक - त्यात काय? सांगायचं.. बरेच दिवस आपण एकमेकांकडे पाहतो आहोत... आज मला वाटले की आपल्याशी बोलावे.. खूप इच्छा आहे मनात बोलण्याची...

वनदास - दार वाजतंय... ए आत्म्या... दार उघड की????

रात्रीचे साडे दहा वाजलेले होते. आत्मानंदने दार उघडले. बाहेर शिपाई होता.

"आत्मानंद ठोंबरे???"

आत्मानंद - मीच....

शिपाई - फोन आहे...

आत्म्याला आलेला फोन हा त्या रूममधील या वर्षीचा पहिला फोन होता. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पाच मिनिटांनी आत्मानंद रूममधे आला... शांत होता...

अशोक - काय हो?? काही विशेष...

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..."

गुलमोहर: 

मुन्नाभाई असो, तरूण तुर्क असो, की आणखी कोणती कादंबरी, सिनेमा, कथा किंवा लेखक. हे सारे तुमच्या लिखाणाची नैसर्गिक स्फुर्ती असू शकत नाहीत का? शेवटी कुणीही लिहितो ते अनुभूती-अनुभवांतूनच ना? वाचलेले-जगलेले-अनुभवलेले लेखनात उमटले तर ते स्वाभाविक नाही का? त्यामुळे असे कुणी म्हटले, तर त्यात वाईट किंवा चुकीचे काय? म्हणून असे कुणी म्हटल्यावर 'दिलगीर आहे' अशी प्रतिक्रिया भलतीच बिनबुडाची वाटते. अर्थात कुणाला तशी वाटते म्हणून तुम्ही देऊ नये/द्यावी असे मुळीच नाही. पण त्या बुडावर तुमच्या मता-प्रतिक्रियांचे इमले उभे राहिले तर ते हास्यास्पद होते. लेखकाच्या 'अ‍ॅटिट्युड' बद्दल प्रश्न उपस्थित झाले की मग आपोआप त्याच्या लिखाणाबद्दल पण होणारच. त्यात लिखाणाकडे आणि लेखकाकडे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघावे, असाही एक मतप्रवाह आहे. पण तसे न होणे सगळ्या ठिकाणी तुम्ही टाळू शकत नाही. विशेषतः एकदा तुम्ही तुमचे लिखाण सार्वजनिक केल्यावर.

तर अशा प्रतिक्रिया आल्यावर त्यावर 'दिलगीर आहे' अशी प्रतिक्रिया देणे याला 'पुचाटपणा' असा पटकन सुचलेला शब्द असावा. त्याचा सरळ सरळ अर्थ तुम्ही 'लेखक पुचाट आहे' असे म्हणायचे आहे- असा घेतला. मग त्यावर प्रतिआक्रमण करून "एक वाक्य अधिक लिहायला हरकत नव्हती की 'बेफिकिर ओरिजिनल लिहीत असतील असेही वाटतेच' वगैरे!"; आणि शिवाय ते गणपत पाटलाचे अत्यंत अस्थानी वाटणारे उदाहरण. यावर कळस म्हणून तुमचा अ‍ॅटिट्युड नको तितका स्पष्ट करणारा तो लाथ मारण्याचा शेर. हे सारे खरेच हास्यास्पद आहे.

वाचक-लेखक संबंधाची जबाबदारी टण्या घेतल्यासारखे दाखवतो आहे- हे आणखी एक. टण्याची पोस्ट इतकी सेल्फ एक्स्प्लेनेटरी आहे, की त्यावर असे म्हणणे हे खरेच दुर्दैवी. हा 'जॉनर' वेगळा आहे, आणि तो त्याला आवडला नाही. पण इतरांना तो आवडू शकतो- असे तो स्पष्ट म्हणाला. त्यावरच्या काही प्रतिक्रियांवरून वेगळे वळण लागू नये यासाठीची ती पोस्ट होती- इतका हा साधा हिशेब. पण कोणत्या का संदर्भाने होईना विरोधी बोलणे आवडत नाही का, चालत नाही का- असा संशय यायला पुरेसा. विरोधी प्रतिक्रिया आवडत नाही, हेही एकवेळ ठीक. पण प्रतिक्रिया देताना लोक 'अमुक' किंवा 'तमुक' का लिहित नाही, असे विचारणे किंवा अपेक्षा व्यक्त करणे- हा अतिबाळबोध प्रकार वाटतो.

