उदंड देशाटन करावे - राजस्थान ... भाग १ - मालघाट मार्गे फूटादेवल ... !

Submitted by सेनापती... on 27 October, 2010 - 16:04

मुख्य टीप : वाचायला बसायच्या आधी काहीतरी खायला घेऊन बसावे नाहीतर खाऊन बसावे... वाचल्यावर भूक लागल्यास धागाकर्ता कुठलीही जबाबदारी घेणार नाही... Lol

जून २००८ ची गोष्ट. एके दिवशी अभिजित Y.H.A.I. म्हणजे यूथ होस्टेलच्या ट्रेक्सबद्दल माहिती घेउन आला "अरे, नोव्हेंबर महिन्यात राजस्थान स्टेटचा एक ट्रेक आहे. अरावली - रणकपुर - कुंभळगड़ ट्रेकिंग एक्सपिडिशन. तो करुया. तारखा पण फिट बसत आहेत." अभि-मनाली आणि मी तयार होतोच. अजून कोण-कोण येणार असे अनेकांना विचारल्यावर 'मी नक्की येणार' असे ऐश्वर्या एका पायावर उड्या मारत म्हणाली. अनुजाने सुद्धा यायचे नक्की केले. याशिवाय अभिचे संजीव उर्फ़ संजू आणि दिपक हे २ मित्र सुद्धा यायला तयार झाले. संजू हा 'संस्कृत शिक्षक' आहे तर दीपक एल.आय.सी. मध्ये कामाला आहे. अशी एकुण ७ जणांची टिम तयार झाली. आकडा नकी झाल्यावर अभिजितने ट्रेन आणि ट्रेक अश्या दोन्ही तारखा नक्की करून टाकल्या. राजस्थान यूनिटचे 'रतनसिंग भाटी' यांना आम्ही नेमके कुठल्या तारखेला येतोय ते कळवले. आणि सुरू झाली अजून एक भ्रमणगाथा...

९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता बोरीवली स्टेशनवरुन अरवली एक्सप्रेस पकडायची होती. मी, दिपक, अभिजित आणि मनाली ठाण्याहून संध्याकाळी निघालो. बाकी सर्व थेट बोरीवलीलाच भेटणार होते. कविता आम्हाला ट्रेनवर भेटायला येणार होती. गंमत म्हणजे संध्याकाळ ऐवजी ती सकाळीच ९ वाजता आम्हाला भेटायला बोरीवली स्टेशनला जाउन पोचली. मी सांगताना चुक केली की तिने ऐकताना ते माहीत नाही पण तिला एक हेलपाटा पडला हे नक्की. मग संध्याकाळी ती परत स्टेशनला आली. सर्वजण ९ च्या आसपास बोरीवलीला येउन पोचले होते. काही मिनिट्समध्ये ट्रेन येणार आणि आम्ही आमचा प्रवास सुरू करणार इतक्यात... "मला जाम भूक लागली आहे. ह्या ट्रेनमध्ये रात्री खायला मिळेल का रोहन... आपण काहीतरी खायला घेउन येऊया." - ऐश्वर्या उवाच. मग अभि आणि संजू दोघेजण पुन्हा स्टेशनच्या बाहेर गेले आणि समोसा, ढोकळा असे पटकन संपणारे, भूक भागवणारे पदार्थ घेउन आले. ते आले तरी गाडी काही अजून येत नव्हती. न राहून ते पदार्थ हादडणार तितक्यात गाडी आली. कविताला टाटा केला आणि आम्ही प्रवासाला सुरवात केली. ट्रेनमध्ये दिल्लीच्या मनोमयी दीदी सुद्धा होत्या. 'मनोमयी दीदी' म्हणजे अभि, संजू आणि दिपकच्या YHAI ट्रेक फ्रेंड. त्या महाराष्ट्र यूनिटच्या ट्रेकवरुन राजस्थान आणि मग तिकडून आपल्या घरी दिल्लीला जाणार होत्या. आता आम्ही ८ जण असल्याने एक आख्खा बर्थ आणि साईड बर्थ आमचाच होता. तेंव्हा तंगडया पसरल्या आणि गप्पा टाकत बसलो. त्या सोबत खादाडी सुरू झालीच होती. चांगले १२-१५ समोसे होते आणि ढोकळा अर्धा किलो तरी होता. या शिवाय अनुजाने घरून कोलंबी भात बनवून आणला होता तर दिपकने बोंबिल फ्राय. आयला आता हे माहीत असते तर समोसा, ढोकळा आणला असता का? मग काय ... आम्ही तर सुटलो होतो.

