श्रावण होऊन येशील का?

Submitted by के अंजली on 17 August, 2010 - 04:45

शांत पहुडला उधाण वारा
नाचनाचुनी दमल्या धारा
होउनि नवथर ऊन कोवळे
हात तयांचा धरशिल का?
इंद्रधनूतिल रंग लेउनी
श्रावण होउन येशिल का?

आषाढाचे सारुनि मंतर
शाश्वत निळसर होइल अंबर
गर्भरेशमी, गंधबावरा
बहर फुलांचा होशिल का?
मंदसुगंधी झुळुक जसा तू
श्रावण होउन येशिल का?

ओलेता मधुमास सुखाचा
बावरलेल्या रवीकिरणांचा
मृदगंधाच्या सुखद सरींचे
ऊन रुपेरी होशील का?
पानांतुनी झिरपून जात तू
श्रावण होऊन येशील का?

ओढ लाजरी मनात भरते
तळहाताची मेंदी झुरते
सलज्ज या राधेला होऊन
कृष्ण सावळा मिळशील का?
आसक्तीच्या पल्याड जाउन
श्रावण होउन येशील का?

गुलमोहर: 

मुद्याच्या मानाने अधिक दीर्घ व 'लघु-गुरू'कडे दुर्लक्ष केलेली नक्षीबाज रचना!

(अवांतर - मधे अधिक महिना आला तर श्रावणाच्या आधीच्याच महिन्यात पाऊस येऊ शकतो. तसेच, ऋतूचक्र बदलल्याचे स्वतःच्या छातीवर हात ठेवून एका ज्योतिषाने मध्यंतरी शपथपुर्वक सांगीतले होते. तसे झालेले असल्यास श्रावण होऊन येणे निरुपयोगी ठरू शकेल. साठोत्तरीपणा टप्याटप्याने कमी होत जाणे व समकालीनत्व अधिकाधिक होत जाणे उपयुक्त ठरावे अशी कल्पना आहे.)

-'बेफिकीर'!

कवितेचा अर्थ कळला का?
काना, मात्रा, वृत्त, छंद, जे जे काय ते सगळं ठीक... त्या बाह्यसजावटीसाठी ठीक, आक्षेप्/आग्रह नाही!
पण मुळात कविला काय रुजवायचं/मांडायचं/सांगायचं आहे... त्याचं काय?
अन् ते सो कॉल्ड मोजपट्ट्यांत बसत नसेल तर? तर अशा सजावटींत नटून उभ्या केलेल्या शब्दांना कविता म्हणायचं का?

(अवांतर- २१ व्या शतकातील कवीता वृत्त, छंद यात सजवलेले गद्य असावे अशी श्रेष्ठींची इच्छा आहे काय?
असल्यास हरकत नाही :स्मित:)

अमित त्यासाठी मला १६वे शतक ते किमान २२वे शतक असा प्रवास करावा लागेल, आणि टाइम ट्रॅव्हेल येत नाही रे मला. his is a totally different cup of tea. I can just smell and sea , cant even drink...so forget brewing.

बेफिकिर, माझ्या नक्षीबाज(??) (नक्षीदार नव्हे!!) कवितेला वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल आपले आभार!
वृत्त्,छंद मात्रा यांमध्ये सजवलेल्या सगळ्याच रचना वाचनीय असतात काय? एखादी कविता इतकी बांधलेली असते की काय बिशाद तिचा अर्थ कळेल,अशा कवितेला आपण काय म्हणाल??

माझी कविता साधी सरळ आहे, जे मनातलं आहे ते चांगल्या पध्दतीने पोहोचतयं ना, मग झालं तर!

अमित त्यासाठी मला १६वे शतक ते किमान २२वे शतक असा प्रवास करावा लागेल, आणि टाइम ट्रॅव्हेल येत नाही रे मला. his is a totally different cup of tea. I can just smell and sea , cant even drink...so forget brewing.>>>

....!!

खुप छान...
"परी कथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का..
भाव दाटले मनी अनामिक साद तयाला देशील का.."
या भावगीताची आठवण करुन दिली...
धन्स....

