साद सह्याद्रीची

Submitted by मेघनाद नाटेकर on 23 May, 2010 - 08:26

ह्या कथानकावर कोण किती विश्वास ठेवेल हे मला माहीत नाही, आणि ठेवावा असा माझा आग्रहही नाही. पण जे काही घडले ते माझ्या साठी नक्कीच अद्भुत होते. निसर्ग मनकवडा असतो का? Man Desires - Universe Conspires हे जे म्हणतात ते कितपत खरे आहे? अनेक प्रश्न आणि उत्तरे मात्र शून्य. इयत्ता ७ वी पासून मी अव्याहत हिंडतो आहे. पण गेली ५ वर्षे म्हणजे सुवर्णकाळ. गड, किल्ले, डोंगर, घाट हे जीवनातले महत्त्वाचे घटक झाले. रोटी, कपडा, मकान प्रमाणेच बॅकपॅकिंग आणि ट्रेक्स ही जीवनातली मूलभूत गरज झाली. जे मित्र भेटले ते ही सर्व असेच. पायाला सतत भिंगरी लागलेली. मग त्यातूनच Private Wilderness ही संकल्पना उदयास आली. पण मध्यंतरी एक अद्भुत घटना घडली. त्याचे असे झाले -----

साधरणतः दोन वर्षां पूर्वीची गोष्ट असेल. ऑफिस मध्ये दुपारी चहा घेता घेता अचानक पणे प्रोजेक्ट मॅनेजरने विचारले - "तानाजी मालुसरेंचे गाव कोणते रे? "

ह्या जरा Out of the Box प्रश्नामुळे मी हडबडलोच. नक्की काय झाले आमच्या मॅनेजर ला? आमचा वीकएंण्ड ट्रेक चा उत्साह आणि बॅकपॅकिंग ट्रेल्स बद्दल मॅनेजर्सनी अनेकदा विचारणा केली होती, पण हा असा ऐतिहासिक प्रश्न मी प्रथमच ऐकत होतो. मलाही पटकन आठवेना. म्हटले, "जरा पाहून सांगतो. "

मित्राला फोन करून खात्री करून घेतली आणि मॅनेजरला सांगून टाकले - "उमरठ".

तर मॅनेजरचा आणि एक प्रतिप्रश्न - "महाबळेश्वर च्या पायथ्याचे ना? कोंकणांतले? "

म्हटले "हो तेच. "

"तुला माहीत आहे का - तानाजी मालुसरेंचा पार्थिव देह कोणत्या वाटेने कोंकणांत नेला ते? पानशेत बॅकवॉटरच्या मागे रुट आहे तो. कोंकणात उतरते ती वाट. "

मॅनेजरने माझी झोपच उडवली. अनपेक्षित असा प्रश्न. उत्तर मलाही माहीत नव्हते, ना माझ्या इतर बॅकपॅकर्स मित्रांना. युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. ही जागा शोधलीच पाहिजे. पानशेत परिसर तसा हिंडून झाला होताच, पण हे कुठेच ऐकायला मिळाले नव्हते.

पानशेतच्या मागे घाटमाथ्यावर कोकणदिवा शिखर आहे. त्याला खेटूनच कावळ्या घाट खाली कोंकणात उतरतो. मला वाटले की हाच तो ऐतिहासिक घाट. कारण ह्या वाटेने खाली उतरले की समोर रायगड उभा. तेथून महाड - उमरठ असा तानाजी मालुसरेंच्या पार्थिवाचा प्रवास झाला असावा. ह्या वाटेला फारसे कुणी जात नाही आजकाल, इतकेच काय, तर पानशेत पासून पुढे धड गाडीवाटच नाही (हल्लीच हा रस्ता सुधारला आहे). कच्चा रस्ता मागे घोळ गावापर्यंत जातो. हा ४५ कि. मी चा प्रवास म्हणजे Bike and Biker दोघांचे पण patience पाहतो. Dirt Biking / Mud Biking / Dessert Biking असा तिहेरी प्रवास संपवून घोळ पर्यंत पोहोचताना नाकी नऊ येतात (त्यात शेवटी शेवटी तर Bike हातात घेऊन वर चढवावी लागते. भुसभुशीत माती मधून टायर पुढे सरकायचे नावच घेत नाहीत).