खाता-खाता अनुजा लडाखबद्दलच्या गोष्टी सांगत होती तर मध्येच दिपक-अभि-संजूच्या 'हर की दुन'च्या गोष्टी सुरू व्हायच्या. इतके खाल्ले तरी काही समोसे आणि बोंबिल फ्राय उरले. ते एका पिशवीमध्ये ठेवून खिडकीच्या मध्ये ती लटकवली. आजुबाजुला बसलेले लोक जसे आडवे व्हायला लागले तसे आम्हाला सुद्धा आवाज खाली करावे लागले. उगाच बाकीच्यांना कशाला त्रास नाही का. आम्ही सुद्धा आडवे झालो. मी आणि अभि समोरा-समोर अप्पर बर्थ वरती झोपलो होतो. पहाटे ३ वाजताच मला जाग आली. (रोहणा ... अजिबात बोलू नकोस कोणाला की तूला अवघ्या ३ तासात भूक लागुन जाग आली) हाताशी जवळच लटकवून ठेवलेल्या समोश्याच्या पिशवीमध्ये हात घालतो तोच अभि जागा झाला. 'भूक लागली आहे ना रे. दे मला पण एक समोसा.' मी बघतच बसलो. अभ्याचे हे रूप मला नवीन होते. समोसा खाल्यावर आम्ही पुन्हा झोपी गेलो. पहाटे अबू रोड आसपास ट्रेन येता-येता आम्ही जागे झालो पण अनुजा मात्र उठून पुन्हा बसल्या-बसल्या लुडकली होती. स्टेशनवर उतरलो तर सगळीकडे 'रबडी' आणि 'पापडी चाट'वाले दिसत होते. हातात वेळ नव्हता म्हणुन ती संधी हुकली आणि गाडी अबूवरुन 'फालना'ला निघाली. आम्हाला फालनावरुन 'रणकपुर'ला जायचे होते. तिकडून पुढे मग ट्रेक होता. आम्ही फालनाला पोचल्याची वर्दी रतनसिंग भाटी यांना दिली आणि एका जीप मधून रणकपूर जैन मंदिराजवळ असलेल्या बेसकैंपला पोचलो. तिकडे मुंबईचे काही लोक भेटले. ते ट्रेक पूर्ण करून परतत होते. आम्ही सामान लावले, जेवून घेतले आणि गप्पा मारत बसलो.

