... आणि गावसकर 'पेटला'!

Submitted by फारएण्ड on 26 October, 2009 - 22:41

आज हे आठवण्याचे कारण म्हणजे क्रिकइन्फो च्या एका सदरात प्रत्येक तारखेला आधीच्या काही वर्षात काय झाले याची अत्यंत वाचनीय माहिती येते - त्यात या सिरीज बद्दल वाचले आणि क्रिकेट (टीव्हीवर दाखवू लागले आणि) पाहू लागलो तेव्हा अगदी सुरूवातीला पाहिलेल्या या सिरीज बद्दल च्या बर्याच गोष्टी आठवल्या.

१९८३ च्या वर्ल्ड कप मधे भारताकडून वेस्ट इंडिज चा संघ हरला. लॉईड ने राजीनामा दिला होता, पण तो बहुधा स्वीकारला गेला नाही. हा संघ एकूणच प्रचंड डिवचला गेला होता. त्यात चार महिन्यांनतर त्यांचा भारत दौरा आला...

हा संघ तेव्हा क्रिकेट मधला तेव्हाचा (आणि कदाचित आत्तापर्यंतचा) सर्वात बलाढ्य संघ होता. रिचर्डस, ग्रीनीज सारखे आक्रमक फलंदाज तर होतेच पण मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट्स, डॅनियल, डेव्हिस सारखे वेगवान गोलंदाज आणि लॉईड ची कॅप्टनशिप यांच्या जोरावर ते १२-१३ वर्षे कसोटी मालिका कोठेही हरलेले नव्हते. टाटा मोटर्स (पूर्वीचे टेल्को) च्या बाबतीत एक अंतर्गत विनोद (इन जोक) कायम सांगितला जातो - "एक माणूस एक ट्रक विकत घेतल्यावर काही दिवसांनी डीलर कडे जातो आणि बर्याच तक्रारी आहेत म्हणून सांगतो. मग मेकॅनिक ने नीट बघितल्यावर कळते की आत इंजिनच नाही. आता इतके दिवस ट्रक कसा चालला यावर त्या डीलर चे उत्तर असते 'रेप्युटेशन' वर!" तेव्हाच्या विंडीज चे बोलर्स एवढे भीतीदायक असायचे की मला वाटते या मालिकेत भारताच्या अर्ध्या विकेट्स केवळ यांच्या रेप्युटेशन वरच उडाल्या असतील. ही सिरीज मी पूर्ण पाहिलेली आहे आणि काही विकेट्स बघून खरोखरच तसे वाटायचे Happy

या अशा लोकांना पहिल्याच टेस्ट मधे कानपूरला 'ग्रीन टॉप' देण्याची कल्पना कोणाच्या डोक्यातून आली असेल कोणास ठाउक! आधी ऐन भरात असलेला मार्शल आणि त्याचा नुसता वेगच नव्हे तर त्याबरोबर असलेली फलंदाजाच्या चुका ओळखून त्याप्रमाणे त्याला गोलंदाजी करण्याची प्रचंड हुशारी! स्टीव्ह वॉ नेच त्याच्या पुस्तकात लिहीले आहे की मार्शल १-२ ओव्हर्स मधेच फलंदाजाला 'वर्क आउट' करू शकत असे! दुसरा होल्डिंग - याला 'दुसरा' म्हणायचे एकच कारण म्हणजे त्याच्यापेक्षा मार्शल यावेळेस जास्त भरात होता. आणि होल्डिंग त्याच्या ८१ वगैरे सालच्या इंग्लंड विरूद्धच्या फॉर्म पेक्षा किंचित उतरला असला तरी 'डॉन जख्मी है तो क्या, फिरभी डॉन है" अशीच अवस्था होती. आणि हे दोघे थकले तरी डॅनियल आणि डेव्हिस तर कधी रॉबर्ट्स, गार्नर (याच्या उंचीमुळे याने टाकलेला यॉर्कर दुसर्या मजल्यावरून आपल्या पायात आल्यासारखा वाटतो हे संदीप पाटील का कोणीतरी म्हंटला होता Happy ) हे होतेच. नाहीतर आपल्याविरूद्ध खेळणार्यांना एकदा कपिल खेळून काढला की बाकीचे लोक केवळ स्पिनर्स येइपर्यंत बॉल ची चमक घालवण्याचे काम करत असल्यासारखे वाटत. विशेषतः भारतातील खेळपट्ट्यांवर.

यांच्याविरूद्ध खेळण्यासाठी भारताकडे प्रमुख फलंदाज होते - गावसकर, मोहिंदर अमरनाथ, वेंगसरकर, संदीप पाटील आणि शास्त्री (आणि कपिल). आधीच्या सीझन मधे विंडीज आणि पाकच्या तोफखान्याविरूद्ध त्यांच्याच देशात पाच शतके मारणारा आणि वर्ल्ड कप च्या उपांत्य व अंतिम सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' असलेला मोहिंदर घरच्या मैदानावर आणखी चांगला खेळेल असे वाटले होते. पण मोहिंदरच्या बाबतीत हे एक अगम्य कोडे म्हणजे घरच्या मैदानांवर तो अजिबात 'चालला' नाही. त्यामुळे फलंदाजी च्या बाबतीत गावसकर काय करेल यावर बरेच काही अवलंबून होते.