--
जाता जाता तुमच्या कादंबर्‍यांबद्दल- तुमची पहिली कादंबरी मी संपूर्ण वाचली होती. आणि बरी पण वाटली होती. तिथे अजूनही प्रतिसाद असेल. पण नंतर सतत दिसणारी भडक पात्रे आणि प्रसंग; कथा चालू असताना निवेदक मध्येच येऊन स्वतःबद्दल भाष्य करणे (ताजे उदाहरण- बाय द वे! मुलींच्या देहबोलीतील सुक्ष्म हालचालींचा अर्थ सहज सांगू शकण्याचे कसब मी आत्मसात केलेले आहे हे एक अवांतर मधेच! (मुलींच्या म्हणजे त्यात स्त्री ही आलीच! ) हे, आणि त्यानंतरचे काही परिच्छेद. यावर, इतक्या सार्‍या प्रतिक्रियांत कुणीच कसे काही बोलले नाही- याचे नवल वाटते आहे. असो. हे माझे वाटणे अर्थात्च माझाचजवळ); माझ्या वाचनापेक्षाही जास्त असलेला तुमच्या लिहिण्याचा अफाट वेग; संवादांची खटकणारी शैली; अनेक ठिकाणी येणारी बाळबोध वर्णने आणि प्रसंग टाळता येणार नाहीत का- असे प्रश्न पडणे.. इत्यादी अनेक कारणांमुळे त्या अजिबात आवडल्या नाहीत. आता 'कादंबरी' हा साहित्यप्रकार मुळातच आवडत असल्याने, आणि हेही थोडेफार आवडते का, किंवा चांगले काही सापडते का- असे वाटून मी मधून मधून वाचतो- हे ओघाने आले. पण वाचूनही मी कशी, कोणती, आणि कुठच्या भाषेत प्रतिक्रिया द्यावी, किंवा मुळातच न द्यावी- हा माझाच अधिकार असल्याचेही ओघाने येतेच. अर्थात त्यातुनही माझा 'अ‍ॅटिट्युड' (तुमच्या लेखना-प्रतिक्रियांतून तुमचा दिसतो तसाच अगदी) लोकांना दिसेल, जगजाहीर होईल- हे देखील ओघाने आलेच.

तुम्ही जे लिहिताय ते काय क्लासिक आहे होय की गाजवलं तर कोसला होईल आणि दाबलं तर सात सक्कं त्रेचाळीस. >> Lol ते साहित्य सहवासच्या फ्लॅटचंही भारी!

टण्या मी पोस्ट लिहायला घेतली, तेव्हा तुझी पोस्ट नव्हती. तुझ्या पोस्टमधून आणखी काही मुद्दे समोर आले. बाकी त्या संवादलिखाणाच्या पद्धतीबद्दल आणि पात्रांच्या वागण्यातल्या विरोधाभासाबद्दल- अगदी अगदी.

बेफिकीर, या पोस्टींचा विरोधी सूर पाहून (कमीत कमी 'अ‍ॅपरंटली' तरी तसा दिसतोय सार्‍यांना. Proud ) फॅनक्लबातले इतर लोक शिव्या घालणार हे नक्की. पण त्यातला एखादा तरी 'अरे हो, खरंच की! या दृष्टीने तर कधी विचारच केला नव्हता या कादंबर्‍यांचा' असं म्हणला तरी पुष्कळ आहे. प्रत्येकाचा 'जॉनर' वेगळा, प्रत्येक लिखाणाचा 'पोत' वेगळा, शैली वेगळी- या त्रिकालाबाधित गोष्टी तर आहेतच. पण तुम्हीच सांगा- असा 'वेगळा' विचार एखाद्याने करून बघणे- हे तुमच्या आणि तुमच्या लिखाणाच्या दृष्टीने चांगले आहे की वाईट? Happy

टण्या, साजिरा -

दीर्घ व आवर्जुन दिलेल्या प्रतिसादांबद्दल मनापासून आभार!