संध्याकाळी 'रणकपूर जैन मंदिर' बघायला गेलो. 'एक्लमटायझेशन' म्हणजे वातावरणाशी समरस होण्याचा तसा काही प्रश्न नव्हता. तासभर मंदीर बघून कैंप वर परत आलो. ग्रुप मधल्या इतर लोकांशी ओळख करून घेतली. कोणी बंगालमधले तर कोणी गुजरात, कोणी दक्षिणात्य तर कोणी उत्तरेकडचे. १८ एकजण होते एकुण. त्यात आम्ही ७ जण 'जय महाराष्ट्र' होतो. YHAI चे हे एक मस्त असते. अनेक विविध ठिकाणच्या लोकांशी ओळखी होतात. नव्याने बरीच माहिती कळते. अजून एक उत्तम गोष्ट म्हणजे YHAI च्या कुठल्या ही कैंपला 'कैंपफायर' होत नाही. लाकडे कधीच जाळली जात नाहीत. रात्रीच्या जेवणानंतर सर्वजण एकत्र जामुन.. 'फायर..फायर..कैंपफायर..' असे म्हणुन फारतर एखादी मेणबत्ती पेटवून कैंपफायरला सुरवात करतात. आजच्या गप्पांना काही मज्जा आली नाही. ग्रुप मधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) आधीच गुडुप झाले होते. आम्ही तासभर दंगा केला आणि १० वाजता आपापल्या टेंट्स मध्ये जाउन बत्ती गुल केली. पण झोप लागेल तर ना. का विचारताय. घोरण्याची कोंपिटीशन सुरू होती तिकडे. अशी की आता घोरण्यात सुद्धा जोरदार भांडतील की काय. डोके उठले होते अक्षरश:. ह्यांच्या बरोबर ५ दिवस राहायचे. एका टेंट/ खोलीत झोपायचे? च्यामारी... बघुया पुढे पुढे काय होते ते...

***************************************************************************************

दिवस १ : स्वतः घोरून-घोरून, आमच्या जिवाला घोर लावून आणि आम्हाला जागे ठेवून ते 'घोरटे' (घोरून आमची झोप चोरणारे म्हणुन घोरटे) निवांतपणे झोपले होते. आम्ही मात्र उशिरापर्यंत जागे होतो. अखेर रात्री उशिराने कधीतरी आम्हाला झोप लागली. तरी सकाळी जाग लवकरच आली. हिमालयातील ट्रेक्सप्रमाणे पहाटे लवकर उठून बर्फ वितळातयच्या आधी जास्तीत-जास्त ट्रेक करायचा असे काही इकडे नव्हते. रात्रभर 'घोरून लढाई' केलेले काही वीर अजून सुद्धा अंथरुणात निपचीत पडलेले होते. आम्ही उठून आवरून घेतले. आंघोळ करायची नव्हतीच. का काय? डोंगरात आल्यावर डोंगरातले नियम पाळावे लागतात. तेंव्हा नको ते आंघोळ वगैरे करायचे विचार मनात आणायचे नाहीत. आम्ही नाश्त्याची आणि नाश्ता आमची वाट बघत होताच. उदरभरण झाले आणि मग आम्ही निघायची तयारी केली. सॅक्स पाठीवर मारल्या आणि 'मालघाट'कडे निघालो. रणकपुर पासून मालघाटचे जंगल अवघे ३ किमी लांब आहे. जायचा रस्ता पक्का डांबरी आहे तेंव्हा आम्ही ट्रकमध्ये बसलो आणि मालघाट जंगलाच्या गेटकडे निघालो. काही मिनिट्समध्ये मालघाटच्या गेटवर पोचलो.