१ मे चा दिवस. सकाळीच निघालो. कावळ्या घाट पाहायचाच होता. घोळ गावी पोहोचेसतोवर सूर्यनारायण चांगलाच वर आला होता. असह्य उकाडा. Dirt Biking मुळे bike आणि मी, दोघेही लाल झालो होतो. पण कोकणदिवा - कावळ्या घाट पाहायचा उत्साह जोरदार. घाट मुखाशी पोहोचलो पण खाली कोकणामध्ये उतरलो नाही कारण वेळ नव्हता. पण नक्की हाच का तो घाट? हीच का ती वाट? काहीच कळले नव्हते. फक्त इतकेच माहीत होते की ट्रेक मस्त झाला आहे. रात्रीस परत फिरलो. परत एकदा तो ४५ कि. मी चा प्रवास. अंधारात.

त्यानंतर इतर सर्व घाटवाटांकडे नजर गेली. तानाजी मालुसरेंच्या पार्थिव प्रवासाचे थोडे विस्मरणच झाले. पुढे एकदा वाचनामध्ये (बहुदा गो. नि. दांडेकरांचे 'झुंजार माची') मढेघाटाचा उल्लेख आढळला. तोरण्याच्या मागच्या बाजूस १९ कि. मी दूर. नंतर बरेचदा पानशेत मार्गे पाबेघाटातून तोरणा रस्त्यावर येता जाता -"मढेघाट - ३६ कि. मी. " अशी पाटी वाचनात आली. तानाजी मालुसरेंचे पार्थिव म्हणजेच बोली भाषेत 'मढ' ज्या वाटेने कोंकणात नेले तोच हा ऐतिहासिक मार्ग. इतर वाचनामधून पण हे नक्की झाले होते.

पुढे काही ना काही कारणास्तव मढेघाटात जाणे जमलेच नाही. पण तो घाट पाहायच्या इच्छेत जराही कमी आली नाही. आणि अचानक लाँग टर्म साठी ऑनसाइट जाण्याची वेळ आली. ऑफिसच्या कामामुळे झोप उडाली होतीच. जेव्हा झोप लागायची तेव्हा फक्त डोंगर आणि ट्रेक्सचीच स्वप्ने पडायची. हे सर्व एक वर्षा साठी सोडून जावे लागणार ह्या विचारानेच धडकी भरायची. गो. नि. दांडेकरांच्या 'रानभुली' मधील मनी प्रमाणेच माझी अवस्था होत चालली होती. नंतर काही दिवसांनी मला जाणवले की, स्वप्नामध्ये एकच जागा फारच ठळकपणे दिसत आहे. नंतर २-३ ठिकाणे ठळक पणे दिसू लागली. एक गड, त्याच्या माथ्यावर पडलेली सायंकाळची सूर्यकिरणे, त्या गडाच्या मागून उगवणारा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र; अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्यरांगा, आणि त्यावर पडलेली कोवळी किरणे. ह्यातले कुठलेही दृश्य मी वास्तवात आधी कधीच पाहिले नव्हते. बहुतेक सर्व गडांचे आकार माहीत असल्याने ते ही नीट ओळखता येतात, जे गड पाहिले नाहीत, त्यांचे फोटो नीट लक्षात राहतात (Thanks to 'Sahyadri Companion'); पण ही दृश्ये मला नवीन होती. काहीतरी अद्भुत, न पाहिलेले, अनोळखी. कुठे असेल ही जागा? कोणता हा गड? की सर्वच काल्पनिक?

जाण्याआधी दोन वेळा रायगडाची वारी झाली होतीच. विविध Private Wilderness ना सतत भेटी चालू होत्याच. पण मढेघाटाचा बेत काही केल्या जमून येत नव्हता. सांदण व्हॅली - कारोली घाट - रतनगड करायचा होताच, मुंबईकरांबरोबर प्लॅन झाला होता. त्याआधी वेळ जमवलाच आणि आमच्या बॅकपॅकर समाजामध्ये साद घातली "मढेघाट" म्हणून. दोन डोकी लगेच तयार झाली. पण काही कारणास्तव नाही जमले. दोघेही येऊ शकले नाहीत. मग एकटाच निघालो. पाबेघाट पार करून पलीकडे उतरे पर्यंत नारायणाने पश्चिमार्गक्रमण सुरू केले होते. वेल्ह्यात पोहोचलो. भूक नव्हतीच, पण आम्हा भटक्यांच्या परंपरेला जागून 'तोरणा विहार' मधली एक मिसळ घशाखाली ढकललीच. सूर्यास्ता अगोदर मढेघाट गाठणे गरजेचे होते. १९ किमी..... लागलीच निघालो. पुढे रस्ताही बराच खराब होता. हरपुड फाटा पार करून पुढे आलो.