१. विरोधी सूर असलेल्या किंवा नकारात्मक प्रतिसादांनी मला कधीही वाईट वाटत नाही. हे खरे सांगत आहे. मला वाईट वाटते म्हणण्यापेक्षाही हसू येते ते ' हा काय पुचाटपणा' वगैरे व्यक्तीगत रोख असलेल्या प्रतिसादांनी! वैद्यबुवांना मी दिलगीर असण्यात काय प्रॉब्लेम होता? (अर्थात, संकेतस्थळावर कुणीही काहीही लिहू शकते हे माहीतही आहे व अर्थातच मान्यही आहे.) सिंडरेला यांच्या प्रतिसादावर मी दिलगीर असल्याचा प्रतिसाद देण्यात वैद्यबुवांनी फार तर असे म्हणायला हवे होते (आता पुन्हा असे म्हणाल की मी लोकांकडून अपेक्षा करतो) की यात दिलगीर असण्याचे कारण नाही. त्यात पुचाटपणा हा शब्द कसा काय आला? तो काय साहित्याची समीक्षा करणारा होता? लेखन (म्हणजे कलाकृती) व त्याचे वाचकांशी (म्हणजे व्यक्तींशी नव्हे) असलेले संदर्भ पुढे नेणारा / सांभाळणारा होता? मग जे प्रत्यक्ष लाथ मारत आहेत त्यांच्यापेक्षा मी माझ्या शेरात लाथ मारलेली बरी म्हणायची!

२. टण्या - मला आपल्या प्रतिसादाचे भयंकर हसू येत आहे. आपण जे काय काय लिहीले आहेत ते बेसिकली सामान्य आहे. तरीही चर्चा करू!

उदाहरणार्थ, मी ह्या प्रकारच्या कादंबर्‍या वाचणार नाही कारण तो माझा पिंड नाही. >>>

पण प्रतिसाद देत बसायला आणि दीर्घ प्रतिसाद देत बसायला तुम्हाला या कादंबर्‍यांची जरूर भासली. तेही तुम्हाला उद्देशून कुणिच काही लिहीलेले नसताना! 'टण्या' या माणसाचा जळफळाट होत आहे असे वाक्यच कुणी लिहीलेले नाही. फारच उदात्त हेतू आहे लेखक वाचक संबंधांना काही मारक बिरक होतंय का मायबोलीवर हे बघण्याचा!

एखाद्याने इथे येउन हे लिखाण वाचून त्यावर जर त्याला/तिला वाटलेली भावना/प्रतिक्रिया दिली व ती प्रतिकूल असेल तर लगेच 'तुमच्यावर लोकं जळतात', केवळ हांजी/वावा/बहोत खूब प्रकारच्या प्रतिक्रिया अपेक्षित असणे (लेखक तसेच इतर वाचकवर्गाला) असे म्हणणे मूर्खपणाचे आहे.>>>>>

हे सांगायला तुमची काय जरूर? हे कुणालाही माहीत असते. आता काहीतरी नवीन बोला राव!

ह्यातला क्र १ चा विचार आपण केल्याचे अजूनही जाणवत नाही.>>>>

तुमच्या सूचनांचा वगैरे विचार करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये अशी प्रार्थना! हा हा हा हा!

संपूर्ण गझल म्हणुन त्या मला अतिसामान्य वाटल्या.>>>>>

आदर आहे. आपल्याला गझलेला विशेषण देता आले ही समाधानाची बाब मानतो मी!

इथे मला लेखक व वाचक ह्यांचे व्यक्ति म्हणुन परस्परसंबंध अपेक्षित नसून लेखकाची कलाकृती व तिचा असलेला वाचकाशी संदर्भ असे अपेक्षित होते>>>>

अरे बापरे! हे असलं मी काही विचारात घेत नाही. आपलं लेखन प्रसिद्ध करायचं अन पुढचं लिहायला घ्यायचं! एवढंच माहिती!

मी इथे पहिला प्रतिसाद दिला तो माझी ओल्ड मंक ह्या ब्रँडबरोबर असलेला अनेक घटना/आठवणींचा समुच्चय खूप मोठा असल्याने 'ओल्ड मंक..' हे शीर्षक बघून माझी उत्सुकता चाळवली गेली म्हणुन>>>>

बर मग? मी कुठे काय म्हणालो? द्या किंवा नका देऊ?

तुम्हाला इथली लोकं काय लघुनियतकालिके चालवणार्‍या चळवलीतली पुस्तके उचलून धरणारी वा पाडणारी तरुण पोरं/पोरी वाटले का? की अमूक एकाची तळी उचलल्याने व दाबल्याने साहित्य सहवासमध्ये फ्लॅट मिळणार आहेत? मला वा इतर कुणाला तुम्ही लिहिलेल्या कादंबर्‍यातली एकही कादंबरी न आवडण्यामागे कसली डोंबलाची शंका येतेय तुम्हाला. तुम्ही जे लिहिताय ते काय क्लासिक आहे होय की गाजवलं तर कोसला होईल आणि दाबलं तर सात सक्कं त्रेचाळीस. कायच्चा काय काहितरी>>>>>

हे काय समजलेच नाही राव! कसला फ्लॅट? 'कोसला' आणि 'सात सक्कं त्रेचाळीस' हेही माहीत नाही. तुमचा त्रागा त्रागा का झालाय तेही माहीत नाही. तुमचा जर मुळात तो पिंडच नाही तर निबंध कशाला लिहिता आहात तेही माहीत नाही. असो!

