रानकंद - करांदे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 June, 2010 - 03:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करांदे धुवुन काप करुन
आपट्याचा पाला
राखाडी
मिठ (जाडे असल्यास चांगले)

क्रमवार पाककृती: 

कापलेले करांदे राखेमध्ये घोळवुन तो पातेल्यात आपट्याचा पाला मध्ये मध्ये घालून रचावे. टोपाच्या कडेने करांदे बुडे पर्यंत अलगद पाणी टाकावे आता हे उकळवत ठेवावे. उकळी आली की पाणी काढुन टाकावे (टोपावर झाकण ठेउन टोपाच्या दोन कडांना झाकणा सकट धरुन उतरते धरुन पाणी काढावे). हे पाणि एकुण दोन वेळा काढावे. तिसर्‍या पाण्यात मिठ घालावे व करांदे शिजवुन घ्यावेत. मग हे पुर्ण गार झाल्यावर स्वच्छ धुवुन खायला घ्यावेत.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे
अधिक टिपा: 

करांदे हे मातीने भरलेले असतात. त्यामुळे ते पहिला स्वच्छ धुवुन घ्यावेत. हे चवीला कडवट असतात. त्यामुळे सगळ्यांनाच आवडतात असे नाही. पण ज्यांना आवडतात ते अजुन अजुन मागुन खातात. ह्याला वापरणारी राखाडी लाकडांची असते.

माहितीचा स्रोत: 
आईची किमया.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो टाक ना. मी करांदे म्हणुन ज्यांना ओळखते त्यांना उकडताना असला खटाटोप करत नाही. सरळ बटाट्यासारखे उकडते आणि मटकावते.

थोड्या वेळात टाकते ग. सध्या बिझलेय कामात आणि जेवायचही आहे. ते उकडून नुसते खाण्याचेही वेगळे असतात. ते कडू नसतात. हे कडू असतात म्हणून हा खटाटोप करावा लागतो.

हे आहेत धुतलेले करांदे.
Karanda 1.JPG

हा आहे आपट्याचा पाला जो आपण दसर्‍याला सोने म्हणुन वाटतो.
Apata 2.JPG

ह्या आहेत कापलेल्या करांद्याच्या फोडी.
Karanda 3.JPG

अश्या प्रकारे राखाडीत घोळवायच्या.
Karanda 4.JPG

आपट्याचा पाला घालून अश्याप्रकारे ह्या फोडी रचायच्या.
Karanda 6.JPG

अश्या प्रकारे पाणी घालुन उकळवावे.
Karanda 7.JPG

दोनदा पाणी बदलल्यावर मिठ घातलेल्या पाण्यात उकळवुन काढल्यावर स्वच्छ धुतलेल्या करांद्याच्या फोडी.
Karanda 8.JPG

हे करांदे खाल्ले नाहीत. हे क्लस्टर करांदे आहेत Happy माझेवाले एकेकटे असतात. तेही कधीकधी कडु निघतात. पण चेंज म्हणुन खायला बरे लागतात. इथे नाही मिळत, मे महिन्यात कोणी गावी गेले तर येतात घेऊन.

बाकी हा चांगला उद्योग सुरू केलायस तु.. पदार्थ करायचा आणि शिवाय फोटोही काढायचे. ह्या भाज्या/रानकंद निदान फोटोत तरी दिसतात तुझ्यामुळे. बाजारातुन सगळे गायबलेय आता Sad

जागु आमच्याइथे मिळतात त्यांना आम्ही कारिंदे म्हणतो आणी ते पण मी एकदा धुवून कुकरला शिजवून खाते. माझ्या नवर्याला आणी सासर्र्यानाही खुप आवडतात , आयव नवमीला आम्ही करतो ही फळ .

आमच्या कोकणात ह्याला कचरा म्हणतात आणि आम्ही उकडून खातो. पण कडवट नाही लागत. थोडासा वॉटर चेस्टनटसारखा लागतो. चिखलात उगवतात.