-'बेफिकीरजी,
इथे कवियीत्रिंनी आपणास काही प्रश्न विचारला आहे, त्याचं समर्पक उत्तर न देता,
याच कवियीत्रिंच्या दुसर्‍या कवितेवर शेलकी(ती अभ्यासपुर्ण नाहीत) विधाने करण्याचा नैतीक अधिकार कसा असेल?
कळवावे.

अनुजाताई,

त्यांच्या प्रश्नाचे उत्तर कधी द्यायचे, द्यायचे की नाही हे मला ठरवूदेत!

(हा प्रतिसाद या रचनेवर नाही या बद्दल क्षमस्व!)

-'बेफिकीर' !

ते ठरवा, घाई नाही!
पण मुळात एक खड्डा खोदून न बुजवता खड्डे करीत नका सुटु, आप्ल्याकडील कॉरपोरेशन सारखे, एवढंच!

वा! कविता अत्यंत आवडली. सुंदर भाव, लयबद्धता, सहज सुंदर रचना; सगळेच भावले. कदाचित मीसुद्धा एक हळवा रोमॅन्टिक कवी असल्याने असेल.. पण कविता वाचताक्षणी भावली (एखादी साडी सेल्समॅनने टाकताक्षणी आपण घेण्याचे नक्क्की करतो तशी) Happy

माझ्या निवडक दहात नोंद!

ठकु, अनुजा आणि शरदजी आपले खूप आभार!!
दोन्ही कविंतावर तोंडसुख घेऊन झालय तर प्रश्नांची उत्तर (म्हणजे अनुजाच्या भाषेत खोदलेले खड्डे) बुजविण्याचं काम करायचं कधीपासून घेताय मनावर बेफिकिर???
मला वाटतं तुमच फक्त नावच बेफिकिर आहे, फिकिर तर तुम्हांला सगळ्याचीच पडलीये! कोण कसं लिहितय,ते वृत्तात आहे की नाही कोण कुठे कवितेतून काय कुठे पोहोचवतोय आणिक काय काय!!!!!!
असो.

श्रावण संपता संपता श्रावणावरची इतकी सुंदर कविता वाचायला मिळाली.
खरं तर कवितेतला श्रावण कधी सरतच नाही!

खूप सुंदर कविता लिहिली आहे तुम्ही. एक सांगावंसं वाटलं. आपण चांगलं लिहिलं आहे हे आपल्या आनंदाचं असतं. तो आनंद अनावश्यक वादविवादात कशाला हरवावा? आपण एकदा आपलं काव्य इतरांसाठी प्रकट केलं की ते त्यावर आपापलं मत बनवायला स्वतंत्र आहेत. आपण त्यांची मतं व्यक्तिश: घेऊ नयेत म्हणजे झालं. इतकी सुंदर निर्मिती किती निर्मळ मनातून आली असेल, त्याला वादविवादानं कशाला गढूळ करून टाकावं? ज्याचं त्याच्यापाशी. आपण आपल्या निर्मितीचा आनंद घ्यावा, द्यावा. तो ज्यांना घेता येईल त्यांनी घ्यावा. ज्यांना नाही येणार त्यांनी चर्चा करत राहावं.
"आसक्तीच्या पल्याड जाउन, श्रावण होउन येशिल का" वा!!! पुन्हा एकदा या सुंदर कवितेबद्दल अभिनंदन!
-सतीश

सुंदरच आहे.

शांत पहुडला उधाण वारा
नाचनाचुनी दमल्या धारा
होउनि नवथर ऊन कोवळे
हात तयांचा धरशिल का?
इंद्रधनूतिल रंग लेउनी
श्रावण होउन येशिल का?

...............व्व्वा

काही लोक सर्वाधिकार स्वतःच स्वतःला बहाल करून घेऊन शेखी मिरवीत असतात विद्वत्तेची,
के अंजली -त्यांचे मनावर घेऊ नका.
असे खवचट लोक त्यांच्या वलयात असतात

Pages