साजिरा - अतिबाळबोध प्रकार असे आपण म्हणालात! जेव्हा मी 'हे मुन्नाभाईसारखे आहे' या मूळ प्रतिसादावर फक्त दिलगीरी प्रदर्शित केली तेव्हा मी पुचाट ठरलो. हा हा! अपेक्षा केली तर बाळबोध, नाही केली तर पुचाट! काही लिहीले की लगेच अ‍ॅटिट्यूड! नाही लिहीले तर 'कसा याला दाबला मी'! हा हा हा हा!

साजिरा, हे वाचकवर्ग, फॅनक्लब वगैरे शब्द मला अ‍ॅटॅच का होत आहेत काही समजत नाही. मी एकाला सांगीतले नाही की 'बघा माझं लेखन आवडतंय का आणि बरं वाटलं तर प्रतिसाद द्या'! तुमचं मत / मते वाचून एखाद्याला तशी उपरती झाली तर माझं काय बिघडणार आहे? सगळ्यांनी प्रतिसाद बंद केले तर मला असं वाटेल की हे कुणाला आवडतच नाहीये मग आपण कशाला लिहायचं? मग मी लेखन बंद करीन! लोकांची अभिरुची वाढवण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत ते बरे झाले म्हणा!

खरंच कंटाळा आला!

मी आता पुढचा भाग लिहायला घेतो अशी धमकी देत आहे. हा हा हा हा!

गाठायचे असते स्वतःला गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर थांबले की जाहले

-'बेफिकीर'!

बेफिकीर, या पोस्टींचा विरोधी सूर पाहून (कमीत कमी 'अ‍ॅपरंटली' तरी तसा दिसतोय सार्‍यांना. Proud ) फॅनक्लबातले इतर लोक शिव्या घालणार हे नक्की. पण त्यातला एखादा तरी 'अरे हो, खरंच की! या दृष्टीने तर कधी विचारच केला नव्हता या कादंबर्‍यांचा' असं म्हणला तरी पुष्कळ आहे. >>>>
साजिरा, तुमचे मुद्दे अतिशय आवडले...टण्या यांचे सुद्धा! मी माझ्या आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे अशी साधक-बाधक चर्चा घडलीच पाहिजे, त्यातूनच कुठल्याही कलाकृतीला पूर्णत्व लाभते. त्यामुळे शिव्या घालणार्‍या फॅन्सपैकी मी तरी नाहीये, हे नक्की Happy

प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ज्याच्या त्याच्या अनुभवावर, विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रतिसादकाच्या मताचा आपण आदर करावा, या मताची मी आहे. बेफिकीरसुद्धा तो करतात असे माझे आत्तापर्यंतचे निरिक्षण आहे. (निदान त्यांच्या कादंबर्‍यांच्या बाफवर तरी...) दिलगिरी व्यक्त करण्यातपण त्यांचा तोच हेतू असावा...पण त्याला पुचाटपणा असे नाव देण्यात आले. (मला पुचाटपणा या शब्दाचा नेमका अर्थ माहिती नाही...पण काहीतरी रोखठोकपणाचा आभाव असा अर्थ असावा, कृपया सांगावा.) म्हणून बेफिकीर जरा अपसेट झाल्याचे जाणवते...आणि तेच त्यांच्या नंतरच्या पोस्टस मधून रिफ्लेक्ट झाले. म्हणजे नम्रतेने वागले की पुचाटपणा आणि 'लाथ' मारण्याच्या शेर मधून अ‍ॅटिट्युड...म्हणजे नेमके कसे वागावे बरे Uhoh असे त्यांचे कन्फ्युजन होत असावे... Happy

असो, माझे बेफिकीरजींना हेच सांगणे आहे, की प्रतिक्रिया फार पर्सनली घेऊ नका... तुम्ही आमच्या दृष्टीने परफेक्ट लिहिताच. तुमच्या लिखाणात काही लोकांना जाणवलेला बालिशपणा त्यांच्या साहित्यक्षेत्रातील ज्ञानानुसार योग्य असावा. Happy