इथपासून फक्त १३ किमी. ट्रेककरून संध्याकाळपर्यंत 'फूटादेवल' याठिकाणी पोचायचे होते. आता सकाळचे किती वाजले होते ते माहीत नाही पण थोड़े-थोड़े ऊन लागायला लागले होते. संजूने भाटीसरांची एक छोटीशी मुलाखत घेतली. की ट्रेक कसा आहे... जायचा रूट काय-काय आहे वगैरे वगैरे... आमच्या संपूर्ण ग्रुपमध्ये आम्ही सर्वात तरुण होतो. तेंव्हा आम्ही पटापट ट्रेक करत पुढे जाऊ आणि ज़रा वयस्कर असलेले थोड़े मागे राहतील असा भाटीचा अंदाज होता बहुदा. पण हे काय? सुरुवातच आम्ही 'जाऊ दे त्याना पुढे आपण सावकाश जाऊ मागुन आणि कव्हर करू' ह्या स्टाइलने केली. आमच्या सर्वांच्या सॅक्समध्ये कपडे कमी आणि खायचे सामान जास्त भरले होते. शिवाय फालनावरुन घेतलेली केळी आणि मोसंबी सर्वांच्या साइड पॉकेटला लटकत होती. ती संपवणे गरजेचे होते. तेंव्हा जसा ट्रेक सुरू झाला तसे आम्ही सुद्धा 'सुरू' झालो. जणू काही ट्रेक फ़क्त १ दिवसाचा आहे ह्या स्पीडने आम्ही खात होतो आणि त्याविरुद्ध ट्रेक बहुदा १०-१२ दिवस मोठा आहे ह्या स्पीडने चालत होतो. मस्त मज्जा करत. घाई काय होती. उगाच आपले पुढे पळत जाउन भोज्जा करायचा ह्यात कसली मज्जा येते लोकांना काय माहीत. आमच्यात पण असे होते काहीजण. अरे लोकांनो ट्रेकची मज्जा घ्या. निसर्ग बघा. गप्पा टाकत जा. नाहीतर १०-१५ वर्षांनी हे असे लिहायला घेतले ना की काही आठवणार नाही... Happy मग बोलाल अरे हां तेंव्हा तर १०-१० की दौड़ करून पोचलो होतो नेक्स्ट डेस्टीनेशनला.

वाट एकदम सोपी होती. मध्येच कच्चा गाडीरस्ता लागायचा. आम्ही निवांतपणे बसायचो. धमाल गप्पा टाकत पुढे जायचो. आमचा ट्रेक गाईड शिवसिंग बोंबा मारू लागला की मग थोड़े पुढे सरकायचे. वाट सरत होती... मोसंबी संपत होती... आणि सॅक्स हलक्या होत होत्या. एके ठिकाणी मध्येच ऐश्वर्याला बीटल्स दिसले. हिरवे-हिरवे आणि त्यावर काळे ठिपके. ३ जणांचे कुटुंब होते त्यांचे एक. तिकडे त्यांचे फोटोसेशन झाले. मग ऐश्वर्याला ते उचलून घ्यायची हुक्की आली. मग त्यांचे तिच्याबरोबर पुन्हा एकदा फोटोसेशन झाले. पुन्हा बीटल्सना त्यांच्या घरी सोडले अणि आम्ही पुढे निघालो. वळणा-वळणाचा रस्ता हा हळू-हळू वर चढत होता. पण अगदीच हळू. नाहीतर आपला सह्याद्री. असा चढतो-उतरतो की काय विचारू नका. ह्या संपूर्ण प्रदेशात तसा पाउस कमी. त्यामुळे आपल्यासारखी गर्द झाड़ी नव्हती पण थोर वृक्ष मात्र होते. मधुनच पक्ष्यांचे आवाज कानी पडायचे. याशिवाय एखादा जोक झाला की 'संजू' या प्राण्याचे सुद्धा आवाज मोठ्याने ऐकू यायचे. आम्ही ७ जण सर्वात शेवटी 'व्यू जंगल पॉइंट'ला पोचलो.