या सिरीज आधी पासून गावसकर च्या खेळाकडे सर्वांचेच लक्ष होते. तेव्हा भारत जिंकणे वगैरे शक्यता केव्हाही फारच कमी असल्याने वैयक्तिक उच्चांकांना खूप महत्त्व होते. या सुमारास शतकांच्या संख्येमध्ये सोबर्स, बॉयकॉट आणि इतर बरेच नावाजलेले इंग्लिश खेळाडू यांना मागे टाकून गावसकर ब्रॅडमन च्या २९ शतकांच्या (तेव्हा सर्वात जास्त) जवळ आला होता, तसेच एकूण धावांच्या संख्येतही सर्वात जास्त असलेल्या बॉयकॉट च्या जवळ आला होता. त्यामुळे त्याच्या प्रत्येक डावाला प्रचंड महत्त्व आले होते.

तर कानपूरला मार्शल ने खेळपट्टी आणि भारतीय फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळण्याची एकूण क्षमता याचा भरपूर वापर करत दाणादाण उडवली. ही सिरीज म्हणजे विंडीज चा बदला आहे असे दिसू लागले होते.खुद्द गावसकर दुसर्याच बॉलवर आउट झाला. आणि पहिल्या किंवा दुसर्‍या (लक्षात नाही) डावात बॉलच्या वेगामुळे त्याची बॅट त्याच्या हातातून पडली. आणि बहुधा तेव्हापासून ही सिरीज म्हणजे विंडीज वि. भारत असे न होता विंडीज गोलंदाज वि. गावसकर अशी झाली. कदाचित आपले खेळाडू 'पेटायला' अशी काहीतरी व्यक्तिगत गोष्ट कारणीभूत ठरत असावी, आणि मग जेव्हा ते आपण काय करू शकतो ते दाखवतात तेव्हा कितीही तयारी केलेला प्रतिस्पर्धी संघ त्यांच्या प्रतिभेपुढे काही करू शकत नाही.

सिरीज मधे ०-१ ने मागे, पूर्ण बॅटिंग मार्शल आणि इतरांपुढे कोसळलेली, स्वत:चे अपयश हे सगळे पचवून एरव्हीचा शांत आणि बचावात्मक बॅटिंग करणारा गावसकर दिल्लीच्या दुसर्‍या टेस्ट मधे उभा राहिला तो त्याच्या चाहत्यांनी कधीही न पाहिलेला आक्रमक पवित्रा घेउन! आणि मग विंडीज च्या सर्व बोलर्सची यथेच्छ धुलाई करून त्याने केवळ ९१ बॉल्स मधे शतक केले - कसोटी सामन्यात, आणि ते ही वेस्ट इंडिज विरूद्ध! कदाचित ब्रॅडमन च्या विक्रमाची बरोबरी करताना त्यानी त्याच्या सारखेच आक्रमक खेळावे असे ठरवले असेल! त्याने मार्शल च्या एका शॉर्ट बॉल वर हुक करून मारलेली सिक्स अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याचा बहुधा मार्शलवर जास्तच राग असावा, कारण पुढच्या अहमदाबाद च्या मॅच मधे सुद्धा त्याच्या पहिल्या तीन बॉल वर सलग तीन फोर मारून त्याने जबरदस्त सुरूवात करून दिली होती. तेव्हाही शतक झाले असते पण ९० वर तो बाद झाला. पुन्हा कलकत्त्याला पहिल्याच बॉल वर मार्शल ने 'काढल्यावर' मद्रास ला ०-२ ला चौथ्या क्रमांकावर येउन नाबाद २३६ रन्स काढून ३० वे शतक नोंदवत त्याने ब्रॅडमन चा विक्रम मोडला.

भारत ही सिरीज ०-३ हरला, पण ६ टेस्ट पैकी तीन मॅच मधे विंडीज वर चक्क 'लीड' घेतला होता हे मुळात विशेष होते. आणि गावसकर (५०० रन्स, त्यात दोन शतके) व कपिल (२९ विकेट्स) हे आमचे दोन्ही हीरो या सिरीज मधून तेवढेच चांगले - किंवा इतरांविरूद्ध खेळायचे त्यापेक्षा थोडे जास्तच चांगले- खेळले, हाच आनंद आम्हाला होता. तेव्हा भरात असलेले बोथम वगैरेंसारखे लोक विंडीज विरूद्ध कसे ढेपाळत ते पाहिल्यावर तर तो आणखीनच वाढला Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेण्ड, छान लेख.