माझी तुम्हाला एक विनंती... चांगल्या सल्ल्यांचा, तुम्हाला पटलेल्या गोष्टींचा जरुर विचार करा. न पटलेले सोडून द्या, त्याकडे दुर्लक्ष करा. मागे कोणीतरी लिहिल्याप्रमाणे कोणी 'जळत' असेल, तर तेही तुम्ही आपले यशच समजा! कारण आपल्याकडे काहीतरी जास्त असल्याशिवाय कोणीही जळत नाही. (अर्थात मी मागे लिहिल्याप्रमाणे मला तरी कुठे जळण्याचा वास येत नाहीये...काही लोकांचा हेतू आहे ते निरोगी वातावरणही कलुषित करणे हा असतो.)

शिवाय तुमचे कुणी मानसिक खच्चीकरण करत आहे, असे वाटत असेल, तर त्याच वेळेस तुमच्या कादंबरीची रोज उत्सुकतेने वाट पाहणारे आणि त्यावर भरभरुन प्रतिसाद देणारे फॅन्स आठवा... Happy

बेफिकीर, पुढच्या भागाची वाट पाहतेय...कधी लिहिणार आहात? पु.ले.शु. Happy

'आपल्याला आवडले म्हणून ते दुसर्‍याला हि आवडलेच पाहिजे' हे साफ चुक.

एक कोरा कागद आहे, सफेद, सच्छ, आणि त्यावर छोटासा टिपका(टिपका का तर काहि प्रतिसाद म्हणून) कोणि म्हणेण कागद सच्छ आहे(थोडा चलता हे, हा अ‍ॅटिटूड), कोणि म्हणेण कागदावर डाग आहे(कावळ्याचि नजर(कावळा बरका, 'घार' नव्हे)), आणि कोणि जे आहे त्यातून चांगल काय, हे शोधणारि माणस.

ह्याला हे वाट्ल पाहिजे, त्याला ते वाटल पाहिजे, अरे काय पॉईट आहे काय? ज्याला त्याला ज्याच त्याच ठरऊद्या ना.

बेकिफिर, तुम्हि लिहित रहा, हे अस चालायचच. Happy

साजिरा - अतिबाळबोध प्रकार असे आपण म्हणालात! जेव्हा मी 'हे मुन्नाभाईसारखे आहे' या मूळ प्रतिसादावर फक्त दिलगीरी प्रदर्शित केली तेव्हा मी पुचाट ठरलो. हा हा! अपेक्षा केली तर बाळबोध, नाही केली तर पुचाट! काही लिहीले की लगेच अ‍ॅटिट्यूड! नाही लिहीले तर 'कसा याला दाबला मी'! हा हा हा हा! >>>>> बेफिकीर, सेम पिंच Happy एकाचवेळी कित्ती सारखे लिहिलेय आपण Happy Happy Happy मायबोली ऑफलाईन गेली नसती, तर माझे पोस्ट तुमच्या आधी प्रकाशित झाले असते Sad Happy

मी आता पुढचा भाग लिहायला घेतो अशी धमकी देत आहे. हा हा हा हा!>>>> मी एवढ्या सुखद धमकीचा आजवर कधीच अनुभव घेतलेला नाहीये Happy Happy Happy धमकीबद्दल मंडळ आपले आभारी आहे. Happy Happy Happy

प्लिज थाम्ब्वा हे सार......वातावरण खरच दुषित होत चाललय....
बेफिकीर,
लवकर लिहायला घ्या हा एकमेव उपाय आहे......यावर.....

असो, माझे बेफिकीरजींना हेच सांगणे आहे, की प्रतिक्रिया फार पर्सनली घेऊ नका... तुम्ही आमच्या दृष्टीने परफेक्ट लिहिताच. तुमच्या लिखाणात काही लोकांना जाणवलेला बालिशपणा त्यांच्या साहित्यक्षेत्रातील ज्ञानानुसार योग्य असावा....

....सानी सहमत.........

शिवाय तुमचे कुणी मानसिक खच्चीकरण करत आहे, असे वाटत असेल, तर त्याच वेळेस तुमच्या
कादंबरीची रोज उत्सुकतेने वाट पाहणारे आणि त्यावर भरभरुन प्रतिसाद देणारे फॅन्स आठवा......खरय

खरंच कंटाळा आला!

मी आता पुढचा भाग लिहायला घेतो अशी धमकी देत आहे. हा हा हा हा!