सर्वजण आधीपासून तिकडे जाउन टेकले होतेच. मालघाट जंगलाचे इकडून मस्त दर्शन होत होते. ज्या रूटने आलो तो थोड़ाफार दिसत सुद्धा होता. ते दृश्य बघत ज़रा तिकडे विसावलो तर शिवसिंग लगेच म्हणाला,"चलो. थोड़ा आगेही खाना खाने रुकना है. आप पहेले दिनसे ही पीछे, तो पूरा ट्रेक पिछेही रहोगे." मी म्हटले,"शिवसिंगजी हम आगे जानाही नही चाहते. आप चलिए. हम आ जायेंगे." तो आपला निघाला पुढे. आम्ही फारवेळ गप्पा मारत बसलो नाही कारण दुपार होउन गेली होती आणि भूका लागल्या होत्या. (इतके खाऊन पुन्हा भूका कश्या लागतात.. काय कळत नाय राव..) जरा पुढे गेलो तर उजव्याहाताला खाली एक ओढा दिसला. तिकडे सर्वजण जेवत होते. आम्ही सुद्धा मोर्चा तिकडे वळवला आणि ओढयाकाठी जेवून घेतले. २ वाजून गेले होते. तिकडून पुढे निघालो आणि फूटादेवलच्या दिशेने निघालो. काही वेळात जंगलाची ह्या बाजूची भिंत दिसू लागली. त्याचबाजुला आमच्या पुढे काही शर्यतीतले ट्रेकर्स दिसत होते. अचानक शिवसिंग डावीकडच्या एका कच्च्या वाटेने आत घुसला. आम्हाला कळले की हा शोर्टकट आहे. आम्ही त्याच्यामागून त्या वाटेने अर्धे अंतर वाचवून एकदम पुढे पोचलो. आता जंगलाची भिंत ओलांडून आम्ही बाहेर पडलो आणि एका टेकडीला वळसा घालून 'फूटादेवल' गावाकडे निघालो. तितक्यात शिवसिंग बोलला. "इस पहाड के बायेसे से जायेंगे. और एक शोर्टकट है. बाकी लोगोंको जाने दो दाये के रास्तेसे" पहिल्याच दिवशी पठ्याला कळले होते की हे कुठल्या पद्धतीचे ट्रेकर्स आहेत ते. शिवसिंगने दाखवलेल्या शोर्टकटने आम्ही १० मिनिट्समध्ये गावाच्या वेशीवर जाउन पोचलो. ते सुद्धा सर्वांच्या पुढे. गावात जैनमंदिराबाजुला असणाऱ्या जागेमध्ये आमची कैंपसाईट सेट केली गेली होती. तिकडे जाउन एका बाजुला सामान टाकले. एका बाजुला झोपणे सोइस्कर होते कारण रात्री चहुबाजूंनी हल्ला झाला की आमची काय गत होणार होती ते आम्हाला माहीत होते.

संध्याकाळ होत आली तसे आम्ही आसपास भटकायला निघालो. जैन मंदिरासमोरच एक पडके शंकरमंदिर होते. तिकडे शेजारी राहणारे पुजारी चक्क मराठी आणि आपल्या 'कल्याण'चे निघाले. नाव लक्ष्यात नाही आता त्यांचे. राजस्थानमध्ये नोव्हेंबर महिन्यात बऱ्यापैकी थंडी असते असे ऐकून होतो. पण आम्हाला मात्र अजिबात थंडी वाजत नव्हती. जेवण बनत होते तोपर्यंत तिकडेच बाजुला असणाऱ्या एका दुकानातून ज्यांना हवे त्यांनी घरी फोन केले. रात्री जेवणानंतर जास्तच धमाल आली. अनुजाच्या मोडक्या डाव्या हाताला आणि माझ्या मोडक्या उजव्या पायाला (सप्टेंबर महिन्यात उजव्या पायाच्या घोट्याजवळ लिगमेंट दुखावल्यामुळे मी दीड महिना घरी बसून होतो. कामावर देखील जाऊ शकलो नव्हतो. पुन्हा कामावर जायच्या आधी थेट ट्रेकला... ) ऐश्वर्याच्या मोडक्या पायाची सोबत मिळाली. त्याचे झाले असे.. की आमचे जेवण सुरू होते तेंव्हा दुरवर कुठेतरी कुत्रे भुंकत होते. त्यावरून मी काहीतरी जोक मारला आणि ऐश्वर्याला हसण्यासाठी तितके कारण पुरेसे होते. खरेतरं तिला हसायला कारण लागत नाही. हसता-हसता ती मागे सरकली आणि धापकन पडली. पाय मुरगळला आणि दुखत होता तरी मध्येच हसणे सुरूच होते तिचे. माझ्या पायासाठी आणलेले एक्स्ट्रा क्रेप बाँडेज तिला दिले लावायला मग. रात्री पुन्हा एकदा ग्रुपमधले म्हातारे (वयाने) आणि काही तरुण म्हातारे (विचाराने) गुडुप झाले. आम्ही फ़क्त ७ जण जागे होतो कैंपफायर करायला. ११ वाजता झोपायला गेलो तेंव्हा घोरण्याची कोंपिटीशन सुरू झाली होती. आज मी घोरणाऱ्या सर्वांच्या अंगावरुन नाचत थैमान घालेन की काय असे वाटत होते. पण तसे काही मी केले नाही. आज मात्र कालपेक्षा सुरात घोरत होते ३-४ जण. भांडत नव्हते. प्रत्येकाने आपापला टाइमस्लोट घेतला होता. इकडून एकदा तर तिकडून एकदा असे आवाज यायचे. मध्येच संजू खोटे-खोटे त्यापेक्षा जोरात घोरायचा... मी, अभि अणि दिपकची हसून हसून पुरेवाट. आमच्यासारखे अजून २-३ पीड़ित होते. राजस्थान मधलेच होते ते तिघे. त्यातला एकजण उठला आणि त्याच्या पासून दुरवर घोरणाऱ्या एकाला त्याने उशी फेकून मारली. घोरणाऱ्या व्यक्ति अचानक शांत झाली, कुस बदलली आणि पुन्हा घोरायला लागली. आता आम्ही असे फुटलो की काही विचारू नका. अखेर रात्री उशिराने पुन्हा एकदा आमच्या झोपेने घोरण्यावर मात केली आणि आम्ही निद्रेच्या अधीन झालो.