जागू, मस्त लागतात ते. याचा वेलपण मी बघितला आहे. तळ्यातला एक कंद असतो, त्याला कचरा असेच नाव आहे. तो पण असा उकडून वा भाजून खातात. काटी कणंग पण अशीच भाजून खातात.

डॉ. राणी बंग यांचे गोईण पुस्तक वाचलय का ? त्यात असे बरेच कंद व भाजीपाला यांची माहीती आहे पण त्यात चित्र वा फोटो नसल्याने, त्यांची ओळख पटत नाही. इथे मात्र फोटोसकट ही माहिती संकलीत होतेय.

ह्यात दोन प्रकार असतात जागू. एक खाजरा त्याला खाज जाण्यासाठी उपाय करायला लागतात आणि दुसरा साधा जो नुस्त मीठ लावून उकडला तरी खाता येतो.

ओह करांदे... मस्तच आताशी मेजवानी असते गावाकडे मला हे चुलित भाजुन खुप आवडतात अहा काय लागतात मस्तच!! Happy

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

आर्या ह्याची चव कडवट पण जरा वेगळीच असते. नक्की सांगता येत नाही कशासारखी ते.

आमी, नुतन हे करांदे नुसते खाण शक्य नसत म्हणजे राखाडी, आपट्याचा पाला टाकुन तिन पाण्यातुन काढल्यावर त्याचा कडवटपणा कमी होतो. भाजीत किंवा नुसते खाता येत नाहीत हे. नुसते खातात ते करांदे गोडे करांदे असतात. ते इतके कडू नसतात. डोंगराळ, ओसाड जमिनीत हे सापडतात. ह्याची वेल असते मोठि झाल्यावर त्या वेलीलाही छोटे छोटे करांदे लागतात.

मोनोती, कदाचित मिळत असतील कर्जतला हे. ह्याला कारिंदे करांदे म्हणतात. जसा गाव तशी भाषा बदलते.
आर्च कचरा हा वेगळा असतो. तो कडू नसतो व टणक असतो. करांदे उकडल्यावर बटाट्याप्रमाणे मऊ होतात.

दिनेशदा पुस्तक शोधुन वाचेन मी.

असुदे माझ्या माहीतीप्रमाणे करांद्यांना आजिबात खाज नसते. ते दुसर असेल काहीतरी.

बी, खरच धाडसाचच काम आहे हे. अस म्हणतात की एखाद्याच्या हातुनच हे कमी कडू होतात. त्यामूळे ज्यांच्या घरी आज्या आहेत त्याच बहुतांशी करतात. ( मी आमच्या घरची आजी आहे बहुतेक :हाहा:)

भावना, वेलीला जे छोटे छोटे करांदे लागतात ते चुलीत भाजुन खातात.

मस्तच लागतात हे करांदे.. आवडतात Happy , पण मला फक्त उकडायचे किंवा चुलीत भाजून माहिती आहेत.

आपट्याच्या पालाचा काय उपयोग ? काहि फरक पडतो का स्वादामध्ये... Happy

जुई आपट्याचा पालाही पचनासाठी चांगला असतो असे मी ऐकले आहे. कदाचीत त्याने कडूपणाही कमी होत असेल.

ही जागु काय गेल्याजन्मी ऋषीपत्नी/ऋषीकन्या होती की काय?

अश्विनी, मलाही तुझ्यासारखाच संशय येतोय.
अग कारण मला झाडा पानांची खुप हौस आहे. कुठेही शेतजमीनीत किंवा रानासारख्या जागेत गेले की मी वेगवेगळी झाड शोधतच असते.