मॅच जिंकण्यापेक्षा वैयक्तिक रेकॉर्ड वर भर बद्दलचा मुद्दा आधी ही एकण्यात आला होता. गावस्कर स्वतः करता खेळतो हे वाक्य तर मी बर्याच वेळा त्या काळच्या क्रिकेट्बघू आप्तांकडून एकलय.>> हे अत्यंत चुकिच आहे. सचिन , कोहली, पुजारा स्वतःसाठी खेळतात अस म्हणण्यासारख आहे.

गावस्करांच्या ६० षटकातील ३६ धावांबद्दल तसे म्हणता येइल कदाचित. पण मला वाटते त्यावेळेस एक दिवशीय सामने गावस्करांनी जास्त गांभीर्याने घेतले नसावेत, फक्त बॅटींगची प्रॅक्टीस करून घ्या अशी मानसिकता असावी. कुणी तरी त्यांना हा प्रश्न विचारायला हवा. Happy

. मर्व ह्युज, ब्रुस रीड वगैरेच्या बॉलिंगवर हा माणूस डोक्यावर फक्त हॅट घालून खेळत होता हे बघून फार आश्चर्य आणि कौतूक वाटलं. >> बुवा, त्यांचे बाप शोभावेत अशा विंडीज चौक्डीसमोर तो तसाच खेळलाय. कमालीचा माणूस !

गावस्कर स्वतः करता खेळतो हे वाक्य तर मी बर्याच वेळा त्या काळच्या क्रिकेट्बघू आप्तांकडून एकलय. >> मी पण हे बरेचदा ऐकलय. कदाचित त्याच्या सेफ्टी फर्स्ट अ‍ॅप्रोच मूळे असे वाटत असावे.

>>मॅच जिंकण्यापेक्षा वैयक्तिक रेकॉर्ड वर भर बद्दलचा मुद्दा आधी ही एकण्यात आला होता. गावस्कर स्वतः करता खेळतो हे वाक्य तर मी बर्याच वेळा त्या काळच्या क्रिकेट्बघू आप्तांकडून एकलय.>> हे अत्यंत चुकिच आहे. <<
बुवा -१
विक्रमसिंह +१

अ‍ॅक्च्युअली, गावस्करचंच एक फेमस वाक्य आहे. मी रेकर्डस करता कधीच खेळत्/खेळलो नाहि, रेकर्ड्स आपोआप होत गेले...

आणि शेवटि, गावस्करच्या संथ खेळाबाबतच्या आक्षेपा बद्दल. विकेट फेकायची नाहि हे तंत्र गावस्करच्या बॅटिंग स्टाइलमधे खोलवर भिनलेलं होतं. ऑब्वियसली, प्रत्येक बॉलला तलवार फिरवण्या ऐवजी बॉलचं मेरिट बघुन खेळावं, अशी त्याची शैली होती. खरं क्रिकेट तेच आहे. त्याच्या वैयक्तिक रेकर्डस्बाबत बोलायचं झालं तर, ओपनर बॅट्स्मन असुनहि त्यावेळेस अशी परिस्थिती होती कि, गावस्करचे ४०-५० स्कोरर्बोर्डावर लागले, तो सेट झाला कि सेंचुरी हमखास ठरलेली. मिडल ऑर्डर बॅट्स्मनहि ५० च्या पुढे चाचपडत खेळताना बघुन त्याची जाणीव प्रकर्षाने व्हायची...

मस्त लेख!
मागे एकदा सुनंदन लेलेंनी सुनील गावसकरांची मुलाखत घेतली होती त्यात काही जुने किस्से ऐकायला मजा आली होती.
https://youtu.be/X3-QSTPNfzo

मस्त मस्त मस्त !
काय मस्त आठवण काढलीय.

प्रतिसाद वाचतोय. आता तो काळ सरला. आरोप प्रत्यारोप भूतकाळात जमा झाले. जिंकण्याचं प्रेशर, हारल्यावरची चिडचिड, निराशा हे ही इतिहासजमा झालं. आज जर काही जिवंत असेल तर बॅट आणि बॉलचा सामना. विंडीजची भेदक गोलंदाजी आणि गावसकरचे त्याच्या समोर उभे राहणे. अ त्यंत तंत्रशुद्ध फलंदाजी, अप्रतिम पदलालित्य, त्याची ती चेंडूवरची नजर , फिल्डींगमधल्या फटी शोधत राहणे आणि चेंडूची प्लेसमेंट तिकडे करणे, ते करत असतानाच तो सीमापार जाणार कि नाही याचा अंदाज असल्याप्रमाणे त्याचं रनिंग बिटवीन.

गावस्कर गावस्करच होता. त्याच्या इतका बुद्धीमान कप्तान माझ्या तरी पाहण्यात नाही. कप्तान पद गेल्यावरही त्याने दिलेले मोलाचे सल्ले काल परवा पर्यंत आठवणीत होते.

Pages