पुढे काही पॅचेसमध्ये रस्त्याची अवस्था फारच बिकट होती. त्या मोडक्या रस्त्यावर हिंदोळत, अखेर 'केळद'ला पोहोचलो. सह्याद्री घाटमाथ्यावरचे अखेरचे गाव. म्हणजे आता थोडेसेच पुढे गेले की आलाच मढेघाट. अधाशीपणे निघालो. ५ मिनिटांत घाटमाथा आला. गाडी पार्क करून अगदी सह्यकिनाऱ्यावर जाऊन उभा राहिलो. तळ कोंकण न्याहाळीत. विस्तीर्ण पसरलेला कोकणपट्टा, समोर मावळता सूर्य, उजवीकडे खाली कोंकणांत उतरणारी मढेघाटाची पायवाट, आणि डावीकडे....... अरेच्च्या!!! हेच दृश्य मी नुकतेच स्वप्नात पाहिले होते की. (देजावू म्हणतात ते हेच का? )

अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्यरांगा. त्यांच्या माथ्यावर खेळणारी सायंकाळची मोहक किरणे. म्हणजेच मी स्वप्नात पाहतं असलेली रेंज शिवथरघळची होती तर. मढेघाटातून दिसणारी!! What a pleasent surprise! माझी खात्रीच पटली की स्वप्नात दिसणारी बाकी सर्व दृश्ये वास्तवात इथेच कुठेतरी असली पाहिजेत. सूर्य मावळत होता. वेळ फारच कमी होता.

गाडी स्टार्ट करून परत उलटा निघालो - वेल्ह्याच्या दिशेने. तसेही आजचा मुक्काम परत मढेघाटामध्येच होता आणि सकाळी लवकर उठून खाली कोंकणांत सुद्धा उतरायचे होते. त्यामुळेच आजचा हाताशी असलेला सूर्यास्तापूर्वीचा वेळ, माझ्या स्वप्नांतील वास्तवाचा शोध घेण्यासाठी सत्कारणी लावणे भाग होते.

केळद मागे टाकले. एका विस्तीर्ण पठारावर थांबलो. समोर अजस्र तोरणा. सायंकाळची लाल किरणे अंगावर घेत अस्ताव्यस्त पहुडलेला. फक्त मी गडाच्या पाठीमागच्या अंगाला असल्याकारणाने, तोरण्याचा 'बुधला' मला नाकासमोर दिसत होता. फारच मोहक. परत एकदा खात्री पटली की स्वप्नात दिसणारा गड अजून कोणताही नसून तोरणाच होता, फक्त पाठीमागच्या अंगाने दिसल्या कारणाने मी तो ओळखू शकत नव्हतो. ह्या अंगाने कधी तोरण्याचे छायाचित्र पण पाहण्यात आले नव्हते. खरंच जे घडत होते, सर्वच अद्भुत होते. पण ह्या बॅकड्रॉप मध्ये एक कमी होती. पौर्णिमेचा चंद्र!! खरंच जे स्वप्नात पाहिले तेच दिसेल का? लगबगीने बॅकपॅक मधून GPS काढला. Moon Phase चेक केली. आणि तीनताड उडालोच. 'Full Moon Phase' आता ह्याला काय म्हणावे? योगायोग?