आमच्या कडे आयुर्वेदीक डॉ. आहेत त्यांच्याकडे मी आई सोबत औषध आणायला जायचे तेंव्हा त्यांची औषधे झाडांच्या फांद्याचे तुकडे, बिया तोडून केलेली असायची. मी त्यातील मला जे ओळखता यायचे ते सांगायचे. त्यांनाही आश्चर्य वाटायच. त्या मला सांगायच्या की तु पण माझ्यासारखी डॉ. हो. पण मी तेवढी कुठे हुशार ? खर म्हणजे मला कृषी विद्यापिठात जायच होत. पण ती सोय आमच्याइथे नव्हती. रत्नागिरित होती. त्यामुळे ते शक्य नव्हत.
माहेरी आमची वाडी आहे. लग्ना आधी मी इकडून तिकडून झाड गोळा करुन स्वतः लावायचे व त्यांची निगा राखायचे. लग्नानंतर २ वर्ष मी माझ्या सासरी भरपुर झाड लावली मग श्रावणी झाल्यापासुन बंद पडल सगळ आता परत चालू केलय. आता श्रावणीही माझ्याबरोबर येते मी खड्डा केला की ती त्यात बी टाकते.

करांदे किंवा खुपसे कंद हे थोडे विषारी असतात. त्यात थोडेसे सायनाईड असते. कोवळे असताना ते प्राण्यांनी खाऊ नये म्हणुन निसर्गाने अशी सोय केलेली असते. अगदी बटाट्यातही खास करुन त्याचा हिरवट भाग असतो तिथे, बांबूच्या कोवळ्या कोंबात ते असते. पण भरपूर पाण्यात ते धुवून, शिजवून घेतल्यास त्यातला विखार निघून जातो. राख लावायचे कारण पण हेच. मला नीट वाचल्याचे आठवत असेल, तर हे कंद कापून, त्याची पुरचुंडी बांधून गिरिवासी वाहत्या पाण्यात एक दोन दिवस ठेवून देतात.

मला वाटते या करांद्याचे दोन प्रकार असावेत, एका प्रकारचे वेलाला (जमिनीवरती) लागलेले मी बघितले आहेत. ते उकडून वा भाजून खाता येतात. त्याला इतके सोपस्कार लागत नाहीत. मूळे सोडले तर त्याचे रुप असेच असते.

दिनेशदा कंदमुळांची खुप छान माहीती सांगितलीत. ऋषी कंदमुळ वाहत्या पाण्यात ठेवायचे हे मी पण ऐकलय.
दिनेशदा ह्या करांद्याच्या दोन जाती आहेत. एक कडू आणि एक गोड. गोड करांदे नेहमी बाजारात विकायला असतात. पण कडू करांदे हे पावसाच्या सुरुवातीलाच येतात. पावसाची पहिली धार पडली की ह्याची वेल बाहेर येउ लागते. त्या वेलीला पान यायच्या आत हे करांदे काढले की चविष्ट लागतात. पान आल्यावर ते कडक होउन त्यांना जास्त चव लागत नाही. ह्याच्याही वेलीवर छोटे करांदे येतात. तेही कडु असतात. ह्या कडू करांद्यातही दोन प्रकार आहेत. लाल मातिचे म्हणजे डोंगरातले करांदे कमी कडू व पिठुळ आणि जास्त चविष्ट असतात. पण रानातील करांदे हे जास्त कडू असतात. पण ह्या दोन्ही करांद्यांना वरिल सोपस्कर करावेच लागतात. नाहीतर अगदी कारल्याएवढे कडू लागतात हे.

गोडे करांद्याची लागवड केली जाते. ते करांदे डायरेक्ट उकडुन खातात.

जागु आणि दिनेशदा, या सर्व भाज्या, झाडे,बिया, याबाबत काही माहीती देणारे पुस्तक तुम्हाला माहीत आहे ?

चुकुन प्रतिसाद पडला

नवीन Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 June, 2018 - 14:50

असुदे, त्यामुळे पुन्हा एकदा कारिन्दे वर आले आहेत मोसमात Happy

वा जागुताई. आम्ही याला करांद्याची कापं म्हणतो. गुळ खोबरं घालून चांगले लागतात. आमच्या शेजारचे काका बनवतात तेव्हा आम्हाला पण देतात. पण कसं बनवतात ते आज कळलं.

Pages