गाठायचे असते स्वतःला गाठले की जाहले
अगदीच नाही सोसले तर थांबले की जाहले-----

..............ये हुयी ना बात.....

सावरी

तुमच्या लिखाणात काही लोकांना जाणवलेला बालिशपणा त्यांच्या साहित्यक्षेत्रातील ज्ञानानुसार योग्य असावा.
>>>

हा हा हा हा! सानी! सॉलीड लिहीता राव तुम्ही!

सावरी...सहमतीबद्दल धन्स हं Happy Happy

बेफिकीर Sad तुम्हाला माझ्या प्रतिक्रियेत डबल स्टँडर्डचा वास येतोय का आता???? Sad Sad Sad

Rofl

ट्ण्या ह्याच लेखक-वाचक विशुद्ध संबंधांबद्दल बोलत असावा.

@ राडा
लय भारी...

@ टण्या
सहित्य सहवास...... Rofl

बेफीकीर , अहो आपण का येवढा त्रास करुन घेताय ???

निंदकाचे घर असावे शेजारी !!!

ते सोडुन सोडा हो ........

तुम्ही आपला पुढचा पेग भरा लवकर !!! Proud

बेफिकीर.......
तुम्ही या वादात नका पडू, खरच.....................

तुम्ही फक्त लिहित राहा......

@ टण्या आणि साजिरा ................

त्यांचा म्हणणं सुद्धा मला १००% पटलं......
त्यांच्या सूचनांना तुम्ही positivly घ्या....
बस......

तुमचा एक प्रचंड मोठा पंखा..... Happy

माबो मित्रपरीवार,

इथे कोणाच्याही भावना दुखवल्या जाणार नाहीत याची काळजी प्लिज सगळ्यानीच घ्या ही विनंती....

सावरी

ओल्ड मंक लार्ज...........

सावरी

बेफिकिर,

मी आता पुढचा भाग लिहायला घेतो अशी धमकी देत आहे. हा हा हा हा!...

तुमच्या धमकीमुळे वातावरण बदललय बरका........

सावरी

चला बेफिकीरजी...सगळे वाद,चर्चा संपली बहुदा..पुढचा भाग येऊदे आता Happy

कॅप्टन, किति वेळ झाला, ओडर रिपिट करायला सांगितलि राव, जरा बघा कि लवकर. चढलेलि उतरायला लागलिय..............

'कोसला' आणि 'सात सक्कं त्रेचाळीस' हेही माहीत नाही. >>>>> या विधानाचे अतिशय आश्चर्य वाटले. टण्याने लघुनियतकालिकांच्या चळवळीचा उल्लेख केला आहे, तो संदर्भसुद्धा कळला नाही असे प्रतिक्रियेत दिसते. साहित्यिकाचे वाचन-मनन भरपूर, चौफेर असावे असे वाटत नाही का? (त्याला अपवाद असतात - उदा. सर्व संतकवी, बहिणाबाई, इ. सारखी प्रतिभावान माणसे). यामुळे साहित्यिकाची क्षमता वाढणार नाही का? क्षमता असूनसुद्धा ती जोपासण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाहीयेत असे वाटून खेद झाला. वाचन-मननाने एक जाण येत असावी, तिलाच 'साहित्यिक ज्ञान' म्हणत असावेत. अर्थात, 'आपल्याला ती काय नाही बुवा' असे म्हणून जबाबदारी सहजपणे झटकताही येते.
आत्ममग्न असणे व आत्मकेंद्री असणे यात फरक असावा असे वाटते. आत्ममग्नतेतून बेफिकिरी येते, आत्मकेंद्री असण्यातून 'मला काय घेणेदेणे, माझी जी स्थिती आहे तीच उत्तम' अशी भावना येते. तिलाही बेफिकिरी म्हणता येतेच.

आत्मकेंद्री असण्यातून 'मला काय घेणेदेणे, माझी जी स्थिती आहे तीच उत्तम' अशी भावना येते. तिलाही बेफिकिरी म्हणता येतेच.
>>> तिलाच बेदरकारी म्हणत असावेत का? तिथे असलीच तर दिखाव्याची नम्रता असते, जिच्यातील फोलपणा ठायी ठायी दिसून येतो. नुसती वाहवा अ‍ॅक्सेप्टेबल असते हे देखिल टीकेची कळ सोसता न आल्याने उफाळून बाहेर येते. ठराविक परिघ सोडून बाहेरचे जग दिसतच नसते त्यामुळे प्रतिभेमधे कसलीही भर पडणे/पाडून घेणे मान्य नसते.

Pages