GPS च्या सांगण्यानुसार Moon Rise नुकताच झाला होता. पण चांदोबा अजून तोरण्यापलीकडे होता. 'पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त' असे म्हणत खाली बैठक मारली. सूर्य अजूनही पुरता मावळला नव्हता. तोरण्यावरची लाल छटा अधिकच गडद झाली. आणि काहीच सेकंदात चांदोबाने तोरण्यामागून डोके वर काढले. तो उगवता मोठ्ठा पांढरा गोळा, मावळत्या सूर्याच्या छटेने गुलाबी वाटत होता. हेच हेच ते दृश्य. आज स्वप्न सत्यात उतरले. इतके दिवस सह्याद्री मला साद घालत होता. मी आज प्रतिसाद दिला. माझा अजूनही विश्वास बसत नाही ह्या गोष्टीवर. खरंच अद्भुत. मन हलके झाले होते. ह्या विश्वात, ह्या निसर्गात मनुष्यप्राण्याचे स्थान काय? हे हे हे! क्षुद्रतेची लाट अंगावरून सरकली. हळूहळू सर्व विचार गळून पडले. राग, लोभ, क्रोध, आसक्ती, मोह ह्या सर्वांतून मी हलकेच वर उचलला गेलो. स्पिरिच्युअल अपलिफ़्ट. मी फक्त तोरण्याकडे अचंबित होऊन पाहतं सत्याचा अनुभव घेत होतो. स्थिर आणि दिग्ड्मुढ.

सूर्य पूर्णपणे अस्तास गेला. चंद्रप्रकाशाने आता भूमी उजळली. मी भानावर आलो. गाडी घेऊन परत केळद मध्ये पोहोचलो. एक मोठा कॅनभरून पाणी घेतले. मुक्कामपोस्ट मढेघाट. टेंट लावून खिचडी शिजवायला टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर मढेघाटातून खाली कोंकणात उतरायचे होते. झोप लागलीच नाही. परत विचारचक्र सुरु.

मढेघाट हे फक्त निमित्त होते का? निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी? माझ्याकडे ह्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. आणि कधीच मिळणार नाहीत. काही प्रश्न अनुत्तरितच चांगले वाटतात. ज्या ठिकाणी माणसाची विचार करायची क्षमता संपते त्या ठिकाणी मनुष्य वाटेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार होतो. ह्यालाच अंधविश्वास असे म्हणतात. माझ्याबाबतीत जे घडले ते अद्भुत नक्कीच होते. पण माझे वैचारिक मन आजही कोड्यात पडते. मनाचे समाधान म्हणून मी ह्या घटनेला योगायोग म्हणेन. पण निसर्ग असाच कधीतरी कुठल्यातरी रूपांत आपल्या वैयक्तिक जीवनात डोकावतो आणि 'मी' पणा नाहीसा करून जातो. कोण मी? माझी लायकी काय? This experience made me feel so inferior and such a small part of existence. निसर्गा बद्दल चा माझा आदर आता अधिकच दृढ झाला आहे. माझा मढेघाटाचा long awaited शोध एका अविस्मरणीय अनुभवाबरोबर पूर्ण झाला होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मित्रा अद्भुत आहेस. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे म्हणतात, पण स्वप्नी दिसलेले प्रत्यक्षात जसेच्या तसे दिसणे हे केवळ अफलातून आहे. त्यावेळी अंगावर काटा आला असेल.
जबरदस्त अनुभव. पुन्हा अशी काही स्वप्ने पडली तर कळवा आम्ही पण येऊ तुमच्या स्वप्नांच्या मागे.

मित्रा ashu, अशा प्रसंगांमधे फोटो काढायचे भान राहातच नाही. हे प्रसंग फक्त प्रत्यक्षात अनुभवायचे असतात.