उदया सकाळी आम्हाला 'वीरों का मठ' मार्गे कुंभळगड़ येथे पोचायचे होते. कुंभळगड़ - जेथे जन्म झाला महाराणा प्रताप यांचा...

क्रमश: ... पुढील भाग - वीरों का मठ' मार्गे 'कुंभळगड़' ... !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही खादाडीच्या ब्लॉगला आमंत्रण का ठेवले आहे?? तुमचम लिखाण वाचायला आवडतं. वेगवेगळ्या खादाडी स्पॉट्ची माहीती पण होते. परत ओपन कराल का प्लीज?

सुंदर लेख. माझ्या वहिनीने आणि तिच्या मैत्रिणीने हा ट्रेक २ वर्षापूर्वी केला होता. खूप अनोखी मंदीरे आणि गावे बघितली होती त्यांनी त्यावेळी. (त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत.)

एक मुलगी... पुढचा भाग उद्या टाकतो..

रोचीन.. तो ब्लॉग सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे... Happy सुरू करीन लवकरच...

दिनेशदा.. टाक की ते फोटो.... Happy जुने फोटो बघायला मज्जा येईल. किमान मला तरी पाठव... Happy

हिम्सकुल... म्हणजे काय.. YHAI मार्फत आपण अनेक राजांमध्ये जाऊन ट्रेक्स करू शकतो ते सुद्धा अतिशय स्वस्तात...

व्वा! मस्त! कुठे माहिती मिळते अशा ट्रेक्सची?
लिगमेंटची काळजी घे... एकवेळ हाड मोडलेलं परवडलं...लिगमेंटचं दुखणं जास्त वाइट.
पुढचा भाग लवकर टाक.

सॅम ... परेलला ऑफिस आहे YHAI चे. मडके बुवा चौकात. तिकडे सर्व ट्रेक्सची माहिती मिळते...

आणि २ वर्षे झाली रे ह्या ट्रेकला.. पाय आता बरा आहे त्या नंतर बरेच ठिकाणी उनाडक्या करून आलोय.. Lol

सुंदर माहिती दिलीस. जैन मंदिराचा फोटो फार भारी, ट्रेक करतानाचे प्रसंगपण मस्तच.
नाव सार्थ करतोयस अगदी.. पक्का भटक्क्या Happy