मेघनाद असा अनुभव येऊ शकतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कदाचित एका गोष्टिचा ध्यास घेतल्याने असे होत असे. माझ्या भटकंतीत, असे अनुभव अनेकदा येतात, एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर असे प्रकर्षाने जाणवते, कि हे आपण आधी पाहिलेय, आपण इथे आलो होतो.
खुपदा ठरवले कि अश्या स्वप्नांचा मागोवा घ्यायचा, पण ते जमत नाही. एखादे स्वप्न नंतर दोन तीन दिवस डोक्यात घोळत राहते. ते दृष्य डोक्यात अगदी चपखल बसलेले असते, थोड्या दिवसात विसरलेही जाते, आणि ते ठिकाण प्रत्यक्ष दिसले कि ते सगळे आठवते.
पण या अनुभवाप्रमाणे त्याच्या मागे काही कारण आहे का ते कधी लक्षातच येत नाही. अपवाद फक्त एका दृष्याचा. माझी आई मलकापूरची तर वडील राजापूरचे. माझे आजोबा आणि त्यांची आई व्यापाराच्या निमित्ताने, मलकापुरहून पायी राजापूरला जात. आणि त्या ओळखीतूनच माझ्या आईवडीलांचे लग्न ठरले.
इतक्या वर्षात कधी विशाळगडावर जाणे झाले नव्हते (माझ्या दोन्ही आज्या विशाळगडावरच्या ) दोन वर्षांपूर्वी तिथे गेलो होतो. तिथे आता जो पूल आहे त्याच्या एका बाजूला पठार तर दूसर्‍या बाजूला कोकणात उतरणारी वाट आहे. आता तिथे घनदाट जंगल आहे, पण त्या पूलावर प्रकर्षाने मला जाणवले कि या वाटेने आपण गेलो आहोत. आता ती वाट वहिवाटीची नसल्याने कुणी जात नसेल, पण मला खात्री आहे जर कधीकाळी त्या वाटेने जायला सुरवात केली, तर मला प्रत्येक वळण आठवेल.
बस या निमित्ताने ते सगळे आठवले.

छान अनुभव. स्वप्न तसंच अर्ध्यावर न सोडता त्याचा पाठपुरावा केलात त्याबद्दल अभिनंदन.

खरंच अद्भुत!!!!
स्वप्न तसंच अर्ध्यावर न सोडता त्याचा पाठपुरावा केलात त्याबद्दल अभिनंदन.>>>> आडोला अनुमोदन.

तुमचा लेख वाचला, छान लिहीलत .अनुभव अगदी सुंदर उतरला आहे!
मलाही असेच अनुभव येतात,पण एक माझ्या लक्षात राहीलेला सांगते,तीन वर्षांपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो, जयपूरला गायत्रीदेवींचा राजवाडा आहे तिथे आम्ही फिरत होतो, अचानक एका मोठ्या भांड्यापाशी मी थांबले,तो एक प्रचंड मोठा हंडा होता!पूर्वीच्या काळी त्यातून गंगाजल आणले जायचे असे आम्हाला गाइडने सांगितले,आम्ही सगळे तो पहात होतो,मी मात्र अवाक होऊन इभी! इथे मी काही दिवसांपूर्वी आले होते, मी हे पाहीलय इथल वातावरण माझ्या परीचयाचे आहे अस मला सारखं वाटायला लागलं आणि मी भयंकर अस्वस्थ झाले, अशासाठी की कस शक्य आहे मी इथे येणं? इतक्या दूरवर राजस्थानात?
पण मला कुठे चित्रात,टिव्हीवर पाहिल्याचे स्मरत नव्हते!
काय असावे ते या विचाराने मी आजही अचंबीत होते!

माझ्या ही बाब्तीत अस घड्ल् य , मला कळाय्च कि या नन्तर ही व्यक्ति अशी क्रुती करेल पन सन्गीतल तर तस होणार नाहि अस वाटुन मि गप्प बसे.....आणी मग मनोमन हसे........
भ्रमन कमि झाल्यपासुन आता घड्त नाही..........
ही मनाची ओधच् कदाचीत १
लेख खुप आवड्ला !
तोरणा आश्या बाब्तित प्रसिधद आहे...........(च क वा)

तुमचा अनुभव वाचून २मिनीट स्तब्ध झाले!
खरचं _अस स्वप्न सत्यात उतरलेलं पाहुन सहि वाट्लं असेल !
It happens in reality and is great to experience!
माझहि असं repeated पडणारं एक स्वप्न आहे_एका सुरेख सह्यद्रिच्या कड्याचं!
As far as i remember मि तिथे कधिच गेले नाहिये!
आता खरचं शोध घेण्याची इच्छा आहे!
Thanks for inspiration Happy

कोकणदिव्याचा शोध घेतांना हे गवसलं.. म्हटलं याला वर खेचलंच पाहिजे! Happy
हा परिसरच भारलेला आहे.... अत्यंत सुरेख लेखन. मस्त.

जबरदस्त अनुभव.... आणि वर्णन पण छान आहे.

हेम धन्यवाद हे वर आणल्या बद्दल. तुझ्या मुळे माझ्यासारख्या नविन माबोकरांना एक छन लिखाण वाचायला मिळालं Happy